Oct 29, 2007

चित्तथरारक!


घटना इवलीशी, पण कधीकधी आपल्या अंगाशी येते.
डोकं सैरभैर होतं, काही काळ मस्तकात तिडीक जाते आणि नंतर सगळं अस्तित्त्वच बधीर होऊन जातं.

घाबरू नका.

मानवी स्वभावाच्या पैलूंच्या मनोवैज्ञानिक विश्‍लेषणाचा व्यासंगी आढावा वगैरे घेणार नाहीये मी!
एक किरकोळ विषय केवढा गंभीर आणि तापदायक बनू शकतो, याचा अनुभव सांगणार आहे, फक्त.

"ब्लॅक अँड व्हाईट' नावाचा जुन्या अजरामर (ही द्विरुक्ती झाली. जुनी म्हणजे अजरामरच!) हिंदी गीतांचा एक कार्यक्रम रविवारी रात्री कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार होता. त्याची चार तिकीटं (प्रत्येकी दीडशे रुपये) खपवण्यासाठी मी उरावर घेतली होती. दोन तिकिटं स्वतःसाठी आणि दोन कुणाला तरी विकण्यासाठी, असा बेत होता. ड्युटीमुळे मला जायला जमणारच नव्हतं, पण घरच्या कुणाला तरी देता येतील, हा कयास होता.

आधी विकतची तिकीटं खपवण्याचा प्रयत्न केला. तसं साधं दोन रुपयाचं लकी ड्रॉच तिकीटही कधी खपवता आलं नाही आपल्याला! उगाच तीनशे रुपयांची तिकीटं खपवायला निघालो होतो. जवळपास पंधरा-वीस जणांनी काही ना काही कारणं सांगितली. मग ती परत देऊन टाकायचा निर्णय घेतला. कमी वेळात ती परत नाट्यगृहापर्यंत पोचवण्यासाठीही बरीच यातायात करावी लागली.

आता उरला प्रश्‍न माझ्या स्वतःच्या दोन तिकीटांचा. ती कुणी विकत घेणार तर नव्हतंच, पण फुकट तरी कुणी जातंय का, हे पाहण्याचा प्रयत्न केला. जवळपास पन्नासेक जणांना विचारून पाहिलं. एवढा चांगला जुन्या हिंदी गाण्यांचा दृक्‌श्राव्य कार्यक्रम. लंडन-दुबई वगैरे दौरा करून आलेला. स्वतः पैसे मोजून मला बघायला मिळत नाहीये, याची चुकचूक (खूप वाईट शब्द आहे ना!) होतीच. पण त्यातूनही, फुकट तिकीटं मिळूनसुद्धा जाण्याचं कुणाच्या भाग्यात नाहीये, याची खंत जास्त वाटली.

नगरच्या एका मित्राला पुण्यातले त्याचे सोर्सेस शोधायला लावण्यापासून कुठले कुठले नंबर शोधून त्यांना कळविण्यापर्यंत बरेच उद्योग केले. बऱ्याच जणांनी नेहमीप्रमाणे एसएमेसला उत्तर देण्याचेही कष्ट घेतले नाहीत. आपल्याला कुणी सोबत नाही, म्हणून जायला मिळत नसल्याबद्दल हळहळणारी एकच मैत्रीण भेटली फक्त.

हां...माझी एक अट होती. संगीताच्या बाबतीत औरंगजेब असलेल्या कुणाही फडतूस माणसाला मला ती तिकीटं द्यायची नव्हती. फक्त फुकटात मिळाल्यावर कुठेही जाण्याची तयारी असलेल्या उपटसुंभालाही द्यायची नव्हती. त्यापेक्षा ती फुकट गेलेली मला चालली असती. नेहमी स्वतःच्या पैशानं आणि कष्ट घेऊन, तडजोडी करून असे वेगळे कार्यक्रम बघणाऱ्या एखाद्यालाच ती देण्याची इच्छा होती.

सुमारे पन्नासेक जणांना विचारून झाल्यावर ऑफिसात एका सहकाऱ्याकडे त्याच्या दोन मित्रांना ती तिकीटं दिली. निदान, ती फुकट न गेल्याचं समाधान तरी मिळालं!असो. या सगळ्या धांदलीमुळे की काय कोण जाणे, आज आवाज पार बसलाय!अजिबात बोलता येत नाहीये.जवळचे म्हणतात, बरं आहे. मी तोंड उघडलं, की तिरकस किंवा कुजकटच बोलतो. त्यामुळे संपर्कातल्या लोकांची मजा आहे. पण बघून घेईन त्यांना माझा कंठ फुटल्यावर!

बाय द वे,

काल "सारखं छातीत दुखतंय' पाहिलं.
बेफाट आहे.
अशोक सराफ, निवेदिता, संजय मोने, विनय येडेकर आणि राजन भिसे अशी भन्नाट टीम आहे.
विनय येडेकरनं धुमाकूळ घातलाय आणि अशोक सराफ तर कहर! अगदी साध्या साध्या प्रसंगांत आणि संवादांत हा माणूस "बाप' असल्याचं सिद्ध करतो.आपल्याला काहितरी होतंय आणि आपण लवकरच मरणार, असं त्याला वाटत असतं. त्या भयगंडातून हे सगळं नाटक घडतं.खूपच धमाल आहे.भाई ताईशेट्टे त्याचं नाव. तो बायकोला सांगतो, ""माझ्यानंतर क्रियाकर्म वगैरे करू नका. पेपरात जाहिराती देऊन त्याखाली कविताबिविता करू नका. "ताईशेट्टे' या नावाला जुळणारं यमक सध्या तरी मराठीत नाहीये!''विनय येडेकर आणि अशोक सराफ दोघं भन्नाटच आहेत. राजन भिसेही बेफाट.
मजा आली.
"मनोमिलन' माझं बघायचं राहिलं. आता त्याचे पुण्यात प्रयोग होत नाहीत.
तसंच, मच्छिंद्र कांबळींचं "भैया हातपाय पसरी'देखील राहिलं.
शरद तळवलकरांना अखेरच्या काळात रंगमंचावर पाहायचं असंच राहून गेलं. त्याबद्दल आता आयुष्यभर चुकचुकायला लागणार.

असो. इट्‌स लाईफ!

पण "सारखं छातीत दुखतंय' अवश्‍य बघा.

you will enjoy!!!!

2 comments:

स्नेहल said...

hi... to junya ganyancha karyakram kasa zaala?
saarakhamn chhaateet - mala baghyach aahe. 'kadachit' pan baghayachaa aahe. baghu sagal kadhee ani kas jamatay!

अभिजित पेंढारकर said...

thanks snehal,
for always being the first to comment on my blog!
lage raho!