Dec 16, 2007

भय इथले संपत नाही...--------

खबर पक्की आहे.
तमाम न्यूज चॅनेल्सवर दाखवली असली, तरी!
कॅथरिनानं (कतरिना, कॅथरिना, कॅटरिना...आपापल्या सोयीनुसार!) सल्लूमियॉंला सोडल्याची. सलमानचा पंधरा वर्षांतला सलग चौथा विवाहपूर्व घटस्फोट. आधी सोमी अली, मग संगीता बिजलानी, मग साक्षात ऐश्‍वर्या राय. आता त्याचा कॅथरिनाचा "कैफ'ही उतरला. बिच्चारी! अक्षयकुमार नावाच्या सज्जन, सत्शील, सद्‌गुणी माणसाबरोबर चार-दोन पिक्‍चरमध्ये कामं काय केली, सल्लूमियॉंचं डोकं भडकलं. का भडकू नये? त्यानंच तिला पिक्‍चर मिळवून दिले होते. पार्ट्यांमध्ये मिरवलं होतं. लोकांच्या गाठीभेटी करून दिल्या होत्या. हिंदी लिहिता-वाचता-बोलता येत नसताना, बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींत बसवलं होतं. तरीही तिनं "हारे' राम हारे राम हारे क्रिश्‍ना हारे राम' करत त्या अक्षयच्या भजनी लागावं? का? फक्त एक लग्न आणि सल्लूसारखेच तीन-चार विवाहपूर्व घटस्फोट यांचा अनुभव म्हणून?

आपला भाव घसरत चाललाय आणि अक्षयचा दर्जा घसरला असला, तरी भाव वाढतोय, हे खरं आहे. पण एवढ्याच कारणास्तव तिनं आपल्याला सोडावं? सल्लू जाम भडकला. त्यानं नेहमीसारखेच तमाशे केले. ऐश्वर्याला सोडल्यानंतर (म्हणजे, तिनं लाथ घातल्यानंतर त्यालाही बरेच दिवस अशी मिळाली नव्हती!) कॅथरिनानं शेवटी कंटाळून त्याला टाटा केला. पुढे गेल्यावर मागचं विसरायची तिलाही सवय झालेय आता!सध्या सल्लू नैराश्‍याच्या गर्तेत आहे म्हणे. एकतर काळविटाच्या शिकारीप्रकरणी शिक्षेची टांगती तलवार आहेच डोक्‍यावर. वाढत्या वयाचं टेन्शन आहे. त्यातनं अशा "मृगनयनी' सोडून गेल्यावर करायचं काय? भांडायचं कुणाबरोबर आणि तमाशे कुणासमोर करायचे?

अशा नैराश्‍यगस्तीत ("ओढगस्ती'च्या तालावर) घरातच गस्त (येरझाऱ्या) घालत असताना सल्लूला एकदम जुना मित्र संजूबाबा आठवला.

त्यानं फोन लावला, तर संजूबाबा कुठल्यातरी विपश्‍यना शिबिरात होता.
"दीर्घ श्वास घ्या...मन एकाग्र करा. लांबवर नजर टाका. आपल्या मनाचं सामर्थ्य ओळखा. मनातले विचार एकदम काढून टाका. आधीची कोरी पाटी पुसून नव्यानं काही रंगवण्याचा प्रयत्न करा...'

संजूबाबा आपल्याला सांगतोय, की समोरच्या शिबिरार्थींना, ते सल्लूला कळलं नाही....