Feb 17, 2009

शीर्षकाने केला घोटाळा

काही परीक्षणं लिहायला जाम मजा येते। काही अगदी रूटीन होतात. पण चित्रपटाची कथा-कल्पना आणि सादरीकरण यात काहीच संबंध नसेल, तर ती विसंगती लगेच पकडता येते. अशाच काही "जमलेल्या' परीक्षणांपैकी एक.
---
चित्रपटाच्या माध्यमातून महत्त्वाचा विषय मांडणं आणि परिणामकारक शीर्षकातून त्याला अपेक्षित परिणाम देणं हे खायचं काम नाही. `सालीनं केला घोटाळा'नं असा उत्तम परिणाम साधला आहे. `अल्ट्रा' कंपनी प्रस्तुत, भास्कर जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची कथा फिरते एका सालीभोवती. इथे `साली' ही शिवी किंवा मेहुणी या अर्थाने नाही, तर चक्क खरीखुरी केळ्याची साल आहे।
सटवाबाई (नयना आपटे) सारखी (गळ्यातील साखळीला अडकवून) केळी खात असते। तिच्या जाचाला कंटाळलेला जावई राजा गोंधळेकर (भरत जाधव) तिला मारण्याची सुपारी एका विमा एजंटाला (सिद्धार्थ जाधव) देतो। (आईशप्पथ! कुठे भेटतात असे विमा एजंट?) तिला मारताना तो तिनेच टाकलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरून पडतो। एकदा राजादेखील सासूनेच टाकलेल्या सालीवरून घसरून पडतो. आपल्या घरच्या अडचणी सोडविण्यासाठी राजा विसरभोळेंची (विजय चव्हाण) मदत घेतो. तेदेखील कधीकाळी सालीवरून (सटवाबाईने टाकलेल्या नव्हे!) घसरून पडलेले असतात.

चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला समजलेली कथा अशी. प्रत्यक्षात ही कथा संशयी पत्नी आणि धांदरट पती यांच्यातील गैरसमज आणि त्यातून होणाऱ्या गोंधळाची आहे, असं चित्रपटाचं माहितीपत्रक वाचून समजतं. या कथेचा (`शिवी'तल्या, मेहुणीतल्या किंवा केळ्याच्या) सालीशी काहीही संबंध नाही! असलाच; तर तो निव्वळ योगायोग समजावा!

सुरुवातीच्या मोलकरणीच्या दृश्‍यांपासून चित्रपट जी पकड घेतो, ती शेवटपर्यंत सोडत नाही। ही पकड मनाची की मानगुटीची, हे ज्याचं त्यानं ठरवावं। नंतर जी एकेक चित्तचक्षुवेधक आणि हास्यस्फोटक दृश्‍यं समोर येतात, त्यानं जागच्या जागी थिजून जायला होतं.चित्रपटाचं वैशिष्ट्य असं, की सालीनं केलेला घोटाळा तो हाच, असं दर अर्ध्या तासानं वाटतं. प्रत्यक्षात या घोटाळ्याचं गूढ शेवटीच उलगडतं आणि आधीचे घोटाळे कशाला दाखविले असावेत बुवा, असा प्रश्‍न पडतो.भरत जाधव, नयना आपटे, किशोरी अंबिये, विजय गोखले, शिल्पा, ऋतुजा आपटे यांनी चित्रपटाच्या प्रकृतीला साजेसा अभिनय केला आहे. सिद्धार्थ जाधवनं उगीचच वेगळेपण वगैरे जपलं आहे.

1 comment:

Anonymous said...

झकास!!

सकाळी ’सकाळ’ ला पण वाचलेलं..

:)

तिरकसपणा असा फ़ुलून आलाय की सरळ वाक्य आहे की अजून एक तिरकस बाण आहे हा विचारच करत राह्तो माणूस..
पण तरिही एका परीक्षणाचे सर्व गुण आहेत यात.
कुतुहल निर्माण करणे, कथा सांगणे, कलावंतांना दाद, इ.

आता सीडीने केला घोटाळा असे होण्याआधी थिएटरला जाऊन बघावा म्हणतो...:P