Jul 14, 2015

प्रश्नांकित...!

लहानपणी गोष्टी ऐकताना किंवा वाचताना जिवावर उदार होऊन राजकन्येला आजारपणातून किंवा संकटातून वाचवणा-या एखाद्या गरीब बिचा-या तरुणाला राजा अर्धं राज्य देतो आणि राजकन्येचंही त्याच्याशी लग्न लावून देतो, याचं फार अप्रूप वाटायचं. (अप्रूपच. असूया नव्हे. कारण आपल्याला असा कुठला उदार राजा मिळणार नाही, याची शंभर टक्के खात्री असायची. आणि फक्त तेवढ्या आशेवर आपण एवढं साहस बापजन्मी करणार नाही, याची दोनशे टक्के. तर ते असो!)

माझ्या मुलांना अशाच काहीतरी गोष्टी रचून सांगताना हा लग्नाचा विषय मध्ये येणार नाही, याची काळजी मी आवर्जून घेतो. जेणेकरून माझ्या लहानपणी मला पडणारे प्रश्न त्यांना पडू नयेत. (मुलांचं मन निरागस, चौकस असतं. त्यांना प्रश्न विचारू द्यावेत, मुलं म्हणजे मातीचा गोळा छाप उपदेश श्यामची आई/बाबांनी करू नयेत.)

आज मुलाला (वय वर्षं साडेपाच) अशीच एक स्वैर रूपांतरित गोष्ट सांगत होतो. सगळ्यात शेवटी राजकन्येला वाचवल्यानंतर त्या तरुण गरीब मुलाला राजानं मोठ्ठं बक्षीस दिलं, असं सांगितलं. राजकन्येशी लग्नाचा विषय कटाक्षानं टाळला.

 ``बक्षीस म्हणजे काय दिलं?``

हा प्रश्न अचानक आला, पण अनपेक्षित नव्हता.

``म्हणजे, खूप सोन्याच्या मोहरा आणि एक मोठ्ठं घर दिलं राहायला.`` मी त्याची समजूत घालायचा प्रयत्न केला.

`` पण तो आणि त्याची आई, असं दोघंच आहेत ना? मग त्याला एवढं मोठं घर कशाला हवं?``

त्याच्या पुढच्या प्रश्नानं मी सर्द झालो...!