Jan 22, 2018

दुःस्वप्न


सहा अजून वाजायचे होते. निरंजन झोपेतून जागा झाला, तेव्हा त्याला दरदरून घाम फुटला होता.

``काका...काका कसे आहेत?`` त्यानं अंजलीला विचारलं.

``कोण काका?`` त्याची ती अवस्था बघून ती जरा घाबरलीच होती.

``अगं कोण काय? आपले भालेराव काका!`` तो उगाचच तिच्यावर डाफरला. अजूनही तो भीतीने थरथरत होता.

``त्यांचं काय?``

``त्यांची तब्येत कशी आहे आता... ? तुला भेटले का ते? किती वाजले आत्ता...?``

तो सैरभैर झाल्यासारखं करत होता.

``तुला काही वाईट स्वप्न वगैरे पडलं होतं का?`` तिनं त्याला पाणी दिलं. एका दमात ते पाणी घटाघट संपवून तो म्हणाला, ``हो. खूप वाईट स्वप्न. जे कधीच खरं होऊ नये, असं स्वप्न. ``

``कसलं स्वप्न? तू नीट काही सांगशील का? `` ती आता जराशी वैतागली होती.

त्यानं आधी भानावर येण्यासाठी आणखी काही मिनिटं घेतली. स्वप्नातल्या घटनांची संगती कशी लावायची, त्या घटना नक्की कशा सांगायच्या, हे त्याला सुचत नव्हतं. नेमक्या क्रमाने सगळं स्वप्न आठवतही नव्हतं. मात्र काहीतरी वाईट दिसलं होतं, एवढं नक्की. त्याची अवस्था बघून अंजलीसुद्धा घाबरली होती.

``तुला बरं वाटतंय का? पडतोस का आणखी थोडा वेळ?``

``नाही...नको!`` त्यानं एकदम तिचा हात झिडकारला. आपल्या विचित्र वागण्याचं आता त्यालाही वाईट वाटायला लागलं होतं. काही वेळानं तो सावरला.

``भालेराव काका दिसले मला स्वप्नात. ते कुठल्यातरी विचित्र संकटात सापडले होते...`मी आता वाचत नाही....मी आता जाणार...` असं आर्तपणे सांगत होते...त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. मी समोरच होतो, पण मला त्यांना वाचवण्यासाठी काहीच करता येत नव्हतं.`` एवढं सांगून निरंजन थांबला. त्याला पुढे बोलवेना.

``काका तुला भेटले का सकाळी?`` काही वेळानं त्यानं पुन्हा अंजलीला विचारलं.

``नाही रे. आज मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेच नाहीये मी. ``

``आत्ता कुठे असतील भालेराव काका? ``

``असतील की त्यांच्याच घरी! ``

निरंजन ताडकन उठला आणि तडक घराबाहेर पडला.

``अरे, निदान तोंड तरी...`` ही अंजलीची हाक हवेत विरून गेली.

...

 

भालेराव काकांचं घर आलं आणि निरंजन तीरासारखा घरात घुसला. त्याला जी भीती वाटत होती, ती सुदैवानं खोटी ठरली होती. समोरच भालेराव काकांना आरामात पेपर वाचताना बघून त्याला हायसं वाटलं. त्याच्या मनावर असलेलं प्रचंड दडपण कमी झालं. तो एकदम त्यांच्या पायापाशी बसला आणि एवढा वेळ रोखून धरलेले अश्रू त्याच्या डोळ्यांतून घळाघळा वाहू लागले.

``निरंजन, अरे झालं काय तुला? असा रडतोयंस का?`` भालेराव काकांनी विचारलं, पण पुढची काही मिनिटं निरंजन काहीच बोलू शकला नाही.

``काका, वेडा आहे मी...आज स्वप्नात जे काही बघितलं, ते खूप वाईट होतं...तुम्ही खूप चांगले आहात काका. तुम्हाला काही होणार नाही!`` धीर एकवटून तो बोलला.

नक्की काय झालंय, काकांना कळेना. निरंजनचा रडवेला चेहराही त्यांना पाहवत नव्हता. एरव्ही निरंजन हा कायम हसतमुख, सगळ्यांशी मिळून मिसळून असलेला, हरहुन्नरी प्राणी. त्याच्या चेहऱ्यावर अशी उदास छटा काकांनी कधीच पाहिली नव्हती. त्याला उगाच कुठल्याही कारणावरून दुःखी होतानाही कधीच अनुभवलं नव्हतं. उलट कुणी अडचणीत असेल, काळजीत असेल, तर त्याला धीर द्यायला निरंजन कायम पुढे असायचा. त्यामुळेच तो सोसायटीत लोकप्रिय होता. त्याचं आणि अंजलीचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं, तेव्हासुद्धा सोसायटीनं उत्साहानं आणि कौतुकानं सगळा सोहळा पार पाडला होता. सोसायटीच्या घरचं कार्य असल्यासारखं वातावरण त्यावेळी होतं. आज मात्र निरंजन हा रोजचा निरंजन नव्हताच. तो अतिशय उदास, हताश, भेदरलेला वाटत होता. त्या स्वप्नानं त्याला हैराण केलं होतं. त्याचे रोजच्या परिचयातले भालेराव काका संकटात असल्याचं स्वप्न! बरं, सगळ्यांशी प्रेमानं वागणारे, सोसायटीच्या कामांमध्ये हौसेनं सहभागी होणारे, साठीतही उत्तम तब्येत टिकवून असलेले भालेराव काका कुठल्यातरी संकटात आहेत, मदतीसाठी आर्त साद घालतायंत, असं स्वप्न अचानक निरंजनला का पडावं? आत्तापर्यंत त्याला अशी विचित्र, अनाकलनीय स्वप्नं कधीच पडली नव्हती. मग आजच काय झालं होतं? त्यालाही कळत नव्हतं.

निरंजनने बसल्या बसल्याच थोडा विचार केला, तेव्हा त्याला लक्षात आलं, की कालच आपलं भालेराव काकांशी कुठल्यातरी किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं. तो ऑफिसमधून आल्या आल्या सोसायटीच्या दारातच काकांनी काहीतरी वादाचा विषय काढला होता आणि साध्या गप्पांचं रूपांतर एकदम भांडणात झालं होतं. त्या रागातून निरंजन त्यांना काहीतरी ताडकन बोलला होता. त्याचं मन त्याबद्दल त्याला खात होतं. अर्थात, हा राग भालेराव काकांवरचा नव्हता, तर त्याच्या बॉसवरचा होता. ऑफिसमधला तणाव, दगदग अशी चुकून काकांवर निघाली होती. एरव्ही अंजली या रागाची हक्काची धनी होती. संध्याकाळी काकांशी भांडण झालं आणि त्याच रात्री काका संकटात असल्याचं त्याला स्वप्न पडलं. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध असावा का? काकांशी काहीतरी वाजलं म्हणून त्यांच्या बाबतीत काहीतरी विपरित घडावं, असं आपल्याला वाटलं का? मनी वसे ते स्वप्नी दिसे, असं म्हणतात. मग काकांना असं काहीतरी व्हावं, असं आपल्याला खरंच मनातून वाटत होतं का?

निरंजनचं डोकं सैरभैर झालं.

काका समोर बसले होते, तरी ते सुखरूप आहेत, याबद्दल त्याचा विश्वास बसेना. त्यानं पुन्हा एकदा तशी खात्री करून घेतली, काल घडलेल्या प्रकाराबद्दल काकांची पुन्हा पुन्हा माफी मागितली आणि तो तिथून निघाला.

दिवसभर निरंजनचं कामात लक्ष नव्हतंच. राहून राहून त्याला ते स्वप्न आठवत होतं. त्याची उकल करण्याचा तो प्रयत्न करत होता. पहाटेच्या वेळी पडलेली स्वप्नं खरी होतात म्हणतात. हो...पहाटच होती ती. प्रचंड घाबरून निरंजन उठला, तेव्हा बाहेर झुंजुमुंजू झालं होतं. अर्थात, ते फक्त स्वप्नच होतं. कारण सकाळी उठून तो स्वतः भालेराव काकांना भेटला होता. त्यांची तब्येत उत्तम असल्याची खात्री त्यानं स्वतः करून घेतली होती. मनातल्या विचारांचा कल्लोळ निरंजनने मोठ्या हिमतीने शांत केला आणि पुन्हा एकदा ऑफिसच्या रुक्ष कामात डोकं खुपसलं.

दिवसभर अंजलीसुद्धा सतत निरंजनच्या संपर्कात होती. त्याची सकाळची अवस्था तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. त्यामुळे इतरवेळी निरंजन ऑफिसमध्ये असताना त्याला फोन करणं अंजली टाळत असे. आज मात्र ती उगाचच निमित्त काढून त्याला दिवसभरातून दहावेळा फोन करत होती. अगदी डबा खाण्यापासून ते `वेळेत घरी ये`पर्यंतची आठवण करून देत होती. निरंजनलासुद्धा तिची काळजी आणि तिच्यातला बदल समजला होता, पण त्यानं ते फारसं मनावर घेतलं नाही. त्यालाही परिस्थितीची जाणीव होतीच.

 

दिवस सुरळीत पार पडला.

संध्याकाळी निरंजन ऑफिसमधून नेहमीच्या वेळी घरी आला, तेव्हा मात्र त्याला सोसायटीच्या दारात गर्दी दिसली. बरेच लोक जमले होते आणि सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत होते. थोडं पुढे जाऊन निरंजनने अंदाज घेतला, तर ही सगळी गर्दी भालेराव काकांच्या घरासमोरच झालेली दिसली. आज दुपारीच भालेराव काकांचा अचानक मृत्यू झाला होता. कधी नव्हे ते सकाळच्या ऐवजी दुपारी उशिरा अंघोळीला गेले आणि गॅस गिझर सुरू केला, पण बहुतेक नळीतून गॅस बाहेर पडत होता. बाथरूममध्ये गॅस कोंडून राहिला आणि काकांना बाथरूमच्या बाहेरच पडता आलं नाही. त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला असणार, हेसुद्धा स्पष्ट जाणवत होतं. मात्र तिथेच दारापाशी गुदमरून ते मरून पडलेले आढळले होते.

ही बातमी समजल्यावर निरंजन जागच्या जागी कोसळला. सकाळी ज्या काकांशी आपण गप्पा मारल्या, त्यांच्या खुशालीची चौकशी केली, त्यांच्याबद्दल पाहिलेलं स्वप्न त्यांना सांगून माफी मागितली, ते काका अचानक दुपारी गेले. म्हणजे आपल्याला पडलेलं स्वप्न नक्कीच खरं होतं तर! नाही, पण हे कसं शक्य आहे? स्वप्नाचा आणि वास्तवाचा काय संबंध? हा नक्कीच योगायोग असणार. आत्तापर्यंत कधी कुणी गॅसमुळे गुदमरून मेलेलं नाही? अशा प्रकारे धडधाकट माणूस अचानक गेल्याची ही काय पहिलीच वेळ आहे? नाही नाही...पण ज्याच्याबद्दल काहीतरी स्वप्न पडलं, तोच माणूस गेल्याची ही नक्कीच पहिली वेळ होती. आणि त्यांचा जीव धोक्यात असल्याचं स्वप्न फक्त आपल्याला पडलं होतं.

पुढचे दोन आठवडे निरंजन अस्वस्थ होता. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. भालेराव काका गेले, त्या पहाटे आपल्याला हे असं वाईट स्वप्न पडलं होतं, हे कुणाला सांगायचं धाडसही त्याला झालं नव्हतं. अंजलीला मात्र त्याची अवस्था कळत होती. त्याच्याबद्दल तिला काळजी वाटत होती. भालेराव काकांशी त्याचं जवळचं नातं होतं, त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या दुःखाचा त्यानं स्वतःला त्रास करून घेऊ नये, एवढंच तिला वाटत होतं.

सुदैवानं अंजलीचे प्रयत्न आणि तिच्या सदिच्छा उपयोगी पडल्या. निरंजन हळूहळू ती घटना विसरून गेला, त्याच्या मनावरचं दडपण दूर झालं. कामात त्याचं लक्ष लागायला लागलं आणि आता तो नॉर्मल वागू लागला. भालेराव काका जाऊन आता जवळपास महिना झाला होता. त्यानंतर निरंजनला पुन्हा कुठलं दुःस्वप्नंही पडलं नव्हतं. त्या दिवशी जे घडलं, तो एखादा विचित्र योगायोग असावा, असं समजून त्यानं ती कटू आठवण मनातून दूर करण्याचा प्रयत्न केला.

...

एक महिना उलटून गेला आणि एके दिवशी पहाटे पुन्हा निरंजन खडबडून जागा झाला. त्याचं अंग घामानं डबडबलेलं होतं. त्याला पुन्हा तसंच स्वप्न पडलं होतं...बरोब्बर एक महिन्यापूर्वी पडलेलं. यावेळी त्याला स्वप्नात त्याचा जीवलग मित्र आणि सहकारी राकेश दिसला होता. निरंजन पहिल्यापेक्षा जास्त हादरला. गेल्यावेळी त्याला भालेराव काका दिसले होते. ते अगदीच म्हातारे नसले, तरी त्यांचं वय झालेलं होतं. आयुष्याचे सगळे टप्पे बघून झाले होते. राकेश अगदी तरुण होता, जेमतेम पस्तिशीचा. त्याच्याएवढाच. त्याला अजून बरंच आयुष्य बघायचं होतं. त्याचा मुलगा नुकताच पाच वर्षांचा झाला होता. रोज मुलाची वेगवेगळी कौतुकं सांगताना राकेशचा उत्साही चेहरा आणखी फुलत असे. निरंजनला क्षणार्धात हे सगळं आठवलं आणि त्याला पुन्हा प्रचंड अपराधी वाटायला लागलं. अंजलीला त्याच्यातला हा बदल जाणवला आणि गेल्यावेळसारखी शंका पुन्हा मनात दाटून आल्यामुळे तिचा चेहराही चिंताक्रांत झाला. तरीही धीर एकवटून तिनं स्वतःला सावरलं, काय झालंय, हे निरंजनला विचारलं.

``तेच स्वप्न...यावेळी राकेश दिसला मला स्वप्नात. तो संकटात होता. अंजली, मला भीती वाटतेय गं.`` निरंजन थरथरत होता.

``घाबरू नकोस, काही होणार नाही. गेल्यावेळी जे झालं, तो फक्त एक योगायोग होता. आणि अशी विचित्र स्वप्नं पडतात. आपल्याशी काहीही संबंध नसलेली माणसं स्वप्नात दिसतात. विचित्र परिस्थिती दिसते, प्रत्यक्षात तसं काही होत नसतं. सगळे मनाचे खेळ असतात. `` अंजलीनं त्याही परिस्थितीत त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला खरा, पण तीसुद्धा जराशी घाबरूनच गेली होती.

निरंजन अंथरुणातून उठला. अस्वस्थपणे स्वयंपाकघरात जाऊन त्यानं पाणी प्यायलं. हॉलमध्ये येरझारा घातल्या. उगाचच गॅलरीत डोकावून आला. तरीही त्याला चैन पडत नव्हतं.

``आज तारीख काय आहे?`` त्याला एकदम आठवलं.

``अठरा. का?`` अंजलीला तो काय बोलतोय कळत नव्हतं.

``आणि तिथी?``

``तिथी? ``

``तिथी गं...! मराठी तिथी...! ``

``मला नाही माहीत. बघावं लागेल. ``

``कॅलेंडर कुठाय? `` त्यानं धडपडत कॅलेंडर शोधलं. आजची तारीख बघून तो हादरला. आणखी अस्वस्थ झाला.

``आज अमावस्या आहे अंजली!`` त्याच्या तोंडून शब्द नीट फुटत नव्हते.

``बरं मग.. ? `` तिनं जणू काही कळलंच नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.

`बरं मग` काय? अमावस्या आहे आज. तुला काही कळतंय का? अमावस्येच्या दिवशी मला हे वाईट स्वप्न पडलंय. ``

``असं होत असतं रे. गेल्यावेळीसुद्धा अमावस्याच होती काय़? काहीतरी बोलतोस उगाच!``

``गेल्यावेळी.... `` एकदम निरंजनच्या डोक्यात काहीतरी आलं. त्यानं कॅलेंडरचा आधीचा महिना काढला आणि तिथल्या प्रत्येक तारखेवरून त्याची नजर फिरू लागली.

``भालेराव काका गेले, तो दिवस कुठला होता? 19 तारीख होती...होय. आमची मीटिंग होती त्या दिवशी. पक्कं आठवतंय मला. 19 तारखेला तिथी.... `` निरंजन बारकाईनं पाहू लागला आणि एकदम त्या तारखेवरचा तपशील पाहून हादरला. कॅलेंडर बाजूला करून हताशपणे खुर्चीवर कोसळला.

``त्या दिवशीसुद्धा अमावस्याच होती, अंजली!`` त्याला पुढे काय बोलावं कळत नव्हतं. अंजलीही आता सैरभैर झाली होती. म्हणजे फक्त अमावस्येलाच त्याला अशी भयानक स्वप्नं पडत होती. गेल्यावेळी त्यानं भालेराव काकांना संकटात बघितलं आणि त्याच दिवशी त्यांचा अचानक मृत्यू झाला. यावेळी पहाटे त्याला त्याचा मित्र राकेश स्वप्नात दिसला होता. तिलाही काय बोलावं काही सुचेना.

``हे बघ निरंजन, घाबरू नकोस. असं काहीही होणार नाहीये. गेल्यावेळी भालेराव काकांशी तुझं भांडण झालं होतं. राकेशशी तुझं काही भांडण वगैरे झालंय का काल?``

``नाही. तो ऑफिसला आलाच नव्हता.``

``काय सांगतोस? बघ! मी म्हटलं नव्हतं, उगाच तुझ्या मनात शंका!``

अंजलीनं खुलासा केला आणि निरंजनलाही हायसं वाटलं. गेल्यावेळी भालेराव काकांशी आदल्या दिवशी त्याचं भांडण झालं होतं आणि पहाटे ते संकटात असल्याचं स्वप्न त्याला पडलं होतं. यावेळी त्याला राकेश स्वप्नात अशाच प्रकारे संकटात असलेला दिसला, पण त्याच्याशी भांडण वगैरे काही झालं नव्हतं. राकेश आदल्या दिवशी निरंजनला भेटलाच नव्हता. दोन्ही घटनांमधला समान धागा एकच होता, तो म्हणजे दोन्ही दिवशी अमावस्या होती.

तरीही निरंजनला राहवत नव्हतं. आता एवढ्या सकाळी राकेशला फोन करून त्रास देणं योग्य नव्हतं, म्हणून त्यानं सकाळी आठपर्यंत कसाबसा वेळ काढला. आठला त्यानं फोन केला, तेव्हा राकेश घरीच होता. एवढ्या सकाळी सकाळी निरंजनचा फोन बघून त्यालाही आश्चर्य वाटलं. पण निरंजनने सहज, काल का आला नव्हतास, ते विचारायला फोन केला, असं सांगून वेळ मारून नेली. नाही म्हटलं तरी त्यामुळे राकेश थोडासा दुखावला गेलाच. राकेश आणि निरंजन मित्र असले, तरी अलीकडच्या काळात ऑफिसमध्ये निरंजनचा भाव थोडा वधारला होता. त्याला राकेशपेक्षा जास्त महत्त्व मिळायला लागलं होतं. नवीन आलेल्या बॉसची निरंजनवर जास्त मर्जी होती आणि इतर लोक त्याबद्दल निरंजनवर जळतही होते. निरंजनही हल्ली बदललाय, अशी कुजबुज सुरू झाली होती. राकेशचाही आज असाच गैरसमज झाला. आपण खरंच एका महत्त्वाच्या कारणासाठी आलो नव्हतो, पण तेही कन्फर्म करायला निरंजनने फोन केला, असं त्याला वाटलं आणि कळत नकळत त्या दोघांची थोडी वादावादी झाली. निरंजनलाही मग राहवलं नाही आणि त्यानं राकेशवर राग काढला. सहज म्हणून केलेला हा फोन रागारागाने कट केल्यानंतरच संपला.

त्या दिवशीही राकेश ऑफिसला आला नाही, तेव्हा निरंजनची अस्वस्थता वाढली. राकेशला फोन करून एकदा त्याच्या तब्येतीबद्दल विचारावं का, असा विचार त्याच्या मनात आला, पण आपण आजही येऊ शकत नाही, असं राकेशनं सकाळीच स्पष्ट केलं होतं. त्यावरून त्या दोघांची थोडी वादावादीही झाली होती. आता निष्कारण पुन्हा फोन करणं योग्य दिसलं नसतं, याची निरंजनला कल्पना आली. त्यानं फोन करण्याचा विषय मनातून काढून टाकला. संध्याकाळी चारच्या सुमारास निरंजनचा फोन वाजला, तेव्हा अनोळखी क्रमांक त्यावर दिसत होता. निरंजनने फोन घेतला. राकेशच्या भावाचा फोन होता. त्यानं जी माहिती दिली, ती ऐकून निरंजन हबकला. राकेशला अचानक हार्ट अटॅक आलाय आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे, असं त्याच्या भावानं सांगितलं. निरंजन त्याला बघायला हॉस्पिटलमध्ये धावला, पण तोपर्यंत खेळ खलास झाला होता. राकेशचा निर्जीव देह समोर बघून निरंजनच्या पायातलं त्राणच नाहीसं झालं. तो कितीतरी वेळ तिथेच एका बाकड्यावर बसून रडत राहिला. मध्ये अंजलीचे अनेकदा फोन येऊन गेले, पण त्याला उत्तर द्यायचंही भान राहिलं नाही. त्याला पुन्हा ते सगळं आठवलं. सकाळी आपल्याला पडलेलं स्वप्न, त्यानंतर वाटलेली राकेशची काळजी, सकाळीच त्याच्याशी फोनवरून झालेलं भांडण आणि दुपारी राकेशच्या भावाचा ही वाईट बातमी देणारा फोन...! निरंजनला काय बोलावं कळत नव्हतं. कसाबसा तो घरी आला. त्याच्या स्वप्नानं आज दुसरा बळी घेतला होता. गेल्या अमावस्येला भालेराव काका आणि यावेळी त्याचा जवळचा मित्र, राकेश.

निरंजनचं आयुष्य एका महिन्यात होत्याचं नव्हतं झालं होतं. त्याचं कशात लक्ष लागेनासं झालं होतं. कळत नकळत आपल्या जवळच्या दोन व्यक्तींच्या मृत्यूला तो कारणीभूत ठरला होता. त्यांच्या मृत्यूची चाहूल त्याला लागली होती, पण तो काहीही करू शकला नव्हता. किंबहुना, काही करायचं त्याला सुचलंच नव्हतं. दोन्ही घटनांमध्ये एक विलक्षण संगतीही होती. दोन्ही वेळेला त्याला त्या-त्या व्यक्तीची स्वप्नं पडली होती, तीसुद्धा अमावस्येच्या रात्री. दोन्ही वेळेला एकतर आधी किंवा नंतर त्याचं त्या त्या व्यक्तींशी भांडण झालं होतं आणि त्याच दिवशी काहीतरी निमित्ताने त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. म्हणजे निरंजनला लोकांचा मृत्यू दिसू लागला होता. निदान जवळच्या व्यक्तींचा तरी!

अंजलीच्या आग्रहावरून निरंजनने सध्यातरी या प्रकाराची कुठेही वाच्यता करायची नाही, असं ठरवलं होतं. अगदी आईवडिलांनाही त्यानं याबद्दल काही सांगितलं नाही. काही दिवस गेले आणि तोसुद्धा हळूहळू ते प्रसंग काही काळासाठी विसरून गेला. पुढची अमावस्या जवळ आल्यानंतर मात्र त्याला पुन्हा त्या कटू प्रसंगांची आठवण झाली आणि मनातली धाकधूक वाढली. गेल्यावेळचं ओझं निरंजनने बाळगायची गरज नाही, यावेळी काही होणार नाही, असं अंजली त्याला वारंवार बजावत राहिली, पण निरंजनला अजूनही खातरी होत नव्हती. काहीतरी विपरित घडणार, असं त्याला उगाचच वाटत राहिलं होतं.

अमावस्येच्या आदल्या दिवशी तर निरंजन फारच अस्वस्थ झाला. आपल्याला पुन्हा ते स्वप्न पडणार आणि कुणाचातरी नाहक बळी जाणार, अशी भीती त्याचं मन कुरतडायला लागली होती. काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. अंजलीलाही त्याची ही अवस्था बघवत नव्हती, पण ती त्याला शाब्दिक धीर देण्यापलीकडे काही करू शकत नव्हती.

निरंजनने पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींचा पहिल्यापासून विचार केला आणि त्याला एकदम काहीतरी सुचलं.

``अंजली, असं केलं तर?`` तो चमकून म्हणाला.

``कसं?`` तिनंही उत्सुकतेनं विचारलं.

``हे बघ, गेल्या दोन्ही वेळेला मला पहाटेच्या वेळी ते स्वप्न पडलं होतं. आणि फक्त अमावस्येच्याच रात्री ते स्वप्न पडतंय. यावेळी मी रात्रभर झोपलोच नाही, तर?``

त्याच्या डोक्यातला विचार तिलाही पटला.

``खरंय रे. म्हणजे, दरवेळी तुला असं काही स्वप्न पडेलच असं नाही, पण यावेळी उगाच रिस्क घेण्यापेक्षा हा उपाय चांगलाच वाटतोय मला.``

``मलासुद्धा. हे बघ, माझाही या अनैसर्गिक गोष्टींवर विश्वास नाही. पण गेल्या दोन अमावस्यांना जे काही घडलंय, ते आपल्या डोळ्यांसमोर आहे. आता मी या परिस्थितीत आणखी धोका पत्करू शकत नाही.`` निरंजन मनापासून बोलला, ते तिलाही पटलं.

``पण रात्रभर कसा जागा राहणार तू? दुसऱ्या दिवशी त्रास होईल, त्याचं काय?``

``दुसऱ्या दिवशीच्या त्रासाचं बघून घेऊ. ज्या रात्री मला स्वप्नं पडतात, त्या रात्री मी झोपलोच नाही, तर स्वप्न पडायचा प्रश्नच येणार नाही. बरोबर ना?``

निरंजनचा युक्तिवाद बिनतोड होता. शिवाय त्या परिस्थितीत दुसरं काही सुचत नसल्यामुळे अंजलीनेही त्याला होकार दिला. ती स्वतः त्याच्याबरोबर जागी राहणार होती. रात्री त्याला झोप येऊ नये, म्हणून काय काय करायचं याची यादीच त्यांनी तयार केली होती. दिवसभरात चुकूनही कुठलंही औषध पोटात जाणार नाही, झोप येईल, असा कुठलाही पदार्थ खाल्ला जाणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. रात्री टीव्ही आणि डीव्हीडीवर बघण्यासारखे भरपूर सिनेमे शोधून ठेवले. कॅरम, पत्ते, कुठले कुठले गेम्स शोधून ठेवले. रात्री अगदीच वाटलं तर नाइट आउट करायचा, गाडीतून कुठेतरी भटकून यायचं, हेही त्यांनी निश्चित केलं होतं.

अमावस्येची रात्र उजाडली. अंजलीलाही टेन्शन आलं होतं, पण तिनं तसं दाखवलं नाही. निरंजनला आधार देणं तिच्यासाठी महत्त्वाचं होतं. दोघांनी लग्नानंतर कधी नव्हे ते एवढा सलग वेळ एकमेकांसाठी दिला. त्यांच्या मनसोक्त गप्पा रंगल्या. कुठले कुठले विषय निघाले, लग्नाआधीच्या गमतीजमती, लग्नानंतरचे रुसवेफुगवे, सगळ्या आठवणी निघाल्या. दोघंही या गप्पांमध्ये रंगून गेली होती. मध्येच अंजलीनं उठून कॉफी केली, दोघांनी आवडीचे सिनेमे आलटून पालटून बघितले. मध्यरात्र उलटून गेली होती. आता पहाट व्हायला काहीच तास बाकी होते. अंजली सोबत असल्यामुळे निरंजनलाही झोपेची गरज वाटत नव्हती. झोप येत होती, पण ती अगदी अनिवार झाली नव्हती. एकमेकांच्या सहवासात वेळ कसा गेला, कळलंच नाही.

...

 

किचनमधून आलं-सुंठ घातलेल्या चहाचा मस्त वास घरात दरवळला आणि निरंजन टेबलापाशी चहा प्यायला येऊन बसला.

``घे. ताज्या दुधाचा गरमागरम चहा!`` अंजली उत्साहाने दोन कप घेऊन आली.

तिनं निरंजनसमोर एक कप ठेवला, स्वतः बसली आणि गरम चहाचा आस्वाद घेऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर एका मोठ्या संकटातून सुटल्याचं समाधान होतं. निरंजन मात्र अजूनही अस्वस्थ वाटत होता. तिच्या ते लक्षात यायला वेळ लागला नाही.

``काय रे, चहा घे ना! कसला विचार करतोयंस?`` तिनं विचारलं.

निरंजननने फक्त नकारार्थी मान हलवली. चहाचा कप हातात घेतला, पण अजूनही त्याचं लक्ष नाहीये, याचा अंदाज अंजलीला आला.

``काय झालंय? आता ते सगळं विसरून जा. कालच्या रात्रीची भीती होती ना आपल्याला? ती रात्र संपलेय आता. आपण दोघं एकमेकांसमोर आहोत. खूप धीर दाखवून आपण हे संकट परतवलंय. आता काळजी करायचं काही कारण नाही!`` ती त्याला समजावत म्हणाली. निरंजनला मात्र ते पटलेलं दिसत नव्हतं. त्यानं कसातरी चहाचा एक घोट घेतला.

``तू बाहेर कशासाठी गेली होतीस?`` त्याच्या अचानक प्रश्नानं अंजलीनं चमकून पाहिलं.

``कशासाठी म्हणजे?  ताज्या दुधाची पिशवी आणायला गेले होते. तुला सांगूनच गेले होते की! तू अंघोळीला जातो म्हणालास आणि मी बाहेर पडले. का? काय झालं?``तिनं आश्चर्यानं विचारलं.

निरंजन त्यावर गप्प बसला.

``अरे काय झालं, सांग की. असं मनात ठेवू नकोस. तुलाच त्रास होईल.`` तिनं काकुळतीला येऊन विनंती केली.

``तू गेलीस तेव्हा मी बेडरूममध्येच होतो. घड्याळात पाच वाजलेलेही बघितले मी. अंघोळीसाठी उठणार होतो, पण तेवढ्यात...`` बोलता बोलता निरंजन एकदम थांबला.

``तेवढ्यात काय?``

``कसा कुणास ठाऊक, मी बेडवर बसल्या बसल्या आडवा झालो आणि पंधरा वीस मिनिटं झोप लागली मला.``

``काय?`` त्याच्या बोलण्यानं अंजलीच्या हातातला कप डचमळला. तिला काय बोलावं कळेना झालं.

``पुन्हा स्वप्न पडलं की काय?`` तिनं घाबरतच विचारलं.

``न...नाही.`` निरंजनने नजर चोरत उत्तर दिलं, तेव्हा अंजलीच्या चेहऱ्यावरची काळजी आणखी वाढली.

``म्हणजे तुला स्वप्न पडलं पुन्हा. हो ना?``

निरंजन काहीच बोलला नाही, पण त्याच्या मौनातच त्याचा होकार आहे, हे तिच्या नजरेनं हेरलं.

``निरंजन, काय स्वप्न पडलं, ते मला खरंखरं सांग.`` तिनं त्याला धीर दिला, पण आता तिचाही धीर खचला होता. तो काय बोलतो, हे ऐकण्यासाठी तिचे प्राण कानात एकवटले होते.

निरंजनने एक आवंढा गिळला आणि कसंबसं तो सांगू लागला, ``मला पुन्हा तेच स्वप्न पडलं होतं...तसंच...कुणीतरी संकटात असल्याचं.``

``पण कोण?``

``नाही...यावेळी चेहरा दिसला नाही त्या माणसाचा.``

``कसं काय?``

``कुणास ठाऊक. पण ती व्यक्ती माझ्या जवळची होती. मला खूप काळजी वाटतेय, अंजली. खूप घाबरलोय मी. पुन्हा तसं काही झालं, तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही...का पडतात मला अशी स्वप्नं? काय झालंय मला? मी नॉर्मल माणूस राहिलो  नाहीये का?``

बोलता बोलता निरंजनच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहायला लागले. त्याला कसा धीर द्यावा, तेच अंजलीला सुचेना.

``हे बघ, पुन्हा सगळं तसंच घडलंय, हे कळतंय. पण यावेळी तुला कुणाचा चेहरा दिसला नाहीये, हे त्यातल्या त्यात समाधान नाहीये का?``

``अगं हो, पण...``

``पुरे. आता त्या विषयावर चर्चा नको. तू त्या स्वप्नाची आठवणच काढू नकोस. काही घाबरायचं कारण नाही. तू नेहमीसारखा ऑफिसला जा, कामात स्वतःला बुडवून घे. काही होणार नाही. पण तुझी झोप...?``

``झोपेचं काही एवढं टेन्शन नाही. मी करेन मॅनेज.``

``हं. मग ठीकेय.``

``पण मी ऑफिसला नाही जाणार. मला आज दिवसभर तुझ्याबरोबर राहायचंय. मला खूप काळजी वाटतेय अंजली. मला तुझा आधार हवाय.``

``अरे हो, कळतंय मला. पण तू घरी राहिलास, तर सतत तुझ्या डोक्यात तेच विचार येत राहतील. त्यापेक्षा कामात गुंतवून घे स्वतःला. मग त्रास नाही होणार.``

``अगं, पण...`` निरंजनला तिचं म्हणणं पटत नव्हतं. ``तू गेलीसच का बाहेर? नसता प्यायला चहा एखादवेळी!`` तो पुन्हा वैतागला. आता मात्र तिला राहवलं नाही.

``तुझ्यासाठीच बाहेर गेले होते ना? तू लगेच अंघोळीला का उठला नाहीस? मला कशाला दोष देतोयंस?`` तिचाही आवाज चढला. दोघांची वादावादी झाली. शेवटी अंजलीनेच माघार घेतली. निरंजनची अवस्था तिला कळत होती. कुणाचा मुद्दा योग्य, याच्यापेक्षाही निरंजनला त्रास होऊ नये, हे यावेळी महत्त्वाचं होतं. तिनं शांत राहायचं ठरवलं.

``हे बघ, काय झालं, ते विसरून जा. ऑफिसला जायचं की नाही, ते आपण नंतर ठरवू. तू सध्या आवरून घे. फ्रेश हो, आपण बाहेर जाऊन ब्रेकफास्ट करून येऊ. तुला बरं वाटेल.``

``नाही...नको. बाहेर नको. तू घरीच काहीतरी कर. आज बाहेर कुठेच नको जायला.`` निरंजन एकदम उसळून म्हणाला. अंजलीला त्याचं वागणं विचित्र वाटलं, पण ती काही बोलली नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवायचं तिनं मनाशी ठरवलं होतं.

``बरं, तू अंघोळ करून घे, तोपर्यंत मी नाश्त्यासाठी काहीतरी करते,`` असं म्हणून ती जागेवरून उठली. त्याच्या जवळ जाऊन तिनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याचा हात हातात घेऊन त्याला धीर दिला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं. कधी नव्हे एवढी काळजी तिला त्याच्या डोळ्यांत दिसली. तिने पुन्हा त्याच्या हातांवर थोपटून त्याला धीर दिला.

``सगळं ठीक होईल. काळजी करू नकोस.`` ती म्हणाली आणि स्वयंपाकघराकडे वळली. निरंजनची नजर मात्र तिच्यावरच रोखली गेली होती. त्याला बरंच काहीतरी सांगायचं होतं, पण सांगता येत नव्हतं. ``अंजली, तू आहेस म्हणून सगळं आहे. मला तू कायम माझ्या आयुष्यात हवी आहेस. कधीकधी मी तुझ्याशी उगाच भांडतो, पण तू मला समजून घेतेस. मी तुला काही होऊ देणार नाही...`` तो मनातल्या मनात पुटपुटला. स्वयंपाकघरात शिरताना अंजलीने मागे वळून पाहिलं आणि तिची निरंजनशी नजरानजर झाली. तो आपल्याकडेच बघतोय, हे लक्षात आल्यावर तिलाही हसू आलं. `उठा आता,` असं तिनं नजरेनंच त्याला खुणावलं, तसा तोही कसंनुसा हसला. मनातले विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो अंघोळीसाठी उठला. बाथरूमच्या दिशेने जायला निघाला, तेवढ्यात जोरदार स्फोटाचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्यापाठोपाठ अंजलीची किंकाळी.

...

पोस्ट मार्टेमचे सोपस्कार पार पडून अंजलीचा मृतदेह ताब्यात मिळाला, तेव्हा निरंजन कितीतरी वेळ तिच्याशेजारी बसून होता. तिचा चेहरा ओळखू येण्याच्या पलीकडे गेला होता. राहून राहून एकच विचार त्याच्या मनात येत होता – आज पहाटे पडलेल्या स्वप्नातसुद्धा तिचा चेहरा असाच आपल्याला ओळखूच आला नसता तर?

...

 

-       अभिजित पेंढारकर.

(पूर्वप्रसिद्धीः प्रपंच दिवाळी अंक, 2017.)

No comments: