Sep 30, 2008

गुहागरात...(कोरडी) सुहागरात...


गेल्याच आठवड्यात भन्नाट योगायोगांविषयी लिहिलं होतं। तसाच योग पुन्हा एकदा जुळून आला। गुहागरला जायचं बऱ्याच वर्षांपासून राहिलं होतं। स्वतः रत्नागिरीचा असूनही मी अद्याप हेदवी, वेळणेश्‍वर पाहिलं नव्हतं। सारखी हुरहूर लागत होती, पण जायचं काही घाटत नव्हतं। एकदा एन्‍रॉनच्या निमित्तानं लेख करण्यासाठी गुहागर शहरात आणि अंजनवेल, वेलदूर भागात गेलो होतो। पण तेवढाच। ते काही फिरणं नव्हतं. ते अचानक, अनपेक्षितपणे परवा जुळून आलं.
"गोड गुपीत', "नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे' या चित्रपटांचा दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर हा बऱ्यापैकी मित्र। पुण्यात भेटला, तेव्हा मी आणि श्रीपाद ब्रह्मे यांनी त्याला एखाद्या वेळी शूटिंगला बोलावण्याची गळ घातली होती. एरव्ही शूटिंग रिपोर्टसाठी जाणं म्हणजे फक्त औपचारिकता असते. तासभर थांबायचं आणि बोलून निघायचं. आम्हाला तसं नको होतं. जरा निवांत आणि स्वतंत्र हवं होतं. त्यानं ते लक्षात ठेवलं होतं बहुधा. श्रीपादला फोन करून त्यानं गुहागरला त्याच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला येण्याचं निमंत्रण दिलं. श्रीपादनं मलाही भरीला घातलं. काही कारणांनी माझंही प्रभुलकरशी काही दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं आणि मलादेखील ही चांगली संधी वाटली.
रविवारी सुटीच्या दिवशी जायचं आणि सोमवारी सकाळी निघून दुपारी ड्युटीला परत यायचं, अशी आमची अटकळ होती। रजा वगैरे घेण्याचा प्रश्‍न नव्हता आणि राहण्याची सोयही तो करणार होता. एकूणात काय, की फक्त बस प्रवासाचं भाडं आम्हाला पदरचं घालायचं होतं. त्यामुळे दोघंही तयार होतो. शेवटी जाण्याचं शुक्रवारी निश्‍चित झालं.जुजबी सामान घेऊन रविवारी सकाळी साडेसातची गाडी पकडली. दुपारी एक दीड पर्यंत पोचायचं, असा आमचा अंदाज. गुहागरला पोचायला सव्वाचार होतील, असं कंडक्‍टरनं सांगितलं, तेव्हा आमचा धीरच खचला. म्हटलं, उद्या दांडी मारावी लागणार बहुधा! मग एकदा तो विचार मनात आला आणि तोच मग पक्का केला
प्रवास उत्तम झाला. एकतर मी एसटीच्या लाल डब्यातून दिवसा बऱ्याच वर्षांनी एवढा मोठा प्रवास करत होतो. पण काही त्रास झाला नाही. वारा छान होता, एसटीही मोकळी होती आणि ऊनही फारसं नव्हतं. कुंभार्ली घाटात एसटीतूनच फोटो काढले, कोयनानगरला जेवलो आणि बरोब्बर सव्वाचारला गुहागरात पोचलो. त्यांनी कळविलेल्या हॉटेलवर पोचलो, तर तिथे कुणालाच काही पत्ता नव्हता. मग पुन्हा फोनाफोनी झाली. शेवटी आम्हाला बॅगा टाकायला आणि तोंडं विसळायला जागा मिळाली. आंघोळ कुणाला करायची होती?आत्ता येऊ मग येऊ करता करता दोन तासांनी, साडेसहाला आम्हाला न्यायला गाडी आली. तिथून चहा पिऊन पालशेत नावाच्या बारा किलोमीटरवरच्या गावात पोचलो. तिथे एका कोकणी चौसुपी घरात शूटिंग चाललं
"सुंदर माझं घर' असं चित्रपटाचं नाव. मधुराणी गोखले, राहुल मेहंदळे हे कलाकार. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते आदल्या दिवशीच येऊन गेले होते. कोकणात मोठ्या कुटुंबात राहणारी एक मुलगी मुंबईत विभक्त झालेल्या कुटुंबात जाऊन राहते आणि तिथे सर्वांना एकत्र आणते, अशी ही कथा. प्रभुलकरनं आमचं चांगलं स्वागत केलं. गेल्या गेल्या भोपळ्याच्या घारग्यांचा भरपेट नाश्‍ता झाला.नंतर थोडा वेळ गेल्या दोन दिवसांतलं शूटिंग टीव्हीवर पाहिलं आणि मग प्रत्यक्ष शूटिंग. शूटिंगच्या गमतीजमतीही अनुभवायला मिळाल्या. अंगणात एकत्र जेवणाचं दृश्‍य होतं, पण जेवणच तयार नव्हतं। मग चिडाचिडी, आरडाओरडी झाल्यावर जेवणाची तयारी करण्यात आली। तोपर्यंत दिग्दर्शकानं तो शॉटच बदलून टाकला होता।
नायिकेच्या मोठ्या बहिणीच्या मांडीवर देण्यासाठी आणलेलं गावातलं कुणाचं तरी बाळ भोकाड पसरून रडायला लागलं. म्हणून मग बाहुलीचं बाळ तयार करण्यात आलं. ते बिचारं रडलं नाही!रात्री दहापर्यंत शूटिंग चाललं. आम्ही म्हणजे तिथे विशेष पाहुणेच होतो. त्यामुळं बसायला खुर्च्या, पाणी, खाणं, सगळ्याची ददात होती. साडेदहाला जेवलो। मग शूटिंगची मंडळीही पॅक अप करून आली. सगळ्यांशी गप्पा झाल्या. साडेअकरापर्यंत "हॉटेल निसर्ग'वर आलो. येतानाचा अंधारातला प्रवासही छान झाला. वाटेत एक कोल्हा पाहिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचा बेत रद्दच केला होता. ऑफिसला कळवून दांडी टाकली होती. मग सकाळी प्रभुलकरांनी आमच्या दिमतीला एक गाडी दिली. तिच्यातून हेदवीला जाऊन आलो. येताना चालकानं हेदवीच्याच समुद्रकिनाऱ्यावरचा एक भन्नाट स्पॉट दाखवला. आमच्या श्रीपादला तो आधी माहीत असल्यानं जरा पुढे जाऊन व्यवस्थित पाहिला. बामणघळ त्याचं नाव. डोंगराच्या कुशीत दोन खडकांमध्ये चर तयार होऊन त्यातून लाटा आत येतात. जोरात लाट आली, की ती उसळून फेसाळत वर येते आणि अक्षरशः आंघोळ घालते. पाहायला हे दृश्‍य फारच भन्नाट आहे. आम्ही अर्धा तास तिथे काढून मग निघालो.
गुहागरात आल्यावर तिथल्या किनाऱ्यावरही फेरफटका मारला। मग दुपारी पुण्याची गाडी धरली...