Sep 12, 2008

माफीनामा!

"अनफर्गेटेबल टूर' संपवून मी परतीच्या प्रवासाला लागलो असताना वाटेत ढीगभर एसएमएस मिळाले। जयानं मुंबईत काहितरी विधान केल्याबद्दल गदारोळ उडाल्याचं कळलं. भावना दुखावल्या गेल्या आहेत, ही माझी त्यावरची पहिली प्रतिक्रिया होती. तसं झालं असेल, तर आम्ही माफी मागतो.महाराष्ट्र ही आमची आई आहे आणि आईचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही. आईच्यान!

मराठी आणि महाराष्ट्राने आम्हाला भरपूर काही दिले आहे आणि आम्ही हे उपकार कधीच विसरणार नाही। आम्हीही आमच्या परीने मराठी माणसांवर, मुंबईवर, शिवसेनेवर, मनसेवर, मूळ आणि "नवनिर्माण' झालेल्या ठाकरे परिवारावर प्रेमच केले आहे. कृतघ्नतेची भावना आमच्या मनात कधीच नव्हती.मराठीवर प्रेम नसल्याचा आरोप आमच्यावर सातत्याने होतो. तो चुकीचा आहे. मराठीसाठी आम्ही काय केले नाही? कुठलेही संकट आले, की आम्ही पाया पडतो, ते दादरच्या सिद्धिविनायकाच्याच. मी यूपीचा आहे, म्हणून सारखी काशी-मथुरेकडे धाव घेत नाही.

मध्यंतरी अभिषेकच्या लग्नाच्या वेळी मंगळ "शनी' ठरू नये, म्हणून तिकडच्या काही देवळांत यज्ञयाग केले, पण ते तेवढ्यापुरतेच। म्हणून सिद्धिविनायकावर आमचा विश्वासच नाही, असं कुणी म्हणू शकत नाही. मी, जया, अभिषेक, ऐश्वर्या सगळ्यांनी अनेकदा त्याची पायी वारी केली आहे.मध्यंतरी मी बाराबंकीत जमीन घेतली, तशीच पुणे जिल्ह्यातल्या मावळ खोऱ्यातही घेतली. उत्तर प्रदेशात आमच्या मित्राचं सरकार आहे, म्हणून महाराष्ट्रावर अन्याय होऊ दिला नाही. जयाचं शिक्षण पुण्यात झालं, तसं अभिषेकचं शिक्षण आम्ही मुंबईतच केलं. त्यासाठी आम्ही दोघंही आग्रही होतो. डेहराडूनला त्याला ठेवण्याचा मित्रपरिवाराचा सल्ला आम्ही मानला नाही.मुख्य म्हणजे, आमचे सगळे चित्रपट आधी मुंबईत प्रदर्शित झाले. त्याबाबतही मी कुणाचे काही ऐकले नाही. मुंबई ही आमची कर्मभूमी आहे आणि इथेच चित्रपट प्रदर्शित व्हायला हवेत, याबाबत मी स्वतः आग्रही होतो.

बाळासाहेबांशी मैत्री केली, ते केवळ ते मराठी आहेत म्हणून। त्यामागे काही स्वार्थ नव्हता. मुंबईत राहणाऱ्या, काम करणाऱ्या अनेक मराठी माणसांशी मी प्रसंगानुरूप अनेकदा स्वतः बोललो आहे. माझ्या युनिटमधल्या मराठी माणसांशीही मी संवाद साधत असतो.अभिषेकच्या लग्नाची सर्व खरेदी आम्ही मुंबईतच केली आहे. पॅरिस किंवा ऍमस्टरडॅमहून सूट आणावा, अशी अभिषेकची मागणी होती, पण मी त्याला सविनय नकार दिला. आता, मराठी माणसाच्या दुकानातून खरेदी केली की नाही, हे नेमकं सांगता येणार नाही. मात्र, याबाबत मी अधिक काही विधान करणार नाही. नाहीतर, "मुंबईत मराठी माणसाची दुकानं आहेत तरी कुठे, ' असं मी म्हटल्याचा नवा वाद निर्माण होईल.

आम्ही शांतताप्रिय आणि कायदेप्रिय माणसं आहोत। लाखो रुपयांचा कर बुडवल्याबद्दल, जमिनीच्या मालकीबाबत शेतकरी असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल, पैशांच्या घबाडासाठी अनिवासी भारतीय म्हणून नोंदणी केल्याबद्दल, जेव्हा जेव्हा आम्ही कायद्याचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या, तेव्हा सरकारी दट्ट्या आल्यानंतर त्याची प्रामाणिक कबुली देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. त्याबद्दल आमच्याविरुद्ध कुणी बोट दाखवू शकत नाही. "एबीसीएल' गाळात गेली, तेव्हा मुलायमसिंहांनी, अमरसिंहांनी आम्हाला मदत केली असेल, पण ती केवळ मैत्रीपोटी. महाराष्ट्रातल्या कुण्या नेत्यानं आम्हाला मदतीचा हात दिला असता, तर आम्ही तो नाकारला असता, असे नव्हे!

ऐश्वर्याच्या नावानं उत्तर प्रदेशात आम्ही शाळा सुरू केल्यावरून गहजब माजला. बच्चन परिवारातल्या कुणाला ना कुणाला सतत चर्चेत ठेवायचं, ही मीडियाची हल्ली गरजच झाल्यासारखी वाटते. आम्ही मात्र त्यामागे वाहवत जाणार नाही. ऐश्वर्याच्या नावाची शाळा यूपीमध्ये काढली, ती काही केवळ तिकडच्या प्रेमापोटी नव्हती. कुणीही आपल्या मातृभूमीसाठी एवढं करतोच ना! आता नातवाच्या नावे गडचिरोलीत महाविद्यालय सुरू करण्याचा आमचा विचार आहे. त्या संधीच्या सध्या प्रतीक्षेत आहे.आणखी एक. ब्लॉगही आता मराठीतून लिहिण्याचा विचार आहे. पण माझ्या लॅपटॉपवर फॉंटचा प्रॉब्लेम आहे. तो दूर झाला, की करेनच सुरुवात! मराठी वाचकांना ब्लॉग वाचण्यास आणि मराठीतून त्यावर कॉमेंट टाकण्यासही माझी अजिबात मनाई नाही. एवढे मराठीद्वेष्टे आम्ही नक्कीच नाही. कुणाला काहीही वाटले, तरी!!

-आपला,
अमिताभ बच्चन.

Sep 11, 2008

मेगा`ब्लॉग'

न्यू यॉर्कहून परतीच्या प्रवासात बच्चनसाहेब अस्वस्थ होते. विमानाच्या कॉरिडॉरमध्ये येरझारा चालू होता। सारखा ते कुणालातरी फोन करायचा प्रयत्न करत होते (बहुधा अमरसिंहांना असावा), पण लागत नव्हता. त्यातून त्यांची अस्वस्थता वाढत होती.
``सर, मे आय हेल्प यू? वुड यू लाइक टु हॅव सम कॉफी ऑर ड्रिंक?'' एक हवाईसुंदरी मार्दवी सुरात म्हणाली। मुळात बच्चनसाहेबांशी आपल्याला बोलायला मिळालं, याचंच तिला कौतुक
""नो, थॅंक्‍स।'' बच्चनसाहेबांनी शक्‍य तेवढ्या सौजन्यानं तिला उडवून लावलं।

बच्चनसाहेबांचं सामान वगैरे पुन्हा गायब झालं की काय, असं त्या हवाईसुंदरीला वाटलं। आता आपल्या एअरलाइन्सचं आणि नोकरीचं काही खरं नाही, अशी भावना तिच्यासह अन्य काही कर्मचाऱ्यांच्या मनात दाटून आली. मात्र या वेळी पुरेशी खबरदारी घेतली असल्याचं अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना कळवल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.
बच्चनसाहेबांनी "नवरत्न तेल' चोळून पाहिलं, पण त्याचाही उपयोग झाला नाही। चित्रपटसृष्टीतल्या चाळीस वर्षांच्या प्रवासातील चढउतार ज्या तेलाच्या भरवशावर त्यांनी पार केले, त्यानं या वेळीही साथ देऊ नये, याचा त्यांना मनस्वी राग आला. पण तरीही "इमेज'ला ते मारक असल्यानं ते गप्प राहिले. खरं तर "एबीसीएल' गाळात गेली तेव्हा, रेखा प्रकरण सर्वाधिक चर्चेत होतं तेव्हा, बंगल्यावर जप्ती आली तेव्हाही एवढी अस्वस्थता बच्चनसाहेबांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे या वेळचं नेमकं कारण काय असावं, याचं सर्वांना कुतूहल आणि कोडंही होतं. अखेर एकदाचं विमान मुंबई विमानतळावर उतरलं. बच्चनसाहेबांचा मोबाईल सुरू झाला, "न्यूज अलर्ट'ही मिळाले.
अचानक "युरेका युरेका!' थाटात ते ओरडले, ""अरे मिल गया, मिल गया!''
कुणीतरी सहकारी सोबत होता।
"क्‍या मिल गया साब?''
""अरे भैया, ब्लॉग के लिये नया विषय मिल गया!''
""साब, मराठी में बोलो, हम मुंबई में हैं।'' सहकाऱ्यानं जाणीव दिली।
``अरे हां!'' बच्चनसाहेब म्हणाले, ""मिळाला, मिळाला, ब्लॉगसाठी विषय मिळाला।''
तेव्हा कुठं सर्वांच्या लक्षात आलं, की "अनफर्गेटेबल टूर'मधल्या बऱ्याचशा विस्मरणीय अनुभवांवर लिहिल्यानंतर आता ब्लॉगवर काय लिहायचं, हा यक्षप्रश्‍न त्यांना पडला होता. मुंबईत "रेंज' मिळाल्यानंतर जया बच्चन यांच्या वक्तव्यावरून उडालेला गदारोळ त्यांना समजला। त्यांनी तातडीनं विषय मिळाल्याचं जया बच्चनना कळवलं आणि त्याचबरोबर वादाबाबत माफी मागण्याचा सल्लाही त्यांना दिला. घराच्या परतीच्या वाटेवर लॅपटॉप उघडून स्वतःच्या ब्लॉगवरही माफीनामा लिहून टाकला.
ता. क. :"डॅड'च्या ब्लॉगसाठी नवा विषय देण्यासाठी आता अभिषेकनं ऐश्‍वर्याकडे आग्रह धरलाय म्हणे!

Sep 9, 2008

गणपती बाप्पा मोरया!

गणपती म्हंजे कोकणी मान्साचो वीक प्वाइंट। गणपतीला घरी न जायील, तो कोकनी म्हनायचाच

सांगूक काय होता, की दरवर्सारमानं कोकनात गेल्तो।

औंदा सगळ्या दिवसांसाठी नाय, तर फकस्त चारच दिवसांसाठी. पण मजा आली.एकतर पहिल्या दिवशी येणार नाही, म्हणून आई भडकली होती. पण चार दिवस गेलो, हेही नव्हते थोडके।


रत्नागिरीत पोचलो तेव्हा गणपती घरी येऊन दोन दिवस झाले होते. पण "घरचा गणपती' आला नसल्याने पंचपक्वान्नांचा नैवेद्य बाकी होता. पहिल्याच दिवशी आईनं मोदकांचा घाट घातला. मीही थोडे हात साफ केले, पण काही जमलं नाही. मनस्वीही लुडबुड करायला बसली होती. संध्याकाळी गावातले दोनचार गणपती बघून आलो. फादरांच्या गाडीला सध्या ड्रायव्हर नसल्यानं मी गेलो की मीच ड्रायव्हर. मग काय, इकडे जाऊ नि तिकडे जाऊ. लालबागच्या राजासारखा यंदा तिकडे "रत्नागिरीचा राजा' हा मोठा गणपती बसवला आहे. तो पाहिला. संध्याकाळी आरती बिरती आणि मग गुडूप!

दुसऱ्या दिवशी गणपतीपुळ्याला जायचा घाट घातला होता. घरी कुणीतही हवं म्हणून आई घरी थांबली आणि आम्ही फादरांसह तिकडे गेलो. प्रवास धमाल होता. गणपतीपुळे आमच्या घरापासून आता अगदी 26 किलोमीटरवर आलंय. त्यातून रस्ताही मस्त आणि निसर्गरम्य! जातानाचा आरे-वारे पूल तर सुंदरच! ("फुल 3 धमाल' या चित्रपटात तुम्ही कदाचित पाहिला असेल.) पाऊण तासात गणपतीपुळ्याला पोचलो. दर्शन घेऊन किनाऱ्यावर उधळलो. मनस्वीला भरपूर खेळायचं होतं, पण आम्हाला जेवायला घरी यायचं होतं. मग तिथलं कोकण दर्शन प्रदर्शन न पाहताच माघारी फिरलो. येताना थोडासा रस्ता चुकलो, पण त्यामुळं दोन किलोमीटर वाचले. एकूण सहल झकास झाली.नंतरचे दोन दिवसही घरगुती व सार्वजनिक गणपती पाहणे, फिरणे, यात गेले।

विसर्जनाला यंदा मी पहिल्यांदाच गणपती घेतला होता. शेजारच्या तळ्यात मी स्वतःच विसर्जन केलं. वडिलांची गादी आता मुलाकडे आली म्हणायची! अप्पांनी तर पुढच्या वर्षी माझ्यावर जबाबदारी टाकण्याची घोषणा करून हात झटकून टाकले!संध्याकाळी काळ्या समुद्रावर (रत्नागिरीत काळी वाळू आणि पांढरी वाळू असलेले दोन समुद्रकिनारे आहेत. त्यांना काळा समुद्र आणि पांढरा समुद्र म्हणतात.) विसर्जन पाहायला गेलो. तिथेही मजा आली. आम्हाला रात्रीच्या गाडीसाठी लवकर परतायचं होतं. त्यामुळं फार वेळ आनंद नाही घेता आला.प्रवास ठीक झाला, पण रात्रभर पाऊस होता. सकाळी रिक्षा मिळवतानाही बोंब झाली. कसेबसे पहाटे साडेपाचला घरी पोचलो।

एकत्र आरत्या वगैरे म्हणण्याची परंपरा हल्ली लुप्तच झाली आहे. लहानपणी आम्ही घरोघरी जाऊन आरत्या म्हणायचो. पूर्वी मिऱ्या भागात अनेकांकडे घरगुती गणपती आणि देखावे पाहण्यासारखे असायचे. हल्ली तेही नाही. थोडेफार उरलेत, त्यांचाही उत्साह मावळला आहे. ब्राह्मणेतर लोकांमध्ये गणपतीचा उत्साह आणि एकोपा अजून दिसतो. बामण मात्र त्याबाबत चिकू मारवाडी आणि हातचं राखून वागणारे!असो. आता यंदाही पुण्यातले देखावे बघायला फारसा वेळ मिळेलसा वाटत नाही.

ता. क. गेल्या वर्षीच्या गणपतीच्या पोस्टसाठी इथे पाहा....
http://abhipendharkar.blogspot.com/search/label/%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87

आणि फोटो इथे...
http://picasaweb।google।com/abhi.pendharkar/ycmnb

कथा कढईभर शिऱ्याची!

खाण्याशी सख्य लहानपणापासूनच जडल्यामुळे आणि कुणी मखरात बसवून आवडीचे पदार्थ करून खायला घालण्याची शक्‍यता नसल्यामुळे मुदपाकखान्यात स्वतःचं कौशल्य आजमाविण्याविना पर्याय नव्हता। उपाशी राहायला लागणार नाही, एवढा स्वयंपाक इयत्ता नववीत असल्यापासूनच यायला लागला होता. दहावीत असताना तर त्यावर कडीच झाली.

तेव्हा रत्नागिरीत राहत होतो। दहावीचं महत्त्वाचं वर्ष होतं। वर्षभर थेटरात जाऊन चित्रपट न पाहण्याचं पथ्य वगैरे (आई-वडिलांच्या धाकामुळे का होईना,) पाळलेलं. अभ्यासाचं "शिवधनुष्य' पेलताना खांद्याचे पार वांधे झालेले. त्यातून नेमकं फेब्रुवारी का मार्च महिन्यात आत्तेबहिणीचं पुण्यात लग्न ठरलं. (क्रिकेटच्या मॅच आणि नातेवाइकांची लग्नं परीक्षेच्या काळातच का घेतात, हा बालमनाला पडलेला प्रश्‍न अजूनही सुटला नाही!) घरच्यांचा आग्रह होता, मीही यावं असा; पण दहावीच्या अभ्यासाचा `कोंडाणा' सर करण्याच्या जिद्दीपुढे मला आत्तेबहिणीच्या लग्नातल्या आनंदाची फिकीर नव्हती.

तीन-चार दिवस आई-बाबा पुण्याला जाणार होते. घरात आमचं एकट्याचंच राज्य होतं. दूध बरंच शिल्लक होतं, म्हणून त्याचं दही लावलं. तेही शिल्लक राहिलं, तेव्हा काय करायचं, असा प्रश्‍न पडला नाही. सुपीक डोक्‍यात श्रीखंडाची कल्पना शिजली. (धोतराच्या फाडलेल्या) मऊसूत फडक्‍यात रीतसर दही टांगून ठेवून चक्का वगैरे केला. दीड-एक दिवसानं घट्ट चक्का झाला. मग त्यात साखरबिखर घालून, घाटून श्रीखंड केलं. तशी पोळी-भाजी रोज करत होतोच; पण श्रीखंड पोळीबरोबर कसं खायचं? म्हणून पुऱ्या लाटून तळल्या. फर्मास बेत झाला. घरी एकट्यानं मांड ठोकून त्यावर ताव मारला. कुणी वाटेकरी नको, की कुणाची अडचण नको.
दुसऱ्या दिवशी शिऱ्याचा बेत आखला होता। माझा पहिलाच स्वतंत्र प्रयोग होता। तशी रेसिपी माहीत होती; पण प्रत्यक्ष कधी प्रयोग केला नव्हता. साधारण जेवढी कढई भरून शिरा हवा, तेवढाच रवा, या हिशेबानं पाच सहा मुठी रवा घेतला. सुमारे तासभर लागला असेल, शिरा व्हायला. एवढं करून तो गोळाच्या गोळा. दोन दिवस फक्त शिराच खात होतो!चौथ्या दिवशी आई पुण्याहून आली आणि सगळी आवराआवर करताना उरलेला अर्धी कढई शिरा तिला फ्रीजमध्ये दिसला. त्यानंतर काय रामायण झालं असेल, याचा अंदाज कुणालाही येऊ शकेल.

"अभ्यास करायचा म्हणून लग्नाला आला नाहीस आणि तुझे हे धंदे?''

...जणू काही मी घरच विकून खाल्लं होतं! पण ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता।

त्या दिवशी मला भूक नसतानाही एका जागी मांडी ठोकून तो शिरा तिनं (प्रेमानं) खायला घातला..

...पुढचं वर्षभर मी शिऱ्याचं नाव काढलं नाही!