Feb 18, 2009

`राजा' माणूस!

काही माणसांचं वैशिष्ट्यच असं असतं, की ती थेट काळजात घुसतात। सर्वार्थानं ती परिपूर्ण असतात, किंवा आदर्श असतात असं मुळीच नाही. पण त्यांच्यातला एखादाच गुण एवढा जोरकस असतो, की रूढ अर्थानं असलेले इतर दुर्गुण त्यापुढे झक् मारतात!

राजा रेवाळे हा आमचा असाच एक कॉलेजमधला मित्र। अकरावीत प्रवेश घेतल्यापासून सगळं जगच बदललं होतं. एकतर शाळेतली शिस्त, नियमित अभ्यास, घरच्यांचा धाक, कायमचं लक्ष, या सगळ्यातून स्वातंत्र्याचा अनुभव घेत होतो. परिणाम व्हायचा तोच झाला. शाळेत दहावीपर्यंत कधी स्वाध्यायात सुद्धा नापास झालेल्या मला अकरावीतल्या पहिल्याच चाचणी परीक्षेत पंचवीसपैकी एक, दोन असे गुण मिळायला लागले. अकरावी कशीबशी काढली आणि बारावीत चक्क नापास झालो. पुन्हा बारावी परीक्षा द्यायची ठरवली, तीपण सगळे विषय घेऊन. मी मेडिकलला वगैरे जाणार, अशी आशा घरच्यांना आणि मला तेव्हाही होती! म्हणूनच "ग्रुप'मध्ये चांगली टक्केवारी मिळवण्यासाठी सगळे विषय घेऊन पुन्हा बसण्याची खुमखुमी होती.

वाईटातून काही चांगलं होत असतं म्हणतात। राजा रेवाळेचा आणि माझा परिचय याच वर्षी झाला. आधी केवळ चेहरा ओळखीचा होता, पण थेट संबंध आला नव्हता. तोही असाच बारावीत पहिल्या वर्षी गटांगळी खाऊन माझ्या जोडीला पुन्हा सर्व विषय घेऊन बारावीला बसला होता. मग आम्ही दीडशहाण्या रिपीटर्सची टीमच जमली! सगळे विषय आम्हाला आधीच कळलेत, आता फक्त उरलेय ती उजळणी, असाच आमचा पवित्रा असायचा. त्यामुळं वर्गात पुन्हा तेच विषय "समजून' घेण्याची आम्हाला काहीच गरज नव्हती! मग कुठे कॉलेजच्या गेटबाहेर उभं राहून पोरींची टवाळी कर, कधी ग्राऊंडवर टाइमपास कर, असे उद्योग चालायचे.

पुलंच्या "रावसाहेब'मध्ये सगळ्यात जास्त दंगा रावसाहेबांचा असे, तसाच दंगा आमच्या ग्रुपमध्ये "राजा' करायचा। त्याची विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा अफाट होता. विनोदाला फार काही दर्जाबिर्जा होता, असं नव्हे. पण कॉलेजातल्या टिंगलटवाळ्यांमध्ये तो अव्वल होता. वर्गात कधीमधी चुकून बसलोच, तर सर काहीतरी शिकवत असताना राजाच्या एखाद्या कॉमेंटवरून जी खुसपूस व्हायची, ती सरांच्या नजरेतून न सुटणारी असायची. मग एकेकाला वर्गाच्या बाहेर तरी जावं लागायचं, किंवा ओरडा खायला लागायचा. बरं, एवढं करून हा नामानिराळाच राहायचा.

राजाला उगाच डिवचणं आणि त्याच्याकडून शब्दांचा यथेच्छ मार खाणं, हे भाग्याचं लक्षण होतं। काही जण मात्र नकळत त्याच्या शेपटीवर पाय द्यायचे आणि मग आठ दिवस त्यांना तोंड दाखवायला जागा उरायची नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी ऐकून असलेल्या एका नवख्या पोरानं असंच एकदा राजाला डिवचलं.... "काय राजा, लग्न केलंस म्हणे! 'एखाद्यानं काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं असतं.

राजा लगेचच म्हणाला। "म्हंजे काय? तुला माहित नाही? पोरगं पण झालं! घरी ये, "खरवस' खायला! 'आता, एखाद्याला हा विनोद अश्लील, दर्जाहीन वगैरे वाटू शकेल. पण त्यावेळी आम्ही गडबडा लोळलो होतो.मुलींशी बोलण्याची त्या काळात चोरी होती. कॉलेजात असलो, तरी आमचे मुला-मुलींचे ग्रुप वगैरे नव्हते. ग्रुप म्हणजे एकतर मुलांचा, किंवा मुलींचा. वेगवेगळा. एखादा मुलगा गॅलरीत मुलीशी बोलताना दिसला, की त्या प्रक्रियेला आमच्या शब्दकोषात "गूळ पाडणे' असं नाव होतं. मग एखादा मुलगा जास्तच चिकटलेला दिसला, की आम्ही त्याच्या समोरच्या गॅलरीत किंवा काही अंतर राखून जवळ उभे राहून पाठीवरून गुळाची पोती भरून नेल्याची ऍक्शन करायचो. तो तिच्याशी गुलुगुलू करून परत आला, की राजा त्याला हळूच म्हणायचा. "जपून रे! डायबेटिस होईल! ' नवखा असला, तर त्या बिचाऱ्याला काहीच कळायचं नाही.

"नेचर क्लब'च्या नावाखाली आम्ही भटकंतीला जायचो, तेव्हा गणपतीपुळ्याच्या एका ट्रेकदरम्यान तो नदी पार करताना खोल पाण्यात जाऊन बुडायला लागला होता। दोघातिघांनी हात दिल्यावर सावरला. तेव्हाची त्याची अवस्थाही पाहण्यासारखी होती. नंतर स्वतःवरच विनोद वगैरे करून त्यानं त्या घटनेचंही बरंच भांडवल केलं.कॉलेजच्या गॅदरिंगलाही हवालदाराचं सोंग आणून त्यानं धुमाकूळ घातला होता. मी त्या वेळी "बाई' झालो होतो आणि राजाच्या जोडीनं हास्याचे फवारे उडविण्याचा अल्पसा प्रयत्न केला होता.

नंतर टी। वाय. पर्यंत आम्ही एकत्र होतो, पण आमचे विषय वेगवेगळे होते. कधीतरी ट्रेकला एकत्र भेटायचो किंवा कॉलेजच्या मधल्या सुटीतही. तेवढ्यापुरती मजा यायची. पण बारावीएवढी धमाल नंतर कधी केली नाही.कॉलेजातली मैत्री वर्ष संपता संपता कशी संपते, ते कधीच कळत नाही. मीदेखील रत्नागिरीतून शिक्षणासाठी (? ) पुण्यात आलो आणि राजाशी काहीच संपर्क राहिला नाही. आता तर तो काय करतो, याचाही मला पत्ता नाही. रत्नागिरीत गेल्यावर शोधून काढणं अवघड नाही, हे जेवढं खरं, तेवढंच जुन्या गोड आठवणींना आता वरकरणीच्या औपचारिक गाठीभेटींची पुटं चढवलेली पाहवत नाहीत, हेही!

2 comments:

Sneha said...

hmm kahi aaThavaNinche kappe .. kappech rahu dyavet tasay he.. pan titkach khara...

Anonymous said...

छान.... आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या राव.. !! कौलेज आणि मैत्रीची दुनियाच न्यारी असते. नाही तर सध्या - आम्ही आणि आमचे मैतर - देशी - विदेशी विस्कटलेलो...
ते लाइफ पुन्हा एकदा तरी जगायला मिळावं - मैत्रीचे ते किस्से पुन्हा रंगावेत - वा! .. रौक-औन !!