Oct 18, 2007

शेण कसे खावे?



बाजारात येता-जाता, गल्ली-बोळातल्या फूटपाथांवर, रेल्वे स्टेशनांवर, बस स्टॅंडांवर, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची वर्तमानपत्रं, नियतकालिकांत सध्या एकाच प्रकारच्या पुस्तकाची चलती आहे...यश कसे मिळवावे, सुखी कसे व्हावे, यशस्वी होण्याचे शंभर उपाय, अपयशातून यशाकडे वगैरे वगैरे....!


ही पुस्तकं एवढ्या संख्येनं सगळीकडे मिळताहेत, खपताहेत, त्यावरून त्यात नक्कीच काहितरी "दम' असला पाहिजे. "नॉन-फिक्‍शन' पुस्तकंच हल्ली खपतात, अशी "रिऍलिस्टिक' माहितीही मिळाली. त्यामुळं आम्हीही काहितरी हृदयद्रावक, मनखोदक, बुद्धिभेदक, नेत्रविस्फारक, कल्पनारम्य, चक्षुचमत्कारिक लिहिण्यापेक्षा खर्रखुर्र आणि वास्तवाधारित लिहावं, असं वाटू लागलं....पण "यश कसं मिळवावं' अशा छापाचं काहितरी लिहायचं, तर स्वतःला किमान यश मिळालेलं असणं अपेक्षित किंवा अध्याहृत आहे, असं आम्हाला वाटलं. (अशी पुस्तकं लिहिणाऱ्या किती जणांना आधी आणि पुस्तकानंतर यश मिळालंय, देव जाणे! पण आमची आपली एक भ्रामक समजूत.) त्यामुळं तो प्रश्‍न मिटला. यशाचा आणि आमचा म्हणजे भुजबळ-शिवसेनेइतकाही संबंध नाही. मग लिहावं कशावर...?


मोठा खासा प्रश्‍न होता. मग आपला हातखंडा असलेल्या अपयशावरच काहितरी लिहावं असा कौल आमच्या सडक्‍या मेंदूनं दिला. भिकारगल्लीतल्या "कवडीमोल' प्रकाशनानं स्वतःहून प्रकाशनाची तयारी दाखवली आणि दहा रुपये सवलतीत एक प्रत आणि खपलेल्या दर तीन पुस्तकांमागे सव्वा रुपया असं भरघोस मानधन मंजूर झाल्यानंतरच आम्ही लेखणीला हात घातला.सध्या एकट्या सानिया मिर्झाचा सन्माननीय अपवाद वगळता सगळ्याच खेळांतले खेळाडू, कलाकार, मान्यवर, मंत्री, संत्री, मोसंबी, सगळ्या क्षेत्रांत यशस्वी होत असताना त्यांच्यासाठी "यश कसे मिळवावे' अशा प्रकारच्या पुस्तकांची काहीच गरज नाही, असे वाटून गेले. (असलीच, तर ती सचिन तेंडूलकरला असेल. पण तोही जाहिराती, हॉटेल व्यवसाय, पेज थ्री वगैरे क्षेत्रांत यशस्वी आहेच की!)


"यशाचाही कंटाळा येतो' अशा स्वरूपाचे कोणत्या तरी प्रसिद्ध व्यक्तीचे संतवचनही आमच्या कानावर पडले होते. त्यामुळं प्रत्येक यशस्वी व्यक्तीनं अपयशाची चवही थोडी चाखून बघायला हवी, असं आम्हाला वाटून गेलं. त्यामुळंच, "अपयशी होण्याचे 51 सोपान' अशा छापाचं पुस्तक लिहिलं, तर ते हातोहात खपेल, अशी मनोमन खात्री झाली. पण पुस्तकाला नाव काहितरी आकर्षक असावं, असं कुणीतरी सुचवलं. उदा. "इडली, ऑर्किड आणि मी', "ही श्रींची इच्छा' वगैरे. म्हणून मग आमचा "अंतू बर्वी' बाणा ऐनवेळी हात देऊन गेला. "अपयशी कसे व्हावे' यालाच समानार्थी असलेला आणि आम्ही स्वतः वारंवार अनुभवलेला "शेण कसे खावे,' हा वाक्‍प्रचार मदतीला धावून आला. पुस्तकाला शीर्षक तेच ठरलं.


या पुस्तकाची किंमत फारच वाजवी (कुणीतरी कानाखाली "वाजवी'ल!) असल्यामुळं आणि ते नाक्‍यानाक्‍यावर "गोवा, माणिकचंद'पेक्षाही सहज उपलब्ध असल्यामुळं त्यातल्या तपशीलाबद्दल फार काही देण्याचा मोह इथे टाळलाय. (विचारलंय कुणी?) तरीही, ही थोडक्‍यात झलक...


1. कुठलंही काम हाती घेताना आपल्याला हे बापजन्मात जमणार नाही, याची खात्री मनात बाळगावी.

2. असला-नसलेला उत्साह झटकून टाकून, प्रचंड नैराश्‍यानं आणि एरंडेल प्यायल्यासारखा (किंवा अलोकनाथसारखा म्हणा, हवं तर!) चेहरा करून कामाला नाइलाजानंच सुरुवात करावी.

3. थोडंसं जरी आपल्याला काम जमतंय, यश मिळतंय, असं वाटायला लागलं, की काहितरी कारणं काढून आपली कामाची दिशा बदलावी. नसलेल्या त्रुटींबद्दल तक्रारी करून काम देणाऱ्याला हैराण करून टाकावं.

4. कामात इंटरेस्ट वाटायला लागला असल्यास ताबडतोब काम थांबवावं. चहा किंवा लघुशंकेचं निमित्त करून कामातून मन काढून घ्यावं. उसना उत्साह गाळून टाकावा आणि नव्या नैराश्‍यानं पुन्हा कामाला हात घालावा.

5. एवढं करूनही कसंबसं एखादं काम पूर्णत्वाला गेलंच, तर अंतिम टप्प्यानंतर तरी ते कुणापर्यंत पोचणार नाही, याची काळजी घ्यावी.

6. शक्‍यतो त्याचा आणि आपल्या अयशस्वी कारकिर्दीचा तोंड फाटेस्तोवर अपप्रचार करावा.

7. कामात जाणुनबुजून काहीतरी त्रुटी ठेवाव्यात आणि त्यांवरच समाधान मानावे.

8. आपलं यश काम पूर्ण होण्यात नाही, तर ते अर्धवट राहण्यात, अयशस्वी होण्यात आहे, याची कायम जाणीव ठेवली, तर कधीच अपयश येणार नाही. (म्हणजे काय?)

9. एखाद्या वेळी यशस्वी होण्याची थोडीशीही धुगधुगी निर्माण झाल्यास, ताबडतोब केलेल्या कामाचा बट्ट्याबोळ करून टाकावा.

10. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, अपयश हे आपलं ध्येय आहे, हे पक्कं मनाशी ठेवावं.

----


सध्या माझं हे पुस्तक प्रचंड खपतंय.

हं...आता काही नतद्रष्ट समीक्षकांच्या पोटात या पुस्तकाचा अत्युच्च दर्जा खुपल्यामुळं आणि त्यांच्या डोळ्यांवर "यश कसं मिळवावं' वगैरे पुस्तकांचं यश असल्यामुळं त्यांनी माझ्या पुस्तकावर प्रचंड टीका केलेय. "लेखकाच्या अपयशाचं कारण सांगणारं पुस्तक' अशी शेलकी आणि सदाशिव पेठी विशेषणं त्यांनी लावल्येत, पण आम्ही फिकीर करत नाही....अपयशावर आमचा प्रचंड विश्‍वास आहे....!


तुम्हीही हे पुस्तक (कुठे मिळालंच, तर) जरूर वाचा आणि अभिप्राय कळवा.
काशीत गेलातच म्हणून समजा!


-------------

Oct 16, 2007

धुलाई आणि कोडकौतुक...


सिनेमा पाहण्याचं आमचं वेड पहिल्यापासूनच.
(दर वेळी हीच सुरुवात करायला हवी का? गेल्या वेळी "चक दे'बाबतही पहिलं वाक्‍य हेच होतं. पेंढारकर, सिंह गवत खायला लागलाय आता!)
अगदी मिथूनपासून सोमी अलीपर्यंत (माहितेय?) कुठलाही सिनेमा वर्ज्य नाही.
परीक्षण लिहिण्याची खुमखुमीही पहिल्यापासूनच.
रत्नागिरीत 1994 साली "रत्नागिरी एक्‍स्प्रेस'मध्ये पहिलं परीक्षण लिहिलं. "हम आपके हैं कौन'चं. त्यानंतर परीक्षणं लिहिण्याचा छंदच लागला. कमलाकर नाडकर्णी, शिरीष कणेकर, अभिजीत देसाई, श्रीकांत बोजेवार, यांचा मी पहिल्यापासूनचा फॅन. आणि नंतर मुकेश माचकरचा. किती लिहिलंय या लोकांनी चित्रपटांबद्दल! त्यांनी परीक्षणं वाचणं म्हणजे तर मेजवानीच!

मग त्यांची नक्कल करता करता स्वतःची शैली (डोंबल!) विकसित झाली.

"जेमतेम दोन-तीन हातरुमालांपासून तयार होतील, एवढेच कपडे "सत्यम शिवम्‌ सुंदरम'मध्ये झीनत अमाननं घातलेत.' किंवा "अमक्‍या तमक्‍याला अभिनेता म्हणण्याची माझी तरी छाती होणार नाही. (माझीच काय, ममता कुलकर्णीचीही होणार नाही!) हे शिरीष कणेकरांनीच लिहावं.
"आपटून धोपटून पीळ पीळ पिळलेली माहेरची साडी' हे खास नाडकर्णी स्टाईल शीर्षक. किंवा "चित्रपटात मरतानाही पूजा बेदी अंगप्रदर्शन करून मरते. (केवढी ही निष्ठा!)' हे त्यांच्याच परीक्षणात शोभणारं.
"रंग' ओला आहे' हे श्रीकांत बोजेवारांचं शीर्षक, किंवा "त्यांचंच आग लागो त्या बस्तीला' हे शीर्षक.
"थोरला आणि धाकटा' हा अभिजीत देसाईंचा लेख...आजही चांगलाच लक्षात आहे.
"अचानक कसला, भयानकच!' हे माचकरचं शीर्षक. किंवा "पहेली'वरचा लेख. खास "मुमा'टच!
--
हे सगळं वाचता वाचता स्वतःही परीक्षणं लिहायची सवय लागली आणि चक्क छंद जडला. पुण्यात आल्यावर पत्रकारितेची पदवी करता करता आमच्या विभागाच्या नियतकालिकातच काही परीक्षणं लिहिली. मग "सकाळ'मध्ये नोकरीला लागल्यानंतर दोन-तीन वर्षांनी परीक्षणं लिहिण्याची संधी मिळाली.

परीक्षणात खूप प्रयोग करण्याची संधी मिळाली. मराठी चित्रपटांबद्दल सहानुभूतीनं लिहिण्याचं धोरण स्वीकारतानाच वाईट चित्रपटांना ठोकण्याची परंपराही राबविली. सगळ्यात गाजलेलं परीक्षण म्हणजे गौतम जोगळेकरच्या "आई नं 1'चं. एवढा भीषण सिनेमा मी आजवर पाहिला नसेल. "माता न तू वैरिणी' असं शीर्षक मी त्याला दिलं होतं. जोगळेकर जाम खवळले होते. भलं मोठं पत्रही लिहिलं. तेही "सकाळ'ने छापलं, माझ्या उत्तरासकट!


एका संथ, वाईट मराठी चित्रपटाचं परीक्षण मी "आपण रांगत आहात' असं दिलं होतं. केदार शिंदेच्या "जत्रा-ह्याला गाड रे त्याला गाड'चं परीक्षण "कथेला गाड रे तंत्राला काढ' या शीर्षकानं दिलं होतं.

"धूम-2' या केवळ तांत्रिक चमचमाटी चित्रपटाचं परीक्षण वेगळ्या शैलीत, "गंमत म्हणजे काय रे भाऊ?' असं दिलं होतं. तेही गाजलं.
चित्रपट बघताना कॅमेऱ्याचे अँगल्स, दिग्दर्शकाची मानसिकता, शेड्‌स, रंगांचा वापर, याला माझ्या लेखी अजिबात महत्त्व नाही. मी मानतो, ते चित्रपटाच्या एकूण परिणामाला. सिनेमा आपल्याला एकूण आवडला, तर असल्या बारीक सारीक गोष्टी लक्षातही येत नाहीत, राहत नाहीत. चित्रपटच परिणामकारक नसेल, तर त्यातल्या त्रुटी, खाचाखोचा आपल्याला दिसायला लागतात. तशी संधीच प्रेक्षकाला देत नाही, तो खरा उत्तम चित्रपट.

विनोदी, गंभीर, सामाजिक, कौटुंबिक...कुठलाही चित्रपट आपल्याला वर्ज्य नाही. मी परीक्षणासाठी चित्रपट पाहताना सर्वसामान्य प्रेक्षकाच्या नजरेतून बघतो. म्हणजे अगदी पिटातल्या नाही, तर सुजाण प्रेक्षकाच्या. एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला चित्रटपट आनंद देतो ना, भिडतो की नाही, हे महत्त्वाचं. मग बाकीचे निकष दुय्यम.

मराठी चित्रपट म्हणून निष्कारण उदोउदो नाही आणि दुय्यम अभिनेत्यांचा म्हणून अनाठायी टीका पण नाही. पण हेतूच वाईट असेल, तर त्या सिनेमाला, दिग्दर्शकाला सोलून काढण्याला पर्याय नसतो. म्हणायचं उदात्त हेतू आणि दाखवायच्या उघड्या बायका, या धोरणानं आपलं टाळकंच फिरतं.

तुम्हाला जे मांडायचंय ते स्पष्ट मांडा, स्पष्ट सांगा. अमक्‍यातून तमका अर्थ काढा वगैरे नाही जमणार. तुमचा संदेश व्यवस्थित नाही पोचला, तर तुम्ही नापास!नंतर पत्रकं वाटत फिरणारात का गावभर? मग...? तुम्ही त्या त्या प्रसंगातूनच बोललं पाहिजे. नाहीतर हे दिग्दर्शकाचं माध्यम कशाला म्हणायचं?

असो. खूप बोललो. माझी परीक्षणं तुम्ही वाचत असाल, तर तुम्हाला काय वाटतं?
अनाठायी झोडपल्यासारखं वाटतं का?
अकारण स्तुती वाटते का?

तुमचे चित्रपट आवडी-नावडीचे निकष काय आहेत?

मलाही तुमचं रसग्रहण वाचायला आवडेल...

-----------