Dec 10, 2015

Operation `बाहु`बली

(भाग 3)

सर्जरी!
कन्फर्म झालं.

फक्त ती कधी करायची, एवढाच प्रश्न होता.
माझ्या आयुष्यात सर्जरीची ही पहिलीच वेळ होती. त्यातून उजवा हात, त्यातून खांदा. सर्जरी म्हणजे काहीतरी गंभीर जाणवत होतं, पण त्याचं पुरेसं गांभीर्य मला त्या क्षणी खरंच जाणवलं नव्हतं. छोटंसं OPERATION आणि नंतर दुस-या दिवसापासून कामाला सुरुवात, असंच त्या क्षणी वाटलं.

त्याच दिवशी इतर तपासण्या करून टाकल्या. सर्जरी दोन दिवसांनीच करायचं ठरलं. दुस-या दिवशी फिजिकल फिटनेस रिपोर्ट आणायचा होता. तोही झाला आणि तिस-या दिवशी सर्जरीसाठी दाखल झालो. सकाळपासून पाणीसुद्धा प्यायला बंदी होती. थिएटरशी माझा लहानपणापासून जिव्हाळ्याचा संबंध. पण OPERATION थिएटर आतून बघण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. साधारण दोन तास लागतील, असा अंदाज होता. मला लोकल अनेस्थेशिया दिला जाणार होता. म्हणजे स्वतःच्या खांद्यावरचे कापाकापीचे प्रयोग मला डोळ्यांनी बघता येणार होते म्हणे.

अनेस्थेशियाचं इंजेक्शन डाक्टरांनी देण्याआधीच खूप गोष्टी विचारायच्या होत्या, पण जमलं नाही. माझ्या नाकाला त्यांनी आक्सिजनचं नळकांडंही लावून टाकलं. श्वास जड होत असल्याचं जाणवायला लागलं होतं. घशात खवखवत होतं, म्हणून खोकण्यासाठी मास्क बाजूला करायला सांगितला, तर मला धड खोकताही येईना आणि श्वासही घेता येईना. डाक्टरांनी आपापसात काहीतरी गुफ्तगू केलं आणि माझी भूल वाढवली. नंतरचं मला काही समजलंच नाही. जाग आली, ती आजूबाजूला भयंकर च्यांवच्यांव सुरू असल्यानं. बघितलं, तर मी OPERATION थिएटरच्या बाहेर होतो आणि हर्षदा, इतर नातेवाईक आजूबाजूला होते. ``त्यांना कुशीवर होऊ देऊ नका!`` असिस्टंट डाक्टर एकदम ओरडल्या.
मग मला उताणी झोपवण्यात आलं. पुढचे काही दिवस मला असंच उताणं पडायचं होतं, याची तेव्हा कल्पना नव्हती. काही वेळानं मला माझ्या खोलीत शिफ्ट करण्यात आलं. पुढचे तीन दिवस असेच काढायचे होते. हातावर एक मोठा कट घेऊन आत धातूची प्लेट टाकण्यात आली होती. एक्सरेमध्ये ही प्लेट म्हणजे दरवाज्याच्या बिजागरीसारखी दिसत होती. स्क्रू टाइट करून ती फिटसुद्धा करण्यात आली होती. हात अडकवण्यासाठी दिलेली हॅंडबॅग पुढचा महिनाभर माझी साथ करणार होती. हात खांद्याला चिकटून राहावा, हलू नये, यासाठी एक  पट्टासुद्धा दिला होता. शर्ट घालायचीही पंचाईत झाली होती.

पहिल्याच दिवशी काही नातेवाईक भेटायला आले होते. आपण कुठल्याही अवस्थेत असलो, तरी कुणीतरी आपल्याला भेटायला येणं, आनंददायीच असतं. पण त्या दिवशी मात्र माझी चिडचीड चालली होती. एकतर संध्याकाळपर्यंत काही खायला प्यायला परवानगी नव्हती. पाण्याचा थेंबही घेतला नव्हता आणि घशाला कोरड पडली होती. डाव्या हाताला सतत इंजेक्शन्स देण्यासाठी आणि सलाइनसाठी एक सुई कायमस्वरूपी टोचून ठेवण्यात आली होती. ती सांभाळत सक्तीनं उताणी झोपायचं होतं.

आठ वाजता थोडं खायला हरकत नाही, असं डाक्टरांनी सांगितलं होतं, पण नर्स आणि असिस्टंट डाक्टर प्रत्येक जण वेगवेगळं सांगत होते. मला जास्त वेळ उठून बसायचीही परवानगी नव्हती. आठ वाजता नर्सनं सलाइन लावलं आणि पंधरा मिनिटांत ते संपेल, असं सांगितलं. त्यानंतर मला खायला परवानगी मिळणार होती. प्रत्यक्षात पाऊण तास झाला, तरी सलाईन संपायचं नाव घेईना. मग तिला पुन्हा शोधून आणून आठवण केली, तेव्हा तिनं सलाईनची गती वाढवली. तरी ते संपायला साडेनऊ वाजले. कडाडून भूक लागली होती, तरी थोडंच खायचं होतं. उलटी होण्याची शक्यता होती. सुदैवानं तसं काही झालं नाही आणि अखेर मी खाऊ आणि पिऊ शकलो. दिवसभर चाललेली माझी चिडचीड अखेर थंडावली.

रात्री डाक्टर व्हिजिटला आल्यानंतर त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. त्यांनी आता मी उठून हिंडू फिरूही शकतो, असं सांगितलं. असिस्टंट मात्र मी बेडवर उठून बसलो, तरी गुरकावत होते. दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळेल, असंही डाक्टरांनी सांगितलं.

हास्पिटलातले दोन दिवस म्हणजे दिव्य होतं. आमची रूम सेमिस्पेशल आणि हवेशीर, मोकळी ढाकळी असली, तरी दिवसभर कंटाळा सोबतीला होताच. तरी दुस-या दिवशी LAPTOP मागवून घेऊन एका स्क्रिप्टवर काम केलं. म्हणजे, निदान वाचता तरी आलं. पुढचे पंधरा वीस दिवस तरी लिहिणं कठीण होतं. कधी एकदा या तापातून बाहेर पडतो, असं झालं होतं.

रात्री झोपतानाही सक्तीनं उताणी झोपायचं होतं. कुठल्याही कुशीवर वळायला परवानगी नव्हती, त्यामुळे पाठीला रग लागायची. झोप यायची नाही. उजव्या हाताच्या कोपराखाली उंच उशी आणि डाव्या कुशीवर वळलं जाऊ नये, म्हणून डावीकडे एक लोड, असं काहीतरी घेऊन त्या खोपच्यात झोपावं लागायचं. थोडक्यात पाळण्यात झोपल्याचा फील या सर्जरीनं दिला होता. मध्येच पाठीला रग लागून जाग आली, की एकतर कमान करून शरीराचा त्रास कमी करणं, किंवा काही वेळ उठून बसून नंतर पुन्हा झोपणं, एवढाच पर्याय हातात होता.

अखेर तीन आठवड्यांनी टाके काढले गेले. त्यानंतर हाताच्या थोड्या हालचाली सुरू करायलाही डाक्टरांनी सांगितलं, काही व्यायामही दिले. आता थोडं रिलॅक्स वाटू लागलं. दोन्ही हातांतून पहिल्यांदा शर्ट घातला, तेव्हाच मी हुश्श केलं.

दिवाळी तोंडावर होती आणि मी हात गळ्यात घेऊन पडलो होतो. पण सुदैवानं दिवाळी गोड झाली. आदल्याच आठवड्यात एक्सरे पार पडला आणि तो उत्तम असल्याचं डाक्टरांनी सांगून आता मला हाताच्या नियमित हालचालीही हळूहळू करायला परवानगी दिली. एका कुशीवर वळायलाही आता हरकत नव्हती. एवढे दिवस सतत हात शरीराला चिकटून असल्यामुळे स्नायू आखडले गेल्यामुळेच हात हलवल्यावर दुखतोय, हा साक्षात्कार मला झाला. त्याआधी जरा कळ मारली, तरी प्लेट हलली की काय, असं वाटून घाबरायला होत होतं.
एकंदरीत या सर्जरीची कहाणी अशी सुफळ संपूर्ण झाली. अजूनही काही बंधनं आहेत, पण आधी जो त्रास सहन केला, त्या तुलनेत मी लवकर स्वतंत्र झालो, असंच म्हणायला हवं.

महिनाभरातच पुन्हा टायपिंगही सुरू झालं. कधी डाक्टरांच्या परवानगीनं, कधी त्यांची परवानगी गृहीत धरून मुंबई वारी आणि ड्रायव्हिंगही सुरू केलं.

कुठल्याही प्रसंगात देव आपल्या पाठीशी असतो, असं म्हणतात. अनंत चतुर्दशीला बाप्पा माझ्या समोर होता आणि मी पाठच्या पाठी पडलो, ते तो बघत होता. आता पुढच्या वर्षी त्याच्या पाठवणीला जावं, की मिरवणुकीकडेच पाठ फिरवावी, याचा विचार करतोय!

(समाप्त.)

Nov 18, 2015

Operation `बाहु`बली


(भाग 2)

खजिना विहीर चौकातून टिळक रस्त्याला जाऊन तो पार करावा, असा विचार केला, पण तिथेही अभूतपूर्व गर्दी होती. एरव्ही टिळक रस्त्यावरच्या दोन मंडळांच्या मध्ये खूप अंतर असतं. पुढचा गणपती येईपर्यंत एका जागी उभं राहून वाट बघायलाही कंटाळा येतो. त्या रात्री मात्र सगळी संकटं आमच्यासमोर हात जोडून उभी होती. लांबलांबपर्यंत रस्ता पार करण्याची अजिबात संधी दिसत नव्हती. मग तिथून मागे वळून भिकारदास मारुतीच्या जवळच्या बोळातून टिळक रस्त्यापर्यंत आलो.  गर्दीतून सुटकेचा मार्ग तिथेही दिसत नव्हताच, पण आता पर्याय नव्हता. लवकरात लवकर तिथून बाहेर पडणं महत्त्वाचं होतं. शेवटी तसाच धीर करून गर्दीत घुसलो.

माझा उजवा हात डाव्या हातानं धरूनच गर्दीतून चालावं लागत होतं. हात गळ्यात बांधल्यामुळं निदान ते बघून तरी लोक थोडीशी जागा देत होते. तरीही, पायाखाली दिसत नसणा-या फूटपाथवरून दुस-या चौकापर्यंत जाणंही सहनशक्तीचा अंत बघणारं होतं. लोक दोन्ही बाजूंनी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते आणि मी त्यांच्या धक्क्यापासून वाचण्याचा! दोन्ही मुलं हर्षदाच्या ताब्यात होती. आधीच गर्दी, त्यात माझा हात जायबंदी, त्यामुळे मुलं जास्तच घाबरली होती. कसाबसा सावरत, धक्क्यांपासून वाचत त्याच गर्दीतून एसपी कालेजच्या चौकापर्यंत पोहोचलो आणि डावीकडे वळून थोडा मोकळा श्वास घेतला. तरीही अग्निपरीक्षा संपली नव्हतीच. उजवा हात जरा हलला तरी ठणकत होता. आता टिळक रस्त्यापासून पर्वतीच्या पुलापर्यंत चालत जायचं होतं. वाटेत गर्दीची विघ्नं होतीच. ना. सी. फडके चौकापर्यंत आलो आणि नीलायम समोरच्या रस्त्यावर एका मिरवणुकीनं पुन्हा रस्ता अडवला होता. या गर्दीत घुसण्याचं धाडस दाखवणं म्हणजे मूर्खपणा ठरला असता. पर्वतीजवळ लावलेली बाईक तर ताब्यात घ्यायलाच हवी होती. मग हर्षदा आणि मनस्वीनं बाईकवरून घरी यावं आणि मी निमिषला घेऊन चालत घरी पोहोचावं, असं आम्ही ठरवलं.

तिथून चालत घरी आलो. मुलांना एकटंच घरी झोपवून हर्षदाबरोबर मी ग्लोबल हास्पिटलला पोहोचलो.  गर्दीचं दिव्य पार पडलं, पण हास्पिटलमधल्या अतिशहाण्यांशी संघर्ष अद्याप बाकी आहे, याची तेव्हा कल्पना नव्हती. हात दुखतोय, त्या अर्थी मुका मार लागला असेल, किंवा फारतर फ्रॅक्चर असेल, अशीच शंका वाटत होती. किंबहुना, तशी खात्रीच होती. `ग्लोबल`मध्ये पोहोचलो, तर तिथे गणपतीचाच प्रसाद मिळालेले आणखी दोन तीन पेशंट आले होते. एका झिडपिडीत माणसानं आमची चौकशी केली. हा स्वतः रात्रपाठीचा डाक्टर आहे, हे समजल्यावर मी थिजूनच गेलो. त्यानं प्राथमिक चौकशा केल्या आणि हात हलवल्याशिवाय दुखत नाहीये, याचा अर्थ फ्रॅक्चर नसावं, असा निष्कर्ष काढला. मग माझी एक्सरेसाठी रवानगी केली. हात थोडा हलवल्यावर प्रचंड दुखत होता. एक्सरे काढणा-या माणसानं मला तो कोपरात शक्य होईल तेवढा वाकवायला लावला. प्रचंड कळा मारत होत्या, पण इलाज नव्हता. त्यानं कोपराचे दोन angles मधून एक्सरे काढले.

आता एक्सरे रिपोर्टसाठी थांबणं आवश्यक होतं. ते लवकर आले आणि ते पाहून फ्रॅक्चर नाहीये, असं निदान तिथल्या डाक्टरांनी केलं. पेन किलर इंजेक्शन देऊ आणि उद्या सकाळपर्यंत नाही थांबलं, तर खांद्याचा एक्सरे काढू, असं त्यांनी सांगितलं. प्रत्यक्षात दुखणं खांद्याला आहे, हे त्यांना बहुधा एक्सरे काढल्यानंतर लक्षात आलं असावं. मग धनर्वात आणि पेन किलर अशी दोन दोन भोकं शरीराला पाडून घेतल्यानंतर आम्ही घरी आलो. रात्री एकाच कुशीवर कसाबसा तळमळत झोपलो.
सकाळी उठलो, तरी त्रास कमी झाला नव्हता. रात्रीपासून सतत एक विचार मनात येत होता. मुकामारच असेल, तर हात जरा ताणून, दुःख सहन करत वर घेऊन बघावा. पण तो त्रास सहन न झाल्यामुळे असेल किंवा दुस-या कुठल्या भीतीमुळे, पण तेवढा जोर केला नाही.
दहा वाजता सदाशिव पेठेतलं मोडक हास्पिटल गाठलं. मिरवणूक सुरूच होती, त्यामुळे ठिकठिकाणी बांबूने अडवलेल्या रस्त्यांचे अडथळे पार करण्याची शर्यत खेळावी लागत होती. टिळक रस्त्याच्या अलीकडेच गाडी लावून हास्पिटलपर्यंत चालत गेलो. एक्सरे टेक्निशिअन आले नव्हते. तिथल्या असिस्टंट डाक्टरांना दाखवलं, त्यांचाही पहिला अंदाज असाच होता, की सहन न होण्यासारखं दुखत नाहीये, त्या अर्थी फ्रॅक्चर नसावं. कदाचित मुकामार असेल, किंवा किरकोळ फ्रॅक्चर असेल, असाच ग्रह आता आम्हीसुद्धा करून घेतला होता.

एक्सरे टेक्निशिअन सांगवीहून निघाल्याचं समजलं. गणपती मिरवणुकीचे अडथळे पार करत ते कधी पोहोचणार, यासाठी आम्ही आता देवच पाण्यात ठेवायचे बाकी होते. तरीही ते अपेक्षेपेक्षा खूपच वेळेत पोहोचले. त्यांनी लगेच एक्सरे काढले. मुख्य म्हणजे जिथे दुखत होतं, तिथले, म्हणजे खांद्याचे एक्सरे काढले. काही सेकंदात ते तयार झाले आणि ते पाहून त्यांची नाही, पण माझी काळजी वाढली.

फ्रॅक्चर आहे, असं त्यांनी सांगितलं.
म्हणजे आता प्लॅस्टरचा ताप, असाच विचार मी मनात केला.

पण त्यांचं पुढचं वाक्य काळजात धडकी भरवणारं होतं.

`बहुतेक सर्जरी करावी लागेल! मी डाक्टरांशी बोलून कन्फर्म करतो!!`

(क्रमशः)

Nov 11, 2015

Operation `बाहु`बली

भाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात लावण्यापासून दुस-या दिवशी पहाटे दगडूशेठ गणपती लक्ष्मी रस्त्यावरून जाईपर्यंत मजबूत तंगडतोड करणं, हा वार्षिक सोहळाच होऊन गेला होता. भाड्याच्या घरात राहणं बंद झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर हा उत्साह क्रमाक्रमानं कमी होत गेला. लक्ष्मी रस्त्याच्या श्वासही घेता न येणा-या गर्दीत घुसून एका चौकापासून दुस-या चौकापर्यंत जाणं ही अहमहमिकाही बाद होऊन मुलांसह जायचं, तर आपला टिळक रस्ता बरा, हा विचार पक्का होत गेला. पण टिळक रस्ताही एवढा दगा देईल, याची मला अजिबात कल्पना नव्हती.


यंदाच्या चतुर्दशीला सकाळी फक्त मानाचे गणपती बघायचे आणि संध्याकाळी थोडा वेळ टिळक रस्त्याला चक्कर मारून परत यायचं, असंच नेहमीप्रमाणे ठरवलं होतं. तरीही सकाळी बाहेर पडलोच नाही. दिवसभर घरीच काम केल्यानंतर जरा कंटाळा आला, म्हणून फारसा उत्साह नसतानाही पाय मोकळे करण्यासाठी टिळक रस्त्याला जायचं ठरवलं. सहकुटुंब. निमिषला सकाळी मानाचे गणपती दाखवले होते, त्यामुळे त्याला घरीच ठेवून मी आणि मनस्वी, दोघांनीच जायचं आधी ठरत होतं, पण ते बदलून चौघं जायला निघालो. पर्वतीपर्यंत दुचाकीनं जायचं आणि तिथे जागा मिळेल तिथे गाडी लावून पायी भटकायचं, असा बेत होता. पर्वतीच्या पुलावरच एका बाजूला स्कूटी लावून टिळक रस्त्याच्या दिशेनं चालत निघालो. त्या दिवशी नेहमीपेक्षा गर्दी जास्तच वाटत होती. टिळक रस्ता जवळजवळ येत गेला, तशी ती आणखी वाढत गेली.


एखाद दुसरा गणपती बघून निघू, असाच विचार तेव्हा केला होता. थोडा वेळ एसपी collegeच्या चौकात थांबून रस्ता मोकळा मिळाल्यावर ओलांडून पलीकडे गेलो. काही वेळ थांबल्यानंतर एका मंडळाचा गणपती दृष्टिपथात आला. त्यांचं ढोलपथक ऐकून घरी परतू, असं ठरवलं होतं. ढोलपथक पाहायला पुढे गेलो, तेव्हाच मागून गर्दी वाढायला लागल्याचा अंदाज आला होता. निमिषला कडेवर घेतलं होतं. मनस्वी आणि हर्षदा आमच्या पुढेच, एकत्र होत्या. ढोलपथकाच्या स्वयंघोषित रस्तेसम्राटांनी दो-या लावून पथक पाहायला जमलेल्या लोकांना रस्त्याच्या कडेला रेटायला सुरुवात केली. ह्या लोकांच्या दांडगाईत आपण चेंगरायला नको, म्हणून लगेचच मागे जाऊन रस्त्याच्या कडेला उभं राहण्याचा निर्णय घेतला. एवढ्यात पुढच्या बाजूनं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून रांगा करून येणा-या लोकांनी मधल्या चिंचोळ्या जागेतून समोरच्यांना ढकलत पुढे जायला सुरुवात केली. माझ्या समोर दोन कमी उंचीच्या महिला होत्या. त्यांना या ढकलाढकलीची झळ बसू नये, म्हणून जास्तीत जास्त पाय रोवून त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत होतो. थोडी जागा मोकळी झाल्यावर तसाच मागे येऊन रस्तातून बाजूला जाण्यासाठी निघालो, तेवढ्यात रेटणा-या लोकांचा जोर वाढला. थोडासा बेसावध होतो, त्यामुळे त्या रेट्यानं तसाच पाठमोरा रस्त्यावर पडलो. कडेवर निमिष होता, त्याला वरच्यावर कुणीतरी उचलल्याचं दिसलं. मी पडलो, तिथून अगदी थोडीशी जागा सोडून बाजूला फक्त गर्दीचे पायच दिसत होते. निमिषला वरच्या वर कुणीतरी उचललं आणि कुणाकडे तरी दिलं, एवढंच दिसत होतं. आपटल्यामुळे माझा खांदा अचानक प्रचंड दुखायला लागला होता. काय होतंय, हे मला काही क्षण कळतच नव्हतं. हर्षदा आणि मनस्वी दिसत नव्हत्या, पण निमिषला कुणीतरी हर्षदाकडे दिलं असावं, असं वाटत होतं. पडल्यानंतर उठण्याचीही शुद्ध मला काही क्षण नव्हती. कुणीतरी मला खांद्याला धरून उठवण्याचा प्रयत्न केला, पण मीच त्यांना रोखलं, कारण उजवा खांदा प्रचंड दुखत होता. कसाबसा हात टेकून उठलो, पण आपला उजवा हात उचलताच येत नाहीये, हे जाणवलं. चक्कर आल्यासारखं होत होतं. पुन्हा गर्दीत सापडू नये, म्हणून बाजूला जाऊन दहा मिनिटं शांतपणे उभा राहिलो. हर्षदा, मनस्वी, निमिष एकत्र असतील आणि सुरक्षित असतील, असा फक्त अंदाजच करू शकत होतो. कारण खांद्याच्या असह्य वेदनांमुळे दुसरं काही सुचतच नव्हतं.


थोडं सावरल्यानंतर आजूबाजूला पाहून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोप-यात उभी असलेली हर्षदा दिसली. मनस्वी तिच्याबरोबरच होती आणि मुख्य म्हणजे निमिषही होता. म्हणजे कुणीतरी वरच्या वर त्याला उचलून हर्षदाकडे दिलं असावं, हा माझा अंदाज बरोबर ठरला होता. हायसं वाटलं. मला नक्की काय झालंय, मी असं का करतोय, हे त्यांना कळतच नव्हतं. गर्दीतून मुलांना वाचवण्यासाठी हर्षदा सुरक्षित ठिकाणी उभी राहिली होती. मी प्रत्यक्षात पडल्यानंतर सुमारे दहा-बारा मिनिटांनी आम्ही एकमेकांना भेटलो. माझा हात प्रचंड दुखतोय आणि उचलताही येत नाहीये, हे तिला सांगितलं. त्या गर्दीत नक्की काय करावं, तेच कळत नव्हतं. कदाचित पडल्यामुळे मुकामार लागला असेल, काही वेळानं तो बरा होईल, असं मला वाटलं. सुदैवानं तिथेच एक ambulance होती. माझ्या कोपरालाही आपटलंय आणि जखम होऊन रक्त येतंय, हेही जाणवलं. तातडीनं काहीतरी उपचार घेणं भागच होतं. प्रत्यक्षात मला कोपराची जखम बघताही येत नव्हती, एवढा हात जखडला गेला होता. ambulance मध्ये शिरलो. तिथे doctor असतील आणि आपल्याला नक्की काय झालंय त्याचं निदान होईल, उपचार होतील, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली. तिथे फक्त एक कंपाउंडर होता. त्यानं कोपराच्या जखमेला मलमपट्टी केली आणि हात दुखतोय म्हटल्यावर एका साध्या बँडेज पट्टीनं तो गळ्यात अडकवून टाकला. दुसरा काहीच उपचार तिथे होऊ शकणार नव्हता. आता जवळचं हास्पिटल गाठणं भाग होतं.


गर्दी एवढी होती, की पुढच्याच चौकात सदाशिव पेठेत असलेलं मोडक हास्पिटल आठवलं, तरी तिथे पोहोचण्याचा विचारही करणं शक्य नव्हतं. एवढ्या गर्दीत ते सुरू असेल की नाही, याचीही खात्री नव्हती. त्यामुळे आधी टिळक रस्ता पार करून घराजवळच्या ग्लोबल हास्पिटलमध्ये पोहोचावं, असा विचार केला. एसपी बिर्याणीच्या बाहेरच्या कट्ट्यावर काही वेळ बसून विश्रांती घेतली. दुखणारा हात घेऊन तुफान गर्दीतून रस्ता कसा काढायचा आणि वेदना कशा सहन करायच्या, याचाच विचार डोक्यात सुरू होता. माझ्या कडेवर असताना पडल्यामुळे आणि गर्दीमुळे निमिष आधीच खूप घाबरला होता. मला नक्की काय झालंय, हे समजल्यामुळे हर्षदाही. घरापर्यंत पोहोचण्याचं दिव्य कसं पार पाडायचं, याची चिंता आम्हा दोघांनाही होती. पण आमच्यापेक्षाही जास्त चिंता असलेला माणूस शेजारीच येऊन माझ्याच परवानगीनं `श्रमपरिहारा`साठी बसला, तेव्हा तिथून हलावं, असा विचार मी केला. माझ्या नशीबातला `सश्रम कारावास` मात्र एवढ्या सहजासहजी संपणार नव्हता...!


(क्रमशः)

Sep 20, 2015

जबाबदारी


रत्नागिरीच्या घरी गणपती असल्याने आणि आईवडील तिथेच राहत असल्याने दरवर्षी निदान मला तरी गणपतीत घरी जावं लागतं. पूर्वी स्वेच्छेने जायचो, आता कर्तव्य म्हणून जातो. गेल्या वर्षी सात दिवसांचा गणपती होता. तेव्हा मी सिरियलचं अचानक जास्त काम आल्यामुळे मला सात दिवसांत घरातून बाहेरसुद्धा पडता आलं नव्हतं. या वेळी मात्र बाहेर पडून आवर्जून काही लोकांना भेटायचं ठरवलं होतं.

काल स्टॅंडवर एका मित्राला भेटायला निघालो होतो, तेव्हा जाताना आईनं आठवण केली, ``गोखले नाक्यावरच्या दुकानात सुनीता असेल. लवकर गेलास, तर भेटेल.`` सुनीता माझी मामेबहीण. लग्न झाल्यानंतर आता ती रत्नागिरीतच असते. ब-याच दिवसांत तिची भेट झाली नव्हती. या वेळी भेटायचं असं मनात नव्हतं, पण अचानक योग आला होता आणि वेळेतही बसत होतं. गोखले नाक्यापर्यंत गेलो, पण सवयीनं मारुती आळीतून स्टॅंडकडे वळणार होतो. आज आठवडा बाजारामुळे मारुतीच्या आळीला गर्दी नसेल, म्हणून राम आळीनं जायचं ठरवलं आणि अचानक सुनीताला भेटायचं होतं, हे आठवलं. तिथे जवळच तिचं दुकान होतं. मी गेलो, तेव्हा ती आवराआवरी करून निघण्याच्या तयारीतच होती. पाच मिनिटांत बाहेर आली. कुठे बसूया, असा विचार करत मग आम्ही शेवटी राम आळीतल्या नूतनीकरण झालेल्या राम मंदिरात बसलो. त्या निमित्तानं श्रीरामाला माझं दर्शन घडलं.

सुनीता आणि मी एकाच वयाचे. लहानपणी रत्नागिरीत असताना मी दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्यांमध्ये हटकून माझ्या आजोळी, म्हणजे शिपोशीला जायचो. तासा-दीड तासाचा बसचा प्रवास. थोडा मोठा झाल्यावर एकटाच जायला लागलो. मामा-मामी, आजी आणि ही तीन भावंडं, असा सहा जणांचा संसार. मी तिकडे जाणं म्हणजे ह्या भावंडांसाठी पर्वणी असायची. शिपोशी हे तसं अगदीच खेडेगाव. गावात उन्हाळ्यात पूजेनिमित्त प्रोजेक्टरवर दाखवले जाणारे चित्रपट, घराच्या जवळच असलेली नदी आणि कार्तिकातला गावाच्या देवळातला उत्सव, एवढंच काय ते मनोरंजन. त्या मानानं मी सुखी होतो. रत्नागिरीत तीन थिएटर्स होती आणि मला लहानपणापासूनच सिनेमाचं वेड होतं. मी तिकडे गेल्यावर नव्यानंच पाहिलेल्या सिनेमांच्या स्टो-या सांगायचो, ते त्या भावंडांसाठी मोठं मनोरंजन असे. कधीकधी तेसुद्धा शेतात, कुठल्या कुठल्या वाडीत प्रोजेक्टरवरून पडद्यावर बघितलेल्या सिनेमांच्या स्टो-या सांगत, तेव्हा मलाही नवीन ज्ञान मिळे. `यादों की बारात` आणि `आली लहर, केला कहर` या दोन सिनेमांची त्यांनी मला सांगितलेली स्टोरी अजूनही आठवतेय. (मी अजूनही हे दोन्ही सिनेमे पाहिलेले नाहीत. स्टोरी कळल्यामुळे नव्हे, योग आला नाही म्हणून! असो.) कधीतरी माझा बेळगावचा मावसभाऊ राजू राहायला यायचा, तेव्हा त्याच्याकडे सिनेमाच्या स्टो-यांचा खजिनाच असायचा. मग आम्ही सगळेच श्रोते व्हायचो!

बाकीची दोन भावंडं तशी लहान असल्यामुळं सुनीताशी माझ्या ब-याच गप्पा व्हायच्या. आपापल्या भावी आयुष्यावरही आम्ही बोलायचो. तिच्याशी माझं ब-यापैकी ट्यूनिंगही होतं. आमच्या घराशेजारची पोरं मला सुनीताच्या नावावरून चिडवायचीही. पण मामेबहिणीशी लग्नाच्या विचाराची संकल्पनाही मला कधी पटली नव्हती.
आपापल्या घरातली सुखदुःखं, कटकटी याच्यावर आम्ही त्या अजाणत्या वयात बरीच गहन आणि गंभीर चर्चा करायचो. त्या त्या समस्यांवरच्या उपाययोजनांवरही बोलायचो. अर्थात, मोठ्या माणसांसमोर कधी ते उपाय मांडण्याचं धाडस आम्हा दोघांचंही झालं नाही. मुंबईत धाकट्या मामाच्या घरीसुद्धा आम्ही सुट्यांमध्ये योगायोगानं एकत्र राहिलो, तेव्हाही आमच्या खूप गप्पा व्हायच्या.

सुनीताला रत्नागिरीत भेटलो, तेव्हा ह्या सगळ्या आठवणी निघाल्या. तिच्या किंवा माझ्या घरी भेटलो नाही, हे बरंच झालं, असं वाटलं. बोलण्यात आमचे नेहमीचे विषय निघालेच. `आईवडिलांनी आपल्याला लहानपणी वाचनाची आवड आणि सवय लावली नाही, त्यासाठी पुस्तकं विकत आणून दिली नाहीत, किंबहुना, आपल्याला `घडवण्या`साठी जास्त वेळ दिला नाही, ही माझी नेहमीची तक्रार. माझ्यापेक्षा त्या खेडेगावात वाढताना सुनीताला हे जास्तच जाणवलं असणार, असं मला वाटत होतं. ती म्हणाली, ``तुलनेनं बाबांनी आमच्यासाठी खूप केलं. आजोबा गेल्यामुळे खूपच लहान वयात त्यांच्यावर घराची जबाबदारी पडली. लांबची नोकरी, त्यासाठी रोजची पायपीट, शाळेतल्या कटकटी, घरी आल्यावर घरातल्या समस्या, आमची भांडणं, घर आणि जागेची सगळी व्यवस्था पाहणं, कामावर आलेल्या मजुरांना दिवसभराची कामं देणं, पहाटे डोंगरावर असलेल्या गोठ्याकडे जाऊन गुरांची व्यवस्था पाहणं, दूध काढणं, एवढे सगळे व्याप ते एकट्यानं सांभाळत होते. तरीही आमच्या अभ्यासासाठी खूप वेळ द्यायचे. त्या परिस्थितीत यापेक्षा जास्त काही करण्याची अपेक्षाच करता येणार नाही!``

याच्या आधी आमच्या बोलण्यात हा विषय कधीच आला नव्हता. सुनीतालाही अशा दृष्टिकोनातून विचार करताना आत्तापर्यंत कधी ऐकलं नव्हतं. मीसुद्धा अशा पद्धतीनं कधी विचारच केला नव्हता ह्या गोष्टींचा!

स्वतः पालक झाल्यावर किती समज येते नाही, माणसात!

Jul 14, 2015

प्रश्नांकित...!

लहानपणी गोष्टी ऐकताना किंवा वाचताना जिवावर उदार होऊन राजकन्येला आजारपणातून किंवा संकटातून वाचवणा-या एखाद्या गरीब बिचा-या तरुणाला राजा अर्धं राज्य देतो आणि राजकन्येचंही त्याच्याशी लग्न लावून देतो, याचं फार अप्रूप वाटायचं. (अप्रूपच. असूया नव्हे. कारण आपल्याला असा कुठला उदार राजा मिळणार नाही, याची शंभर टक्के खात्री असायची. आणि फक्त तेवढ्या आशेवर आपण एवढं साहस बापजन्मी करणार नाही, याची दोनशे टक्के. तर ते असो!)

माझ्या मुलांना अशाच काहीतरी गोष्टी रचून सांगताना हा लग्नाचा विषय मध्ये येणार नाही, याची काळजी मी आवर्जून घेतो. जेणेकरून माझ्या लहानपणी मला पडणारे प्रश्न त्यांना पडू नयेत. (मुलांचं मन निरागस, चौकस असतं. त्यांना प्रश्न विचारू द्यावेत, मुलं म्हणजे मातीचा गोळा छाप उपदेश श्यामची आई/बाबांनी करू नयेत.)

आज मुलाला (वय वर्षं साडेपाच) अशीच एक स्वैर रूपांतरित गोष्ट सांगत होतो. सगळ्यात शेवटी राजकन्येला वाचवल्यानंतर त्या तरुण गरीब मुलाला राजानं मोठ्ठं बक्षीस दिलं, असं सांगितलं. राजकन्येशी लग्नाचा विषय कटाक्षानं टाळला.

 ``बक्षीस म्हणजे काय दिलं?``

हा प्रश्न अचानक आला, पण अनपेक्षित नव्हता.

``म्हणजे, खूप सोन्याच्या मोहरा आणि एक मोठ्ठं घर दिलं राहायला.`` मी त्याची समजूत घालायचा प्रयत्न केला.

`` पण तो आणि त्याची आई, असं दोघंच आहेत ना? मग त्याला एवढं मोठं घर कशाला हवं?``

त्याच्या पुढच्या प्रश्नानं मी सर्द झालो...!

 

 

Jun 7, 2015

फटा पोस्टर, निकला... हिरो, हिरोइन, व्हिलन, सेकंड हिरो, सेकंड हिरोइन, ईटीसी ईटीसी...!

 

 

`दिल धडकने दो'चं पोस्टर पाहिलं आणि मळमळायला झालं.

छ्या...!

ह्याला काय पोस्टर म्हणतात? पोस्टर म्हणजे कसं हवं? सिनेमातल्या जवळपास प्रत्येक प्रसंगाचा तो छोटेखानी प्रोमोच हवा. नव्वदच्या दशकात आम्ही स्वतंत्रपणे थेट्रात जाऊन पिक्चर पाहायला लागलो. काय पोस्टर्स असायची त्या काळात....अहाहा...!!

एका हातात पिस्तुल, दुस-या हातात rocket launcher घेतलेला मिथुन, धर्मेंद्र, गोविंदा, चंकी पांडे, सनी देओल किंवा कधी कधी तर दस्तुरखुद्द बच्चन साहेब. त्याच्या कपाळावर रक्ताचा मळवट भरलेला. हातावर एखादी पट्टी. अंगात रक्ताळलेली बनियन. चेह-यावर खाऊ का गिळू छाप बद्धकोष्ठित भाव. त्याच्या सोबत अर्धी झाकलेली हिरवीण. (अर्धी झाकलेली म्हणजे, भीतीनं त्याच्या मागे अर्धी दडलेली. `तशा` अर्थानं अर्धी झाकलेली नव्हे. ती पण असायची, पण दुस-या कोप-यात.) दुस-या कोप-यात हिरोपेक्षाही संहारक शस्त्रं हातात घेऊन उभा असलेला व्हिलन किंवा व्हिलनची फौज. मल्टिस्टारर सिनेमा असेल, तर मग सगळे हिरो लायनीत आपापल्या हिरविणीबरोबर रांगेत उभे. पोस्टरच्या डाव्या वरच्या कोप-यापासून ते उजव्या वरच्या कोप-यापर्यंत फोटो फ्रेमला फुलांची माळ घातल्यासारखी छोट्या छोट्या चौकौनांमध्ये सिनेमातल्या इतर असंख्य कलाकारांची वेगवेगळ्या भावमुद्रेतली छायाचित्रं. उजव्या कोप-यात सिनेमातल्या बलात्कारासारख्या अत्यंत महत्त्वाच्या दृश्याची झलक. डाव्या कोप-यात एखाद्या होळीच्या किंवा तत्सम गाण्याची झलक. मधोमध सिनेमाचं नाव आणि त्याभोवती दोन, तीन थरांचं वलय.

त्या काळात बी ग्रेड, सी ग्रेड अशी हीन, जातिवाचक, अपमानास्पद वर्गवारीच अस्तित्त्वात नव्हती. सगळे सिनेमे एकाच जातकुळीतले वाटायचे. जे वेगळ्या वाटेनं जायचे, ते कुठल्यातरी एकांड्या थेट्रात किंवा टीव्हीवरच बघायला मिळायचे.

`जंगल क्वीन' `डाकूरानी`छाप सिनेमांची पोस्टर्स तर विशेष आकर्षक असायची. किती दूरदर्शी विचार करणारे दिग्दर्शक आणि निर्माते होते, त्या काळात...! आपल्या सिनेमाचा प्रोमो प्रेक्षकांना कुठेही पाहता येणार नाहीये, त्यामुळे पोस्टरवरच तो स्थिरचित्र रूपाने का होईना, दिसला पाहिजे, अशी त्यांची प्रामाणिक भावना असायची. के. सी. बोकाडिया, कांती शाह, मेहुलकुमार, हे अशाच सामाजिक हेतूनं प्रेरित झालेले काही महापुरुष.

सिनेमाच्या मुख्य पोस्टरशिवाय अगदी खिडकीच्या एका झडपेच्या आकाराची छोटी पोस्टरही त्या काळात आकर्षक असायची. ती बाजारात, किंवा दुस-या थिएटरवर लावली जायची. ती बघून मोठं पोस्टर बघायची उत्सुकता चाळवायची.

याशिवाय जास्त उत्सुकता असायची ती सिनेमातल्या काही दृश्यांची झलक दाखवणारी साधारण छोट्या फ्रेमच्या आकाराची पोस्टर्स. प्रेक्षक म्हणून माझी कारकिर्द रत्नागिरीत घडली. त्यावेळी तिथे तीन थिएटर्स होती. राधाकृष्ण, श्रीराम आणि लता. `राधाकृष्ण`ला साधारण नवीन (एक महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेले) सिनेमे लागायचे. `श्रीराम`ला मराठी किंवा रिपीट रन मधले आणि `लता`ला तथाकथित बी किंवा सी ग्रेड. `राधाकृष्ण`मध्ये तिथल्या आणि `श्रीराम`मधल्या सिनेमांची ही छोटी फ्रेम साइज पोस्टर्स लागायची. प्रत्येक सिनेमाची साधारण दहा ते बारा. गुरुवारी तर मेजवानी असायची. सध्या सुरू असलेल्या आणि शुक्रवारपासून लागणा-या सिनेमाची, अशी दोन्ही पोस्टर्स बघायला मिळायची. मी तर चौथीपासूनच मधल्या सुटीत वेळात वेळ काढून, ही पोस्टर्स बघायला थेटरवर धावायचो.


या पोस्टरनी सिनेमांची चटक लावली आणि सिनेमानं जगण्याची!

Apr 22, 2015

पाऊले चालती...दिंडोशीची वाट...!


नवे रस्ते शोधणं आणि त्यासाठी तंगडतोड करणं, ही खाज पहिल्यापासूनचीच. पुण्यात वास्तव्याला आल्यानंतरही पहिल्यांदा आसपासचे सगळे गल्लीबोळ पालथे घालण्याचं कर्म अगदी श्रद्धेनं पार पाडलं होतं. बोळ शोधताना वेगळ्याच `गल्ल्या` सापडल्या, तेव्हा तंतरली होती, ते वेगळंच. असो.

तर मुद्दा असा, की आता मुंबईत (अधून मधून का होईना,) राहायला लागल्यानंतर आसपासचे रस्ते शोधून काढणं हे आद्यकर्तव्य मानलं. त्यातून `सुजलायंस सगळीकडून. जरा शरीराला कष्ट देऊन चालायला जात जा,` हा धमकीवजा आदेश धर्मपत्नीकडून मिळाल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणंही क्रमप्राप्त होतं. ही हौस किती महागात पडू शकते, याचा मात्र अंदाज आला नव्हता. काल तोही आला.

गोरेगाव पश्चिम भागात आत्याकडे गेलो होतो. आमचा दिंडोशी भाग म्हणजे पूर्वेला रेल्वे स्टेशनपासून सुमारे तेवढंच अंतर. म्हणजे आत्याचं घर ते दिंडोशी अंतर सरळ रेषेत मोजलं, तर सुमारे पाच ते सहा किलोमीटर असावं. दिंडोशीपासून गोरेगाव स्टेशनपर्यंत (सुमारे अडीच कि.मी.) चालत जाण्याची हौस अनेकदा भागवली होती. काल आत्याकडून निघताना गोरेगाव स्टेशनवरून भाज्या घ्यायच्या होत्या. संसारसंसर्ग. दुसरं काय? आत्याला विचारलं, तर ती गोरेगावपेक्षा मालाडला चांगल्या मिळतील, असं म्हणाली. मी मालाड स्टेशनपर्यंत चालत जायचं ठरवलं. अंतर साधारण दीड किलोमीटर. भाज्या मनासारख्या मिळाल्या. गोरेगावहून दिंडोशी जेवढं अंतर आहे, तेवढंच मालाडहून असेल, असा आपला माझा एक स्वैर अंदाज. समोर दिसणारा रस्ता दिंडोशीच्या आधी लागणा-या पूर्व द्रुतगती मार्गालाच मिळणार, हा फाजील आत्मविश्वास. रस्त्याचं ज्ञान अगाध असतानाही चालण्याची खाज भागवण्याची ही नामी संधी होती. म्हणून चालत निघालो. पाठीला laptop, हातात भाजीची जड पिशवी होती. समोर दिसेल तो रस्ता आपलाच मानून चालत राहिलो. एकतर मुंबईचा उकाडा, पाठीला बॅग, हातात पिशवी आणि रस्ता संपता संपेना अशा अवस्थेत अंगानं घामाच्या धारा लागल्या. मिल्खासिंगनं ग्राउंडला राउंड मारून बनियन पिळपिळून मग भरला होता. मी हातातला नॅपकिन पिळत होतो. शर्टही संपूर्ण भिजून निथळत होता. (तो काढून पिळणं शक्य नव्हतं. असो.) साधारण साडेसहा वाजता मी घरातून निघालो होतो. पाऊण ते तासाभरात माझ्या घरी पोचेन, असा अंदाज होता. हायवे पर्यंत पोचायलाच दोन तास लागले. तिथूनही Oberoy mall चा चौक दृष्टिपथात नव्हता. आपण नक्की कुठे आलो आहोत, तेच कळेना झालं होतं. उजव्या बाजूनं चालत राहिलं, तर दिंडोशीला जाता येईल हे नक्की, पण किती चालायला लागेल, याचा अंदाज येत नव्हता. तरीही चालत राहिलो. रिक्षा करायचा घातक विचार एक क्षण मनाला शिवून गेला, पण भाज्यांचे पैसे वाचवण्यासाठी एवढी तंगडतोड केली आणि आता रिक्षावाल्याच्या नरड्यात तीसेक रुपये कोंबायचं जिवावर आलं होतं. बसनं जावं तरी हायवे ओलांडून जावं लागणार होतं आणि त्यासाठी कुठेच सोय दिसत नव्हती. ``इथून ओबेरायचा चौक किती लांब आहे हो साहेब...?`` असं गि-हाईक टिपायला टपलेल्या एका हवालदाराला विचारलं. ``हे इथेच. एक चौक.`` असं त्यानं उत्तर दिलं. मला तर नजरेच्या टप्प्यात कुठेच ओबेरायची इमारत दिसत नव्हती. तरीही त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहिलो. आणखी थोडं चालल्यावर ओबेरायचा चौक नाही, पण एक पादचारी पूल दिसला आणि जीवात जीव आला.

पूल ओलांडून पलीकडे गेलो, तर एक बस stop लागला. कुरार गाव. दिंडोशी अजून खूप लांब आहे, निदान या अवस्थेत चालत जाण्यासारखं नक्की नाही, हेही लक्षात आलं. मग बसनं जाण्याचा शहाणपणा करायचं ठरवलं. पहिली गर्दीची बस सोडून दिली आणि पुन्हा मूर्खपणा केला की काय, असं वाटू लागलं. आणखी दहा मिनिटं बसच आली नाही. शेवटी मला हवी ती बस आली. फार गर्दीही नव्हती. एखादा आदिमानव बघितल्यासारखं लोक वळून वळून माझ्या अवताराकडे बघत होते. घामानं निथळणारा चेहरा, ओलाचिंब शर्ट, विस्कटलेले केस. माझा जवळपास `टारझन` झाला होता. फक्त अंगात वल्कलं नव्हती, एवढंच. उघडं व्हायची इच्छा होती, पण सार्वजनिक ठिकाणचे संस्कार आड येत होते.

दिंडोशी दहा मिनिटांत आलं, पण तेवढी आणखी पायपीट केली असती, तर माझी `दिंडी` काढायची वेळ आली असती, हेही लक्षात आलं. माझी ही रामकहाणी रूम पार्टनर्सना ऐकवली. त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली. बिच्चारे. काही बोलले नाहीत.

पुण्यात असतो, तर एवढ्या द्राविडी प्राणायामानंतरही...

``हे काय? कोबी कशाला आणलास परत?``

``अरे श्रावणघेवडा आणलाय मी कालच. तुला आणू नको म्हटलं होतं.``

``शी. किती सुकलेली आहे ही कोथिंबीर!``

``अरे देवा. ही मेथी बघून नाही का घेतलीस? सगळी किडकी आहे!``

 

...यापैकी काही ना काही सुवचन कानी पडलंच असतं.!!

 

असो. असतात एकेक भोग.

 


Apr 13, 2015

शाब्बास रे `वाघा`!

वाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वाघा border ला प्रत्यक्ष जायचा योग आला नव्हता. अगदी हनीमूनच्या वेळी अमृतसरमध्ये राहून सुवर्णमंदिर वगैरे पाहिलं, पण `वाघा`वरचा भारत-पाकिस्तान सैनिकांचा `हनीमून` बघायचा हुकला होता. ती इच्छा या वेळी घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पूर्ण झाली.

साहित्य संमेलनाला जायचं प्लॅनिंग करताना मी, श्रीपाद ब्रह्मे आणि अरविंद तेलकर यांनी मुद्दामच जास्त दिवस राहायचं ठरवलं होतं. म्हणूनच संमेलनाच्या स्पेशल ट्रेनची निवड न करता आम्ही स्वतःचं ट्रेनचं वेगळं बुकिंग केलं आणि संमेलनानंतरही एक दिवस जादा राहायचं ठरवलं, त्यात वाघा आणि इतर ठिकाणी भटकंतीचा उद्देश नक्की होता. 3 ते 5 एप्रिलदरम्यान संमेलन आणि त्यानंतरचा 6 तारखेचा पूर्ण दिवस आमच्या हातात होता. अमृतसरपासून `वाघा` साधारण एक तासाच्या अंतरावर असल्यामुळे जाणं-येणं फार अवघड नव्हतं. संमेलनातच एखाद दिवशी दांडी मारून तिकडे जायचा विचार होता, पण ते काही शक्य झालं नाही. संमेलनात आम्ही रमलो होतो, म्हणूनही असेल कदाचित. शेवटी संमेलन संपल्यानंतर 6 तारखेला दुपारी `वाघा`ला जायचं निश्चित झालं.

कुठल्याही नव्या ठिकाणी जाताना आपण लोकांचे सल्ले ऐकले, तर ते आपल्याला माहिती देण्यापेक्षाही आपल्याला तिथलं सगळंच कसं माहितेय, याची फुशारकी मारण्यात धन्यता मानतात. तिथे केलेला जो शहाणपणा त्यांच्या अंगाशी आला, तो शक्यतो लपवून तुम्ही `असं करू नका अन तसं करू नका,` हे सांगण्यात त्यांना जास्त कौतुक वाटतं. त्यामुळे संमेलनाला आलेल्या आणि मधूनच एका दिवशी ताजे ताजे `वाघा`ला जाऊन आलेल्या सहका-यांचीही असेच सल्ले देण्यासाठी अहमहमिका लागली होती. `किमान दोन तास आधी जाऊन बसा आणि माणशी 120 रुपयांपेक्षा जास्त पैसे प्रवासासाठी देऊ नका,` हे त्यातले दोन सल्ले जास्त मौलिक होते. तरीही आम्ही रिक्षासाठी येणे-जाणे मिळून (तिघांसाठी) सहाशे रुपये मोजून दुपारी दीड वाजताच प्रवासाला सुरुवात केली. सहा आसनी रिक्षामध्ये आम्ही प्रत्येक दोनशे रुपये मोजल्याने मधल्या सीटवर आरामात बसलो होतो. आपला कोटा भरण्यासाठी रिक्षावाल्यानं पुढे आणि मागे आणखी चार प्रवासी (प्रत्येकी शंभर रुपयांत) घेतले होते. त्यांच्यापैकी कुणी मधल्या जागेत ऐसपैस बसलेल्या आम्हा तिघांकडे नुसतं बघितलं, तरी ``दोनशे रुपडे मोजलेत. चिंचोके नाही!`` असा अत्यंत माजुरडा लूक त्यांना द्यायचा आविर्भाव आणला होता.

अमृतसरचे कुजलेल्या कच-याच्या मंद सुवासाने बहरून गेलेले गल्लीबोळ पार करत, उघड्या गटारांच्या समुद्रांचे मंथन करत, रस्त्यावरच्या खड्ड्यांची जाणीव पटायला नको त्या ठिकाणी पटवून घेत कसेबसे आम्ही लाहोरच्या रस्त्याला लागलो आणि तासाभरात पोहोचलो. अटारी गावाची पाटी वाचल्यानंतर खरंच आपण देशाच्या सीमेवर आल्याची जाणीव झाली. सकाळीच केलेल्या खरेदीने लडबडलेल्या बॅगा आमच्याबरोबर होत्या. त्या आत नेता येणार नाहीत, फक्त पैशांचं पाकीट, ओळखपत्र, पैसे, पेन, कॅमेरा, मोबाईल, एवढ्याच गोष्टी नेता येतील, असं तिथे एका दुकानदारानं सांगितल्यावर पहिल्याच घासाला मिठाचा खडा लागल्यासारखं झालं. मग आम्ही मराठी असल्यामुळे आमच्यावर उपकार म्हणून तिथल्या एका मराठी कर्मचा-याच्या ओळखीनं त्यानं आमच्या बॅगा प्रत्येकी 50 रुपये मोजून त्याच्या कपाटरूपी खबदाडात ठेवायची तयारी दाखवली. गडबडीत खाण्याचं सामान तिथेच राहिलं. आम्ही स्वतःबरोबर न्यायला परवानगी असलेल्या वस्तू घेऊन बीएसएफच्या गुहेत शिरलो. साधारण दुपारचे अडीच वाजले होते. इथे पोचण्याच्या गडबडीत दुपारचं जेवण राहिलंच होतं. आत खायला मिळेल, अशा पाट्या असल्यानं आम्ही निश्चिंत होतो. जवानांनी रांगेत उभं केलं, तरी अनेक लोक संधी मिळेल तेव्हा घुसायचा प्रयत्न करून आपलं भारतीय रक्त सिद्ध करत होते. रांगेत आणि उन्हात फार काळ ताटकळत राहावं लागलं नाही. सुमारे पाऊण तास पुढे पुढे सरकल्यानंतर जवानांनी दोन ठिकाणी कसून तपासणी करून आत सोडलं. शेवटची तपासणी पूर्ण झाल्यानंतर मात्र सगळे रांगा सोडून आत गॅलरीत बसण्याची चांगली जागा पटकावण्यासाठी धावत सुटले. सुदैवानं आम्हाला चांगली जागा मिळाली. दुपारी तीनच्या त्या रणरणत्या उन्हात उघड्या गॅलरीत आम्हाला बसायचं होतं. बीटिंग रिट्रीट समारंभ संध्याकाळी साडेपाचला सुरू होणार होता. अडीच तास तसंच बसून राहणं हे एक दिव्यच होतं. तरीही आसपासच्या गर्दीच्या मारामा-या, भांडणं आणि भारत-पाकिस्तान सीमेशिवाय आसपासची `प्रेक्षणीय स्थळं` पाहण्यात दोन तास कमी त्रासाचे गेले. मधल्या काळात आसपास पाऊलही टाकता येणार नाही, एवढी गर्दी झाली होती. त्यातल्या अनेकांना तुडवत एकेक जण जाऊन खाऊन आणि `मोकळे होऊन`ही आलो.

डाव्या बाजूला पाकिस्तानची सीमा आणि त्यांचा प्रांत दिसत होता. काही पावलं चालून गेलं, तर आपण चक्क पाकिस्तानात पोहोचू, ही भावना वेगळीच होती. अर्थात, मध्ये सीमाभिंतीची आणि द्वेषाची कुंपणं होतीच. पलीकडे पाकिस्तानच्या बाजूच्या गॅलरीत फक्त महिलाच दिसत होत्या. इथल्या पुरुषांना हा समारंभ बघण्यात इंटरेस्ट नाही की काय, असं वाटत असतानाच काही वेळानं लक्षात आलं, की तिथे पुरुष आणि महिलांची गॅलरी वेगळी आहे. अगदी समोरासमोर. एकसारखी माती, एकसारखी झाडं, एकसारखी माणसं, तरीही देश दोन, असा विचार करत असतानाच दोन संस्कृतींमधला आणि प्रशासकीय मानसिकतेमधला हा मोठा फरकही बोचणारा होता.

आता इकडची आमची गॅलरी तुडुंब भरून गेली होती. सोमवार होता, तरी एवढी गर्दी, तर शनिवार-रविवारी काय होत असेल, या कल्पनेनंच अंगावर काटा आला. मुलांना घेऊन आलो नाही, ते बरंच झालं, असा विचारही मनात आला. `नामदेव महाराज की जय` अशा टोप्या घालून आलेल्या काही भक्तांनी मध्येच सर्वसामान्य प्रेक्षकांच्या गॅलरीच्या कठड्यांवरून उडी मारून व्हीआयपी गॅलरीत प्रवेश करून आपली देशभक्ती आणखी ठळक केली.

आमच्या गॅलरीसमोर एक रुंद रस्ता होता. त्याच्या एका बाजूला भारताचं मुख्य प्रवेशद्वार आणि डावीकडे पाकिस्तानचं गेट होतं. मध्येच दिल्ली-लाहोर ऐतिहासिक बसही त्याच रस्त्यानं पुढे गेली. सगळ्या प्रवाशांना भारतीय गेटच्या अलीकडे उतरवलं गेलं. बसची तपासणी झाली. सगळे प्रवासी सामान घेऊन ट्रालीवरून ढकलत त्याच रस्त्यावरून पाकिस्तानच्या गेटच्या दिशेने गेले. तिकडे जाऊन पुन्हा तपासणी आणि नंतर ती बस लाहोरच्या दिशेनं रवाना होणार होती. काही वेळानं पाकिस्तानातून आलेले काही प्रवासी अशाच पद्धतीनं भारताच्य हद्दीत आले. हा एक मजेशीर सोहळा होता. नंतर एका ट्रकमधून काही मालही अशाच पद्धतीनं भारतातून पाकिस्तानात गेला.

संध्याकाळी पाच वाजता समोरच्या बीएसएफच्या आफिसमधून एक तरुण लष्करी अधिकारी दोन ध्वज घेऊन बाहेर आला. तोपर्यंत मधल्या काही जवानांनी काही महिलांना रस्त्याच्या मधोमध रांग करून उभं केलं होतं. ते कशासाठी, असा विचार करत असतानाच ह्या बाबानं दोघींच्या हातात ते ध्वज दिले आणि समोर सीमेपर्यंत धावत जायला सांगितलं. भारताच्या सीमेवर आपल्याला सगळ्यांच्या समोर ध्वज घेऊन धावायला मिळतंय, हा आनंद प्रत्येकीच्या चेह-यावरून ओसंडून वाहत होता. चार-पाच आज्याही तिथे आल्या होत्या. त्या ध्वज घेऊन धावल्या, तर बीटिंग रिट्रीटच्या ऐवजी त्यांना अखेरची सलामी देण्याचा सोहळा इथे घडवावा लागेल, अशी भीती त्या अधिका-याला वाटली असावी. त्यानं त्या दोघींना ध्वज दिले नाहीत. तरीही नंतर भांडून भांडून त्यांनी ते मिळवलेच. आणि कसंबसं लुटुलुटू त्या धावल्या. त्यांच्या उत्साहाची कमाल वाटली.

याच्यानंतरचा सोहळा अनपेक्षित आणि धक्कादायकही होता. आधीपासूनच काही देशभक्तीपर हिंदी गाणी स्पीकरवर वाजत होती. आता त्यांचा आवाज वाढला आणि काही महिलांना मध्ये रस्त्यावर नाचायला बोलावण्यात आलं. त्यानंतर bollywood च्या गाण्यांच्या ठेक्यावर पंधरा वीस मिनिटं महिलांचा `देशभक्तिपर` नृत्याचा अनुपम सोहळा पाहताना डोळे दिपून गेले. श्रीपादनं या सगळ्या वातावरणाचं `patriotic tourism` असं बारसं करून टाकलं, तेही अगदी सार्थ होतं.

प्रत्यक्ष बीटिंग रिट्रीट सोहळ्याचं एवढं कौतुक ऐकलं होतं, पण तो काही खास वाटला नाही. दोन्ही देशांच्या सैनिकांनी उगाच उसनं अवसान आणून लाथा झाडत एकमेकांच्या गेटपर्यंत समोरासमोर यायचं, एकमेकांना उगाचच नाटकी आवेश दाखवायचा, `आम्ही तुम्हाला जुमानत नाही`छाप हावभाव करायचे, असा सगळा नाटकी प्रकार सुरू होता. शेवटी गेटवरचे दोन्ही देशांचे ध्वज उतरवून आणि दाणकन दार आपटून ह्या `नाटका`चा समारोप झाला.

गॅलरीतलं वातावरण देशभक्तीने भारून गेलं होतं. लष्करी अधिका-यानं आधीच सूचना दिल्यामुळे कुणी पाकिस्तानचा थेट उद्धार करत नव्हतं, एवढंच. पण प्रत्येकाच्या मनात देशभक्ती संचारली होती.

...सोहळा संपवून परत येताना गॅलरीत बसल्या जागी आपापल्या पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचरा टाकून त्या हजारो देशभक्तांनी आपली देशभक्तीची पातळी सिद्धही केली.

......

`वाघा` सीमेवर जाऊ इच्छिणा-यांसाठी....

- अमृतसरपासून खाजगी वाहनाने जाण्यास सुमारे एक तासाचे अंतर.
- रोज संध्याकाळी 5.30 ते 6 या वेळेत हा सोहळा होतो.
- चांगली जागा मिळण्यासाठी किमान दोन किंवा तीन तास आधी पोहोचणे महत्त्वाचे.
- कमीत कमी सामान न्या. बॅगा आपापल्या गाडीतच ठेवा.
- आत पाणी, काही स्नॅक्स मिळण्याची सोय आहे.
- उन्हाचा त्रास टाळण्यासाठी टोपी, goggle अत्यावश्यक.
- सैन्यदलात कुठेतरी वशिला लावून VIP एन्ट्री मिळवल्यास अधिक उत्तम.
- देशभक्ती सिद्ध करण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध असतील, तर या सोहळ्यासाठी नाही गेलात, तरी चालेल. काही बिघडत नाही!
-

Mar 25, 2015

विक्रमादित्यांचा हट्ट!


वर्ल्ड कप स्पर्धेत रोज नवनव्या विक्रमांची नोंद होत आहे. काही विक्रम तर कल्पनेच्याही पलिकडचे आहेत. त्यांची नोंद कशी ठेवली जाते, याचंच आश्चर्य वाटतं.
उदाहरणार्थ, आपल्या देशात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज, अमक्या मैदानावर तमक्या विशिष्ट स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज, सातव्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी करणारी जोडी, वगैरे वगैरे.

तरीही काही विक्रमांची नोंद राहिली आहे, असे वाटते. ते खालीलप्रमाणेः

- बायकोशी भांडण झालेलं असतानाही मैदानावर जास्त वेळ टिकून राहणारा फलंदाज.
- गर्लफ्रेंडने तिच्या आयुष्यातून हाकलून दिल्यानंतरसुद्धा विरुद्ध संघाच्या खेळाडूंशी सर्वाधिक वेळ सौजन्याने वागणारा गोलंदाज.
- विरुद्ध संघाच्या खेळाडूंना सर्वाधिक कालावधीसाठी आणि वैविध्यपूर्ण शिव्या देणारा खेळाडू.
- आपल्या संघाच्या खेळाडूंना सर्वाधिक कालावधीसाठी आणि वैविध्यपूर्ण शिव्या देणारा खेळाडू.
- कुणाचाही उल्लेख न करता तोंडातल्या तोंडात सर्वाधिक कालावधीसाठी आणि वैविध्यपूर्ण शिव्या देणारा खेळाडू.
- आपल्या सहकारी फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाचकवून धावचित करणारा फलंदाज.
- `मी घेतो,` `मी घेतो,` असं करून समोरच्याला थांबवून, स्वतः आयत्या वेळी सर्वाधिक झेल सोडणारा क्षेत्ररक्षक.
- पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या सध्याच्या गर्लफ्रेंडला सर्वाधिक वेळा बॅट उंचावून दाखवणारा फलंदाज.
- पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या माजी गर्लफ्रेंडला सर्वाधिक वेळा बॅट उंचावून दाखवणारा फलंदाज.
- पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या भावी गर्लफ्रेंडला सर्वाधिक वेळा बॅट उंचावून दाखवणारा फलंदाज.

याशिवाय
- सर्वाधिक वेळा चेंडू कुरतडणारा
- चेंडू घासून कपडे सर्वाधिक लालेलाल करणारा
- उगाचच साईड स्क्रीन वगैरे हटवायला सांगून दोन-चार धावा करून बाद होणारा
- रात्री सर्वाधिक काळ पार्टी करूनही दुस-या दिवशी त्याचा हॅंग ओव्हर दिसू न देणारा

अशाही काही विक्रमांची नोंद करता येईल.
कृपया आयसीसीने दखल घ्यावी.

Jan 3, 2015

`प्रभात`ची संध्याकाळ...


1997 ला पुण्यात आल्यानंतर सगळ्यात आधी कुठलं काम केलं असेल, तर ते जवळची सगळी थिएटर्स शोधून काढायचं. मोठं झाल्यावर पैसे मिळवायला लागल्यावर सगळ्या थिएटर्सचे सगळे सिनेमे बघायचे, हे माझं लहानपणीचं स्वप्न होतं. पुण्यात आल्यावर options जास्त असल्यामुळे ते अंशतः का होईना, साकार करण्याची संधी प्रथमच मिळत होती. भाऊ महाराज बोळात म्हणजे अगदी मध्यवस्तीत राहत असल्यामुळे जवळची `विजय, अलका, लक्ष्मीनारायण, नीलायम, रतन, श्रीनाथ`पासून ते `भारत, अपोलो, अल्पना, वेस्ट एन्ड, व्हिक्टरी`पर्यंतची सगळी थिएटर्स आणि शोधून काढली. सगळ्यात जवळचं आणि सोयीचं होतं ते अप्पा बळवंत चौकातलं `प्रभात`.

तीस ते चाळीस रुपयांत तिकीट आणि अगदी चालत जाण्यासारखं असल्यामुळे `प्रभात`वर जास्त जीव जडला. `सकाळ`मध्ये कामाला लागल्यापासून तर हापिसात गाडी लावायची, दुपारी 12 किंवा 3 चा सिनेमा बघायचा आणि संध्याकाळी किंवा दुपारी ड्यूटीवर जायचं, हा शिरस्ता बनला. अनेकदा 3 ते 9.30 ची ड्यूटी करून रात्री 9.30 चा शेवटचा शो बघून घरी जायचे उद्योगही अगदी 2012 साली नोकरी सोडेपर्यंत करत राहिलो.

परीक्षणांसाठी बघितलेले (किंवा सहन केलेले) अनेक मराठी चित्रपट इथलेच. भरपूर उकाडा, इकडून तिकडे जाणा-या प्रेक्षकांमुळे होणारा त्रास, चिरका आवाज, हे सगळं सहन करत इथे अनेक चित्रपटांचा आनंद घेतला, तो फक्त सिनेमावरच्या निस्सीम भक्तीमुळे. अनेकदा शो हाऊसफुल्ल असल्यामुळे घरीसुद्धा परत आलो, पण कधी भिडे काकांना फोन करून तिकीट ठेवायला सांगावंसं वाटलं नाही. कारण उद्या पुन्हा येऊ, थिएटर आपलंच आहे, जातंय कुठे, ही भावना.

या महिन्यात प्रभात कायमचं बंद होणार, ही बातमी वाचली होती, पण नेहमीच्या विसरभोळेपणामुळे आणि बेफिकिरीमुळे ती नेमकी तारीख विसरून गेलो. `हॅपी जर्नी' बघायचा राहिला होता आणि `प्रभात`ला तो दोन शो मध्ये होता, तरीही आठवडाभर पुण्यात असूनही त्याला जाणं जमलं नाही. गुरुवारी, 25 तारखेला संध्याकाळी सातच्या दरम्यान अचानक आठवलं, की आज `प्रभात'चा शेवटचा दिवस. `हॅपी जर्नी` चुकला, पण निदान शेवटचा शो बघण्याचं भाग्य तरी पदरात घेऊ, असा विचार करून, धावपळ करून रात्री थिएटरवर पोचलो. 50 रुपयांचं सर्वोच्च दराचं (stall चं) तिकीट काढलं. 9.20 झाले होते आणि सिनेमा 9लाच सुरू झाला होता. पाच मिनिटांचा सिनेमा बुडला, तरी थिएटरवरून परत जायचं, हा अनेक वर्षांचा शिरस्ताही बाजूला ठेवला आणि थिएटरात शिरलो. `लव्ह फॅक्टर`नावाचा भीषण सिनेमा बघण्याचे `भोग' नशीबात होते. पण याआधी असे अनेक भोग स्वखुशीने उरावर घेतलेले असल्यामुळे आज काही विशेष वाटलं नाही. त्यातून `प्रभात'मधला (कदाचित) शेवटचा शो बघितल्याचं सुख सोबतीला होतं, ते वेगळंच.

शेवटचा शो संपेपर्यंत `प्रभात'चे व्यवस्थापक भिडे काका, संचालक विवेक दामले आणि इतरही सगळे जण आवर्जून थांबले होते. जेमतेम पन्नास साठ प्रेक्षक होते, सिनेमलाा शिव्या घालून बाहेर पडल्यानंतरही प्रेक्षक अतिशय आनंदाने त्या सगळ्यांबरोबर फोटो काढत होते. `प्रभात`च्या परंपरेला साजेशा पुणेरी पाट्याही थिएटरबाहेर लावण्यात आल्या होत्या. खरंच एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मिळालं.

पुन्हा कधी `प्रभात'समयो पातला, तर आम्ही पिटात हजर असूच!!