Oct 30, 2008

भडक लाल रंगाचे कपडे घालून एकता कपूर तिच्या गिरणीत नेहमीप्रमाणे कामात दंग होती। मधली एक गिरणी फारच अवाढव्य होती. एखाद्या ऑटोमोबाईल कारखान्यात शोभावी, अशी. या गिरणीवर एकता कपूर स्वतः काम करत होती. वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची वेगवेगळी पिंपं शेजारी मांडली होती. मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून धान्य काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून सकस, रसरशीत पीठ खालच्या पिंपांत पडत होतं.
या भल्यामोठ्या आवारात शेजारीच रांगेत, ठराविक अंतरावर पंधरा-वीस गिरण्या मांडल्या होत्या। त्यांच्यावरही एकतासारख्याच दिसणाऱ्या काही बाया कार्यरत होत्या। या एकताच्या "डमी'। त्यांच्या हाताखाली डझनभर लोकं काम करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले होते, कसल्यातरी ओझ्याखाली ते पार बुडून गेले होते. बहुधा, एकताच्या "कारखान्या'तले लेखक असावेत. तेही धान्य पुरवण्याच्या कामात मदत करत होते. कुठलं धान्य कुठल्या वेळी घालायचं, हे एकताच मुख्य गिरणीवरून ओरडून सांगत होती.
गिरणीच्या बाहेर गिऱ्हाइकांची भलीमोठी रांग लागली होती। प्रत्येकाने आपल्यासोबत ट्रकच आणले होते. तयार झालेलं पीठ लगेच नोकरांकरवी ट्रकमध्ये चढवलं जात होतं. ट्रक अगदी खच्चून भरले, की पुढच्या मार्गाला लागत होते. गिऱ्हाइकांनी मोठमोठ्या पिशव्या भरभरून नोटा आणल्या होत्या. बालाजीच्या भल्यामोठ्या फोटोसमोर ठेवलेल्या दानपेटीत ते या नोटा ओतत होते. दर अर्ध्या तासाने ही पेटी रिकामी करावी लागत होती.असं सगळं पवित्र वातावरण हा एकूणच भारावून टाकणारा अनुभव होता. अचानक काय झालं कुणास ठाऊक, एकताच्या गिरणीतून "खडाम खट्ट....खुर्र खुर्र...' असा विचित्र आवाज ऐकू यायला लागला. गिरणीतून पीठ पडताना अडकायला लागलं. एकताच्या आणि बाहेरच्या गिऱ्हाइकांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली...पण क्षणभरच. एकतां ताबडतोब आधीच्या धान्याचं पिंप हलवलं आणि त्या जागी नवीन मागवलं. हे धान्य जरा वेगळ्या रंगाचं होतं, पण लगेच गिरणी पूर्वीसारखी सुरू झाली.
गिऱ्हाइकांच्या रांगेतली चुळबूळही थांबली। पुन्हा दानपेटीत धान्याच्या राशी पडू लागल्या.थोडा वेळ गेला आणि एकताच्या मुख्य गिरणीच्या शेजारच्या गिरणीला "घर घर' लागली. बऱ्याच खटपटी करूनही ती सुरू होईना. नंतर लक्षात आलं, तिचा पट्टाच कुणीतरी तोडला होता. शेवटी सगळ्यांनी नाद सोडून दिला.मधली मुख्य गिरणी मात्र जोरात सुरू होती. खरंतर तिच्या क्षमतेचाच बाकीच्या गिरण्यांना आधार होता. सगळ्यात जास्त पीठ याच गिरणीतून पडत होतं. एकताचं काम वेगात सुरू असताना काहीतरी घडलं. जोराचा आवाज आला आणि एकाएकी गिरणी बंद पडली. पीठ पडायचं थांबलं. एकतानं आणखी धान्य ओतून पाहिलं, धान्य बदलून पाहिलं, पट्टा जोरजोरात फिरवून पाहिला, पण काही फरक पडेना. ती मागे वळली तेव्हा लक्षात आलं, की या गिरणीचा "मेन स्विच'च कुणीतरी काढून टाकला होता. तिनं वीज मंडळाला फोन लावला. पण त्यांचं हे काम नव्हतं. तिच्या विजेचं बिल भरणाऱ्या "स्टार' लोकांनी ही कारवाई केली होती.एकतानं आपले सगळे "सोर्सेस' वापरून बघितले.
मुदतीआधीच गिरणी बंद करायला लावणं म्हणजे कराराचा भंग होता. एकतानं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आलं, की "स्टार' लोकांना जास्त पीठ पाडणारी दुसरी गिरणी मिळालेय. तिच्यातून उत्पन्नही चांगलं मिळतंय. पिठानं माखलेला हात एकतानं कपाळावर मारून घेतला....काही क्षणांतच मग ती सावरली. बंद पडलेली गिरणी ताबडतोब तिथून हलवली आणि नव्या पद्धतीच्या, नव्या रूपातल्या गिरणीची ऑर्डर तिनं लगेच नोंदवून टाकली. आधीच्या धान्याला पॉलिशही करून आणायला सांगितलं आणि बाकीच्या गिरण्यांकडे वळली.

दिवाळी संपली, सुटी सुरू!

मस्तपैकी १० दिवस रजा टाकलेय. बरीच राहिलेली कामं पूर्ण कराय्चेत. शनिवार-रविवार फिरायला जाणार होतो, पण आता सोमवारी मुंबईत `स्टार माझा'च्य ब्लॉग स्पर्धेचं बक्षीस वितरण आहे. त्यामुळे तिकडे जावं लागणार. बघू....फिरायला पुढच्या आठवड्यात जाईन.
दिवाळी मजेत गेली. भरपूर कपडे घेतले सगळ्यांनी. सगळ्यात जास्त खरेदी मनुताईंची. तिनं यंदा २ आकाशकंदील घेतले. आणखीही घ्यायचे होते. पण दम दिल्यावर गप्प बसली. किल्ल केला. पाडव्याला सहकुटुंब `अभिरुची'त गेलो होतो. सकाळी १० ते २. मजा आली. जेवण पण तुडुंब झालं. माहेरच्या मंडळींना आमची पार्टी द्यायची राहिली होती. त्यातून उतराई झालो एकदाचे.
किल्ला पण रोज वेगळ्या अवस्थेत होता. एके दिवशी ऑफिसातून आलो, तर सगळे मावळे आडवे. आणि एकटे शिवाजी महाराज जागे. मला वाटलं औरंगजेबानं हल्ला केला की काय! पण तसं नव्हतं. सगळ्या मावळ्यांना झोप आला, म्हणून विश्रांती दिल्याचं मनुताईंकडून कळलं. बिच्चारे शिवाजी महाराज! ते साधरणपणे किल्ल्याच्या निम्म्या आकाराचे असल्यामुळे त्यांआ झोपवणं शक्य नव्हतं. म्हणून नाइलाजानं ते डोळे तारवटून पहारा देत बसले होते....मावळे झोपलेले, आणि राजे पहारा देताहेत, अशा अभूतपूर्व घटनेची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल.
असो.
दिवाळीत लेखन पर.म्परा पण जोरात होती. `साहित्य शिवार'च्या दिवाळी अंकात लेख लिहिला. `मनोगत'वर विनोदी कथा-कम-लेख लिहिला. `ईसकाळ'वर ग्राफिटीच्या कार्यक्रमाचं ऑडिओ सादरीकरण होतं. `जत्रा'मधली कथा आली नाहीये बहुतेक.
तर, पुन्हा सुटी. मजा आहे. बघुया, काय काय कामं पूर्ण होताहेत!

Oct 27, 2008

किल्ला, किल्ल्या आणि कल्ला

दोनच दिवसांपूर्वी किल्ल्यावरची पोस्ट टाकली ब्लॉगवर. त्यानंतर लगेच त्यासंबंधित विषयावर लिहायला लागेल, अशी कल्पना नव्हती. नियतीनंच हा खेळ मांडला असावा!
घाबरू नका. काही फार गंभीर, चित्तचक्षुचमत्कारिक, नेत्रविस्फारक वगैरे लिहिणार नाहीये. अनुभव अगदी साधासाच, पण धडा शिकविणारा आणि योगायोगाचं महत्त्व ठसविणारा.
परवा शनिवारी ऑफिसला आलो, तेव्हा अंमळ उशीरच झाला होता. ऑफिसला यायचं, म्हणजे सगळं शिस्तशीर असतं. म्हणजे, शर्टाच्या शिखात लायसन्स, डेबिट कार्ड (हो, डेबिटच! "क्रेडिट' नाही!!), पीयूसी. पॅंटच्या डाव्या खिशात घराची किल्ली, मोबाईल. उजव्या खिशात गाडीची (म्हणजे बाईकची. आम्ही "श्रीमंत' मध्यमवर्गीय बाईकलाच "गाडी' म्हणतो.) किल्ली आणि रुमाल. दर पाच मिनिटांनी खिसे रापून हा सर्व जामानिमा सुरक्षित आहे ना, हे बघण्याची सवय. बरं, आपली टाचणी हरवली, तरी अस्वस्थ होण्याची प्रथा. पेनबिन म्हणजे फारच त्रास! तर सांगण्याचा मुद्दा काय, की त्या दिवशीही सगळं असंच व्यवस्थित जागच्या जागी होतं.
जेवणाचा डबा सवयीप्रमाणे बाईकच्या डिकीत ठेवला होता. जेवणाच्या सुटीत खाली पार्किंगमध्ये गेलो. डब्यात पोळ्या नसल्यानं त्या हॉटेलातून घेऊन आलो. डिकी उघडायला गेलो अन्‌ काय? खिशात किल्लीच नाही! हादरलो. गाडीला आहे काय, ते पाहिलं. नव्हती. पार्किंगच्या जागेत बऱ्याच ठिकाणी शोधली. गाडी हलवून पाहिली. किल्ली कुठेच नव्हती.
तसाच वर टेबलपाशी आलो. मीटिंग रूम, आर्टिस्ट रूम, कॉन्फरन्स हॉल, साहेबांची केबिन, स्वच्छतागृह, जिथे जिथे म्हणून जाऊन आलो होतो, तिथे तिथे वेड्यासारखा फिरलो. औरंगजेबाच्या सैन्याला जसे संताजी-धनाजी पाण्यात दिसत, तसे मला सगळीकडे माझी किल्लीच पडलेली असल्याचा भास होऊ लागला होता. पण अर्थातच या शोधमोहिमेचा काही उपयोग झाला नाही. शेवटी ज्या हॉटेलातून पोळ्या आणल्या, तिथेच त्याच पोळ्या आणि वर भाजी बिजी घेऊन चार घास पोटात ढकलावे लागले. वसुबारसेच्या दिवशी ते भयाण अन्न अक्षरशः पोटाची गरज म्हणूनच खावं लागलं.
"गाडीची डुप्लिकेट किल्ली घेऊन ये,' अशी विनंती सहधर्मचारिणीला केली, पण तिने पुणेरी स्वाभिमानी बाणा दाखवत ती धुडकावून लावली. झक्‌ मारत ड्युटीनंतर एक तास थांबून एका मित्राच्या मागे बसून घरी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी डुप्लिकेट किल्ली घेऊन ऑफिसला हजर. तिथे आल्यावर सहज म्हणून वॉचमनकडे चौकशी केली, तर माझी किल्ली तिथे माझी वाट बघत होती. कॅंटीनमधल्या मुलाला सकाळी झाडताना पार्किंगमध्ये मिळाली होती. अशा रीतीने माझी कसोटी बघत बेटी छान सुरक्षित हाती विसावली होती!
....
किल्लीचाच प्रसंग दोन दिवसांत पुन्हा घडेल, असं अजिबात वाटलं नव्हतं.
या वेळी "बळी' होती, माझ्याबाबत बाणेदारपणा दाखविणारी आमची (म्हणजे माझीच हं!) सहधर्मचारिणीच!
संध्याकाळी दिवाळीच्या उत्साहाच्या आणि पोरीला खेळवण्याच्या नादात बाईसाहेबांनी लॅचचं दार बाहेरून लावून घेतलं. मग शेजारून मला फोन करून आपला पराक्रम कळविला. वर मलाच किल्ली घेऊन घरी येण्याचा विनंतीवजा आदेशही दिला. काय करणार बापडा? नवरा या प्राण्याला बाणेदारपणा नसल्यामुळे झक्‌ मारत जावं लागलं. एक फायदा मात्र झाला. अगदी जेवायच्या वेळीच घरी गेल्यामुळे कधी नव्हे ते गरमगरम गिळायला मिळालं. अर्थात, माझ्या उपकारांच्या ओझ्यामुळं दबून गेल्यामुळं बायकोनंही न कुरकुरता जेवायला घातलं, हे वेगळे सांगणे न लगे!
...
या निमित्तानं एक सुरस आणि चमत्कारिक कथा आठवली. शनिवार पेठेत भाड्याच्या (हा कोण "भाड्या?') खोलीत राहत होतो, तेव्हाचा प्रसंग. एकदा पहाटे पाचला रत्नागिरीहून आलो, तो खोलीची किल्ली रत्नागिरीत विसरूनच! मग पत्र्यावर चढून, तिथून गॅलरीत उतरून, खिडकीतून खोलीत शिरून दुसऱ्या किल्लीनं दार उघडण्याचं दिव्य पार पाडावं लागलं होतं. तेव्हा कुण्या शेजाऱ्यानं चोरटा समजून दगडबिगड मारले नाहीत, हे नशीबच!
...
असो. इजा-बिजा-तिजा कधी होतोय, पाहायचं!
------------