Dec 31, 2008

`संकल्प'यात्रा!

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांची आसनेही हलली। हल्ली असं काही झालं, की मीडियावाले लगेच चांव चांव करायला लागतात आणि दिवस साजरा करण्यासाठी तेवढ्यापुरता कुणाचा तरी बळीचा बकरा करून टाकतात। पोलिसांपासून अतिरेक्यांच्या कपड्यांपर्यंत सगळ्याचं तपशीलवार "लाइव्ह कव्हरेज' देणाऱ्या मीडियाने एका गंभीर प्रसंगात शिवराज पाटलांना लक्ष्य केलं. त्यांनी दिवसभरात तीनदा कपडे बदलल्याचीच "ब्रेकिंग न्यूज' केली. त्यामुळं तो अनुभव लक्षात घेता, मुंबई हल्ल्याच्या वेळी शिवराज पाटलांनी तीन दिवस कपडेच बदलले नाहीत. स्वयंस्फूर्तपणे निदर्शने करणाऱ्या महिलांच्या पावडर आणि लिपस्टिकवर मुख्तार अब्बास नक्वी घसरले, तेव्हा कॉस्मेटिक बनविणाऱ्या कंपन्यांच्या सीईओंनी नक्वींविरोधात मोर्चा काढला. मंदीच्या काळात नक्वींसारख्या बेजबाबदार नेत्यांच्या वक्तव्यांमुळे व्यवसाय आणखी गाळात जात असल्याचा त्यांचा आरोप होता.

हल्ल्याचे हादरे बराच काळ बसत राहिले। शिवराज पाटलांबरोबर आर। आर। पाटील यांचंही पद केलं, तेव्हा कुणालाचा धक्का बसला नव्हता. दिल्लीकरांचा वरदहस्त लाभलेल्या विलासरावांच्या खुर्चीवरही गदा आली, तेव्हा मात्र सगळे हादरले. पाठोपाठ नारायण राणेंनीही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. या सर्वच नेत्यांवरील कारवाईचं कारण एकच होतं. या काळातली त्यांची वक्तव्यं आणि कृत्यं. (अपवाद शिवराज पाटील यांचा. त्यांनी काहीच न केल्याबद्दल त्यांना शिक्षा झाली होती. ) काही काळ विजनवासात घालविल्यानंतर आर. आर. पाटलांचं पुनर्वसन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी झालं. विलासराव आणि राणेंनीही पुढच्या वाटचालीसाठी कंबर कसली. विशेषतः "मीडिया'समोर जाण्यात आणि प्रसिद्धीतंत्र हाताळण्यात चुका झाल्यानं या नेत्यांच्या वाट्याला हे भोग आले होते. त्यामुळं नव्या वर्षात या चुका टाळायच्याच, असा निश्चय त्यांनी आणि त्यांच्यापासून धडा घेतलेल्या काही नेत्यांनी करून टाकला. आपापल्या पी. ए. च्या साथीनं त्यांनी करून ठेवलेली त्याची यादी आमच्याकडे पोचली...

विलासराव देशमुख ः-
रामगोपाल वर्माचा कुठलाही चित्रपट यापुढे पाहायचा नाही, त्याच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती लावायची नाही। रितेशलाही त्याच्या चित्रपटात काम करू द्यायचं नाही।
- मीडियाच्या कॅमेऱ्यात पकडले जाऊ, अशा कुठल्याही हॉटेलात यापुढे जेवायलाही जायचं नाही।
- पत्रकारांसमोर हसायचं नाही। पुन्हा मुख्यमंत्रिपद किंवा त्याहून मोठं पद पक्षानं दिलं, तरी कायम "अलोकनाथ'छाप चेहऱ्यानं वावरायचं.

आर। आर. पाटील ः
- हिंदीचा क्लास लावायचा। त्यासाठी वेळ पडल्यास नारायण राणे किंवा मायावतींचं मार्गदर्शन घ्यायचं. पक्षीय बंधनांमुळे ते उपलब्ध झाले नाहीत, तर मुकेश पटेलांना गळ घालायचीच!
- "छुटपुट'सारखे गोंधळात टाकणारे शब्द अभ्यासक्रमांतून, बोलीभाषेतून, व्याकरणातून नाहीसे होतील, यासाठी प्रयत्न करायचे। प्रसंगी विधानसभेत तसं विधेयक मांडायचं.
शिवराज पाटील ः
- अडचणीत आल्यानं राजीनामा द्यावा लागलेल्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांची यादी करायची। राजीनाम्याची पार्श्वभूमी, तात्कालिक कारणे, त्यांची कारकीर्द आणि मीडियामधील प्रतिमा, यांचा अभ्यास करायचा.
- नवीन वर्षात एकही नवा कपडा शिवायचा नाही।
- पक्षनिष्ठा पुन्हा सिद्ध होईपर्यंत आणि पक्षश्रेष्ठींच्या परवानगीशिवाय मीडियाला मुलाखती द्यायच्या नाहीत।
नारायण राणे ः
- "कॉंग्रेसची संस्कृती' या विषयात व्यासंग मिळवायचा। जमल्यास, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या चरित्रांची पारायणं करायची.
- काकासाहेब गाडगीळ, बॅ। विठ्ठलराव गाडगीळ, प्रणव मुखर्जी, अर्जुनसिंग आदींच्या पत्रकार परिषदांच्या सीडी जमवून त्यांच्या वक्तव्याचा अभ्यास करायचा.
- आर। आर. पाटील यांच्यामागे वशिला लावून आपल्यालाही हिंदीच्या क्लासला प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करायचा.
उद्धव ठाकरे ः
- "राज्यकर्त्यांना उसाच्या फोकानं बडवून काढा' या वाक्प्रचाराएवढेच प्रभावी, पण त्याला पर्यायी वाक्प्रचार शोधायचे।
- शिवसेनेची सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या विविध भावमुद्रांचं प्रदर्शन आयोजित करायचं। त्यासाठीच्या फोटोंची जमवाजमव करायची.
राज ठाकरे ः
- "बडव्यांच्या कचाट्यातून विठ्ठलाची सुटका' ही सत्यघटनेवर आधारित कादंबरी लिहून काढायची। बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरेंच्या उपस्थितीत त्याचं प्रकाशन करायचं.
- इंग्रजी भाषाशिक्षणही मराठीतून दिलं जावं, यासाठी आग्रह धरायचा।
- "बिग बी' आणि "ब्लॉग' या शब्दांना मराठीतील पर्यायी प्रतिशब्द अमिताभनं वापरावेत, यासाठी आंदोलन उभारायचं।
---
(खुलासा ः नेत्यांच्या नववर्षसंकल्पाची ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, आपण असे संकल्प केलेच नसल्याचा खुलासा या सर्व नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत केला. सुधारित यादी लवकरच पाठवून देणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. )

भीमाशंकरचा द्राविडी प्राणायाम!



रोज किंवा दर दोन दिवसांनी ब्लॉग लिहायचं ठरवलं, तरी ते साध्य होत नाही। एकतर आपण काही अमिताभ बच्चन नाही, ज्याला शिंक आली, तरी लोकांना कुतुहल वाटेल. त्यातून त्याला रोज घरची भांडी घासणं, कचरा काढणं, ढेकूण झाले तर पेस्ट कंट्रोलवाला शोधून काढून त्याला फोन करणं, मुलीची शी-शू काढणं, असली कामं करावी लागत नाहीत. (स्वतःची शी-शू काढायला सुद्धा माणसं ठेवली असतील त्यानं! असो.) तर नमनाला एवढं घंगाळभर तेल ओतल्यानंतर आता सांगण्याचा उद्देश हा, की या वेळी भीमाशंकरच्या सहलीबद्दल लिहायचा विचार आहे. फार ग्रेट बिट नव्हती सहल, पण जरा दोन दिवस बदल झाला, एवढंच!
रविवारला जोडून सोमवारी सुटी घेतली होती। मनस्वीच्या शाळेला आठ दिवस नाताळची सुटी होती. तिलाही बदल म्हणून हर्षदानं सुटी काढली आणि पाठोपाठ मी. मग कुठेतरी जायचा बेत आखायला घेतला. महाबळेश्‍वर, माथेरान, प्रतापगड, इकडे जाण्यात काही अर्थ नव्हता. रायगड, दापोली वगैरे लांब पडलं असतं. म्हणून भीमाशंकरची निवड केली. "ब्लू मॉर्मोन' या हॉटेलविषयी आधी ऐकलं होतं आणि तिथेही जायची बरेच दिवस इच्छा होती. सगळा योग जुळून आला आणि भीमाशंकरचं हॉटेल आणि बसचं बुकिंगही मिळालं.
रविवारी, 28 तारखेला भल्या पहाटे साडेसहाची गाडी पकडली। भीमाशंकरला पोचेपर्यंत बरीच दमछाक झाली. रस्ता खराब आणि घाट असल्यामुळे लाल डब्यात त्रासही झाला. "प्रवासाचा त्रास होणाऱ्यांचं कठीण असतं...स्वतः खाल्लं तरी त्यांच्या पोटात दुखतं आणि दुसऱ्यांनी खाल्लं, तरी!' या ग्राफिटीची आठवण झाली. अशाच एका वाईट प्रवासात ती सुचली होती. असो. साडेदहाच्या सुमारास भीमाशंकरला पोचलो. पण कालच्यापेक्षा वातावरण जरा बदललं होतं. काल रात्रीपासून मनस्वीला अचानक कोरडा खोकला सुरू झाला होता. रात्री एक वाजेपर्यंत जागी होती. त्यातून सकाळी लवकर उठल्यानं तिचं सगळं तंत्र बिघडलं होतं. आम्ही तिथे औषधांची चौकशी केली, पण काहीच उपलब्ध नव्हती. आम्हीही चुकून काहीच नेली नव्हती. ती तर खोकून खोकून हैराण झाली होती. खरं तर गुप्त भीमाशंकर वगैरेला जाऊन आणि दिवसभर फिरून संध्याकाळी हॉटेलवर जायचा बेत होता, पण तो बदलावा लागला.देऊळ पाहूनच आम्ही माघारी हॉटेलकडे जायला निघालो. सात किलोमीटरवरच्या पालखेवाडी फाट्याला उतरायचं होतं. तिथून दोन किलोमीटर आत हॉटेल आहे. आम्हाला न्यायला त्यांची गाडी येणार होती. आम्ही बाराला निघालो आणि मोबाईलला रेंज नसल्यानं, तिथून कॉइन बॉक्‍सवरून हॉटेलवर गाडी पाठवायला कळवून ठेवलं. गाडीत बसेपर्यंत सगळं ठरल्याप्रमाणे होत होतं. नंतर अचानक सगळंच चक्र फिरलं.
मनस्वीचा खोकला फारच वाढल्यासारखा वाटला आणि औषधंही नसल्यावर दिवस कसा काढायचा, असा विचार केला। मग आम्ही एकदा पुढच्या तळेघर गावात थांबून, औषधं घेऊन पुन्हा हॉटेलवर मागे जाण्याचा विचार केला. पण तिथे डॉक्‍टर मिळाला नाही तर काय, असं वाटलं. मग थेट पुण्यालाच जायचं ठरवलं. तसं तिकीटही काढलं. पालखेवाडीला थांबून जीपवाल्याला निरोप तरी देऊ, असा विचार केला, पण कंडक्‍टरने स्टॉप सांगितलाच नाही. मग झाली पंचाईत! मग पुढे आल्यावर पुन्हा विचार बदलला. सुटी घेतलीच आहे, तर फुकट कशाला घालवायची? एकतर ठरलेला कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीत बदलायला मला आवडत नाही. मनस्वीलाही नंतर थोडासा आराम पडला. मग पुण्याचं तिकीट फुकट घालवून, घोडेगावलाच उतरलो. तिथे औषधं घेऊन पुन्हा परतीची गाडी पकडून भीमाशंकरच्या दिशेनं आलो. पालखेवाडीला उतरून, गाडीने हॉटेलवर पोचलो. दोन तास थांबायला लावलं, म्हणून हॉटेलवाला वैतागला होता.
ब्लू मॉर्मोन' हे जंगलात, माळरानावर बांधलेलं एक छोटेखानी हॉटेल निवांत राहायला चांगलं आहे. पण अपेक्षा होती, तशी तिथे फार गर्द झाडी वगैरे नव्हती. आमची एका बंगलीत सोय केली होती. व्यवस्था चांगली होती. फ्रेश वगैरे झाल्यावर जेवण केलं. मग संध्याकाळी शेजारचं एक देऊळ, तळं, हेलिपॅड आणि सनसेट पॉइंटला फेरफटका मारला. संध्याकाळी लवकर परतलो. खूप दमलो होतो. खोलीवरच जेवण मागवलं. रात्री कॅंटीनपर्यंत जायचं म्हणजे सुद्धा भीती वाटत होती, एवढ्या लांब होती आमची ती बंगली. एवढ्या निवांतपणासाठी दिवसाला बाराशे रुपये मोजावे लागले, ही गोष्ट वेगळी!फार उत्तम नाही, पण बऱ्यापैकी व्यवस्था झाली राहण्याची. दुसऱ्या दिवशी पुन्ही भीमाशंकरला जाण्याची माझी इच्छा होती. कारण तिथलं प्रसिद्ध "शेकरू' (मोठी खार) आम्हाला दिसलंच नव्हतं. पण या दोघींच्या विरोधापुढे माझी इच्छा तोकडी पडली. साडेदहाला हॉटेलवाल्यांनी आम्हाला एकेक करून बाईकवरून फाट्यापर्यंत सोडलं. तिथं सव्वा तास बसची प्रतीक्षा करावी लागली. संध्याकाळी चारला घरी आलो.
भीमाशंकरला पूर्वीही एकदा गेलो होतो. तेव्हा गुप्त भीमाशंकरलाही जाऊन आलो होतो. प्रसिद्ध "शेकरू' तर देवळाजवळच दिसलं होतं! या वेळी योग नव्हता, एवढं मात्र खरं! पुढच्या वेळी जाऊ, तेव्हा स्वतःची गाडी घेऊनच, असा निश्‍चयही करून टाकला!