Jun 25, 2008

बोंबलेवाडीत चिअरगर्ल्स

---------
नाव बोंबलेवाडी असलं, तरी तिथं फारसं काही घडत नसे. विहिरीवरच्या भांडणांखेरीज बाकी शांतताच. म्हणायला गाव आधुनिक होतं, पण ते फक्त सरपंच हणमंतराव वाघमोडेंच्या लेखीच. जी काय आधुनिकता म्हणून होती, ती फक्त हणमंतरावांच्या घरीच. आता ती तिथं असायलाच हवी होती. हणमंतरावांच्या गेल्या तीन-चार पिढ्या राजकारणात होत्या. पणजोबा-आजोबा यांनी तर इंग्रजांच्या काळातही राजकारण गाजवलेले. हणमंतरावांच्या सांगण्यावर विश्‍वास ठेवला, तर त्यांचे आजोबाच नेहरूंऐवजी पहिले पंतप्रधान व्हायचे खरे. पण "नव्या रक्ताला' वाव देण्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त गरम न होऊ देता ते पद सोडलं.
रक्तातच राजकारण असल्यानं तो हणमंतरावांचा अगदी आवडीचा विषय. आणखी एक अत्यंत प्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्यांच्या बापजाद्यांपैकी कुणाला क्रिकेटचा गंधही नव्हता, पण हणमंतरावांना क्रिकेटचा भलताच नाद. क्रिकेटच्या विरोधात कुणी बोलायला लागलं, की हणमंतरावांचं टाळकंच सटकायचं. त्यावरून तिसरं महायुद्ध झालंच तर पाण्यावरून नव्हे, तर क्रिकेटवरूनच होईल, असं कुणालाही वाटावं.
कुस्ती हाही एक आवडता छंद होता. गावात कुस्तीचे दोन-तीन आखाडे होते. तसं ते पाच-सहाशे उंबऱ्यांचं गाव. पण खेळाच्या बाबतीत पुढे होतं. कुस्ती हा गावातला पारंपरिक आवडीचा खेळ. सरपंचपदावर पंधरा-वीस वर्षं असलेल्या हणमंतरावांच्या हट्टामुळे काही मुलं आपली क्रिकेट खेळायची, एवढंच.
अख्ख्या गावात फक्त हणमंतरावांकडेच टीव्ही. सध्याच्या "आयपीएल' स्पर्धेतल्या "चिअरगर्ल्स'नी त्यांना वेड लावलं होतं. कुठलीही नवी कल्पना आली की ती आपल्या गावात राबवायची, ही तर हणमंतरावांची खासीयत. आसपासच्या पंचक्रोशीत कुणाला क्रिकेटचा गंधही नव्हता. हणमंतरावांचे चमचेच तेवढे त्यांच्या घरी टीव्हीवर मॅच चालू असताना बघायला यायचे तेवढेच. त्यामुळं "चिअरगर्ल्स' वगैरे प्रकरण गावाला नवीनच होतं. हणमंतरावांच्या मनानं घेतलं, की यंदाच्या जत्रेत गावातल्या कुस्त्यांच्या आखाड्यात या चिअरगर्ल्स उतरवायच्या. कुस्ती लढायला नव्हे, तर मल्लांना प्रोत्साहन द्यायला. लगेच हणमंतरावांनी कल्पना ग्रामपंचायतीसमोर मांडली. गावातली कुठली तरी विकास योजनाच आहे, असं वाटून सदस्यांनीही माना डोलावल्या. बाकी, हणमंतरावांचा शब्द म्हणजे तिथं काळ्या दगडावरची रेघ होती. हणमंतरावांच्या कधी अन्‌ काय मनात येईल, याचा नेम नव्हता. गावात कुणी सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये, म्हणून जागोजागी देवाबिवांचे फोटो आणि टाइल्स लावण्याची मोहीम त्यांनी काढली. त्या खर्चात स्वच्छतागृहंच बांधून झाली असती, असं लक्षात आलं. तेव्हा हणमंतरावांनी गावात शेकडो स्वच्छतागृहं उभारली. घरांच्या संख्येपेक्षा स्वच्छतागृहंच जास्त, अशी परिस्थिती झाली होती. काही लोक तर राहती घरं सोडून स्वच्छतागृहांतच राहायला गेले.
"चिअरगर्ल्स' म्हणजे नेमकं काय? कुणाला वाटलं, कुस्तीच्या आखाड्याची डागडुजी वगैरे करायला या बाया आणणार आहेत. वाशी-पनवेल करून आलेला कुणी "या डान्स बारमधल्या मुली आहेत आणि सगळ्यांना दारू वाटणार,' अशी अक्कल पाजळून गेला. कुणाला वाटलं, मल्लांना मालिशबिलिश करायला या बाया आहेत.
चिअरगर्ल्स गावात येण्याचा दिवस उजाडला. हणमंतरावांनी सगळं गावच सजवून टाकलं होतं. दोन बैलगाड्यांतून मिरवणूक काढायचं ठरलं होतं. हणमंतरावांनी खिल्लारी बैलांच्या जोड्या मागवल्या होत्या. ते उंच, धिप्पाड बैल पाहून आधी त्या चिअरगर्ल्सच बुजल्या. मग त्यांचे कपडे बघून ते बैल बुजले. त्यांना आवरल्यानंतर पुन्हा जमवाजमव झाली.
कुस्त्यांचं मैदान चांगलंच सजलं होतं. नेहमीच्या मल्लांबरोबर आज चिअरगर्ल्सचंही आकर्षण होतं ना! गावकऱ्यांची जागा मिळवण्यासाठी एकमेकांशी लठ्ठालठ्ठी सुरू होती. मिरवणूक मैदानापर्यंत आल्यानंतर सगळ्यांनी एकच गलका केला. सगळ्या चिअर गर्ल्स खाली उतरल्या. सुवासिनींनी त्यांना ओवाळलं. हणमंतरावांनी मोजल्या - एक दोन....नऊ!
""आँ? दहा बाया बोलावल्या होत्या. नऊच कशा काय?''
मग शोधाशोध सुरू झाली. तेवढ्यात मिरवणुकीच्या मागून एक कुणीतरी बाई धडपडत, पाय ओढत येताना दिसली. अंगाला सगळा चिखल, शेण लागलं होतं. ती गावातली दिसत नव्हती. कुणाला ओळखेना. मग कुणाची तरी ट्यूब पेटली - अरे, हीच ती एक हरवलेली चिअरगर्ल! बैल उधळले, तेव्हा ती गाडीतून खाली पडली होती आणि कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं. औषधपाण्यासाठी तिची रवानगी करून मंडळी पुढे मैदानाकडे मार्गस्थ झाली.
कुस्त्यांच्या मैदानात जोश भरला होता. पहिलीच कुस्ती चुरशीची होती. बोंबलेवाडीचा परशा लोखंडे आणि खानपाटोळीचा दगडू आडदांड झुंजणार होते. चिअरगर्ल्सनी "पोझिशन' घेतली. हातातल्या झिरमाळ्या फडकावत त्या नाचू लागल्या. गावकरी मल्लांकडे बघण्याऐवजी त्यांच्याकडेच बघायला लागले. कुठल्याही मल्लानं एखादा डाव टाकला, की चिअरगर्ल्स नाचायला लागायच्या. अधेमधे त्यांच्या हातातल्या झिरमाळ्या कुणाच्या डोळ्यात जाऊ लागल्या. त्या नाचत असल्यानं पलीकडचे मल्ल दिसेना झाले. मध्येच वैतागवाडीच्या शिरप्यानं चिअरगर्ल्सवर पैसेच फेकले. त्यानं कुठंतरी डान्सबारमध्ये हे बघितलं होतं. नाचामुळं उडालेली धूळही लोकांच्या डोळ्यांत जाऊ लागली.
मध्येच एकीचा पाय चुकून दुसरीच्या पायावर पडला. ती किंचाळली. इंग्रजीत काहीतरी कचकचीत शिवीच हासडली तिनं. मग पहिलीचंही अवसान गळालं. तिनं झिरमाळ्या खेळवाव्यात तशा तिच्या झिंज्या उपटल्या. दोघी एकमेकींच्या उरावर बसल्या. गावात आणलेल्या या दहा चिअरगर्ल्स दोन वेगवेगळ्या गटांतल्या आहेत, हे कुणालाच माहीत नव्हतं. या दोघी भांडताना बघून त्यांच्या सख्याही एकेकीची बाजू घ्यायला धावल्या. मग त्यांच्यात लठ्ठालठ्ठी सुरू झाली. कुणी कुणाची तंगडी ओढतेय, कुणी केस उपटतेय, कुणी हात धरून ओढतेय, असला प्रकार सुरू झाला.
मूळची कुस्ती थांबली आणि ही नवीच कुस्ती सुरू झाली. बरं, बायामाणसंच असल्यानं कुणी त्यांना अडवायलाही पुढे येईना. लोकांना मूळ कुस्तीपेक्षा ही नवी अनपेक्षित कुस्तीच जास्त रंगतदार वाटू लागली. अगदी मूळ क्रिकेटपेक्षा "आयपीएल'सारखी करमणूक मजेदार वाटावी ना, तशीच!
पार धुळीत लोळून एकमेकींना जेरीस आणेपर्यंत ही कुस्ती रंगली. सगळे लोकही त्यांना आणखी चेव चढवत होते. शेवटी दोघीतिघींचे दात पडल्यावर आणि हातपाय मुरगळल्यावरची ही अघोषित कुस्ती थांबली. एव्हाना मघाशी गाडीतून पडलेली ती दहावी चिअरगर्ल आखाड्यात आली होती. तिच्यापेक्षा वाईट अवस्था आता या नऊ जणींची झाली होती. तिलाही त्या ओळखू येईनात. कसंबसं तिनं सगळ्यांना आवरलं. या झटापटीत तिचं अंग पुन्हा धुळीनं माखलंच.
""कुठायंत ते हणमंतराव? खेटरानंच पूजा करायला हवीय त्यांची!'' कुणीतरी कडाडलं.
मग सगळ्यांनी हणमंतरावांचा शोध घेतला. तर स्टेजच्या बाजूला हणमंतराव कलंडलेले दिसले. या अनोख्या आणि अनपेक्षित कुस्तीचा धसका घेऊन त्यांना फीट आली होती.
""कुणीतही कांदा नाहीतर चप्पल आणा रे!'' गर्दीतून एक जण ओरडला.

Jun 24, 2008

थरार-2

"थरार'च्या निमित्तानं आणखी एक घटना लिहायचीच राहिली.
त्या वेळी मी रत्नागिरीत "रत्नागिरी एक्‍स्प्रेस'मध्ये काम करत होतो. 1995 चं वर्ष असेल. आमचं ऑफिस कुवारबावला, म्हणजे एमआयडीसीत मुख्य शहरापासून सात किलोमीटरवर होतं. माझ्याकडे बजाज सुपर एफई स्कूटर होती. घरी जायला रात्रीचे अकरा वाजायचे. एकदा असाच काम संपवून घरी चाललो होतो. पावणेअकरा वाजले असतील. रस्त्याला अधूनमधून दिवे असले, तरी बाकी मिट्ट काळोख. माझ्या स्कूटरचा लाईट बाकबूक करत होता. कदाचित, कुठलीतरी वायर सैल झाली होती. पण मी फारसं लक्ष दिलं नव्हतं.
काय हौस आली कुणास ठाऊक, पण नेहमीचा गावातून जाणारा रस्ता सोडून शॉर्टकट म्हणून माळावरून जाणारा रस्ता धरला. हा रस्ता दिवसा अगदी परिचयाचा, पण रात्री तेवढाच सुनसान आणि भयाण. आसपास अजिबात वस्ती नाही आणि मोकळा माळ. त्यावरून येणारा वाराही छातीत धडकी भरवणारा. पण आमची "खाज' जरा जास्तच ना! विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याला छेद देऊन जाणारा चौक ओलांडला आणि थोडासा पुढे गेलो होतो. तेवढ्यात स्कूटरचा हेडलाइट बंद पडला. काहीही करून चालू होईना. हात मारून, धक्के देऊन, स्कूटर बंद-चालू करून पाहिलं, काहीही फायदा नव्हता. आता काय करायचं? पुढेही जाता येईना, मागेही फिरता येईना. अक्षरशः जवळून कुणी डोळ्यात बोट घातलं, तरी कळणार नाही, एवढा मिट्ट काळोख. मला काहीच सुचेना. पण भीती बीती फारशी वाटली नव्हती.
थोडा वेळ वाट बघितल्यानंतर एक ट्रक मागून येताना दिसला. मग ठरवलं, पुढंच जायचं. स्कूटर सुरू करून ठेवली. ट्रक जवळ आला तशी मी त्याच्या मागची लाइन धरली. ट्रक सुदैवानं आमच्या घराच्या दिशेनंच जाणारा होता. त्याच्या मागेमागे चाचपडत जात राहिलो. रस्ता परिचयाचा होता, त्यामुळं थोड्याशा उजेडातही मला अंदाज यायला काही त्रास नव्हता.
घरी पोचलो, तेव्हा मनात हायसं वाटलं. घरी अर्थातच काही सांगितलं नाही. नाहीतर, "कुणी सांगितले होते नसते उद्योग!' असलं काहीतरी ऐकायला लागलं असतं.
असो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हेच खरं!
---------

Jun 23, 2008

थरार!


एखाद्या ठिकाणी नवं काहीतरी साहस करून पाहण्याची आमची हौस दांडगी. त्यातून पैसे वाचवण्याची आणि अंगाला कष्ट वगैरे देण्याची स्पर्धा असेल, तर विचारताच सोय नाही! त्यातूनच कधीतरी साल्हेरवरून जीवघेण्या उतारानं पाठीवरून तोफेचा गोळा वगैरे आणण्याचं शहाणपण सुचतं.

पाच-सहा वर्षांपूर्वी आम्ही तिघे मित्र भरतपूरच्या केवलदेव अभयारण्यात गेलो होतो, तेव्हाची कथा. आमच्या एका मित्राला त्या पक्ष्याबिक्ष्यांचं फारच वेड होतं. आम्हाला दोघांना मात्र जंगलात दोन दिवस राहून कंटाळा आला होता. एके दिवशी जयपूरला जायचं ठरवलं. दिवसभर फिरून रात्री यायला उशीर झाला. अकरा वाजले. आम्ही राहत होतो, ते फॉरेस्टचं रेस्ट हाऊस अभयारण्याच्या मुख्य दाराच्या आत दीडेक किलोमीटरवर होतं. मुख्य दारापर्यंत सायकलरिक्षावाल्यानं आम्हाला सोडलं, पण आत येण्याची काही सोय नव्हती. वॉचमननं आमच्यावर उपकार करून आम्हाला आत घेतलं, पण जाणार कसं? मिट्ट अंधार होता. त्यातून त्या अभयारण्यात बिबट्याही असल्याची एक वदंता. कोल्हेबिल्हे तर होतेच! गेटवर तर रात्रभर थांबता येणं शक्‍यच नव्हतं. शेवटी मनाचा हिय्या करून जायचं ठरवलं.
आपण टरकलो नाही आहोत, असं तोडानं म्हणत आणि गप्पा मारत कसेबसे रस्त्यानं निघालो. तशी कुठलीच अडचण आली नाही, पण जाम तंतरली होती. शेवटी एकदाचं ते रेस्ट हाऊस आलं. गेटमधून आम्ही आत गेलो आणि आतापर्यंत असलेली भीती समोर उभी ठाकली. तीही अनपेक्षितरीत्या! रात्रीच्या मिट्ट काळोखात आणि थंडीत गुडूप झोपलेल्या कुत्र्यांना अचानक जाग आली. एकाच्या हाकेनं दुसरा उठला आणि सगळे वास्सकन अंगावर आले. तेवढ्यात तिथल्या वॉचमननं सगळ्यांना हुसकावून लावलं, म्हणून बरं. नाहीतर आमचा कोथळा काढायला त्यांनी मागेपुढे पाहिलं नसतं.

दुसऱ्या दिवशी आमच्या धाडसाचं तिथल्या वॉचमनसकट सगळेच कौतुक करत होते. कोल्हे मागे न लागल्याबद्दल आश्‍चर्यही करत होते. आम्ही कसा प्रवास केला, ते आमचं आम्हालाच माहीत होतं!

आत्ता ही घटना नव्यानं आठवायचं कारण म्हणजे, उटीतला नुकताच आलेला अनुभव!

तिथंही आम्ही (अर्थात, मी!) अतिशहाणपणानं धाडस करायला गेलो होतो. झालं काय, की उटीतलं साईट सीइंग आटोपून संध्याकाळी सहा साडेसहाला आम्ही गावात परत आलो. आमचं हॉटेल स्टॅंडपासून बऱ्यापैकी अंतरावर होतं आणि तिथे काही खायचं चांगलं मिळतही नव्हतं. त्यामुळं उटी लेकपाशी असलेल्या हॉटेलापर्यंत जाऊ आणि तिथून खायचं पार्सल घेऊन हॉटेलवर रिक्षानं जाऊ, असा बेत केला. चालत निघालो, पण आधी जवळ वाटलेला तो लेक काही दृष्टिपथात येईना. अर्ध्या वाटेवरून परतावंसंही वाटेना. काही हॉटेल्स मागे टाकल्यानंतर रस्ता पार सुनसान झाला आणि मी, बायको आणि कडेवर मुलगी, असे तिघेच राहिलो. रस्त्याला दिवेही नव्हते. तसे साडेसातच वाजले होते, पण उटीच्या त्या हिल स्टेशनवर ते रात्रीचे दहा वाटत होते. पुढे जाऊन हॉटेल तरी चालू असेल की नाही, अशी शंका आली. उलट्या बाजूनं येणारा एक रिक्षावालाही "साब, ऑटो..?' विचारत घुटमळून गेला. आम्ही त्याला सन्मानानं परत पाठवलं.

तसेच पुढे चालत राहिलो आणि "आत्ता या वळणानंतर आहे तो लेक' असं म्हणूनही एक-दोन वळणं झाली, तरी लेक येईना. कुठे दिवेही दिसेनात. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या एका माणसाची चालही मंदावली होती. मनात उगाच भलते विचार येऊ लागले. म्हणून मग शेपूट घालून परतायचा निर्णय घेतला. स्टॅंडच्या दिशेने तसेच उलटे फिरलो. रिक्षा पकडून थेट हॉटेलवर गेलो.

मनस्वीला काही कळत नव्हतं. ती कडेवर बसून मस्त "एन्जॉय' करत होती. येताना बाजूची झाडी आणि अंधार बघून म्हणते कशी, "बाबा, या झाडीत वाघ नाहीतर सिंह कुणीतरी असेल, बरं का!' तिला कसं समजावणार, की आधी वाघ झालेल्या तिच्या बापाचीच शेळी झाली होती आणि भीतीच्या सिंहानं तिला खाऊन टाकलं होतं...!
-----------
(ता. क. : वरील मजकुरातील अनुभव आणि छायाचित्र यांचा संबंध असेलच, असे नाही. असल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा.)