Dec 25, 2008

सादरीकरण वजनी; हिंसेच्या "भजनी'!

आमीर खानचा हेअरकट, डोक्‍यावरच्या आघाताचं गूढ आणि शीर्षकाचा अर्थ एवढी रहस्यं "गज़नी'ला आहेत। भरपूर मालमसाल्यात घोळवून ही रहस्यं प्रेक्षकांपर्यंत पोचवून दणदणीत मनोरंजन देण्यात "गज़नी' 200 टक्के यशस्वी झाला आहे. तरीही मूळ घटनेचं रहस्य सांगेपर्यंत ताणलेली आणि सांगितल्यानंतर सरळसोट धावणारी कथा आणि नायकाच्या अचाट ताकदीबाबत दाखविलेलं "(पुरुष)दाक्षिण्य' यामुळं हा चित्रपट झेपणं प्रत्येकाच्या पचनशक्तीवर अवलंबून आहे. मात्र अतिहिंसेच्या "भजनी' लागला नसता, तर चित्रपट आणखी "वजनी' झाला असता.
ही एक अगदी सर्वसाधारण सूडकथा आहे; पण वेगळ्या प्रकारे सादर केलेली। संजय सिंघानिया (आमीर खान) हा एका बड्या मोबाईल कंपनीचा मालक. त्याचं कल्पना (असीन) या नवोदित मॉडेलशी अपघातानं प्रेम जमतं. ते पुरेसं फुलण्याआधीच चित्रपटातला परमोच्च बिंदू असलेला "तो' आघात होतो. नंतर संजयचं आयुष्य बदलतं. त्याला पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काळ काही लक्षात राहत नाही, म्हणून तो अंगभर आणि घरभर प्रदर्शन सूचनांची रांगोळी घालून ठेवतो. त्याच्या सूडाचा हा प्रवास.
कथेचं सादरीकरण दाक्षिणात्य स्टाइलचं; तरीही भन्नाट! चित्रपटातल्या मूळ घटनेपर्यंतचा प्रवास वेगानं होतो। संजय-कल्पनाचं प्रेमप्रकरण हा चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भाग बॉलिवूडपटांपेक्षाही वरच्या पातळीचा. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीच्या (जिया खान) प्रयत्नांतून नायकाचं आयुष्य मध्यंतरापर्यंत अतिशय परिणामकारकपणे प्रेक्षकांसमोर उलगडत जातं. त्यानंतर मात्र तो आघात आत्ता घडेल, मग घडेल, अशा प्रतीक्षेत प्रेक्षकाला एक-दोन गाणीही घुसडून बरंच टांगलं जातं. प्रत्यक्ष आघाताचा प्रसंग अंगावर काटा आणणारा असला, तरी सहृदय लोकांना न पाहवणाराच!
त्या बहुप्रतीक्षित प्रसंगानंतरचा प्रवास मात्र अगदीच सरधोपट आहे। एकदा फक्त नायकाकडच्या सगळ्या नोंदी पुसून त्याची स्मृती घालविण्याचा प्रयत्न केला जातो, तेवढंच काय ते वेगळेपण! बाकी, दाक्षिणात्य चित्रपटाचा "रीमेक'च असल्यानं दिग्दर्शक ए. मुरुगदास यांनी तिकडचा आततायी हिंसाचार, ढणढणाटी संगीत, रक्ताचा सडाबिडा व्यवस्थित घातला आहे, फक्त थोडा सौम्य रूपात!
बडा उद्योगपती असलेल्या नायकाला चेहऱ्यानं (पोलिसांसकट!) कुणीच कसं ओळखत नाही, त्याची स्मरणशक्ती गेल्यानंतर कंपनीचे लोक त्याला एकटे कसे सोडतात, डझनभर लोकांना यमसदनाला धाडल्यानंतरही तो लगेच बाहेर कसा येतो, वगैरे चुका सोडून देण्याजोग्या।
दहा-बारा लोकांना एका वेळी लोळवू शकेल, एवढं पटवून देण्याजोगं विक्राळ रूप आमीरने धारण केलंय, हे मात्र खरं! एकाच वेळी सरळमार्गी माणूस आणि नंतर सूडानं पेटलेला रक्तपिपासू महामानव त्यानं परिणामकारक सादर केला आहे। (पण तो आलिशान ऑफिसातही शर्टाच्या अर्ध्या बाह्या वर करून चालतो. बहुधा चाहत्यांची गरज म्हणून!) नवोदित असीन अतिशय उत्स्फूर्त आणि प्रसन्न. प्रदीप रावतने क्रूरकर्मा खलनायक उत्तम साकारला आहे. चित्रपटाच्या इतर दर्जाच्या बाबतीत ए.आर. रेहमानचं संगीत अगदीच सुमार.
हिंसक दृश्‍यांबद्दल माफ केलं, तर आमीरच्या शिरपेचात "गज़नी'चा आणखी एक तुरा खोचायला हरकत नाही!

1 comment:

Unknown said...

Aamir ha mehanati ani guni kalakar aahe. Kharetar prasiddhichya ugach pathi dhavanyachi tyala garajach nahi. Mi tyachi pankha vaigare nahi pan Salman sarakhi etar makade pahili tar tyache vyaktimattva barech uthun disate asech mhanave lagel.