Oct 20, 2010

देव देव्हाऱ्यात नाही!

शनिवारी ऑफिसातून कधी नव्हे ते लवकर घरी आलो होतो. मनस्वीला देवी दाखवायला नेण्याचं कबूल केलं होतं. रात्री नऊला घरातून बाहेर पडलो. ती थोडीशी झोपाळली होती, पण देवी बघायला जाण्याचं सोडवत नव्हतं.
सर्वांत आधी बंगाली दुर्गा पाहण्यासाठी कॉंग्रेस भवन गाठलं. तुफान गर्दी होती, पण देवी पाहता आली. माझ्यासमोर डझनभर तरुण-तरुणी, प्रौढ-प्रौढा हातातले मोबाईल सरसावून देवीची छबी आणि शूटिंग टिपण्यात गुंतले होते. फ्रेम ऍडजस्ट करून देवीचा चेहरा बरोबर मध्यभागी कसा येईल, याचे प्रयत्न सुरू होते. मला हसावं की रडावं कळेना. गणपतीतही हेच दृृश्‍य सगळीकडे पाहायला मिळतं. लोक उठसूट कसलेही फोटो मोबाईलमध्ये घेऊन काय साध्य करतात? बरं, देवीची भक्ती, श्रद्धा समजू शकतो. पण यांच्या वॉलपेपरवर, स्क्रीनसेव्हरवर किंवा इतर वेळी कायम पाहण्यात हा फोटो येणार नसतो. फोटो डाऊनलोड करून ते डेस्कटॉप, लॅपटॉपवर टाकणार नसतात. गेला बाजार तो फोटो फेसबुक किंवा ऑर्कुटचं कोंदण पटकावू शकतो. पण तेवढ्यासाठी एवढा आटापिटा कशाला?
बंगाली दुर्गेचं उदाहरण एकवेळ समजू शकतो. ती एरव्ही पुण्यात कुठे पाहायला मिळणार नाही. पण गणपतींच्या मूर्तींचं काय? दगडूशेठ गणपतीचा देखावा आणि रथ दरवर्षी इथूनतिथून सारखाच असतो. त्याला नावं वेगवेगळी असतात, एवढंच. बरं, आपण मोबाईलवर काढतो त्यापेक्षा अत्युच्च गुणवत्तेचा फोटो कुठूनही उपलब्ध होऊ शकतो. मग उपडीतापडी पडून, लोकांना धक्काबुक्की करून, मोबाईलचा आणि आपला जीव धोक्‍यात घालून फोटो काढण्यासाठी धडपडायलाच हवं का?
काही लोक याला श्रद्धा असं नाव देतील.
कबूल.
श्रद्धा कुठेतरी असायलाच हवी. काहींची ती देवावर असते. याच श्रद्धेचा प्रत्यय त्यानंतर सारसबागेसमोरच्या महालक्ष्मी मंदिराजवळ गेलो, तेव्हा आला. रात्रीच्या साडेदहा वाजता भाविकांचा मोठा जथ्था महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भक्तिभावानं रांगेत उभा होता. साधारण तास-दीड तास तरी त्यांना तसंच ताटकळावं लागेल, असं चित्र होतं. तरीही लोक एकेका पायावर नाचत, हातात तबकं, फुलं, पोरं सांभाळत त्या रांगेत तिष्ठत होते.
मंदिराच्या समोर रस्त्यावर उभं राहूनही देवीचं दर्शन झालं. "आत येऊन माझी खणानारळानं ओटी भरली नाहीस, तर तुझा नरकासुर करून टाकीन,' असं काही देवी माझ्या कानात पुटपुटल्याचं मला तरी ऐकू आलं नाही.
तिरुपतीच्या रांगेत म्हणे तासन्‌ तास उभं राहावं लागतं. सिद्धिविनायकाच्या मंदिरात बच्चन कुटुंबीय अनवाणी चालत गेल्याचे फोटो छापून येतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तिष्ठणाऱ्या भाविकांना "थंडगार' करण्याची सोय केल्याचं कौतुक होतं, एकवीरेला 50 लाखांचा मुखवटा चढवल्याच्या हेडलाइन होतात....
देवांच्या चरणी लीन होण्यासाठी एवढे उतावीळ झालेले हे भाविक इतर वेळी कितपत पुण्याचं (पुण्याचं म्हणजे उच्चारानुसार "पुण्ण्याचं'. "पुणे शहराचं नव्हे!) काम करतात हो? एकदा देवाच्या पाया पडलं की बाहेर आपण चोऱ्यामाऱ्या, लांड्यालबाड्या, पापं करायला मोकळे का? बाहेर दडपून पैसे खाणारे देवळात जाऊन स्वतःच्या तोंडावर थपडा कशाला मारून घेतात? बाहेर पुन्हा लोकांना थपडा मारता याव्यात म्हणून?
झ्या मनात ते वाईट विचार असतात, ते देवळात गेल्यावरही येऊ शकतात. म्हणून तिथे गेल्यावर भाविकतेचं, सात्विकतेचं नाटक मी करत नाही. आपण अजिबात वाईट काम करत नाही, असा माझा बिल्कुल दावा नाही. किंवा देवळात गेल्यानं आपली सर्व पापं धुवून निघाली, असंही मला कधी वाटत नाही. माझ्या चुका, उणिवा, कमतरता आणि अकार्यक्षमतेचं खापर मी कधी देवावर फोडत नाही.
एवढ्या निर्गुण-निराकार देवाला एखाद्यानं नमस्कार केला नाही, गंध-फूल वाहिलं नाही, दक्षिणेची लाच दिली नाही, तर एवढं कोपायचं कारण काय? तो राग-लोभ-मोह-माया यांच्या पलीकडं गेलाय ना? मग त्याची पूजा केली की तो चांगला माणूस आणि नाही केली तर वाईट, हा कुठला न्याय? हा भक्तिरूपी अत्याचार आता "ई-मेल'मधूनही फोफावलाय. कुठल्या तरी देवाचा फोटो पुढे 15 जणांना पाठवला नाही, तर म्हणे तुमच्यावर कोप होईल. होऊ द्या काय व्हायचाय तो कोप. तुमचा देव जर चराचरांत भरून राहिलाय, तर एवढा प्रसिद्धिलोलुप कसा हो?
असो. सध्या एवढंच. उर्वरित भाग पुढच्या वेळी.
कुठल्या देवाला झोडपण्याचा उद्देश नाही. नाहीतर देवाचे स्वयंघोषित "पीआरओ' अंगावर यायचे!

Oct 17, 2010

"अन्नोन'दशा!


सकाळी बाइकवरून कुठेतरी निघालो होतो आणि राजाराम पुलाजवळील सिग्नलच्या अलीकडेच मोबाईल वाजला. "सायलेंट' करायला विसरलो होतो आणि व्हायब्रेटर सुरू असल्यानं माझं हृदय खिळखिळं होण्याआधी फोन उचलणं आवश्‍यक होतं.
कुठला तरी "अननोन' नंबर होता.
""सर तुम्ही अभिजित पेंढारकरच बोलताय ना?''
""हो, बोला.''
""सर, मी जळगावहून बोलतेय, तुमचा "प्रीमियर'मधला लेख वाचला.''
व्हायब्रेटरवर असलेल्या मोबाईलमुळे दडपलेली माझी छाती आता फुगली होती. सत्काराच्या वेळी हार घालण्यासाठी मान वाकवून ठेवतात, तशी मी लेखनाबद्दलची प्रशंसा ऐकण्यासाठी माझे कान मी मोबाईलच्या अधिकाधिक जवळ आणले. कानात प्राण, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, शक्ती कपूर...सगळे आणले!
""सर, तुम्हाला जरा विचित्र वाटेल, पण एक विचारू का?''
आता तर मी तिच्या शब्दांच्या अमृतचांदण्यात चिंब व्हायला आतुर झालो होतो. माझ्या लेखनाची वारेमाप स्तुती होणार, "तुम्हाला कसं काय सुचतं हे सगळं,' असा कौतुकवर्षाव होणार, अशी खात्री होती. त्याच धुंदीत मी असताना तिनं पुढचं वाक्‍य टाकलं -
"सर, सलमान खानचा नंबर आहे का तुमच्याकडे?''
धुंदी खाडकन उतरली होती. कानाखाली एक सणसणीत चपराक बसली होती.
""सलमान खानचा नंबर? तुम्हाला कशाला हवाय? तुम्ही फॅन आहात का त्याच्या?'' मी आवाजात शक्‍य तितकं मार्दव आणून विचारलं.
""हो सर...खूप! मला प्लीज द्या ना त्याचा नंबर. कुठून मिळणार नाही का?''
""अहो ताई, माझ्याकडे नाही त्याचा नंबर. मी पुण्यात असतो. तुम्हाला मुंबईतून मिळवावा लागेल नंबर.''
"सलमान खानच्या कारकिर्दीवर लेख लिहिण्यासाठी त्याला "मॉडेल' म्हणून समोर बसवून त्याची लांबी-रुंदी मोजायची नसते! तसा मी बराक ओबामांनाही लेखातून चार खडे बोल सुनावू शकतो. याचा अर्थ ते अफगाणिस्तान, इस्राईलविषयीची धोरणं आखण्यासाठी ते दर वेळी फोन करून माझा सल्ला घेतात असं नाही!' असंच मला तिला सुनावायचं होतं, पण मनाला आवर घातला. शेवटी युवती-दाक्षिण्य म्हणून काही असतंच ना!
बिचारीचा भ्रमनिरास झाला होता. लेख वाचल्या वाचल्या "युरेका' म्हणून तिनं मला फोन केला असावा. तिच्या लाडक्‍या सलमानचा नाही, निदान त्याच्यावर लेख लिहिणाऱ्याचा नंबर "प्रीमियर'मध्ये छापला होता. सलमान त्याच्याकडे नक्कीच रोज विटी-दांडू खेळायला येत असणार, असा तिचा ठाम समज होता. केवढ्या अपेक्षेनं तिनं मला फोन केला होता! पण तिच्या सगळ्या स्वप्नांचा आणि उत्साहाचा मी चक्काचूर केला.
"अननोन' नंबरची दहशत असते ती अशी. एखाद्या वेळी काही वेगळी संधी असेल म्हणून "अननोन' नंबरचा फोन उचलायला जावं, तर कुण्यातरी प्रतिभावंत वाचकाचा फोन असतो. कुठला तरी लेख कुठल्या तरी पुरवणीसाठी त्यांनी म्हणे टपालानं, कुण्या माणसाच्या हस्ते किंवा पेटीत टाकून पाठविलेला असतो. आपला एवढा एकमेवाद्वितीय अनुभव का छापला नाही, अशी त्यांची विचारणा असते.
कधी कधी तर आपण सकाळी सकाळी प्रेमानं "अननोन' नंबरचा फोन घ्यावा तर असे संवाद होतात...
""हॅलो...'' (आवाजात शक्‍य तितका गोडवा आणून) - मी.
""हलव...कोन बोल्तंय?''
""आपण कोन बोल्ताय?''
""हा...कोन? विलास का?''
""आपण कोण बोलताय? आपण फोन केलाय ना? मग आपणच आधी सांगितलं पाहिजे ना, कोण बोल्ताय ते?''
""हा...मी अण्णा बोल्तोय. विलास आहे का?''
...
कधी कधी तर "रॉंग नंबर' आहे, असं सांगूनही लोकांना पटत नाही. "काय चेष्टा करताय का राव,' म्हणून ते पुन्हा तिथेच फोन करतात. वर त्यांच्या कुणा विलास, संजय, दादू, म्हादू, गणपतला फोन देण्याचा धमकीवजा आदेशही देतात. आता त्यांच्या आग्रहासाठी आणि आपण त्यांचा फोन उचलल्याचं प्रायश्‍चित्त म्हणून त्यांचा विलास, संजय, दादू, म्हादू किंवा गणपत कुठून पैदा करायचा, असा प्रश्‍न मला पडतो.
प्राचीन काळी लॅंडलाइनवर फोन करण्याची पद्धत होती, तेव्हा तर माझ्या नंबरवर कायम दुसऱ्याच कुणाच्या नावासाठी फोन यायचा. बहुधा "बीएसएनएल'नं कुणाचा तरी बंद केलेला नंबर मला दिला होता. त्या भल्या माणसाचे जुने स्नेही मला फोन करून पिडायचे. दहा-बारा वेळा सांगून झालं, तरी त्यांची संपर्कयात्रा काही थांबेना. शेवटी कंटाळून त्यांनी त्यांच्या स्नेह्याचा मोबाईल नंबर मिळविला की काय, कुणास ठाऊक! पण माझे फोन बंद झाले.
हल्ली नाइट ड्युटीच्या वेळी तरी मी दुपारी मोबाईल सायलेंटवरच टाकून घोरत पडतो. कुठल्या नोन-अननोन नंबर्सना नंगानाच घालायचाय, तो घालू द्या! चार वाजता उठेपर्यंत मी त्याकडे ढुंकून बघत नाही. एखाद वेळी उतावीळ झालेल्या कुणाकुणाचे ढीगभर मिस्ड कॉल्स मिळतात. मी मेलो बिलो की काय, अशी शंका त्याला येते. मग मी झोपलो होतो, असं त्याला शांतपणे सांगतो. त्याचा चेहरा मग (मोबाईलवरूनही) पाहण्यासारखा होतो.
र्ल मॅनर्स ही तर भल्याभल्यांना न झेपणारी गोष्ट आहे. माझा मोबाईल अनेकदा "सायलेंट' असतो. म्हणजे मीटिंगसाठी जाण्यापूर्वी काही मिनिटं आधी आणि नंतर, दुपारी झोपलो असताना, रात्री झोपण्यापूर्वी आणि अगदी फोनच्या रिंगची कटकट नको असेल तेव्हाही! मीटिंग ऐन रंगात आलेली असताना अनेक जणांचे मोबाईलवरचे "कोंबडे' आरवतात. काहीतरी गंभीर विषय चाललेला असताना त्यांची "मुन्नी बदनाम' होते किंवा तबला, ढोलताशे वाजू लागतात. मग फोन बंद करण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी त्यांची तारांबळ उडते. बरं, मीटिंगमध्ये असताना चुकून फोन आला, तर लोक कट करून गप्प बसत नाहीत.
"हॅलो, मीटिंगमध्ये आहे.' हे सांगून बहुधा त्यांना फुशारकी मिरवायची असते.
बरं, हळू आवाजात खुसपुसल्यामुळं पलीकडच्याला काही ऐकू येत नाही. तेवढी त्याची पोहोचही नसते. तो पुन्हा काहितरी विचारतो.
हा पुन्हा - "हॅलो, मीटिंगमध्ये आहे. नंतर करतो,' असं सांगतो.
आल्यावर कट न करण्याएवढा आणि फोन "कट' केल्याचा अर्थ न कळण्याएवढा कोण उपटसुंभ पलीकडे असतो, कुणास ठाऊक! यांना तरी "आन्सर' करावाच लागेल, असा कुठल्या राष्ट्राध्यक्षांचा दर वेळी फोन येत असतो, हेही कळत नाही.
थेटरात असताना तर यांना आणखी स्फुरण चढतं. थेटरातल्या गर्दीतही फोन घेऊ नये, सायलेंट ठेवावा, वगैरे गोष्टी यांच्या गावीही नसतात. तिथला संवाद साधारणतः असा ः
""हां...बोल.'' ...जणू काही हा लोडाला टेकून घरात निवांत पडलाय!
"पिच्चर बघतोय...पिच्चर'
यावर पलीकडच्यानं "बरं, ठीक आहे, नंतर करतो,' असं म्हणणं अपेक्षित असतं. प्रत्यक्षात पलीकडचा विचारतो, "कुठला पिच्चर?'
मग हा त्याला "पिच्चर'चं नाव सांगतो. बरं, ते सहज समजण्यासारखं असेल, तर ठीक. नाहीतर त्याला त्यातल्या कलाकारांचीही नावं घेऊन समजावून द्यावं लागतं. (किती त्रास!) पलीकडच्याचं समाधान होत नाही, तोपर्यंत शेजारच्या प्रेक्षकांची सुटका कठीणच.
बरं, फोन "कट' करण्याचा, न उचलण्याचा अर्थही अनेकांना कळत नाही, हे खरंच आहे. एकदा फोन उचलला नाही, तर लोक तो उचलेपर्यंत पुनःपुन्हा करत राहतात.
मला तर अनेक जण एसएमएस-शत्रूच वाटतात.
मध्यंतरी माझ्या फोनवरचे सगळे नंबर उडाले. त्यामुळे सणासुदीला ढिगाने येणारे एसएमएस कुणाचे आहेत, हेही कळत नाही. काही "अननोन' लोक एखादा जोक-बिक पाठवतात, त्यांचेही नाव कळत नाही. "हू इज इट,' असा रिप्लाय पाठवला, तर या बाबांना झेपतच नाही! पुन्हा काहीच उत्तर नाही.
मला रिप्लाय करण्याचीही जाम खुमखुमी असते. त्या माणसाला पुन्हा एसएमएस करण्यासाठी उचकवण्याचा प्रयत्न त्यातून असतो. अनेक ठोंब्यांना तेही कळत नाही. विरामचिन्हांचा आणि त्यांचाही 36चा आकडा असावा, असं वाटतं. कारण दूरदर्शनवरच्या बातम्या सांगितल्यासारखे सपक, सरळसोट एसएमएस करून ते मोकळे होतात.
असो.
विषय जरासा लांबलाच नाही? आपल्या प्रतिक्रिया एसएमएस करून नक्की कळवा हं! "अननोन' नंबर असला, तरी मी नक्की रिप्लाय देईन. (*कंडिशन्स अप्लाय)
...
* दसरा, दिवाळीला एक किंवा दोन रुपये एसएमएस नसलेल्या दिवशी!