Jun 29, 2010

पावसा पावसा कधी होशील रे पाऊस?

मानसा मानसा कधी होशील रे मानूस

अशी कुणाची तरी कविता आहे. कुणाची तरी अशासाठी, की मला कवितेतलं की ठो कळत नाही. कळलं, तरी लक्षात राहत नाही. मग कशाला डोक्याला ताप घ्या? कुणाची तरी असं म्हटलं, की सगळे प्रश्न मिटतात.

तर ते असो.

सांगण्याचा उद्देश हा, की सध्या पावसा पावसा कधी होशील रे पाऊस, असं म्हणायची वेळ आलेय.

यंदा भरपूर पाऊस होणार...मान्सून आला...102 टक्के सरासरी गाठणार..जूनची सरासरी ओलांडली...खंडीभर बातम्या लिहून, वाचून आणि संपादित करून जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भरपूर करमणूक झाली. या बातम्या वाचतानाच मनात शंकेची पाल चुकचुकत होती. चोर-दरोडेखोर जसे पेपरमधल्या बंदोबस्ताच्या बातम्या वाचून सावध होतात ना, तसाच पाऊस झाला तर? पण स्वयंघोषित हवामानतज्ज्ञ सांगत होते, `गेल्या वर्षी दुष्काळ होता. म्हणजे यंदा पाऊस नक्की पडणार. अगदी सरासरी ओलांडणार...' मग आमची तोंडं गप्प झाली.

पण व्हायचं तेच झालं. गेले पंधरा दिवस पाऊस वाकुल्या दाखवतोय. पुण्यात, पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडून पाणी वगैरे भरल्याच्या बातम्या एखाद-दोन वेळाच वाचायला मिळाल्या. त्यादेखील जूनच्या पहिल्या आठवड्यात. त्यातला निम्मा पाऊस तर मान्सूनचा नव्हताच...

ट्रेकला सुरुवात करायची म्हणून गेल्या रविवारी भातराशी ट्रेकला जाऊन आलो. पवनानगरच्या अगदी पावसाच्या पट्टयात. वाटलं, पावसात चिंब भिजता येईल. पण कसलं काय नि कसलं काय...औषधालाही पाऊस नव्हता. एकदा धुक्याचं दर्शन झालं, तेवढंच.

काल खडकवासल्याला गेलो होतो. तिथेही पाऊस भेटला नाहीच. साधे ढगसुद्धा सिंहगडाच्या टोकावरून खाली उतरायला तयार नव्हते.

गेल्या वर्षी पावसानं असंच कुथवलं होतं. जूनची पुण्यातली सरासरी ओलांडून गेली आणि मग पावसासारखा पाऊस काही पडलाच नाही. जुलै, आॅगस्टमध्ये थोडी भरपाई केली त्यानं, पण तेवढीच. गेल्या वर्षी पाच जुलैला ताम्हिणीत गेलो होतो. नेहमीपेक्षा जरा लवकरच. पुण्यात पावसाची फारशी लक्षणं नसल्यानं या ट्रिपविषयी जरा धाकधूकच मनात होती. पण जातानाच एका छोट्या धबधब्यानं उत्साह वाढवला. नंतर तर रस्त्यावर आम्ही धुक्यात हरवून गेलो आणि ताम्हिणीत फार नाही, पण आनंद घेण्याएवढे धबधबे मिळाले.

यंदा एवढ्यात ताम्हिणीत जायचा विचार नाहीये, पण पावसाची प्रतीक्षा मात्र आहे. ताम्हिणीसह माळशेजही करायचा बेत आहे. बघूया. आधी पाऊस तर पडू दे.!
 
(फोटो गेल्या वर्षीचे आहेत. क्रुपया गैरसमज नसावा.)

Jun 23, 2010

डोळे तुपाशी; डोके उपाशी!



दसऱ्याचा रावण दहनाचा भव्य कार्यक्रम पाहायला जावं आणि बुजगावण्याला जाळताना पाहायला लागावं, तसं काहीसं "रावण' पाहणाऱ्या प्रेक्षकांचं होतं. प्रचंड बजेट, अफाट मेहनत, बक्कळ पैसे घेणारे बडे कलाकार आणि भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळी दिशा देणारे दिग्दर्शक मणिरत्नम अशी भरभक्कम रसद रणांगणावर मान टाकते आणि "रावण'चं "दहन' कसलं, शेकोटीच पाहावी लागते!
महाभारतावरचा "राजनीती' झाला; आता मणिरत्नम यांनी "रावण'मध्ये रामायणाला वेठीस धरलं आहे. इथे दुष्ट प्रवृत्तीचा "रावण' (वीरा ः अभिषेक बच्चन) आहे, त्याला मारणारा "राम' (देव ः विक्रम) आहे आणि रावणानं अपहरण केलेली त्याची पत्नी "सीता' (रागिणी ः ऐश्‍वर्या राय) आहे. सीतेचं अपहरण, रामाला हनुमानाची (गोविंदा) मदत, सीतेची अग्निपरीक्षा (पॉलिग्राफ टेस्ट!) असं सगळं आहे. मणिरत्नम यांचा रावण मात्र जरा जास्तच सहानुभूती वाटावा असा आणि अन्यायामुळे व्यवस्थेशी संघर्ष करणारा आहे. हा रावण जसा सीतेच्या प्रेमात पडतो, तसेच तिलाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते, एवढाच कथानकातला "ट्विस्ट'!
मणिरत्नम यांनी आतापर्यंत नेहमीच वेगळे विषय हाताळले आहेत आणि प्रत्येक चित्रपटातून ते सामाजिक भाष्य करू पाहतात. "रावण' मात्र सामाजिक सोडाच, कुठलंच भाष्य करत नाही. वीरानं केलेल्या रागिणीच्या अपहरणापासून चित्रपटाला सुरवात होते. रागिणी त्याच्या लंकेतल्या यातना भोगत असताना त्याच्यावर झालेला अन्याय आणि त्याची सर्वांना मदत करण्याची वृत्ती जवळून अनुभवते. तिच्या मनात त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते. रागिणीला सोडविण्यासाठी आणि वीराला पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक देव जंगजंग पछाडतो. रागिणीला मिळवून तो हा संघर्षही संपवतो.
रावणाची व्यक्तिरेखा सादर करताना मणिरत्नम यांनी अभिषेक बच्चनची प्रतिमा लक्षात ठेवून त्याला खूपच सहानुभूती मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. चित्रपटाची मोठी फसगत तिथेच झालीय. सुरवातीच्या निर्घृण हिंसाचाराच्या दृश्‍यात तो नरसंहारक म्हणून शोभत नाही आणि नंतरच्या सहानुभूतीपूर्ण प्रतिमेमुळे आधीचं क्रौर्य अविश्‍वसनीयच वाटू लागतं. रागिणीला तिच्याविषयी प्रेम वाटावं म्हणून केलेली ही व्यवस्था कथानक भरकटून टाकते. चित्रपट पकड घेतो तो शेवटच्या अर्ध्या-पाऊण तासात.
कथा-पटकथा फसली असली, तरी चित्रपट शेवटपर्यंत पाहत राहावासा वाटतो तो संतोष सिवन-मणिकंदन यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छायाचित्रणामुळे. रौद्रभीषण धबधब्याचं दृश्‍य असो वा जंगलातील शोधमोहीम... प्रत्येक फ्रेमच्या कानाकोपऱ्यातून कॅमेरा फिरवून त्यांनी झाडं-फुलंच नव्हेत, तर दगड-धोंडेही जिवंत करून टाकले आहेत. शेवटचा अधांतरी पुलावरच्या मारामारीचा प्रसंग म्हणजे तंत्रज्ञानाची, छायाचित्रणाची अत्युच्च पातळी आहे. रहमानचं संगीत वेगळं असलं, तरी चित्रपटातली गाणी अनावश्‍यक पद्धतीनं येतात.
न शोभणारी व्यक्तिरेखा आणि आचरट हावभाव यामुळे अभिषेक बच्चनची कामगिरी फसली आहे. ऐश्‍वर्या राय-बच्चनने अभिनयाचा आणखी एक उत्तम नमुना सादर केला आहे. रविकिशन लक्षात राहण्यासारखा. गोविंदाला वाया घालवलं आहे. विक्रमही ठीकठाक.
छायाचित्रण, सादरीकरणासाठी पाहायलाच हवा, असा हा "रावण' मणिरत्नमचा चित्रपट म्हणून अपेक्षापूर्ती करत नाही, एवढं खरं.

Jun 22, 2010

`भात-राशी'च्या राशीला!

भातराशी हे काही ट्रेकला जाण्यासाठी आकर्षण वाटावं असं नाव नाही, हे कबूल. पण दरवेळी आपल्याला आवडीच्या आणि नेहमीच्या ठिकाणीच जावं, असं काही नाही ना...कधी कधी नवे प्रयोगही करून बघावेत, या उद्देशानं गेल्या रविवारी ट्रेकला जायचं निश्चित केलं.

आमचा मित्र अजित रानडे याच्या wanderers क्लबने ट्रेक आयोजित केला होता. रविवार होता आणि मीही बऱ्याच दिवसांत कुठे ट्रेक केला नव्हता. सगळं जुळून आलं होतं....

सकाळी सहाच्या आधीच शिवाजीनगर स्थानकावर पोचलो. साडेसहाच्या लोकलनं निघायचं होतं. जाताना अजिबात गर्दी मिळाली नाही. त्यामुळे प्रवास छान झाला. पाऊस पडण्याविषयी जरा शंकाच होती. वाटेतही कुठे पावसाची लक्षणं दिसत नव्हती. नाही म्हणायला डोंगरांच्या टोकांवर ढगांचे पुंजके जमलेले काही ठिकाणी दिसत होते, पण मनाचे मोर थुईथुई नाचावेत, असं वातावरण नव्हतं.

तासाभरात कामशेतला पोचलो. तिथून जीपने महागाव या ठिकाणी जायचं होतं. तिथल्या घटेश्वर मंदिरात पहिला थांबा होता. काही मंडळी मागे राहिली होती. त्यांची व्यवस्था करून आम्ही जीपने घटेश्वर मंदिरात पोचलो. तिथे चहाचा आस्वाद घेतला. पुण्यातून आणलेली इडलीही हादडली. अजितनं तिथे कसले कसले व्यायाम पण घेतले. त्याचे नेतृत्वगुण हल्ली फारच फुलून आलेत, हेही लक्षात आलं. इंग्रजीतूनही तो सफाईदार (की बेमालूम) मार्गदर्शन करत होता.

पोटपूजा झाल्यानंतर आम्ही साडेनऊच्या सुमारास भातराशी टेकडीकडे मोर्चा वळविला. जाताना पावसाचं टिपूस नव्हतं. अधूनमधून तर ऊन येत होतं आणि घामाघूम व्हायला होत होतं. दोन चार छोट्या टेकड्या आणि डोंगररांगा पार करून आम्ही एका विस्तीर्ण पठारावर पोचलो. दुपारचे बारा वाजले होते. तरी तिथे हवा आल्हाददायक होती. हवा स्वच्छ असल्यानं लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना असे किल्ले आणि चक्क ड्यूक्स नोजचं टोकही दिसत होतं. महिनाभरानं तिथे जायचंच आहे, पण त्याआधीच तिथलं दर्शन घडलं.

पठारावर मस्त आराम केला. गार वा-याच्या झुळका सुखावत होत्या. कुणाच्या तरी पाय लचकला होता. सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मग भातराशीची टेकडी चढायला सुरुवात केली. अगदी छोटंसंच टेकाड होतं ते. वर चढायला सुरुवात करतानाच पावसाचे हलके शिंतोडे उडाले. वर पोचेपर्यंत पाऊस नक्की येणार, असं वाटत होतं, पण पुन्हा त्याच्या लहरीपणाबद्दल मनात संशयाचं धुकं दाटत होतं.

वर चढायला सोपंच होतं. काही नवख्या माणसांना आधार द्यावा लागला. वर पोचलो, तर अधिक आल्हाददायक आणि गार हवा होती. खालून दरीतून कुणीतरी फुंकर मारावी, तसे धुक्याचे ढग वर आले. काही काळ तेही मनाला सुखावून गेले. पुन्हा एकदा पावसानं शिंतोडे उडवून वाकुल्या दाखवल्या. पण प्रत्यक्षात तो वरुणराजा मात्र मेहेरबान होत नव्हता.

तिथे टेकाडावरच डबे खाल्ले. गावातून दोन वाटाडे आमच्यासोबत आले होते. एक मोठा बाप्या आणि दोन लहानगे. त्यांनाही आमचे डबे खायला दिले. सगळ्यांचे डबे चाखून आणि संपवून झाल्यानंतर उतरायला सुरुवात केली.

उतरणीची वाट जरा आणखी अवघड होती. दोन-तीन डोंगररांगा तर भन्नाट होत्या. तिथून तोल सावरत घसरताना मजा आली. तसेच आम्ही उतरून बेडसे लेण्यांपाशी आलो. लेणी बघायला जाताना खालून वर जाण्याऐवजी वरून खाली येण्याचा हा अनुभव अनोखा होता.

लेणी ठीकठाक होती. निदान कार्ल्याच्या लेण्यांपेक्षा स्वच्छ, नेटकी वाटली. तिथून उतरायला ढीगभर पाय-या होत्या. खाली पुन्हा गावापर्यंत चालत जातानाचा रस्ता मात्र थोडासा कंटाळवाणा झाला. मुख्य रस्त्यावर आमच्यासाठी जीप वाट बघत उभ्या होत्या. तिथून कामशेतला आलो आणि साडेपाचची लोकल निघून गेल्यानं एक तास तिथेच वाट पाहत उभं राहावं लागलं. त्या काळात छान गप्पा आणि टाइमपास झाला. येताना लोकलमध्ये दंगा करायचा विचार होता, पण प्रचंड गर्दी होती आणि आम्ही सगळे विखरले गेल्यानं गप्प बसून राहावं लागलं. हा त्रास सहन करण्यापलीकडचा होता.

चला, पावसाळ्याची सुरुवात तर छान झाली..!!

 

(watch the photos here)

Jun 18, 2010

पेन `डाइव्ह'!

अवघ्या चार वर्षांपूर्वी घरी कॉंप्युटर घेतला, तोपर्यंत मला सीडी हा प्रकारही माहित नव्हता. एखादा लेख घरी टाइप करून आणायचा, तरी कोणती पद्धत वापरायची, हे नंतर समजलं. सीडी अवघ्या आठ ते दहा रुपयांना मिळते, हे त्यानंतर कळलं. (तोपर्यंत मला फक्त "फ्लॉपी' माहित होती.) मग सीडी विकत घेतल्या, त्यावर मजकूर "राइट' कसा करायचा, हे जाणून घेतलं. पहिल्यांदा सीडी "राइट' करायला घेतली, तेव्हा "बर्न' करायची सोडून बाकी सगळे प्रयत्न करून पाहिले होते. "बर्न'चं बटणच न दाबल्यानं सीडीवर मजकूर येतच नव्हता आणि तो का येत नाही, हे गूढ मला उकलत नव्हतं.
तर सांगायचा मुद्दा काय, की तंत्रज्ञानाच्या बाबतीत एवढ्या अडाणी असलेला मी कधी पेन ड्राइव्ह वगैरे वापरेन, असं कुणी सांगितलं असतं तर मलाच पटलं नसतं. सीडीनंतर पेन ड्राइव्हही घेतला. पहिल्यांदा 500 एमबीचा पेन ड्राइव्ह घ्यायलाही खूप महागात पडला होता. नंतर त्याच किमतीत चार जीबीचा पेन ड्राइव्ह मिळाला. पण नुकताच तो माझ्या विसरभोळेपणामुळं शहीद झाला. कुठेतरी विसरलो आणि नंतर मिळालाच नाही.
विसरभोळेपणाचा मोठा फटका बसल्यामुळं दुसऱ्या दिवसापासूनच मी सावध झालो होतो. परवा एकदा ऑफिसात काम करताना पेन ड्राइव्ह खिशात नसल्याचा अचानक साक्षात्कार झाला. पंधरा दिवसांपूर्वीच एक चांगला पेन ड्राइव्ह गमावला होता आणि नवा घेण्याचा भुर्दंडही सोसावा लागला होता. त्यामुळे या वेळी मी खूपच जागरूक होतो. (म्हणजे, निदान मला तसं वाटत होतं!) मग तिसऱ्या मजल्यावर जिथे तो विसरला असावा असं वाटलं, तिथे जाण्याचा प्रयत्न केला. तिथला विभाग बंद झाला होता. मग अंधारात धडपडत जाऊन, कुलपं उघडून पेन ड्राइव्ह शोधला. जिथे तो असायला हवा होता, तिथे नव्हताच. निरनिराळ्या शंका मनात आल्या. त्यातली एक शंका मात्र अधिक दाट होती आणि तीच खरी असण्याची शक्‍यता जास्त वाटत होती...
वरती पेन ड्राइव्हचं काम झाल्यावर मी खाली येऊन माझ्याच मशीनला तो लावल्याचं अंधुकसं आठवलं आणि तो कदाचित तिथेच असावा, असा किंचित संशय आला. तिथे काही बोलणं म्हणजे सोबत आलेल्या सहकाऱ्यासमोर स्वतःचीच अब्रू काढून घेण्यासारखं होतं. ते टाळलं. (लग्न केल्याचा फायदा!) खाली येऊन पाहिलं, तर खरंच पेन ड्राइव्ह माझ्याच मशीनला होता. मी तिथे बसूनच त्याचा शोध सुरू केला होता, स्वतःच्या मशीनला तो आहे की नाही, हे न पाहता!
आपण आता निदान पेन ड्राइव्हबाबत तरी खूपच दक्ष आणि सावध झाल्याची जाणीव मनात निर्माण झाली. स्वतःचा अभिमानही वाटला. (हे प्रसंगही दुर्मिळच!) पण तो खोटा ठरण्यासाठी फार वेळ लागला नाही....
परवाच रात्री घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच लक्षात आलं, पेन ड्राइव्ह पुन्हा गायब आहे. मी तो पुन्हा विसरणार नाही, याबाबत असलेली खात्री उद्‌ध्वस्त झाली होती. पण पेन ड्राइव्ह मशीनलाच लावून ठेवलेल्या अवस्थेत असणार, याची खात्री होती. तसा तो होताही. ऑफिसात फोन करून कळवलं आणि मला दुपारी माझी अमानत परत मिळाली.
पहिला महागातला, पण कमी क्षमतेचा पेन ड्राइव्ह कधीच हरवण्याचा प्रसंग आलानाही. त्याच्यावरचं टोपणही अगदी तळहाताच्या फोडासारखं मी जपलंय.
दुसरा चार जीबीचा पेन ड्राइव्ह माझ्या गबाळेपणामुळे हरवला.
तिसरा एकदा हरवल्याची अफवा माझी मीच पसरवली आणि दुसऱ्यांदा हरवता हरवता वाचला....एकूणच, त्यानं अनेकदा माझ्या ताब्यातून "डाइव्ह' मारायचा प्रयत्न केलाय!
आता त्याला दीर्घ आयुरारोग्य चिंतण्यासाठी कुठल्या देवाला नवस बोलावा, याचा विचार करतोय!
 

Jun 13, 2010

भुलेश्वरानं पाडलेली भूल...

 
 

फिरायची

आवड आधीपासून होती, पण गाडी घेतल्यानंतर तिला एक अधिष्ठान प्राप्त झालं. गाडीचा निदान रविवारी तरी वापर करायला हवा, या कारणाखाली किंवा -याच दिवसांत कुठे गेलो नाही, मस्त हवा पडलेय, छानपैकी वातावरणात फिरायला जावंसं वाटतं, या सबबींखाली भटकंती अनेकदा सुरू झाली. महिन्यातून साधारण एकदा किंवा दोनदा तरी पुण्याबाहेर उधळलंच पाहिजे, हा दंडक झाला.

जेजुरी

, शिरगाव, नीळकंठेश्वर, सिंहगड, कार्ला, अशी ठिकाणं पालथी घालून झाली. रामदरा सारख्या काही नवीन ठिकाणी भटकंती करता आली. यवतजवळच्या भुलेश्वरचं नाव बरेच दिवस ऐकत होतो. एक दिवसाच्या सहलीसाठी चांगलं ठिकाण, अशी ख्याती ऐकली होती. बरेचदा भटकंतीतल्या मित्रांना विचारल्यावर त्यांनी हे नाव सुचवलं होतं. पण आणखी ेक देऊळ यापलीकडे त्याविषयी फार आकर्षण वाटलं नव्हतं. त्यामुळं एक-दोनदा भुलेश्वर निश्चित करूनही मागे पडलं होतं. कालच्या रविवारी तसा कुठे जाण्याचा बेत नव्हता, पण दिवसभर मोकळा असल्यानं आणि पावसाळी हवा पाहून मनानं उचल खाल्ली. मग बरेच दिवस हातातून निसटलेलं हे भुलेश्वरच पालथं घालायचं ठरवलं.

सकाळी

मनस्वीचा क्लास, रविवारची कामं आटोपून निघेपर्यंत एक वाजला. वाटेत हाॅटेलवाल्यांनी अगत्यानं केलेला पाहुणचार झोडून प्रत्यक्ष भुलेश्वरला पोचेपर्यंत साडेतीन वाजले. पुण्याहून यवत साधारणपणे 45 किमी आहे आणि यवत गावाच्या आधीच भुलेश्वरचा फाटा फुटतो. तिथून आत घाटरस्त्यानं सुमारे सात ते आठ किमीवर भुलेश्वर आहे.

जातानाचा

रस्ता भन्नाट होता. पाऊस फारसा नव्हता आणि रस्त्याचं कामही सुरू होतं, तरी जाताना मजा आली. घाटांतल्या वळणावळणांवरून निसर्गाचं रूप टिपत आम्ही डोंगरावर पोचलो. भुलेश्वरच्या मंदिरापर्यंत गाडी जात असली, तरी शेवटचा रस्ता फारच खराब आणि तीव्र चढणीचा आहे. मंदिर पाहिल्यानंतर होता नव्हता तो थकवा पळून गेला.

मला

गावातली, भोंदू भाविकांच्या गर्दीनं घुसमटलेली मंदिरं आवडत नाहीत. त्यापेक्षा गावकुसाबाहेरची, शांत ठिकाणची किंवा डोंगरावरची अशी मंदिरं फार आवडतात. तिथे भेट दिल्यावर खरंच काहितरी पाहिल्याचा, नीरव शांततेचा आनंद घेता येतो. मार्लेश्वर, भीमाशंकरचा परिसर, घोरावडेश्वर, ही अशीच काही आवडीची ठिकाणं. आता त्यात भुलेश्वरची भर पडायला हरकत नाही. शंकराची सगळी मंदिरं याच प्रकारात बसतात आणि ती पाहायला फार उत्सुकता वाटते.

हे

मंदिर बाराव्या शतकात बांधलं असल्याची माहिती मिळाली. अप्रतिम कोरीव काम आणि दगडी बांधकामानं मन मोहून टाकलं. मंदिरात मिणमिणते दिवे होते आणि आत फार अंधार होता. त्यातून धडपडत, ठेचकाळत चढून जायला मजा आली. भलामोठा नंदी, दगडांमधली शिल्पकला आणि प्रत्यक्ष देऊळ पाहण्यासारखं आहे. कुटुंबासह दिवसभराच्या सहलीसाठी अगदी मस्त ठिकाण. इथे पाण्याची सोय मात्र चांगली नाही. ते स्वतःच घेऊन जायला हवं.
तास
-दोन तास तिथे रेंगाळल्यावर परतीच्या वाटेला लागलो. येताना थेऊर किंवा रामदरा येथे जाऊन येण्याचा बेत होता, पण संध्याकाळचे सहा वाजले होते. तिकडे गेलो असतो तर आणखी उशीर झाला असता. घरातली ढीगभर संसारोपयोगी कामं खुणावत होती. मनस्वीचा गणवेश, बूट वगैरे खरेदी करायची होती. त्यामुळं अन्य कुठेही जाता थेट पुण्याकडे गाडी हाकली.
 

(आणखी छायाचित्रे पाहण्यासाठी इथे भेट द्या.