Jan 28, 2014

`हॅक` तिच्या!

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात दुःखं तरी किती असावीत! रस्त्यावरचा खड्डा चुकवावा लागला नाही, टीव्हीचे सगळे चॅनेल व्यवस्थित दिसले, बायकोनं एकही दिवस भांडण केलं नाही, बॉसनं फालतू कारणावरून झापलं नाही, असा एकही दिवस उगवत नाही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात!

गण्या हा असाच एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस. कुणाच्या अध्यात-मध्यात नसलेला. (थोडक्यात शक्यतो प्रत्येक बाबतीत मूग गिळून (किंवा शेपूट घालून!) गप्प बसणारा. गण्याची हौस मात्र दांडगी. प्रत्येक गोष्टीत त्याला फार इंटरेस्ट. प्रत्येक विषयात त्याचा जवळपास व्यासंग! अर्थात, अनुभव आणि निरीक्षणांतून आलेला. सीरियावर हल्ला होणार की नाही, याचं उत्तर आंतरराष्ट्रीय संबंधांमधला एखादा प्रकांडपंडित किंवा एखादा होराभूषणही देऊ शकणार नाही, पण गण्याला त्याचं उत्तर माहीत असतं. बराक ओबामांना ते जाणून घ्यावंसं वाटत नाही, हा त्यांचा करंटेपणा.

गण्याची सगळीकडेच फिरस्ती. तसा गण्या लहानपणापासूनच संवेदनशील. मनाचा हळवा. कांदा चिरतानाही त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं ते कांद्याच्या उग्रपणामुळे नव्हे, तर तो चिरला जातोय, याबद्दल गण्याच्या मनाला होणा-या यातनांमुळे.

अशाच दोन वेगवेगळ्या बातम्यांनी गण्याचा जीव अलिकडेच पुन्हा कासावीस झाला होता. पहिली बातमी होती ती आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या (उद्योगांच्या नव्हे!) आणि भारत-पाकिस्तान परराष्ट्र संबंधांना एक वेगळा आयाम देणा-या थोर अभिनेत्री (?) वीणा मलिक यांची. लग्नानंतर आता त्यांनी चित्रपट क्षेत्रातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. खरंतर एकतर लोक संन्यास संपल्यानंतर लग्न करतात किंवा लग्नाचा आणि संसाराचा कंटाळा आल्यानंतर अनेक वर्षांनी संन्यास घेतात. हा संन्यास चित्रपट क्षेत्रातल्या कारकिर्दीचा होता, हे गण्याच्या खूप उशिराने लक्षात आलं. तरी त्याचा जीव हेलावायचा तो हेलावलाच! आपल्या महान चित्रपटसृष्टीचं, टीव्ही चॅनेल्सवरच्या टॉक शोजचं आणि `बिग बॉस`सारख्या रिअलिटी शोजचं काय होणार, या गंभीर प्रश्नानं गण्याची रात्रीचीच काय, दुपारची झोपसुद्धा उडाली!

दुसरी बातमी आणखी गंभीर होती. भारतीय क्रिकेट संघाचं विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्यासाठीचं प्रेरणास्थान आणि तमाम भारतीय क्रिकेटरसिकांचं आशास्थान असलेल्या मॉडेल-कम-अभिनेत्री मा. पूनमजी पांडे यांची वेबसाईट हॅक झाल्याची खबर होती. ही अफवा नाही, तर साक्षात पूनमजींनी ट्विटरवरून जाहीर केलं होतं. (आता, त्यांचं ट्विटर अकाउंट कुणी हॅक करून पुन्हा ही अफवा कुणीतरी पसरवली होती की काय, कोण जाणे!) गण्याच्या पायाखालची वाळू सरकली. मा. पूनमजींची ही वेबसाईट रात्रंदिवस पाहताना (म्हणजे दिवसा कमी, रात्री जास्त!) गण्यानं इंटरनेटचं बिल भरमसाठ वाढवून घेतलं होतं! `नशा`सारख्या असंख्य चित्रपटांत त्यांनी केलेल्या कायिक अभिनयामागची सामाजिक आणि मनोवैज्ञानिक भूमिका वाचताना गण्याचं काळीज हेलावून गेलं होतं. ही अशी वेबसाईट हॅक झालेय, हा धक्काच गण्याला न झेपणारा होता. स्वतःची सख्खी बायको मित्राबरोबर पळून गेल्यानंतर जेवढा रडणार नाही, तेवढा गण्या त्या दिवशी रडला.

भारतासारख्या देशात कुठलीच गोष्ट सुरक्षित नाही, या भावनेपेक्षाही गण्याच्या मनातली दुसरी भीती जास्त गंभीर होती. भारतीय क्रिकेट संघानं वर्ल्ड कप जिंकला, तर (किमान एकदा तरी!) नैसर्गिक अवस्थेत फिरण्याची प्रेरणादायी घोषणा पूनमताईंनी केली होती. त्यानंतर भारतानं खरंच वर्ल्ड कप जिंकला. (हा योगायोग की खरंच स्फूर्ती, याबद्दल धोनीनं उत्तर देणं टाळलं म्हणे!) पण दुर्दैवानं पोलिसांच्या आणि कायद्याच्या दबावामुळे पूनमताईंना त्यांची (आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची) मनोकामना पूर्ण करता आली नाही. मा. पूनमजी कधी ना कधी त्यांचा शब्द पाळतील, या एकमेव आशेवर गण्या जगतोय. पण कालच्या ताज्या बातमीमुळे, त्यावेळची ती घोषणा नक्की पूनमजींनीच केली होती, की त्यांची साईट/ट्विटर अकाउंट हॅक करून आणखी कुणी हा चहाटळपणा केला होता, याबद्दल गण्याचा गोंधळ उडालाय!

....