Sep 1, 2014

`येष्टी'चित!

रत्नागिरीला गणपतीला जायचं तर नक्की होतं, पण कधी जावं, कसं जावं काही ठरत नव्हतं. नेहमीप्रमाणे पुणे-रत्नागिरी येष्टी पकडून जावं, तर आपण आता एकटे नाही, दोन दोन सिरियलमधल्या डझनभर बायकांच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर आहे, ही काळजी होती. त्यातल्या कुणा बाईला मध्येच उचकी लागली तर काय घ्या, या विचारानं घालमेल होत होती. पण शेवटी जायचा निर्णय घेतलाच.

महिनाभर आधी येष्टीचं रिझर्व्हेशन सुरू झालं होतं, पण याच डायलेम्म्यामुळे नक्की दिवस ठरवायचं आणि त्यानुसार रिझर्वेशन करायचं टाळलं होतं. एकटंच कार ताबडत जावं माज करत, होऊ द्या खर्च, असाही विचार केला होता. फेसबुकावर तसं आवाहनही करून पाहिलं. पण वाह्यात कमेंट आणि ढीगभर लाइक्स पडण्यापलिकडे त्यातून काही साध्य झालं नाही. शेवटी `गड्या आपली येष्टी बरी,` असा विचार करून online रिझर्वेशन साइटवर फेरफटका मारायचं ठरवलं. येष्टीच्या सगळ्या गाड्या रिझर्वेशन सुरू झाल्याच्या पहिल्या काही तासांत जिथे फुल होतात, तिथे ऐन गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच्या एका शेमी लक्झरीचं रिझर्वेशन मिळून गेलं. जादा गाडी होती, पण वेळेत होती, सोयीची होती, त्यामुळे निश्चिंत झालो. आता फक्त रत्नागिरीहून परत येतानाचं रिझर्वेशन मिळण्याचं टेन्शन होतं. येष्टी त्या मागणीला काही दाद देत नव्हती. मग मित्राला सांगून एका खाजगी गाडीचंच रिझर्वेशन करून टाकलं. आता यायचा, जायचा दोन्ही प्रश्न मिटले होते. सिरियलमधल्या कुठल्या नायिकेला उचकी लागली नाही, तर आपला दौरा निर्विघ्न पार पडायला हरकत नाही, असंच वाटत होतं.

रात्री नऊला चिंचवडहून सुटणारी शेमी लक्झरी होती. गणपतीच्या आदल्या दिवशीची रस्त्यावरची खरेदीची झुंबड, ट्रॅफिक जाम वगैरे गृहीत धरून नऊलाच घरातून निघालो. कुठल्याही अडथळ्याविना सव्वानऊला स्वारगेट स्टॅंडला पोहोचलो. पंधरा वीस मिनिटं आधी पोहोचणार असलो, तरी स्टॅंडवर बसून पुस्तक वाचू, अगदीच कंटाळा आला तर गेम खेळू, असा विचार केला होता. पुस्तकही अगदी सहज सापडेल असं बाहेरच्याच कप्प्यात ठेवलं होतं. पण स्वारगेटला पोहोचलो आणि प्रथम ग्रासे मक्षिकापातः झाला. गर्दीची अपेक्षा होती, पण आजची गर्दी एवढी तुफान होती, की खुर्ची वगैरे रिकामी मिळणं शक्यच नव्हतं. मग मागेच उभा राहून वाट पाहणं सुरू झालं. त्यातून पावसानं कृपा केल्यामुळे सगळीकडे चिकचिकाट होता. बॅग जमिनीवर ठेवणं म्हणजे चिखलात ठेवण्यासारखंच होतं. पण पर्याय नव्हता.

गाडीची माहिती देणा-या आणि आल्या गेल्या सगळ्या गाड्यांची नोंद करणा-या कंट्रोलरच्या समोर ही.... गर्दी होती. काही विचारण्यासाठी त्याच्यापर्यंत पोचणं हे रेशनवर ठरलेल्या वेळी ठरलेल्या प्रमाणात धान्य मिळण्याएवढंच अवघड होतं. दहा वाजले तरी गाडी आली नाही, तेव्हा जरा काळजी वाटू लागली. विचारून काही फायदा नव्हताच, तरी कंट्रोलरपर्यंत जाण्याचा धीर केला. ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यानंतर आपण नाही का शेजारच्या गाडीवाल्याला `काय झालंय हो पुढे,` असं विचारतो, त्यालाही काही माहिती नाहीये, याची आपल्याला कल्पना असते, तरीही. थोड्या वेळात येईल, असं उत्तर देऊन तो गरीब बापुडा इतर प्रवाशांच्या समस्यांचं निरसन करण्यात बिझी झाला. मी पुन्हा जागेवर येऊन उभा राहिलो.

नेहमीची पुणे-रत्नागिरी आणि चिंचवड-रत्नागिरी गाडीही आली नव्हती. एकूणच स्टॅंडवर अभूतपूर्व गोंधळ होता. जेवढ्या गाड्या फलाटावर उभ्या होत्या, त्याहून दुप्पट मागच्या बाजूला मधल्या रस्त्यावरच उभ्या राहून तिथूनच सुटत होत्या. आणि काही गाड्या तर वेगळ्याच फलाटांवर लावण्यात आल्या होत्या. एकूणच कुणाचा कुणाला काही मेळ नव्हता. थोड्यावेळानं असं लक्षात आलं, की गाडी आलेलीसुद्धा कुणाला कळत नाहीये. मग मी बॅग एका कोप-यात ठेवली आणि पाठीला लॅपटापची सॅक अडकवून माझ्या गाडीच्या शोधमोहिमेवर निघालो. कोलंबसाच्या पृथ्वीप्रदक्षिणेपेक्षाही ही मोहीम अवघड होती, हे माझ्या थोड्याच वेळात लक्षात आलं. स्टॅंडच्या एका कोप-यात ठेवलेल्या बॅगवर मी पाणीच सोडलं होतं. कुणी नेली तर नेऊ द्यात, पण मी तिचं ओझं वागवून फिरणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी स्वारगेटवर दीनवाणेपणाने इकडून तिकडे फिरत होतो. दर पंधरा मिनिटांनी स्टॅंडच्या शंकरशेट रस्त्यावरच्या गेटजवळ जायचं, आपली गाडी आली का याचा अंदाज घ्यायचा, परत बॅगेपाशी येऊन एकदा नजर टाकायची, मग पुन्हा आणखी कुणाकडे काही माहिती मिळते का बघायचं, असा द्राविडी प्राणायाम सुरू होता.

स्वारगेटच्या बाहेरच्या शंकरशेठ रस्त्यावर अभूतपूर्व ट्रॅफिक जाम झाला होता आणि गाड्या यायला खूप उशीर होत होता, हे अल्पावधीतच कळलं. पण आपल्या गाडीबद्दल कुणी सांगेल, याचा काही नेम नव्हता. समोर दिसणा-या गाड्यांची काय विल्हेवाट लावायची, हे जिथे येष्टीच्या तमाम अधिका-यांना सुधरत नव्हतं, तिथे ते चिंचवडहून येणा-या गाडीबद्दल काय सांगणार होते? रिझर्वेशनची सीट सोडून बस तशीच हाणायचा येष्टीचा लौकिक नाही, एवढ्या एकाच आशेवर आणि पूर्वानुभवावर मी तिथे ताटकळलो होतो. सव्वाअकराच्या सुमारास चिंचवडहून येणारी नेहमीची रत्नागिरी शेमी लक्झरी आली, तेव्हा मात्र धीर खचला. आपली जादा गाडी रद्द झाली, की काय झालं, याचा काहीच अंदाज येत नव्हता. अजून किती वेळ थांबायचं आणि तोपर्यंत अस्वस्थपणे येरझा-या घालण्यापलीकडे काय करायचं, याची चिंता डोकं पोखरत होती. शेवटी साडेअकराच्या सुमारास चिंचवडहूनच येणारी दापोली गाडी आली. आशेने तिच्याकडे धाव घेतली. चिंचवडहून नऊची जादा गाडी आपल्या गाडीबरोबरच सुटलेय, अशी मौलिक माहिती त्या कंडक्टरनं दिल्यानंतर जिवात जीव आला. तरीही माझी इच्छित गाडी स्वारगेटच्या स्टॅंडपर्यंत यायला पावणेबारा वाजले. तीही मागच्या नेहमीच्या गेटनं आत न येता पुढे जाऊ लागली, तेव्हा काळजात धस्स झालं. पुढच्या गेटनं ती आत आली, तेव्हा पटकन जाऊन जागा पकडली. सुमारे दोन तास उशिराने गाडी सुटण्याची माझ्या आयुष्यातली ही पहिली वेळ.

नंतरचा प्रवास मात्र सुखानं झाला. पहाटे पाचला रत्नागिरीत पोचणारी येष्टी सकाळी आठ वाजता पोचली. जाताना रिक्षावाल्यांच्या हातापाया पडायची वेळ आली नाही, हीच काय ती दुःखात सुखाची बाब. आता जाताना टगे-पाटील काय धुमाकूळ घालतात, ते बघायचं.


 

Mar 22, 2014

ओहोटी रोखण्यासाठीची भरती!

निवडणुकांचा मोसम आहे. सगळीकडे प्रचाराचा हलकल्लोळ माजला आहे. राजकीय पक्षांमध्येही तेवढाच हलकल्लोळ आहे, पण तो उमेदवारांपेक्षाही जास्त नाराजांचा, बंडखोर आणि असंतुष्टांचा. हे नाराज, बंडखोर आपली पोळी कशी भाजून घेता येईल, याच्या शोधात असले, तरी निवडणुकांनी इतरही अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी खाजगी स्वरूपात काही निविदाही काढण्यात आल्या आहेत. त्यांची ही झलकः

 

कामाचे स्वरूपः खिंडारे बुजविणे.

पात्रताः मोठमोठी खिंडारे बुजवण्यातील तज्ज्ञ असणे अपेक्षित.

तपशीलः निवडणुकांच्या हंगामात, निदान मतदान होईपर्यंत तरी पक्षाला खिंडार पडू नये, यासाठी पक्षाची तटबंदी आणखी अभेद्य करणे. अगदीच काही कारणांनी छोटेसे भोक पडल्यास त्याचे भगदाड होऊ न देण्यासाठी योग्य ती डागडुजी करणे. अगदीच भगदाड पडल्यास, त्याचे खिंडार होऊ नये, यासाठी सर्वतोपरी मेहनत घेणे. अगदीच खिंडार पडल्यास त्याची तातडीने डागडुजी करून तटबंदी पुन्हा अभेद्य करणे. (यात पक्षाला आधीच पडलेले खिंडार बुजवून देण्याच्या कामाचाही समावेश असेल.)

ता.क - आपल्या पक्षातील खिंडार बुजवून दुस-या पक्षांच्या तटबंद्यांना खिंडारे पाडण्याची क्षमता असलेल्या कुशल कामगारांना विशेष प्राधान्य.

 

 

कामाचे स्वरूपः मानसोपचार, नैराश्यनिवारण.

पात्रताः नैराश्यग्रस्तांना नव्या आशा, नवी स्वप्ने दाखविण्याची क्षमता.

तपशीलः पक्षातील वरिष्ठ पातळीवरच्या नाराजांची नाराजी कुठल्याही माध्यमातून दूर करणे, ही प्रमुख जबाबदारी असेल. त्यासाठी दबावतंत्राचा, धाकधपटशाचा वापर करण्याऐवजी त्यांना बाबापुता करून, त्यांनाच पक्षात किती महत्त्व आहे, याची जाणीव करून देण्यावर भर असावा. त्यांच्यामुळे पक्ष चालू शकत नाही आणि निवडणुकीत पक्षाला जे प्रचंड यश मिळणार आहे, त्यात त्यांचा कसा सिंहाचा वाटा आहे, हे पटवून द्यावे लागेल. पूर्वीच्या काळात त्यांनी किती महान कार्य केले आहे, याची पुन्हा उजळणी करून, त्यांनी पार पाडलेल्या जबाबदा-यांच्या आठवणीने त्यांच्या मनाला गुदगुल्या होतील, अशी व्यवस्था करावी लागेल. अशा नेत्यांनी आता पक्षातले ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून काम पाहावे आणि नव्या पिढीला छोटीछोटी कामे करण्याची संधी द्यावी, हाच त्यांना मुख्य जबाबदारीत न घेण्याचा (किंबहुना डावलण्याचा!) हेतू आहे, हे त्यांना पटवावे लागेल. भावी काळात पक्षाला जे महान कार्य करायचे आहे, त्यासाठी त्यांचे आशीर्वाद किती मोलाचे आहेत, हेही सांगावे लागेल.

ता. क. - वरिष्ठ नेत्यांना हिप्नोटाइज करून जुन्याच काळात गुंतवून ठेवण्याची क्षमता असलेल्यांना विशेष प्राधान्य.

 

 

कामाचे स्वरूपः उत्तम मासेमारी करणे.

पात्रताः समोरच्या व्यक्तीचे वजन आणि लायकीनुसार गळ बनविण्यात तरबेज असणे अपेक्षित.

तपशीलः दुस-या पक्षातल्या ज्या माशांना वेळेवर खायला मिळत नाही, ज्यांना चांगल्या पाण्यात पोहायला मिळत नाही, ज्यांना आणखी वेगळे आणि सुग्रास अन्न हवे आहे, अशांना हेरून आपल्या पक्षाच्या पाण्यात आणणे. त्यासाठी उत्तम गळ आणि गळाला लागणारे खाद्य यांची व्यवस्था पक्षातर्फे केली जाईल. एकदा गळाला लागलेला मासा पुन्हा पूर्वीच्याच जलाशयात जाणार नाही, याची हमी द्यावी लागेल. मोठ्या माशांसाठी मोठे आणि विशेष प्रकारचे गळ तयार करण्यासाठीही स्वतंत्रपणे अनुदानाची व्यवस्था होईल. काठाकाठाने पोहणा-या माशांनाही त्यांची योग्यता (लायकी!) ओळखून आपल्या जलाशयात ओढण्यासारखी कामेही करावी लागतील.

ता.क. गळाची ताकद नसतानाही न पेलवणा-या वजनाचे मासे आपल्या जलाशयात आणण्याची ताकद असलेल्यांना विशेष प्राधान्य.

 

त्याबरोबरचः

-    भूलथापातज्ज्ञः मतदारांना वेगवेगळ्या भूलथापा देऊन आपल्याकडे खेचून आणण्यात तरबेज.

-    दमदाटीतज्ज्ञः कार्यकर्त्यांना आणि मतदारांना दमदाटीने आपल्या मर्जीप्रमाणे वागायला लावण्यात निष्णात.

-    गर्दीचे घाऊक कंत्राटदारः सभा, मेळावे, शिबिरं, प्रचारफे-या, यांसाठी कार्यकर्त्यांची गर्दी जमवून देणारे कुशल कंत्राटदार. वेगवेगळ्या वयोगटाच्या आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या बुद्धिमत्तेचे लोक गर्दीमध्ये जमवणे अपेक्षित.

-    धर्मशास्त्र पंडितः दुस-या पक्षातून आपल्या पक्षात आलेल्या नेत्यांना योग्य मंत्रोच्चारांनी शुद्ध करून घेणे अपेक्षित.

-    कात्रणकिंगः वेगवेगळ्या नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांच्या बातम्यांची कात्रणे आणि व्हिडिओ क्लिप्स रोज तारीखवेळेसकट आणून देणे अपेक्षित.

 

इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा. मानधनाची अपेक्षा नसलेल्यांना विशेष प्राधान्य!


Feb 23, 2014

`स्वप्न` भारत निर्माणाचं....!

जागोजागी लागलेल्या पोस्टरवरचा दाढीचे खुंट वाढलेला तो चेहरा किशा एकटक पाहत उभा होता. त्याचा सखारामकाका ब-याच दिवसांनी गावात येणार होता. सखारामकाका मोठ्या शहरात जाऊन बरीच वर्षं झाली होती, पण किश्या मात्र गावातल्या शेतीतच रमला होता. अखेर बरीच वाट बघितल्यानंतर एकदाची एसटी आली. गावात दिवसभरात येणारी ही एकच एसटी. किशा काकाच्या दर्शनाकडे डोळे लावून बसला होता. पण एकेक करत सगळे प्रवासी उतरले, तरी काका दिसायला काही तयार नव्हता. काकानं चुकीचा दिवस कळवला, की त्याचीच बस चुकली, असा प्रश्न किश्याच्या मनात उभा राहिला. शेवटी सगळे प्रवासी उतरल्यानंतर ड्रायव्हरनं गाडी वळवायला घेतली, तेव्हा किशाला राहवेना. तो गाडीत चढला आणि अख्खी एस्टी त्यानं धुंडाळून पाहायला सुरुवात केली.

ड्रायव्हरच्या मागच्या आडव्या सीटपर्यंत किश्या आला, तेव्हा एका कोप-यात गलितगात्र अवस्थेत बसलेला एक देह त्याला दिसला. थोडंसं निरखून पाहिल्यावर हाच आपला सखारामकाका, हे ओळखायला त्याला वेळ लागला नाही.

``काका, अरे इथे काय बसून राहिलायंस? उतरला का नाहीस?'' किश्यानं विचारलं, तरी काका एक ना दोन. ढिम्म. काकाचं असं काय झालं, असा विचार करताना किश्याला लक्षात आलं, की काकाला एसटी बाधलेय. मुख्य म्हणजे, आपल्या गावातल्या रस्त्यावरचे खड्डे बाधलेत. मग कसाबसा हात धरून काका बसमधून खाली उतरला. ड्रायव्हर कंडक्टरचा खोळंबा झाल्याबद्दल शिव्या खायला लागल्या, ते वेगळंच.

याच गावात जन्माला आलेल्या, वाढलेल्या आपल्या काकाचं असं का व्हावं, हे किश्याला कळत नव्हतं. मग बैलगाडीतून घराकडे जात असताना किश्यानं काकाला बोलतं केलं.

जाताना वाटेत काकाला त्याच्या बालपणीचे हरी, गजाभाऊ, सोपानकाका वगैरे मित्र भेटले. सगळे डोक्यावरून कसल्यातरी मोठमोठ्या टोपल्या घेऊन निघाले होते.

``काय भाऊ, आज कुठे दौरा?`` सखाकाकानं सहज म्हणून विचारलं, पण तो प्रश्न त्या तिघांना जिव्हारी का लागला, हे काही त्याला कळलं नाही.

``कुठे म्हणजे? बाजाराला! इथून चार मैलावर आहे बाजार. रोज चालत जावं लागतंय एवढ्या टोपल्या डोक्यावर घेऊन, तेव्हा कुठे चार पैसे मिळतात!`` त्यांच्यातल्या एकानं सुनावलं.

``अरे? पण गेल्या दहा वर्षांत काहीच बदललं नाही?`` काकानं निरागसे विचारलं. त्यावर त्या तिघांनीही असा काही राग चेह-यावर आणला, की काकाला पुढचं काही विचारायला सुचलंच नाही. ते तिघंही आपल्या मार्गानं चालते झाले.

बैलगाडीची ही सफर खरंतर शहरात राहिलेल्या काकासाठी आनंददायी असायला हवी होती. शहरात गेल्यावर स्वतःच्या मुलांनाही कृषी पर्यटनात आवर्जून तो बैलगाडीत बसवत आला होता. पण ही सफर त्याला फारशी मानवत नसल्याचं जाणवत होतं. एकतर गावात येतानाच्या रस्त्यात एसटीमध्ये बसलेले दणके आता त्याच्या अंगप्रत्यंगातून बोलके झाले होते. गावातल्या या धुळीनं माखलेल्या रस्त्यावरचे खड्डे त्या जखमांवर मीठ चोळत होते.

``किश्या, अरे पक्का रस्ता कुठे गेला?`` शेवटी त्यानं न राहवून विचारलं.

``कुठला पक्का रस्ता?`` किश्या गोंधळून गेला होता.

``अरे, इथे पक्का रस्ता झाला नाहीये का अजून?``

``नाही!`` आपला काका असा का भंजाळलाय, हे किश्याला कळेनासं झालं होतं.

``म्हणजे? गेल्या दहा वर्षांत काहीच बदललं नाही का?`` काकाच्या या प्रश्नानं तर किश्याला हसावं की रडावं कळेना. काकाचं काहीतरी बिनसलंय, एवढं मात्र त्याच्या लक्षात येत होतं.

वाटेत कावडीनं पाणी नेणारे काही बाप्ये भेटले, डोक्यावरून हंड्यांची चवड घेऊन जाणा-या बायाबापड्या भेटल्या, त्यांनाही काकानं असेच काही प्रश्न विचारले. आपल्याच गावातला हा माणूस आपली चेष्टा का करतोय, असं त्यांना वाटलं आणि काकाचा रागही आला. शेवटी किश्यानं मध्यस्थी करून वेळ मारून नेली. आपल्याच गावात राहिलेल्या काकाला शहरात गेल्यावर नक्की झालंय काय, या शंकेनं किश्याचं मन कुरतडलं जाऊ लागलं होतं.

कसं बसं घर आलं. दमूनभागून आलेल्या काकानं लगेच पंखा लावायची आर्डर सोडली.

``काका, इथे दुपारी चार तास लाइट नसते!``किश्यानं खुलासा केला.

``काय? चार तास? मग तोपर्यंत काय करायचं? हा उकाडा कसा सहन होणार?`` काकाच्या या प्रश्नावर किश्यानं त्याच्याकडचा पुठ्ठा पुढे केला.

``हा घे घरगुती पंखा. आता उकाडा यानंच पळवायचा!``

काकाचा नाइलाज झाला. मग शेताचा फेरफटका झाला. पाण्यावाचून सुकून चाललेली शेती बघून काकाला वाईट वाटलं. काकाच्या इतर प्रश्नांपेक्षाही `गेल्या दहा वर्षांत काहीच बदललं नाही का,` या प्रश्नानं किश्या जास्त हैराण झाला होता.

``काय बदलणार होतं काका? हे दहा वर्षांत सगळं बदलल्याचं काय नाटक काढलंयंस तू?`` किश्यानं शेवटी वैतागून विचारलं.

``अरे, आमच्याकडे टीव्हीवर दर पाच मिनिटांनी ती भारत निर्माणची जाहिरात लागते. त्यात म्हणतात, की दहा वर्षांत खूप काही बदललं म्हणून. गावांची प्रगती झाली, सगली गावं समृद्ध झाली वगैरे दाखवतात त्याच्यात, मला वाटलं आपलंही गाव....!`` काकानं खुलासा केला.

``काका, त्या जाहिरातीत दाखवतात ना, ते तुझं स्वप्नच होतं असं समज. फारसं काही बदललेलं नाहीये, हेच खरं आहे.``

``मग नक्की बदललंय काय?``

``अरे, मंत्री बदलले, त्यांची खाती बदलली, त्यांनी केलेल्या गैरव्यवहारांची नावं बदलली, झालंच तर पक्षाचे नेतेसुद्धा बदलले...! अजून काय बदलायला हवं होतं तुला?``

किश्याच्या या सडेतोड उत्तरानंतर गप्प बसण्याशिवाय काकाला पर्याय नव्हता.

Jan 28, 2014

`हॅक` तिच्या!

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात दुःखं तरी किती असावीत! रस्त्यावरचा खड्डा चुकवावा लागला नाही, टीव्हीचे सगळे चॅनेल व्यवस्थित दिसले, बायकोनं एकही दिवस भांडण केलं नाही, बॉसनं फालतू कारणावरून झापलं नाही, असा एकही दिवस उगवत नाही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात!

गण्या हा असाच एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस. कुणाच्या अध्यात-मध्यात नसलेला. (थोडक्यात शक्यतो प्रत्येक बाबतीत मूग गिळून (किंवा शेपूट घालून!) गप्प बसणारा. गण्याची हौस मात्र दांडगी. प्रत्येक गोष्टीत त्याला फार इंटरेस्ट. प्रत्येक विषयात त्याचा जवळपास व्यासंग! अर्थात, अनुभव आणि निरीक्षणांतून आलेला. सीरियावर हल्ला होणार की नाही, याचं उत्तर आंतरराष्ट्रीय संबंधांमधला एखादा प्रकांडपंडित किंवा एखादा होराभूषणही देऊ शकणार नाही, पण गण्याला त्याचं उत्तर माहीत असतं. बराक ओबामांना ते जाणून घ्यावंसं वाटत नाही, हा त्यांचा करंटेपणा.

गण्याची सगळीकडेच फिरस्ती. तसा गण्या लहानपणापासूनच संवेदनशील. मनाचा हळवा. कांदा चिरतानाही त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं ते कांद्याच्या उग्रपणामुळे नव्हे, तर तो चिरला जातोय, याबद्दल गण्याच्या मनाला होणा-या यातनांमुळे.

अशाच दोन वेगवेगळ्या बातम्यांनी गण्याचा जीव अलिकडेच पुन्हा कासावीस झाला होता. पहिली बातमी होती ती आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या (उद्योगांच्या नव्हे!) आणि भारत-पाकिस्तान परराष्ट्र संबंधांना एक वेगळा आयाम देणा-या थोर अभिनेत्री (?) वीणा मलिक यांची. लग्नानंतर आता त्यांनी चित्रपट क्षेत्रातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. खरंतर एकतर लोक संन्यास संपल्यानंतर लग्न करतात किंवा लग्नाचा आणि संसाराचा कंटाळा आल्यानंतर अनेक वर्षांनी संन्यास घेतात. हा संन्यास चित्रपट क्षेत्रातल्या कारकिर्दीचा होता, हे गण्याच्या खूप उशिराने लक्षात आलं. तरी त्याचा जीव हेलावायचा तो हेलावलाच! आपल्या महान चित्रपटसृष्टीचं, टीव्ही चॅनेल्सवरच्या टॉक शोजचं आणि `बिग बॉस`सारख्या रिअलिटी शोजचं काय होणार, या गंभीर प्रश्नानं गण्याची रात्रीचीच काय, दुपारची झोपसुद्धा उडाली!

दुसरी बातमी आणखी गंभीर होती. भारतीय क्रिकेट संघाचं विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्यासाठीचं प्रेरणास्थान आणि तमाम भारतीय क्रिकेटरसिकांचं आशास्थान असलेल्या मॉडेल-कम-अभिनेत्री मा. पूनमजी पांडे यांची वेबसाईट हॅक झाल्याची खबर होती. ही अफवा नाही, तर साक्षात पूनमजींनी ट्विटरवरून जाहीर केलं होतं. (आता, त्यांचं ट्विटर अकाउंट कुणी हॅक करून पुन्हा ही अफवा कुणीतरी पसरवली होती की काय, कोण जाणे!) गण्याच्या पायाखालची वाळू सरकली. मा. पूनमजींची ही वेबसाईट रात्रंदिवस पाहताना (म्हणजे दिवसा कमी, रात्री जास्त!) गण्यानं इंटरनेटचं बिल भरमसाठ वाढवून घेतलं होतं! `नशा`सारख्या असंख्य चित्रपटांत त्यांनी केलेल्या कायिक अभिनयामागची सामाजिक आणि मनोवैज्ञानिक भूमिका वाचताना गण्याचं काळीज हेलावून गेलं होतं. ही अशी वेबसाईट हॅक झालेय, हा धक्काच गण्याला न झेपणारा होता. स्वतःची सख्खी बायको मित्राबरोबर पळून गेल्यानंतर जेवढा रडणार नाही, तेवढा गण्या त्या दिवशी रडला.

भारतासारख्या देशात कुठलीच गोष्ट सुरक्षित नाही, या भावनेपेक्षाही गण्याच्या मनातली दुसरी भीती जास्त गंभीर होती. भारतीय क्रिकेट संघानं वर्ल्ड कप जिंकला, तर (किमान एकदा तरी!) नैसर्गिक अवस्थेत फिरण्याची प्रेरणादायी घोषणा पूनमताईंनी केली होती. त्यानंतर भारतानं खरंच वर्ल्ड कप जिंकला. (हा योगायोग की खरंच स्फूर्ती, याबद्दल धोनीनं उत्तर देणं टाळलं म्हणे!) पण दुर्दैवानं पोलिसांच्या आणि कायद्याच्या दबावामुळे पूनमताईंना त्यांची (आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची) मनोकामना पूर्ण करता आली नाही. मा. पूनमजी कधी ना कधी त्यांचा शब्द पाळतील, या एकमेव आशेवर गण्या जगतोय. पण कालच्या ताज्या बातमीमुळे, त्यावेळची ती घोषणा नक्की पूनमजींनीच केली होती, की त्यांची साईट/ट्विटर अकाउंट हॅक करून आणखी कुणी हा चहाटळपणा केला होता, याबद्दल गण्याचा गोंधळ उडालाय!

....


Jan 6, 2014

रजनी फॅन्स...डोन्ट मिस द चॅन्स...!


सासवडला होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सुपरस्टार रजनीकांतला निमंत्रण धाडण्यात आल्यानंतर समस्त सारस्वत विश्वात अपरिमित आनंद झाला. रजनीकांतने येणार असल्याचे गुपचूप कळवून टाकल्यानंतर त्याच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. त्यानुसार संमेलनातील काही कार्यक्रमांमध्येही बदल करण्यात आला.

`मराठी साहित्याचे काय होणार` अशा स्वरूपाचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, तो बदलून `मराठी साहित्यः तंत्रज्ञानाने मारले, रजनीकांतने तारले` असा करण्यात आला. `मराठी साहित्य साता समुद्रापार` अशा विषयावर एक परिसंवाद होता, त्याचाही विषय बदलून `मराठी साहित्य सात आकाशगंगांपार` असा करण्यात आला. या परिसंवादांना तुफान प्रतिसाद मिळाला. रजनीकांतच्या उपस्थितीमुळे फक्त मराठी, अमराठी आणि परदेशस्थ भारतीयच नव्हे, तर इतर ग्रहांवरील काही वाचकही सहभागी झाल्याचे समजते. स्वागतगीताच्या ऐवजी `लुंगी डान्स`वर अप्रतिम नृत्य सादर करण्यात आले. रजनीकांत यांच्या तेजामुळे डोळे दिपू नयेत, म्हणून साहित्यनगरीला भेट देणा-या सर्वांसाठी मोफत गॉगल्सची व्यवस्थाही करण्यात आली होती.

रजनीकांतच्या धमाकेदार एन्ट्रीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. साहित्य महामंडळाने त्यासाठी मुख्य मंचाच्या शेजारीच सुपरसॉनिक रॉकेट उतरण्यासाठीचा तळ बांधला होता. प्रत्यक्षात रजनीकांतने चेन्नई ते सासवड अशा भुयाराची रचना करून घेऊन त्यातून मंचावर एन्ट्री घेतली.

साहित्य संमेलनातील रजनीकांतचे भाषणही खूप गाजले. ``सासवडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण मला मिळाले, तेव्हा मी माझ्या रोबो-2 या चित्रपटाच्या तयारीत बिझी होतो. हा आधीच्या `रोबो`पेक्षा खूप वेगळा आणि बिगबिगबजेट सिनेमा आहे. याच्यात डॉ. चिट्टी एक रोबो बनवतो आणि नेपच्यूनवर राहणा-या एका मुलीच्या हा रोबो प्रेमात पडतो. आपल्या ग्रहावरची मुलगी पळवली, म्हणून नेपच्यूनवासीय पृथ्वीवर हल्ला करतात आणि मग हा रोबो पृथ्वीला वाचवतो, अशी ही कथा आहे. सासवडबद्दल मी खूप काही ऐकलं आहे. नेपच्यूनवरची वस्ती याच भागात एक सेट लावून दाखवता येईल, असं मला वाटलं. म्हणून मी लगेच होकार कळवून टाकला. आमचा सिनेमा भव्यदिव्य असल्यामुळे शूटिंगसाठी बरंच `साहित्य` लागतं. संमेलन सासवडलाच होणार असल्यामुळे तिथून रेडीमेड `साहित्य` मिळेल, असं माझ्या निर्मात्यानं मला सांगितलं. पण संमेलनातलं साहित्य आणि शूटिंगसाठी लागणारं साहित्य या वेगळ्या गोष्टी आहेत, हे इथे आल्यावर समजलं. असो. काही हरकत नाही. मी महाराष्ट्राचा असलो, तरी चेन्नईशिवाय आता करमत नाही. त्यामुळे शूटिंगच्या काळातही मी रोज चेन्नई-सासवड अपडाऊन करणार आहे. आमची डझनभर हेलिकॉप्टर्स, दहा सुपरसॉनिक विमानं आणि पाच रॉकेटस शूटिंगच्या ठिकाणी रोज साहित्य घेऊन येणार आहेत. त्यामुळे संमेलनात `साहित्य` कमी पडलं, तरी ते पुरवणं आमच्यासाठी अभिमानास्पद असेल.``

संमेलनाच्या व्यासपीठावर सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मध्ये रजनीकांत बसले होते. सिक्कीमला शूटिंगसाठी येण्याचं निमंत्रण पाटीलसाहेबांनी रजनीकांतला दिल्याचं समजतं. तर मुख्यमंत्र्यांनी `आदर्श` प्रकरणाच्या अहवालाचा विषय समस्त भारतीयांच्या मेंदूतून कायमचा पुसून टाकण्यासाठी रजनीकांतना गळ घातल्याचीही खबर आहे. कार्यक्रमादरम्यान मध्येच उठून रजनीकांत हे शरद पवार यांच्याही शेजारी जाऊन बसले होते. त्यावरून येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी रजनीकांत महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ब्रॅंड अम्बॅसिडर बनणार असल्याची जोरदार चर्चाही उपस्थितांमध्ये सुरू झाली. शरद पवार यांनी या चर्चेत काही तथ्य नसल्याचं ती सुरू व्हायच्या आधीच स्पष्ट केलं आहे. ``मी फक्त रजनीकांत यांच्या अभिनयाची (?) प्रशंसा केली आणि त्यांच्या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. `परदेशी नको, देशी घ्या` या विषयावर मराठी चित्रपट बनविण्याची कल्पनाही मी रजनीकांत यांना सुचवली,`` असं पवारसाहेबांनी स्पष्ट केलं. या वक्तव्यावरूनही वाद झाल्यानंतर `परदेशी` या शब्दाचा मा. सोनिया गांधी किंवा `वाईन` या दोन्ही गोष्टींशी काहीही संबंध नव्हता, तर ते वक्तव्य नागरिकांचा देशाभिमान जागविण्यासाठी होते, असेही पवारसाहेबांनी स्पष्ट केले आहे.

यापुढेही साहित्य संमेलनाला येण्याचे रजनीकांत यांनी कबूल केल्यामुळे `मराठी साहित्याचे काय होणार` ही चर्चा यापुढील काळात सुरू राहिली, तरी `साहित्य संमेलनाचे काय होणार,` याविषयीच्या शंकांना मात्र पूर्णविराम मिळाला आहे!