Aug 19, 2013

बिनकांद्याचा श्रावण


""निनाद कुठाय? आत्ताच्या आत्ता त्याला इथे यायला सांग!'' बाहेरून आल्या आल्या श्री. किरकिरेंनी खास "वडीलकी'चा स्वर लावला होता.
""बाबा, तो सोसायटीत खेळायला गेलाय. काय झालंय?'' कु. नं विचारलं.
""तो येऊ दे. मग मला तुमच्याशी एकत्रच बोलायचंय! जा, त्याला हाक मार.''
एवढं बोलून श्री. हातपाय धुवायला गेले. एव्हाना आरडाओरडा ऐकून सौ.सुद्धा फोडणीचा गॅस बंद करून बाहेर आल्या होत्या. कु.ची आणि त्यांची खुणवाखुणवी झाली.
""आई, नक्की काय झालंय? बाबा चिडलेत कशानं एवढे?''
""सांगते नंतर.''
""अगं, सांग ना. आमच्यावर रेशन निघायच्या आधी त्याचं कारण तर कळू देत.''
""बोकडाच्या मानेवर सुरी फिरवायच्या आधी त्याला सांगतात का, की बाबा गेल्यावेळी तू एकदा मला ढुशी दिली होतीस, म्हणून तुला कापतोय...?'' सौं.चा युक्तिवाद पटण्यासारखा होता.
""अगं आई, पण...'' कु. काहीतरी बोलणार, एवढ्यात श्री. फ्रेश होऊन हॉलमध्ये आले. त्यामुळे कु.नं तिचे पुढचे शब्द गिळले.
""आला का निनाद?''
""नाही अजून. बोलावते.'' कु. पटकन हाक मारण्यासाठी बाहेर पळाली.
""अहो, जरा शांत राहा. मुलं लहान आहेत, त्यांना जास्त ओरडू नका.''
""काही लहान नाहीयेत. तू त्यांना डोक्‍यावर बसवून ठेवलंयंस.''
""मी? बरं!'' वाद घालण्यात काही अर्थ नाही, हे सौं.च्या लक्षात आलं. (कधी वाद घालायचा आणि कधी वाद घालण्यासाठी एनर्जी राखून ठेवायची, हे बायकांना बरोबर कळतं.)
काही क्षण असेच तणावाचे गेले आणि चि. आणि कु. दारात हजर झाले. घरात स्फोटक परिस्थिती आहे, हे कु.नं चि.ला आधीच सांगितेललं होतं. महायुद्धाचा भडका उडणार होता, पण त्यामागचं तात्कालिक कारण कुणाला कळत नव्हतं.
""आलात का? या!'' श्री.ंच्या आवाजावरूनच चि.चा धीर आणखी खचला.
""काल कुठे गेला होतास?''
""काल...?''
""हो. कालच! कोर्टात साक्षीला उभा राहिल्यासारखा चेहरा करू नकोस. दोन वर्षांपूर्वीच्या घटनेबद्दल विचारत नाहीये तुला. कालचंच विचारतोय!'' चि.चं आज काही खरं नव्हतं.
"" कानतोडेंकडे गेलो होतो...भुर्जी तोडायला...आपलं...भुर्जी खायला.''
""हेच...हेच...हीच शिस्त नाहीये तुम्हाला. महिना कुठला चालू आहे आत्ता?'' श्री. जाम भडकले होते.
""ऑगस्ट!'' कु. नं आता कुणीही न विचारता उत्तर दिलं.
""मराठी महिना कुठला चालू आहे, ते विचारतोय.''
""अं...बहुतेक चैत्र असावा.'' कु.च्या निरागस प्रश्‍नाने श्रीं.चा पारा आणखी चढला.
""श्रावण महिना चालू आहे! तुम्हाला काही आहे का त्याचं?''
""आईशपथ, खरंच हो. लक्षातच नव्हतं माझ्या. श्रावणात एकदा सत्यनारायणाची पूजा घालायची म्हणत होते मी. बरी आठवण केलीत.'' सौं.च्या या विधानाने श्री. आणखी भडकले.
""बाहेर लोक माझी खेटरानं पूजा बांधतायंत आणि तुला सत्यनारायणाची पूजा सुचतेय?'' श्रीं.च्या पट्ट्यातून आज कुणीच सुटणार नव्हतं.
""नक्की काय झालंय, सांगाल का? काल संध्याकाळपासून तुम्ही असे निष्कारण चिडचीड करताय.'' सौ.नी पुन्हा मुलांची बाजू घेतली.
""चातुर्मास चालू आहे आणि भुर्जी पाव खायचं सुचतंय तुम्हाला? तू त्यांच्याकडे जाऊन भुर्जी खाल्लीस, म्हणजे उद्या आपल्याला त्यांच्यासाठी भुर्जी करावी लागेल. मग काय करणार? किरकिरेंच्या सात पिढ्यांमध्ये कुणी श्रावणात कांदा आणि मांसाहार केलेला नाही, माहितेय का? उद्या लोकांनी विचारल्यावर काय उत्तर देऊ मी?''
""बाबा, पण परवाच आईनं घरी भुर्जी केली होती, ती आपण सगळ्यांनीच खाल्ली!'' कु.ला राहवत नव्हतं.
""हो का...? ती चुकून खाल्ली असतील. पण यापुढे कडक श्रावण पाळायचा. कांदाबिंदा सगळं बंद!''
""आणि नॉनव्हेज?''
""तेसुद्धा बंद!''
""चला, मी सकाळीच ताजी मासळी आणलेली पाटीलकाकूंना देऊन टाकते.'' सौ.नी केलेल्या या विधानामुळे श्रीं.ची थोडी चलबिचल झाली, पण तसं न दाखवता ते तडक आत निघून गेले.
आता चि. आणि कु. ने सौ.ना एका कोपऱ्यात घेतलं.
""बाबा एवढे का बिथरलेत?'' दोघांनीही एकदमच विचारलं.
""काय सांगू मुलांनो तुम्हाला? माझीच चूक आहे!'' सौं.नी असं सांगितल्यावर दोघांनीही कान टवकारले.
""काय झालं?''
""अरे, काल चुकून त्यांना बाजारातून भाजी आणायला सांगितलं होतं. यादीत एक किलो कांद्याचाही उल्लेख होता. कांदे घेऊन आले आणि जे बिनसलंय, ते आत्तापर्यंत. प्रत्येक गोष्टीचा हिशोब करत बसलेत! चातुर्मास आणि कांदा-लसूण न खाणं वगैरे सगळ्या संकल्पांचा जन्म त्यातूनच झालाय!!'' सौं.नी खुलासा केला.

सलमानभाऊ, "लई भारी'!


दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या "लई भारी' या आगामी चित्रपटातून सलमान खान मराठीत पदार्पण करणार आहे. सलमानच्या कुठल्याही चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही दोनशे कोटींचा गल्ला जमवेल आणि सलमानला चित्रपटात घेण्यासाठी मराठी निर्मात्यांच्या रांगा लागतील, अशी शक्‍यता आहे. सलमानच्याच अनेक हिट हिंदी चित्रपटांवरून मराठीत रिमेक करता येऊ शकतो. काही उदाहरणं ः


-ं पहिलं लफडं (मैंने प्यार किया)
-लव्हरनं मारली टांग! (सनम बेवफा)
-किरण्या-अज्या (करण अर्जुन)
-घ्या मुका ः पार्ट 2 (खामोशी)
-व्यक्ती तितक्‍या प्रकृती (अंदाज अपना अपना)
-लफडी करणाऱ्या सगळ्यांसाठी (हर दिल जो प्यार करेगा)
-तुझा-माझा काय संबंध? (हम आपके है कौन)
-जुळ्याचं दुखणं (जुडवा)
-सख्या सजणा (साजन)
-उशिरा झोपून उठणारा (सूर्यवंशी)
-आईशपथ, अशी बायको पाहिजे यार! (बीवी नं. 1)
-हरवला आहे! (वॉंटेड)
-टग्या (दबंग)
-तुमच्यासाठी काय पण! (रेडी)
-आणखी एक टग्या (दबंग-2)
-अंगाला हात लावायचं काम नाही! (बॉडीगार्ड)
-एक होता वाघोबा (एक था टायगर)
-
-आणि
-आगामी ः
-
-लाथ मारीन तिथं पाणी काढीन! (किक)

कांद्याअभावी वांदा टाळण्यासाठी...



कांद्याच्या भावांनी सध्या (कांदा न चिरताही) अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. पुढचे काही दिवस सहजासहजी कांदादर्शन घडण्याची चिन्हं नाहीत. कांदा हा जीवनातला आणि जेवणातला अविभाज्य भाग आहे. श्रावणातही कांदा खाण्याची इच्छा मारता येत नाही. त्यामुळे या काही कांदाविरहित पाककृती ः

बिनकांद्याची भजी ः
साहित्य ः कांदा, बेसन पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, पाणी, पातेलं, गॅस, कढई, तेल आणि (मानवी) हात.
कृती ः आधी अख्खा कांदा उभा बारीक चिरून घ्यावा. तुकडे वेगवेगळे करण्याऐवजी कांदा खालच्या किंवा वरच्या बाजूने एकसंध ठेवावा. (फळविक्रेते शोभेसाठी डाळिंब कापून, फुलवून ठेवतात, तसा.) त्यात मीठ, थोडी हळद आणि लाल तिखट घालून तो भिजवून ठेवावा. त्याला पाणी सुटल्यानंतर त्यात बेसन पीठ मिसळावे. हातांनी हे मिश्रण नीट कालवून घ्यावे. थोडा वेळ हे मिश्रण तसेच राहू द्यावे. त्यानंतर अख्खा कांदा तसाच उचलून घ्यावा. त्यावर पाणी ओतून कांद्याच्या फोडींमध्ये अडकलेले सगळे पीठ व्यवस्थित धुवून घ्यावे आणि कांदा नीट बाजूला काढून ठेवावा. आता कांद्यातून बाजूला केलेले पीठ आणि आधीचे पिठाचे मिश्रण एकत्र करून, गरम तेलात त्याची छोटी भजी करून तळावीत. बाजूला काढून ठेवलेला कांदा तसाच फ्रीझमध्ये ठेवून, पुढच्या भज्यांच्या वेळी अशाच प्रकारे वापरावा.
टीप ः पाहुणे आले असल्यास ही भजी शक्‍यतो गार करून वाढावीत. जेणेकरून ते कमी खातील.
....
कांदा-बटाटा रस्सा
साहित्य ः कांदा आणि बेसनपीठ सोडून वरीलप्रमाणेच. फक्त शेंगदाण्याचे कूट किंवा ओले खोबरे अतिरिक्त.
कृतीः कढईत चवीप्रमाणे मसाल्याचे पदार्थ, मसाला, लसूण, जिरे, असे पदार्थ छान खरपूस परतून घ्यावेत. हे मिश्रण (कढई सोडून!) मिक्‍सरमधून काढावे. पुन्हा कढईत तेल घेऊन फोडणी करावी आणि त्यात हे मिश्रण घालावे. दरम्यानच्या काळात नवऱ्याला बटाटे धुवून कांद्याप्रमाणे बारीक चिरून घ्यायला सांगावेत. पेपर वाचण्याचा, फेसबुक, व्हॉटस्‌ ऍप बघण्याचा, मॉर्निंग वॉकचा वेळ वाया गेल्याची कुरकुर त्याने केल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कांद्याप्रमाणे बारीक चिरलेला हा बटाटा फोडणीत घालावा. नंतर पुन्हा नव्याने वेगळे बटाटे धुवून, त्याचे थोडे मोठे काप करावेत आणि ते फोडणीत घालावेत. चवीप्रमाणे (आणि घरातल्यांवर किती राग काढायचा आहे, त्याप्रमाणे) मीठ व तिखट घालावे. गरमागरम कांदाविरहित कांदा-बटाटा रस्सा तयार!
....
मिसळ, पावभाजी.
साहित्य ः नेहमीचेच.
पावभाजी आणि मिसळ,या दोन्ही पदार्थांना वरून घातलेल्या कांद्याशिवाय चव नाही. त्यामुळे या दोन्ही पाककृतींमध्ये कांदा पूर्णपणे टाळता येणार नाही. फक्त वाचवता येईल. त्याची कृती पुढीलप्रमाणे ः
लहानात लहान कांदा बारीक चिरून घ्यावा. तो एका ताटलीत पसरून ठेवावा. त्यावर बारीक छिद्रांची जाळी कायमस्वरूपी चिकटवून टाकावी. मिसळ किंवा पावभाजी घरातल्या मंडळींना डिशमध्ये वाढल्यानंतर ही कांद्याची ताटली त्यांच्या नाकासमोरून फिरवावी. बारीक छिद्रांच्या जाळीमुळे कांद्याचा वास त्यांच्या नाकापर्यंत जाईल आणि कांदा खाल्ल्याचा फील येऊ शकेल. जाळी निघणार नाही किंवा कुणाला काढता येणार नाही, याची काळजी घ्यावी. ही ताटली फ्रीझमध्ये ठेवून महिनाभर सहज वापरता येईल.
....
रामबाण उपाय ः
बिनकांद्याचे हे पदार्थ खाऊन थोड्या दिवसांनी कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी कर्ज काढून कांदे विकत आणण्याचा पर्याय स्वीकारण्याऐवजी पुढील उपाय करावा ः
""अरे देवा! ह्यांना चक्कर आली! अहो काकू, दोन कांदे द्या पटकन!'' असं म्हणून शेजाऱ्यांच्या घरी विद्युतवेगाने धावत जावे. प्रचंड घाबरेघुबरे झाल्याचा अभिनय करावा. (प्राइम टाइममधली कोणतीही मालिका पाहिल्यास हा अभिनय फारसा अवघड जाणार नाही.) शेजारच्या काकूंनी शेजारधर्माला जागून (यदाकदाचित) कांद्याची परडी पुढे धरल्यास "असू देत अडीनडीला' असं म्हणून चार-पाच कांदे पटकन उचलून घराच्या दिशेने पोबारा करावा.

Jun 14, 2013

प्रिय तार आजी...

प्रिय तार आजी, 

शि. सा. न. वि. वि. 
म्हणजे, शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष. 
(एक वेळ "एलबीटी' म्हणजे काय, ते माहीत असेल. पण, "शि. सा. न. वि. वि.'चा फुलफॉर्म माहीत नसण्याची शक्‍यता जास्त! म्हणून हा खुलासा.) 

जपानमधल्या 116 वर्षांच्या जगातल्या सर्वांत वयोवृद्ध आजोबांच्या निधनाची आणि तुझ्याही "अवतारसमाप्ती'ची बातमी एकाच दिवशी यावी, हा एक कटू योगायोग. 

त्या आजोबांच्या निधनाची बातमी वाचून "हो का?' यापलीकडं काहीच प्रतिक्रिया मनात उमटली नाही. पण, तुझ्याबद्दलची बातमी वाचून मात्र खरंच हळवा झालो. 160 वर्षांच्या आयुष्यात तू काय काय पाहिलं नाहीस? प्रामुख्यानं इतरांच्या निधनाच्या बातम्या पोचवण्याचंच काम तू केलंस. पोस्टमन अवेळी दारात आले, की जवळच्या नात्यातलं कुणीतरी गेलं, असंच मानलं जायचं. इतरवेळी देवदूतासारख्या वाटणाऱ्या याच पोस्टमनची चातकासारखी वाट पाहिली जायची. पण, या वेळी मात्र तो "यमदूत' ठरून घरी येऊच नये, असं वाटायचं. थरथरत्या हातांनी तुला स्वीकारलं जायचं आणि धडधडत्या काळजानं एकेक अक्षर वाचलं जायचं...

"...क्रिटिकल. स्टार्ट इमिजिएटली,' असं वाक्‍य असलं, की तारेमध्ये उल्लेख असलेल्या माणसाला आता पुन्हा काही डोळे भरून पाहता येणार नाही, असं तार वाचणारा समजून जायचा. "क्रिटिकल' ही फक्त समोरच्या माणसाला बसणारा धक्का काहीअंशी सुसह्य व्हावा, यासाठी तूच आजीच्या मायेनं केलेली सोय असायची. 

अर्थात, दर वेळी तू दुःखाच्या बातम्या पोचवायचीस, असंच काही नाही. अनेकदा तुझ्या मुलाबाळांना नोकरीत बढती मिळाल्याच्या, बदली झाल्याच्या, नातवंडांना परीक्षेत चांगले मार्क मिळाल्याच्या आनंदाच्या बातम्याही अगदी उत्साहानं सांगायचीस. निकाल लागल्यानंतर सुमारे आठ-पंधरा दिवसांनी येणाऱ्या पत्राची वाट बघत राहण्यापेक्षा तुझ्यामार्फत आलेली ही शुभवार्ता खूपच गोड वाटायची. अगदी थोडक्‍यात, कमी ओळीत असली, तरी! नंतर येणाऱ्या पत्रात सविस्तर वर्णन वाचायची उत्सुकता आणखी टिकून राहायची. 

तुझ्या नातवंडं-पतवंडांच्या जन्माच्या बातम्या तर किती उत्साहानं दिल्या असशील गं तू! त्या बाळाच्या आई-वडिलांना आणि नातेवाइकांना झालेल्या आनंदाच्या कितीतरी पटीनं तुला उचंबळून आलं असेल! मनातल्या मनात त्या बाळांना जोजवून त्यांचं नावही ठरवून टाकलं असशील तू. फक्त तुला ते सांगता आलं नसेल. निधनाच्या बातम्या पोचवण्यासाठी तुझ्या जिवावर आलं असेल. मात्र, अशा आनंदाच्या बातम्या कधी एकदा योग्य व्यक्तीपर्यंत पोचवून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहते, असं तुला झालं असेल! 

अगदी अचानक ठरलेली लग्नं, मुंजी, बारशी, डोहाळजेवणं ("डोहाळे' हा आयत्यावेळी ठरलेला कार्यक्रम नसला, तरी त्यानिमित्तचा समारंभ मात्र आयत्यावेळीच ठरतो!) वैयक्तिक आणि लग्नाच्या वाढदिवसांचे समारंभ, यांच्या निमंत्रणांसाठीही कधी कधी तुला मध्यस्थ केलं जायचं. अशी निमंत्रणं तर तू डोक्‍यावर पदर घेऊन, तारेच्या कागदावर अक्षता, हळद-कुंकू ठेवूनच दिली असशील! खात्री आहे मला. 

आयत्या वेळी रद्द झालेल्या किंवा ठरलेल्या नातेवाइकांकडच्या दौऱ्याच्या वेळी तर निरोप पोचवण्यासाठी तुझाच आधार असायचा. गाडीवर परस्पर पाठवून दिलेलं पार्सल किंवा एखादा छोटा मुलगा-मुलगी त्याच्या नातेवाइकांपर्यंत सुरक्षित पोचतील, अशी खात्री पाठवणाऱ्यांना असायची, ती फक्त तुझ्या भरवशावर. नंतर "ट्रंक-कॉल' आले आणि त्यांनी तुझा भार थोडा हलका केला. हळूहळू "एसटीडी' नावानं आलेल्या त्यांच्या भाईबंदांनीही हातपाय पसरायला सुरवात केली आणि तू नकळत बाजूला पडू लागलीस. मोबाइल नावाच्या तरुण परदेशी पाहुण्याचं आगमन झालं आणि तू पार अडगळीत पडलीस. आजीच्या मायेनं तू पोचवलेले निरोप, पाऊस-वाऱ्याची पर्वा न करता दाखवलेली तत्परता, वेळेला धावून जाऊन आधीच्या पिढीतल्या असंख्य लोकांच्या चेहऱ्यावर फुलवलेलं समाधान, सगळं विसरलं गेलं. 

आता अवतारकार्य संपल्यानंतर तुला "संग्रहालय' नावाच्या वृद्धाश्रमात तरी पाठवलं जावं, असं मनापासून वाटतं. जेणेकरून पुढच्या पिढीतल्या मुलांना, नातवंडांना सांगता येईल, अशी होती आमची प्रेमळ, लोभस "तार आजी!' 

कळावे, 
तुझा लाडका नातू

Aug 28, 2012

एक तरी `वारी` अनुभवावी!

पहिल्यापहिल्याने आपण आयुष्यात जे करतो, ते कायम लक्षात राहतं आणि मनात घरही करून राहत असतं. तो पहिला अनुभव एकदम सुपर असेल, तर मग विचारायलाच नको. ड्यूक्स नोजच्या बाबतीतही माझं असंच झालंय.
मी पहिला ड्यूक्स नोज केला तो झेप संस्थेबरोबर. त्या वेळी मी भाऊ महाराज बोळात Cot Basis  वर राहत होतो. तिथल्या दोन मित्रांना घेऊन ट्रेकला गेलो होतो. त्याआधी बहुधा रोहिडा किल्ला पाहिला होता. ड्यूक्स नोज ही ख-या अर्थानं ट्रेकर्सची पंढरी. फार दमछाक करणारी वाट नाही, धोकादायक रस्ता नाही, तरीही ट्रेकिंगची मजा देणारा असा हा धमाल अनुभव. जाताना वाटेत लागणारा धबधबा, त्यात यथेच्छ धिंगाणा घालण्याची सोय, असा सगळा मस्तीचा मामला. झेप बरोबर पहिल्यांदा गेलो, तेव्हा फक्त निसर्ग आणि ट्रेकिंगशिवाय दुसरा कुठला आनंद घेता आला नव्हता. काही ट्रेकिंग क्लब त्यांच्यासोबत येणा-या ट्रेकर्सना धबधब्यात घेऊन जात नाहीत.
एका ट्रेकमध्ये अजित रानडे या गिरीप्रेमी मित्राची अशीच कुठेतरी द-याखो-यांत ओळख झाली. अजितमुळेच गिरीदर्शन ट्रेकिंग क्लबबरोबर ट्रेकिंग करू लागलो. तेव्हापासून (साधारण 1999) ड्यूक्स नोजची दरवर्षीची वारी ठरूनच गेलेली. जाताना सिंहगड एक्स्प्रेसनं खंडाळ्याला उतरायचं, तिथून ड्यूक्स नोजकडे कूच करायची, वाटेत धबधब्यात मस्ती करायची आणि मग दोन तीन चढणी आणि तेवढेच Rock Patch पार करून ड्यूक्स नोजच्या शिखरावर पोचायचं. येताना डोंगरावरच्या निसरड्या वाटेवरून धावत, घसरत उतरायचं हीसुदधा आणखी एक धमाल.
ड्यूक्स नोजची चटक लागल्यापासून कुणा ना कुणा नव्या माणसाला दरवर्षी सोबत नेलं. ट्रेकिंगची फार आवड नसलेल्या माणसालासुद्धा मनापासून आवडणारं वातावरण असल्यानं पाय दुखण्यापलीकडे त्याची फारशी तक्रार येत नाही. मुख्य म्हणजे पाऊस आणि धुकं अशा वातावरणात ट्रेक केल्यानं फारसं दमायला होत नाही आणि पाण्यावाचून हालही होत नाहीत. त्यामुळे दरवर्षी कुणा ना कुणाला मी नव्यानं ट्रेकर बनवलं. काही मित्र, मैत्रिणी, नंतर पत्नी हर्षदा आणि आता गेल्या वर्षीपासून मुलगी मनस्वीही सोबत येऊ लागली. गेल्या वर्षी अपेक्षा नसताना तिनं खूप छान सहकार्य केलं आणि अजित रानडेच्या Wanderers सारखा अगदी कुटुंबवत्सल ग्रुप मिळाल्यामुळं तिला ते फारसं जडही गेलं नाही.
यंदा अजित परदेशात असल्यामुळं माझी दरवर्षीची ड्यूक्स नोजची वारी चुकणार असं वाटत होतं. गिरीदर्शनच्या ट्रेकच्या वेळी मनापासून जायची इच्छा नव्हती, म्हणून ते राहून गेलं. पण अजितनं ड्यूक्स नोजचा ट्रेक ठरवल्यानंतर मी मनस्वीला सहज म्हटलं आणि तीसुद्धा उड्या मारायला लागली. खरंतर पुढच्या वर्षी पुन्हा ड्यूक्स नोजला जायचं, असं तिनं गेल्या वर्षीच ठरवून टाकलं होतं. पण तो निश्चय अजूनही कायम असल्याचं पाहून मलाच आश्चर्य वाटलं. ट्रेकला जायचं ठरलं, तरी पूर्वतयारीच्या बाबतीत नेहमीची धावपळ कायम होती. आदल्या दिवशी रात्री तिच्यासाठी बूट घेतले. ते सुदैवानं तिच्या मापाचे निघाले. आमच्या अडचणी एवढ्यातच संपणा-या नव्हत्या. स्विमिंग करताना आदल्या दिवशीच तिच्या पायाला काहीतरी लागलं. छोटीशी जखमही झाली होती. ट्रेकच्या दिवशी सकाळी ती थोडीशी कुरकुरत होती. तिची झोपही झाली नव्हती आणि पायही दुखत होता. मग तिला न्यायचा हट्ट नको, असं ठरवलं. ती जाऊन झोपलीसुद्धा. तिच्यासाठी केलेले पराठे, चिरीमिरी खाणं, बूट, कपडे, एवढी तयारी फुकट जायला नको, असं वाटत होतं. तिच्या पायाची जखमही फार मोठी नव्हती. मग हर्षदानं तिला पुन्हा पटवलं. ती पुन्हा उठून ट्रेकसाठी तयार झाली, तेव्हा 5.35 झाले होते. सकाळी 6.10 ची सिंहगड एक्स्प्रेस आम्हाला शिवाजीनगर स्टेशनला गाठायची होती. अक्षरशः दहा मिनिटांत आवरून बाहेर पडलो.
खंडाळ्याला पोचलो, तर जोरदार पाऊस सुरू झाला होता. पुण्यात पावसाची काहीच लक्षणं नसल्यानं रेनकोटही आणायचं लक्षात आलं नव्हतं. मनस्वीला दिवसभर भिजून त्रास झाला असता. मग ट्रेकिंग ग्रुपमधल्या तेजलनं तिचा जर्किन मनस्वीला दिला. त्याचा खूपच फायदा झाला. नेहमीप्रमाणे धबधब्यात धमाल केली, सगळ्या चढणी पार पडल्या. शेवटच्या Rock Patch पाशी मात्र मनस्वी गळाठली. तिला अचानक उंचीची भीती वाटून रडायला यायला लागलं. खरंतर घाबरायला व्हावं, असं या ट्रेकमध्ये काहीच नाही. पण तिच्या मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू असावेत. गेल्या वर्षी तर तिनं हाच ट्रेक मोठ्या उत्साहात केला होता. यंदा झोप आणि पायाच्या जखमेचं निमित्त झालं होतं. शेवटी कसंबसं तिला तिथून वरपर्यंत नेलं.
येताना मात्र तिला पुन्हा मूड आला होता. एकटीनं सगळा डोंगर उतरली. दोनतीनदा घसरली, परत सावरली. यंदाचा ट्रेक एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणा-या गिरीप्रेमी संस्थेच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेतले अनुभव आणि आव्हानांबद्दल संस्थेच्या काही गिर्यारोहकांनी उदबोधक आणि थरारक माहिती सांगितली. मनस्वीला नाट्यछटेसाठी फर्माईश होतीच. तिला कधी एकदा ती सादर करतेय, असं झालं होतं. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तिनं टाळ्या मिळवल्या. त्याबद्दल cHOCOLATES चा गठ्ठाही तिला मिळाला.
ड्यूक्स नोजबरोबरच इतरही अऩेक आनंददायी ट्रेक आहेत. आता त्यांची वाट पाहतोय. पुढच्या ट्रेकमध्ये सादर करायला मनस्वीसाठी आणखी एखादी नाट्यछटा लिहायला हवी!!