Oct 15, 2017

घेता, किती घेशील दो कराने?


``आज संध्याकाळी जायचंय ना हो आपण खरेदीला?`` सकाळी पेपर वाचताना सौ. किरकिरे एकदम आठवल्यासारख्या ओरडल्या आणि सगळ्या घराचं लक्ष वेधलं गेलं. बहुधा कुठल्यातरी साडीच्या दुकानांतल्या आकर्षक साड्यांच्या जाहिरातींवर त्यांची नजर पडली होती.

 

यंदा दिवाळीचा फराळ स्वस्त, घरांच्या किमती कमी होणार, अशाच बातम्या महिनाभर झळकत होत्या. एसटीचा प्रवास थोडासा महागणार असल्याची कुणकुण होती, पण यावेळी कुठे फिरायला जाण्याचा बेत नव्हता. पेट्रोलच्या किंमतींवरून रणकंदन झाल्यानंतर सरकारनं पेट्रोल दोन-चार रुपये कमीच केलं होतं आणि काही पदार्थांच्या जीएसटीमध्येही कपात केली होती. थोडक्यात, विरोधकांच्या मोर्चांशिवाय महागाईचं विशेष विरोधी वातावरण कुठे नव्हतं. त्यामुळे खरेदीसाठीही अगदी अनुकूल काळ होता. त्यातून दिवाळी अगदीच दोन दिवसांवर आली होती आणि आज खरेदीला जाणं आवश्यकच होतं. कुमार आणि सुकन्येचे खरेदीचे तर भलेमोठे प्लॅन्स कधीपासून आखून तयार होते. त्यासाठीची यादीही त्यांनी तयार ठेवली होती.

``आम्ही लहान होतो, तेव्हा आम्हाला असं कुणी विचारतही नव्हतं!`` किरकिरे आजोबांनी सकाळपासून तीनशेएकोणसत्तराव्या वेळेला हे वाक्य उच्चारलं, तेव्हा समोर ऐकून घ्यायला कुणी नव्हतं. ``वर्षातून एकदा नवीन कपडे मिळायचे, तेसुद्धा दिवाळीला. वडील कुठूनतरी स्वस्तातलं एखादं कापड घेऊन यायचे आणि मग त्यातच घरातल्या सगळ्या भावंडांची शर्टांची शिलाई व्हायची.`` आजोबांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यपूर्वकाळातली टेप वाजवली. ``अरे श्रीधर, तुला चष्म्याची नवीन फ्रेम सांगितली होती, ती आणलीस का रे?`` त्यांना तेवढ्यात काहीतरी आठवलं.

``ती बाजारातच आली नाहीये हो अजून! तो दुकानदार वैतागला होता माझ्यावर, दर महिन्याला तुमच्यासाठी वेगवेगळ्या फ्रेम्स मागतो म्हणून!`` श्री. किरकिरेंनी शक्य तेवढ्यात नम्र आवाजात खुलासा केला.

``बरं ठीकेय, संध्याकाळी तसंही आपण बाहेर शॉपिंगला जाणारच आहोत, तेव्हा काय ते बघू.`` आजोबांनी विषय मिटवून टाकला. आजीलाही बाजारात नवी आलेली नवी `पाठक बाई स्टाईल` साडी घ्यायची होती, पण एकदम संध्याकाळीच विषय काढू, असं तिनंही ठरवून टाकलं होतं. चिरंजीवांना कॉलेजसाठी नवीन बूट घ्यायचे होते. खरंतर अजून त्याची दहावीच सुरू होती, तरीही मनातून तो कॉलेजला कधीच पोचला होता. सुकन्येला आलिया भट स्टाईल पलाजो घ्यायचा होता, कृती सेनॉन स्टाईल लेहंगा, कंगना स्टाईल स्पॅगेटी टॉप आणि दीपिका स्टाईल अनारकलीही हवा होता. एकूण सगळ्यांचे सगळे प्लॅन्स ठरले होते. ठरला नव्हता तो एकाच व्यक्तीचा प्लॅन आणि ती व्यक्ती होती, श्री. किरकिरे. सगळ्यांना नव्या खरेदीसाठी मूड आला होता आणि श्री. किरकिरेंना फक्त टेन्शन आलं होतं...खर्चाचं. सगळ्यांच्या इच्छाआकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या एकट्यावर होती, कारण घरखर्चाचा कोलमडणारा हिशोब त्यांना सावरायचा होता. सकाळपासून त्यांची जी घालमेल चालली होती, त्यावरूनच सौ. किरकिरेंना अंदाज आला होता. त्यामुळे आपल्या खरेदीची यादी आयत्यावेळीच जाहीर करावी आणि दुकानदारानं गळ घातली म्हणून घ्यावं लागलं, असा देखावा निर्माण करावा, असा त्यांचा बेत होता.

दुपारपर्यंत फारसं काही उत्साहवर्धक घडलं नाही, पण दुपारनंतर घडामोडींना वेग आला. सरकार पाडण्यासाठी किंवा मंत्रिमंडळ विस्तारासाठी येतो, तसा.

``सगळ्यांनी एकत्र खरेदी जायलाच हवं का?`` चिरंजीवांनी शंका काढली. त्यांना संध्याकाळी टीव्हीवर लागणारी फुटबॉलची मॅच बघायची होती. खरंतर दिवाळीच्या तोंडावर संध्याकाळी एकत्र बाहेर खरेदीसाठी जाण्याचा कुमारी किरकिरेलाही वैताग आला होता, पण तिला खरेदीसाठी दुसरं कुणी पार्टनरही मिळालं नव्हतं. शिवाय बंधुराज घरी असल्यामुळे तिला निवांतपणे घरी बसून `हाफ गर्लफ्रेंड`ही बघता येणार नव्हता. तिची त्यावरून धुसफूस सुरू झाली. आजीआजोबांना पाय मोकळे करायला बाहेर पडायचंच होतं, पण पावसाची लक्षणं दिसत होती आणि आता भिजण्याची कुणाचीच इच्छा नव्हती.

``ते ऑनलाइन का काय ते शॉपिंग करता ना तुम्ही? ते कुठे जाऊन करतात?`` आजीनं शंका काढली, तसे चिरंजीव आणि सुकन्या फिस्सकन हसले.

``अगं आजी, ऑनलाइन शॉपिंग घरीच करता येतं. त्यासाठी कुठे जावं लागत नाही.`` सुकन्येनं आजीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग तिनं मोबाईलवर वेगवेगळ्या वेबसाइट्स कशा असतात, तिथे केवढ्या व्हरायटी असतात, लेटेस्ट ट्रेंड आणि कस्मटर रेटिंग बघून कसं खरेदी करता येतं, हे सगळं तिला दाखवलं. ``पण मोबाईलवर दुकानदाराशी घासाघीस कुठे करता येतेय?`` या आजीच्या प्रश्नावर कुणाकडेच उत्तर नव्हतं. आणि खरेदीची मजा घासाघीस करून दुकानदाराकडून आपल्याला पाहिजे तशा वस्तू आपल्याला हव्या त्या दरात घेण्यातच आहे, असं सांगून आजीनं ऑनलाइन शॉपिंगचा प्रस्ताव धुडकावून लावला.

बाहेर जाऊन ही मंडळी किती खरेदी करणार आणि त्यासाठी किती वेळ खर्ची घालणार, याचा अजूनही श्री. किरकिरेंना अंदाज येत नव्हता. नाही म्हणायला एक गोष्ट त्यांना साथ देत होती, ती म्हणजे पाऊस. दुपारपासून जो काही पाऊस लागला होता, त्यामुळे सगळ्यांच्याच खरेदीच्या उत्साहावर विरजण पडलं होतं. छत्र्या आणि रेनकोट सांभाळत आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत खरेदीला जाण्यात कुणालाच रस नव्हता. निदान आजचा बेत उद्यावर गेला, याचा सूक्ष्म आनंद श्री. किरकिरेंच्या चेहऱ्यावर झळकत होता. अर्थात, आज खरेदीला गेलो नाही, तर उद्यापासून आपल्याला वेळ नाही आणि मग मनासारखी खरेदी राहूनच जाईल, याचा सौ. किरकिरेंना अंदाज होता. काहीतरी करायला हवं होतं.

 

``पण संध्याकाळी घरी बसून काय करायचं?`` चिरंजीवांनी विचारलेली शंका सौ. किरकिरेंच्या पथ्यावर पडली.

``मी मस्त उपाय सांगते!``  उत्साहाने उडी मारत त्या पुढे आल्या. पुन्हा सगळ्यांचे कान टवकारले गेले.

``आठ दिवस फराळाच्या कामामुळे घरातल्या साफसफाईला वेळ मिळाला नव्हता. सगळे अनायसे घरी आहेत, तर आजच करून टाकूया साफसफाई! सगळ्यांची मदत होईल!``

 

सौ. किरकिरेंनी हे वाक्य उच्चारलं मात्र, पुढच्या दहा मिनिटांत घरातले सगळे मरगळलेले, सुस्तावलेले, कंटाळलेले चेहरे पावसापाण्याची पर्वा न करता बाजारातील गर्दीत खरेदीच्या उत्सवात रममाण झाले होते!


 

-    अभिजित पेंढारकर.

Aug 17, 2017

संकटी रक्षी, शरण तुला मी!

('मुंबई सकाळ'च्या श्रावण विशेष पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 4)


घरी आल्यापासून केतनला चहा मिळाला नव्हता. या श्रावणात घरात रोज कुठल्या ना कुठल्या पदार्थांचे वास घमघमत असायचे. आपणच केलेला पदार्थ त्याने सगळ्यात आधी खावा, यासाठी सासू-सुनांमध्ये चढाओढ लागलेली दिसायची. मग दोघींचेही पदार्थ कसे चांगले आहेत, असं कौतुक करताना केतनचा मुत्सद्दीपणा पणाला लागायचा. आज मात्र असं काहीच झालं नव्हतं. आज मात्र जेवणाची वेळ झाली, ती साध्या आमटीभाताचा वाससुद्धा दरवळत नव्हता.

केतननं जरा आढावा घेतला, तेव्हा त्याला लक्षात आलं, की सोनालीचा घरीच गणपती तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. गणपतीची माती, पाणी, काटे-चमचे, पळ्या, कागद, यांचा तिनं एवढा पसारा करून ठेवला होता, की खोलीत पाऊल ठेवायला जागा नव्हती. केतनला बघितल्या बघितल्या ती उत्साहाने उडी मारून म्हणाली, ``कसा झालाय माझा गणपती?`` तिनं खरंच छान मूर्ती घडवली होती. ``कमाल! हे कधी शिकलीस तू?`` त्यानं कौतुकानं विचारलं. सोनालीकडूनच त्याला समजलं, की तिनं गणपती तयार करण्याच्या एका कार्यशाळेत भाग घेतला होता. अवघ्या दोन दिवसांत ती असा गणपती तयार करायला शिकली आणि आता यंदा घरच्या गणपतीची मूर्ती आपणच तयार करायची, असं तिनं मनाशी ठरवलं होतं.

केतन म्हणाला, ``खरंच भारी आहेस तू. घरातली कामं सांभाळून तू गणपती करायला शिकलीस, एवढ्या लवकर एवढी सुबक मूर्ती तयार केलीस. यंदा हाच गणपती आपण बसवायचा. फायनल!`` आश्वासन दिलं खरं, पण नजीकच्या भविष्याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. त्याचं बोलणं संपतं न संपतं, तोच वत्सलाबाईंची हाक आली आणि तो तिकडे पळाला.

वत्सलाबाईंच्या खोलीत आल्यावर केतनला बसलेला धक्का आधीच्या धक्क्यापेक्षाही जास्त रिश्टरचा होता. त्यांनीसुद्धा असाच पसारा पाडला होता आणि त्याच्या मध्यभागी होती, त्यांनी स्वतःच्या हातांनी घडवलेली गणपतीची सुबक मूर्ती.
``कसा झालाय माझा गणपती?`` त्यांनी उत्साहानं विचारलं.
``कमाल! हे कधी शिकलीस तू?`` केतनच्या स्वरात आश्चर्य, धक्का, उत्सुकता, भीती आणि भविष्यातल्या संकटाची चाहूल, सगळंच दाटून आलं होतं. वत्सलाबाईसुद्धा अशाच कुठल्यातरी कार्यशाळेत गणपती करायला शिकल्या होत्या आणि त्यांनीही घरी हा यशस्वी प्रयोग केला होता, हे त्याच्या लक्षात आलं. `यंदा हाच गणपती आपण बसवायचा,` असं आश्वासन त्याला इथेही द्यावंच लागलं.
आता केतनपुढे धर्मसंकट उभं होतं. दोघींपैकी एकीचा गणपती बिघडला असता, त्यांना जमला नसता, तर त्यांनी स्वतःहूनच माघार घेतली असती. पण यावेळी मुकाबला बरोबरीचा होता. घरात दोन गणपती बसवणं तर शक्य नव्हतं. कुणाचा एकीचा गणपती निवडला, तर दुसरीला राग येणार होता.

गणपतीच्या काळातल्या बंदोबस्ताचा पोलिस यंत्रणेला येत नसेल, एवढा तणाव केतनला या काळात आला होता. गणपती रंगवून पूर्ण होईपर्यंत केतनच्या जिवात जीव नव्हता. मात्र, एके दिवशी अचानक सोनाली आणि वत्सलाबाई एकदमच त्याच्या समोर आल्या आणि वादावर तोडगा निघाल्याचं त्यांनी सांगितलं.
``हे बघ, आम्ही ठरवलंय, की दोन्ही गणपती चांगले आहेत, त्यामुळे दोन्ही बसवायचे. फक्त एकाची पूजा करायची आणि दुसरा नुसताच. सार्वजनिक मंडळं करतात, तसं.`` वत्सलाबाईंनी खुलासा केला.
केतन समाधानाचा निःश्वास टाकणार, एवढ्यात सोनाली म्हणाली, ``फक्त मखरात कुठला बसवायचा आणि पूजेसाठी कुठला ठेवायचा, हे तेवढं तू ठरव!``

केतनला पुढच्या संकटाची चाहूल लागली आणि त्यातून वाचण्यासाठी त्यानं मनातल्या मनात विघ्नहर्त्याचा जप सुरू केला!

Aug 10, 2017

समथिंग `स्पेस`ल

('मुंबई सकाळ'च्या श्रावण विशेष पुरावणीसाठी लिहिलेला लेख क्र. 3)
...


``आई, मी काय म्हणतो, तू यंदा नेहमीसारखी मैत्रिणीकडे जन्माष्टमीला जाणार नाहीयेस?`` वत्सलाबाईंसाठी स्वतः चहा करून आणून दिल्यावर केतन म्हणाला.

``अरे नाही रे बाबा, यंदा तीच घरी नाहीये. जन्माष्टमी बुडणार माझी.``
हे उत्तर ऐकून त्याचा चेहरा पडला.
``तुला नक्की काय हवंय? उगाच ताकाला जाऊन भांडं लपवू नये.``
`` भांडं लपवायचा प्रश्नच येत नाही. हल्ली टेट्रा पॅकमध्येच मिळतं ना ताक!`` त्यानं विनोदाचा प्रयत्न केला.
``बाळा, हेच संस्कार केले का रे मी तुझ्यावर? एवढा वाईट दर्जा आहे तुझ्या विनोदाचा?`` वत्सलाबाईंच्या या वाक्यावर त्याची बोलतीच बंद झाली.
...
रात्री सगळीकडे निजानीज झाल्यावर बेडरूममध्ये मात्र वातावरण एकदम तापलं...अर्थात, जोरदार खडाजंगीमुळे.
``तुला ना, एखाद्याला कसं पटवायचं, कळतच नाही!`` सोनाली धुसफुसत म्हणाली.
``निदान तू तरी हे बोलू नकोस. तीन वर्षांपूर्वीच तुला...``
``आगाऊपणा करू नकोस. मला पटवून खूप मोठा तीरच मारलायंस तू. मी आईला पटवण्याबद्दल बोलतेय.``
``अगं, पण ते बाबा बघून घेतील ना!`` केतनने पंच मारला खरा, पण त्यावर सोनाली फणकाऱ्यानं तोंड फिरवून झोपी गेली, तेव्हा हा पंच आपल्याला आज खूप महागात पडणार, याचा त्याला अंदाज आला.
...
रविवार, कृष्णाष्टमी आणि 15 ऑगस्ट अशा सलग तीन दिवस सुटीच्या काळात फिरायला जाण्याचा खर्च आत्ता शक्य नव्हता, पण निदान रोजच्या धबडग्यातून तरी सोनालीला जरा स्वतःसाठी `स्पेस` हवी होती. सासूबाई घरी असल्या, की अशी मोकळीक घेता येणार नव्हती. पण जन्माष्टमीची आठवण करून देण्याचा प्लॅन तर फसला होता. सासूबाई कुठे जाणार नाहीत हे कळलं आणि सोनाली जरा खट्टूच झाली. अगदी कुठे रिसॉर्टवर गेलो नाही, तरी निदान गाडीतून लांब कुठेतरी चक्कर मारून येऊ, असं त्यानं सुचवलं. सोनालीनं नाइलाजानं त्याला होकार दिला.
अखेर तो सुटीचा दिवस उजाडला. दोघं सकाळी लवकरच गाडीतून फिरायला बाहेर पडली. नेमका अर्ध्या तासातच सोनालीला कुणाचातरी फोन आला आणि तिनं वैतागून गाडी थेट घराकडे वळवायला सांगितली. घरी पोहोचल्यावर ती तातडीने दार उघडून स्वयंपाकघराकडे धावली.
``गॅस सुरू राहिलाय म्हणून आईंचा फोन आला होता. पण इथे तसं काहीच नाहीये! शी! आता पुन्हा कुठे बाहेरही पडता येणार नाही. सगळा मूड गेला!`` मागून आलेल्या केतनला सांगत सोनाली वैतागून खाली बसली. केतनने तिला शांत करण्यासाठी तिच्यासाठी कॉफी केली, तिच्या आवडीची गाणी लावली. आपण आता थेट उद्याच येऊ, असा निरोपही वत्सलाबाईंनी दिला होता. आता पुन्हा बाहेर जायला नको, घरीच एखादी फिल्म बघू, गप्पा मारू, एकमेकांसाठी वेळ देऊ, असं त्यानं ठरवलं. जेवणही त्यानं बाहेरूनच मागवलं. त्या दोघांचा वेळ खूप मजेत गेला.
पार दुसऱ्या दिवशी सकाळी वत्सलाबाई घरी आल्या, तेव्हा सोनालीनं त्यांचं उत्साहात स्वागत केलं, आस्थेनं चौकशी केली. थोड्यावेळाने मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या वत्सलाबाईंनी पुन्हा सोनालीला फोन केला, तेव्हा तिच्या काळजात धस्स झालं.
``काय गं, काल घरात पुरेशी स्पेस मिळालेय, की आजसुद्धा मला वेगळं काहीतरी निमित्त काढून आणखी एखाद्या मैत्रिणीच्या घरी दिवसभर वेळ घालवायला जावं लागणारेय?`` असं वत्सलाबाई म्हणाल्या तेव्हा कालचा त्यांचा फोन, गॅसचं बटण चालू राहिल्याचं निमित्त आणि त्यांच्या अचानक ठरलेल्या कार्यक्रमामागचं कारण सोनालीला कळलं आणि ती कानकोंडी झाली. मग दोघी फोनवरच मनसोक्त हसल्या. खूप `स्पेस`ल होतं ते मनमोकळं हास्य!

- अभिजित पेंढारकर.

(क्रमशः)

हॅशटॅग सूनबाई!

(`मुंबई सकाळ`च्या श्रावण पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 2)

...


सोनाली आज सकाळपासून नेटवर काहीतरी शोधाशोध करत होती, पण तिला हवं ते सापडत नव्हतं. एकदोनदा केतननं तिला विचारायचा प्रयत्न केला, पण तिची प्रतिक्रिया बघून तो खचला. थोड्या वेळानं तीच शोधाशोध थांबवून त्याच्या आसपास घुटमळायला लागली, तेव्हाच तिला काहीतरी हवंय, याचा अंदाज त्याला आला.

``केतन, ऐक ना...`` थोड्याशा लाडिक स्वरात तिनं सुरुवात केली.
``हे बघ, आई घरात आहे आत्ता. तेव्हा आत्ता काही...``
``आगाऊपणा करू नकोस. मला जरा तुझा गायडन्स हवाय.``
`` हे म्हणजे काजव्यानं सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे!``
``चेष्टा पुरे. आमची इकडून अशीच थट्टा होणार असेल, तर एक माणूस कट्टी आहे मग स्वारीशी.`` सोनालीनं पुन्हा `जयश्री गडकर` पवित्रा घेतला.
``सोनाली, मी तुला हवी ती मदत करतो, पण प्लीज साठच्या दशकात शिरू नकोस.`` 
``मला नारळीभात करायचाय, पण प्रॉपर रेसिपीच मिळत नाहीये कुठे.`` सोनाली सकाळपासून कशात गुंतली होती, हे केतनला आत्ता समजलं.
``अगं एवढंच ना? आमच्या आईला विचार. आईच्या हातचा नारळीभात अप्रतिम असतो. तिच्या हातांची चव कुणालाच येणार नाही!`` ज्या वाक्याची सोनालीलाच काय, कुठल्याही सुनेला सर्वाधिक भीती असते, ते वाक्य अखेर केतनने उच्चारून टाकलं. सोनालीनंही तो सल्ला ताबडतोब शिरोधार्य मानला. `तू सांगितलंस, म्हणून जातेय हं,` असं तिला स्वतःच्याच मनाचं समाधान करून घ्यायचं असावं, असं केतनला उगाचच वाटलं.

पुढचे दोन दिवस घरात अधूनमधून नारळीभाताचाच विषय निघत राहिला. सोनाली सासूबाईंकडून नारळीभात करण्याच्या टिप्स घेतेय, त्याबद्दल काही शंका अतिशय सौम्य स्वरात विचारतेय, सासूबाई प्रेमानं तिला समजावतायंत, बदाम, काजू किती घालावेत, कसे चिरावेत असं अगदी साग्रसंगीत वर्णन करतायंत, असं दुर्मिळ दृश्य दिवसातून अनेकदा बघायला मिळालं.

..आणि अखेर तो दिवस उजाडला. सोनाली गेल्या दोन तीन दिवसांत जे काही शिकली होती, त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याची वेळ आता आली होती. तिनं नारळीपौर्णिमेच्या आधीच नारळीभाताचा प्रयोग करून बघितला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. सोनाली स्वतःवरच जाम खूश झाली. आपण केलेल्या नारळीभाताची भरपूर सजावट करून तिनं त्याचे फोटो काढले, स्वतःचे आणि सासूबाईंचे स्वयंपाकघरात फोटो काढले. त्या दिवशी काही तिला ते फेसबुकवर अपलोड करायला वेळ मिळाला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती फोटो अपलोड करण्यासाठी ते सिलेक्ट करत असतानाच मैत्रिणीचा फोन आला.
``अगं, तू नारळीभाताचे फोटो फेसबुकवर अपलोड केलेस का, असं विचारायला मीच तुला फोन करणार होते!`` सोनाली म्हणाली, ``आपल्या सगळ्या ग्रुपचं आजच फोटो टाकायचं ठरलं होतं ना? विसरलीस की काय?``
``मी नाही विसरलेले. पण तू काहीतरी विसरल्येस.`` मैत्रिणीनं सुनावलं, ``आपलं ठरलं होतं, की स्वतः नारळीभात करायला शिकायचं आणि त्याचे फोटो टाकायचे.``
``हो, मग! मी स्वतःच केलाय नारळीभात कुणाचीही मदत घेतलेली नाही.`` सोनालीनं ठसक्यात उत्तर दिलं, पण आपण फोटो अपलोड न करताही हिला आपण सासूबाईंची मदत घेतल्याचं कसं कळलं, असा प्रश्न सोनालीच्या मनात आलाच.
तेवढ्यात मैत्रीण म्हणाली, ``तुझ्या सासूबाईंनी अपलोड केलेत तुमचे दोघींचे नारळीभात करतानाचे फोटो. तुला टॅग केलयं, `सेलिब्रेटिंग श्रावण : सेल्फी विथ सूनबाई`, अशा हॅशटॅगसकट. कुठल्यातरी सिनेमाच्या प्रमोशनसाठीचा फंडा आहे, त्यालाच रिस्पॉन्स दिलाय बहुतेक, तुझ्या सासूबाईंनी!`` मैत्रिणीचं बोलणं संपता संपताच सोनालीनं फेसबुक चेक केलं, तेव्हा तिला सासूबाईंनी अपलोड केलेले त्या दोघींचे फोटो आणि त्यावरच्या ढीगभर कमेंट्स, लाइक्स दिसल्या आणि तिनं कपाळावर हात मारून घेतला. नारळीभात करताना काल सहज म्हणून काढलेले फोटो सासूबाईंनी आपल्या मोबाईलवर मुद्दामहून का मागवून घेतले, याचं गूढ तिला आत्ता उकललं होतं. आता तिचं कडू झालेलं तोंड नारळीभातानं तरी गोड होणार का, हा प्रश्नच होता.

- अभिजित पेंढारकर.


(क्रमशः)

`काळ` सोकावतो...!...

(`मुंबई सकाळ`च्या श्रावण विशेष पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 1)


 ...


``सोनाली, अगं हा जोक वाचलास का?`` वत्सलाबाईंनी हाक मारली आणि सोनाली आदर्श सुनेसारखी स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली.

``कुठला जोक, आई चेहऱ्यावरचे `केतनला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि सासूबाईंना स्मार्ट फोन घेऊन दिला!` हे भाव लपवत तिनं कुतुहलानं विचारलं.

``अगं, हा नागपंचमीवरचा जोक गं!`` वत्सलाबाईंना हसू आवरत नव्हतं. त्यांनी सांगितलेला जोक ऐकल्यावर सोनालीनं त्यांना हसून टाळी दिली आणि त्याच वेळी बाहेरून आलेल्या केतनने तिच्या या अभिनयाला फक्त नजरेतूनच दाद दिली.

``आई, मला फॉरवर्ड करा ना!`` एक डोळा केतनकडे ठेवून सोनालीनं स्वरात शक्य तेवढा नम्रपणा आणत सांगितलं  ``गेल्या वर्षी हाच जोक आला होता आई. तुम्ही यंदा व्हॉटस अप घेतलंत, हा आमचा दोष आहे का?`` हे तोंडावर आलेलं वाक्य तिनं पुन्हा आदर्श सुनेसारखं गिळून टाकलं.

आज घरी आल्यानंतर एकदम एवढं प्रसन्न, हसतंखेळतं वातावरण बघून केतनच्या मनात पाल चुकचुकली होतीच. चहा घेताघेता त्याच्या मनातल्या शंकेवर शिक्कामोर्तब झालं.

``अच्छा, हे कारण आहे होय आजच्या सौजन्य सप्ताहाचं?`` आई बाहेर निघून गेल्याची खातरी झाल्यावर, केतननं सोनालीला टोमणा मारला.

``उगाच काहीतरी शंका काढू नकोस. आमचं काही भांडण वगैरे नाहीये, त्या माहेरी जाणार म्हणून मला आनंद व्हायला!``

``मी कुठे म्हटलं तुमचं भांडण आहे म्हणून? काळाबरोबर बदलायला हवंच. तूसुद्धा आईची सून न राहता मुलगीच झालेयंस. पण आई आता माहेरी जाणार म्हणून एका माणसाला मनातून खराखुरा आनंद झालाय की नाही?`` केतनला तिची खोडी काढायचा मोह आवरला नाही.

``काय हे बोलणं तरी! अशी चेष्टा आवडत नाही बरं आम्हाला. इकडून असेच टोमणे मारले जाणार असतील, तर आम्ही मुळी बोलणारच नाही, ज्जा!`` सोनालीनंही एकदम `जयश्री गडकर` पवित्रा घेतला. केतन एवढ्या फिस्सकन हसला, की त्याचा कप डचमळून चहा अंगावर सांडला.

`` मला आईंचं खरंच कौतुक वाटतं. त्यांना या वयातसुद्धा त्यांना माहेरी जाण्याची ओढ आहे!`` सोनाली मनापासून म्हणाली.

``अगं, श्रावणात जातात ना बायका आपल्या माहेरी!``

``अरे हो, पण लग्नानंतर थोडे दिवस ओढ असते. आईंना अजूनही माहेरी जावंसं वाटतं, याचीच कमाल वाटते मला. अगदी उत्साहानं जातात त्या. गावातल्या माहेरवाशिणींच्या मंगळागौरींमध्येही रस घेतात, नागपंचमीला झाडाला झुले बांधून त्याच्यावर खेळतात, खरंच असं उत्साही असायला हवं माणसानं!``

``ती उत्साही आहेच! बरं, सध्या व्हॉट्स अप काय म्हणतंय?``

``काही विचारू नकोस बाबा. सोसायटीतल्या ज्येष्ठ नागरिक महिला मंडळाच्या ग्रुपवरसुद्धा घेतलंय आईंना. सतत कुठले ना कुठले सुविचार, जोक्स पाठवत असतात मला! आजच श्रावणाचा महिमा का काय पाठवलंय. आणि वर त्या नागपंचमीचा जोक!`` सोनालीनं व्यथा मांडली आणि केतनला पुन्हा हसू आलं.

``माणसानं काळानुसार बदलायला हवं. आईसुद्धा बदलतेय. गंमत वाटते मला!`` केतनच्या बोलण्यातून आईचं कौतुक दिसत होतं. ``बाय द वे, मला वाटतं, तुलासुद्धा ब्रेक हवाय. तू पण श्रावणानिमित्त माहेरी का जात नाहीस चार दिवस?``

``खरंच जाऊ? चालेल तुला?``

``जा गं, इथे मॅनेज करू आम्ही. चारच दिवसांचा तर प्रश्न आहे. आणि तुलाही विश्रांती हवीच ना!`` केतननं अगदी काळजीनं सांगितलं.

``किती काळजी करतोस रे माझी!`` सोनाली डोळ्यांत अश्रू आणून म्हणाली. ``की असं करू?`` तिनं एकदम काहीतरी सुचल्यासारखं विचारलं.

``काय?``

``मी आईला भेटावं, असं वाटतंय ना तुला?``

``अर्थात!``

``मला विश्रांती मिळायला हवेय ना?``

``म्हणजे काय!``

``मग माझ्या आईलाच इकडे बोलावून घेते ना! बोरिवलीलाच तर राहते ती. मी तिच्याकडे गेले काय आणि ती माझ्याकडे आली काय, एकच ना! काळाबरोबर एवढं तरी बदलायला हवंच ना माणसानं?`` सोनालीनं बिनतोड सवाल केला आणि केतनचा चेहरा पाहण्यासारखा झाला.


- अभिजित पेंढारकर.


(क्रमशः)

Jul 17, 2017

अटी लागू

10.30 am
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या ग्रुपचा सध्या दिवसेंदिवस गुणात्मक ऱ्हास होत चालला आहे. इतर ग्रुप्सपेक्षा आपले वेगळेपण जपण्यासाठी, आपण प्रत्येकाशी बोलून, चर्चा करून, निवडून मोजकेच असे 40 सदस्य ग्रुपमध्ये घेतले होते. परंतु सुरुवातीच्या काळात कुठल्याही विषयावर हिरिरीने आणि अभ्यासपूर्ण चर्चा करणाऱ्या सदस्यांना सध्या टाइमपास आणि चहाटळकीव्यतिरिक्त बोलण्यासाठी काही विषयच राहिलेले नाहीत, असे निदर्शनास आले असून, ही अतिशय गंभीर बाब आहे. आधी कला, साहित्य, राजकारण, सामाजिक समस्या, अर्थव्यवस्था, आर्थिक नियोजन अशा विषयांवर गांभीर्याने चर्चा करणारे सदस्य आता नटनट्यांच्या लफड्यांपासून आपापल्या कपड्यांच्या खरेदीपर्यंत कुठल्याही विषयावर अर्थहीन, चहाटळ, थिल्लर आणि वाह्यात चर्चा करू लागले आहेत, हे खरंच खेदजनक आहे. नाइलाजाने हा ग्रुप काही काळासाठी स्थगित करावा किंवा कायमचा बंद करावा, असा निर्णय घ्यावा लागत आहे. यापैकी योग्य पर्याय निवडून लवकरच जाहीर करण्यात येईल. कृपया कुणी याबद्दल वैयक्तिक गैरसमज करून घेऊ नये. या विषयावर कुठलीही चर्चा पर्सनल चॅटवर करू नये, ही विनंती.``
- आपला ॲडमिन.
....
12.30 pm
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपवरच्या काही गैरप्रकारांबद्दल स्पष्ट मत व्यक्त करून ग्रुप बंद करण्याचा किंवा स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक सदस्यांनी ग्रुपवर किंवा पर्सनली विनंती करून ग्रुप बंद करू नये, अशी मागणी केली आहे. ग्रुपची शिस्त आणि नियम यांसाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीसुद्धा दिली आहे. तरीही, थोड्या प्रमाणात मनोरंजन आणि वैयक्तिक गप्पा होणारच, अशी शक्यताही व्यक्त केली आहे. त्याचबरोबर जास्तच वाह्यातपणा करणाऱ्या सदस्यांना योग्य ताकीद द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. या सर्व सूचनांचा विचार करून ग्रुप बंद करण्याचा निर्णय सध्या घेऊ नये, असा विचार असून, ग्रुपच्या भवितव्याबद्दलचा पुढील निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल.``
- आपला, ॲडमिन.
....
2.30 pm.
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपच्या बिघडलेल्या शिस्तीबद्दल ग्रुपच्या बहुतेक सदस्यांशी वैयक्तिक चर्चा केल्यानंतर काही सदस्यांनी ग्रुपमध्ये थोडा मोकळेपणा असण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जास्त टाइमपास नको, पण अध्येमध्ये हलकेफुलके मेसेज यायला हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या सूचनेचा गंभीरपणे विचार करून, सरसकट सगळ्यांना अशा मेसेजचा त्रास होऊ नये आणि ग्रुपच्या मूळ नियमांना हरताळ फासला जाऊ नये, म्हणून आपल्याच मूळ ग्रुपचा एक सहग्रुप म्हणून वेगळा ग्रुप तयार करावा आणि त्यात या मोकळेपणाला, थोड्याफार टाइमपासला वाव द्यावा, असा विचार समोर आला आहे. या निर्णयाला मान्यता असलेल्या आणि नव्या ग्रुपमध्ये येण्यास इच्छुक असलेल्या सदस्यांनी कृपया पर्सनलवर मेसेज करावा.``
- आपला, ॲडमिन.
....
4.30 pm.
आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपबरोबरच एक नवा सहग्रुप स्थापन करण्याबद्दल काही सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, असा ग्रुप लवकरच तयार करण्यात येईल आणि त्यात इच्छुक सदस्यांना प्रवेश दिला जाईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.
- आपला ॲडमिन.
- ....
4.45 pm.
Admin created new group – `Serious friendship-on tp mode.`
Admin added 38 new members to the group.
सदस्यांच्या मागणीनुसार नवा ग्रुप तयार करण्यात आला असून, केवळ इच्छुक सदस्यांनाच त्यात प्रवेश देण्यात आला आहे. आधीच्या ग्रुपमधल्या एका सदस्याशी काहीच संपर्क होऊ न शकल्याने त्याला या ग्रुपमध्ये घेण्याबद्दलचा निर्णय झाला नाही. बाकी इच्छुकांना ग्रुपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.
आधीच्या ग्रुपची सर्व शिस्त आणि नियम इथे धाब्यावर बसवले जातील, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, ही नम्र विनंती.
- आपला, ॲडमिन.

नशीब


``काय काय नशीबाचे भोग आले नाही, आपल्या वाट्याला? आजचा दिवस कधी बघू शकेन, असं वाटलंच नव्हतं मला.`` ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकत म्हणाली.
``खरंच. माझ्या मनातलं बोललीस. मी तुला मधल्या काळात धीर देत होतो, पण मनातून पार खचून गेलो होतो. आपण कधी एकत्र येऊ, ही आशाच सोडून दिली होती.`` त्यानं हळूच डोळे पुसले.
``नशीब आपल्याला कुठेकुठे घेऊन जातं, नाही? तुला सांगू, नशीब वगैरे गोष्टींवर आधी माझा कधीच विश्वास नव्हता. `माझी वेळ चुकली,` `नशीबात असेल ते मिळतंच`, वगैरे गोष्टींची टर उडवायचे मी एकेकाळी. पण तुझ्याशी भेट झाली आणि मी हळूहळू बदलत गेले.``
``केवढी कचाकचा भांडली होतीस, पहिल्याच दिवशी माझ्याशी, आठवतंय? ह्या मुलीचं पुन्हा आयुष्यात कधी तोंड बघायचं नाही, असं ठरवलं होतं मी!``
``हो, मीसुद्धा!`` ती हसून म्हणाली.
``चोराच्या उलट्या बोंबा!``
``का? तुझी काहीच चूक नव्हती त्या दिवशी?``
``अजिबात नव्हती! रांगेत मीच पुढे होतो. तू उशिरा आली होतीस!``
``आता पुन्हा त्यावरून भांडणारेस का आज माझ्याशी? चार वर्षं झाली त्या गोष्टीला. त्याच्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय साहेब!``
``हो, आपण पुन्हा भेटलो तेव्हा पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यातच अडकलो होतो. तेव्हासुद्धा मला बघून तोंड फिरवलं होतंस तू. पण दुसरा काही पर्यायच नव्हता, म्हणून माझी छत्री, माझा रुमाल, माझी गाडी, सगळंच घेतलंस.``
``आणि तुझं मनसुद्धा, ना?``
``शी! खूपच पांचट होता हा!``
``असू दे. तुझ्याकडूनच शिकलेय!``
``विषय बदलू नकोस. बरं, नेलंस ते नेलंस, दुसऱ्या दिवशी वेळेवर आणूनसुद्धा दिलं नाहीस!`` त्यानं पुन्हा तिची खोडी काढली.
``हो क्का? बरं! मग आत्तासुद्धा तुझीच गाडी घेऊन मी घरी जाते. तू ये चालत.`` ती फणकाऱ्यानं उठली.
``अगं अगं! रागावतेस काय नुकतंच प्रेमात पडल्यासारखी? साडेतीन वर्षं झाली आपण प्रेमात पडून. आज आपलं लग्नसुद्धा झालंय. इथे मस्त समुद्रावर आलोय, जरा बसूया निवांत. गप्पा मारू. घरी जाऊन पुन्हा भांडायचंच आहे! `` त्याच्या या वाक्यावर तिला हसायचं नव्हतं, पण तिला ते आवरता आलं नाही.
``स्वीट रास्कल आहेस तू. कितीही टोकाचं भांडण झालं, तरी दोन मिनिटांत नॉर्मलला येतोस आणि माझी समजूत काढतोस. तुझ्या याच स्वभावावर फिदा झालेय मी.``
``आणि मी तुझ्या वस्सकन अंगावर येण्यावर!`` त्यानं पुन्हा तिला चिमटा काढला.
``आपल्या भांडणाचं काही टेन्शन नाही रे, पण आपल्या घरच्यांची भांडणं कधीच मिटणार नाहीत, याची काळजी वाटतेय मला. माझ्या नशीबात सासरचे आणि माहेरचे दोन्ही नातेवाईक नसणारेत, यापुढे कधीच.``
``थोड्या दिवसांनी होईल सगळं सुरळीत. काळजी नको करू.``
``नाही होणार. मी दोन्ही घरच्यांना ओळखते. त्यांच्या मनातला आपल्याबद्दलचा आणि एकमेकांबद्दलचा राग बघितलाय मी. आणि खोट्या आशेवर जगायला मला नाही आवडत.``
``हं. खरंच आहे. आपल्या नशीबात ते नव्हतं, असं म्हणू आणि आपलं आयुष्य जगायला लागू.``
``करेक्ट बोललास. आणि मला कसलीही खंत नाहीये. घरच्यांचे आशीर्वाद मिळाले नसतील, पण रीतसर रजिस्टर लग्न झालंय आपलं. आता आयुष्यभर तू माझ्याबरोबर आहेस ना, मग बास! तुझी साथ असेल, तर नशीब साथ देईलच!``
ती त्याच्या मिठीत शिरली आणि त्यालाही भरून आलं.
...
संध्याकाळी समुद्राजवळच्या रस्त्यावर भरपूर गर्दी जमली होती. नुकताच एक भीषण अपघात तिथे झाला होता. पोलिसांचा घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. अपघात झालेली बससुद्धा एका इलेक्ट्रिक पोलवर धडकलेल्या अवस्थेत तिथेच उभी होती. तिच्या चाकापाशी रक्ताचं थारोळं साचलेलं दिसत होतं.
कुणीतरी शेजारच्या माणसाला म्हणत होतं, ``दोघं जण गेले म्हणे. आजच लग्न झालं होतं त्यांचं. बिच्चारे! समुद्रावर फिरायला आले होते. घरी जात असताना एकदम बसचे ब्रेक फेल झाले आणि या दोघांना धडक बसली. दोघंही ऑन द स्पॉट खलास!``
शेजारी म्हणाला, ``वाईट झालं. काय तरी नशीब असतं नाही एकेकाचं?``

शेजारधर्म!

``नमस्कार. आत येऊ का?`` दारात उभ्या असलेल्या त्या अनोळखी गृहस्थांनी नम्रपणे विचारणा केली आणि शंतनुनं अदबीनं त्यांना नमस्कार करून दार उघडलं.
``अहो या ना, प्लीज!`` त्यानं दारात उभ्या असलेल्या त्या दांपत्याचं स्वागत केलं, पण हे नक्की कोण आहेत, हा उलगडा काही त्याला झाला नव्हता.
``सॉरी, आपली ओळख नाही आणि आम्ही असे अचानक तुम्हाला न कळवता आलो. डिस्टर्ब तर नाही ना केलं? `` त्यांनी पुन्हा नम्रपणा दाखवला.
``नाही हो. इट्स ओके. बसा ना.`` शंतनुने त्यांना खुर्ची दिली. दोघेही जरा स्थिरावले.
``आम्ही शारंगधर. इथेच, ह्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर राहतो.`` त्या दांपत्यानं खुलासा केला, तेव्हा शंतनुच्या मनातलं प्रश्नचिन्हही दूर झालं.
``अरे, हो का? सॉरी, मी ओळखलं नाही. आम्हीसुद्धा इथे नवीनच आहोत ना, जेमतेम एक महिनाच झालाय आम्हाला इथे येऊन.``
``हो, कळलं आम्हाला अध्यक्षांकडून. म्हणूनच तुमच्याकडे आलोय. आम्हालाही फ्लॅट विकायचाय. त्यासाठी तुमची मदत हवी होती.``
``अवश्य. बोला ना. शेजाऱ्यांना मदत करणं, हे कर्तव्यच आहे आपलं.``
``आम्हाला सोसायटीचा सॅंक्शन्ड प्लॅन पाहिजे होता. तो कुठेच मिळत नाहीये.``
``काय सांगता? सोसायटीकडे पण नाहीये? ``
``नाही. सगळीकडे प्रयत्न केले, कुठेच मिळेना, म्हणून शेवटी तुमच्याकडे आलो. तुमचा नुकताच व्यवहार झालाय, तुमच्याकडे तो नक्की असेल असं वाटलं. ``
``बरं झालं, तुम्ही आमच्याकडे आलात. अहो, आमच्या फ्लॅटच्या व्यवहाराच्या वेळेलाही असाच त्रास झाला होता आम्हाला. घर घेणं म्हणजे बाळंतपण पार पाडण्यासारखंच असतं. सगळा त्रास सहन करावा लागतो!`` बायकोनं आणून दिलेला चहा त्या दोघांना देत शंतनू म्हणाला. त्या दोघांनीही नको नको करत चहा घेतला.
``आम्हाला तर कुणीच मदत केली नव्हती. सगळयांनी अडवणूक केली. एका क्षणी तर आता काही घर होत नाही, असंच वाटून गेलं होतं. अगदी पार माणुसकी विसरून जातात लोक अशा व्यवहारात.`` शंतनूनं त्याची व्यथा सांगितली.
``हो ना.`` शारंगधरांनीही दुजोरा दिला.
``हा मॅप शोधण्यासाठी आम्ही जंगजंग पछाडलं. महापालिकेत खेटे घातले, तिथल्या शिपायाला पैसे देऊन बघितलं, नगरसेवकाचा वशिला लावला, तरीही ढिम्म. शेवटी वैतागून गेलो. मग बॅंकेच्या वकिलानंच पाच हजार रुपये घेऊन करून दिलं आमचं काम. बहुतेक पैशांसाठीच अडवलं होतं!`` शंतनूचा सगळा संताप त्याच्या बोलण्यातून जाणवत होता.
``हे वकील इथून तिथून सारखेच. ग्राहकांना लुबाडण्यातच जन्म जाणार ह्यांचा!`` शारंगधरांनी त्यांचाही अनुभव सांगितला.
``खरंतर आमच्या आधीच्या मालकांनीच हा प्लॅन आम्हाला द्यायला हवा होता. पण काय करणार, गरज आमची होती ना, आमचे हात दगडाखाली होते. बॅंकेचें कर्ज नामंजूर झालं असतं, म्हणून आम्हीच सोसला तो भुर्दंड. अक्कलखाती गेले म्हणायचं, आणि गप्प बसायचं!`` शंतनूनं त्यांच मन मोकळं केलं.
``हो, हे खरंय. पण तुमच्यासारखी माणसं भेटली, की जगात माणुसकी शिल्लक असल्याची खातरी पटते.`` शारंगधर चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाले. एव्हाना शंतनूने तो प्लॅन शोधून त्यांच्यासमोर उलगडला होता. त्यात त्यांचा फ्लॅट स्पष्ट दिसत होता. त्यांचं काम झालं होतं. हा प्लॅन त्यांना चालणार होता. त्यांचा चेहरा एकदम खुलला.
``हेच तर हवं होतं मला. कॉपी काढून घेण्यापुरता मला हा द्याल का?``
``अरे, म्हणजे काय! अर्थातच. काही प्रॉब्लेम नाही. घेऊन जा तुम्ही. ``
``थॅक्यू. थॅंक्यू शंतनू साहेब.``
``अहो थॅंक्यू काय? शेजारी आहात तुम्ही आमचे. एवढं तर करायला हवंच ना माणुसकी म्हणून! `` शंतनूने हसून उत्तर दिलं आणि शारंगधर आणखी कृतकृत्य झाले. असे शेजारी आणखी काही काळ लाभायला पाहिजे होते, आपण उगाच फ्लॅटचा व्यवहार लवकर करतोय, असं त्यांच्या मनाला वाटून गेलं. ते दारातून बाहेर पाऊल टाकणार, तेवढ्यात शंतनूचे पुढचे शब्द त्यांच्या कानावर आले, ``आम्हाला प्लॅनसाठी पाच हजार रुपये पडले होते, म्हणून तेवढेच तुमच्याकडून घेतोय. झेरॉक्स काढून आणल्यावर दिलेत तरी चालतील. काही घाई नाही. माणुसकी सोडलेली नाही आम्ही वकिलांसारखी!``

ता. क.

``माझ्यासाठी हा निकाल अतिशय दुःखदायक होता. अशी कामं करायला कधीकधी जिवावर येतं, पण काय करणार, हा आमचा व्यवसाय आहे. असो. तुमच्या दोघांच्याही भावी आयुष्याला शुभेच्छा. आनंदी राहा.`` खूप जड अंतःकरणाने वकील साहेबांनी प्रणव आणि अवनीला शुभेच्छा दिल्या.
प्रणव आणि अवनीलाही काय बोलावं कळत नव्हतं. त्यांच्या आयुष्यातला हा कदाचित सर्वांत कटू दिवस होता. दोघांनी गेली दोन वर्षं एकमेकांशी खूप चर्चा केली, खूप संवाद साधण्याचा प्रयत्न केला, आपापसातले मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण काही जमलंच नाही. नाइलाजानं तो निर्णय घ्यावा लागला होता...एकमेकांपासून वेगळं होण्याचा.
खरंतर त्या दोघांचा प्रेमविवाह. एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असताना त्यांची ओळख झालेली. ओळखीतून मैत्री, मैत्रीतून प्रेम आणि प्रेमातून लग्न, असा रीतसर प्रवास पाच वर्षांचा होता. प्रेम आंधळं का कसंतरी असतं असं म्हणतात, ते प्रणवला लग्नानंतर जाणवायला लागलं. किरकोळ कारणावरून त्याचे अवनीशी खटके उडायला लागले. अवनीचा अतिव्यवस्थितपणा आणि नियमानुसार वागण्याचा अतिआग्रह हेच आधी त्यांच्यातल्या प्रेमाचं आणि नंतर विसंवादाचं कारण ठरलं होतं. अवनी मराठीची प्राध्यापक. अतिशय बुद्धिमान. तर प्रणव जगण्याकडे हसतखेळत बघणारा, छोट्या चुका नजरेआड करणारा, स्वच्छंदी. हे दक्षिण आणि उत्तर ध्रुव काही एकत्र येऊ शकले नाहीत. आपलं एकमेकांवर प्रेम असलं, तरी आपण एकत्र संसार करू शकत नाही, या निर्णयावर ते आले आणि सामंजस्याने वेगळं व्हायचा निर्णय त्यांनी घेऊन टाकला. पुढील कायदेशीर अडथळेही सुरळीत पार पडले.
घटस्फोट मंजूर झाल्याच्या दिवशी ते पुन्हा भेटले, तेव्हा नाही म्हटलं तरी दोघांच्याही काळजात काहीतरी हललंच. प्रणवनं तिला एक पत्र दिलं. ओळख झाल्यापासून अशी अनेक पत्रं त्यानं तिला लिहिली होती. आजचं हे कदाचित शेवटचं होतं. त्यानं लिहिलं होतं, ``अवनी, तू खूप चांगली आहेस. तुझ्यासारखी व्यक्ती ज्याच्या आयुष्यात असेल, तो खरंच भाग्यवान. काही काळासाठी मला हे भाग्य लाभलं, पण मी दुर्दैवी ठरलो. आयुष्यभरासाठी तुझी सोबत मिळू शकली नाही. पुढच्या काळात तुझी साथ नसली, तरी तुझ्याबरोबर घालवलेल्या काही चांगल्या क्षणांची आठवण काढून मी तो काळ निभावून नेईन.
कायम हसत राहा, सुखी राहा.
ता. क. :
आणि हो, आणखी कुणावर माझ्यासारखंच अमाप प्रेम केलंस, तर माझ्याप्रमाणे त्याच्या व्याकरणाच्या चुका काढत जाऊ नकोस. बाय!``
घरी आल्यावर प्रणवचं ते पत्र पुन्हा पुन्हा वाचताना अवनीचे डोळे भरून आले. आता बरंच काही घडून गेलं होतं, पण हा कटू निर्णय बदलता आला असता का, असा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला. तिनंही हातातली कामं बाजूला ठेवून प्रणवला एक भावनिक पत्र लिहिलं. आजपर्यंतचं कदाचित मायेचा सर्वाधिक ओलावा असलेलं ते पत्र होतं. सगळं पत्र पूर्ण झाल्यावर तिनं लिहिलं,
`ता. क. `व्याकरणा`च्या नाही रे, `शुद्धलेखना`च्या!`

रॉंग नंबर

``हाय!``
``हाय डिअर``
``व्हॉटस अप?``
``हो, व्हॉटस अपवरच आहे मी. बोल ना.``
``अगं, ते माहितेय. व्हॉटस अप म्हणजे, काय चाललंय?``
``बसलेय निवांत. तुला आज माझी कशी काय आठवण?``
``कशी काय म्हणजे काय? मला रोजच तुझी आठवण येते. ``
``खरंच? लव्ह यू डिअर. काय करतोयंस तू? ``
``ऑफिसमध्ये खर्डेघाशी. दुसरं काय करणार? बरं, तू डीपी का ठेवला नाहीयेस? ``
``सहज. तुला माहीत नाही, मी डीपी काढलेला? ``
``अं...अगं नाही, नसेल लक्ष गेलं. सॉरी.
``इटस ओके. पण नावावरून तर कळलं असेलच ना?``
``अगं नाही, मी तुझा नंबर वेगळ्याच नावानं सेव्ह केलाय. एनीवे. ऑफिसमध्ये जरा बोअर झालं म्हणून तुला पिंग केलं. ``
``सो नाइस ऑफ यू! आज एवढं छान वाटतंय ना, पहिल्यांदा बोलतोयंस तू असं.``
``अगं मनात असतं, पण नेहमी बोललं जातंच, असं नाही. You know, I am so lucky to have you in my life. ``
``रिअली?``
``I mean it. योग्य वेळी तू भेटली नसतीस, तर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक!``
``same here. आज तू एवढं मनापासून बोलतोयंस, खरंच खूप बरं वाटतंय. ``
``माझ्यासाठी खूप करतेस तू. मी खरंच त्याची परतफेड नाही करू शकत.``
``It's ok darling. असं बोलून दाखवायची गरज नसते. ``
``डार्लिंग म्हटलंस आणि अंगावर शहारा आला बघ. आता ऑफिसमध्ये लक्ष लागणार नाही माझं. ``
``हं. मग माझी आठवण काढत काम कर, म्हणजे फास्ट काम होईल. ``
``कधी भेटायचं? ``
``तुला वेळ झाला की, जानू. ``
``जानू? इश्श!! खूप वेगळं बोलतोयंस तू आज, सोनू. आता तर तुला भेटायची कधी नव्हे एवढी ओढ लागलेय. ``
``हं. भेटूच. बरं ऐक, एक महत्त्वाचं सांगायचं होतं. ``
``बोल ना. ``
``हे असं लाडिक आणि खाजगी चॅट करणं धोकादायक असतं. अशा नात्यात आपण जास्त काळजी घ्यायला हवी. तू चॅट लगेच डिलीट करून टाकत जा हां!``
``का रे? त्यात कसला एवढा धोका? ``
``अगं, उगाच प्रॉब्लेम नको. तुझ्या ऑफिसमध्ये, घरी कुणी तुझा मोबाईल बघितला तर... ``
``कुणी नाही बघत.``
``तरीही काळजी घे. आणि दुसरं म्हणजे माझ्याशी चॅट करताना चुकून दुसऱ्या कुणाला जाणार नाही, याची काळजी घे. ``
``म्हणजे? ``
``अगं, चुकून आपलं चॅट दुसऱ्या कुणाला गेलं, तर प्रॉब्लेम होऊ शकतात. परवा आमच्या ऑफिसमधल्या एका मित्राचा असाच लोच्या झाला. ``
``काय? ``
``त्याला वाटलं आपण आपल्या गर्लफ्रेंडशी चॅट करतोय आणि चुकून तो बायकोशी बोलत होता. घरी गेल्यावर बायकोनं धू धू धुतला.``
``वा! पण तू हे मला का सांगतोयंस, मला कळलं नाही. नवऱ्याशी काहीही बोलेन मी चॅटवर. कुणाची भीती बाळगायची काय गरज आहे? ``
``डार्लिंग, आपण नवरा-बायको झालो नाहीये अजून. आपल्याला एकत्र येण्यात अनेक अडथळे आहेत. यू बेटर नो. ``
``तू काय बोलतोयंस? बरा आहेस ना? आपलं लग्न होऊन पाच वर्षं झालेयंत राजा! मी प्रणिती बोलतेय, तुझी बायको! मला वाटलं आता नोकरीसाठी मी नाशिकला असते, म्हणून तू माझ्याशी चॅट करत होतास. तुला नक्की कुणाशी बोलायचं होतं?``
(काही मिनिटं स्मशानशांतता....)
``अनिकेत, r u there? Hello…reply immediately. अनिकेत....हे बघ, तू आहेस ऑनलाइन. मला दिसतोयंस तू. उगाच रेंज नाही वगैरे कारणं सांगू नकोस. मला उत्तर दे. थांब...मी उद्याच्या उद्या पुण्याला येतेय. मग करू आपण समोरासमोर चॅटिंग!``

सहानुभूती


``तुला तर माहितीच आहे ना, मी कसा माणूस आहे ते? माझ्यावर विश्वासघाताचा आरोप केलाय तिनं! विश्वासघाताचा आरोप! मी तिला फसवू शकतो का? तिलाच काय, मी कुणालातरी फसवू शकतो का? असा लबाड माणूस वाटतो का मी?`` तो अगदीच सैरभैर झाला होता. खचून गेला होता. त्याला एवढं निराश झालेलं कधीच कुणी बघितलं नव्हतं. तो आत्तापर्यंत कायम स्वाभिमानानं, ताठ मानेनं जगत आला होता. कधी कुठल्याही गोष्टीसाठी कुणावर अवलंबून राहिला नव्हता. आज मात्र त्याची उमेद पार खचली होती. आता तो पुन्हा उभा राहू शकेल की नाही, असंच कुणालाही त्याच्याकडे बघून वाटलं असतं.
``एवढी वर्षं एकत्र राहिलो आम्ही आणि आता ती माझ्यावर असे आरोप करतेय. मी तिला फसवलं, असं सांगून आजच घटस्फोटासाठी अर्ज केलाय तिनं. मी काय करू? तिच्यावरचं प्रेम पुन्हा सिद्ध करून दाखवू का? `` तो पुन्हा रडायला लागला.
``एवढं प्रेम होतं आमचं एकमेकांवर, तरीही तिनं माझ्यावर फसवणुकीचा आरोप केला! मी इमोशनल बोलून कायम सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणाली ती. इमोशन्स वापरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो? मी? तुला तरी पटतं का हे? तुझ्या बाबतीत तरी कधी केलंय का मी असं?`` त्यानं पुन्हा डोळ्यांत पाणी आणून तिला विचारलं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो पुन्हा हमसाहमशी रडायला लागला.
``राजा, तू रडू नकोस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू कधीच अशी दुसऱ्याची भावनिक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार नाहीस रे, माझ्या सोन्या!`` ती त्याच्या केसांतून बोटं फिरवत म्हणाली. तिनं त्याला आधार देण्यासाठी मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रूधारा ओघळायला लागल्या...

Jun 26, 2017

नीतिमत्ता!


संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात मुख्य रस्त्याच्या कॉर्नरला असलेलं ते रेस्टॉरंटसुद्धा उत्साहाने फुललं होतं. संधिप्रकाश दारंखिडक्यांतून झिरपत आत येत होता आणि आकर्षक रंगसंगती केलेल्या टेबलांवरची सजावट आणखी खुलून दिसत होती. बाहेरची वाढती रहदारी, लोकांची घरी जाण्याची घाई, मध्येच गाडी पुढे घेण्यावरून होणारी भांडणं बघत आलं-वेलची टाकलेल्या चहाचे घोट घेत निवांत बसणं, हा अनेकांचा संध्याकाळचा विरंगुळा होता. त्या दिवशीही हे रेस्टॉरंट अशाच दर्दींच्या गर्दीनं फुलून गेलं होतं. अपवाद होता, तो फक्त एका टेबलचा. या टेबलावरचे सगळेच जण सुतकी चेहऱ्यानं एकमेकांकडे बघत बसले होते. कुणीच काही बोलत नव्हतं. शेवटी एकानं पुढाकार घेतला आणि मौनव्रताची कोंडी फुटली. ते सगळे एकाच ऑफिसमध्ये काम करणारे होते, पण वेगळ्या विभागांतले. ऑफिसमध्ये रोज तसा एकमेकांशी संबंध येत नसे. येई तोसुद्धा कामापुरता. ऑफिस व्यवस्थित चाललं होतं, कामाचंही फार टेन्शन नव्हतं आणि हाच त्यांच्या चिंतेचा विषय होता.
``आपण व्हॉट्स अप ग्रुप सुरू करूया का?`` एकानं काडी टाकली आणि सगळे खाऊ का गिळू नजरेने त्याच्याकडे बघायला लागले.
आपण असं काय देशद्रोही विधान केलं, हे न कळून तो बिचारा कानकोंडा झाला. इतरांच्या बोलण्यातून त्याला कळलं, की ऑफिसमधला कामाचा शीण घालवण्यासाठी व्हॉटस अप ग्रुप तयार करण्याचा उपाय सुचवणारा तो काही जगातला पहिला माणूस नव्हता. याआधीसुद्धा हा विचार कित्येकदा पुढे आला होता आणि मागे पडला होता. ऑफिसमधलं गॉसिप नको, मेसेज वाचण्यातच खूप वेळ जातो, लोक काहीही फॉरवर्ड करतात, अशा अनेक तक्रारी होत्या. त्याबरोबरच एक मुख्य आक्षेप होता, तो म्हणजे काही आगाऊ पुरुष सदस्य या कॉमन ग्रुपवर असभ्य जोक्स टाकतात, हा. ती भानगडच नको म्हणून कधी या ऑफिसचा ग्रुपच स्थापन झाला नव्हता. यावेळी मात्र अशा ग्रुपशिवाय तरणोपाय नाही, असाच निष्कर्ष या चर्चेत निघाला आणि लगेच शिक्कामोर्तब आणि अंमलबजावणीही झाली.
अर्थात, ऑफिसच्या साडेचार वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीतला पहिला व्हॉट्स अप ग्रुप स्थापन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीआधी ग्रुपच्या अटी आणि नियम ठरवणे आवश्यक होते. हिशेब आणि नियमावलीच्या बाबतीत चोख असलेल्या एका सहकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. बाकीही कुणाकुणावर अशाच जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. सगळ्यात महत्त्वाची आणि जोखमीची जबाबदारी म्हणजे ग्रुपच्या सदस्यांना काबूत ठेवणे आणि त्यांचा तोल सुटू न देण्याची होती, ती त्या ग्रुपचा प्रस्ताव पुन्हा नव्याने मांडणाऱ्या त्या नव्या सदस्याची होती. त्या निमित्तानं त्याची सगळ्यांशी पुन्हा ओळख झाली. त्याचं नावही त्याच्या स्वभावाला साजेसंच होतं – प्रीतम. अल्पावधीत तो सगळ्यांचा `प्रीतम` झाला.
ग्रुपमुळे ऑफिसमुळे नवं चैतन्य आलं, लोकांचा कामातला हुरूप वाढला, सगळे एकमेकांशी खेळीमेळीत राहू लागले. ऑफिसच्या कामातला रुक्षपणा संपून तिथे नवा उत्साह आला, कार्यक्षमताही वाढली. एकूण सगळीकडे आनंदीआनंद झाला. लोक काटेकोरपणे नियमांचं पालन करत होते, ग्रुपवर काही वाह्यात, अवाजवी, थिल्लर चर्चाही होत नव्हती. थोडक्यात, सगळे आटोक्यात होते आणि नियम पाळत होते. ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश प्रचंड यशस्वी झाला होता.
...आणि अशाच उत्साही वातावरणात एके दिवशी भूकंप झाला! ग्रुपवर हलकल्लोळ माजला, प्रचंड उलथापालथ झाली. ग्रुपच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. कारणही तसंच घडलं होतं. एवढ्या साध्या, सरळ, सोज्वळ वाटेने चाललेल्या ग्रुपवर एक अश्लील व्हिडिओ येऊन पडला होता. ग्रुपच्या सगळ्या नियमांना एका फटक्यात सुरुंग लागला होता. दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, तर साक्षात एडमिनकडूनच हा प्रमाद घडला होता! सगळ्यांचा `प्रीतम` असलेला एडमिन एका फटक्यात सगळ्यांच्या रागाचा धनी बनला होता. अपेक्षेप्रमाणेच सगळ्यांनी त्याला सोलून काढला. तो सगळ्यात ज्युनिअर असतानाही एडमिन म्हणून सगळ्यांना गुरकवायचा, त्याचा हूट एका क्षणात निघाला. प्रीतम हडबडला. खरंतर त्याच्याकडून ही चूक नकळत घडली होती. एवढ्या प्रेमानं निर्माण केलेला, प्राणपणानं जपलेला, सगळ्या ज्येष्ठश्रेष्ठांच्या भावना जपून चालवलेला ग्रुप एका क्लिपमुळे उद्ध्वस्त होणार होता. इतर कुणी टाकलेल्या एखाद्या थोड्याशा वाह्यात विनोदावरही ज्येष्ठांनाही ग्रुपवरच खडे बोल सुनावणारा प्रीतम आज नैराश्याच्या गर्तेत गेला होता. प्रीतमनं ग्रुपवर `सॉरी` एवढाच मेसेज टाकला आणि तो मौनात गेला.
दुसऱ्या दिवशीही ग्रुपवर स्मशानशांतता होती. प्रीतम ग्रुपवरच नव्हे, तर ऑफिसलाही फिरकला नाही.
तिसऱ्या दिवशी सकाळी प्रीतमला जाग आली, तेव्हा त्याच्या मोबाईलवर व्हॉट्स अपचे कितीतरी पर्सनल मेसेज आलेले होते. बहुधा आणखी बरंच काही ऐकून घ्यावं लागणार, या काळजीनं त्यानं भीतभीतच मेसेज वाचायला सुरुवात केली.
``प्रीतम, झालं ते झालं. तूसुद्धा मुद्दाम काही केलं नव्हतंस. आपण काय घडलं ते विसरून जाऊ. मी बाकीच्यांनाही समजावेन. तू परत ये.`` प्रीतमला मेसेज वाचून समाधान वाटलं. त्यानं हसरा इमोजी पाठवून आपलं समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा मेसेज वाचला गेल्याचं नोटिफिकेशन आल्यावर लगेच पुढचा मेसेज आला - ``परवाची क्लिप चांगली होती. अशाच आणखी आहेत का?``
प्रीतम उडालाच. काही प्रतिक्रिया द्यायच्या आधी त्यानं बाकीच्या सहकाऱ्यांकडून आलेले पर्सनल मेसेज बघितले. त्यांचाही आशय बहुतांश तसाच होता. एवढ्यात प्रीतमला काही महिला सदस्यांचेही मेसेज दिसले. बहुधा परवाच्या प्रकरणाबद्दलच त्यांनी आपले वाभाडे काढले असतील, असं समजून त्याला ते उघडायचं धाडस होईना. पण बऱ्याच जणींचे मेसेज बघून त्याला राहवलं नाही. त्यानं ते उघडून बघितले आणि त्याला पुन्हा जोरदार धक्का बसला.
त्या मेसेजमधलाही आशयही जवळपास तसाच होता!

-       अभिजित पेंढारकर.