Sep 26, 2008

योगायोगाच्या गोष्टी!

"आपल्या चुकांबद्दलची सोपी पळवाट म्हणजे नशीब' अशी व्याख्या कुणी केली असली, तरी नशीबावर आणि योगायोगांवर माझा प्रचंड विश्‍वास आहे. अशा अनेक अनपेक्षित गोष्टी आयुष्यात कधीकधी घडतात, की त्यांना योगायोगाशिवाय दुसरं काही नाव देता येत नाही।
श्रीनिवास देशपांडे नावाचा एक डॉक्‍टर मित्र ऑर्कुट परिवारात समाविष्ट आहे। मला भेटण्याचा प्रस्ताव त्यानं अनेक दिवस-महिन्यांपूर्वी दिला होता. आम्ही वेळ पण ठरवत होतो, पण काही जमत नव्हतं. खरं तर तो राहतो गणेशमळ्यात आणि मी पानमळ्यात. अगदी दहा मिनिटांचं अंतर होतं. पण त्याला वेळ फक्त रविवारी. आणि रविवारी आमच्या सांसारिक जबाबदाऱ्या.एकदा भेटण्याविषयी बोलणंही झालं, पण कुठेतरी माशी शिंकली. शेवटी गणपतीनंतर भेटू, असं मी त्याला सांगून टाकलं. तरीही त्याला पंधरा दिवस उलटून काही निश्‍चित होत नव्हतं. भेटायची इच्छा दोघांनाही होती, पण मुद्दाम वेळ काढण्याचं घाटत नव्हतं.

परवाच्या मंगळवारी मी सहज रजा घेतली होती आणि गाडी सर्व्हिसिंगला टाकायला गेलो होतो. येताना व्यायाम म्हणून चालत घरी निघालो होतो. टिळक रोडवर एका दुकानावर कॅमेऱ्यांची जाहिरात पाहत असताना एक माणूस उगाचच संशयाने माझ्याजवळ घुटमळत असलेला जाणवला. मी त्याच्यावर उचकणार तेवढ्यात तो म्हणाला, ""तुम्ही अभिजित पेंढारकर ना?''मी चमकलो.""मी श्रीनिवास देशपांडे!'' त्यानं ओळख करून दिली.भरदार शरीरयष्टीचा (खरं तर भरगच्च वजनाचा म्हणायला हवं, पण ते बरं दिसत नाही ना!) हा ऑर्कुटवरचा माझा कधीही न पाहिलेला, न भेटलेला मित्र असा रस्त्यात भेटेल आणि मला फक्त फोटोवरून ओळखेल, अशी मुळीच कल्पना नव्हती! मग आम्ही कॉफी वगैरे पिऊन योगायोगानं झालेल्या भेटीचा आनंद साजरा केला।
एकाच आठवड्यात अशीच दुसरी गोष्ट घडली...बायकोच्या मैत्रिणीच्या माध्यमातून गेल्या वर्षी एक एलआयसी पॉलिसी काढली होती. पण ती कधी माझ्यापर्यंत पोचलीच नाही. दरम्यान काही कौटुंबिक कारणांमुळे तिनंही कामातून विश्रांती घेतली होती। पॉलिसी मिळाली नाही, म्हणून मी जाम अस्वस्थ होतो. पुढचे हप्ते भरण्याच्या नोटिसा आल्या, पण पॉलिसीच असल्याने पैसे फुकट जातील, या विचाराने हप्ते भरले नाहीत.त्या मैत्रिणीच्या कनपटीला बसल्यानंतर तिनं पॉलिसीची कुंडली आणली. एलआयसीकडून कधी रवाना झाली, कोणतं पोस्ट ऑफिस, डिस्पॅच क्रमांक वगैरे. पोस्टात चौकशी केली. त्यांना रजिस्टर उकरायला लावलं. काहीही नव्हतं. हाही प्रयत्न फुकट गेला.आगपाखड करून झाल्यानंतर शेवटी स्वतःच हे "मिशन' हाती घ्यायचं ठरवलं. एकतर तिचं एलआयसी कार्यालय होतं गणेशखिंड रस्त्याला. आमच्या घरापासून खूप लांब. तरीही, उन्हातून बोंबलत तिकडे तडमडलो. तिथून फॉर्म बिर्म आणले. पण तेही पडूनच राहिले.मग एक ओळखीचा दुसरा एलआयसी एजंट गाठला. तो सगळं करून देतो म्हणाला. त्यासाठी दोनशे रुपयांचा बॉंड पेपर लागणार होता. त्यासाठी गावात चार-पाच चकरा मारल्या. कुठेच मिळाला नाही. एक दुकान सापडलं, ते दोनदा बंद होतं. नंतर दोनशे रुपयांचा बॉंडच मिळत नाही, असं कळलं. मग त्याला साक्षात्कार झाला, की बॉंड पेपरऐवजी फ्रॅंकिंग पण चालेल. मग फ्रॅंकिंगसाठी प्रयत्न सुरू झाले. दोन-तीनदा कॉसमॉस बॅंकेतली ही सेवा बंद होती. एकदा राजस्थान बॅंकेत संप होता. खेपा फुकट जात होत्या. अखेर हिय्या करून एकदा ती मोहीमदेखील यशस्वी करून दाखवली.
आता उरला होता प्रश्‍न फॉर्म भरण्याचा आणि त्या एजंटकडे ते सगळं गबाळं सुपूर्द करण्याचा। परत त्याची माझी वेळ जमत नव्हती. आता सगळं दिलं की मिळणार डुप्लिकेट पॉलिसी, हे निश्‍चित होतं.
अचानक काल आमच्या डोक्‍यावर राहणारे शेजारी सकाळी सकाळी दारावर आले। मी चहा पीत होतो। बायको काहीतरी त्यांच्याशी बोलत होती। त्यांना फ्लॅट सोडायचा असल्यानं एनओसी साठी आले असतील, असं वाटलं. बाहेर जाऊन पाहतो, तर कुठल्या तरी पॉलिसीची चर्चा सुरू होती.नंतर मला उलगडा झाला, की जी पॉलिसी मिळवण्यासाठी मी आकाशपाताळ एक केलं होतं, ती मूळ पॉलिसी आमच्या डोक्‍यावरच्या त्या शेजाऱ्यांच्या घरी सापडली होती! तीदेखील बिऱ्हाड हलवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यानंतर उपसाउपशी सुरू केली, तेव्हा!
खरं तर माझा जळफळाट झाला होता. ज्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, एवढ्या चकरा मारल्या, भरपूर वेळ फुकट घालवला, ती पॉलिसी माझ्यापासून अगदी दहा-बारा फुटांवर आरामात पहुडून होती.पैसे, वेळ, श्रम खर्च करून बराच मनस्ताप घेतल्यानंतर हा आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. त्यांच्या गबाळेपणाबद्दल थयथयाट करण्यापेक्षा मला पॉलिसी मिळाल्याचा आनंद अधिक वाटला!