Jun 14, 2009

चला जेजुरीला जाऊ...

jejuri1
नव्या अल्टोची पहिली अधिकृत ट्रिप तशी शिरगाव-प्रतिशिर्डीला झाली होती. पण ती पूर्ण वेळेची ट्रिप नव्हती. म्हणून गेल्या रविवारी जेजुरीला जायचं ठरवलं. जेजुरी हे काही फार आकर्षणाचं केंद्र नव्हतं, पण घरच्याही काही जणांना पाहायचं होतं, म्हणून तिकडे जाण्याचा बेत पक्का झाला.

सकाळी आठला निघायचा बेत पक्का करून साडेनऊपर्यंत निघालो. गाडीची प्रवासी क्षमता पूर्ण झाली होती. आमची लाडकी कन्या पुढची सीट अडवून बसली होती. जाताना सिंहगड रस्त्यानेच निघालो आणि देहूरोड-कात्रज बायपासवर गाडी घेतली. माझं रस्त्यांचं ज्ञान अगाध! गाडीच्या आणि ड्रायव्हिंगच्या नादात मस्त नवा बोगदा वगैरे पार करून खेड शिवापूरच्या जवळ आलो, तेव्हा कळलं, आपल्याला कात्रजमधून कोंढव्याला जायचं होतं!

पुन्हा कात्रजचा घाट उतरून जावंसं वाटेना. बराच पुढेही आलो होतो. म्हणून पुढे थांबून चौकशी केली. खेडशिवापूर दर्ग्यापासून थेट सासवडला जाण्याचा एक खुश्‍कीचा मार्ग असल्याचं कळलं. मग त्या दर्ग्याची दोन-तीन ठिकाणी चौकशी केली. कुणी एक किलोमीटर सांगितलं, कुणी चार किलोमीटर! शेवटी अपेक्षित तेच घडलं. तो दर्गा आणि त्याजवळची कमान की काय ती...ओलांडून आम्ही पुढे गेलो. तिथून पुन्हा वळता येईना. मग शेवटी नारायणपूरमार्गेच सासवडला जाण्याचा निर्णय घेतला. फुक्कटचा 45 रुपयांचा टोल भरावा लागला!

सासवडमार्गे जेजुरीला पोचायला साडेअकरा वाजले. जेजुरीत गाड्यांचा आणि गर्दीचा भयंकर राडा होता. रस्त्यात लोकांचा महापूर होता. त्यातून मार्ग काढत गाडी हाकावी लागत होती. पार्किंगची खासगी जागा पण दिव्यच होती. मी लग्नाआधी जेजुरीला गेलो होतो, तेव्हा मागे बऱ्याच अंतरावर चालत जाऊन कडेपठारापर्यंतही जाऊन आलो होतो. या वेळी उन्हामुळे आणि उशीर झाल्याने तो बेत रद्द करावा लागला.

jejuri2
जेजुरी मंदिरात दर्शनासाठी भलीमोठी रांग होती. त्यातून आमच्याजवळ तीन-तीन पोरांची लटांबरं होती. मग दर्शन न घेता, थोडा वेळ टेकून काढता पाय घेतला. येताना वाटेत पहिले एक-दोन ढाबे टाळून तिसरं हॉटेल पकडलं. तेही दिव्यच होतं. रोटी आणि काहीबाही भाजी अशी "मेजवानी' झाली. येताना मात्र कुठेही न चुकता, दिवेघाटमार्गे पुण्यात चारपर्यंत आलो.

jejuri3
ट्रिप तशी बरी झाली, पण फार "छान' नाही. अल्टो बरीच लांबवर पहिल्यांदाच चालवली, तो एक आनंददायी अनुभव होता. पण पाचवा गिअर टाकायला काही फारसं झेपलं नाही. बहुधा, पाचवा समजून मी तिसराच गिअर टाकत होतो! पुढच्या वेळी नव्यानं प्रयत्न करायला हवा. एसीदेखील चटकन काम करत नव्हता. पहिल्या सर्व्हिसिंगपर्यंत थांबून नंतर निर्णय घ्यायला हवा!
पुढची ट्रिप कुठे करावी, याचा सध्या विचार करतोय!

Jun 8, 2009

महिलाराज!

कामातून जरा निवांत वेळ काढून शरद यादव आज सकाळीच पाटण्यात फेरफटका मारायला निघाले होते. नितीशकुमार मुख्यमंत्री झाल्यापासून यादव तसे जरा अलिप्तच वागत होते. कुणी त्याला पक्षांतर्गत मतभेद म्हटलं, कुणी मत्सराचं नाव दिलं, तर कुणी "नेतृत्वाला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा मोठेपणा' असं नाव दिलं. काहीही असो, पूर्वीच्या जनता दलाच्या काळात शरद यादव या नावाला जे वजन होतं, ते आता राहिलं नव्हतं, हे मात्र खरं.
यादवांना आज जरा लोकांची मनं जाणून घ्यायची होती. "लालूराज' संपल्याच्या खुणा पाहायच्या होत्या. नव्या सुशासनाचा सुनियोजित कारभार स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवायचा होता. लोकसभेच्या प्रचाराच्या धामधुमीत त्याकडे लक्ष द्यायला जमलं नव्हतं. त्यातून त्यांच्याच पक्षातल्या फर्नांडिसांनी बंडाचं निशाण रोवून पक्षाच्या नाकीनऊ आणलं होतं. त्यांना निवृत्तीच्या वाटेला लावण्याची मोठी जबाबदारी यादवांनी पार पाडली होती. त्यामुळं त्यांना आता हायसं वाटत होतं.
बाजारपेठेतून चक्कर मारता मारता त्यांच्या असं लक्षात आलं, की काही वर्षांपूर्वीचं दहशतीचं सावट कुठच्या कुठं पळून गेलंय. नियमित व्यवहार सुरू आहेत. मुलं एकमेकांचा हात धरून शाळेत एकटी निघाली आहेत. आवश्‍यक तिथं पोलिसांचा पहारा आहे.
"चला, संयुक्त जनता दलाच्या राज्यात तरी गुन्हेगारी संपली, हे एक बरं झालं!' यादवांनी समाधानाचा सुस्कारा टाकला. पण जसजसे ते पुढे जाऊ लागले, तसतसं त्यांना वातावरण काहीसं वेगळं जाणवू लागलं. दुकानात सगळीकडे बायकाच वस्तू विक्री करीत होत्या. किराणा मालाच्या दुकानापासून मॉलपर्यंत आणि पार्लरपासून हार्डवेअरपर्यंत, सगळीकडे बायकाच बायका! सायकल आणि स्टोव्ह रिपेअरिंगसाठीही बायकाच होत्या!
काहीतरी गडबड आहे की काय, याची शहानिशा करायला यादव पोलिस ठाण्यात गेले, तर तिकडेही सगळ्या बायकाच! अस्वस्थ होऊन यादव बाहेर आले. बिहार बदललाय, अशी चर्चा त्यांनी ऐकली होती; पण सगळीकडे बायकांचं राज्य असण्याइतपत परिस्थिती आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. तरतरत ते तसेच घराकडे निघाले. सोबतच्या कार्यकर्त्यांची मागून पळताना दमछाक झाली.
काही निष्ठावंत लगेच घरी दाखल झाले. यादव घामाघूम होऊन घरी पोचले. सकाळच्या फेरफटक्‍याचा प्रसन्न मूड कुठच्या कुठं पळून गेला होता. आता काय बोलावं नि करावं, कुणालाच सुचत नव्हतं. कुणी त्यांना थंड पाणी दिलं, कुणी कोल्ड्रिंक आणून दिलं. कुणी सरबताचा पेला पुढे केला. कुणी फॅनचा स्पीड वाढवला. यादवांचं कशातच लक्ष नव्हतं.
""मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसात फोन लावा!'' यादव कडाडले.
लगेच फोन लावण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू झाली. पण प्रयत्न करूनही फोन लागेना, तसे यादव आणखी अस्वस्थ झाले. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर फोन लागला.
""मी शरद यादवांकडून बोलतोय. साहेबांना सीएमशी बोलायचंय!'' कार्यकर्त्यानं प्रस्तावना केली.
सीएमनी फोन घेतला. यादवांनी त्या कार्यकर्त्याकडून रिसीव्हर जवळपास ओढूनच घेतला.
""बोला!'' पलीकडून कुण्या महिलेचा आवाज आला.
""सीएम आहेत का? मला त्यांच्याशीच बोलायचंय.'' यादव गुश्‍श्‍यात म्हणाले.
""मी सीएमच बोलतेय.'' पलीकडून आवाज आला.
""अहो, काय चेष्टा करताय? तुम्ही नितीशकुमारांना फोन देता का?''
""नितीशजी आता सीएम नाहीत. त्यांनी मला सीएम केलंय. मी त्यांची पत्नी!'' फोनवरून खुलासा झाला.
यादवांच्या हातून रिसीव्हर गळूनच पडला. म्हणजे? नितीशकुमारांनी पण लालूंच्याच पावलावर पाऊल ठेवून बायकोला वारसदार केलं की काय? पक्षातल्या इतर नेत्यांना काही किंमतच नाही? या महिला एवढ्या डोईजड कशा झाल्या? महिला आरक्षण विधेयकामुळे?
""नाही नाही! मी हे होऊ देणार नाही! महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झालं, तर मी सभागृहात विष प्राशन करेन!'' यादव गरजले.
त्याच क्षणी त्यांची तंद्री भंगली. आपण घरी नाही, तर संसदेत आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं. "मघाचं सगळं स्वप्न होतं तर!' ते मनाशी म्हणाले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती...

May 31, 2009

स्टॅलिनशाही!

चेन्नईतल्या आपल्या निवासस्थानी करुणानिधी ऐटीत आपल्या सिंहासनावर बसले होते. पक्षाच्या आमदार-खासदारांची गर्दी झाली होती. करुणानिधींच्या सिंहासनाच्या डावीकडे होते त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अळगिरी. त्यापलीकडे नातू दयानिधी मारन. उजवीकडच्या बाजूला पहिल्याच खुर्चीत होते त्यांचे दुसरे पुत्र स्टॅलिन. पलीकडे मुलगी कनिमुरी.
सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत होते. विषय गंभीर होता. काही झालं तरी तमीळ अस्मितेचा प्रश्‍न होता! तमिळनाडूच्या जनतेनं टाकलेल्या विश्‍वासाला पात्र ठरतील असेच प्रतिनिधी दिल्लीत पाठवणं आवश्‍यक होतं. करुणानिधींनी एकेकाला मत विचारायला सुरवात केली. पण कुणीच काही बोलायला तयार नव्हतं. पक्ष ठरवेल ते धोरण स्वीकारण्याची त्यांची तयारी होती. गेल्या वेळी "नापास' ठरवलेल्या टी. आर. बालू या विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षेला बसण्याची इच्छा होती, पण दिल्लीतल्या हेडमास्तरांनीच त्याचं नाव नाकारल्यानं त्याचा इलाज चालत नव्हता. त्यानं एकदा चोरून हात वर करण्याचा प्रयत्न केला, पण करुणानिधींनी गॉगलआडच्या डोळ्यांनीच त्याला दटावलं. बालू आपला पुन्हा शहाण्या "बाळू'सारखे...आपलं.. बाळासारखे गप्प बसले.

कुणाचीच इच्छा नाही असं दिसल्यावर करुणानिधींनी पुन्हा एकदा सर्वांना संधी द्यायचं ठरवलं. तरीही कुणी हात वर करायला तयार होईना. ""ठीक आहे. कुणाचीच तयारी नसेल केंद्रात जायची, तर मला पक्षाचा प्रमुख म्हणून काहीतरी भूमिका घ्यावीच लागेल. दयानिधी गेल्या वेळीही सरकारमध्ये होता. तो केवळ माझा नातू म्हणून नव्हे, तर एक नेता म्हणून महत्त्वाचा आहे. त्याला यावेळीही केंद्रात पाठवू.'' करुणानिधी म्हणाले.
सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला.

""दूरसंचार क्षेत्रातली नवी क्रांती आमच्या पिढीला काही झेपत नाही. तिथे नव्या दमाचे लोक हवेत. आपण ए. राजाला पाठवू. चालेल?''
सगळ्यांनी पुन्हा गजर केला.

""आता अजून एक कॅबिनेट शिल्लक आहे. आहे का कुणाची इच्छा?'' करुणानिधींनी चौफेर नजर टाकली.
कुणाचाच आवाज आला नाही.

""ठीक आहे. पुन्हा एकदा मलाच हा निर्णय घ्यायला हवा. बाळ, तुला आहे का इच्छा केंद्रात जायची?'' करुणानिधींनी स्टॅलिनला विचारलं.
""नाही बाबा. मी राज्यातल्याच जनतेची सेवा करणार. मला पदबिद नको.''
""बरं. मग बाळ अळगिरी, तू दादा ना? जाशील का तू दिल्लीत?''
""ठीक आहे बाबा. जशी तुमची आज्ञा.'' अळगिरीनं नम्रतेनं होकार भरला.
""बाबा, मी पण जाणार दादाबरोबर!'' पलीकडे बसलेली कनिमुरी एकदम ओरडली.
""थांब. एकेकाला पाठवू आपण. तुला पण पाठवू हां पुढच्या वेळी!'' करुणानिधींनी समजूत काढली.
""बाबा, दादा केंद्रात जाणार असेल, तर तुम्हाला इथे एकटं एकटं होईल. शिवाय तुमची तब्येतही बरी नसते हल्ली. तुम्हाला मदत करायची इच्छा आहे माझी.'' स्टॅलिन करुणानिधींचं उपरणं खेचत म्हणाला.
""असं म्हणतोस? राज्याच्या कारभारात मलाही कुणाची तरी मदत हवीच आहे. मग उपमुख्यमंत्री होतोस का तू?''
""चालेल बाबा!''
""ठीक आहे. ठरलं तर. चला, सगळे निर्णय लोकशाहीनं झाले, हे एक बरं झालं!'' करुणानिधींनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आणि सगळे नेते पांगले.

May 22, 2009

`गाडी` घसरली, सावरली...

साडेसाती एकदा मागे लागली, की तिचं समाधान होईपर्यंत पिच्छा सोडत नाही। गाडी बिघडण्याची साडेसाती अशीच गेले काही दिवस मागे लागली होती. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी पिडल्यानंतरच तिनं पाठ सोडली.
आमची मारुती गाडी चालकासह घेऊन आई-वडील रत्नागिरीहून इथे पुण्याला आले होते. माझी मावशीही सोबत होती. त्यांच्यासाठी म्हणून मी रजा टाकली होती. दुसऱ्या दिवशी रांजणगावला जायचा बेत आखला. साधारण 11 वाजता निघालो. घरापासून निघून पुढच्याच चौकात आलो होतो, तर पोलिसांनी गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला. मी तर सिग्नल तोडला नव्हता, की झेब्रा क्रॉसिंग तुडवले नव्हते. "अपराध माझा असा काय झाला,' अशा पवित्र्यात मी भांडण्याच्या तयारीत होतो. तेव्हा समजलं, की सीटबेल्ट लावला नसल्यानं मला अडवण्यात आलंय. हे प्रकरण नवीन होतं. पुण्यात बेल्ट अत्यावश्‍यक आहे वगैरे ऐकलं होतं, पण पुण्यात कार चालविण्याची कधी वेळच आली नव्हती. प्रत्यक्षात आज आली आणि प्रथम ग्रासे मक्षिकापात जाहला. निमूटपणे काहीतरी कारणं सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शेवटी हो-नाही करता करता 50 रुपयांत मांडवली झाली. हुश्‍श करून पुढच्या प्रवासाला लागलो. पण पहिला अपशकुन झाला होता...जाताना प्रचंड रहदारी आणि रांगांमुळे पोचण्यास वेळ लागला. दुपारी जेवण करून निघालो. गाडी सुरू करण्यासाठी आलो, तर किल्लीच फिरेना. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर ती कशीबशी फिरली. गाडी सुरू झाली. येताना वाटेत दोन-तीनदा गाडी वेगात असताना अचानक बंद पडली. काय भानगड झाली, कळेना. बरेचदा किल्ली फिरवल्यानंतर ती पुन्हा सुरू होत होती. मला संध्याकाळी पाचला ऑफिस गाठायचं होतं. त्यामुळं पुण्यापर्यंत जाऊ आणि उद्या बघू, असं ठरवलं. शेवटी तीन-चारदा बंद पडून कोरेगाव भीमामध्ये पोचल्यानंतर गाडी हटूनच बसली. काही केल्या पुन्हा सुरू होईना. तिथे मेकॅनिक शोधणं भाग होतं. शिवाय, ऑफिसमध्ये माझ्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्याची दुहेरी जबाबदारीही सुरू झाली. फोनाफोनी करून काही व्यवस्था होते का, ते पाहिलं.
कोरेगाव भीमामध्ये मेकॅनिक शोधणं जिकिरीचं काम होतं. नशीबानं आमची गाडी बंद पडली, तो मुख्य बाजार होता. तिथेच जवळ एक गॅरेज होतं. तिथे जाऊन मेकॅनिकला गाठलं. त्यानं तपास केल्यावर बॅटरीतलं पाणी पूर्ण संपल्याचं निष्पन्न झालं. बाटलीभर पाणी ओतल्यानंतर भस्सकन वर आलं. मघाशी आम्हीही बॅटरीतलं पाणी तपासलं होतं....पण ते होतं ड्रायव्हर सीटखालचं. ते "वायपर'चं पाणी होतं, हे त्या मेकॅनिकनं सांगितल्यावर समजलं. पाणी पूर्णपणे संपल्यामुळे गाडी गरम झाली होती आणि बंद पडत होती. रबर कीटही जळालं होतं. गाडी लगेच दुरुस्त होणं शक्‍यच नव्हतं. तिथेच सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आमच्या तिथल्या एका सहकाऱ्याला साकडं घातलं आणि तेही देवासारखे धावून आले. त्यांच्याच गाडीतून मग आम्ही सगळे पुण्याला अगदी घरापर्यंत आलो.दुसऱ्या दिवशी बसने जाऊन गाडी घेऊन येण्याचा उद्योग करावा लागला. या सगळ्या प्रकरणात सुमारे दीड हजार रुपये खर्च झाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत गाडी बाहेर काढली नव्हती. संध्याकाळी बाजारात जाण्याची तयारी सुरू होण्याआधी एक छोट्या फेरीसाठी गाडी बाहेर काढली. येताना सोसायटीत आल्यावरच गाडी पुन्हा रुसली. गिअर पडत नव्हते आणि रेझ मात्र खूप होत होती. क्‍लचची गोची झाली होती. गाडी बाजूला लावून रिक्षानं जावं लागलं. त्यापुढच्या दिवशी ते काम करून घेतलं. तूर्त काम झालं होतं, तरी धाकधूक होतीच. रत्नागिरीपर्यंतचा प्रवास करायचा होता. सुदैवानं त्यानंतरच्या प्रवासात गाडीनं काही त्रास दिला नाही.
...पण माझ्या नेहमीच्या बाईकनं ती कसर भरून काढली। तिसऱ्याच दिवशी संध्याकाळी सातच्या एका मराठी चित्रपटाच्या प्रिमिअरला निघालो होतो। सिटीप्राईडच्या थोडेच अलीकडे बाईक अचानक पंक्‍चर झाली. तिथे दुकान शोधून पंक्‍चर काढून घेण्याएवढा वेळ नव्हता. गाडी तशीच रस्त्याच्या कडेला लावली. चित्रपट पाहिला. नंतर नऊ वाजता पंक्‍चरच्या दुकानाची शोधाशोध सुरू झाली. कुणी दुकान सोडून दुसरीकडे गेलेला होता, कुणी बंद करण्याच्या मार्गावर होता, कुणी येण्यास तयार नव्हता. कर्वे रोड फ्लायओव्हरपर्यंत फिरण्याची दगदग केली. काहीच उपयोग झाला नाही.रात्री पत्रकार परिषदेला जायचं होतं. ती आटोपल्यावर गाडी ढकलत घरी न्यावी, असा विचार केला. पण दोन-अडीच किलोमीटरचं अंतर होतं. रात्री अकराला एवढी गाडी ढकलणं म्हणजे दिव्यच होतं. हॉटेलातून मनाचा हिय्या करून निघालो खरा, पण अर्ध्या वाटेतच विचार बदलला. पुन्हा एकदा नशीबावर हवाला ठेवून गाडी उभी केली होती तिथेच रात्रभर सोडून चालत घरी आलो. सकाळी पंक्‍चर काढून घेण्याचं काम फारसं कठीण नव्हतं.दोन्ही गाड्यांनी असा मला मनसोक्त त्रास दिला, तेव्हाच त्यांची मनःशांती झाली.
---
असो। यंदाच्या कोकण दौऱ्यात दोन नवीन ठिकाणांना भेट दिली। जयगडजवळच्या कोळिसरे देवस्थानाला खूप लहानपणी गेलो होतो. यंदाच्या दौऱ्यात ते जमवलं. गाडी घेऊन सर्व जण गेलो होतो. अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेलं हे ठिकाण कुणालाही हरवून टाकणारं आहे. गणपतीपुळ्याच्या रस्त्यावर, पण दहा किलोमीटर अलीकडे हे देवस्थान आहे. साधारणपणे इ.स. 150 वगैरे मध्ये त्याची स्थापना झाल्याचं सांगतात. लक्ष्मी-केशवाची मूर्ती आणि देवळाचं एकूण स्थानच डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. दोन बाजूंना डोंगर, एकीकडे दरी आणि एकीकडे नदी, अशा या स्थानी मनाला शांतता लाभते. देवळाशेजारीच कायमस्वरूपी झरा हा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो.माझ्या मामेभावाच्या सासुरवाडीला, कळझोंडी या गावालाही भेट दिली. त्यांचं घर सुंदरच होतं. कोकणात एवढं सुंदर घर मी अनेक वर्षांनी अनुभवलं. भरपूर आंबे खाल्ले. फणस मात्र यंदा वाट्याला आला नाही. एकदा बरका फणस आणून हाणला, तेवढाच. मनस्वीसुद्धा मांडी ठोकून गरे खायला बसली होती. काप्यापेक्षा बरक्‍याचंच तिला जास्त आकर्षण होतं. गणपतीपुळ्याला मात्र या वेळी गेलो नाही.आता पावसाळ्यात पुन्हा या भागात जाण्याचा विचार आहे. पाहूया!
----

ही काही प्रकाशचित्रं :
kokan1कोळिसरेचं निसर्गरम्य मंदिर.---------
kokan2मंदिराशेजारी असलेला कायमस्वरूपी झरा.-----kokan3पावसाळ्यात इथे काय धमाल येइल!---kokan5कळझोंडीचं टिपिकल कोकणी घर.--------kokan4देवळाकडे जाणारी वाट--------kokan6रत्नागिरीतला भगवती किल्ला. इथे भगवतीचं मंदिर आहे. नि अथांग पसरलेला समुद्र पण मनमोहक दिसतो. दीपस्तंभही आहे किल्ल्यावर.----kokan7किल्ल्याची भिंत.----kokan8समुद्रावर मनस्वी उंटावरून बागडली.----kokan9नंतर वाळूत मनसोक्त लोळली. ----------kokan12भरपूर भिजलीसुद्धा!----------बाकीचे फोटो पाहा इथे....

May 20, 2009

`उत्तर'क्रिया!

rajनिवडणूक निकालाची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज ठाकरे त्यांच्या नित्यक्रमाला लागले होते. नाही म्हटलं, तरी प्रचार संपूनही प्रत्यक्ष निकालापर्यंत गडबड कायम होतीच. बेरजा वजाबाक्‍यांची चर्चा सुरू होती, समीकरणं मांडली जात होती. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी तर मनसेची दिवाळीच साजरी झाली होती. पहिल्याच निवडणुकीत अनेक उमेदवारांनी लाख-दीड लाख मतांपर्यंत बाजी मारली होती. अधिक जोर लावला असता, तर आणखी काही जागा जिंकलोही असतो, अशी परिस्थिती होती. लोकांच्या अगदी "मनसे' प्रतिसादामुळं सगळेच भारावले होते. राजसाहेबांनाही मतदारांनी दाखविलेल्या प्रचंड अभिमानाबद्दल श्रमांचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांतही त्यांच्या कर्तृत्वाचं, पक्षाच्या यशाचं गुणगान आलं होतं. ते वाचतानाही राजसाहेब प्रसन्न हसले. आपल्या लाडक्‍या कुत्र्याला त्यांनी गोंजारलं. नेहमीप्रमाणं त्याला सकाळी फिरायलाही नेऊन आणलं. शुभेच्छांचे फोन निकालाच्या सकाळी जे सुरू झाले, ते रात्री बारा-साडेबारापर्यंत सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळीही हा "सिलसिला' संपला नव्हता. अनेकांच्या शुभेच्छा झेलत झेलतच राजसाहेबांनी आन्हिके उरकली. तेवढ्यात कुणा नेत्याचाच फोन आला.
""लक्षात ठेवा. एवढ्या यशानं हुरळून जायचं नाही. बाकीचे नालायक पक्ष लोकांना नको आहेत, हे त्यांनी दाखवून दिलंय. आता विधानसभेला अजिबात गाफील राहू नका. विजय आपलाच आहे!'' त्यांनी करड्या आवाजात सुनावलं. आपण अभिनंदन करायला फोन केला, की नेहमीची दटावणी ऐकायला, असाच प्रश्‍न त्या बिचाऱ्या नेत्याला पडला असावा.
""असो. बोला, तुमचं काय काम होतं ते!'' राजसाहेब म्हणाले.
पलीकडून बोलणाऱ्यानं त्याचं काम सांगितलं.
""सत्कारच ना? मी फार सत्कार-बित्काराच्या फंदात पडणारा माणूस नाही. पण पक्षाची ताकद सिद्ध झालेय. त्यानिमित्तानं मी सत्कार स्वीकारायला तयार आहे. कुठे आहे कार्यक्रम?''
""मुंबईतच आहे साहेब!'' कार्यकर्त्यानं सांगितलं.
""ठीक आहे. येईन मी. पण वेळेत सुरू करा आणि वेळात आटपा. बरीच कामं बाकी आहेत.'' राजसाहेबांनी पुन्हा सुनावलं.
पुढचे काही दिवस शुभेच्छा आणि अभिनंदनं झेलण्यात गेले. इतर पक्षांची संसदीय समितीची बैठक होते, तशी मनसेची लोकसभेतल्या सर्व (पराभूत) उमेदवारांची बैठक झाली. विधानसभेसाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली.
असेच काही दिवस धामधुमीत गेले आणि प्रत्यक्ष सत्काराचा दिवस उजाडला. सगळी तयारी झाली होती. राजसाहेब मोठ्या प्रसन्न मुद्रेनं सत्काराच्या ठिकाणी गेले. कार्यक्रमाची आखणी भव्य स्वरूपाची होती. मात्र, सुरुवातीपासून संजय निरुपम, गुरूदास कामत आणि अन्य काही नेत्यांची छायाचित्रं बघून ते काहीसे अस्वस्थ झाले. उत्तर भारतीय संघटनांच्या नावांच्या पाट्याही ठिकठिकाणी झळकत होत्या. "मनसेची ताकद पाहून उत्तर भारतीयही वठणीवर आले की नाही! माझ्या सत्कारातही त्यांनी अभिनंदनाच्या पाट्या लावल्या आहेत!!' राजसाहेब मनाशीच म्हणाले.
कार्यक्रमाचं स्वरूप थोडं निराळं होतं. आधी राजसाहेबांचं भाषण आणि नंतर सत्कार, अशी रचना होती. बाकीच्या नेत्यांची भाषणं झाल्यावरच राजसाहेब सभास्थळी आले होते. आल्याआल्या काही मिनिटांतच त्यांचं भाषण सुरू झालं. नेहमीप्रमाणे मनसेची गरज, ताकद, मतदारांनी दाखविलेला विश्‍वास, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं कार्य, याविषयी ते बोलले. मग ओघानंच बिहारी आणि उत्तर भारतीय नेत्यांवर आणि लोकांवर त्यांनी आग ओकायला सुरवात केली. व्यासपीठावरचे अन्य लोक काहीसे अस्वस्थ झालेले आढळले. लोकांमध्येही टाळ्या-शिट्ट्या आणि जल्लोषाऐवजी अस्वस्थता दिसत होती. तेवढ्यात कुणीतरी राजसाहेबांचा शर्ट ओढला. "इन' बाहेर आल्यानं ते थोडेसे संतापलेले दिसले.
""साहेब, उत्तर भारतीयांवर आणि बिहारींवर जास्त टीका करू नका. त्यांनीच हा सत्कार आयोजित केलाय! मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या प्रचंड मतांमुळेच मुंबईत युतीचे उमेदवार पडले ना, म्हणून!'' तो कार्यकर्ता कुजबुजला.
""काय?'' राजसाहेब उडालेच. मग त्यांची नजर व्यासपीठावरच्या फलकांकडे गेली. "उत्तर भारतीय और बिहारी उम्मीदवारों को लोकसभा पर प्रतिनिधित्व देने में मदद के लिये "मनसे' का धन्यवाद' असे लिहिले होते!!