Jun 22, 2010

`भात-राशी'च्या राशीला!

भातराशी हे काही ट्रेकला जाण्यासाठी आकर्षण वाटावं असं नाव नाही, हे कबूल. पण दरवेळी आपल्याला आवडीच्या आणि नेहमीच्या ठिकाणीच जावं, असं काही नाही ना...कधी कधी नवे प्रयोगही करून बघावेत, या उद्देशानं गेल्या रविवारी ट्रेकला जायचं निश्चित केलं.

आमचा मित्र अजित रानडे याच्या wanderers क्लबने ट्रेक आयोजित केला होता. रविवार होता आणि मीही बऱ्याच दिवसांत कुठे ट्रेक केला नव्हता. सगळं जुळून आलं होतं....

सकाळी सहाच्या आधीच शिवाजीनगर स्थानकावर पोचलो. साडेसहाच्या लोकलनं निघायचं होतं. जाताना अजिबात गर्दी मिळाली नाही. त्यामुळे प्रवास छान झाला. पाऊस पडण्याविषयी जरा शंकाच होती. वाटेतही कुठे पावसाची लक्षणं दिसत नव्हती. नाही म्हणायला डोंगरांच्या टोकांवर ढगांचे पुंजके जमलेले काही ठिकाणी दिसत होते, पण मनाचे मोर थुईथुई नाचावेत, असं वातावरण नव्हतं.

तासाभरात कामशेतला पोचलो. तिथून जीपने महागाव या ठिकाणी जायचं होतं. तिथल्या घटेश्वर मंदिरात पहिला थांबा होता. काही मंडळी मागे राहिली होती. त्यांची व्यवस्था करून आम्ही जीपने घटेश्वर मंदिरात पोचलो. तिथे चहाचा आस्वाद घेतला. पुण्यातून आणलेली इडलीही हादडली. अजितनं तिथे कसले कसले व्यायाम पण घेतले. त्याचे नेतृत्वगुण हल्ली फारच फुलून आलेत, हेही लक्षात आलं. इंग्रजीतूनही तो सफाईदार (की बेमालूम) मार्गदर्शन करत होता.

पोटपूजा झाल्यानंतर आम्ही साडेनऊच्या सुमारास भातराशी टेकडीकडे मोर्चा वळविला. जाताना पावसाचं टिपूस नव्हतं. अधूनमधून तर ऊन येत होतं आणि घामाघूम व्हायला होत होतं. दोन चार छोट्या टेकड्या आणि डोंगररांगा पार करून आम्ही एका विस्तीर्ण पठारावर पोचलो. दुपारचे बारा वाजले होते. तरी तिथे हवा आल्हाददायक होती. हवा स्वच्छ असल्यानं लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना असे किल्ले आणि चक्क ड्यूक्स नोजचं टोकही दिसत होतं. महिनाभरानं तिथे जायचंच आहे, पण त्याआधीच तिथलं दर्शन घडलं.

पठारावर मस्त आराम केला. गार वा-याच्या झुळका सुखावत होत्या. कुणाच्या तरी पाय लचकला होता. सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मग भातराशीची टेकडी चढायला सुरुवात केली. अगदी छोटंसंच टेकाड होतं ते. वर चढायला सुरुवात करतानाच पावसाचे हलके शिंतोडे उडाले. वर पोचेपर्यंत पाऊस नक्की येणार, असं वाटत होतं, पण पुन्हा त्याच्या लहरीपणाबद्दल मनात संशयाचं धुकं दाटत होतं.

वर चढायला सोपंच होतं. काही नवख्या माणसांना आधार द्यावा लागला. वर पोचलो, तर अधिक आल्हाददायक आणि गार हवा होती. खालून दरीतून कुणीतरी फुंकर मारावी, तसे धुक्याचे ढग वर आले. काही काळ तेही मनाला सुखावून गेले. पुन्हा एकदा पावसानं शिंतोडे उडवून वाकुल्या दाखवल्या. पण प्रत्यक्षात तो वरुणराजा मात्र मेहेरबान होत नव्हता.

तिथे टेकाडावरच डबे खाल्ले. गावातून दोन वाटाडे आमच्यासोबत आले होते. एक मोठा बाप्या आणि दोन लहानगे. त्यांनाही आमचे डबे खायला दिले. सगळ्यांचे डबे चाखून आणि संपवून झाल्यानंतर उतरायला सुरुवात केली.

उतरणीची वाट जरा आणखी अवघड होती. दोन-तीन डोंगररांगा तर भन्नाट होत्या. तिथून तोल सावरत घसरताना मजा आली. तसेच आम्ही उतरून बेडसे लेण्यांपाशी आलो. लेणी बघायला जाताना खालून वर जाण्याऐवजी वरून खाली येण्याचा हा अनुभव अनोखा होता.

लेणी ठीकठाक होती. निदान कार्ल्याच्या लेण्यांपेक्षा स्वच्छ, नेटकी वाटली. तिथून उतरायला ढीगभर पाय-या होत्या. खाली पुन्हा गावापर्यंत चालत जातानाचा रस्ता मात्र थोडासा कंटाळवाणा झाला. मुख्य रस्त्यावर आमच्यासाठी जीप वाट बघत उभ्या होत्या. तिथून कामशेतला आलो आणि साडेपाचची लोकल निघून गेल्यानं एक तास तिथेच वाट पाहत उभं राहावं लागलं. त्या काळात छान गप्पा आणि टाइमपास झाला. येताना लोकलमध्ये दंगा करायचा विचार होता, पण प्रचंड गर्दी होती आणि आम्ही सगळे विखरले गेल्यानं गप्प बसून राहावं लागलं. हा त्रास सहन करण्यापलीकडचा होता.

चला, पावसाळ्याची सुरुवात तर छान झाली..!!

 

(watch the photos here)

No comments: