Aug 30, 2007

लज्जा आणि मज्जा!


बिच्चारी राखी सावंत!

काय तरी तिच्या अब्रूचे धिंडवडे!

त्या निर्लज्ज मिकानं त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिचा मुका घेतला. तोही सगळ्यांच्या देखत. बिच्चाऱ्या राखीनं आतापर्यंत कुण्णा कुण्णाला म्हणून मुका दिला नव्हता. त्याच पार्टीत आधी तिनं त्याच्या गालांची पप्पी घेतली ती केवळ आदर व्यक्त करण्यासाठी. मिकानं मुक्‍यानं तिचा अपमान केला.


बिच्चारी.

कुठ्ठं कुठ्ठं म्हणून तोंड दाखवायला जागा राहिली नाही तिला.

पण ती काही रडूबाई नव्हती. रणरागिणीच्या थाटात ती धाडसानं प्रसारमाध्यमांसमोर जाऊन उभी ठाकली. त्यांना सर्व हकीकत इत्थंभूत वर्णन केली. पोलिसांकडे जाऊन तक्रारही दिली. म्हणजे काय? सोडते की काय ही मराठी वाघीण त्या पंजाबी "लांडग्या'ला? पंजाबी असला म्हणून काय झालं, तुझी मर्दानगी तिकडं सीमेवर दाखव म्हणाव. मराठी मुलीचा असा "विनयभंग' करतोस म्हणजे काय? "तळं "राखी'ल तो पाणी चाखील' ही म्हण मिकाला माहिती असण्याचं काहीच कारण नाही. राखी कोणाचीही होऊ शकते, असा त्याचा अर्थ आहे, असं कुणी तरी त्याला सांगितलं असणार. त्यानं बाकी काही माहिती करून न घेता त्याचं अनुकरण केलं, एवढंच. राखीनं त्याच्या गालांवर पप्पी दिली, त्यानं तिच्या ओठांवर! त्यात तिचा अपमान आहे, तिच्यातल्या संवेदनशील स्त्रीच्या चारित्र्यावर घाला आहे, हे कळलंच नाही त्या मेल्याला.


ती बिचारी गरीब, साधी-भोळी मुलगी. पोटासाठी तिला आणि तिच्यासारखीच "पाठी-पोटा'ची लढाई लढणाऱ्या दीपल शॉ, सनोबर कबीर, आणि असंख्य "नटव्यां'ना काय काय करावं लागतं! गाण्याची लय, ताल आणि त्यातले भाव यांच्याशी संबंध नसलेलं नृत्य करायचं. आपल्या संगीत-तमाशाची बारी घेऊन गावोगाव हिंडायचं. प्रेक्षकांची गरज आणि मागणी म्हणून त्यांना हवे तसे हावभाव करायचे. त्यातून काय दोन-चार पैसे गाठीला येतील ते कुटुंबीयांसाठी, स्वतःसाठी राखून ठेवायचे. पुरेसे कपडेही घालायला परवडत नाही बिचाऱ्यांना. वर पोलिसांचा, संस्कृतिरक्षकांचा ससेमिरा आहेच. गरिबी, आधुनिक नृत्य कशाशी खातात, हे ठाऊक नसलेल्यांनी सार्वजनिक भावना लक्षात न घेता "अश्‍लील अश्‍लील' म्हणून एकीकडे त्यांच्याविरुद्ध तुरुंगात जायचं. त्यांनी घाबरून व्यवस्थित कपडे घातले, तरी दुसऱ्या ठिकाणच्या प्रेक्षकांनी "पैसा वसूल न झाल्याची' बोंब ठोकायची. सगळीच गोची.


त्यातून राखी पडली बिचारी मराठी पोरगी. "बुरसटलेल्या विचारां'च्या लोकांच्या समाजात वावरणारी. आपल्यातली एक मुलगी अटकेपार झेंडे लावतेय, केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला आपल्या तालावर नाचायला लावतेय, याचा अभिमान मिरवण्याऐवजी तिचे पाय ओढण्यात धन्यता मानणारेच अधिक. मग तिनं हिंदी चित्रपटसृष्टीच्या महासागरात "स्ट्रगल' करावा तरी कुणाच्या बळावर? आता करत असेल ती अश्‍लील हावभाव. केलं असेल अंगप्रदर्शन. अगदी कमरेचं सोडून डोक्‍याला गुंडाळलं असेल. पण एक मराठी मुलगी एवढं पुण्ण्याचं ("पुण्या'चं नाही!) काम करतेय, अवघी चित्रपटसृष्टी व्यापून राहिलेय, याचं काहीच कौतुक नाही तुम्हाला? ती म्हणतेच, "अगर अपनी फिल्में दाल हैं, उसमे मेरे "आयटेम सॉंग'का डाल दे, तो उसमें "तडका' लग जाता है.' आपली मराठी लवंगी मिरची "दाल तडक्‍या'लाही पुरून उरलेय, याची कुठे तरी जाणीव नको?


अमेरिका चंद्रावर पोचलीय. तुम्ही डोंगरावर किती दिवस राहणार? बिच्चाऱ्या त्या माधुरी दीक्षित, ऊर्मिला मातोंडकर, मधू सप्रे, उज्ज्वला राऊत, सोनाली बेंद्रे, वर्षा उसगावकर याच जुनाट विचारांशी लढत राहिल्या. आता नव्या दमाची मराठी मुलगी नव्या जोमानं लढायला सज्ज झाली आहे. "राखी' हे नाव घेतल्यावर बहिणीविषयीचा आदर, प्रेमाची जशी पवित्र भावना आपल्या मनात दाटते, तसंच पवित्र काम राखी सावंत करत आहे. "अश्‍लील, बीभत्स,' असे टोमणे मारून तिची उमेद खच्ची करू नका. जरा डोळे उघडून बघा. बुरसटलेले विचार झटकून टाका. टीव्ही वाहिन्यांनी तिच्या वादाचं दळण थांबवलं असेल, तर तिचे विचार ऐकायला "मुक'लेले तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. आता तरी तिच्या अंगविक्षेपांचा, अंगप्रदर्शनाचा वेगळ्या "अंगा'नं विचार करा. त्यातली आधुनिकता, सौंदर्य तुम्हालाही सापडेल!


तथास्तु!

1 comment:

Abhijit Zope said...

बरोबर आहे मानूं तर क्नोनी तरी कविता लिहाली आहे ......

भरुन आले आसमंत,
रडू लागले संत,
महाराष्ट्राची खंत,
राखी सावंत.

राखी आणि मिका,
दोघांची एकच भूमिका,
राखी म्हणते, "मिका नको."
मिका म्हणतो, "मी का नको??"

मिका म्हणाला राखीला:

र र राखी
म म मका
मी तुझा मिका
दे मला मुका

मी मराठी, तू मराठी, झी मराठी, अरेरे आणि राखी पण मराठी