Dec 27, 2009

"आल इज व्हेरी व्हेरी व्हेरी वेल'!

सध्या सॉल्लिड बिझी आहे. घरी लिहायला वेळ मिळत नाही आणि हापिसात आल्यावर कामांमधून लक्षात राहत नाही. त्यामुळे नियमित ब्लॉग लिहिण्याचा संकल्प बासनात गुंडाळला गेला आहे. तरीही, नव्या वर्षात हे बासन उलगडून काही नवे प्रयोग करण्याचा विचार नक्कीच आहे. तोपर्यंत, कामाचाच भाग असलेलं हे परीक्षण वाचून घ्या! दुधाची तहान ताकावर!


"जगणं' सापडेपर्यंत अनेकांचं अर्धं आयुष्य उलटून गेलेलं असतं. आयुष्याच्या दावणीला स्वतःला बांधून घेऊन घाण्यात गोल गोल फिरण्याऐवजी काही जण चौखूर उधळतात, मनमुराद जगतात आणि मग यश, आनंद स्वतःच त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहतात... "थ्री इडियट्‌स'मधला एक "इडियट' याच पद्धतीनं स्वच्छंदी आयुष्य जगणारा आहे. बाकीच्या दोघांना तो दिशा दाखवतो आणि त्यांचं जगणं प्रसन्न करून टाकतो.
रॅंचो (आमीर खान), फरहान (माधवन) आणि राजू (शर्मन जोशी) या इंजिनिअरिंग करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची ही कहाणी आहे. फरहान आणि राजू हे आई-वडिलांच्या दबावामुळे, कौटुंबिक जबाबदारीमुळे इंजिनिअर होण्यासाठी आलेले. दबून जगणारे, नाकासमोर चालणारे. त्यांच्या आयुष्याची दिशा चुकल्याचं रॅंचो त्यांना जाणवून देतो. तिघेही त्याच्यासोबत कॉलेजात धमाल उडवतात आणि त्यावरून बदनामही होतात. त्यांना जगण्यातलं सौंदर्य दाखवणाऱ्या रॅंचोबद्दलचं रहस्य मात्र त्यांना माहिती नसतं. ते उलगडण्यासाठी त्यांना बरीच खटपट करावी लागते...
चेतन भगत यांच्या "फाइव्ह पॉइंट समवन' या कादंबरीचा आधार घेऊन दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांनी "थ्री इडियट्‌स'ची पटकथा लिहिली आहे. चित्रपटाला अपेक्षित तरुण वर्ग, आमीर खानच्या पुढील चित्रपटाविषयीची उत्सुकता आणि विधू विनोद चोप्रा-हिरानी या जोडीकडून "मुन्नाभाई'नंतरची असलेली अपेक्षा, एवढ्या सगळ्या कसोट्यांवर हा चित्रपट खरा उतरून आणखी उरतो. म्हटलं तर पालकांनी आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवर लादू नये, एवढाच साधा विषय. "तारे जमीं पर'मध्येही वेगळ्या प्रकारे तो होताच. पण दिग्दर्शन आणि पटकथालेखन करताना हिरानी यांनी तो अशा प्रकारे मांडला आहे, की चित्रपट सादर करण्याचं गणितच बदलून जावं. सध्याच्या "मल्टिप्लेक्‍स' संस्कृतीला न साजेशी, दोन तास 50 मिनिटांची लांबी असलेल्या या चित्रपटाची पटकथा हा तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकेल.

या तीन मित्रांचे कॉलेज आणि पाच वर्षांनंतरचा काळ, अशा दोन काळांत घडणाऱ्या घटना पटकथेत अशा बेमालूम मिसळल्या आहेत, की प्रेक्षकाला विचार करण्याचीही उसंत मिळू नये. म्हटलं तर कॉलेजमध्ये या तिघांनी घातलेला धिंगाणा, एवढाच मध्यंतरापर्यंतच्या चित्रपटाचा अर्थ असला, तरी त्या प्रत्येक प्रसंगाला काही अर्थ, संदर्भ आहेत. त्यातले काही शेवटच्या प्रसंगापर्यंत लक्षात येत नाहीत.

आमीर खानने पंचेचाळिशीच्या घरात असतानाही कुमारवयीन मुलाची व्यक्तिरेखा निव्वळ डोळ्यांतून आणि देहबोलीतून बेमालूम साकारली आहे. माधवन, शर्मन जोशी आणि नवा चेहरा ओमी (चतुर) यांचा अभिनयही अप्रतिम. करिना कपूर झकास दिसते आणि छोट्या भूमिकेतही उत्तम कामगिरी करून जाते. तिरसट आणि हेकेखोर प्राचार्य वीरू सहस्रबुद्धे ऊर्फ "व्हायरस' ही बोमन इराणीची आणखी एक लक्षवेधी भूमिका. शंतनू मोईत्रा यांनी स्वानंद किरकिरेंच्या गाण्यांना योग्य न्याय दिला असला, तरी चित्रपटातल्या सादरीकरणामुळेच ही गाणी अधिक श्रवणीय झाली आहेत.

चित्रपट सर्वच बाबतींत उत्कृष्टतेच्या पातळीवरचा असला, तरी तरुणाईला आवडतं, या गैरसमजातून की काय, रॅगिंगचे ओंगळ आणि किळसवाणे प्रसंग माथी मारले आहेत. केवळ कॉलेजात नव्हे, तर त्यानंतरही दोन-तीनदा हे प्रसंग सहन करावे लागतात. चतुरने चुकीचे शब्द वापरून हास्यस्फोटक भाषण करण्याचा प्रसंगही उत्तरार्धात खालच्या पातळीवर घसरला आहे. प्राचार्यांची मनोवृत्ती बदलायला लावणारा त्यांच्या मुलीच्या बाळंतपणाचा प्रसंगही असाच अनावश्‍यक आणि न झेपणारा आहे.

हा ओंगळवाणेपणा सोडला, तर बाकी "ऑल इज वेल' नव्हे, "ऑल इज सुपर्ब'!

Dec 7, 2009

मलकापूरचा म्हातारा

बालपण किती रम्य असतं नाही? लहान असताना आमच्यासाठी लांबचा प्रवास म्हणजे रत्नागिरी-मुंबई किंवा रत्नागिरी-पुणे असायचा. दोन्हीकडे आत्या राहायच्या, राहतात. त्यामुळे वर्षातून एकदा, विशेषतः मे महिन्यात किंवा काही सणानिमित्त एक ट्रिप या ठिकाणी असायची. रत्नागिरीत झोपाळ्यावर खेळतानाही आम्ही बसची जमवलेली तिकिटं घेऊन रत्नागिरी-मुंबई एसटी असा खेळ खेळायचो. असो.
मुंबईपेक्षाही पुण्याचा प्रवास जास्त वेळा झाला. पुण्याची साधी गाडी रात्री सात वाजता निघायची. नंतर ही वेळ वाढत नऊपर्यंत गेली. तेव्हा सेमीलक्‍झरी गाडीत बसणं म्हणजे चैनच होती. त्यातून वडील एसटीत असल्यानं वर्षातून दोन महिने पास मिळायचा. त्यामुळं लाल डब्याला पर्याय नव्हता. साधी गाडी कोल्हापूरमार्गे जायची. कोल्हापूरला थांबल्यानंतर सगळ्यात मोठं आकर्षण असायचं ते तिथला स्टॅंडबाहेर मिळणारा वडापाव खाणं. स्टॅंडच्या गेटबाहेर वडापावच्या भरपूर गाड्या रांगेने उभ्या असत. त्यांच्याकडे गरमागरम तळलेला गलेलठ्ठ वडा मिळे. मी कुठेही पाहिलेल्या वड्याच्या साधारण दीड ते पावणेदोन पट त्याचा आकार असे. त्याच्यासोबत पाव म्हणजे एक घसघशीत मोठा तुकडा असे. ग्रामीण भागात बेकरीत असे जाडजूड पाव तयार केले जातात. साधारण आपल्या शहरी ब्रेडच्या आकाराच्या अडीचपट त्याचा आकार असतो. वडा-पाव म्हणजे पावात घातलेला वडा नव्हे, तर वेगळा वडा आणि पाव, अशी ही कोल्हापुरी तऱ्हा. तरीही झणझणीत चटणी आणि त्यासोबत गरम वडा व पाव, असा बेत म्हणजे तोंडाला पाणीच सुटे. कोल्हापूरला थांबल्यानंतर धावतपळत जाऊन तो वडा घेऊन येणं आणि ओरपणं, हेच प्रवासाचं मुख्य आकर्षण होतं.
कालांतराने मात्र या गाड्या बंद झाल्या. बहुधा गुन्हेगारीमुळे पालिकेनं तिथे कारवाई करून रात्रीचे सगळे स्टॉल बंद करून टाकले. रात्रीच्या प्रवासाची सगळी गंमतच निघून गेली. मी पुण्याला कायमचा राहायला आल्यावर रत्नागिरी-पुणे वाऱ्या बऱ्याचदा सुरू झाल्या, पण आता हे आकर्षणही नव्हतं आणि माझाही प्रवास सेमीलक्‍झरीने सुरू झाला होता. सेमीलक्‍झरीचा प्रवासाचा मार्ग वेगळा होता. गाडी कोल्हापूरला न जाता परस्पर कोकरूडमार्गे मलकापूरला पोचते. त्यातून अंतर आणि तिकीटही कमी! पास मिळण्याचाही मुद्दा संपला होता...
कोकरूडच्या मार्गावर जाणारी बस मलकापूर स्टॅंडला काही सेकंदच थांबायची, तीही प्रवाशांच्या लघुशंकांसाठी. नंतर तातडीने वळून पुन्हा ती दोनच मिनिटांत थांबायची. सुरुवातीला झोपेच्या अमलाखाली मला काही कळायचं नाही. पण अधूनमधून जाग असायची, तेव्हा लक्षात आलं, गाडी चहाला थांबते. तेही मलकापूरच्या मुख्य बाजारातील एका अरुंद रस्त्यावर. एक म्हातारबाबानं तिथे आपली छोटीशी गाडी थाटली होती. आगेमागे बऱ्याच एसटी आणि इतरही ट्रक वगैरे गाड्या थांबलेल्या असायच्या. एकतर कऱ्हाड सोडल्यानंतर रत्नागिरीपर्यंत या मार्गावर कोणतंही मोठं शहर, ठिकाण नाही. महामार्गापासूनचा वेगळा रस्ता. त्यामुळं रहदारीही मोजकी. त्यामुळं कुठलं हॉटेल किंवा चहाचं दुकान वगैरे उघडं असण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे रात्रीच्या यात्रेकरूंना बहुधा चहाचा एवढा एकमेव पर्याय उपलब्ध असावा. तेव्हापासून आजतागायत मी ही गाडी याच ठिकाणी पाहत आलो आहे.
या म्हातारबाबांकडे मिळतो फक्त चहा आणि वडा. चहा द्यायची पद्धतही खास आहे. गाळण्याच्या ऐवजी असलेला कळकट, मळकट फडका. एका स्टोव्हवर रटरटत असलेलं एक ऍल्युमिनिअमचं पातेलं. त्याला वरून बंद ताटलीचं झाकण. या झाकणाला मध्यभागी एक मोठं छिद्र. त्या छिद्राच्या वर ठेवलेली चहाची किटली. त्या छिद्रातून आलेल्या वाफेनं किटलीतला चहा गरम होणार.
चहाची चव यथातथाच. बहुधा साखर जास्त आणि दूध कमी. तरीही, रात्री तीनच्या दरम्यान प्रवासातला टाइमपास म्हणून आणि थंडी उडवण्यासाठी गरम काहितरी प्यायला मिळण्याचं समाधानच जास्त. ड्रायव्हर-कंडक्‍टरही तिथे चहाचा आस्वाद घेतात. त्यामुळं प्रवाशांनाही गाडी सुटण्याचं टेन्शन राहत नाही. या टपरीवर थांबल्याशिवाय एसटी पुढे गेल्याचं मी तरी आजपर्यंत पाहिलेलं नाही.
म्हातारबाबांकडे मिळणारा वडा बहुतेक वेळा गारच. त्यातून तो मस्त तेलात माखलेला. व्हाइट कॉलर मध्यमवर्गीयानं चार हात लांबच राहावं, असा. तरीही, वड्यांचं ताट कधी भरलेलं मी पाहिलेलं नाही. बहुतेक वेळा तीन ते चारच वडे त्या ताटात दिसतात. एकतर त्यांना भरपूर खप असावा, किंवा म्हातारबाबा तेवढेच वडे बनवत असावा. मीही एकदोनदा तो वडा चाखल्याचं आठवतंय. (हल्ली हेल्थ-कॉन्शस झाल्यापासून घरचेही वडे-भजी खात नाही, ही गोष्ट अलाहिदा!)
गाडी तिथे सात ते आठ मिनिटंच उभी राहत असल्यानं या म्हाताऱ्याचं नाव, गाव, कूळ विचारण्याची संधी आजपर्यंत मिळालेली नाही. धंद्यावरची त्याची निष्ठा मात्र वाखाणण्यासारखी! जुलै-ऑगस्टच्या मुसळधार पावसातही त्याची गाडी कधी बंद असलेली मला आढळलेली नाही. त्याच्यासोबत मदतीला कुणी मुलगा, घरचं कुणीही कधी पाहिलेलं नाही. गाडी थांबल्यावर प्रवासी गाडीभोवती गोळा झाल्यावर अतिशय अदबीनं चहाचा ग्लास पुढे करण्याची त्याची अदाही विलक्षण.
अगदी गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून आलो, तेव्हाही म्हाताऱ्याकडचा चहा चाखला. मनस्वी गाडीत एकटीच झोपलेली असताना! ती पडेल की काय ही भीती होती, तशीच जागी झाली तर उठून बाहेर येईल की काय, हीदेखील! तर ते असो. या वेळी म्हातारबाबाच्या एका डोळ्यात फूल पडल्याचंही प्रकर्षानं जाणवलं. लोकांच्या सेवेची त्यांची "दृष्टी' मात्र पूर्वीसारखीच टवटवीत होती!
एकंदरीत, या म्हाताऱ्याची व्यवसायावरची निष्ठा विलक्षण आहे. आमची तेवढी जगण्यावरही नाही!

Dec 6, 2009

मी आणि मनू- सॉल्लिड टीम!

मनस्वीला सांभाळायची आता पाच वर्षं सवय झालेय. लहानपणी रात्री दीड-दोनला आल्यानंतर ती झोपेपर्यंत पाळणा हलवत बसण्याचं कंटाळवाणं कामही न कंटाळता केलं. त्यामुळं तिच्यासोबत एकटं असण्यात भीती किंवा टेन्शन वाटण्याजोगी परिस्थिती नव्हती. तरीही, एक दिवसापेक्षा जास्त काळासाठी ही वेळ कधी आली नव्हती. ती एक वर्षाची असताना हर्षदा बारामतीला कार्यक्रमाला गेली होती, तेव्हा एक दिवस पूर्णपणे मी तिला सांभाळलं होतं. अन्यथा आमची जबाबदारी काही तासांपुरतीच.
या वेळी गोव्याला जायचं होतं आणि हर्षदाला रजा नव्हती. म्हणून मी मनस्वीला घेऊन जायचं ठरवलं. आई-बाबाही रत्नागिरीहून सोबत येणार होते. शाळा बुडण्याचं मनस्वीला काही दुःख नव्हतंच. उलट, रेल्वेच्या प्रवासाचं आकर्षण होतं. जाताना आईनं दहा-दहादा बजावून वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. तिला दिवसभरात द्यायच्या गोळ्या, घ्यायची काळजी, तिचे कपडे, बॅग, इकडे पाठव, तिकडे पाठवू नको वगैरे वगैरे. तिला सोडून कुठेही उंडारायला जायचं नाही, ही धमकीही होतीच! तिला सांभाळण्याच्या टेन्शनपेक्षा आईच्या सूचना पाळण्याचं टेन्शन मोठं होतं.
एकदाची सगळी तयारी झाली आणि आम्ही रात्री साडेनऊच्या रत्नागिरी बसमध्ये बसलो. नेहमीचाच प्रवास होता, पण या वेळी मी एकटा नव्हतो, तर मुलीचं ओझं रात्रभर वागवायचं होतं. दोन सीटचं आरक्षण होतं, पण तरीही जागा तशी अडचणीचीच. आमच्या तंगड्याही घड्या करून न ठेवता येण्यासारख्या. त्यामुळे कसेतरी पाय पुढच्या सीटखाली घुसवून रात्रभर पेंगत बसायचं, अशी एरवीची रीत. या वेळी मात्र मनस्वी मांडीवर होती. दुपारी झोप झाल्यानं साडेअकरापर्यंत जागत बसली होती. बसमध्ये सुद्धा तिला पुस्तकातून गोष्टी सांगाव्यात, अशी तिची अपेक्षा होती. महत्प्रयासानं मग तिला कसंबसं दोन गोष्टींत पटवावं लागलं. शिरवळच्या नंतर कधीतरी झोपली. ती मांडीवर असल्यानं तिचे पाय दुखावणार नाहीत, पावलांना थंडी वाजणार नाही, पांघरूण नीट अंगावर राहील, याची काळजी घेण्यातच माझी रात्र गेली. झोप फारशी लागू शकली नाही. रात्री मलकापूरला म्हातारबाबांकडे चहा प्यायलाच काय, साधं लघुशंकेला उठायचे कष्टही घेतले नाहीत!
सकाळी साडेचारला रत्नागिरी स्टॅंडवर गाडी पोचली, त्याआधीच मनस्वी टुणकन उठून बसली होती. साडेचार वाजता रिक्षा मिळणं दुरापास्तच होतं. बससाठी तासभर थांबावं लागणार होतं. दोन रिक्षावाले तर चक्क घोरत होते. एकानं आधी नकार दिला, मग तिप्पट पैसे मागितले. अर्थातच त्याला धुडकावून लावून आम्ही चालत जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी पावणेपाचला रत्नागिरीच्या रामआळी, गोखले नाका, गाडीतळ, पतित पावन मंदिरावरून मस्त गप्पा मारत नि थंडी अनुभवत आमची वरात निघाली होती. पहाटेचे किती वाजलेत वगैरे कसलंही भान मनस्वीला असण्याची अपेक्षाच नव्हती. नेहमीच्या तारस्वरात तिच्या गप्पा, प्रश्‍न, शंका, नि गाणी सुरू होती. मध्येच स्मरणशक्तीचा खेळही खेळून झाला. घरी गेल्यावर मात्र थोडा वेळ झोपली. मीही जरा अंग मोकळं करून घेतलं.
आम्हाला लगेच दुपारच्या रेल्वेनं गोव्याला निघायचं होतं. आधीच्या आठवड्यात रत्नागिरीच्या आमच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयातून देणगीच्या अपेक्षेनं फोन आला होता. रत्नागिरीत जातोच आहोत, तर जाऊन येऊ, अशा विचारानं तिथे जाऊन आलो. मनस्वीलाही माझी शाळा पाहण्याचं कौतुक होतंच. मग माझ्या "दीक्षितबाईं'शी तिची भेट करून दिली. दीक्षितबाई म्हणजे तिच्या बालवाडीच्या शिक्षिका. त्यामुळे माझ्या शिक्षिकांनाही तेच नाव दिल्यानं ती खूश होती. मी देणगीची रक्कम दिली आणि मनस्वीला एक बालगीतांचं पुस्तक मिळालं. स्वारी खूश! मग त्यातली गाणी तेव्हापासून जी सुरू झाली, ती रेल्वेच्या दोन्ही प्रवासभर पुरली.
दुपारची गाडी अपेक्षेप्रमाणंच उशिराने आली. आम्ही करमळीला उतरून नागेश मंदिरात पोचेपर्यंत साडेसात वाजले. गेल्या गेल्या एक अपशकुन झाला. आमच्या ऐकण्यात गफलत झाल्यानं जेवण्यात मी वेळ काढला नि तोवर देवळाच्याच आवारातली पालखी संपून गेली. मनस्वीला नवे कपडे घालून तयार करून खाली आणलं, तोवर पालखी संपून गेल्यानं ती माझ्यावर भयंकर खवळली होती. मनसोक्त रडून झालं. दोन-तीन चॉकलेटच्या आमिषावर मग गाडं शांत झालं. दुपारी ट्रेनमध्ये तिने मस्त दोन-तीन तास ताणून दिली होती. वरच्या बर्थवर जाऊन माझ्याबरोबर मस्ती करण्याचा तिचा बेत होता, पण मी आडवा झालो नि तीही माझ्या आधीच डाराडूर पंढरपूर झाली!
रात्री गोष्टींना पर्याय नव्हता. चार-पाच गोष्टी झाल्यावर कुठे जरासं समाधान झालं. देवळाच्या आवारातच आमची राहायची सोय चांगली होती. दोन खोल्यांमध्ये मी व मनस्वीला वेगळी खोली होती. रात्री ती व्यवस्थित झोपली. हर्षदाला मात्र इकडे करमत नव्हतं. आधीच्या रात्री नि दुसऱ्या दिवशीही तिला बराच वेळ झोप आली नाही नि उमाळेही येत होते!
दुसऱ्या दिवशी आम्ही आसपासच्या परिसरातली देवळं वगैरे पाहिली. देवळं पाहण्याच्या कार्यक्रमाचा मनस्वीला भारी कंटाळा येतो. तिला हवी फक्त दंगामस्ती नि धुडगूस! बाग, प्राणिसंग्रहालय, अशा ठिकाणी ती जास्त रमते. देवळांत राम-कृष्णाचे वेगवेगळे अवतार पाहण्याचं तिला आकर्षण असतं, तेवढंच!
संध्याकाळी मग आम्ही देवळाच्या आवारातल्याच भल्या मोठ्या तळ्यात मस्त टाइमपास केला. चारही बाजूंनी या तळ्याला पायऱ्या होत्या नि त्यांवर उभं राहून पाण्यात खेळायलाही मजा येत होती. मनस्वीने तिथे भरपूर मजा केली. आदल्या दिवशी चुकलेली पालखी आम्ही दुसऱ्या दिवशी डबल वसूल केली! जवळच्याच एका दत्तमंदिरात तिला मुद्दाम घेऊन गेलो. तिथली पालखी पाहिली नि पुन्हा आमच्या नागेश मंदिरात येऊन तिथलीही पालखी पाहायला मिळाली. मग मात्र मनस्वी खूश होती. शिवाय, तिच्या आवडीची मनीमाऊ तिच्या काकूच्या घरी भेटली. एक-दोनदा हातही फिरवायला मिळाल्यानं तिला मूड आला होता. रात्री तिनं आजीकडे वशिला लावून मनाजोग्या गोष्टींचं पारायण केलं.
तिसऱ्या दिवशी मी मनस्वी आणि माझे बाबा, तिघेच पणजीला जाऊन आलो. आईला यायला जमणार नव्हतं. पणजीचा जातानाचा प्रवास थेट देऊळ ते पणजी स्टॅंड असा होता. मिरामार बीचवर तिला घेऊन गेलो नि तासभर पाण्यात, किनाऱ्यावर खेळलो. किल्ले, बोगदे, विहिरी नि समुद्राची शिल्पं तिथे साकारली. येतानाचा प्रवास मात्र कंटाळवाणा होता. पणजी ते फोंडा, फोंडा ते नागेशी अशा मिनिबसमध्ये खूप अवघडायला झालं.
आम्ही राहत होतो, त्या नागेशी मंदिर परिसरात फारशी दुकानं, हॉटेल्स नव्हती. बाजारही मोठा नव्हता. त्यामुळे कुठे काही पाहायला, फिरायला जाण्याचा प्रश्‍नच नव्हता. मनस्वीला दुसऱ्या दिवशीच समोरच्या दुकानातल्या एका वेगळ्या प्रकारच्या चॉकलेटचा शोध लागला. एक रुपयाच किंमत होती, पण ते एका आकर्षक बॉक्‍समध्ये गुंडाळलेलं चॉकलेट होतं. शिवाय प्रत्येकात एक वेगळं गिफ्ट असणार होतं. मनस्वीनं मग दररोज दोन-तीन गिफ्ट जमवण्याचा सपाटा लावला. दोन वाघनखं नि दोन प्रकारच्या अंगठ्या तिला मिळाल्या. आईसाठी घे÷य ठेवलेल्या गिफ्टमध्ये "पाल' निघाल्यानं मात्र ती जराशी हिरमुसली होती.
चौथ्या दिवशीच आम्हाला रत्नागिरीला परतायचं होतं. सकाळी लवकर गोव्यातून निघालो. करमळी स्टेशनवर रेल्वेची वाट पाहताना मनस्वीला रोखणं अवघड झालं होतं. अंगात वारं भरल्यासारखी सैरावैरा धावत होती. तिथे तिला एक मोठी दोरी मिळाली होती. तिचं एक टोक तिच्या हातात नि दुसरं माझ्या हातात बांधून माझा अक्षरशः घाण्याचा बैल केला होता पोरटीनं!
दुपारी अडीचला रत्नागिरीत पोचलो. त्याच रात्री आम्हाला पुण्याला निघायचं असल्यानं संध्याकाळी कुठे गेलो नाही. बसप्रवासही गेल्या वेळेसारखाच झाला. बसमध्ये बसल्यावर लक्षात आलं, आपली शाल तिकडे गोव्यालाच मंदिराच्या खोलीत राहिलेय! मग मनस्वीचं थंडीपासून रक्षण करण्यासाठी टॉवेलचा आधार घ्यावा लागला. सुदैवाने थंडी फार नव्हती. या वेळी मात्र रात्री मलकापूरला चहा ढोसला. झोप लागली नाहीच. येताना पहाटे हर्षदा स्कूटी घेऊन कुडकुडत स्वारगेटला आली होती. मग तिथे स्टॉपवरच मायलेकींचा भरतभेटीचा कार्यक्रम झाला...
चारच दिवसांची सहल होती, पण मनस्वीनं फारसा त्रास दिला नाही. तिसऱ्या दिवशी तिला साधारण आईची उणीव जाणवू लागली होती, त्यामुळं तिची जराशी कुरकूर सुरू होती. पण तिनं प्रत्यक्ष तसं काही बोलून दाखवलं नाही. मग जरा तिच्या कलानं घ्यावं लागलं. कधी बावापुता करून, तर कधी पडतं घेऊन तिचा मूड बनवावा लागला. रोज दोन्ही वेळेला जेवण भरवण्याचा कार्यक्रम न कंटाळता करण्याला पर्याय नव्हता. त्यासाठी स्वतःचं जेवण गार होऊ देऊन तसंच पोटात ढकलावं लागत होतं. चक्क तिकडे रोज पांढरं दूधही (बोर्नविटा, कोकोचा आग्रह न धरता) प्यायली!
एकंदरीत आमची सहल छान झाली. पुढच्या वेळीही कधीतरी असा प्रयोग करायला हरकत नाही! काय?

Nov 25, 2009

ती भीषण रात्र...

रात्रीचे दहा वाजले होते. रात्रपाळीत पान 1 ची जबाबदारी पार पाडत होतो. नेहमीप्रमाणे बातम्या संपादित करून, पान लावण्यास सुरवात करायची होती. त्यापूर्वी संपादकांशी बोलून घ्यायचे होते. त्यांना फोन केला, तोपर्यंत मुंबईतील घडामोडींची माहिती कुणालाच नव्हती. मुंबईतल्या गोळीबाराचा फ्लॅश कुठल्या तरी चॅनेलवर सुरू झाला होता. सीएसटी स्थानकावर गोळीबार, एवढीच प्राथमिक माहिती कळली होती. कुठल्या तरी माथेफिरूचा असेल, असं समजून त्या विषयाची केवळ नोंद घेतली होती. संपादकांनी त्या विषयाची आठवण करून दिल्यानंतर पुन्हा आवर्जून सर्व चॅनेल आणि साइट्‌स पाहिल्या. दहा मिनिटांत दहशतवादी हल्ल्याची भीषणता लक्षात आली. आधी सीएसटी स्थानकाचे नाव होते, नंतर दहशतवादी ताज हॉटेलात घुसल्याचे स्पष्ट झाले. तातडीने आधीच्या आवृत्त्यांसाठी तशी बातमी तयार करून घ्यावी लागली.
एव्हाना घरी गेलेले अनेक सहकारीही ही बातमी टीव्हीवर पाहून पुन्हा कामावर आले होते. सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. संसदेवरच्या हल्ल्यापेक्षाही हा भीषण होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो महाराष्ट्राच्या हृदयावर, सर्वांच्या जिव्हाळ्याच्या मुंबईवर झालेला हल्ला होता. हल्ल्याचं रौद्र रूप हळुहळू प्रकट होत गेलं. नेमके किती अतिरेकी, किती पोलिस, किती जखमी, किती शहीद यांची माहिती घेत असतानाच अचानक रात्री अकराला मोठमोठे फ्लॅश झळकू लागले. अशोक कामटे शहीद...विजय साळसकर शहीद...हेमंत करकरे शहीद! मालेगावातील बॉंबस्फोट प्रकरणी ताब्यात घेतलेल्या साध्वी आणि अन्य हिंदू आरोपींच्या प्रकरणावरून करकरेंचं नाव "एटीएस'प्रमुख म्हणून चांगलंच गाजत होतं. त्यातच ते हेल्मेट वगैरे घालून कारवाईसाठी सज्ज झाल्याची दृश्‍यंही दाखविली गेली होती. त्यातच ही बातमी आली आणि काळजात चर्रर्र झालं. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचं भीषण रूप त्याआधीच स्पष्ट झालं होतं. पण करकरे, साळसकरांसारख्या बड्या अधिकाऱ्यांचे प्राण क्षणार्धात गेल्याचं कळल्यानंतर दहशतवाद्यांबद्दल अक्षरशः तिडीक निर्माण झाली.
शहर आवृत्तीसाठी आणखी बरीच धावपळ करावी लागणार होती. सुदैवाने सर्वांच्या सहकार्याने आणि मदतीने ती शक्‍य झाली. रात्री काम संपवून दोननंतर बाहेर पडलो, तेव्हाही हल्ल्याचा विषयच चर्चेला होता. पुढचे चार दिवस तो तसाच सुरू राहिला. मुंबईनं बॉंबस्फोट, महापुरासह अनेक धक्के गेल्या काही वर्षांत पचवले होते. दहशतवादी हल्ला त्यापैकी सर्वांत भीषण होता. वार्तांकन म्हणूनही ते आव्हान होतंच. पुढचे चार दिवस टीव्ही चॅनेलच्या बातम्या पाहत असताना त्यांच्या कष्टांची आणि परिश्रमांचीही प्रकर्षाने जाणीव झाली...

Nov 24, 2009

गावागावांत...

mahabaleshwar-nov 09 424

महाबळेश्‍वर आणि रायगडाची चार दिवसांची सहल या महिन्यात केली. दोन्ही ठिकाणी मजा आली, स्वतःची गाडी घेऊन गेल्यामुळं निवांत आणि निश्‍चिंतही होतो. धावपळ, दगदग फार झाली नाही. रायगडावर मुक्कामासाठी थोडा त्रास पडला, पण आधीच्या नियोजनात बदल केला आणि ती चिंताही मिटली. त्याविषयी लिहीनच नंतर. आज लिहायचंय, ते रायगडावरून परतताना बसलेल्या सुखद धक्‍क्‍याबद्दल.
परतताना महाडजवळ महामार्गाच्या तिठ्याजवळ आम्ही थांबलो होतो. दुकानातून थोड्या गोळ्या घेतल्या आणि रस्ता विचारून घेणं, हाही उद्देश होता. सुदैवानं पत्ता योग्य सांगितला गेला. नाहीतर पत्ता सांगण्याची आपल्या लोकांची रीत म्हणजे जागतिक आश्‍चर्यात नोंद होण्यासारखी.
गाडीत पुन्हा बसत होतो, तेवढ्यात तिथेच दुकानाबाहेर लावलेल्या एका बोर्डाकडे माझं लक्ष गेलं. हो...माझा अंदाज खरा होता. तिथे चक्क महाड पोलिसांनी वाहतूकविषयक जागृतीसाठी "ट्रॅफिक ग्राफिटी'मधील माझ्या एका "ग्राफिटी'चा वापर केला होता! भले परवानगी घेतली नसेल, पण सामाजिक हितासाठी हा वापर झाल्याचं समाधान जास्त होतं.
याआधीही "सकाळ सोशल फाउंडेशन'नं रस्त्यावर, चौकाचौकांत वाहतूक जागृतीसाठी "ग्राफिटी'ची निरनिराळी वाक्‍यं फलकांवर लिहून प्रदर्शित केली होती. त्यांना मोठा प्रतिसादही मिळाला होता. आता महाडपर्यंत आपली "ग्राफिटी' पोचलेली पाहून खरंच समाधान वाटलं.

ता. क. : फलकाच्या तळातील प्रायोजकांच्या व्यवसायाचा फलकातील विचारांशी संबंध असेलच, असे नाही!

Nov 21, 2009

एकच "तारा' समोर आणिक...

meteor

"सिंह राशीतून सर्वात मोठा उल्कावर्षाव मंगळवारी दिसणार' अशी बातमी वाचून माझ्या भावनिक, वैचारिक विश्‍वात उलथापालथ होण्याचा प्रश्‍नच नव्हता. नेहमीच्या पद्धतीनं ती बातमी वाचून सोडूनही दिली होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीत कामावरही आलो होतो. पण काम सुरू असतानाच्या काळातच दोन सहकारी उगीचच "आज रात्री ड्युटी संपल्यावर काय करणारेस,' म्हणून आसपास घुटमळून गेले. त्यांच्या आविर्भावावरून काहितरी प्रस्ताव असावा आणि त्यासाठी माझी मदत हवी असावी, असा दाट संशय आला. खोदून विचारल्यावर त्यांनी उल्कावर्षाव पाहायला जाण्याचा प्रस्ताव ठेवला. रात्री दोन ते पाच या वेळेत उल्कावर्षाव दिसणार होता. त्यासाठी पुण्याहून आम्हाला राजगुरूनगरजवळच्या कडूस गावी जायचं होतं. अंतर 40 किलोमीटरचंच होतं, पण रात्रभर जागरणाचं दिव्य पार पाडायचं होतं. त्यातून दुसऱ्या दिवशीच्या कामांत आणि ड्युटीत कुणी सवलत देणार नव्हतं. त्यामुळंच मला विचारायला ते जरा का-कू करत असावेत. असो. मी फारसे आढेवेढे न घेता होकार भरला आणि आम्ही उत्साहाने काम आटोपून निघालो.
घरी जाऊन कार घेऊन आलो. माझ्यासह चार सहकारी होतो. जाताना टाइमपासला सीडी प्लेअर घेतला होता, पण गप्पा, गॉसिप आणि विनोदांची मैफल रंगली आणि गाणी लावायची वेळच आली नाही! ग्लास नव्हते, (त्यांचा उपयोगही नव्हता!) पण सोबत "चकणा' भरपूर होता. त्यामुळं चरत चरतच इप्तित स्थळी पोचलो. फारशी वाहतूक नव्हती. राजगुरूनगरच्या अलीकडच्या फाट्यावरून दहा किलोमीटर आत असलेल्या या गावातील शाळेच्या मैदानावर आम्ही पोचलो, तेव्हा पावणेतीन वाजले होते. "गाडीचे दिवे बंद करून आत या, जपून पावले टाका,' अशा सूचना आम्हाला तिथे आधीच उपस्थित असलेला आमचा सहकारी आणि हौशी आकाशनिरीक्षक मयुरेश प्रभुणे याच्याकडून मिळाल्या होत्या. अंधारात चाचपडतच गाडीतून उतरलो. बरेच लोक त्या मोकळ्या मैदानात पथारी टाकून निवांत पहुडले होते. पायाखाली किडा-मुंगी चिरडू नये म्हणून काळजी घेतात, तशी कुणाच्या अंगाखांद्यावर पाय पडू नये म्हणून आम्हाला काळजी घ्यावी लागत होती.
कसेबसे धडपडत शाळेचा कट्टा गाठला नि विसावलो. गप्पा-विनोदांना ऊत आलाच होता. आमचा सहकारी मयुरेश कुठल्या तरी गच्चीवर जाऊन उल्कांचे फोटो घेण्यासाठी धडपडत होता. त्याचं दर्शन होणं दुरापास्त होतं. मैदानात पहुडलेली माणसं नि "उल्का' या नामविशेषावरून यथेच्छ कोट्याही करून झाल्या. थोड्याच वेळात उल्का पडताना दिसायला लागल्या. अगदी "वर्षाव' नसला, तरी नेत्रसुखद दृश्‍य होतं ते. निदान आपण गेल्याबद्दल पश्‍चात्ताप तरी झाला नाही, एवढा दिलासा देणारं! काही छोट्या, काही मोठ्या उल्का पडताना पाहायला मिळाल्या. पहाटे अपेक्षित असलेलं मोठ्या प्रमाणातलं उल्कावर्षावाचं नाट्य मात्र हुलकावणी देऊन गेलं. "आत्तापर्यंत दोन ढगांतून उल्का पडल्या आहेत. आता तिसऱ्या ढगातून आणखी मोठा वर्षाव पाहायला मिळेल,' असं आश्‍वासन मयुरेश देत होता, पण आम्हाला त्यानं फारसा फरक पडत नव्हता. वातावरण एन्जॉय करण्याचा उद्देश सफल झाला होता.
दहा वर्षांपूर्वी असाच एकदा उल्कावर्षाव झाला होता, त्या वेळी तो बघायला दुचाकीवरून बोंबलत पौडच्या पुढे गेलो होतो. फारसा अनुभव त्या वेळीही घेता आला नव्हता, असं आता अंधुकसं आठवतंय.
असो. पण या वेळचा अनुभव धमाल होता. उल्कांचा नसला, तरी आनंदाचा, उत्साहाचा आणि विनोदांचा भरपूर वर्षाव झाला! "एकच तारा' समोर दिसला असला, तरी "पायतळी अंगार' मात्र नव्हता!!

Nov 11, 2009

सूर्योदय रायगडावरचा

१. रायगडावरून दिसलेली चंद्राची मनमोहक प्रभा.
mahabaleshwar-nov 09 280

२. नगारखान्यावरून पहाटे टिपलेला चंद्र.

mahabaleshwar-nov 09 310

३. छत्रपतींसोबत चंद्रही सूर्योदय पाहायला उत्सुक होता.

mahabaleshwar-nov 09 316

४. आम्ही सरसावून बसलो होतो, पण आदित्य महाराज वाकुल्या दाखवत होते.
mahabaleshwar-nov 09 318


५. अखेर त्यांनी हळूच डोकं वर काढलं.

mahabaleshwar-nov 09 320

६. लांबवर एक नजर टाकली...
mahabaleshwar-nov 09 321


७. मग डुलत डुलत अजून वर सरकले

mahabaleshwar-nov 09 322

८. प्रुथ्वीतलावरची पकड आणखी घट्ट केली...

mahabaleshwar-nov 09 332

९. आणखी घट्ट....!

mahabaleshwar-nov 09 327

१०. भेट दोन सूर्यांची
mahabaleshwar-nov 09 334

११. नगारखान्याच्या दरवाज्यातून टिपलेलं सूर्याचं लोभस रूप

mahabaleshwar-nov 09 342


रायगडावर स्वारीची ही माझी तिसरी आणि मुक्कामाची दुसरी वेळ होती. याआधी मुक्काम केला होता, तो जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाच्या व्हरांड्यात. या वेळी सहकुटुंब गेलो असल्याने जिल्हा परिषदेच्या विश्रांतीगृहाचं आधीच आरक्षण करून ठेवलं होतं. पण तोही प्रयोग फसला. विश्रांतीगृह अगदीच भकास आणि गलिच्छ अवस्थेत होतं. पण एमटीडीसीच्या विश्रामगृहात उत्तम सोय झाली. संध्याकाळी गडावर फिरून आम्ही खोलीवर परतलो, तेव्हा चंद्राची तांबूस-तपकिरी प्रभा पाहायला मिळाली. आत्तापर्यंत चंद्राचा असा रंग कधीच पाहिला नव्हता.
संध्याकाळी सूर्यास्तही पाहिला, पण सगळ्यात आकर्षण होतं सकाळच्या सूर्योदयाचं. मुक्काम गडावरच असल्यानं सकाळी हा मुहूर्त गाठायचाच, असं मी ठरवलं होतं. सकाळी सहा वाजता गजर लावून उठलो, तेव्हा बऱ्यापैकी फटफटलं होतं. वाटलं, सूर्य वर आला की काय! पटकन आवरून कॅमेरा सरसावून नगारखान्याकडे पळालो. सुदैवानं सूर्य वर आलेला नव्हता. तोपर्यंत मेघडंबरीचे आणि नगारखान्याच्या मुख्य दरवाज्याचे फोटो टिपले. चंद्रासह हे फोटो फारच आकर्षक वाटत होते. पहाटच असल्यानं बऱ्यापैकी अंधार होता आणि फ्लॅश टाकून स्पष्ट फोटो येत नव्हते. अखेर फ्लॅश बंद करणं जमलं आणि उत्तम फोटो टिपता आला.
धुंद-कुंद हवा आणि वारा वाहत होता आणि त्यात नगारखान्याच्या समोरच्या ध्वजस्तंभावरची लोखंडी साखळी स्तंभावर आपटून खण-खण आवाजात मधुर निवाद करत होती. त्या भारलेल्या वातावरणात तो मंद ध्वनी मंदिरातल्या पवित्र घंटानादासारखाच लयबद्ध वाटत होता. नगारखान्याकडून होळीच्या माळाकडे वळलो. बाजारपेठेसमोरच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आलो. तिथे काही अन्य लोक सूर्योदयाची छबी न्याहाळण्यासाठी जमले होते. सूर्योदयापूर्वीची प्रभा क्षितिजावर रंग उधळत होती, पण आदित्य नारायण उगवले नव्हते. बहुधा, धुक्‍यामुळे किंवा ढगाळ हवामानामुळे महाराजांचं कोवळं रूप पाहायला मिळणारच नाही, अशीच शंका मनात दाटून आली. 6.40 होत आले होते, तरी त्यांनी डोकं वर काढलं नव्हतं. "डोंगरावरून चढून यायला त्याला वेळ लागत असणार,' असा विनोदही कुणीतरी केला.
एका बाजूने चंद्रही आकाशात चमकत होता. बहुधा, त्यालाही सूर्याची उगवती प्रभा पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता! अखेर आमच्या प्रतीक्षेला फळ आलं आणि घरातल्या छोट्या खुर्चीच्या आधारानं लहानग्यानं उभं राहावं, तसं सूर्याच्या लालबुंद गोळ्यानं हळूच डोकं वर काढलं. आळसातून जागा होत असलेला रायगड आपल्याच कोवळ्या प्रकाशात दिसतो तरी कसा, हेच पाहण्याचा तो प्रयत्न करत होता बहुधा. बराच वेळ प्रतीक्षा करायला लावून एखादा "स्टार' कसा आल्याआल्या वातावरण भारून टाकतो, तसाच काहीसा अनुभव होता तो.
या "ताऱ्या'नं सगळ्यांना मनसोक्त फोटोबिटो काढू दिले. मग शिवाजी महाराजांच्या अस्तित्त्वाची आणि जबाबदारीची जाणीव झाली असावी बहुधा त्याला. लगालगा वर आला. आपली लालबुंद, कोवळी प्रभा झटकून टाकली आणि नंतर हळुहळू रंग बदलून कामाला लागला. मीदेखील मग त्याचा नि महाराजांचा निरोप घेऊन माझ्या आन्हिकांकडे वळलो...

for more photos click here

Nov 9, 2009

मी कात टाकली

कोणतीही गोष्ट साधी, सरळ, सुव्यवस्थित होता कामा नये, हा माझ्या जीवनाचा दंडक आहे. काहितरी खुसपट, अडचण, समस्या त्यात निर्माण झालीच पाहिजे. त्यानंतरच ते काम पूर्ण व्हायला हवं. मी स्वखुशीनं स्वीकारलेला नव्हे, तर नशीबानं/दैवानं/देवानं किंवा जगण्यानं म्हणा, माझ्यावर लादलेला हा नियम आहे.

बऱ्याच दिवसांत तसं काही झालं नव्हतं. यंदाची दिवाळी व्यवस्थित पार पडत होती. शेवटचा दिवस होता. पाडव्याला संध्याकाळी घरी नको, म्हणून आम्ही सासुरवाडीला (माझ्या!) जाऊन आलो होतो. फटाके उडवण्याची ही शेवटचीच संधी मनस्वीला दवडू द्यायची नव्हती. तसेही, दिवाळी यंदा दोनच दिवस होती आणि लगेचच शाळा सुरू होणार होती. त्यामुळे साडेदहा वाजले होते, तरी मी तिच्याबरोबर गच्चीत फटाके उडवायला जायला तयार झालो. फुलबाजे वगैरे उडवून झाल्यानंतर आम्ही भुईनळे उडवायला घेतले. तिला भुईनळा लावायला शिकवण्याचा बेत होता. तिच्या हातात फुलबाजा देऊन मी तिला शिकवायच्याच प्रयत्नात होतो, पण तिला काय वाटलं कुणास ठाऊक, तिनं अचानक माघार घेतली. "मी नाही उडवणार' म्हणायला लागली. मग तिचा नाद सोडून तिच्यासाठी मीच तो भुईनळा पेटवण्यासाठी सरसावलो. छोटाच फुलबाजा होता. भुईनळ्याच्या टोकाला तो लावला आणि एकदम "ठाप्प' आवाज आला. माझ्या डोळ्यापुढे अंधार झाला. दोन मिनिटं काही सुचेचना. दिसेचना. मी जोरात ओरडलो फक्त. भानावर आलो तेव्हा कळलं, हाताचा अंगठा आणि एक बोट पूर्णपणे भाजलं होतं. मधल्या बोटालाही अर्धवट इजा झाली होती. भुईनळा वर उडण्याऐवजी फुटला होता. बॉंबसारखा! माझ्या हाताचा जो भाग मिळाला, तो पोळून निघाला होता.

सुरुवातीला भाजण्याची तीव्रता कळली नाही. चटकन नळाच्या धारेखाली हात धरला, पण आग वाढत होती. सहन होण्याच्या पलीकडे गेली होती. काय झालं, ते मनस्वीला कळतच नव्हतं. "बाबा, फटाके उडवायला चला,' हे तिचं टुमणं सुरूच होतं. मी ताडकन घरी आलो आणि पुन्हा हात पाण्याखाली बुडवून ठेवला. पण तरीही वेदना कमी होत नव्हती.

डोळ्यापुढे अंधार झाला, पण सुदैवानं डोळ्यांना काही झालं नव्हतं. काही क्षणांत मला व्यवस्थित दिसू लागलं. बाथरूममधल्या गॅस हीटरवरची काही अक्षरं वाचूनही पाहिली. मग समाधान झालं. हाताची आग मात्र थांबत नव्हती. पाण्याखाली तरी किती वेळ धरणार?

फटाके उडविण्याच्या कार्यक्रमाचा फियास्कोच झाला होता. कुणीतरी सांगितलं, बटाट्याचा किस हातावर लावा. तो उष्णता शोषून घेईल. मग तसं केलं. जरा गार वाटलं. पण नंतर पुन्हा तो किस गरम झाल्यासारखं वाटू लागलं. हात झोंबायचा काही कमी होईना.

साडेअकराला अंथरूणावर अंग टेकलं. दिवाणाच्या शेजारी तेवढ्याच उंचीचं स्टूल घेऊन त्यावर हात ठेवला. स्टुलावर हात, त्यावर बटाट्याचा किस, अशी "लगोरी' रचलेली दिसत होती. तरीही, स्वस्थ झोपवेना. हाताची वेदना काही सुचू देईना. मग उठलो. टीव्ही लावला. दिसेल ते बघत बसलो. रात्री दोनपर्यंत हात ठणकत होता. मी अस्वस्थ येरझारा घालत होतो, चॅनेल बदलत होतो, हातावर फुंकर मारत होतो, बटाट्याचा किस खालीवर करत होतो. शेवटी दोनला जरा वेदना कमी झाली आणि पुन्हा एकदा निद्रादेवीची आराधना करण्याचा विचार केला. सुदैवानं झोप लागली.

दुसऱ्या दिवशी काळी पडलेली बोटं आणि भाजलेली कातडी भयानक दिसत होती. डॉक्‍टरांकडून रंगीबेरंगी गोळ्या आणल्या. (कुठलाही आजार झाला, की आमच्या डॉक्‍टरांना रंगीबेरंगी गोळ्या द्यायची हौसच आहे. पूर्वी पानपट्टी चालवायचे बहुधा!) बॅंडेज करायचं नव्हतं, हात बांधायचा नव्हता. त्यामुळं आमचा हा उवद्‌व्याप सर्वांना चर्चेच्या गुऱ्हाळासाठी उपयोगी पडणार होती. ऑफिसच्या दैनंदिन गॉसिपव्यतिरिक्त चघळायला आणखी एक विषय!

साधारणपणे आठ दिवस जुन्या कातडीच्या खाली येणारी नवी कातडी जाम चावत होती. कराकरा खाजवायची इच्छा होत होती, पण इलाज नव्हता. सुदैवानं उजवा हात असला, तरी ऑपरेटिंगसह सगळी कामं मला करता येत होती. पंधरा दिवसांनी हात व्यवस्थित झाला. जुनी कातडी जाऊन नवी कातडी आली. मला कात टाकल्यासारखंच वाटू लागलं. आता नवी कातडी जुन्या कातडीशी जुळूनही आलेय बहुतांश भागात. पूर्ण बरं व्हायला अजून काही दिवस, महिने लागतील, अशी शक्‍यता आहे.

सुदैव म्हणजे मनस्वीला तो भुईनळा न उडविण्याची सुबुद्धी लवकर झाली. तो फुटणार आहे, हे तिला "सिक्‍स्थ सेन्स'नं कळलं की काय कोण जाणे! (ती मुलगी असल्यानं तिच्याकडे तो असण्याची दाट शक्‍यता आहेच. पण बापाला घडोघडी पिडू नये, हे पहिले पाच "सेन्स' वापरूनही का कळत नाही, ते तिलाच ठाऊक!)

मोठा झाल्यानंतर भाजण्याचा हा पहिलाच अनुभव. शाहिस्तेखानासारखं आमचंही त्या बोटांवरच निभावलं. लहानपणी असाच एकदा भाजलो होतो. खुर्चीवर मागे उभं राहून खुर्चीच्या दोन पायांवर ती आपल्या अंगावर घेऊन झुलण्याचा आवडता खेळ खेळत होतो. मागे स्टोव्हवर पिठलं रटरटत होतं. खुर्ची जास्तच अंगावर आली नि मी पिठल्यात पडलो. उजवा खांदा नि बरीच बाजू खरपूस भाजून निघाली होती. पिठल्यासारखी! दुसऱ्याच दिवशी परीक्षा होती नि मी मुख्याध्यापिकांच्या केबिनमध्ये बसून पेपर दिला होता! तरीही भाजल्याच्या रात्री मी व्यवस्थित जेवलो आणि मला भाजलं म्हणून माझी बालमैत्रीण कम बहीण मात्र उपाशी राहून रडत बसली होती, हे ती अजूनही सुनावते कधीकधी!

असो. कात टाकल्यानंतर आता लिहायलाही बरेच विषय आहेत. दर दोन-तीन दिवसांनी लिहीनच एखादा. वाचत राहा, म्हणजे झालं!

Oct 28, 2009

हजारों ख्वाइशें ऐसी

दोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्‍व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. अगदी ब्लॉग लिहून ते वाचणार कोण, असाच प्रश्‍न मनात होता. त्यामुळं काही महिने दुर्लक्ष झालं होतं. बऱ्याच अवांतर गोष्टी लिहीत होतो, पण अजूनही बरंच काही लिहू शकतो, मांडू शकतो, हे ध्यानात आलं नव्हतं. ध्यानात आलं, तरी कुठे आणि कसं मांडावं, हे कळत नव्हतं. पेपरमधून ते मांडणं शक्‍य नव्हतं, कारण वृत्तपत्रीय लेखनाला असलेल्या मर्यादा. अशात आमच्या देविदास देशपांडे या सहकाऱ्यामुळं या ब्लॉग प्रकरणाविषयी अधिक माहिती मिळाली. ब्लॉग कसा लिहायचा, पोस्ट कशा टाकायच्या, लेआऊट कसा करायचा, फॉंट कसे-कोणते निवडायचे, इथपासून ते ब्लॉग इतर वाचकांपर्यंत कसा पोचवायचा, या सगळ्याची माहिती त्याच्या मार्गदर्शनाखेरीज शक्‍य नव्हती.
ब्लॉग सुरू केला, पण सुरुवातीला लिहायचा कंटाळाच करायचो. मग "सकाळ'मध्येच प्रसिद्ध होणारे लेख नि परीक्षणं टाकण्याची पळवाट शोधली. पण त्यात काही अर्थ नाही, हे लवकरच लक्षात आलं. ब्लॉग चालवायचा म्हणजे त्यासाठी स्वतंत्र लिखाण केलं पाहिजे, हे पटलं. मग वेगवेगळे विषय सुचत गेले. नियमितपणे लिहायला लागल्यावर तर असं लक्षात आलं, की एखाद्या वेगळ्या ठिकाणी गेल्यावर तिथेच ब्लॉग लिहिण्यासाठी फोटो वगैरेची तयारी आपण आपसूक सुरू करत आहोत. ब्लॉगच्या जोडीला पिकासा, ऑर्कुट, मनोगत नि मिसळपावची जोड मिळाली आणि ब्लॉगविश्‍व आणखी खुललं.
ब्लॉग अनेक विषयांवर, अनेक क्षेत्रांतले लोक लिहितात. त्यांचीही निरीक्षणं करू लागलो. पण अभ्यास वगैरे शक्‍य नव्हतं. इंटरनेटवरून वाचन करायला एक प्रकारची निष्ठा आणि पेशन्स लागतो. माझ्यात तो नाही. पण मित्रांचे ब्लॉग वाचणं आणि त्यातून सादरीकरण, लिहिण्याचे विषय निवडणं, ही प्रक्रिया सोपी झाली. ब्लॉग लिहिताना मी स्वतः मात्र वैयक्तिक अनुभवांवर भर दिला. राजकीय, सामाजिक विषय अभावानेच लिहिले. तसे विषय लिहायचे, तर त्यासाठी वेगळा आणि स्वतंत्र शैलीचा ब्लॉग सुरू करायला हवा. माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि नाही.
वैयक्तिक अनुभवांना मात्र भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यातलाच हा पहिला अनुभव म्हणजे माझी ब्लॉगवरची पहिलीवहिली पोस्ट. तिला तब्बल 11 प्रतिसाद मिळालेत. आज वीस हजारांच्या टप्प्याच्या निमित्तानं ती पोस्ट खाली पुन्हा प्रसिद्ध करतोय.
आतापर्यंतचा ब्लॉगचा अनुभव प्रसन्न, आनंददायीच आहे. मनातल्या अनेक गोष्टी इंटरनेटच्या पानांवर उतरवता आल्या. अजून अनेक उतरवायच्या आहेत. आयुष्यातल्या अनेक टप्प्यांविषयी, व्यक्तींविषयी लिहिण्याचं मनात आहे. पण मूड लागल्याशिवाय ते प्रत्यक्षात उतरत नाही. आता मात्र नेमानं आठवड्याला दोन तरी पोस्ट टाकण्याचा संकल्प आहे.
पुन्हा एकदा तुमच्या सहकार्याबद्दल, प्रेमाबद्दल, पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद. माझ्यावर, ब्लॉगवर असंच प्रेम यापुढेही कायम ठेवा!!

Oct 27, 2009

घ्या हात धुवून!

जगातल्या समस्त समस्यांची घाऊक चिंता असलेल्या अनेक पाश्‍चात्त्य संघटना आहेत. त्यांना कधी कशाचे उमाळे येतील, याचा नेम नसतो. त्यातून ऊठसूट प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करायची सवयच लागली आहे जणू पाश्‍चात्त्यांना. चित्रविचित्र दिवसांचा जन्म होतो, तो त्यातूनच. नुकताच "जागतिक हात धुणे दिवस' साजरा झाला. त्यामागचा उद्देश भव्यदिव्य असला, तरी एक वेगळाच विचार त्यातून मनात डोकावला. या दिवसाचा खरंच उपयोग करून काही समाजोपयोगी, हितकारक करता आलं तर? पाहूया, एक झलक.

1. सरकारी कर्मचारी ः यांच्यासाठी कुठलाही दिवस "हात धुणे दिवस'च असतो. कोणतंच काम नसेल, तर त्याला सरकारी सेवेच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेणं म्हणतात. हीच गंगा वाहताना कर्मचाऱ्याला फलदायिनी ठरत असले, तर तो आनंद दुप्पट असतो. मग हात धुवून घेण्याचं प्रयोजन आणि उद्दिष्ट वेगळं असतं. आपले वरिष्ठ तेच काम करीत असतील, तर त्यांचं अनुकरण करणं आणि त्यांच्या कामात मदत करणं हे कर्मचाऱ्याचं आद्य कर्तव्य ठरतं. त्याची तंतोतंत अंमलबजावणी या दिवसानिमित्त करावी.

2. इतर कोणतेही कर्मचारी ः साहेबाला किंवा पंचिंग मशीनला फसवून ऑफिसात उशीरा येणं आणि लवकर बाहेर पडणं, ऑफिसला स्वतःचं घरच मानून टाचण्यांपासून ते स्टेशनरीपर्यंत अनेक गोष्टी घरीच नेऊन ठेवणं, अशा कोणत्याही मार्गांनी हात धुण्याचं व्रत अंगीकारणं शक्‍य असतं. आधी आपण आचरणात आणत असलेल्या उपक्रमांमध्ये भरभक्कम वाढ करावी, एवढंच. तसंच पुरुषांसाठी दुपारच्या वेळेत झोपा काढणं, महिलांसाठी स्वेटर विणणं, यांखेरीज गाणी डाऊनलोड, कॉंप्युटरवर चित्रविचित्र वेबसाइट्‌स पाहणं, मनसोक्त वाचन करणं, ब्लॉग-फोटो ब्लॉग चालवणं, मित्रमैत्रिणींशी आपुलकीनं संवाद साधणं, असे अनेक नवनवीन उपक्रम राबविता येतील.

3. वरिष्ठ अधिकारी ः कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त पाळण्याचा, कामावर निष्ठा ठेवण्याचा सल्ला देऊन स्वतः मात्र भरपूर गैरफायदे उपटणाऱ्या या प्राण्याला तर या दिनानिमित्त अनेक योजना प्रत्यक्षात आणता येतील. मंदीचं किंवा उत्पन्नघटीचं कारण दाखवून कर्मचाऱ्यावर कपातीची कुऱ्हाड चालवणं, छंद म्हणून हव्या त्या शेऱ्यांसह मेमो देऊन त्यांना खचवणं, ऑफिसच्या यंत्रणेचा भरपूर गैरवापर करून त्याचं खापर कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर फोडणं, अशी अनेक तंत्र त्यासाठी अवलंबण्याचा विचार करता येईल.

4. चोर, पाकीटमार ः यांच्यासाठी हा सर्वाधिक उपयुक्त दिवस ठरू शकतो. एवढी वर्ष आपल्या व्यवसायाला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून अधिकृत मान्यता मिळविण्यासाठी ज्यांनी मूक आंदोलन केले, त्यांच्यासाठी हा विजयी दिवसच म्हणायला हवा. त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाचा उत्सव अधिक परिणामकारकरीत्या साजरा करणं सहज शक्‍य आहें.


5. मारकुटे मास्तर/मास्तरणी : `मारकुटे' हे आडनाव नसून, ती प्रव्रुत्ती आहे. या वर्गातील मास्तर-मास्तरणींसाठी हा सोनियाचा दिनु. विद्यार्थ्यांना धोपटण्याचे आपले राष्ट्रीय कार्य त्यांना ब्राह्ममुहूर्तावरही सुरू करता येइल. नेहमीचे वर्ग असोत, वा जादा. आपल्या उपक्रमात खंड पडू देण्याचं काहीच कारण नाही. छडी, वेताचा फोक, पट्टी, डस्टर, छत्री...कोणतंही आयुध वापरता येइल. ही क्रुत्रीम आयुधं थकली, तर `हात' समर्थ आहेतच! विद्यर्थ्यांना बडवल्याशिवाय त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल होत नाही, अशी ठाम धारणा मनात असली, म्हणजे झालं!

6. राजकीय कार्यकर्ते : यांची संधी आता गेली! निवादानुका संपल्या, प्रचारही संपला. पण आमची खात्री आहे, प्रचारकाळात त्यांनी हा दिवस रोज साजरा केला असणार. `साहेब, आज अमक्या वस्तीत जायचंय. द्या पैसे. साहेब, तमके लोक फार कावकाव करताहेत. द्या पैसे. साहेब, ढमक्या ठिकाणी आपण पोचलेलो नाही. नाराजी खूप आहे. द्या पैसे' करून त्यांनी आपल्या इच्छुक `साहेबां'कडून भरपूर माया गोळा केली असणार. आपल्या निष्ठेचा, अविरत सेवेचा मोबदला म्हणून स्वत:कडेच ठेवली असणार, याबद्दल आमच्या मनात तीळमात्र शंका नाही!

7. पुढारी : यांना मात्र केव्हाही, कधीही, कोणत्याही परिस्थितीत साजरा करता येण्याजोगा दिवस! शिक्षण म्हणू नका, पाणी म्हणू नका, बांधकाम म्हणू नका, आरोग्य म्हणू नका. हात धुवून घेण्याची संधी सगळीकडेच! खर्‍या अर्थाने या दिवसावर, उपक्रमावर श्रद्धा आणि निष्ठा आहे, ती याच मंडळींची!
जय लोकशाही!!

Oct 20, 2009

निकालाआधीची दिवाळी!

सामान्यांची, सर्वसामान्यांची, अतिसामान्यांची आणि असामान्यांची दिवाळी असते, तशीच राजकीय नेत्यांनाही दिवाळी असतेच की! त्यांच्या घरीही गोडधोड पदार्थ होतात, वेगवेगळे फराळाचे प्रकार केले जातात, आप्तेष्ट-नातेवाइकांना निमंत्रणं धाडली जातात, अगदी आनंदाचा महोत्सव असतो म्हणा ना! हां. इतरांपेक्षा राजकारण्यांची दिवाळी वेगळी म्हणायची ती या अर्थानं, की दिवाळीच्या आगचे-मागचे वातावरण कसे आहे, यावर बरंच काही अवलंबून असतं. सध्याचे त्यांचे ग्रहमान, पक्षश्रेष्ठींची मर्जी, सध्या असलेली जबाबदारी, येऊ घातलेली संकटं, विरोधकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, या सगळ्यावर त्यांच्या दिवाळीचा "मूड' ठरत असतो. अशा या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळीत त्यांचे फटाकेही एकदम जगावेगळे असणारच की नाही? पाहूया, त्यांची एक झलक..

1) आपटीबार ः हा फटाका दलित चळवळीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांच्यासाठी. रिपब्लिकन ऐक्‍याची त्यांनी दिलेली ही एकशेत्रेसष्टावी हाळी. या वेळी ऐक्‍य होणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघच मानली जात होती; पण ज्या खडूनं ही रेख मारायला आठवले निघाले होते, त्या खडूच्या निर्मितीतच काहीतरी भ्रष्टाचार झाला असावा. कारण ही रेघच मुळात पुसट आखली गेली. त्यामुळं ती पुसण्यासाठी इतरांना फारसे कष्ट करावे लागले नाहीत. शिवाय, तो काळा दगडदेखील आठवले ज्यांना सध्या जाहीर विरोध करताहेत, त्यांनीच पुरवलेला होता, अशीही कुजबुज ऐकू येऊ लागली.
असो. तर या फटाक्‍याचं वैशिष्ट्य असं, की बाहेरून वाटतो हा मोठा शक्तिशाली फटाका. पाहताक्षणी कुणाच्या डोळ्यात भरावा आणि कुणालाही आकर्षण वाटावं असा. अनेक वाती आणि अनेक प्रकारचे दारूगोळे एकत्र येऊन बनलेला; पण तो पेटवायच्या आधीच एकेक वाती निखळत जातात. काही आधीच फुसक्‍या होत्या, हे नंतर लक्षात येतं. ठासून भरलेल्या दारूगोळ्यातही फारसा दम नाही, हे फटाका पेटवल्यानंतरच लक्षात येतं. मोठ्या आवाजाचं चित्र फटाक्‍याच्या अंगावर असलं, तरी प्रत्यक्षात फुसका आवाज करून हा फटाका विझून जातो.

2) ट्रेन ः "ट्रेन' किंवा दोरीवरून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सुर्रर्रर्रऽऽऽऽ करत जाणारा हा फटाका खास बंडखोर आणि अपक्षांसाठी. तो सुरू कुठे होणार, हे आपल्याला माहीत असतं, पण संपणार कुठे, हे कुणीच आधी सांगू शकत नाही. एका टोकावरून जो वात पेटवून देईल, त्याच्याच बाजूला तो फटाका परत येईल, याची अजिबात खात्री नसते. कदाचित तो दुसऱ्या टोकाला जाऊन पुन्हा पहिल्या टोकाला येऊ शकतो, किंवा आल्याची हूल देऊन तिकडेच थांबूही शकतो. कधीकधी तर वात शिल्लक असताना आणि आत दारूही भरपूर असताना तो दोरीच्या मध्यभागीच एकाएकी विझूनही जाऊ शकतो. तर एखाद प्रसंगी वात पेटवणाऱ्याच्याच अंगावर उडी मारून त्याला भाजण्याची गंभीर धोकाही असतो!

3) अग्निबाण (रॉकेट) ः हा फटाका खास राज ठाकरेंसाठी. या फटाक्‍याचं वैशिष्ट्यं असं, की त्याला जशी दिशा द्याल, त्या प्रमाणात तो विध्वंस घडवतो. कधी या गोटात खळबळ उडवेल, तर कधी त्या गोटात. काही सांगता येत नाही! बाटलीत जरी हा बाण लावला, तरी तो सरळ जाईलच, याचा नेम नसतो. सुईईईऽऽऽऽ असा त्याचा शिट्टीसारखा आवाज आणि जोरदार अग्निवर्षाव पाहून कुणालाही त्याविषयी आकर्षण वाटतंच. तो फार मोठा स्फोट वगैरे घडवत नाही. तरीही, प्रतिस्पर्ध्याच्या गोटात अस्वस्थता आणि चिंता निर्माण करण्याएवढा परिणाम नक्कीच साधतो. बाटली वाकडी करून लावली, तर तो कुणाच्याही खिडकीतून एखाद्याच्या घरात अग्निकांड घडवू शकतो, तर कधी कुणाला बेसावध गाठून त्याला नामोहरम करू शकतो. लावणाऱ्याला मात्र या अग्निबाणाचा काही अपाय झाल्याचा अनुभव आत्तापर्यंत तरी नाही!

4) लवंगी ः अतिशय आकर्षक वेष्टनात आणि दणदणीत आवाजाच्या स्टीकरसह बनवलेली ही लवंगी फटाक्‍यांची माळ आपले सर्वांचे लाडके नेते कोकणसम्राट नारायण राणेंसाठी! ही माळ अतिशय बेरकी, हुशार. आपली नक्की ताकद किती आहे, याचा अंदाज कुणाला येऊ द्यायची नाही. त्यामुळे सुरवातीला तिच्यावरचे स्टीकर पाहून आणि तिच्या वेष्टनाचा आकार पाहूनच भलेभले दचकतात; पण प्रत्यक्षात तसं घाबरण्याचं कारण नाही बरं! कारण आधी दणदणीत आवाज केला, तरी नंतर ही माळ फुसकी निघू शकते. कधी कधी तर वेष्टन बदलून अगदी सस्त्यातही खपवलेली गेलेली पाहिलेय म्हणे अनेकांनी तिला!

5) फुलबाजे ः मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेले समस्त नेते उदा. पतंगराव कदम, रोहिदास पाटील, अजित पवार, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदींसाठीचं हे विशेष उत्पादन. फारसं धोकादायक नाही, तरीही छान तडतडणारं आणि भरपूर प्रकाश व आनंद देणारं. फटाके उडविल्याचंही समाधान आणि कुणाला नुकसान न केल्याचंही. यानं दुसऱ्या कुणाला त्रास होण्याची शक्‍यताच नाही. उलट, कधीकधी याच फुलबाज्यानं दुसऱ्या मोठ्या फटाक्‍यांची वात लावून देऊन त्यांना उडण्यासाठी आणि भरपूर आवाज करण्यासाठी देखील मदत करता येते. अशी मदत झाली तरी ठीक, नाही झाली, तरी उत्तम! फुलबाजे उडविण्यातली गंमत काही कमी होत नाही. आहे की नाही खरी गमतीदार वस्तू?

यंदाच्या दिवाळीत या फटाक्‍यांच्या खरेदीला भरपूर गर्दी झाल्याची चर्चा आहे; पण ग्यानबाची मेख खरी पुढेच आहे बरं का! हे फटाके यंदा ज्या रंगाचे, ज्या रूपाचे आणि गुणधर्माचे आहेत, तसेच पुढील वर्षी राहतील, अशी खात्री नाही बरं का! तेव्हा यंदा असे दिसताहेत म्हणून खरेदी करून पुढल्या वर्षासाठी राखून ठेवाल, तर नक्की पस्तावाल, एवढं लक्षात ठेवा!!

Oct 2, 2009

अनुशेष!

`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोचक विनोद वगळला, तरी मूळ परिस्थिती पटण्याजोगीच होती.
रत्नागिरीत राहत होतो, तेव्हा तिथे तीन थिएटर होती. (आता वाढली नाहीत, उलट एक कमी झालंय!) आम्हाला अधिकृतपणे एखादाच चित्रपट, तोही तीन महिन्यांतून वगैरे...बघण्याची परवानगी होती. मग कुठे मळ्यात, कुठे सत्यनारायणाच्या सार्वजनिक पूजेला, कुठे मित्राकडे व्हीडिओवर ही तहान भागवावी लागायची. तेव्हाच ठरवून टाकलं होतं - "मोठा झाल्यावर तिन्हीच्या तिन्ही थेटरांतले सिनेमा बघेन, तरच नावाचा अभिजित,' असा संकल्प त्याच वेळी करून टाकला. हा संकल्प पूर्ण करण्याची संधी मिळण्याच्या आधीच पुण्याला आलो. पुण्यात पहिलं काम कुठलं केलं असेल, तर ते वेगवेगळी थिएटर शोधून काढणं. तोपर्यंत फक्त "प्रभात'च माहित होतं. अगदी मध्यवस्तीत, भाऊ महाराज बोळात आम्हाला आश्रय मिळाल्यानं फावल्या वेळेत थिएटर शोधून काढण्याची मोहीम आवडीची आणि आनंददायी होती. मग श्रीकृष्ण, श्रीनाथ, अपोलो, भारत, सोनमर्ग, लक्ष्मीनारायण, अलका, विजय, अशी सगळी आसपासची थिएटरं शोधून तिथे वाऱ्या सुरू झाल्या. अगदी स्टेशनपलीकडचं "निशात', "वेस्ट एन्ड'ही पालथं घालून झालं. "व्हिक्‍टरी' तेवढं एक ताब्यातून सुटलंय!
सांगायचा मुद्दा हा, की तेव्हा भरपूर वेळ होता आणि घालवायचा कुठे, हा प्रश्‍न होता. त्यामुळे भरपूर चित्रपट पाहण्याचा छंद आणि संकल्पही पूर्ण करण्याची संधी मिळाली. अगदी मिथून चक्रवर्तीपासून बो डेरेकपर्यंत सर्व चित्रपटांची तथेच्छ मेजवानी झडली. बाल्कनीत बसणे वगैरे आग्रह नसल्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहापर्यंतचा कुठल्याही थिएटरातला, कुठल्याही वर्गाचा आणि कुठलाही शो आपल्याला वर्ज्य नव्हता. अर्थातच, बरेचचे हुकलेले, रत्नागिरीत पाहायला न मिळालेले सिनेमे पाहून झाले.
आता मात्र ही चंगळ झेपेनाशी झाली आहे. तेच तर दुःखाचं कारण आहे. दुपारनंतर ऑफिस आणि सकाळच्या वेळेत घरच्या, मुलीच्या जबाबदाऱ्या, या चक्रात स्वतःच्या आवडीचा वेळेत पाहायला मिळणं, ही सध्या चैनीची गोष्ट झाली आहे. त्यातून हल्ली सकाळी सहाला उठून "जिम'ला जाण्याचं व्रत घेतलंय. त्यामुळं रात्री उशीरापर्यंत जागणंही झेपत नाही. काही दिवसांपूर्वी रात्री झोप लागत नव्हती, म्हणून उठून इंटरनेटवर "सिंहासन' पाहिला. घरात बरेच दिवस "जाने तू या जाने ना' आणि "रॉक ऑन' पडून होते. तेही अर्धवट पाहिले. रात्री तीन वाजले, म्हणून झोपलो. पण पुढचा अर्धा भाग पाहायचा राहिलाय, तो अजून नाही जमला. वेन्सडे, हजारों ख्वाइशें ऐसी, दस विदानियॉं, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि, क्विक गन मुरुगन, दशावतारम, कित्ती कित्ती सिनेमे पाहायचेत. मराठीत तर ही यादी आणखी मोठी आहे. त्यातले प्रमुख म्हणाल तर...गोष्ट छोटी डोंगराएवढी, रीटा, जोगवा, इत्यादी इत्यादी.
थिएटरच्या अंधारात एकदा स्वतःला झोकून दिलं, की पूर्ण चित्रपट तरी पाहून होतो. अगदी मिथुनच्या वाईटात वाईट सिनेमालाही मी उठून बाहेर गेलोय, असं कधी झालं नाही. किंबहुना, मला थिएटरमधून बाहेर काढू शकणारा सिनेमा अजून जन्माला यायचाय, असं म्हणायला हरकत नाही! तूर्त मात्र बाहेर येण्यापेक्षा हल्ली थिएटरमध्ये जाणंच कमी झालंय. शुक्रवारी परीक्षणासाठी सिनेमा पाहायला लागतो, तेवढाच एक दिलासा म्हणायचा! आजच "हसतील त्याचे दात दिसतील' पाहिला. "अपोलो'ला! कुठेही, कसाही, कुठलाही सिनेमा पाहण्याची आपली उमेद अजून कायम आहे, याची खात्री पटली!

Sep 29, 2009

"बाल'हट्ट

""बाबा, मला जादूचे प्रयोग बघायचेत.''
आमची "लाडली लक्ष्मी' हट्ट धरून बसली होती.
मध्यंतरी टीव्हीवर "छोटा चेतन,', "भूतनाथ'वगैरे पाहिल्यापासून तिची ही इच्छा अधिकच चिघळली होती. त्यामुळे गणपतीच्या आधीपासून अशा संधीच्या शोधात होतो. गणपतीत-नवरात्रात बरेच ठिकाणी जादूच्या प्रयोगांची जाहिरात होती, पण वेळ जमण्यासारखी नव्हती. अशा सार्वजनिक प्रयोगांना जाण्याबद्दल वावडं नव्हतं, पण तिथली सोय आणि व्यवस्था यांविषयी शंका होत्याच. एवढं करून गर्दीतून प्रयोग नीट दिसला नाही, तर सगळंच मुसळ केरात, असं वाटलं होतं. त्यातच अचानक गेल्या गुरुवारी "सकाळ'मध्येच जादूगार संजय रघुवीर यांच्या प्रयोगांची जाहिरात वाचली. प्रयोग रविवारी सकाळी भरत नाट्य मंदिरात होता. सर्वच बाबतीत सोयीचा होता आणि तिकीटदरही परवडण्याच्या घरातले होते. तातडीनं शुक्रवारी बुकिंग करून टाकलं. तरीही, सातवी रांग मिळाली म्हणून जरा नाराजी होतीच!
रविवारी फारशी काही कामंधामं नव्हती, त्यामुळे वेळेत नाट्यगृहात पोचलो. प्रयोगही बऱ्यापैकी वेळेत सुरू झाला. रत्नागिरीत असताना रघुवीर, जादूगार भैरव यांचे प्रयोग पाहिले होते. त्यावेळी ते फारच भव्यदिव्य वाटले होते. माणसाचे दोन तुकडे करणं, तलवारी खुपसणं, पेटीतला जादूगार गायब होऊन प्रेक्षकांतून बाहेर येण्यासारखे प्रयोगांनी विलक्षण गारूड केलं होतं. अगदी तसंच नाही, पण तत्सम काही पाहायला मिळेल, अशा समजात मी होतो. मनस्वी पहिल्यांदाच जादूचे प्रयोग पाहत असल्यानं, तिच्या विशेष काही अपेक्षा नव्हत्या बहुधा. बऱ्याचदा पालकच मुलांच्या इच्छाआकांक्षांविषयी चुकीचे ग्रह करून घेतात, हे या वेळी प्रकर्षानं जाणवलं.
सुरुवातीला हातचलाखीचे आणि नंतर काहीसे अवघड आणि मोठ्या स्वरूपाचे प्रयोग झाले. मला आणि हर्षदालाही कुठल्याच प्रयोगात काही गम्य वाटलं नाही. लाकडी बॉक्‍समधून ठोकळा गायब करणं, पत्ते मोठे करणं, झोपलेला माणूस तरंगवणं, अशा स्वरूपाचे प्रयोग अगदीच साधे आणि कालबाह्य वाटले.
लहानपणी गणेशोत्सवात, अन्यत्रही असे प्रयोग पाहून अनेकदा भारावलो होतो. किंबहुना, चार वर्षापूर्वी गोव्यात फिल्म फेस्टिव्हलला गेलो, तेव्हाही गर्दीत हातचलाखीचे खेळ करणाऱ्या एका कलाकाराच्या कलेनं खूप प्रभावित झालो होतो. हे प्रयोग मात्र अगदीच सामान्य दर्जाचे वाटले. जादूगाराची हातचलाखी, बोलण्याची आणि प्रेक्षकांशी संवादाची पद्धतही अगदीच सामान्य होती. अगदी रिकाम्या पिशवीतून पेट्या किंवा काही वस्तू काढण्याच्या प्रयोगांबद्दल मात्र थोडंसं अप्रूप वाटलं.
सादरीकरणाच्या बाबतीतलं बुद्धिदारिद्य्रही अगदीच त्रासदायक होतं. गबाळे कपडे घातलेले दोन सहायक आणि त्यांच्याहून जरा कमी गबाळे कपडे घातलेला जादूगार पाहायला पैसे देऊन थिएटरात कशाला यायचं, असाच प्रश्‍न निदान मला तरी पडला. "हे सगळं खोटं आहे,' हे माहीत असूनही निदान जादूगाराच्या हातचलाखीला दाद देण्याची संधी तरी काही वेळा मिळते. या वेळी त्याचाही अभाव जावणवला. एकंदरीत पैसे आणि वेळ फुकट गेल्याचा अनुभव मिळाला.
मनस्वी थोडीशी कंटाळली, पण एकंदरीत तिला फार काही दुःख झालेलं वाटलं नाही. ती बऱ्यापैकी आनंद घेत होती या प्रयोगाचा. शिवाय तिचा नेहमीचा खुराकही तिला मिळाला होता. आईवडिलांची संगतही होती. तिचं फारसं काहीच बिघडलं नव्हतं.
अर्थात, मुलांसाठीच्या कार्यक्रमासाठी अतिउत्साहानं जाऊन तोंडघशी पडण्याची ही माझी काही पहिलीच वेळ नव्हती! गेल्या वर्षी मनस्वीला पहिल्यांदाच बालनाट्य दाखवायला याच नाट्यगृहात घेऊन गेलो होतो. नाटक होतं - "हिमगौरी आणि सात बुटके'. अगदीच प्राथमिक दर्जाचे बालकलाकार, त्यांचं नाटकी बोलणं, कोणत्याही आधुनिक साहित्याचा समावेश नसलेला सेट आणि जुनाट, अतिप्राचीन सादरीकरण आणि संवाद यांनी अगदी उबग आणला होता. मनस्वीला त्यातली सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे चेटकीण आणि तिचं हसणं! "पैसे वसूल' या संकल्पनेत तिला तेवढं पुरेसं होतं.
यंदा "माकडाचं लग्न' आणि तशाच प्रकारच्या तीन एकांकिकांच्या एकत्रित प्रयोगाला तिला घेऊन गेलो होतो. हे तरी बरे असतील, या अपेक्षेनं. ते "हिमगौरी'पेक्षा वाईट होते. सई परांजपेंच्या "झाली काय गंमत'चा गंभीर शेवट पाहून तर हसावं की रडावं, हेच कळेना. एकतर अनेक वर्षांपूर्वी लिहिलेली ही नाटकं. त्या वेळची सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती निराळी. ती नाटकं तशीच्या तशी उचलून सादर करायची अवदसा काय म्हणून या संस्थांना सुचली असावी, असाच प्रश्‍न नाटकाची सुरवात झाल्यापासून मला छळत राहिला.
हल्ली टीव्ही हा मुलांच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. "आई, ऐकलंस ना? शुद्ध पाणी ही प्रत्येक आईची जबाबदारी आहे. तू पण मला असंच पाणी दे' असं आमची अंगठ्याएवढी पोरगी स्मृती इराणीची जाहिरात पाहिल्यापासून आम्हाला गेल्या सहा महिन्यांपासून ऐकवत आहे. टॉम अँड जेरी, भीम, हे तिचे रोजचे स्वप्नातले आणि प्रत्यक्षातले सवंगडी झाले आहेत. राक्षस, देव, परी, यांच्याकडे भरपूर ताकद आणि शक्ती असते आणि त्यांचंच आयुष्य हे खरं आयुष्य, असा तिचा ठाम समज आहे. कॉंप्युटर स्वतः सुरू करून ती गेमसुद्धा खेळत बसू शकते. अशा पिढीतल्या या मुलांना जुनाट विचारांची, जुनाट सादरीकरणाची आणि अगदी सामान्य दर्जाची कालबाह्य बालनाट्ये का बरे दाखवतात ही मंडळी? त्यांच्या काळाशी, त्यांच्या विचारांशी आणि बुद्धीच्या एकूण आवाक्‍याशी साधर्म्य राखणारी नवी नाटके का बरे लिहीत नाहीत? त्यांना आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा का बरे निर्माण करत नाहीत? त्यांना आवडेल आणि आपलेसे वाटेल, असे सादरीकरण का करत नाहीत? सत्तर-ऐंशीच्या दशकातली अतिआदर्शवादी विचारांची बालनाट्यं त्यांनी का पाहावीत? नव्या जमान्याला आणि आयुष्याच्या वेगाला साजेशी नाटकं पाहायला मिळणं, हा त्यांचा हक्क नाही?
असो. दिवाळीची सुटी लवकरच लागेल. पुन्हा बालनाट्यांचं पीक येईल. एका सर्वसामान्य पालकाच्या या विचारांची कुणीतरी दखल घेईल आणि या परिस्थितीत अल्पशी सुधारणा होईल, या अंधुक आशेवर हा विषय इथेच सुफळ संपूर्ण.
----

Sep 22, 2009

वारी नीळकंठेश्वरची







पुण्याच्या आसपासची बरीचशी ठिकाणे आता फिरून झाल्यामुळे दरवेळी ट्रिपचा बेत ठरवताना नवं ठिकाण शोधण्याचं आव्हान असतं. गेल्या रविवारी असाच प्रश्न आला, तेव्हा वेल्हा, भोरगिरी असे पर्याय होते. पण दुपारपर्यंत परत यायचं आणि जास्त प्रवासही नको, या निकषांवर नीळकंठेश्वराची निवड केली. मी आणि हर्षदा एकदा तिथे जाऊन आलो होतो. तेव्हा अलीकडच्या गावातून होडीने जावं लागलं होतं. या वेळी गाडी न्यायची असल्याने थेट पायथ्यापर्यंत जाता येणार होतं. खडकवासल्यापासून पुढे रस्ता बराचसा खराअबच होता. वाटेत एका गावात मस्त मिसळ चाखली. अनपेक्षितरीत्या उत्तम चव होती. मजा आ गया!तिथून पुढे रस्ता शोधत नि खड्ड्यांतून वाट काढतच प्रवास झाला. पायथ्याच्या पार्किंगपर्यंत गाडे नेणं म्हणजे अक्षरश: दिव्य होतं. गेलो कसेबसे.उभा चढ चढून जाताना अर्थातच दमछाक झाली. पण उद्देश तोच होता, नि कल्पनाही होती. आश्चर्य म्हणजे, मनस्वीदेखील बराचसा चढ चढली. काही वेळा तिला डोक्यावर घ्यावं लागलं. वाटेत एकदा पडलीही.नीळकंठेश्वर म्हणजे शंकराचं शांत, निवांत देवस्थान आहे. शंकराच्या देवळांचं हेच वैशिश्ट्य अस्तं. गजबजाटापासून दूर आणि निवांत परिसर. तिथे डाल-भाताचा प्रसाद मिळाला. प्रसादाविषयी वाईट बोलायचं नाही म्हणतात, म्हणून इथेच थांबतो.देवळाबरोबरच तिथलं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे तिथे उभारलेल्या मूर्ती आणि देखावे. रामयण, महाभारत आणि अनेक पौरणिक, ऐतिहासिक संदर्भाच्या मूर्ती तिथे उत्तमरीत्या साकारल्या आहेत. मनस्वीला मेजवानीच होती. भरपूर घोष्ती पण ऐकायला मिळण्याची आपसूक सोय झाली! जाम उधळली होती तिथे.उतरताना तसे निवांतच होतो. शेजारच्य दरीत नि पलीकडच्य अडोंगरावर अंधारून आलं होतं. पाऊस पडत असणार, याचा अंदाज येत होता. पण ते लोण आमच्यापर्यंत लगेच यीएल, असं अजिबात वाटलं नव्हतं. पाचच मिनिटांत हलके थेंब पडायला लागले नि नंतर थर धो-धो पाऊस आला. आम्ही शेवटच्या उतारावर होतो, तरी पळापळ झालीच. मनस्वीला कडेअर घेऊन उतरताना त्रेधा उडाली. धावत येऊन गाडेल बसलो, तरी खूप भिजलो होतो. आपण जादा कपडे, टॉवेल नेत नाही, तेव्हाच पासून अशी पंचाइत करतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गाडीत १५ मिनिटे बसून राहिलो, तरी पाऊस थांबण्याचं लक्षण नव्हतं. चार-पाच फुटांवरचंही दिसत नव्हतं आणि विजा तर काळजात धडकी भरवत होत्या. विजा चमकायला लागल्या, की त्यातली एखादी आपल्याच डोक्याअर पडणार, अशी स्वप्नं पडतात मला लहाणपणापासून! पण सुखरूप आलो. डोंगरावरून गाडी उतरवणं हे जास्तच मोठं आव्हान होतं!येताना सालाबादपरमाणे रस्ता चुकलो. खडकवासल्याकडे येण्याऐवजी शिवणे गवात घुसलो. वेळीच लक्षात आलो, त्यामुळे परत फिरलो. संध्याकाळी घरी येऊन परत नाइट ड्युटीला पण गेलो ऑफिसात!
ट्रेकिंगची आपली खाज अजूनही कायम आहे, यावर शिक्कामोर्तब तरी झालं!

(fr more photos click to )

Sep 18, 2009

पितर्स डे!

crow
मराठी नेटिझन्सच्या आवडत्या "मिसळपाव' साइटवर सक्काळी सक्काळी एका काळ्या कुळकुळीत, प्रसन्न, तुकतुकीत कांतीच्या आणि भक्ष्यावर एकटक नजर लावून बसलेल्या कावळ्याचं चित्र पाहून मन उल्हसित झालं. "मिपा'चे पालक, जनक "तात्या' यांच्या समयसूचकतेला उत्स्फूर्त दाद गेली. या "काका'त मला माझे (किंवा तात्यांचे!) पणजोबा, खापरपणजोबा, खापर-खापर पणजोबा वगैरे दिसू लागले. गेल्याच आठवड्यात शेजाऱ्यांकडे चापलेल्या खीर-पुरीची चव नको नको म्हणताना जिभेवर पुन्हा रेंगाळू लागली.
तसं मला मरणाबद्दल नसलं, तरी मेल्यानंतरच्या क्रियांबद्दल भयंकर आकर्षण! उभ्या आयुष्यात कुणाला मरताना प्रत्यक्ष पाहिलं नाही. अगदी जराजर्जर झालेल्या एखाद्या आप्तालाही! त्या बाबतीत अगदीच "कोषात' निम्मं आयुष्य गेलं म्हणा ना! कुटुंबातलं किंवा जवळच्यांपैकी कुणाच्या मृत्यूचा अनुभव मला वयाच्या सत्ताविशीपर्यंत नव्हता. अगदी लहान असताना पणजी गेली. पण तेव्हा मी जेमतेम सहा-सात वर्षांचा असेन. ती अंधुकशी आठवतेय. "सोनू डॉक्‍टर' म्हणायची मला. मी डॉक्‍टर व्हावं, अशी तिची इच्छा होती. का कुणास ठाऊक? मी डॉक्‍टर होऊन या म्हातारीला औषधं देईपर्यंत जगण्याची तिची इच्छा होती की काय, कुणास ठाऊक! पण सुटली लवकर. तिच्या काय, कुणाच्याच आशीर्वादानं मी डॉक्‍टर वगैरे झालो नाही. तसा मनसुबा होताच अर्थातच. कारण त्यावेळी बारावीनंतर डॉक्‍टर किंवा इंजीनिअर हे दोनच व्यवसाय असतात, असा ठाम समज होता. डॉक्‍टरकीला माझी ऍडमिशन थोडक्‍यासाठी चुकली. केवळ 39 टक्के कमी पडले. मी डॉक्‍टर न होऊन शेकडो रुग्णांवर उपकारच केले म्हणायचे!
असो.
तर सांगत काय होतो, की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू. आजोबा गेले, तेव्हा मी पुण्यात होतो. त्यांना साधी कावीळ झाली होती आणि त्यात ते जातील, असं अजिबात वाटलं नव्हतं. त्यांची तब्येत ठणठणीत होती. ब्याऐंशीव्या वर्षापर्यंत चादरी-पांघरुणं आपटून धुणे, विहिरीतून पाणी काढून झाडांना घालण्यासारखे उद्योग करायचे. त्यांचा उत्साह आम्हालाही लाजवायचा. पण काविळीचं निमित्त झालं आणि यमराजानं डाव साधला. त्यांना बघण्यासाठी रत्नागिरीला जाण्याचा विचार करेपर्यंतच ते गेले. शेवटचं भेटताही आलं नाही. आजीजवळ तेव्हा मी खूप रडलो होतो. आयुष्यात जवळून (न) पाहिलेला जवळच्या व्यक्तीचा पहिला मृत्यू होता तो! आजोबांना शेवटचं पाहताही आलं नाही, याची खूप खंत वाटली त्या वेळी. पण आधी भेटायला येण्याजोगं काही वाटतही नव्हतं. मग आजीनं मला आश्‍वासन दिलं, "माझं काही कमी-जास्त होतंयसं वाटलं, की नक्की तुला बोलावून घेईन!' त्यानंतर तीन-चार वर्षांनी आजी मुंबईला असताना गेली. सुदैवानं माझं लग्न पाहायला ती होती. आजोबांना माझं लग्न पाहायची फार इच्छा होती. बी. ए. पास वगैरे असलेल्या एखाद्या मुलीची नुसती पत्रिका जरी तिकडे रत्नागिरीला पोचली, की जणू माझं लग्न ठरलंच आहे, अशा थाटात ते नाचायलाच लागायचे. मग मी नकार दिला, की "या मुलीत नकार देण्यासारखं काय आहे,' हेच त्यांना कळायचं नाही. शेवटीशेवटी तर माझ्या नकारांमुळे रागावून त्यांनी माझ्याशी बोलणंच सोडलं होतं!
त्यांच्या दहाव्या दिवसाला पिंडाला कावळा शिवत नव्हता. "मी लवकर लग्न करेन' असं आश्‍वासन वडिलांनी मला द्यायला लावल्यानंतर कावळा शिवला! बाकी, असल्या प्रकारांवर माझा कधीच विश्‍वास नव्हता. मी तसं सांगितल्यामुळे किंवा सांगितल्यावर लगेच कावळा शिवला, असं अजिबात नाही. पण घरच्यांच्या समाधानासाठी ते करण्यात काही गैर नव्हतं.
आजी गेली, तेव्हाही मी तिच्याजवळ नव्हतो. पण पुण्याहून मुंबईला जाणं सोईचं होतं. तिचे अंत्यविधी करायला मी पोचू शकलो. पण वडील जिवंत असलेल्या व्यक्तीने असे अंत्यविधी करायचे नसतात, हे नंतर कळलं! गंमत म्हणजे, तिच्या दहाव्याच्या आदल्या दिवशीच इंदूरला एका मित्राचं लग्न होतं. तेही होतं संध्याकाळी आठच्या मुहूर्तावर. मला तिकडे जाणं अत्यावश्‍यक होतं, कारण पुण्यातून अन्य दोन मित्रही जाणार होते. इंदूरहून मुंबईसाठी शेवटची बस संध्याकाळी सातची होती. मग आदल्या दिवशी इंदूरला पोचलो. त्याचं श्रीमंतपूजन वगैरे विधींना हजेरी लावली आणि लग्न लागण्याआधीच संध्याकाळी तिकडून निघालो. पण हाय रे कर्मा! मुंबईत पोचेपर्यंत अकरा वाजले, तोपर्यंत सगळे विधी झाले होते. एवढा आटापिटा करून काही उपयोग झाला नाही. लग्नविधीही चुकला आणि दशक्रिया विधीही!
लहानपणी दहाव्या-तेराव्याच्या जेवणावळींचंही फार कौतुक वाटायचं. आमच्याकडे ही पद्धत नव्हती, पण शेजारच्या काही घरांमध्ये होती. आमच्या शेजारच्या एका घरात तर सात-आठ वर्षांत पाचेक माणसं गचकली! दर वेळी तेराव्याला आम्हाला जेवणाचं निमंत्रण यायचं. पहिल्या वेळी तर मला जाम गंमत वाटली होती! अगदी पत्रिका छापून नाही, तरी "सगळ्यांनी प्रसादाला या,' असं निमंत्रण ऐकून मला हसावं की रडावं, कळेना झालं होतं. वर निमंत्रण दिलं असलं, तरी जेवायला जायचं नसतं, असंही ज्येष्ठांकडून समजलं. पितृपक्षातल्या जेवणावळी ठीक आहे. पण तेराव्याला जेवायला जाऊन करायचं काय? म्हणजे धड जेवणाचा आनंदही घेता येणार नाही आणि मुकाट रडवेला चेहरा करून पानात पडलेलं गिळावं लागणार!
लहानपणी शाळेतून येताना वाटेत पैसे पडलेले सापडले, म्हणून तीन-चार नाणी उचलून घरी आणली होती, असंही आठवतंय! घरी आल्यावर कळलं, कुणाच्या तरी अंत्ययात्रेत ठरलेल्या पद्धतीनुसार त्या मार्गावर पैसे टाकण्याची पद्धत होती. गोरगरीबांना दान म्हणून! तेच पैसे मी उचलून आणले होते!! कधीकधी चुरमुरे-फुटाणेही फेकलेले दिसायचे. अन्नाची नासाडी करून या लोकांना काय "पुण्य' मिळतं कुणास ठाऊक, असा विचार तेव्हा मनात यायचा!!
असो. कावळ्याला पाहून मन भरून आलं, म्हणून काहीतरी खरडलंय. लिखाणाचा विशेष काही उद्देश नव्हता किंवा दिशाही. लेखातल्या एका परिच्छेदाचा दुसऱ्याशी संबंध असण्याची सुतराम शक्‍यता नाही! "पितर्स डे' गोड मानून घ्या, झालं!
---

Sep 7, 2009

गोष्टी योगायोगाच्या

रत्नागिरीच्या दौऱ्याविषयी गेल्या वेळी लिहिलं होतं. याच प्रवासात आणखी एक गंमत घडली. "मोकळे' होण्यासाठी आम्ही मलकापूरच्या पुढे एका ठिकाणी सहज थांबलो. शेजारीच एक छोटा ओहोळ आणि त्यावर पूल होता. पलीकडे एक छोटीशी टपरी होती. अचानक हर्षदाला आठवलं, "अरे, रत्नागिरीच्या पहिल्या दौऱ्याच्या वेळी आपली एसटी इथेच बंद पडली होती!'
मीदेखील आसपास पाहिलं आणि ओळखीच्या खुणा पटल्या. तीच छोटी टपरी, तोच सुनसान रस्ता आणि तेच वळण. लग्नानंतर पहिल्यांदा रत्नागिरीला गेलो, तेव्हाच्या प्रवासात आमची रात्रराणी बंद पडली होती तिथे. पहाटे चारचा सुमार असेल. अंधुकसं फटफटलं होतं. गाडी काही लवकर दुरुस्त होणार नव्हती. मग आम्ही आसपासच्या परिसरात टाइमपाससाठी हिंडत होतो. त्यातच एक आंब्याचं झाड मिळालं. भरपूर कैऱ्या लागल्या होत्या. दगडांना तोटा नव्हताच. वेळही घालवायचा होता. मग कैऱ्या पाडत बसलो. तसल्या आंबटचिंबट कैऱ्या खाल्ल्याही. (लग्न झालं असलं, तरी आंबट-चिंबट खावं लागण्याची वेळ तोपर्यंत आली नव्हती. कृपया गैरसमज नको!)
नशीबावर फारसा विश्‍वास नाही आपला, पण योगायोगावर मात्र भयंकर आहे! योग असेल, तर कुठलाही माणूस कुठेही भेटू शकतो, असे अनेक अनुभव आलेत. प्रवासात त्याच ठिकाणी थांबण्याचा योग हा त्यातलाच एक.
पूर्वी एकदा मुंबईला काही कामानिमित्त गेलो होतो. संध्याकाळी लगेच परतणार असल्यानं मामा किंवा आत्या कुणाच्या घरी गेलो नव्हतो, वा फोनही केला नव्हता. बोरिवली स्टेशनवर उतरलो आणि जिना चढताना नेमकी मामेबहीण पुढ्यात! भरपूर शिव्या खाव्या लागल्या मग. आई-वडिलांना सांगण्याची धमकीही दिली. मला जाणं शक्‍य नव्हतं, म्हणून कुणाला कळवलं नव्हतं. पण ही दत्त म्हणून हजर! मुंबईच्या एवढ्या तुफान गर्दीत, कुणाकडे बघायला कुणाला वेळही नसताना ती समोर अचानक भेटण्याचं प्रचंड आश्‍चर्य वाटलं होतं.
लग्नासाठी आधी नकार देऊन, सहा महिन्यांनी पुन्हा तिच्यातच "आयुष्याचं सार्थक' शोधून तिला सहधर्मचारिणी बनविली, हा "योग' म्हणावा, की "भोग' याबाबत मात्र मी अजून संभ्रमात आहे!
----

Sep 1, 2009

प्रवास तपपूर्तीचा

ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 045
धुक्यात बुडालेला आंबा घाट. कोकणचे प्रवेशद्वार.
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 049
एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पाठवावा का हा फोटो?
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 054
निसर्गानं मन प्रसन्न केलं.
----
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 088
गणपतीपुळ्याला जाण्याचा भन्नाट रस्ता.
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 093
समुद्राची गाज ऐकत थांबण्याला पर्याय नाही!!
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 141
उंटावरच्या शहाण्या!
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 128
समुद्रात धमाल केली
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 114
किल्ला केला, वाहून गेला!
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 157
आरतीला मनस्वी पुढे होतीच...
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 078
अंगणात साफसफाईलाही पुढे!
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 226
गणपतीबाप्पाला निरोप
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 211
थिबा पॉइंटची नवी बाग
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 202
पलीकडे दिसतोय, तो भाट्याचा पूल! (भाट्याच्या खाडीत बुडणारा दालदी आठवतोय ना?)
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 188
कुरध्यात गेलो, ते नदी पार करून.
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 186
कुरध्यातलं निसर्गरम्य घर!
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 172
आडिवर्‍याचं मंदिर
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 177
कशेळीचा कनकादित्य : सूर्य मंदिर
---
ganpati ratnagiri trip 25th to 30th aug. 09 256
..आणि परतीच्या प्रवासातला घाटातला धबधबा!
--------

बरोब्बर बारा वर्षं. एक तप झालं मी रत्नागिरीहून स्कूटर घेऊन एकटाच पुण्याला आलो होतो, त्याला. गणपतीतच. असाच भन्नाट पाऊस होता. यंदाही तशीच सफर घडली. फरक फक्त दोन होते. एक रत्नागिरी-पुणे मार्गाचा आणि दुसरा गाडीचा. सन 1997 साली मी बजाज सुपर एफई घेऊन आलो होतो आणि यंदा "मारुती अल्टो'!
गाडी घेतली, तेव्हाच रत्नागिरीच्या गणपतीला यंदा गाडीनंच जायचं, असं ठरवून टाकलं होतं. त्यामुळं दरवर्षी 21 दिवस आधी रिझर्व्हेशनसाठी तडफडावं लागतं, बराच वेळ खोळंबूनही पाहिजे ती सीट मिळत नाही, ती गोष्ट वेगळीच. यंदा तो त्रास वाचणार होता. गणपतीच्या पहिल्या दिवशी यंदा जायला जमणार नव्हतं. यंदा एकूण सात दिवस बाप्पा घरी मुक्काम करणार होते. त्यामुळे पुण्यातील कामं आटोपून तिसऱ्या दिवशी रत्नागिरीकडे प्रयाण केलं. नाही म्हणता म्हणता पुण्यातून बाहेर पडायला सकाळचे साडेआठ वाजले. स्वाइन फ्लूच्या धोक्‍यामुळं कुठे हॉटेलाबिटेलात थांबणार नव्हतोच. पोटपूजेचं साहित्य सोबत घेतलं होतं. खंबाटकी घाटात थांबून आधी पोटपूजा केली. सकाळी गार वाऱ्यांच्या झुळकांत पोटभर नाश्‍ता करायला मजा आली. नंतर साताऱ्याच्या रस्त्याला लागलो. आम्हाला कोकरूडमागे (कोल्हापूरला वळसा घालून) रत्नागिरीकडे जायचं होतं. जाताना अपेक्षेप्रमाणेच, कोकरूड फाटा शोधताना दमछाक झाली. तो एकदा सापडल्यानंतर पुढे काही अडचण नव्हती.
कोकरूड गावाजवळ एकदा थोडी गडबड झाली, एके ठिकाणी चुकीच्या रस्त्याने थोडा पुढेही गेलो, पण लवकरच चूक लक्षात आली. नंतर मात्र कुठे चुकलो नाही. आंबा घाटात पोचलो आणि पहिल्यांदा पावसानं कृपा केली. गोमुखाच्या ठिकाणी पोचलो, तर तुफान पाऊस आणि धुक्‍यात बुडून गेलो. बाहेर उतरून फार वेळ थांबण्याचीही सोय नव्हती. उरलेला घाट जपूनच उतरावा लागला. पुढेही कोकणात उतरताना दोन-तीन ठिकाणी पाऊस लागला. वाटेत रमतगमत, फोटो काढत, थांबत गेलो. त्यामुळे रत्नागिरीत पोचायला पावणेचार वाजले. पण त्याची खंत नव्हती.
रत्नागिरीत पाच दिवस मुक्काम होता.
दुसऱ्या दिवशी आरे-वारे मार्गे गणपतीपुळ्याला गेलो. पण यंदा कोतवड्यातून न जाता काजरभाटीचा नवा रस्ता निवडला होता. या मार्गावरून रत्नागिरी-गणपतीपुळे अवघं 28 किलोमीटर अंतर आहे. समुद्रात काही वेळ खेळलो, किल्ले वगैरे केले. "कोकण दर्शन' प्रदर्शन पाहायचं या वेळीही राहून गेलं.
तिसऱ्या दिवशी राजापूरजवळ आडिवरे येथे आमच्या कुलदैवताला जायचं ठरलं. पावस-पूर्णगडमार्गे जाणारा हा रस्ता भन्नाटच आहे. आडिवऱ्याला मी पहिल्यांदाच जात होतो. पूर्णगडच्या पुढचा, गावखडीपासूनचा रस्ता तर समुद्रकिनाऱ्याला लागून असललेल्या सुरूबनाशेजारून जाणारा होता. मस्त गार वारा होता आणि आम्ही त्या भन्नाट रस्त्यावरून एकटेच निघालो होतो...
आडिवऱ्याचं पारंपरिकता जपणारं रवळनाथ आणि महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती मंदिर मन प्रसन्न करणारं होतं. देवाधर्माशी मला काही देणंघेणं नसलं, तरी देवळं पाहायला मात्र फार आवडतं. विशेषतः खेडेगावांत असणारी शांत, निवांत देवळं. त्यातूनही शंकराची देवस्थानं म्हणजेपर्वणीच! पण ते असो.
आडिवऱ्यात दर्शन उरकून कशेळीचं सूर्यमंदिर पाहायला निघालो. भारतातल्या काही निवडक सूर्यमंदिरांपैकी ते एक आहे. सुमारे नऊशे वर्षांपूर्वी कशेळी समुद्रकिनाऱ्याजवळ समुद्रात एक जहाज अडकलं आणि त्यातली मूर्ती तिथल्या एका किनाऱ्यावरच्या गुहेत त्यांनी सोडून दिली, अशी आख्यायिका सांगितली जाते. गुजरातमध्ये मूर्तिभंजनापासून टाळण्यासाठी ही मूर्ती महाराष्ट्राकडे हलविण्यात आली होती. आडिवऱ्यात आणि कशेळी सूर्यमंदिरातही मी वेगळ्या प्रकारची पाणी काढण्याची व्यवस्था पाहिली. त्याला काय म्हणतात, कोण जाणे!
येताना वाटेवरच्या कुरधे गावात आमच्या एका परिचितांकडे जायचं होतं. त्यांच्या घराचा रस्ताही शेत आणि नदीतून जाणारा, एकदम कोकणाची सर्व वैशिष्ट्यं असलेला होता. मजा आली.
रत्नागिरीत काही गणपती पाहिले. मुख्य म्हणजे तिकडे स्वाइन फ्लूचं सावट नव्हतं. त्यामुळे कुठेही भटकण्यात काही बंधनं नव्हती. एके संध्याकाळी सहज थिबा पॉइंटला गेलो होतो, तर तिथल्या पूर्वीच्या नैसर्गिक सुंदर ठिकाणी भली मोठी बाग उभारलेली! आम्ही कॉलेजात होतो, त्या काळात संध्याकाळी भटकायची ही ठिकाणं! ते दगड, दरी...सगळं आता कृत्रिम सौंदर्यानं वेढलं होतं. तरीही, बागेची रचना आवडली. विशेष म्हणजे तिथला धोका आणि स्वैरपणा कमी करण्यात या बागेचा मोठा हातभार लागेल.
पुण्याला येतानाच्या प्रवासासाठी थोडा लवकर, म्हणजे साडेसातला निघालो. रात्री फार झोप झाली नव्हती, त्यामुळे थोडा थकवा होता. तरीही प्रवास उत्तम झाला. पण जाताना जास्त मजा आली होती. कारण सुरुवातीचा पुणे-कऱ्हाड महामार्गावरचा कंटाळवाणा प्रवास संपल्यानंतर पुढे आंबा घाट, कोकणात उतरण्याचा मार्ग, हा प्रवास प्रसन्नकारक आणि उत्साहवर्धक होता. येताना नेमकी उलट परिस्थिती होती. वाटेत कोकरूडच्या पुढे आम्हाला एक लांडोर चालत जाताना दिसली. नंतर वेगळ्या प्रकारचे तीन लांबलचक पक्षी उडत जाताना दिसले. ते पुढे गेल्यावर कळलं, ते मोर होते! वाटेत शेतात काही मोरांचा केकारव पण ऐकू आला, पण दिसले मात्र नाहीत!
मनस्वीनं जाताना तिच्या समस्त गाण्यांचं पारायण करून एवढा पिट्ट्या पाडला होता, की आम्ही पार वैतागून गेलो होतो. येताना खास तिच्यासाठी 50 गोष्टींची एमपी3 घेतली होती. पण दहा-बारा गोष्टी ऐकूनच तिने साडेदहाच्या सुमाराला जी ताणून दिली, ती एकदम पुण्यात आल्यावर तीन वाजताच उठली!
बारा वर्षांपूर्वी रत्नागिरीहून पुण्यात राहायला आलो, तेव्हा गणपतीनंतर स्कूटर घेऊन आलो होतो. तो प्रवास मात्र चिपळूण-कोयनामार्गे केला होता. एकट्यानं दुचाकीवरून एवढा मोठा प्रवास करायची ही पहिलीच वेळ होती. वाटेत तब्बल 11 जणांना विनामोबदला लिफ्ट दिली होती! या वेळच्या चार चाकीमधून केलेल्या प्रवासाच्या वेळीही त्याची आठवण झाली. विशेष म्हणजे, त्या प्रवासात एका ठिकाणी कुत्रं अंगावर आलं होतं. या वेळीही आलं, पण माझ्या गाडीला दोन चाकांची पडलेली भर त्याला लक्षात आली नसावी!

Aug 15, 2009

पारतंत्र्यदिन!

mask
(खालील लेख हा आठ दिवस सर्व मनोरंजन बंद असल्याने भोगाव्या लागलेल्या मनस्तापाचा झालेला उद्रेक आहे. त्यातून "स्वाइन फ्लू'सारख्या जीवघेण्या समस्येबाबत गांभीर्य नसल्याची भावना झाल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा!)
----
पारतंत्र्यदिन!

छ्या! वैताग आलाय नुसता!
कुठे जाणं नाही, येणं नाही. नुसतं घर एके घर नि ऑफिस एके ऑफिस. पिक्‍चर नाही, नाटक नाही, चौफुला नाही की डान्स बार नाही!
आयचा घो या एच1एन1च्या!
गेल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती बरी होती. म्हणजे हा जो कुणी प्राणघातक विषाणू आहे, त्याच्या झळा जाणवत नव्हत्या. गेल्याच शनिवारी थेटरात जाऊन पिक्‍चर पाहिला होता. त्याच्या आदल्या दिवशी मुंबईला जाऊन आलो नव्हतो. फडकी नि मास्क लावून फिरायची फॅशन तोपर्यंत आली नव्हती. शनिवारी रात्री पुण्यात आणखी एकाचा घास त्या रोगानं घेतला आणि लोक बिथरले.
सोमवारी ऑफिसात आलो, तर निम्मे लोकं फडकी लावलेले! बोलतानाही ती काढण्याचं धाडस कुणी करत नव्हतं. (पुण्यात इतर वेळीही दहशतवाद्यांसारखी तोंडं झाकून फिरणाऱ्या मुलींनी "बघा, आमच्या नावानं बोटं मोडत होतात ना!' असे टोमणे मारून घेतले म्हणे!) मलाही लाजेकाजेस्तो दुसऱ्या दिवसापासून रुमाल लावून फिरणं नशीबी आलं. मनस्वीच्या (कन्या!) शाळेला आठ दिवस सुटी असल्याचं रविवारीच कळलं होतं. सोमवारी पालकमंत्र्यांनी सगळ्याच शाळा, थेटरं बंद करून टाकली. बसा बोंबलत!
मुघलांना जसे जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी-धनाजी दिसायचे, तसे मला ते एच1एन1 जागोजागी अदृश्‍य स्वरूपात दिसू लागलेत. एखाद्या अभयारण्यात पायी फिरताना कुठेही वाघबिघ असेल की काय, अशी भीती जशी वाटते ना, तसंच हल्ली बाहेर पडताना कुठे हा मेला विषाणू तरंगत असेल नि कधी आपल्या नाकातोंडातून शरीरात बसकण मारेल, अशीच दहशत जाणवते.
मास्कची विक्री दुप्पट, तिप्पट, दसपट, शेकडो पटीनं वाढली. दुकानदारांनीही त्यासाठी भरभरून सहकार्य केलं. (सदाशिव पेठेतल्या एका दुकानदारानं तर चक्क दुपारी एक वाजून तीन सेकंदांनी आलेल्या एका गिऱ्हाइकालाही तातडीने मास्क दिला म्हणतात!) मास्क कसा वापरावा, यावरून सरकारनं, प्रशासनानं, डॉक्‍टरांनी आणि स्वयंघोषित तज्ज्ञांनी मनसोक्त गोंधळ घातला. कुणी त्या डुकराच्या तोंडाचे मास्क वापरायला सांगितले. कुणी म्हणाले, ते नको, साधे सुद्धा चालतील. कुणी सांगितलं, मास्क नको...फक्त स्वच्छ धुतलेले रुमाल बांधा! ("स्वच्छ धुतलेले' ही अट फारच जाचक होती, ही गोष्ट अलाहिदा!) ते भारीतले (एन 95) मास्क म्हणे स्वाइन फ्लू झालेल्या पेशंटच्या आसपास वावरतानाच घालायचे. आता रिक्षात, बशीत, टमटमीत, बाजारात, दुकानात, ऑफिसात स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आसपास आहे की नाही, कसं ओळखायचं? मनोरुग्ण वगैरे वागण्यावरून ओळखू शकतो हो, स्वाइन फ्लूचा रुग्ण कसा ओळखायचा? बरं, शिंकतोय-खोकतोय म्हटलं, तरी ते आपण बारा महिने करत असतो! "स्वाइन फ्लू'त म्हणे घसा खवखवतो. ते शेजारच्या माणसाला कसं कळणार?
साधे मास्क घेतले, तर ते म्हणे दोन-तीन दिवसच वापरायचे. नंतर योग्य रीत्या त्यांची विल्हेवाट लावायची. (खरं तर मास्कबाबत अशी गोंधळ वाढवणारी माहिती देणाऱ्यांचीच विल्हेवाट लावायला हवी. पण ते "स्वाइन फ्लू' गेल्यानंतर बघू!) "योग्य रीत्या विल्हेवाट' हा अगदी पुणेरी फसवेपणा बरं का! ते मास्क एकतर जाळून टाकायचे, किंवा जमिनीत पुरायचे. आता मला सांगा, कुठला माणूस घरातून खाली उतरून ते मास्क जाळून किंवा पुरून टाकणार आहे?
रुमालांचीही एक गंमतच आहे बरं का! नाका-तोंडात विषाणू जाऊ नये, म्हणून रुमाल बाळगायचा. पण रुमाल मात्र घरी जाऊन स्वच्छ धुवायचा. आता तीन ते आठ तास हवेत स्वतंत्रपणे जिवंत राहू शकणारा हा विषाणू रुमालावर बसलेला असेल, तर तो घरात जाऊन रुमाल धुवायला टाकेपर्यंत दुसरीकडे कुठेतरी दडून नाही का बसू शकत? आणि नंतर आपण झोपल्यावर, जेवताना, लोळताना नाही का आपला डाव साधू शकत?
गेल्या आठवड्यात त्या विषाणूनं दहा-बारा बळी घेतल्यानंतर लोक जामच घाबरले. जिवाचाच प्रश्‍न आला, तेव्हा बाहेरही पडायचे बंद झाले. कुणी सांगितलं, निलगिरी हा बेस्ट उपाय! लगेच सगळे बेशुद्ध पडेपर्यंत ती निलगिरीच हुंगायला लागले. दुकानांतली निलगिरीच संपून गेली!
"स्वाइन फ्लू'नं जे बळी घेतले, त्यात नात्यांचा-आपुलकीचा घेतलेला बळी सर्वांत क्‍लेशकारक आणि धक्कादायक होता. जिवाला घाबरून लोक आपल्या जवळच्या व्यक्तींनाही विचारेनासे होण्याएवढे स्वार्थी झाल्याच्या बातम्या मन विदीर्ण करून गेल्या.
असो. यंदाचा स्वातंत्र्यदिन पारतंत्र्यात गेला असला, तरी गणपती सुरळीत पार पडतील आणि तोपर्यंत या राक्षसाचा आपण नायनाट करू, ही आशा!!
--

Aug 8, 2009

ड्यूक्‍स नोजचा धडा

ड्यूक्‍स नोजला पहिल्यांदा गेलो, तेव्हा म्हणजे साधारण 1999 सालापासून मी कोणत्याही वर्षी हा ट्रेक चुकविलेला आठवत नाही. एखाद्‌ वर्षाचा अपवाद असावा. अलीकडच्या काळात त्यात तोरणा आणि ढाक-भैरीचीही भर पडली होती. पण त्यात अनेकदा खंड पडला. ड्यूक्‍स नोजचा नेम मात्र कायम होता. यंदाही जूनमध्ये कोरड्या वातावरणात तोरणा कटाक्षानं टाळला. त्याची पुरेपूर भरपाई ड्यूक्‍स नोजला झाली.
नेहमीप्रमाणं "सिंहगड एक्‍स्प्रेस'नं खंडाळा गाठून तिथे पोटपूजा करून चालायला सुरवात केली. पहिल्या धबधब्यापाशीच पावसाच्या जोराचा अंदाज आला होता. हा ट्रेक म्हणजे जंगलातून जाणारी, दोन-तीन रॉक-पॅचची थोडीशी अवघड, पण भन्नाट वाट! वाटेत एक-दोन छोटे धबधबे आणि ओहोळ व नंतर डोंगरावरून फेसाळत येणारा मोठा धबधबा. यंदा धबधब्यापर्यंत पोचेपर्यंत त्याविषयीचं आकर्षण वाढलं होतं. धबधबा मस्त फेसाळत वाहत होता. यंदा तर त्याचा जोर एवढा होता, की थोडासा आधार घेऊनच पार करावा लागणार होता. आम्ही अर्थातच धबधब्यात मस्त तासभर डुंबलो. मनसोक्त भिजून-भिजवून झालं. निसर्गाची करामत म्हणजे, यंदा धबधब्याच्या वरच्या भागातला डोह दरड कोसळून नाहीसा झाला होता. तिथल्या धबधब्याचा प्रवाहदेखील बदललला होता. खालच्या धबधब्याचाच जोर एवढा होता, की त्याखाली उभंही राहवत नव्हतं. मग तिथेच धमाल केली.
धुक्‍यानं दरीचा बराचसा भाग व्यापला होता. पावसाचं कृपाछत्र असल्यावर ड्यूक्‍स नोजच्या ट्रेकची मजा वाढते. यंदा तर पावसानं नुसता धुमाकूळच घातला होता. धबधब्यात भिजल्यानंतर बदलायला मी कधी कपडे घेत नाही, पण यंदा घेतले होते. पण बदलावेसे वाटले नाहीत. ओले कपडे अंगावर वाळवण्याच्या आनंदाने ट्रेकचा उत्साह आणखी वाढतो. हाच निर्णय नंतर नडला!
वाटेत एका ठिकाणी मस्त लोटांगण घातलं. हाता-पायाला थोडं झाजरलं, कपडे चिखलात लोळले. पठारावरही भरपूर धुकं होतं. ड्यूक्‍स नोजवर पोचायला साडेबारा वाजले. तिथेही पावसानं झोडपून काढलं. धुक्‍यामुळं दरी दिसण्याचा प्रश्‍नच नव्हता. धबधब्यानंतर कॅमेराही बाहेर काढण्याची सोय नव्हती. साधारणपणे दोन वाजेपर्यंत खाली उतरलो. आता उतारावरची बरीचशी माती धूप होऊन वाहून गेल्यामुळे आणि खाली सुरू असलेल्या नव्या रस्त्याच्या कामामुळे उतारावरून घसरत येण्याचा आनंद कायमचा गेला!
जीन्स घातली होती, ती ओली (पावसामुळे!) राहिल्यानं पायाला घासून पाय आतल्या बाजूने मस्त सोलपटून निघाले! दोन दिवस विदूषकासारखं चालावं लागत होतं! भरपूर दिवसांनी केलेल्या ट्रेकमुळे पाय (आणि मन!) भरूनही आलं होतं. ("कुणी सांगितलं होतं नको तिथे शेण खायला!' अशी सुवचनं सहधर्मचारिणीनं ऐकवली, ती गोष्ट वेगळीच!)
असो. पुढच्या ट्रेकला जाण्याआधी 85 किलोच्या या देहाला आता थोड्या व्यायामाची सवय लावली पाहिजे, असा निश्‍चय केलाय. बघूया, कितपत अमलात येतोय ते!!

Aug 5, 2009

राखी : देवस्थळी ते सावंत!

rakhi

राखीपौर्णिमेचं लहानपणापासूनच कधीही फारसं अप्रूप नव्हतं. एकतर मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे तिच्याकडून राखी बांधून घेण्याची क्रेझ नव्हती. मामेबहिणी कधीतरी असायच्या रत्नागिरीत. तेव्हा राखीबंधनाचा सोहळा व्हायचा. पण ती राखी नैसर्गिक न वाटता, "बंधन'च वाटायचं. शेजारची स्वरूपा लहानपणापासून राखी बांधायची. आजही बांधते. तेवढं एक बंधन अतूट राहिलं.
त्या काळी वर्गातल्या, शेजारच्या मुलीशी बोलणंही पाप मानलं जायचं. वर्गात दंगा करणाऱ्या मुलाला शिक्षा म्हणून मुलीशेजारी बसवायचे! सातवीत एकदा अशीच "शिक्षा' आमच्या अख्ख्या वर्गाच्या वाट्याला आली होती. मग आम्ही बेंचवरच आपापली "हद्द' कर्कटकाने आखून घेतली होती. त्या हद्दीच्या पार कुठली वस्तू आली की जप्त करायची किंवा शेजारच्या मुलीला काहितरी शिक्षा करायची, असा नियम होता!
आमच्या घराच्या पल्याड काही अंतरावर राखी देवस्थळी नावाची एक मुलगी राहायची. घराशेजारी राहणाऱ्या, वर्गातल्या, नात्यातल्या, किंवा परिचयातल्या कोणत्याही समवयस्क मुलीच्या नावानं मुलांना चिडवण्याचा त्या काळी दंडकच होता! त्यामुळं मलाही तिच्या नावानं चिडवलं जायचं. हातावरच्या राखीनंतरची आयुष्यातली दुसरी "राखी' ही! बाकी, मामेबहिणी, अन्य शेजारणींच्या नावानंही चिडवणं व्हायचंच.
शाळेत रक्षाबंधनाचा सामूहिक, पारंपरिक, बंधनकारक सोहळा व्हायचा. मुला-मुलींची समसमान वाटणी करून प्रत्येकाला साधारणपणे एक या प्रमाणात राखी बांधण्याचा सार्वजनिक कार्यक्रम असायचा. या कुंभमेळ्यात आपली "लाइन' ("शाळा'!) आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी सर्वांची धडपड असायची. शाळेत ज्याच्या नावानं आपल्याला चिडवलं जातं, त्याला राखी बांधण्याचीही भयंकर प्रथा त्या काळी अस्तित्त्वात होती. मग या दहशतीमुळे अनेक जण राखीपौर्णिमेच्या दिवशीच नेमके आजारी पडायचे! तरीही नंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्यांना गाठून हा कार्यक्रम पार पाडला जायचाच! एकदा का त्या मुलाला राखी बांधली, की आपण "पवित्र' झालो, असा अनेक मुलींचा समज होता बहुधा!! पण राखी बांधली, तरी आम्ही "दादाभाई नवरोजी' व्हायला तयार आहोत, असा आमचा दावा असे.
हातावरची राखी जास्तीत जास्त दिवस टिकवणं हेदेखील एक पवित्र कर्तव्य होतं. आंघोळ करताना तिला पाणी लागू न देण्याचं कसब त्यासाठी पार पाडावं लागे. चित्रपटांच्या नावांच्या, भल्या मोठ्या स्पंजच्या आणि हल्लीच्या "पेस्ट्री'ला लाजवतील, अशा राख्याही बाजारात असायच्या. पण त्या हातावर बांधणं म्हणजे आपण अगदीच "ह्यॅ' असल्याचं लक्षण मानलं जायचं. शाळेत मिळायच्या त्या संघाच्या राख्या. मऊसूत गुंडा आणि एक साधा, केशरी दोरा. बस्स!
कॉलेजात असताना शेवटच्या वर्षात एकुलत्या एक वेळेला प्रेमात पडलो होतो. ही बया आपल्याला आता राखी बांधते की काय, अशी प्रचंड भीती त्या वर्षीच्या राखीपौर्णिमेला होती! पण सुदैवानं तसं काही झालं नाही. आणि तसं झालं असतं, तरी फरक पडला नसता, हे कॉलेज संपल्यानंतर उमगलं.
पुण्यात आल्यानंतर काही वर्षं बहिणींनी पोस्टानंही राखी पाठवली. साधारणतः राखीपौर्णिमा झाल्यानंतर आठवडाभराने ती मिळायची. त्यानंतरही ती हातावर बांधून मिरवण्यात एक प्रकारचं समाधान असायचं. विशेषतः एकटा राहत होतो, तेव्हापर्यंत!
...अगदी अलीकडच्या काळात आणखी एक "राखी' आयुष्यात आली. म्हणजे, खासगी नव्हे, तर सार्वजनिक आयुष्यात! ही राखी भलतीच मजबूत, बोल्ड आणि आकर्षक (हॉट?) होती! तीच ती..."महाराष्ट्राची खंत'. कुण्या पंजाब्यानं तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोण तीळपापड झाला होता अंगाचा!!
...पण हाय रे कर्मा! तिचं अगदी दोनच दिवसांपूर्वी लग्न ठरलं. आमचा मेव्हणा सातासमुद्रापारचा कुणी राजकुमार आहे म्हणे! आता त्याचे कान उपटायला जाईन म्हणतो!!

Jul 18, 2009

अटॅचमेंट!

मनस्वीच्या आयुष्यातील पहिली शाळा संपून एक वर्ष झालं. गेल्या वर्षी मार्चमध्ये तिची शिशु गटाची शाळा संपली. पहिल्या दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता ती कधी रडली नाही. नव्या शाळेत गेल्या वर्षी बालवाडीसाठी प्रवेश घेतला, तिथेही रमली. आता नव्या शाळेहून येताना बऱ्याचदा आम्ही तिच्या पहिल्या म्हणजे शिशु गटाच्या "पाखर' शाळेवरूनच बरेचदा जातो. अनेकदा त्यामागचा उद्देश असतो - तिच्या शाळेच्या आठवणी कायम ठेवणं!
हा आजार "अटॅचमेंट'चा! भावनिक जवळिकीचा. अशा भौतिक वस्तूंशी माझी कदाचित प्रत्यक्ष नात्यांपेक्षाही जास्त अटॅचमेंट आहे. आणि मुलीचीही तशी असावी, अशी (अनाठायी) अपेक्षा आहे. तिला मात्र पहिल्या "पाखर' शाळेतलं ढिम्म काही आठवत नाही. एकदा तिथल्या मुख्य बाई भेटल्या, त्यांनाही तिनं फारसं ओळखलं असावं, असं वाटलं नाही. बाकीच्या बाया आणि मुलांची नावं तर तिला अजिबात आठवत नाहीत. तिथली बाग, झोपाळा, घसरगुंडी आणि रचनाही आठवत नाही. कदाचित, ती नव्या शाळेत रमलेय म्हणूनही असेल. पण तिनं यापैकी काहीच विसरू नये, असं मलामात्र वाटत राहतं.
माझी सगळ्याच गोष्टींशी अटॅचमेंट व्हायची, होते. बालवाडीत मी एका नगरपालिकेच्या शाळेत होतो, तिथलं काही आठवत नाही. पण पहिली ते चौथी ज्या शाळेत शिकलो, तिथल्या पाण्याच्या टाकीपासून गॅदरिंगच्या रंगमंचापर्यंत सर्व काही लख्ख आठवतं. किंबहुना, ते बदलू नये, असंच वाटायचं. तीच गत माध्यमिक शाळेबद्दलची. सातवीत आम्ही शाळेच्या दुसऱ्याच इमारतीत होतो. पण एकच वर्ष. बाकी जवळपास नऊ वर्षं एकाच शाळेच्या दोन इमारतींत काढली. आजही तिथली रचना, खोल्या, प्रयोगशाळा, शिक्षकांची खोली, आमचे वर्ग, मैदान, पाण्याच्या टाक्‍या, जिने, आमची दंगामस्ती करण्याची जागा, सगळं काही डोळ्यांत भरलेलं आहे. मोकळ्या वेळी हे आठवणींचे अल्बम चाळायला घेतले, की एकही फोटो खराब झालेला नाहीये, याची खात्री पटते.
नव्या युगाच्या गरजेनुसार दोन्ही शाळांचं रूप मात्र बदललं. इमारती पाडून नव्या आधुनिक पद्धतीनं बांधण्यात आल्या. आताच्या इमारतींशी तेवढी अटॅचमेंट वाटत नाही.
कॉलेजशी पहिल्या काही वर्षांत माझी फारशी जवळीक नव्हती. बारावीत एकदा, एसवायला एकदा नापास झाल्यानंतर आणि एखादाच अपवाद वगळता बहुतेक वार्षिक परीक्षांत "एटीकेटी'च्या शिडीच्या आधारे वर सरकल्यानंतर कॉलेजविषयी फार काही आस्था असण्याचं कारण नव्हतं. पण टीवायला मात्र मी अगदी सिन्सिअर वगैरे विद्यार्थी झालो होतो. फर्स्टक्‍लासच्या रूपानं त्याचं फळही मिळालं. सुदैवानं, आम्ही कॉलेजात होतो, तेव्हाची रचना आहे तशी कायम आहे. अजूनही त्याच वर्गात, त्याच प्रयोगशाळेत पुन्हा जाऊन बसावंसं वाटतं. पण कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता!!
पुण्यात राहायला आल्यानंतर पहिली सहा-सात वर्षं जिथे काढली, त्या भाऊ महाराज बोळातील लॉज म्हणजे माझं दुसरं घर झालं होतं. रत्नागिरीनंतर सर्वाधिक काळ राहिलो, असं दुसरं ठिकाण! तिथून कधी सोडावंसंच वाटत नव्हतं, पण नंतर वेगळं राहण्याची खुमखुमी आली, म्हणून सोडावं लागलं. त्यानंतर शनिवार पेठेतल्या त्या भाड्याच्या कोंदट, एकलकोंड्या खोलीशीही माझी कायमची सलगी झाली. आत्ता नुकताच तो वाडा पाडून अपार्टमेंट बांधायला घेतल्याचं कळलं, तेव्हा जीव गलबलला. गेली सात वर्षं आता पुण्यात स्वतःच्या हक्काच्या घरात राहतोय. कधीकाळी परवडलं तर, अधिक सुविधांसह मोठा फ्लॅट घ्यायचा विचार आहे. पण त्या वेळी सुद्धा या घराशी नातं तोडण्याच्या कल्पनेनंही कसंनुसं होतं!
रत्नागिरीचं आमचं घर पूर्वी कौलारू होतं. 89 सालाच्या दरम्यान ते पाडून स्लॅब घातला. आमच्या जुन्या घराचा फोटो काढून ठेवायला हवा होता, ही रुखरुख कायम मनात राहील. अजूनही डोळ्यांच्या अल्बममधून ते दूर गेलं नसलं, तरी माझ्या मुलीला, बायकोला दाखवायला त्याच्या स्मृती छापील स्वरूपात तरी शिल्लक नाहीत! म्हणूनच आता डिजिटल कॅमेरा घेतल्यापासून कुठल्याही गोष्टी कॅमेऱ्यात टिपून तारीख-वारासह साठवून ठेवण्याचं व्रत अंगीकारलं आहे.
आयुष्याच्या संध्याकाळी बाकी काही नाही राहिलं, तरी या स्मृती कायम सोबत राहणार आहेत!

Jul 9, 2009

तो मी नव्हेच!













""तो "अग्निहोत्र'चा संगीतकार अभिजित पेंढारकर तूच का रे?''
परवा एक लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणनव्वदाव्या वेळेला कुणीतरी हा प्रश्‍न विचारला आणि मी पुन्हा एकदा निःशब्द झालो.
""अरे बाबा तो मी नव्हे!'' या खुलाशाचाही आताशा कंटाळा यायला लागलाय.
हा अभिजित पेंढारकर नावाचा कुणी दुसरा इसम मला माहित झाला, तो "असंभव'चा पार्श्‍वसंगीतकार म्हणून. अधूनमधून मी ती सीरियल बघायचो. तेव्हा हे नाव वाचून मलाही गोंधळायला झालं होतं. आयला, आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्याच नावाचा कुणी माणूस आहे आणि आपल्याला माहित नाही म्हणजे काय? या क्षेत्रातल्या बऱ्याच मित्रांकडे चौकशा करून पाहिल्या, माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ! कुणाचीच त्याच्याशी थेट ओळख नव्हती. सीरियलपुरतेच त्याचे नाव येत असल्याने फारसा कुणाला माहिती असण्याचीही शक्‍यता नव्हती.
"अग्निहोत्र' किंवा अन्य तत्सम मालिकांमध्येही हे नाव झळकायला लागलं आणि लोक मला विचारायला लागले. काही केवळ शंका उपस्थित करून थांबत, तर काही जण "व्वा! आता संगीताच्या क्षेत्रातही तुमचं नाव आलं का? अभिनंदन!' असं करून जखमेवर मीठ चोळायला लागले.
"तो मी नव्हेच' असा खुलासा करण्याची संधीही काही जण देईनासे झाले.
"बस काय राव!' म्हटलं, की आमचं पुढचं बोलणंच खुंटायचं.
पण परवा एका अगदी ओळखीच्यानंच हा प्रश्‍न विचारला आणि म्हटलं, खुलासा करायला निदान ब्लॉगचं माध्यम तरी वापरूया!
आपलं नाव अगदी "युनिक' असल्याच्या भ्रमाचा भोपळा काही वर्षांपूर्वीच फुटला होता. आमच्या आजोळी म्हणजे शिपोशीचाच कुणी नातेवाइक "अभिजित पेंढारकर' असल्याचं कळलं होतं. त्याची माझी प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही, पण त्याच्याविषयी ऐकलंय मात्र अनेकदा.
दुसरा अभिजित पेंढारकर मला कळला, पुण्यातल्या एका मित्राकडून. त्याच्या मूळच्या निपाणी गावचाच तोही. गंमत म्हणजे, तो त्याला अनेकदा भेटला होता आणि माझी त्याच्याशी भेट करून देण्याची इच्छाही होती. पण हे दोन अभिजित पेंढारकर काही एकत्र भेटले नाहीत.
मी "सकाळ'मध्ये लिहिण्यास सुरुवात केली आणि माझा लेख वाचून त्याच्या मैत्रिणीचा मला ई-मेल आला. तिला वाटलं, मी "तो' अभिजित आहे. नंतर खुलासा झाला, पण आमची मैत्री वाढली. अशा रीतीने तीदेखील दोन अभिजित पेंढारकरांना ओळखू लागली. पण तो काही मला भेटला नाही आणि तीदेखील! आता ती अमेरिकावासी झाल्याचं कळतंय.
...तर असं आहे सगळं!
कुणीतरी त्या दुसऱ्या (तिसऱ्या, चौथ्या...) अभिजित पेंढारकराला मला भेटवा रे!

Jul 7, 2009

एक धुकाळ सहल!

tahini 5th july 09 063

ताम्हिणीत जाण्यात "रिस्क' होती.
दरवर्षीप्रमाणे दणकून पाऊस, दरडीबिरडी कोसळण्याची भीती म्हणून नव्हे. तर अजिबात पाऊस नसल्याच्या बातम्या होत्या म्हणून!
जूनपासून पावसाची वाट पाहूनपाहून थकलो होतो. गाडीतून दोन ट्रिपा केल्या, दोन्ही कोरड्या! जेजुरी आणि कार्ला इथे घामानं पुरेवाट झाली होती. ताम्हिणीत पाच जुलैला जायचं हे तर ठरलं होतं, पण धाकधूक होतीच. ताम्हिणीत जायचं म्हणजे मस्त पाऊस, धुकं, धबधबे, असं समीकरण गेली आठ-दहा वर्षं डोक्‍यात पक्कं बसलं होतं. पहिल्यांदा तिथे गेल्यापासून गेल्या वर्षीचा अपवाद वगळता दरवर्षीची एक फेरी कधीच चुकली नव्हती. रोज पावसाच्या बातम्यांवर आणि आभाळाकडे लक्ष ठेवून होतो. आज पाऊस येईल, उद्या येईल, असं गेले दोन आठवडे वाटत होतं. रोज निराशाच पदरी येत होती. ताम्हिणीचा "व्हेन्यू' बदलायला लागतो की काय, अशी परिस्थिती होती. आदल्या दिवसापर्यंत "अपडेट्‌स' घेणं सुरू होतं.
अखेर गेल्या आठवड्यात पुण्यात हलका पाऊस झाला आणि जरा जीवात जीव आला. तरीही जिल्ह्यात फार दमदार पाऊस झाल्याची वार्ता नव्हती. ऑफिसातल्या एका सहकाऱ्यानंही तिथं जाण्याविषयी नकारघंटाच लावली होती. शेवटी गुरुवारी त्याच भागात राहणारा एक सहकारी निदान तिकडे प्रसन्न वातावरण असल्याची सुवार्ता घेऊन आला. हा खरंच थोडा दिलासा होता. तरीही, मी सोडून कुटुंबीयांपैकी बहुतेक जणांचा तिकडे जाण्याबाबत आग्रह कमीच होता. निघण्याच्या आदल्या दिवशी एका मित्रानं खबर आणली, की थोडे-थोडे धबधबे आहेत. जरा आणखी उमेद आली.
पाच जुलैला सकाळी दहा जणं मिळून दोन गाड्यांतून ताम्हिणीकडे कूच केले. साधारणपणे चांदणी चौक ओलांडला, की ताम्हिणीच्या वातावरणाचा वास यायला लागतो. या वेळी पिरंगुट ओलांडले, तरी फारसे काही वातावरण नव्हते. पौडमध्ये मिसळ खाल्ली, तेव्हाही "पाऊस नाही' या चर्चेनं जरा धडधड वाढली. "सगळ्यांना घेऊन आलोय खरं, पण धबधबे मिळाले नाहीत तर आपली काही खैर नाही,' या विचारानं जीव खालीवर होत होता. वाटेत एके ठिकाणी हवा भरायला थांबलो, तर तिथेच आमचा नेहमी थांबण्याचा फेवरेट स्पॉट होता. जरा पुढे जाऊन बघितलं, तर धबधबा! डोळ्यांवर विश्‍वासच बसत नव्हता! ज्याच्या शोधात पुण्याहून 80 किलोमीटरवर बोंबलत आलो होतो, तो साक्षात पुढ्यात हात जोडून उभा होता!
आम्ही तिथे फोटोबिटो काढले, पण भिजलो मात्र नाही. कारण भिजायला घाटमाथ्यावर भरपूर धबधब्यांच्या सान्निध्यात जायचं होतं! मग वाटेत थांबतथांबत निघालो होतो. एका पठारावर आलो, तर रस्ता धुक्‍यात बुडून गेलेला. समोरची गाडीही दिसत नव्हती. दोन्ही बाजूला पाणी आहे आणि आपण बंधाऱ्यावरून निघालो आहोत, असंच भासत होतं. शेवटी गाडी धांबवली आणि मस्त धुक्‍यात बुडून गेलो. धुकं जसं आलं त्याच वेगानं नाहीसंही झालं. चला, ताम्हिणीचा आटापिटा अर्धाअधिक सत्कारणी लागला होता!
घाटमाथ्यावर गेलो, पण धबधब्यांची रांग काही दिसत नव्हती. एखाददुसरा ओघळ दिसत होता. वाटेत एक-दोन धबधबे लागले, पण तिथे थांबावंसं वाटलं नाही. शेवटी धबधब्यांच्या शोधात घाटउतारापर्यंत गेलो. शेवटी तिथून परत फिरलो. परतीच्या वाटेवर जो धबधबा लागला, त्यात मस्त भिजलो. फार मोठा नव्हता, पण आनंद घेण्याएवढ्या धारा होत्या.
दरवर्षीपेक्षा जरा लवकरच यंदा ताम्हिणीत गेलो होतो. पावसाची स्थिती नव्हती, तरी निराशा झाली नाही. उलट, सहल फलदायी झाल्याचाच अनुभव आला!


tahini 5th july 09 077

tahini 5th july 09 096
अभ्यंगस्नान!

tahini 5th july 09 047
अधिक्रुत पत्नीबरोबरचा अधिक्रुत फोटो!

tahini 5th july 09 108

tahini 5th july 09 071

Jun 19, 2009

काही अनुभव..पावसाळलेले!


पावसाची बरेच दिवस वाट पाहिली, शेवटी कंटाळून सकाळी पावसाच्या अनुपस्थितीतच कांद्याची "खेकडा' भजी (खेकड्याच्या पायांसारखी दिसणारी. खेकड्याचे पाय घातलेली नव्हे!) करून खाल्ली. वर बायकोला एकही न ठेवल्यानं, संध्याकाळी तिच्या शिव्याही खाल्ल्या! दुपारी पावसाचा मस्त शिडकावा झाला आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. क्षणार्धात अनेक पावसाळलेल्या सहली डोळ्यांसमोरून तरळून गेल्या.

कॉलेजात होतो, तेव्हा आमचा "नेचर क्‍लब' नावाचा अभ्यासाच्या नावाखाली भटकंती करण्याचा (उनाडक्‍या म्हणा हवं तर!) क्‍लब होता. विशेषतः पावसाळ्यात या भटकंतीला बहर यायचा! एकदा पावसजवळ असंच "एक्‍सकर्शन'ला गेलो होतो. सकाळी कुठली तरी झाडं-पानं बघायची, त्यांचा अभ्यास वगैरे करायचा आणि दुपारी एकत्र जेवण, गाण्यांच्या भेंड्या, विविध गुणदर्शन वगैरे. संध्याकाळपर्यंत घरी परत, असा कार्यक्रम असायचा. दुपारची जेवणं वगैरे उरकली होती. नरडीही साफ करून घेतली होती. पावसच्या जवळच्या माळरानावर आम्ही होतो आणि तुफान पाऊस आला. कोकणातलाच पाऊस तो! त्यातून मोकळं माळरान आणि जुलैचा महिना! कुणाचीच त्याला अडवायची शामत नव्हती, आणि तोंड द्यायचीही! पावसाच्या तडाख्यात आम्ही मस्तपैकी सापडलो होतो. मोठ्या हरभऱ्याच्या आकाराचे ते टपोरे थेंब टणाटणा तोंडावर-अंगावर आपटत होते. छत्री-बित्रीनं तग धरण्याचा प्रश्‍नच नव्हता. वाराही सोसाट्याचा होता. कसेबसे त्या तडाख्यातून वाचून रस्त्यापर्यंत आलो. पाऊस थांबायची लक्षणं नव्हती. बऱ्याच वेळानं तो कमी झाला. एसटी गाड्या वेळेवर येण्याची चिन्हं नव्हतीच. आमची परतीची गाडी रत्नागिरीहून सुटलीच नसल्याचं समजलं. मग पर्यायी व्यवस्था बघणं आवश्‍यक होतं. शेवटी एक टेम्पो ठरवला. वाळूची वाहतूक करणारा टेम्पो होता तो. हौद्यातल्या काही फळ्या निसटल्या होत्या, काही मोडलेल्या होत्या. अख्खा माणूस मधून रस्त्यावर पडेल, अशी परिस्थिती होती. नशीब, वरती हूड (ताडपत्रीचं छप्पर) तरी होतं. सगळी मेंढरं टेम्पोत चढली. टेम्पोवालाही त्या घाटरस्त्यातून पावसाच्या तुफान माऱ्यातही "फॉर्म्युला वन'मध्ये भाग घेतल्यासारखाच टेम्पो चालवत होता. त्यामुळं आम्ही कधी उजव्या बाजूच्या, तर कधी डाव्या बाजूच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीला जात होतो. टेम्पोच्या हौद्याच्या कठड्यांना धरून जी मुलं उभ
ी होती, त्यांच्या हाताच्या आधारानं मध्यभागी मुलं-मुली उभ्या होत्या. हात जरा जरी सुटला, तरी रस्सीखेचीत दोरी सुटल्यावर जसे सगळे एकमेकांच्या अंगावर कोसळतात, तशी अवस्था होत होती. मध्येच कुणाचा पाय खाली जायचा, कुणी खांबावर आपटायचं! वर पावसाची मजा घ्यायला गाण्यांचा धिंगाणाही होताच.

आणखी एक पावसाळी अनुभव होता ढाक-भैरीचा. आमच्या क्‍लबबरोबर 31 डिसेंबरच्या रात्री आम्ही कामशेतजवळच्या ढाक-भैरीच्या ट्रेकला गेलो होतो. कामशेतवरून टेम्पोतून जायला आधीच धमाल आली होती. रात्री एका मित्राच्या टेंटमध्ये मस्त गाणी म्हणत बसलो होतो. बाकीचं पब्लिक देवळात जागा शोधून गुडूप झालं होतं. मी आणि आणखी दोन मित्रांची किशोरकुमारची गाणी रंगात आली होती. त्याच वेळी पाऊस आला. तिसरा जो होता, तो पावसासाठी आडोशाचं कारण दाखवून पळाला. मग आम्ही दोघंच राहिलो. बाहेर भरपूर पाऊस, तंबूतही खालून पाणी यायला लागलेलं, अशा स्थितीत आम्ही किशोरकुमारच्या दर्दभऱ्या गाण्यांच्या मैफलीत दंगून गेलो होतो. पहाटे तीन-चारला झोपलो असू. तेही देवळाच्या कातळामुळे थंडगार पडलेल्या गाभाऱ्यात, उंदरांच्या सहवासात!
पहिल्यांदा केलेला तोरणा ट्रेकही पावसाच्या उपस्थितीत असाच धम्माल झाला होता. जाताना धबधब्यात मनसोक्त भिजलो होतो आणि येताना एका बंधाऱ्याच्या अडवलेल्या पाण्यात! ड्यूक्‍स नोजच्या धबधब्याला तर पर्याय नाही!!
धबधब्याखाली मनसोक्त भिजायचं राहिलं तसं गेल्या वर्षी. ताम्हिणी घाटात एकदाही गेलो नाही. एकदा फक्त पौड रस्त्यालाच "लवासा सिटी'जवळ गेलो होतो. पण कारमधून गेलो होतो. त्यामुळं भिजलो नाही. शिवथरघळीलाही गेलो, तिथेही येताना भिजू म्हटलं आणि राहून गेलं. यंदा बरेच प्लॅन्स आहेत, पण अजून पावसाचा पत्ता नाहीये!
rain