Sep 6, 2007

नसबंदी...!


"बेवारस कुत्र्यांची नसबंदी करणार' ही बातमी वाचून माझं अवसानच गळालं.
घशाला कोरड पडली.
हातपाय लटलटू लागले

जीभ फूटभर लोंबू लागली

मघाशीच एक विजेचा खांब "पावन' करून आलेलो असताना आता पुन्हा तिकडे जाण्याची उबळ आली.

फारच भयंकर बातमी होती. कुठल्या तरी सामाजिक संस्थेच्या किंवा पेठेतल्या कुठल्यातरी उपटसुंभाच्या मनात आल्यामुळे कोर्टात एक जनहित का काय ती याचिका दाखल झाली होती आणि कामधंदे नसलेल्या कोर्टानं आमच्याविरुद्ध हे फर्मान सोडलं होतं. मनातल्या मनात मेनका गांधींचा धावा सुरू केला. (मेनका की "मनेका'? सुधारून घ्या. व्याकरणाच्या नावानं आमची बोंब आहे!) या "मेनके'नं आमच्या भाईबंदांवर आणि समस्त प्राणिमात्रांवर अन्याय करणाऱ्या तमाम "विश्वामित्रां'ची तपश्‍चर्या भंग केली होती. सध्या मात्र आमची ही तारणहारिनी तिच्या पक्षाप्रमाणेच अज्ञातवासात गेल्यानं कितपत पावेल, याची शंकाच होती. तरीपण खडा टाकून बघायला काही हरकत नव्हती.



काही झालं, की ह्या हरामखोरांना आमचीच जात आठवते। सालं, नळीत घाला नाहीतर फळीत घाला, माणसाचं शेपूट वाकडं ते वाकडंच ! जित्याची खोड मेल्याशिवाय जायची नाही। काय तर म्हणे, भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय। गेल्याच आठवड्यात भटक्‍या विमुक्तांनी मोर्चा काढल्याचं आठवत होतं। म्हणजे एकूणच "भटक्‍यां'वर संक्रांत आली होती तर! पण हे तर चक्क आमची "नसबंदी' करायला निघाले होते

काय काय स्वप्न रंगवली होती, वयात येताना॥! जोशांच्या कार्ट्यानं चोरून आणलेल्या ऍडल्ट फिल्म्स चोरून बघून तर चित्तवृत्ती खवळल्या होत्या। गुळगुळीत मासिकातली दोन-चार पान उचकटून त्यातली चित्रंही बघितली होती. परवा ती "मिनी' नजरेस पडल्यावर तर कलिजाच खलास झाला आपला! आता हिला पटवावं, कुत्र्या-मांजरांच्या साक्षीनं लग्न करावं, सुरेख कुठल्यातरी "हिल'वर हनीमूनला जावं...कसलं काय न्‌ कसलं काय?आता ही "नसबंदी'ची टूम निघाली की कुणाला धरतील नि कुणाला नाही, कुणी सांगावं? नसबंदीचं इंजेक्‍शन बंदुकी-बिंदुकीतून मारलं तर? त्यांचा काय नेम नाही ब्वॉ


कुत्र्यांची संख्या काही भारताच्या भूमीला न पेलवण्याएवढी जास्त झालेली नाहीये। उलट, कुणाची झालेय, ती बघा! त्यांची नसबंदी करा आधी। बाकी, तुमच्या नसबंद्या पण अयशस्वी होतात, म्हणा।



असो। आता फक्त "थांबा आणि वाट पाहा' एवढंच हाती आहे. आमची दुखरी "नस' त्यांच्या हाती आहे


------








Sep 4, 2007

परिवर्तनाचे वारे...


"कुत्र्यासारखा मारीन बघ...!'
आमचा मालक अण्णा जोशानं हे वाक्‍य उच्चारलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली.
असे "प्राणि'वाचक उल्लेख मला अजिबात खपत नाहीत.
वाटलं, एक कडकडून चावा घ्यावा आणि या जोशाला अज्ञातवासाच्या कोशात घालवावं. पण हल्लीच मला "अँटीरॅबीज' इंजेक्‍शन देऊन आणलंय मुडद्यानं ! वर स्वतःही घेतलंय. (फुकट होतं.) त्यामुळं चावणं म्हणजे नुसतंच "दात दाखवून अवलक्षण' झालं असतं. गप्प राहिलो.

आमच्या जातीचा असा उद्धार केलेला मला अजिबात खपत नाही. काही लोक तर अक्षरशः कुत्र्यासारखी वागणूक देतात. आमच्या शेजारचा रॉकी परवा म्हणे..."ट्रेकिंगला कुत्र्यासारखं चालावं लागतं.'
म्हणजे काय?
तुम्हाला आमच्यासारखं चार पायांवर चालावं लागतंय?
विजेचा खांब दिसला की तंगडं वर करता?
चांगले बूटबिट घालून जाता की तडमडायला तिकडे डोंगरांत!
आम्हाला इथे उन्हातान्हात पोटापाण्यासाठी दाही दिशा भटकावं लागतं. कुणी उकिरड्यावर टाकलेला शिळा भाकरतुकडा उचलावा लागतो. त्यातून पळवलेल्या भाकरीवर तूप वाढण्यासाठी आमच्या मागे पळणारे एकनाथ महाराजांसारखे संतही आता राहिले नाहीत. उलट, इथे आमच्याच तोंडातली भाकरी पळवण्यासाठी टपलेले भिकारी आहेत. नळावरच्या भांडणांसारखी तिथे उकिरड्यावर आमची भांडणं होतात. एकतर आमच्या जातभाईंमध्येच एकी नाही. शिळ्या भाकरीसाठी पण आमच्यात मारामाऱ्या.

..तशी, आमची (म्हणजे माझी!) स्थिती बरी आहे म्हणा. आम्ही "पाळीव प्राणी' या गटात मोडतो. सध्या तरी जोशांच्या घरी आपला डेरा आहे. पण हल्ली या जोशाचं काही खरं दिसत नाही. (खरं तर, अन्नदात्याचा असा उद्धार करणं माझ्या स्वभावात नाही. मी काय मालकाचा कृतघ्न कार्टा थोडाच आहे?)

जोशाची हल्ली सटारलेय. सारखा मला घालूनपाडून बोलत असतो. पदोपदी माझा अपमान. कुत्रा असलो म्हणून काय झालं, स्वाभिमान आहेच ना मला! तरी बरं, या जोशाला एकदा चोरांच्या, दोनदा पोलिसांच्या आणि तीनदा बायकोच्या तावडीतून मी सोडवलंय. "माडी'वर गेला असताना पोलिसांनी "रेड' घातली, तेव्हा काळाठिक्कर पाडला होता जोशाचा चेहरा. मी तेव्हा मधे आलो, म्हणून पळून तरी जाऊ शकला. नाहीतर पोलिसांनीच काळानिळा करून सोडला असता. मग "व्हाईट कॉलर' चांगलीच मातीत गेली असती. तरीही या उपकारांची जाणीव नाही त्याला. म्हणून आपला तर हल्ली जीवच उडालाय. परवा फुकटात मिळालेला त्याचा सामोसा मी हाणला म्हणून बदड बदड बदडलं मला त्यानं. मीच आपला गरीब, म्हणून राहिलोय इथे.

पण आता मालक बदलायचा विचार चाललाय. कुत्र्याचं इमान वगैरे राहू द्या. इथे शिळंपाकं खावं लागतंय, वर बोनस म्हणून मारही. बघू. संधी मिळाली, तर ही "कुतरओढ' थांबवायचा विचार आहे. तोपर्यंत आपलं मन मोकळं करण्यासाठी या डायरीचाच आधार...!

------------

"डॉग शो'तला "कॅट वॉक'

सकाळी मस्तपैकी मुरगुशी मारून झोपलो होतो, तर नतद्रष्ट बंट्यानं भुंकून भुंकून उठवलं. खरं तर उठणारच नव्हतो, पण अंगावरच तंगडं वर करीन, म्हणाला. चरफडत उठलो. चार-दोन शिव्या घातल्या. पण लेकाचा ढिम्म होता. काहीही परिणाम नाही. बंट्या पूर्वी कॉंग्रेसवाला असावा. असो.
मला म्हणाला, चल "डॉग शो' बघायला!"
"च्यायला, एवढ्या पहाटे? आत्ताशी नऊ वाजलेत गधड्या!'' मी भडकलो.
तेवढ्यात तिकडून जाणाऱ्या एका गाढवानं पेकाटात एक लाथ घातली. मी बंट्याला गधड्या म्हटलेलं आवडलं नव्हतं त्याला.
गाढवंही माजल्येत लेकाची!"
"अरे, "मॉर्निंग शो' आहे. लवकर आटप आणि चल.''
मला काही ब्रशनं दातबित घासून गुळगुळीत दाढी करायची नव्हती. आटपायचं म्हणजे काय होतं? तंगड्या पसरून मस्तपैकी आळस दिला आणि निघालो बंटीबरोबर. तोंडाला जरा रात्रीच्या मटणाचा वास मारत होता, पण माझ्या तोंडाचा वास घ्यायला कोण जवळ येणार होतं?
मला वाटलं, कुठलातरी पिक्‍चरच दाखवायला नेतोय बंटी. पण तो एका उच्चभ्रू क्‍लबात मला घेऊन आला. सगळीकडे मखमली पडदे, आकर्षक सजावट, झगमगते दिवे, पायाखाली मऊमऊ चादरी...धमाल होती नुसती.
मी म्हटलं, ""बंट्या, पिक्‍चर कुठाय इथे?''"
"तू गप रे! नुसती गंमत बघ तू!''...बंटी माझ्यावरच डाफरला.
मी निमूटपणे (नेहमीप्रमाणे) शेपूट घातलं.
एवढ्यात त्या क्‍लबचे एकेक मेंबर यायला लागले.

क्‍लबच्याही सजावटीला लाजवतील, असे कपडे होते एकेकाचे. भर पावसाळ्यातही पांढरे शुभ्र आणि भरजरी कपडे घालून आले होते. मला वाटलं, कुणाचं लग्नबिग्न दिसतंय. मागे चंपीच्या (आमच्या शेजारच्या गल्लीतली माझी मैत्रीण) आतेभावाच्या मावसबहिणीचं लग्न असंच झोकात झालेलं मी पाहिलं होतं. (आता त्यात चंपीनं लाडानं सगळ्यांचे मुके घेऊन त्यांच्या उंची कपड्यांवर तिचे केस पाडून ठेवले होते आणि चिखलाच्या पायांचे ठसेही उठवून ठेवले होते, ही गोष्ट निराळी!)

क्‍लबचे मेंबर एकटे नव्हते. प्रत्येकाच्या बरोबर वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या जातींची आणि मी कधीच न पाहिलेली कुत्री होती. (कुत्री म्हणजे "कुत्रा' या शब्दाचं अनेकवचन. त्यात मेल/फिमेल दोन्ही आले. उगाच "सदाशिव पेठी' शंका काढू नका.) काय तर म्हणजे ऑल्सेशियन, डॉबरमॅन, ...काय नि काय...!

एक धिटुकली मला फारच आवडली. कुणा तरी नटीबरोबर होती म्हणे. मी काही फारसे पिक्‍चर बघत नसल्यानं मला ओळखलं नाही, पण बंट्यानं सांगितलं. पण तिचा सगळा चेहरा केसांनीच झाकला होता. फक्त लुकलुकते डोळे दिसत होते. साधे "आयब्रोज'सुद्धा करत नाही, हे बघून वाईट वाटलं. पण आपला जीव जडला तिच्यावर. एकदम "लव्ह ऍट फर्स्ट साईट!'. "मिनी' तिचं नाव. गळ्यातला पट्टा पण स्टायलिश होता. मध्येमध्ये माझ्याकडे चोरून नेत्रकटाक्ष टाकत होती.

हा सगळा जामानिमा म्हणजे लग्नबिग्न नव्हे, तर त्या कुत्र्यांचंच संमेलन होतं, हे मला खूप उशिरा कळलं. "डॉग शो' म्हणे. म्हणजे "फॅशन शो'सारखं काहितरी बघायला मिळणार होतं, तर! पण माझ्या मनात दोन शंका होत्या. एकतर "डॉग शो'मध्ये कुत्रे "कॅट वॉक' कसा करणार ही.

दुसरी शंका थोडी गंभीर होती. मागे मी शनिवार पेठेत जोश्‍यांच्या घरात राहायला होतो, तेव्हा मुंबईतल्या कुठल्या तरी "फॅशन शो'मध्ये एका मुलीचे कपडे घसरून पडल्याबद्दल त्यांनी (चवीचवीनं) चाळीत केलेलं निषेधाचं भाषण मला आठवत होतं. त्यामुळं इथेही "मिनी'च्या बाबतीत काही "वॉर्डरोब मालफंक्‍शन' झालं तर काय, याची काळजी मला होती. पण (दुर्दैवानं) तसं काही झालं नाही.मिनी "मिनी स्कर्ट' घालून फारच मिरवत होती. बाकीच्या कुत्तरड्यांनीही (खरं तर आपल्याच जातीच्या बांधवांना आणि भगिनींना...सॉरी, मैत्रिणींना अशा शिव्या घालणं बरोबर नाही, पण हेवा वाटतो ना!) असलेच कायकाय भपकेबाज कपडे घातले होते. काही जण तर ढेंग वर करायला चक्क टॉयलेटमध्ये जात होते. किती हे पाश्‍चिमात्त्यांचं अंधानुकरण! डावे (पाय) काय म्हणतील?शेवटी एकदाचा तो "डॉग शो' आटपला.

गळ्यात पट्टे बांधलेल्या आपल्याच बांधवांना आणि मैत्रिणींना अशा प्रकारे माणसांच्या आदेशांच्या आहारी जाताना बघवलं नाही. कुणा एका जोडीला बक्षीस पण मिळालं म्हणे. मला नंतर फार वेळ थांबवलं नाही.

परतताना मिनी मात्र सारखी डोळ्यासमोर दिसत होती. पांढऱ्या शुभ्र पोशाखात भलतीच गोड दिसत होती. तिनं हेअरस्टाईल मात्र बदलली पाहिजे, असं मनोमन वाटलं. असो.

लग्न झाल्यावर बघू.
----

Sep 3, 2007

हसा थोडं...

""बाई, लईंच शिकल्याली दिसत्येय तुमची सुनबाई...!''
मालती मानकामे भाजीवालीनं दिलेल्या "कॉप्लिमेंट्‌स'नं ज्योत्स्नाबाई देशपांडे फारच सुखावल्या.
आज त्या सुनेला घेऊन पहिल्यांदाच भाजी मंडईत आल्या होत्या. नेहमीच्या भाजीवालीनं केलेल्या कौतुकानं त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढलं. बाह्या (नसल्या तरी) फुरफुरल्या.
पांढऱ्याशुभ्र साडीच्या पदरावर चिकटलेला धुळीचा कण हातानं उडवत टेचात म्हणाल्या, ""मग, पुण्याची आहे ती पण! नाव पण "प्रज्ञा' आहे तिचं. चांगली "एमबीए' आहे म्हटलं ! उगाच नाही, देशपांड्यांच्या घरची सून झाली!...का गं, पण तू का विचारत्येस?''"

"न्हाई...शेवंताकडंनं घेतलेल्या पिकलेल्या टॉमॅटोंच्या पिशवीत कोबीचा मोठा गड्डा बाद्‌कन टाकला तिनं, तवाच वळखलं म्या!'' मालती मानकामेनं खुलासा केला.

-------

2. काही संवाद

गिऱ्हाईक ः अहो, कुत्र्याची बिस्किटं आहेत का?
दुकानदार ः आहेत. बांधून देऊ, का इथेच खाणार?
---
फोनवरून (पलीकडून) आवाज ः हॅलो, देशपांडे आहेत काय?
अलीकडून ः नाहीत.
पलीकडून ः कुठे गेलेत?
अलीकडून ः (अर्थातच, वैतागून) ते पावनखिंडीत लढतायंत!
पलीकडून ः मग त्यांना सांगा, "राजे' गडावर पोचले. आता "गेलात' तरी चालेल, म्हणावं!

----------

3. कर्तारसिंगची नुकतीच पुण्याला बदली झाली होती. पुण्यातल्या "बाजारपेठविश्‍वा'ची त्याला काहीच कल्पना नव्हती. इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचं दुकान शोधालयाच त्याला तास-दोन तास पायपीट करायला लागली.

"केशव नारायण कुलकर्णी अँड सन्स' नावाची भली मोठी पाटी छोट्या अक्षरांत मिरवणाऱ्या एका दुकानात शेवटी तो टेकला.
अपेक्षेप्रमाणे दुकानाचे मालक वास्सकन्‌ अंगावर आलेच...""काय पाहिजे?'
धाप जिरवत, श्‍वासावर नियंत्रण ठेवत कर्तारसिंगनं समोरच्या शोकेसकडे बोट दाखवलं...""हा टीव्ही किती किमतीला आहे?''"
"आम्ही सरदारजींना टीव्ही विकत नाही...''
पुणेरी दुकानदारांच्या "स्पष्टवक्ते'पणाविषयी कर्तारसिंगच्या थोडंसं कानावर आलं होतं, पण हे प्रकरण एकदमच अवघड होतं. पण पिच्छा सोडेल, तर तो कर्तारसिंग कसला! त्याला एकदम आपला पंजाबी बाणा आठवला.
दुसऱ्या दिवशी वेशबिश बदलून तो पुन्हा त्याच दुकानात गेला.पुन्हा तोच संवाद.पुन्हा तेच उत्तर.कर्तारसिंगला पुणेरी दुकानदारांच्या चाणाक्षपणाविषयीदेखील आता खात्री पटली. पण लहानपणी वाचलेल्या विक्रम-वेताळाच्या गोष्टींना जागून त्यानंही आपला हट्ट सोडला नाही.

तिसऱ्या दिवशी धार्मिक रीतीरिवाजांना, परंपरेला हरताळ फासून, कर्तारनं तुळतुळीत दाढीबिढी केली, डोक्‍यावरचं पागोटंही उतरवलं आणि संपूर्ण "मेकओव्हर' करून तो "कुलकर्णी अँड सन्स'च्या मालकांसमोर डेरेदाखल झाला.
"सॉरी...आम्ही सरदारजींना टीव्ही विकत नाही!'
एवढा बदल केल्यानंतरच्या या उत्तरानं मात्र तो पुरता वैतागला आणि मग त्याचा संयम सुटला."
"च्यायला, कपडे बदलून आलो, चेहरा बदलून आलो, तरी तुम्ही मला कसं काय ओळखता? आणि मला टीव्ही विकायचा नाही, मग दुकान तरी कशाला टाकलंय इथं?''"
"श....हळू बोला. पाठीमागे माझी बायको झोपलेय. निष्कारण आरडाओरडा करायला, हे तुमचं घर नाही,'' कुलकर्णींनी शांत स्वरात कर्तारला समजावलं, ""आणि हे बघा, तुमची मागणी पूर्ण करणं मला तरी शक्‍य नाही. आमचं "मायक्रोवेव्ह' विकण्याचं दुकान आहे. टीव्ही ठेवत नाही आम्ही!''
-------

माणसापरास गाढवं बरी!


परसदारातील बागेत फिरत असल्याच्या आविर्भावात रस्त्यावर रेंगाळणारे पादचारी, राष्ट्रपतींशीच भेटीला जाण्याजोग्या घाईत असलेल्या रिक्षा, दोन वाहनांमधील चिंचोळी जागाही अमान्य असलेले दुचाकीस्वार आणि यांसारखीच असंख्य चित्रविचित्र वाहनांची भेळ...सिंहगड रस्त्यावरचा हा संध्याकाळचा नेहमीचाच "राडा'! त्यातून वाट काढत, अंग चोरत स्वारगेटच्या दिशेने निघालेली एक पीएमटी...

आधीच धायरीपासून वाहनांच्या "सर्कशी'तून पीएमटीतल्या पन्नास-साठ लोकांच्या आणि रस्त्यावरच्या असंख्य जिवांची काळजी घेत गाडी पुढे हाकताना मेटाकुटीला आलेला तो चालक आपलं सर्व सौजन्य पणाला लावून भाषा वापरत होता. सारसबागेसमोरून नेहरू स्टेडियमच्या दिशेने वळताना गाढवांचा एक मोठा तांडाच पीएमटीला आडवा गेला आणि चालकाला करकचून ब्रेक दाबावा लागला. हॉर्न दिल्यावर गाढवं बाजूला सरली. आता गाढवांची काही खैर नाही, असं प्रवाशांना वाटलं, पण चालकानं तोंडाला लगाम घातला. पीएमटीला वाट करून देण्यासाठी बाजीराव रस्त्याकडून आलेल्या चार चाकी गाड्याही अलीकडेच थांबल्या. पण एक "अतिउत्साही' मोटारसायकलस्वार गाड्यांना ओलांडून, "आधी मीच'च्या अभिनिवेशात पुढे घुसला आणि नेमका पुढे सरकण्याच्या बेतात असलेल्या पीएमटीच्या समोर आला. चालकाकडून एक कचकचीत शिवीच प्रवाशांना अपेक्षित होती, पण त्यानं फक्त करकचून ब्रेक दाबला. मोटारसायकलवाला पीएमटीला अगदी घासूनच पुढे गेला.

जरा पुढे गेल्यावर चालक न राहवून म्हणाला, ""राव, ही गाढवं तरी बरी! हार्न वाजवल्यावर बाजूला तरी झाली...आणि माणसं बघा...!'' चालकाच्या त्या सौम्य पण उत्स्फूर्त प्रतिक्रियेनं प्रवाशांना तशा परिस्थितीतही हसू फुटलं.

Sep 2, 2007

रामगोपाल वर्माचे "कोळसे'




तो अन्‌ हा...

तो भव्यदिव्य...एकमेवाद्वितीय.

हा एकाच वेळी "भव्यदिव्य' आणि (वेगळ्या अर्थानं) "एकमेवाद्वितीय.'


तो अभिनयाचा, संवादांचा, कथा-पटकथेचा, सादरीकरणाचा मेरुमण

अन्‌ हा...या सगळ्याच बाबतीत बटबटीत, भडक, आक्रस्ताळा, आचरट, भीषण आणि विकृत...!


"शोले'चा "रीमेक' नाही, असा डंका पिटत "फ्रेम टू फ्रेम' तस्साच चित्रपट काढण्याची कल्पना रामगोपाल वर्माला कुठल्या अभद्र वेळी सुचली असावी कुणास ठाऊक? "के सरा सरा' नावाचा चित्रपटांचा "कारखाना' त्यानं सुरू केला, तेव्हाच या भीषण स्थितीची कुणकूण लागली होती, खरं तर! पण ही विकृती "एक हसीना थी'मधला क्‍लायमॅक्‍स, नवा "शिवा', किंवा "जेम्स'मधील हिंसाचाराच्या पातळीपर्यंतच होती. "आग'मध्ये तिचा कळस गाठलाय आणि "रंगीला', "सत्या', "रात'सारखे अतिशय परिणामकारक चित्रपट देणारा हाच का तो दिग्दर्शक, अशा विचारापर्यंतची वेळ आणलीय.


तिथे एक पोलिस इन्स्पेक्‍टर...इथेही तोच. त्याचे हात तोडलेले...याची बोटे. तिथे गब्बर...इथे बब्बन. तिथे गावावर संकट...इथे गाव-कम-शहरावर. तिथे खंडणीचा मुद्दा...इथे जमीन लाटण्याचा. गब्बरला पकडले गेल्याचा राग...बब्बनला भाऊ मारला गेल्याचा..तिथे टांगा चालवणारी बसंती...इथे रिक्षा चालवणारी "घुंगरू.'


"शोले'ची फ्रेम न्‌ फ्रेम तशीच ठेवून, काही नवे संदर्भ देऊन रामगोपाल वर्मानं त्याची जशीच्या तशी नक्कल केलीय...ती देखील अत्यंत भ्रष्ट, टाकाऊ आणि टुकार! "शोले'च्या प्रदर्शनाच्या वेळचं वातावरण आणि त्या वेळचा परिणाम अनुभवण्याचं भाग्य आताच्या पिढीला लाभलेलं नाही. "शोले'बद्दल आधी भरपूर ऐकल्यानंतर मगच चित्रपट पाहणारे बरेच जण असतील. विशिष्ट प्रतिमा मनात घेऊन चित्रपट पाहण्याचा परिणाम वेगळा असतो. "आग'चा स्वतंत्रपणे विचार केला, तरीही त्याच्याबद्दलचं मत अजिबात बदलत नाही.


"शोले'मधला हिंसाचार, दहशत आताच्या काळात अजिबात परिणामकारक वाटत नाही. तरीही, प्रेक्षक त्यात गुंततो. गावातल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यांत ती पाहायला मिळते. मुख्य म्हणजे, ती आवश्‍यक तेवढीच आहे आणि विकृत, न पाहवण्यासारखी अजिबात नाही! "आग'मधल्या बब्बनची दहशत मात्र विकृत आहे. करवतीने इन्स्पेक्‍टरची बोटे कापण्याचं दृश्‍य म्हणजे याचा कळसच. त्यातून चित्रपटाला अगदी कर्कश, कानठळ्या बसवणारं पार्श्‍वसंगीत आहे. त्यामुळे संवाद अनेकदा ऐकूच येत नाहीत. ही कसली आग? हे तर कोळसेच!


"शोले'च्या कॉपीव्यतिरिक्त वेगळा चेहरा नसल्यामुळं सगळ्याच व्यक्तिरेखा टाकाऊ आहेत. अमिताभनं तर "बब्बन' साकारून आणखी एका वाईट भूमिकेवर नाव नोंदलंय. मोहनलाल, अजय देवगण यांनी फक्त काम केलंय, एवढंच. प्रशांत राजला अमिताभच्या मूळ भूमिकेत पाहताना त्रास होतो. त्यापेक्षाही त्रास होतो, दस्तुरखुद्द अमिताभला "गब्बर'च्या भ्रष्ट रूपात पाहताना! त्यातल्या त्यात सुश्‍मिता सेनच बरी. पण अमिताभ-जयाच्या संयत, अव्यक्त प्रेमाला उथळ रूप देऊन या भूमिकेचीही नंतर वाट लावलीय. ऊर्मिला मातोंडकरला बऱ्याच दिवसांनी रामगोपाल वर्माच्या चित्रपटात अंगप्रदर्शनाची संधी मिळालीय. (धन्य झाली पोरगी!)


आता कुणालाही भीती दाखवायला चित्रपटरसिकांना नवं शस्त्र मिळालंय..."चूप हो जा...वरना "आग' दिखाने ले जाऊँगा...'!!


-----