Mar 11, 2009

समज-गैरसमज

"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' असं म्हटलं जातं. (म्हणजे काय, कुणास ठाऊक!) लहानपण हा आयुष्यातला सगळ्यात मोलाचा, महत्त्वाचा टप्पा असतो, एवढंच त्यातून घेण्यासारखं. अर्थात, हे कळतं लहानपण सरल्यावर आणि जास्त अक्कल आल्यावरच. लहानपणात मात्र आपणच हुशार, असं वाटत असतं. त्या वयात मनात काही संकल्पना, व्याख्या, तत्त्वं घट्ट बसलेली असतात. मोठ्ठं झाल्यानंतरही त्या प्रतिमांचं, संकल्पनांचं भूत मानगुटीवरून उतरायला बराच वेळ द्यावा लागतो.माझ्याही लहानपणी अशा अनेक कल्पना, गृहीतकं मनात घट्ट बसली होती. आपल्याकडे लहान मुलाला कुठल्याही गोष्टीविषयी असलेलं नैसर्गिक कुतूहल, उत्सुकता याविषयी समजावून सांगण्याऐवजी आणखी काहीतरी गूढ, अकल्पित सांगण्याची प्रथा आहे. किंवा आमच्या पिढीच्या लहानपणात तरी होती. साधी-सोपी आणि मुलांना समजू शकेल अशी गोष्टही निष्कारण अवघड करून सांगायची आणि त्या मुलाच्या मनाचा गोंधळ वाढवून ठेवायचा. मुंजीत दंडात बेडकी भरण्याचा बागुलबुवा हा यातला आदीम प्रकार. मुंजीच्या वेळी त्या लहानग्याचं वय असतं जेमतेम आठ ते दहा वर्षं. मुंजीतल्या या "अघोरी' प्रथेविषयी त्याच्या मनात भयगंडच निर्माण होईल, याची पुरेपूर खात्री मामे, काके, आई-वडील या गैरसमजाची भलावण करून सांगण्यातून करायचे. मलाही या बेडकी प्रकाराने मुंज होईपर्यंत धडकी भरली होती. शेवटी मुंजीचा दिवस संपता संपता, असलं काही नसतं, हे कळलं होतं. पण दंडात "बेडकी' येणं, म्हणजे शरीर वाढीला लागण्याचं लक्षण, शरीरात बदल घडण्याचं, तारुण्याकडे वाटचाल करण्याचं लक्षण, हे सरळ-साधं सत्य कुणी सांगण्याची तसदी घेतली नाही.
काही गैरसमज असे वडीलधाऱ्यांच्या सांगण्यातून होतात, तर काही नकळत मनात रुजत असतात. त्याविषयी कुतूहलानं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न न केल्यानं, किंवा कुणी स्वतःहून न सांगितल्यानं ते मनात पक्के होत जातात. लहानपणी महाभारतातल्या गोष्टी ऐकताना "चक्रव्यूह' प्रकरणाचं मला भारी आकर्षण आणि गूढ वाटायचं. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला, म्हणजे काय, तेच जाम कळायचं नाही! सैन्याची गोलाकार रचना, म्हणजे एखाद्या गुहेसारखी किंवा गणपतीत देखावे तयार करतात, तशी कुठेतरी अज्ञात ठिकाणी अशी सैनिकांची गोलाकार (गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना धुडकावून!) रचना केली असावी की काय, अशीच शंका यायची मला. मीही ती निरसन करून घेण्याचा प्रयत्न बरीच वर्षं केला नव्हता. साध्या जमिनीवर सैन्याला विशिष्ट रीतीनं उभी करण्याची रचना म्हणजे चक्रव्यूह, हे (मोठेपणी) समजल्यावर "एवढीही अक्कल नव्हती आपल्याला,' असं वाटून गेलं.
राजकीय तत्त्वं आणि समजाबद्दलची तर बातच वेगळी! कॉलेजात असेपर्यंतही बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी म्हणजे आपली दैवतं होती. आणि कॉंग्रेसचे तमाम पुढारी म्हणजे जवळपास राक्षस वाटायचे. ठाकरे-पवार हे मित्र आहेत आणि एकमेकांना भेटतात-बिटतात असं सांगणाऱ्या एका मित्राविषयी त्या क्षणी "तूच का तो ब्रूटस' असंच वाटलं होतं. कारण मनताल्या कोणत्याही संकल्पना, गृहीतकं यापेक्षा वेगळं काही या समाजात असू शकतं, हे लहानपणी कुणी कधी मनावर बिंबवलंच नव्हतं. एकाच विषयाला अनेक पैलू असतात, व्यक्तिमत्त्वाला अनेक रंग असू शकतात, हे समजण्याची पात्रताच नव्हती.
आता माझ्या चार वर्षांच्या लेकीलाही मी अतिउत्साहानं पोस्ट ऑफिस म्हणजे काय, तिथलं काम कसं चालतं, झाडं कशी वाढतात वगैरे गोष्टी शिकवायला जातो (आणि ती मला फाट्यावर मारून खेळायला निघून जाते,) तेव्हा मला माझ्या लहानपणाच्या या आठवणी कुठेतरी मनात असतात. आपल्या मुलीनं आपल्याइतकं तरी बावळट राहू नये, अशी माफक अपेक्षा असते.
तुमच्याही असतील ना अशाच काही आठवणी? जुन्या काळची, जुनाट गृहीतकं, भोळ्या कल्पना? सांगाल??

No comments: