Apr 14, 2008

वाचू कीर्तनाचे रंगी...

पुण्यात सिंहगड पायथ्याजवळ रेव्ह पार्टीची नशा जगजाहीर झाली, त्या वेळी केलेलं हे लिखाण आहे. रेव्ह पार्टीनंतर सांस्कृतिक डोस पाजण्याचं पीकच आलं होतं. "पेशव्यांची परंपरा असलेल्या पुण्याचं काय झालं हो!' असा टाहो फोडला जात होता. विश्‍वास नांगरे पाटीलही सगळीकडे याच विषयावर बोलत होते. त्याचंच हे प्रहसन.
---------
बालगंधर्व (रंग) मंदिरात बुवांचं कीर्तन ऐन रंगात आलंय. समोर उपस्थित सदाशिव पेठी, नारायण पेठी, शनिवार पेठी, तबला-पेटी आणि समस्त सुसुसुसुसुसुसुसु-संस्कृत, सुसुसुसुसुसुसुसु-जाण आणि सुसुसुसुसुसुसुसु-शिक्षित मंडळी आणि पत्रकार-पत्रकारिणी धुंद ("मद्य' नव्हे) होऊन डोलताहेत...काही भावविव्हल आणि भक्तिवेल्हाळ श्रोते तर पार "समाधी अवस्थे'त गेलेत...(काही नतद्रष्ट यालाच सुखाची झोप असं म्हणतात...असो. अशा कपाळकरंट्यांना काय कळणार अशा अध्यात्मिक गोष्टी...(पुन्हा) असो.)

महाराजांच्या जिभेवर जणू सरस्वतीच भांगडा करतेय...आणि वाणीतून तर मध, साखर भसाभसा सांडतेय...(पवित्र, टापटीप "देऊळ' असूनही त्यामुळंच माशाही घोंघावताहेत...)जाहला संस्कारांत खंड । म्हणूनच "रेव्ह पार्ट्या' उदंड ।।"विश्‍वास' म्हणे असे हे "गुंड' । ठेचावेत करूनी "जेरबंद' ।।तर मंडळी, माऊलींनी काय सांगून ठेवलंय...या जगात अज्ञान आणि अंधकाराचं उदंड पीक आलंय...अधर्म आणि असंस्कार माजलाय...अशा परिस्थितीत एकच उपाय...पालकांनो, मुलांना भरपूर प्रेम द्या...नाहीतर आमच्याकडे पाठवा...आम्ही त्यांना कोठडीत त्यांच्यावर "प्रेमवर्षाव' करू...!!अनंतकोटी "रेव्हबाज'निर्दालक, सगुणतारक, दुर्गुणहारक संतशिरोमणी विश्‍वासराव नांगरे पाटील महाराज की जय...!!!!! (एकच जयघोष...)महामहोपाध्याय, संताधिसंत, शास्त्रज्ञाधिशास्त्रज्ञ ("देवाधिदेव'च्या सुरात) विजयराव भटकर महाराज की जय...!! (मंदिरा'तील मागच्या उजव्या कोपऱ्यातील गटाकडून आरोळी) संतशिरोमणी, महान संस्कृतीरक्षक श्री श्री श्री (किमान तीनदा आवश्‍यक. दोनदा चालेल. पण फक्त एकदा "श्री' खपवून घेणार नाही) बबनराव पाचपुते महाराज की जय! (हा "देशा'वरचा आवाज)

एवढा सगळा गदारोळ आणि घोषणांचा चित्कार यथासांग पार पडल्यानंतर नांगरे-पाटील महाराज पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाला (खरं तर तथाकथित उच्चभ्रूंच्या बेगडी अब्रूरूपी लंगोटीलाच) हात घालतात.मंडळी, ""आजची तरुण पिढी बहकण्यामागचं आणि रेव्ह पार्ट्यांसारख्या वाईट मार्गाला लागण्यामागचं कारण एकच आहे....आईवडिलांचं होणारं दुर्लक्ष आणि संस्कारांचा अभाव...!''""आज आईवडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही...सगळे पैशांच्या मागे लागलेत...त्यामुळेच हा दुराचार समाजात माजलाय. अशा पार्ट्यांत नाचणारी, अमली पदार्थांच्या आहारी जाणारी तरुण पिढी पाहताना आमचं हृदय हेलावतं...त्यांच्या (फक्त मुलांच्या) अंगावर हात टाकताना मनाला किती यातना होतात...पण इलाज नसतो..."पोलिसी खाक्‍या'नंच ठोक्‍यायला...आपलं..."ठोकायला' लागतं...किती वेदना होत असतील...मारणाऱ्यांना...! पण इलाज नाही ! आजच्या तरुण पिढीला योग्य जागेवर आणायचं असेल, तर त्यांना त्यांच्या "योग्य जागी' लाथा घालायलाच हव्यात...नाही का?''बोला...अनंतकोटी "रेव्हबाज'निर्दालक विश्‍वासराव नांगरे पाटील महाराज की जय !! ...पुन्हा एकमुखी गजर.त्यापाठोपाठ संताधिसंत, शास्त्रज्ञाधिशास्त्रज्ञ भटकर महाराज आणि संतशिरोमणी पाचपुते महाराज यांच्याही अनुयायांकडून (की समर्थकांकडून?) त्यांच्या नावांचा अनुक्रमे गजर.

नांगरे-पाटील महाराजांच्या कीर्तनात पुन्हा एकदा समाजातील अव्यवस्था, सगळीकडे माजलेला भ्रष्टाचार, संस्कृतीचा ऱ्हास, वाढता चंगळवाद, यांची ओघवत्या आणि मधाळ वाणीत उजळणी होते. (मधासाठी आलेल्या माशा आता सगळीकडे घोंघावून श्रोत्यांना "नको तिथे' चावू लागल्या आहेत.) (मध्येच कुणीतरी सदाशिव पेठी पुणेकर "पोलिस खात्यात भ्रष्टाचार नाही काय?' असा भोचक प्रश्‍न आपलं तोंड कुणाला दिसणार नाही, अशा बेतानं विचारतात. त्यामुळं महाराजांची गैरसोय होते, पण ते तिच्याकडे (आणि त्याच्याकडे) सोयीस्कर दुर्लक्ष करतात.)

संदीप खर्डेकर बुवांना बुक्का लावायला उठतात. त्यांच्या कपाळावर आधीच नाकापासून केसांपर्यंत शेंदूर असल्याने त्यांच्या बुक्का कुठे लावायचा, असा प्रश्‍न बुवांना पडतो. प्रत्येकाच्या कपाळाला बुक्का लावून कीर्तनाची सांगता होते.

(टीप ः - नांगरे-पाटील बुवा सध्या (बदली होईपर्यंत) शाल-श्रीफळ आणि सव्वाअकरा रुपये या दराने पुणे जिल्ह्यात कुठेही "बहकलेली तरुणाई' या विषयावरील कीर्तनासाठी उपलब्ध आहेत.)

------

No comments: