Dec 25, 2008

सादरीकरण वजनी; हिंसेच्या "भजनी'!

आमीर खानचा हेअरकट, डोक्‍यावरच्या आघाताचं गूढ आणि शीर्षकाचा अर्थ एवढी रहस्यं "गज़नी'ला आहेत। भरपूर मालमसाल्यात घोळवून ही रहस्यं प्रेक्षकांपर्यंत पोचवून दणदणीत मनोरंजन देण्यात "गज़नी' 200 टक्के यशस्वी झाला आहे. तरीही मूळ घटनेचं रहस्य सांगेपर्यंत ताणलेली आणि सांगितल्यानंतर सरळसोट धावणारी कथा आणि नायकाच्या अचाट ताकदीबाबत दाखविलेलं "(पुरुष)दाक्षिण्य' यामुळं हा चित्रपट झेपणं प्रत्येकाच्या पचनशक्तीवर अवलंबून आहे. मात्र अतिहिंसेच्या "भजनी' लागला नसता, तर चित्रपट आणखी "वजनी' झाला असता.
ही एक अगदी सर्वसाधारण सूडकथा आहे; पण वेगळ्या प्रकारे सादर केलेली। संजय सिंघानिया (आमीर खान) हा एका बड्या मोबाईल कंपनीचा मालक. त्याचं कल्पना (असीन) या नवोदित मॉडेलशी अपघातानं प्रेम जमतं. ते पुरेसं फुलण्याआधीच चित्रपटातला परमोच्च बिंदू असलेला "तो' आघात होतो. नंतर संजयचं आयुष्य बदलतं. त्याला पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काळ काही लक्षात राहत नाही, म्हणून तो अंगभर आणि घरभर प्रदर्शन सूचनांची रांगोळी घालून ठेवतो. त्याच्या सूडाचा हा प्रवास.
कथेचं सादरीकरण दाक्षिणात्य स्टाइलचं; तरीही भन्नाट! चित्रपटातल्या मूळ घटनेपर्यंतचा प्रवास वेगानं होतो। संजय-कल्पनाचं प्रेमप्रकरण हा चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भाग बॉलिवूडपटांपेक्षाही वरच्या पातळीचा. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीच्या (जिया खान) प्रयत्नांतून नायकाचं आयुष्य मध्यंतरापर्यंत अतिशय परिणामकारकपणे प्रेक्षकांसमोर उलगडत जातं. त्यानंतर मात्र तो आघात आत्ता घडेल, मग घडेल, अशा प्रतीक्षेत प्रेक्षकाला एक-दोन गाणीही घुसडून बरंच टांगलं जातं. प्रत्यक्ष आघाताचा प्रसंग अंगावर काटा आणणारा असला, तरी सहृदय लोकांना न पाहवणाराच!
त्या बहुप्रतीक्षित प्रसंगानंतरचा प्रवास मात्र अगदीच सरधोपट आहे। एकदा फक्त नायकाकडच्या सगळ्या नोंदी पुसून त्याची स्मृती घालविण्याचा प्रयत्न केला जातो, तेवढंच काय ते वेगळेपण! बाकी, दाक्षिणात्य चित्रपटाचा "रीमेक'च असल्यानं दिग्दर्शक ए. मुरुगदास यांनी तिकडचा आततायी हिंसाचार, ढणढणाटी संगीत, रक्ताचा सडाबिडा व्यवस्थित घातला आहे, फक्त थोडा सौम्य रूपात!
बडा उद्योगपती असलेल्या नायकाला चेहऱ्यानं (पोलिसांसकट!) कुणीच कसं ओळखत नाही, त्याची स्मरणशक्ती गेल्यानंतर कंपनीचे लोक त्याला एकटे कसे सोडतात, डझनभर लोकांना यमसदनाला धाडल्यानंतरही तो लगेच बाहेर कसा येतो, वगैरे चुका सोडून देण्याजोग्या।
दहा-बारा लोकांना एका वेळी लोळवू शकेल, एवढं पटवून देण्याजोगं विक्राळ रूप आमीरने धारण केलंय, हे मात्र खरं! एकाच वेळी सरळमार्गी माणूस आणि नंतर सूडानं पेटलेला रक्तपिपासू महामानव त्यानं परिणामकारक सादर केला आहे। (पण तो आलिशान ऑफिसातही शर्टाच्या अर्ध्या बाह्या वर करून चालतो. बहुधा चाहत्यांची गरज म्हणून!) नवोदित असीन अतिशय उत्स्फूर्त आणि प्रसन्न. प्रदीप रावतने क्रूरकर्मा खलनायक उत्तम साकारला आहे. चित्रपटाच्या इतर दर्जाच्या बाबतीत ए.आर. रेहमानचं संगीत अगदीच सुमार.
हिंसक दृश्‍यांबद्दल माफ केलं, तर आमीरच्या शिरपेचात "गज़नी'चा आणखी एक तुरा खोचायला हरकत नाही!

Dec 23, 2008

मौजेचा आठवडा!

मनस्वीची शाळा म्हणजे एक गंमतच आहे। खेळ, गाणी आणि दंगामस्ती! आजच शाळेतून सुटल्यावर सांगत होती, "आज आम्ही "कनिका'चं लग्न केलं आणि सानिकानं माझ्या हातावर खोटीखोटी मेंदी काढली.' आता या पोरी हे लग्न-लग्न कधी खेळतात आणि बाई तरी त्यांना परवानगी कशी देतात, कुणास ठाऊक!
असो। सांगायची गोष्ट ही, की गेल्या आठवड्यात नुसती धमाल होती. 14 तारखेला, रविवारी तिचा वाढदिवस होता. आम्ही खरं तर दरवर्षीसारखा साजरा करणार नव्हतो, तरी गेला बाजार तीसेक माणसं झालीच. यंदा पहिल्यांदाच ऑर्डर देऊन "मॉंजिनीज'चा (सुमारे 800 रुपयांचा) केक आणला होता. (माझ्या खाऊसाठी अख्ख्या आयुष्यात आई-वडिलांनी केलेल्या खर्चही याहून कमीच असेल!) मनस्वीच्या इच्छेप्रमाणे तो मिकी-माऊसचा होता. एक तर मॉंजिनीज-बिंजिनीज सारख्या ठिकाणी ऑर्डर देऊन केक वगैरे घेण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे केकचा फ्लेवर कोणता, सॉफ्ट की नॉर्मल वगैरे प्रश्‍नावली रताना माझी फें-फें उडाली होती. केक आणायला स्कूटी घेऊन गेलो, तेव्हा कळलं, त्यावर बसण्याएवढा तो लहान नाहीये. काय करायचं, असा प्रश्‍न होता. मग वाटेत एका सत्शील दिसणाऱ्या रिक्षावाल्याला पकडलं. मनस्वी आणि तो केक दोघांना सांभाळून घरी पोचविण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. तोही बिचारा कबूल झाला. तिथून त्याच्यासह मॉंजिनीज आणि मग त्याच्या मागेमागे किंवा बरोबरीने घरी, अशी आमची वरात निघाली. मनस्वी आधी एकटी रिक्षात बसायला तयार नव्हती, पण केकचीही जबाबदारी असल्याने कदाचित आपण मोठं झाल्यासारखं वाटत असावं.
संध्याकाळी वाढदिवस छान झाला। घरी फार सजावट केली नव्हती. केक, पावभाजी, गुलाबजाम, असा बेत होता. सोसायटीतली चिल्ली-पिल्ली आणि काही नातेवाईक, अशी मंडळी होती. रत्नागिरीहून अप्पा खास त्यासाठी आले होते. आजारपणानंतर विश्रांती म्हणूनही त्यांना आईने इकडे पिटाळलं होतं. (विश्रांतीच्या नावाखाली ते रोज नव्या ठिकाणी फिरण्याची टूम काढत होते, ही गोष्ट निराळी! ते आईला अजून सांगितलं नाहीये!)
वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी शाळेला सुटी होती। मंगळवारी, 16 तारखेला मनस्वीचं स्नेहसंमेलन होतं. अप्पांचा तोही योग चांगला होता. बाईंना नऊवारी साडी नेसवायची होती. ती अर्थातच कुणाकडून तरी उसनी, रेडिमेड आणली होती. पाच ते सहा अशा कार्यक्रमात मनस्वीचं नृत्य दहा मिनिटांचं होतं. त्यासाठी गेले महिनाभर तयारी सुरू होती. ती घरीदेखील त्याच वातावरणात होती. एक-दोनदा तर माझ्याकडून आणि हर्षदाकडूनही तिनं डान्सची प्रॅक्‍टिस करून घेतली होती! "उदे गं अंबे उदे' हा गोंधळ होता. नावाप्रमाणेच नृत्यातही गोंधळ झाला. मनस्वी नाचते चांगली, पण ती दुसऱ्या रांगेत होती. पुढच्या दोन मुली व्यवस्थित नाचणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे मनस्वीचा उत्साह काहीसा झाकोळला गेल्याचं जाणवलं. तुलनेने, शाळेतल्या तिच्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळी तिचं नृत्य उत्तम झालं होतं. त्यात मुली कमी होत्या आणि मनस्वीला नाचायलाही चांगला वाव होता.
कार्यक्रमांच्या वेळी पालक मधेमधे करतात, म्हणून कुणी पालकांनी फोटो किंवा व्हिडिओसाठी मध्ये येऊ नये, अशी सूचना शाळेनं आधीच केली होती। बसल्या जागेवरून फोटो काढणं शक्‍य नव्हतं. मी वशिल्यानं पहिल्या रांगेत जाऊन बसलो आणि तिथून व्हिडिओ घेतला. पण फारसा चांगला आला नाही. आता शाळेची डीव्हीडी भरमसाट किंमतीत विकत घ्यावी लागेल!
मधल्या सोमवारच्या दिवशी मी, अप्पा आणि मनस्वी थेऊरला जाऊन आलो। पण अगदी पोपटच झाला. एकतर आधी स्वारगेट, मग तिथून बऱ्याच प्रतीक्षेनंतर मिळालेल्या बसमधून थेऊर फाटा आणि नंतर तिथून तिसऱ्या बसने थेऊर, असा कंटाळवाणा प्रवास झाला. देऊळही मला अजिबात आवडलं नाही. मला एकतर निसर्गाच्या सान्निध्यातली, शांत ठिकाणची देवळं आवडतात. तर तेही असो.
स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मनस्वीच्या शाळेतला अल्पोपाहार रद्द झाला. त्याचे पैसे वाचवून मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना द्यायचे ठरलेय म्हणे! पोरांचा उगाच हिरमोड. पण मनस्वीला सुटी मिळाली. आता उद्या, बुधवारी फक्त दोन तास शाळा आहे. नंतर नाताळची आठ दिवस सुटी! कार्टी डोकं पिकवणार आहे आठवडाभर!!
http://picasaweb.google.com/abhi.pendharkar/ManasviSBirthday?feat=email#