Oct 2, 2009

अनुशेष!

`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोचक विनोद वगळला, तरी मूळ परिस्थिती पटण्याजोगीच होती.
रत्नागिरीत राहत होतो, तेव्हा तिथे तीन थिएटर होती. (आता वाढली नाहीत, उलट एक कमी झालंय!) आम्हाला अधिकृतपणे एखादाच चित्रपट, तोही तीन महिन्यांतून वगैरे...बघण्याची परवानगी होती. मग कुठे मळ्यात, कुठे सत्यनारायणाच्या सार्वजनिक पूजेला, कुठे मित्राकडे व्हीडिओवर ही तहान भागवावी लागायची. तेव्हाच ठरवून टाकलं होतं - "मोठा झाल्यावर तिन्हीच्या तिन्ही थेटरांतले सिनेमा बघेन, तरच नावाचा अभिजित,' असा संकल्प त्याच वेळी करून टाकला. हा संकल्प पूर्ण करण्याची संधी मिळण्याच्या आधीच पुण्याला आलो. पुण्यात पहिलं काम कुठलं केलं असेल, तर ते वेगवेगळी थिएटर शोधून काढणं. तोपर्यंत फक्त "प्रभात'च माहित होतं. अगदी मध्यवस्तीत, भाऊ महाराज बोळात आम्हाला आश्रय मिळाल्यानं फावल्या वेळेत थिएटर शोधून काढण्याची मोहीम आवडीची आणि आनंददायी होती. मग श्रीकृष्ण, श्रीनाथ, अपोलो, भारत, सोनमर्ग, लक्ष्मीनारायण, अलका, विजय, अशी सगळी आसपासची थिएटरं शोधून तिथे वाऱ्या सुरू झाल्या. अगदी स्टेशनपलीकडचं "निशात', "वेस्ट एन्ड'ही पालथं घालून झालं. "व्हिक्‍टरी' तेवढं एक ताब्यातून सुटलंय!
सांगायचा मुद्दा हा, की तेव्हा भरपूर वेळ होता आणि घालवायचा कुठे, हा प्रश्‍न होता. त्यामुळे भरपूर चित्रपट पाहण्याचा छंद आणि संकल्पही पूर्ण करण्याची संधी मिळाली. अगदी मिथून चक्रवर्तीपासून बो डेरेकपर्यंत सर्व चित्रपटांची तथेच्छ मेजवानी झडली. बाल्कनीत बसणे वगैरे आग्रह नसल्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहापर्यंतचा कुठल्याही थिएटरातला, कुठल्याही वर्गाचा आणि कुठलाही शो आपल्याला वर्ज्य नव्हता. अर्थातच, बरेचचे हुकलेले, रत्नागिरीत पाहायला न मिळालेले सिनेमे पाहून झाले.
आता मात्र ही चंगळ झेपेनाशी झाली आहे. तेच तर दुःखाचं कारण आहे. दुपारनंतर ऑफिस आणि सकाळच्या वेळेत घरच्या, मुलीच्या जबाबदाऱ्या, या चक्रात स्वतःच्या आवडीचा वेळेत पाहायला मिळणं, ही सध्या चैनीची गोष्ट झाली आहे. त्यातून हल्ली सकाळी सहाला उठून "जिम'ला जाण्याचं व्रत घेतलंय. त्यामुळं रात्री उशीरापर्यंत जागणंही झेपत नाही. काही दिवसांपूर्वी रात्री झोप लागत नव्हती, म्हणून उठून इंटरनेटवर "सिंहासन' पाहिला. घरात बरेच दिवस "जाने तू या जाने ना' आणि "रॉक ऑन' पडून होते. तेही अर्धवट पाहिले. रात्री तीन वाजले, म्हणून झोपलो. पण पुढचा अर्धा भाग पाहायचा राहिलाय, तो अजून नाही जमला. वेन्सडे, हजारों ख्वाइशें ऐसी, दस विदानियॉं, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि, क्विक गन मुरुगन, दशावतारम, कित्ती कित्ती सिनेमे पाहायचेत. मराठीत तर ही यादी आणखी मोठी आहे. त्यातले प्रमुख म्हणाल तर...गोष्ट छोटी डोंगराएवढी, रीटा, जोगवा, इत्यादी इत्यादी.
थिएटरच्या अंधारात एकदा स्वतःला झोकून दिलं, की पूर्ण चित्रपट तरी पाहून होतो. अगदी मिथुनच्या वाईटात वाईट सिनेमालाही मी उठून बाहेर गेलोय, असं कधी झालं नाही. किंबहुना, मला थिएटरमधून बाहेर काढू शकणारा सिनेमा अजून जन्माला यायचाय, असं म्हणायला हरकत नाही! तूर्त मात्र बाहेर येण्यापेक्षा हल्ली थिएटरमध्ये जाणंच कमी झालंय. शुक्रवारी परीक्षणासाठी सिनेमा पाहायला लागतो, तेवढाच एक दिलासा म्हणायचा! आजच "हसतील त्याचे दात दिसतील' पाहिला. "अपोलो'ला! कुठेही, कसाही, कुठलाही सिनेमा पाहण्याची आपली उमेद अजून कायम आहे, याची खात्री पटली!

Sep 29, 2009

"बाल'हट्ट

""बाबा, मला जादूचे प्रयोग बघायचेत.''
आमची "लाडली लक्ष्मी' हट्ट धरून बसली होती.
मध्यंतरी टीव्हीवर "छोटा चेतन,', "भूतनाथ'वगैरे पाहिल्यापासून तिची ही इच्छा अधिकच चिघळली होती. त्यामुळे गणपतीच्या आधीपासून अशा संधीच्या शोधात होतो. गणपतीत-नवरात्रात बरेच ठिकाणी जादूच्या प्रयोगांची जाहिरात होती, पण वेळ जमण्यासारखी नव्हती. अशा सार्वजनिक प्रयोगांना जाण्याबद्दल वावडं नव्हतं, पण तिथली सोय आणि व्यवस्था यांविषयी शंका होत्याच. एवढं करून गर्दीतून प्रयोग नीट दिसला नाही, तर सगळंच मुसळ केरात, असं वाटलं होतं. त्यातच अचानक गेल्या गुरुवारी "सकाळ'मध्येच जादूगार संजय रघुवीर यांच्या प्रयोगांची जाहिरात वाचली. प्रयोग रविवारी सकाळी भरत नाट्य मंदिरात होता. सर्वच बाबतीत सोयीचा होता आणि तिकीटदरही परवडण्याच्या घरातले होते. तातडीनं शुक्रवारी बुकिंग करून टाकलं. तरीही, सातवी रांग मिळाली म्हणून जरा नाराजी होतीच!
रविवारी फारशी काही कामंधामं नव्हती, त्यामुळे वेळेत नाट्यगृहात पोचलो. प्रयोगही बऱ्यापैकी वेळेत सुरू झाला. रत्नागिरीत असताना रघुवीर, जादूगार भैरव यांचे प्रयोग पाहिले होते. त्यावेळी ते फारच भव्यदिव्य वाटले होते. माणसाचे दोन तुकडे करणं, तलवारी खुपसणं, पेटीतला जादूगार गायब होऊन प्रेक्षकांतून बाहेर येण्यासारखे प्रयोगांनी विलक्षण गारूड केलं होतं. अगदी तसंच नाही, पण तत्सम काही पाहायला मिळेल, अशा समजात मी होतो. मनस्वी पहिल्यांदाच जादूचे प्रयोग पाहत असल्यानं, तिच्या विशेष काही अपेक्षा नव्हत्या बहुधा. बऱ्याचदा पालकच मुलांच्या इच्छाआकांक्षांविषयी चुकीचे ग्रह करून घेतात, हे या वेळी प्रकर्षानं जाणवलं.
सुरुवातीला हातचलाखीचे आणि नंतर काहीसे अवघड आणि मोठ्या स्वरूपाचे प्रयोग झाले. मला आणि हर्षदालाही कुठल्याच प्रयोगात काही गम्य वाटलं नाही. लाकडी बॉक्‍समधून ठोकळा गायब करणं, पत्ते मोठे करणं, झोपलेला माणूस तरंगवणं, अशा स्वरूपाचे प्रयोग अगदीच साधे आणि कालबाह्य वाटले.
लहानपणी गणेशोत्सवात, अन्यत्रही असे प्रयोग पाहून अनेकदा भारावलो होतो. किंबहुना, चार वर्षापूर्वी गोव्यात फिल्म फेस्टिव्हलला गेलो, तेव्हाही गर्दीत हातचलाखीचे खेळ करणाऱ्या एका कलाकाराच्या कलेनं खूप प्रभावित झालो होतो. हे प्रयोग मात्र अगदीच सामान्य दर्जाचे वाटले. जादूगाराची हातचलाखी, बोलण्याची आणि प्रेक्षकांशी संवादाची पद्धतही अगदीच सामान्य होती. अगदी रिकाम्या पिशवीतून पेट्या किंवा काही वस्तू काढण्याच्या प्रयोगांबद्दल मात्र थोडंसं अप्रूप वाटलं.
सादरीकरणाच्या बाबतीतलं बुद्धिदारिद्य्रही अगदीच त्रासदायक होतं. गबाळे कपडे घातलेले दोन सहायक आणि त्यांच्याहून जरा कमी गबाळे कपडे घातलेला जादूगार पाहायला पैसे देऊन थिएटरात कशाला यायचं, असाच प्रश्‍न निदान मला तरी पडला. "हे सगळं खोटं आहे,' हे माहीत असूनही निदान जादूगाराच्या हातचलाखीला दाद देण्याची संधी तरी काही वेळा मिळते. या वेळी त्याचाही अभाव जावणवला. एकंदरीत पैसे आणि वेळ फुकट गेल्याचा अनुभव मिळाला.
मनस्वी थोडीशी कंटाळली, पण एकंदरीत तिला फार काही दुःख झालेलं वाटलं नाही. ती बऱ्यापैकी आनंद घेत होती या प्रयोगाचा. शिवाय तिचा नेहमीचा खुराकही तिला मिळाला होता. आईवडिलांची संगतही होती. तिचं फारसं काहीच बिघडलं नव्हतं.
अर्थात, मुलांसाठीच्या कार्यक्रमासाठी अतिउत्साहानं जाऊन तोंडघशी पडण्याची ही माझी काही पहिलीच वेळ नव्हती! गेल्या वर्षी मनस्वीला पहिल्यांदाच बालनाट्य दाखवायला याच नाट्यगृहात घेऊन गेलो होतो. नाटक होतं - "हिमगौरी आणि सात बुटके'. अगदीच प्राथमिक दर्जाचे बालकलाकार, त्यांचं नाटकी बोलणं, कोणत्याही आधुनिक साहित्याचा समावेश नसलेला सेट आणि जुनाट, अतिप्राचीन सादरीकरण आणि संवाद यांनी अगदी उबग आणला होता. मनस्वीला त्यातली सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे चेटकीण आणि तिचं हसणं! "पैसे वसूल' या संकल्पनेत तिला तेवढं पुरेसं होतं.
यंदा "माकडाचं लग्न' आणि तशाच प्रकारच्या तीन एकांकिकांच्या एकत्रित प्रयोगाला तिला घेऊन गेलो होतो. हे तरी बरे असतील, या अपेक्षेनं. ते "हिमगौरी'पेक्षा वाईट होते. सई परांजपेंच्या "झाली काय गंमत'चा गंभीर शेवट पाहून तर हसावं की रडावं, हेच कळेना. एकतर अनेक वर्षांपूर्वी लिहिलेली ही नाटकं. त्या वेळची सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती निराळी. ती नाटकं तशीच्या तशी उचलून सादर करायची अवदसा काय म्हणून या संस्थांना सुचली असावी, असाच प्रश्‍न नाटकाची सुरवात झाल्यापासून मला छळत राहिला.
हल्ली टीव्ही हा मुलांच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. "आई, ऐकलंस ना? शुद्ध पाणी ही प्रत्येक आईची जबाबदारी आहे. तू पण मला असंच पाणी दे' असं आमची अंगठ्याएवढी पोरगी स्मृती इराणीची जाहिरात पाहिल्यापासून आम्हाला गेल्या सहा महिन्यांपासून ऐकवत आहे. टॉम अँड जेरी, भीम, हे तिचे रोजचे स्वप्नातले आणि प्रत्यक्षातले सवंगडी झाले आहेत. राक्षस, देव, परी, यांच्याकडे भरपूर ताकद आणि शक्ती असते आणि त्यांचंच आयुष्य हे खरं आयुष्य, असा तिचा ठाम समज आहे. कॉंप्युटर स्वतः सुरू करून ती गेमसुद्धा खेळत बसू शकते. अशा पिढीतल्या या मुलांना जुनाट विचारांची, जुनाट सादरीकरणाची आणि अगदी सामान्य दर्जाची कालबाह्य बालनाट्ये का बरे दाखवतात ही मंडळी? त्यांच्या काळाशी, त्यांच्या विचारांशी आणि बुद्धीच्या एकूण आवाक्‍याशी साधर्म्य राखणारी नवी नाटके का बरे लिहीत नाहीत? त्यांना आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा का बरे निर्माण करत नाहीत? त्यांना आवडेल आणि आपलेसे वाटेल, असे सादरीकरण का करत नाहीत? सत्तर-ऐंशीच्या दशकातली अतिआदर्शवादी विचारांची बालनाट्यं त्यांनी का पाहावीत? नव्या जमान्याला आणि आयुष्याच्या वेगाला साजेशी नाटकं पाहायला मिळणं, हा त्यांचा हक्क नाही?
असो. दिवाळीची सुटी लवकरच लागेल. पुन्हा बालनाट्यांचं पीक येईल. एका सर्वसामान्य पालकाच्या या विचारांची कुणीतरी दखल घेईल आणि या परिस्थितीत अल्पशी सुधारणा होईल, या अंधुक आशेवर हा विषय इथेच सुफळ संपूर्ण.
----