Nov 23, 2008

श्रद्धा आणि सबुरी

विधानसभा निवडणुकीचे नगारे जोरजोरात वाजू लागले होते. जागावाटप यशस्वीरीत्या पूर्ण झालं होतं. मतभेद मिटविण्यातही विलासरावांची कृष्णशिष्टाई यशस्वी ठरली होती. विलासरावांची तर या दिवसांत फारच धावपळ झाली होती. सकाळचा नाश्‍ता मुंबईत, दुपारचं जेवण दिल्लीत, संध्याकाळचा चहा मंत्रालयात, तर रात्रीचं जेवण कुणा समर्थकाच्या घरी, अशी गडबड सुरू होती. कॉंग्रेसची बहुतांश ठिकाणची प्रचाराची तयारी पूर्ण झाली होती. फक्त उमेदवार ठरायचे बाकी होते!
"कार्यावर आधारितच उमेदवारी' हा निकष असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, अगदी अर्धा तास बाकी असतानाही कॉंग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर झाली नव्हती। कोणाचं कार्य जास्त उजवं, यावर मुंबईत, दिल्लीत, खल सुरू होता। अखेर मुदत संपायला वीस मिनिटे बाकी असताना दिल्लीहून यादीचा फॅक्‍स विलासरावांच्या बंगल्यावर येऊन थडकला।विलासरावांनी उत्सुकतेनं यादीवर नजर फिरवली, पण त्यांनी "कार्यसम्राट' म्हणून ज्यांच्या नावांशी शिफारस केली होती, त्यांची नावं यादीत शोधूनही सापडेनात। अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी नावं मिळाली, तसे विलासराव अस्वस्थ झाले। त्यांनी अँटनींशी चर्चा करून यादीबद्दलची आपली स्पष्ट मतं नोंदवली. `बघतो,' असं आश्‍वासन देऊन अँटनींनी फोन ठेवला.
दिल्लीच्या फॅक्‍सचं दुसरं पान यायचं राहिलंय का, अशी चौकशी करण्यास विलासरावांनी पीएला सांगितलं। मग पीएची लगबग सुरू झाली। काही क्षण असेच अस्वस्थतेत गेले आणि अचानक, "साहेब, आणखी काहीतरी येतंय दिल्लीहून!' असं ओरडतच पीए आला. विलासरावांनी घड्याळात पाहिलं, "अवघी 17 मिनिटं!''कॉंग्रेसमध्ये गुणांची, कार्याची किती कदर केली जाते, अशा भावनेचं एक प्रसन्न, विजयी हास्य त्यांच्या चेहऱ्यावर झळकलं. दिल्लीचा फॅक्‍सटोन सुरू झाला. दुसऱ्या, सुधारित यादीची सर्वांनाच उत्सुकता होती. पण यादी येण्याऐवजी कुणाचं तरी चित्र फॅक्‍सवर उमटत असल्याचं पाहायला मिळालं. विलासरावांनी फॅक्‍स काढून हातात धरला, तर ते साईबाबांचं चित्र होतं. खाली मोठ्या अक्षरात अक्षरं होती -"श्रद्धा आणि सबुरी.'
...
कॉंग्रेसचा प्रचार अगदी धूमधडाक्‍यात झाला। पक्षांतर्गत विरोधकांचीही डाळ फारशी शिजली नाही। कॉंग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचं कार्य घरोघरी पोचविण्यासाठी जिवाचं रान केलं. कॉंग्रेस आघाडीनं दहा वर्षांत महाराष्ट्रात केल्या अफाट, देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर आघाडीला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाली.सत्ता पुन्हा मिळाली, तरी राज्याचं नेतृत्व कोण करणार, हा प्रश्‍न काही सुटला नव्हता. दिल्लीच्या वाऱ्या करूनही काही निर्णय जाहीर होत नव्हता. राज्यात जवळपास आठ वर्षं आपलं नेतृत्व असल्यामुळेच कॉंग्रेसला पुन्हा विजय मिळाल्याचं विलासरावांना मनातून वाटत होतं, पण पक्षानं त्यावर शिक्कामोर्तब करावं, अशी त्यांची इच्छा होती.एवढ्यात काही राणे-समर्थक कार्यकर्ते भेटायला आल्याची वर्दी पीएनं त्यांना दिली. मनातलं वादळ बाजूला सारून प्रसन्न चेहऱ्यानं विलासराव त्यांना भेटायला गेले. नमस्कार-चमत्कार झाले, क्षेमकुशल विचारून झाले. कार्यकर्त्यांनी विलासरावांच्या नेतृत्वाचं आणि कर्तृत्वाचं कौतुक केलं. राणेसाहेबांनी त्यांच्यासाठी पाठविलेली भेट विलासरावांकडे सुपूर्द केली. विलासरावांनी कौतुकानं उलगडून पाहिलं, तर साईबाबांचा भलामोठा फोटो होता. त्याखाली "श्रद्धा आणि सबुरी' असं भल्यामोठ्या अक्षरात लिहिलं होतं.
...
अचानक विलासरावांची तंद्री भंग पावली. समोरच सोफ्यावर पडलेल्या वर्तमानपत्रांमध्ये शिर्डीतल्या कॉंग्रेस प्रचाराच्या कार्यक्रमाचे फोटो आणि बातमीकडे त्यांचं लक्ष गेलं. "श्रद्धा आणि सबुरी' या साईबाबांच्या तत्त्वांवर आपला विश्‍वास असल्याने कोणतेही "प्रहार' झेलायला आपण तयार असल्याची त्यांची प्रतिक्रिया वर्तमानपत्रांनी जरा जास्तच ठळक छापली होती. विलासरावांनी पीएला हाक मारली. "हे वक्तव्य केवळ धार्मिक भावनेशी संबंधित होतं, त्याचा विपर्यास करून पत्रकारांनी राजकीय अर्थ काढला,' अशा स्वरूपाचा खुलासा सर्व प्रसारमाध्यमांना पाठवून देण्याचे आदेश त्यांनी पीएला दिले!
--------
संदर्भ :
शिर्डीची बातमी (२१।११।०८)
श्रद्धा आणि सबुरीपुढे "प्रहार' निष्प्रभमुख्यमंत्रिपदी चार वर्षे राहिल्याबद्दल सर्वच वक्‍त्यांनी विलासरावांचे अभिनंदन केले। त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी साईबाबांचा भक्त आहे। श्रद्धा आणि सबुरी ही त्यांची शिकवण मी अंगिकारली। नेतृत्वावर श्रद्धा ठेवणे आणि सबुरीने काम करणे, हेच माझ्या मुख्यमंत्रिपदी चार वर्षे राहण्याचे गमक आहे। नेतृत्वावर तुमची श्रद्धा असेल तर मग कितीही "प्रहार' होवोत ते निष्प्रभच ठरतात, असा शेरा त्यांनी आपल्या विरोधकांना पक्षांतर्गत हाणला.
----





No comments: