
"सिंह राशीतून सर्वात मोठा उल्कावर्षाव मंगळवारी दिसणार' अशी बातमी वाचून माझ्या भावनिक, वैचारिक विश्वात उलथापालथ होण्याचा प्रश्नच नव्हता. नेहमीच्या पद्धतीनं ती बातमी वाचून सोडूनही दिली होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीत कामावरही आलो होतो. पण काम सुरू असतानाच्या काळातच दोन सहकारी उगीचच "आज रात्री ड्युटी संपल्यावर काय करणारेस,' म्हणून आसपास घुटमळून गेले. त्यांच्या आविर्भावावरून काहितरी प्रस्ताव असावा आणि त्यासाठी माझी मदत हवी असावी, असा दाट संशय आला. खोदून विचारल्यावर त्यांनी उल्कावर्षाव पाहायला जाण्याचा प्रस्ताव ठेवला. रात्री दोन ते पाच या वेळेत उल्कावर्षाव दिसणार होता. त्यासाठी पुण्याहून आम्हाला राजगुरूनगरजवळच्या कडूस गावी जायचं होतं. अंतर 40 किलोमीटरचंच होतं, पण रात्रभर जागरणाचं दिव्य पार पाडायचं होतं. त्यातून दुसऱ्या दिवशीच्या कामांत आणि ड्युटीत कुणी सवलत देणार नव्हतं. त्यामुळंच मला विचारायला ते जरा का-कू करत असावेत. असो. मी फारसे आढेवेढे न घेता होकार भरला आणि आम्ही उत्साहाने काम आटोपून निघालो.
घरी जाऊन कार घेऊन आलो. माझ्यासह चार सहकारी होतो. जाताना टाइमपासला सीडी प्लेअर घेतला होता, पण गप्पा, गॉसिप आणि विनोदांची मैफल रंगली आणि गाणी लावायची वेळच आली नाही! ग्लास नव्हते, (त्यांचा उपयोगही नव्हता!) पण सोबत "चकणा' भरपूर होता. त्यामुळं चरत चरतच इप्तित स्थळी पोचलो. फारशी वाहतूक नव्हती. राजगुरूनगरच्या अलीकडच्या फाट्यावरून दहा किलोमीटर आत असलेल्या या गावातील शाळेच्या मैदानावर आम्ही पोचलो, तेव्हा पावणेतीन वाजले होते. "गाडीचे दिवे बंद करून आत या, जपून पावले टाका,' अशा सूचना आम्हाला तिथे आधीच उपस्थित असलेला आमचा सहकारी आणि हौशी आकाशनिरीक्षक मयुरेश प्रभुणे याच्याकडून मिळाल्या होत्या. अंधारात चाचपडतच गाडीतून उतरलो. बरेच लोक त्या मोकळ्या मैदानात पथारी टाकून निवांत पहुडले होते. पायाखाली किडा-मुंगी चिरडू नये म्हणून काळजी घेतात, तशी कुणाच्या अंगाखांद्यावर पाय पडू नये म्हणून आम्हाला काळजी घ्यावी लागत होती.
कसेबसे धडपडत शाळेचा कट्टा गाठला नि विसावलो. गप्पा-विनोदांना ऊत आलाच होता. आमचा सहकारी मयुरेश कुठल्या तरी गच्चीवर जाऊन उल्कांचे फोटो घेण्यासाठी धडपडत होता. त्याचं दर्शन होणं दुरापास्त होतं. मैदानात पहुडलेली माणसं नि "उल्का' या नामविशेषावरून यथेच्छ कोट्याही करून झाल्या. थोड्याच वेळात उल्का पडताना दिसायला लागल्या. अगदी "वर्षाव' नसला, तरी नेत्रसुखद दृश्य होतं ते. निदान आपण गेल्याबद्दल पश्चात्ताप तरी झाला नाही, एवढा दिलासा देणारं! काही छोट्या, काही मोठ्या उल्का पडताना पाहायला मिळाल्या. पहाटे अपेक्षित असलेलं मोठ्या प्रमाणातलं उल्कावर्षावाचं नाट्य मात्र हुलकावणी देऊन गेलं. "आत्तापर्यंत दोन ढगांतून उल्का पडल्या आहेत. आता तिसऱ्या ढगातून आणखी मोठा वर्षाव पाहायला मिळेल,' असं आश्वासन मयुरेश देत होता, पण आम्हाला त्यानं फारसा फरक पडत नव्हता. वातावरण एन्जॉय करण्याचा उद्देश सफल झाला होता.
दहा वर्षांपूर्वी असाच एकदा उल्कावर्षाव झाला होता, त्या वेळी तो बघायला दुचाकीवरून बोंबलत पौडच्या पुढे गेलो होतो. फारसा अनुभव त्या वेळीही घेता आला नव्हता, असं आता अंधुकसं आठवतंय.
असो. पण या वेळचा अनुभव धमाल होता. उल्कांचा नसला, तरी आनंदाचा, उत्साहाचा आणि विनोदांचा भरपूर वर्षाव झाला! "एकच तारा' समोर दिसला असला, तरी "पायतळी अंगार' मात्र नव्हता!!
Nov 21, 2009
एकच "तारा' समोर आणिक...
Posted by अभिजित पेंढारकर 1 comments at 7:13 AM
Labels:
स्वान्त सुखाय...
Nov 11, 2009
सूर्योदय रायगडावरचा
१. रायगडावरून दिसलेली चंद्राची मनमोहक प्रभा.
२. नगारखान्यावरून पहाटे टिपलेला चंद्र.
३. छत्रपतींसोबत चंद्रही सूर्योदय पाहायला उत्सुक होता.
४. आम्ही सरसावून बसलो होतो, पण आदित्य महाराज वाकुल्या दाखवत होते.
५. अखेर त्यांनी हळूच डोकं वर काढलं.
६. लांबवर एक नजर टाकली...
७. मग डुलत डुलत अजून वर सरकले
८. प्रुथ्वीतलावरची पकड आणखी घट्ट केली...
९. आणखी घट्ट....!
१०. भेट दोन सूर्यांची
११. नगारखान्याच्या दरवाज्यातून टिपलेलं सूर्याचं लोभस रूप
रायगडावर स्वारीची ही माझी तिसरी आणि मुक्कामाची दुसरी वेळ होती. याआधी मुक्काम केला होता, तो जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाच्या व्हरांड्यात. या वेळी सहकुटुंब गेलो असल्याने जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाचं आधीच आरक्षण करून ठेवलं होतं. पण तोही प्रयोग फसला. विश्रांतीगृह अगदीच भकास आणि गलिच्छ अवस्थेत होतं. पण एमटीडीसीच्या विश्रामगृहात उत्तम सोय झाली. संध्याकाळी गडावर फिरून आम्ही खोलीवर परतलो, तेव्हा चंद्राची तांबूस-तपकिरी प्रभा पाहायला मिळाली. आत्तापर्यंत चंद्राचा असा रंग कधीच पाहिला नव्हता.
संध्याकाळी सूर्यास्तही पाहिला, पण सगळ्यात आकर्षण होतं सकाळच्या सूर्योदयाचं. मुक्काम गडावरच असल्यानं सकाळी हा मुहूर्त गाठायचाच, असं मी ठरवलं होतं. सकाळी सहा वाजता गजर लावून उठलो, तेव्हा बऱ्यापैकी फटफटलं होतं. वाटलं, सूर्य वर आला की काय! पटकन आवरून कॅमेरा सरसावून नगारखान्याकडे पळालो. सुदैवानं सूर्य वर आलेला नव्हता. तोपर्यंत मेघडंबरीचे आणि नगारखान्याच्या मुख्य दरवाज्याचे फोटो टिपले. चंद्रासह हे फोटो फारच आकर्षक वाटत होते. पहाटच असल्यानं बऱ्यापैकी अंधार होता आणि फ्लॅश टाकून स्पष्ट फोटो येत नव्हते. अखेर फ्लॅश बंद करणं जमलं आणि उत्तम फोटो टिपता आला.
धुंद-कुंद हवा आणि वारा वाहत होता आणि त्यात नगारखान्याच्या समोरच्या ध्वजस्तंभावरची लोखंडी साखळी स्तंभावर आपटून खण-खण आवाजात मधुर निवाद करत होती. त्या भारलेल्या वातावरणात तो मंद ध्वनी मंदिरातल्या पवित्र घंटानादासारखाच लयबद्ध वाटत होता. नगारखान्याकडून होळीच्या माळाकडे वळलो. बाजारपेठेसमोरच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आलो. तिथे काही अन्य लोक सूर्योदयाची छबी न्याहाळण्यासाठी जमले होते. सूर्योदयापूर्वीची प्रभा क्षितिजावर रंग उधळत होती, पण आदित्य नारायण उगवले नव्हते. बहुधा, धुक्यामुळे किंवा ढगाळ हवामानामुळे महाराजांचं कोवळं रूप पाहायला मिळणारच नाही, अशीच शंका मनात दाटून आली. 6.40 होत आले होते, तरी त्यांनी डोकं वर काढलं नव्हतं. "डोंगरावरून चढून यायला त्याला वेळ लागत असणार,' असा विनोदही कुणीतरी केला.
एका बाजूने चंद्रही आकाशात चमकत होता. बहुधा, त्यालाही सूर्याची उगवती प्रभा पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता! अखेर आमच्या प्रतीक्षेला फळ आलं आणि घरातल्या छोट्या खुर्चीच्या आधारानं लहानग्यानं उभं राहावं, तसं सूर्याच्या लालबुंद गोळ्यानं हळूच डोकं वर काढलं. आळसातून जागा होत असलेला रायगड आपल्याच कोवळ्या प्रकाशात दिसतो तरी कसा, हेच पाहण्याचा तो प्रयत्न करत होता बहुधा. बराच वेळ प्रतीक्षा करायला लावून एखादा "स्टार' कसा आल्याआल्या वातावरण भारून टाकतो, तसाच काहीसा अनुभव होता तो.
या "ताऱ्या'नं सगळ्यांना मनसोक्त फोटोबिटो काढू दिले. मग शिवाजी महाराजांच्या अस्तित्त्वाची आणि जबाबदारीची जाणीव झाली असावी बहुधा त्याला. लगालगा वर आला. आपली लालबुंद, कोवळी प्रभा झटकून टाकली आणि नंतर हळुहळू रंग बदलून कामाला लागला. मीदेखील मग त्याचा नि महाराजांचा निरोप घेऊन माझ्या आन्हिकांकडे वळलो...
for more photos click here
Posted by अभिजित पेंढारकर 1 comments at 12:18 PM
Labels:
स्वान्त सुखाय...
Nov 9, 2009
मी कात टाकली
कोणतीही गोष्ट साधी, सरळ, सुव्यवस्थित होता कामा नये, हा माझ्या जीवनाचा दंडक आहे. काहितरी खुसपट, अडचण, समस्या त्यात निर्माण झालीच पाहिजे. त्यानंतरच ते काम पूर्ण व्हायला हवं. मी स्वखुशीनं स्वीकारलेला नव्हे, तर नशीबानं/दैवानं/देवानं किंवा जगण्यानं म्हणा, माझ्यावर लादलेला हा नियम आहे.
बऱ्याच दिवसांत तसं काही झालं नव्हतं. यंदाची दिवाळी व्यवस्थित पार पडत होती. शेवटचा दिवस होता. पाडव्याला संध्याकाळी घरी नको, म्हणून आम्ही सासुरवाडीला (माझ्या!) जाऊन आलो होतो. फटाके उडवण्याची ही शेवटचीच संधी मनस्वीला दवडू द्यायची नव्हती. तसेही, दिवाळी यंदा दोनच दिवस होती आणि लगेचच शाळा सुरू होणार होती. त्यामुळे साडेदहा वाजले होते, तरी मी तिच्याबरोबर गच्चीत फटाके उडवायला जायला तयार झालो. फुलबाजे वगैरे उडवून झाल्यानंतर आम्ही भुईनळे उडवायला घेतले. तिला भुईनळा लावायला शिकवण्याचा बेत होता. तिच्या हातात फुलबाजा देऊन मी तिला शिकवायच्याच प्रयत्नात होतो, पण तिला काय वाटलं कुणास ठाऊक, तिनं अचानक माघार घेतली. "मी नाही उडवणार' म्हणायला लागली. मग तिचा नाद सोडून तिच्यासाठी मीच तो भुईनळा पेटवण्यासाठी सरसावलो. छोटाच फुलबाजा होता. भुईनळ्याच्या टोकाला तो लावला आणि एकदम "ठाप्प' आवाज आला. माझ्या डोळ्यापुढे अंधार झाला. दोन मिनिटं काही सुचेचना. दिसेचना. मी जोरात ओरडलो फक्त. भानावर आलो तेव्हा कळलं, हाताचा अंगठा आणि एक बोट पूर्णपणे भाजलं होतं. मधल्या बोटालाही अर्धवट इजा झाली होती. भुईनळा वर उडण्याऐवजी फुटला होता. बॉंबसारखा! माझ्या हाताचा जो भाग मिळाला, तो पोळून निघाला होता.
सुरुवातीला भाजण्याची तीव्रता कळली नाही. चटकन नळाच्या धारेखाली हात धरला, पण आग वाढत होती. सहन होण्याच्या पलीकडे गेली होती. काय झालं, ते मनस्वीला कळतच नव्हतं. "बाबा, फटाके उडवायला चला,' हे तिचं टुमणं सुरूच होतं. मी ताडकन घरी आलो आणि पुन्हा हात पाण्याखाली बुडवून ठेवला. पण तरीही वेदना कमी होत नव्हती.
डोळ्यापुढे अंधार झाला, पण सुदैवानं डोळ्यांना काही झालं नव्हतं. काही क्षणांत मला व्यवस्थित दिसू लागलं. बाथरूममधल्या गॅस हीटरवरची काही अक्षरं वाचूनही पाहिली. मग समाधान झालं. हाताची आग मात्र थांबत नव्हती. पाण्याखाली तरी किती वेळ धरणार?
फटाके उडविण्याच्या कार्यक्रमाचा फियास्कोच झाला होता. कुणीतरी सांगितलं, बटाट्याचा किस हातावर लावा. तो उष्णता शोषून घेईल. मग तसं केलं. जरा गार वाटलं. पण नंतर पुन्हा तो किस गरम झाल्यासारखं वाटू लागलं. हात झोंबायचा काही कमी होईना.
साडेअकराला अंथरूणावर अंग टेकलं. दिवाणाच्या शेजारी तेवढ्याच उंचीचं स्टूल घेऊन त्यावर हात ठेवला. स्टुलावर हात, त्यावर बटाट्याचा किस, अशी "लगोरी' रचलेली दिसत होती. तरीही, स्वस्थ झोपवेना. हाताची वेदना काही सुचू देईना. मग उठलो. टीव्ही लावला. दिसेल ते बघत बसलो. रात्री दोनपर्यंत हात ठणकत होता. मी अस्वस्थ येरझारा घालत होतो, चॅनेल बदलत होतो, हातावर फुंकर मारत होतो, बटाट्याचा किस खालीवर करत होतो. शेवटी दोनला जरा वेदना कमी झाली आणि पुन्हा एकदा निद्रादेवीची आराधना करण्याचा विचार केला. सुदैवानं झोप लागली.
दुसऱ्या दिवशी काळी पडलेली बोटं आणि भाजलेली कातडी भयानक दिसत होती. डॉक्टरांकडून रंगीबेरंगी गोळ्या आणल्या. (कुठलाही आजार झाला, की आमच्या डॉक्टरांना रंगीबेरंगी गोळ्या द्यायची हौसच आहे. पूर्वी पानपट्टी चालवायचे बहुधा!) बॅंडेज करायचं नव्हतं, हात बांधायचा नव्हता. त्यामुळं आमचा हा उवद्व्याप सर्वांना चर्चेच्या गुऱ्हाळासाठी उपयोगी पडणार होती. ऑफिसच्या दैनंदिन गॉसिपव्यतिरिक्त चघळायला आणखी एक विषय!
साधारणपणे आठ दिवस जुन्या कातडीच्या खाली येणारी नवी कातडी जाम चावत होती. कराकरा खाजवायची इच्छा होत होती, पण इलाज नव्हता. सुदैवानं उजवा हात असला, तरी ऑपरेटिंगसह सगळी कामं मला करता येत होती. पंधरा दिवसांनी हात व्यवस्थित झाला. जुनी कातडी जाऊन नवी कातडी आली. मला कात टाकल्यासारखंच वाटू लागलं. आता नवी कातडी जुन्या कातडीशी जुळूनही आलेय बहुतांश भागात. पूर्ण बरं व्हायला अजून काही दिवस, महिने लागतील, अशी शक्यता आहे.
सुदैव म्हणजे मनस्वीला तो भुईनळा न उडविण्याची सुबुद्धी लवकर झाली. तो फुटणार आहे, हे तिला "सिक्स्थ सेन्स'नं कळलं की काय कोण जाणे! (ती मुलगी असल्यानं तिच्याकडे तो असण्याची दाट शक्यता आहेच. पण बापाला घडोघडी पिडू नये, हे पहिले पाच "सेन्स' वापरूनही का कळत नाही, ते तिलाच ठाऊक!)
मोठा झाल्यानंतर भाजण्याचा हा पहिलाच अनुभव. शाहिस्तेखानासारखं आमचंही त्या बोटांवरच निभावलं. लहानपणी असाच एकदा भाजलो होतो. खुर्चीवर मागे उभं राहून खुर्चीच्या दोन पायांवर ती आपल्या अंगावर घेऊन झुलण्याचा आवडता खेळ खेळत होतो. मागे स्टोव्हवर पिठलं रटरटत होतं. खुर्ची जास्तच अंगावर आली नि मी पिठल्यात पडलो. उजवा खांदा नि बरीच बाजू खरपूस भाजून निघाली होती. पिठल्यासारखी! दुसऱ्याच दिवशी परीक्षा होती नि मी मुख्याध्यापिकांच्या केबिनमध्ये बसून पेपर दिला होता! तरीही भाजल्याच्या रात्री मी व्यवस्थित जेवलो आणि मला भाजलं म्हणून माझी बालमैत्रीण कम बहीण मात्र उपाशी राहून रडत बसली होती, हे ती अजूनही सुनावते कधीकधी!
असो. कात टाकल्यानंतर आता लिहायलाही बरेच विषय आहेत. दर दोन-तीन दिवसांनी लिहीनच एखादा. वाचत राहा, म्हणजे झालं!
Posted by अभिजित पेंढारकर 6 comments at 4:34 AM
Labels:
स्वान्त सुखाय...
Oct 28, 2009
हजारों ख्वाइशें ऐसी
दोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. अगदी ब्लॉग लिहून ते वाचणार कोण, असाच प्रश्न मनात होता. त्यामुळं काही महिने दुर्लक्ष झालं होतं. बऱ्याच अवांतर गोष्टी लिहीत होतो, पण अजूनही बरंच काही लिहू शकतो, मांडू शकतो, हे ध्यानात आलं नव्हतं. ध्यानात आलं, तरी कुठे आणि कसं मांडावं, हे कळत नव्हतं. पेपरमधून ते मांडणं शक्य नव्हतं, कारण वृत्तपत्रीय लेखनाला असलेल्या मर्यादा. अशात आमच्या देविदास देशपांडे या सहकाऱ्यामुळं या ब्लॉग प्रकरणाविषयी अधिक माहिती मिळाली. ब्लॉग कसा लिहायचा, पोस्ट कशा टाकायच्या, लेआऊट कसा करायचा, फॉंट कसे-कोणते निवडायचे, इथपासून ते ब्लॉग इतर वाचकांपर्यंत कसा पोचवायचा, या सगळ्याची माहिती त्याच्या मार्गदर्शनाखेरीज शक्य नव्हती.
ब्लॉग सुरू केला, पण सुरुवातीला लिहायचा कंटाळाच करायचो. मग "सकाळ'मध्येच प्रसिद्ध होणारे लेख नि परीक्षणं टाकण्याची पळवाट शोधली. पण त्यात काही अर्थ नाही, हे लवकरच लक्षात आलं. ब्लॉग चालवायचा म्हणजे त्यासाठी स्वतंत्र लिखाण केलं पाहिजे, हे पटलं. मग वेगवेगळे विषय सुचत गेले. नियमितपणे लिहायला लागल्यावर तर असं लक्षात आलं, की एखाद्या वेगळ्या ठिकाणी गेल्यावर तिथेच ब्लॉग लिहिण्यासाठी फोटो वगैरेची तयारी आपण आपसूक सुरू करत आहोत. ब्लॉगच्या जोडीला पिकासा, ऑर्कुट, मनोगत नि मिसळपावची जोड मिळाली आणि ब्लॉगविश्व आणखी खुललं.
ब्लॉग अनेक विषयांवर, अनेक क्षेत्रांतले लोक लिहितात. त्यांचीही निरीक्षणं करू लागलो. पण अभ्यास वगैरे शक्य नव्हतं. इंटरनेटवरून वाचन करायला एक प्रकारची निष्ठा आणि पेशन्स लागतो. माझ्यात तो नाही. पण मित्रांचे ब्लॉग वाचणं आणि त्यातून सादरीकरण, लिहिण्याचे विषय निवडणं, ही प्रक्रिया सोपी झाली. ब्लॉग लिहिताना मी स्वतः मात्र वैयक्तिक अनुभवांवर भर दिला. राजकीय, सामाजिक विषय अभावानेच लिहिले. तसे विषय लिहायचे, तर त्यासाठी वेगळा आणि स्वतंत्र शैलीचा ब्लॉग सुरू करायला हवा. माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि नाही.
वैयक्तिक अनुभवांना मात्र भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यातलाच हा पहिला अनुभव म्हणजे माझी ब्लॉगवरची पहिलीवहिली पोस्ट. तिला तब्बल 11 प्रतिसाद मिळालेत. आज वीस हजारांच्या टप्प्याच्या निमित्तानं ती पोस्ट खाली पुन्हा प्रसिद्ध करतोय.
आतापर्यंतचा ब्लॉगचा अनुभव प्रसन्न, आनंददायीच आहे. मनातल्या अनेक गोष्टी इंटरनेटच्या पानांवर उतरवता आल्या. अजून अनेक उतरवायच्या आहेत. आयुष्यातल्या अनेक टप्प्यांविषयी, व्यक्तींविषयी लिहिण्याचं मनात आहे. पण मूड लागल्याशिवाय ते प्रत्यक्षात उतरत नाही. आता मात्र नेमानं आठवड्याला दोन तरी पोस्ट टाकण्याचा संकल्प आहे.
पुन्हा एकदा तुमच्या सहकार्याबद्दल, प्रेमाबद्दल, पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद. माझ्यावर, ब्लॉगवर असंच प्रेम यापुढेही कायम ठेवा!!
Posted by अभिजित पेंढारकर 7 comments at 2:37 PM
Labels:
स्वान्त सुखाय...
