Showing posts with label ललिताचं लळित.... Show all posts
Showing posts with label ललिताचं लळित.... Show all posts

Aug 17, 2017

संकटी रक्षी, शरण तुला मी!

('मुंबई सकाळ'च्या श्रावण विशेष पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 4)


घरी आल्यापासून केतनला चहा मिळाला नव्हता. या श्रावणात घरात रोज कुठल्या ना कुठल्या पदार्थांचे वास घमघमत असायचे. आपणच केलेला पदार्थ त्याने सगळ्यात आधी खावा, यासाठी सासू-सुनांमध्ये चढाओढ लागलेली दिसायची. मग दोघींचेही पदार्थ कसे चांगले आहेत, असं कौतुक करताना केतनचा मुत्सद्दीपणा पणाला लागायचा. आज मात्र असं काहीच झालं नव्हतं. आज मात्र जेवणाची वेळ झाली, ती साध्या आमटीभाताचा वाससुद्धा दरवळत नव्हता.

केतननं जरा आढावा घेतला, तेव्हा त्याला लक्षात आलं, की सोनालीचा घरीच गणपती तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. गणपतीची माती, पाणी, काटे-चमचे, पळ्या, कागद, यांचा तिनं एवढा पसारा करून ठेवला होता, की खोलीत पाऊल ठेवायला जागा नव्हती. केतनला बघितल्या बघितल्या ती उत्साहाने उडी मारून म्हणाली, ``कसा झालाय माझा गणपती?`` तिनं खरंच छान मूर्ती घडवली होती. ``कमाल! हे कधी शिकलीस तू?`` त्यानं कौतुकानं विचारलं. सोनालीकडूनच त्याला समजलं, की तिनं गणपती तयार करण्याच्या एका कार्यशाळेत भाग घेतला होता. अवघ्या दोन दिवसांत ती असा गणपती तयार करायला शिकली आणि आता यंदा घरच्या गणपतीची मूर्ती आपणच तयार करायची, असं तिनं मनाशी ठरवलं होतं.

केतन म्हणाला, ``खरंच भारी आहेस तू. घरातली कामं सांभाळून तू गणपती करायला शिकलीस, एवढ्या लवकर एवढी सुबक मूर्ती तयार केलीस. यंदा हाच गणपती आपण बसवायचा. फायनल!`` आश्वासन दिलं खरं, पण नजीकच्या भविष्याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. त्याचं बोलणं संपतं न संपतं, तोच वत्सलाबाईंची हाक आली आणि तो तिकडे पळाला.

वत्सलाबाईंच्या खोलीत आल्यावर केतनला बसलेला धक्का आधीच्या धक्क्यापेक्षाही जास्त रिश्टरचा होता. त्यांनीसुद्धा असाच पसारा पाडला होता आणि त्याच्या मध्यभागी होती, त्यांनी स्वतःच्या हातांनी घडवलेली गणपतीची सुबक मूर्ती.
``कसा झालाय माझा गणपती?`` त्यांनी उत्साहानं विचारलं.
``कमाल! हे कधी शिकलीस तू?`` केतनच्या स्वरात आश्चर्य, धक्का, उत्सुकता, भीती आणि भविष्यातल्या संकटाची चाहूल, सगळंच दाटून आलं होतं. वत्सलाबाईसुद्धा अशाच कुठल्यातरी कार्यशाळेत गणपती करायला शिकल्या होत्या आणि त्यांनीही घरी हा यशस्वी प्रयोग केला होता, हे त्याच्या लक्षात आलं. `यंदा हाच गणपती आपण बसवायचा,` असं आश्वासन त्याला इथेही द्यावंच लागलं.
आता केतनपुढे धर्मसंकट उभं होतं. दोघींपैकी एकीचा गणपती बिघडला असता, त्यांना जमला नसता, तर त्यांनी स्वतःहूनच माघार घेतली असती. पण यावेळी मुकाबला बरोबरीचा होता. घरात दोन गणपती बसवणं तर शक्य नव्हतं. कुणाचा एकीचा गणपती निवडला, तर दुसरीला राग येणार होता.

गणपतीच्या काळातल्या बंदोबस्ताचा पोलिस यंत्रणेला येत नसेल, एवढा तणाव केतनला या काळात आला होता. गणपती रंगवून पूर्ण होईपर्यंत केतनच्या जिवात जीव नव्हता. मात्र, एके दिवशी अचानक सोनाली आणि वत्सलाबाई एकदमच त्याच्या समोर आल्या आणि वादावर तोडगा निघाल्याचं त्यांनी सांगितलं.
``हे बघ, आम्ही ठरवलंय, की दोन्ही गणपती चांगले आहेत, त्यामुळे दोन्ही बसवायचे. फक्त एकाची पूजा करायची आणि दुसरा नुसताच. सार्वजनिक मंडळं करतात, तसं.`` वत्सलाबाईंनी खुलासा केला.
केतन समाधानाचा निःश्वास टाकणार, एवढ्यात सोनाली म्हणाली, ``फक्त मखरात कुठला बसवायचा आणि पूजेसाठी कुठला ठेवायचा, हे तेवढं तू ठरव!``

केतनला पुढच्या संकटाची चाहूल लागली आणि त्यातून वाचण्यासाठी त्यानं मनातल्या मनात विघ्नहर्त्याचा जप सुरू केला!

Aug 10, 2017

समथिंग `स्पेस`ल

('मुंबई सकाळ'च्या श्रावण विशेष पुरावणीसाठी लिहिलेला लेख क्र. 3)
...


``आई, मी काय म्हणतो, तू यंदा नेहमीसारखी मैत्रिणीकडे जन्माष्टमीला जाणार नाहीयेस?`` वत्सलाबाईंसाठी स्वतः चहा करून आणून दिल्यावर केतन म्हणाला.

``अरे नाही रे बाबा, यंदा तीच घरी नाहीये. जन्माष्टमी बुडणार माझी.``
हे उत्तर ऐकून त्याचा चेहरा पडला.
``तुला नक्की काय हवंय? उगाच ताकाला जाऊन भांडं लपवू नये.``
`` भांडं लपवायचा प्रश्नच येत नाही. हल्ली टेट्रा पॅकमध्येच मिळतं ना ताक!`` त्यानं विनोदाचा प्रयत्न केला.
``बाळा, हेच संस्कार केले का रे मी तुझ्यावर? एवढा वाईट दर्जा आहे तुझ्या विनोदाचा?`` वत्सलाबाईंच्या या वाक्यावर त्याची बोलतीच बंद झाली.
...
रात्री सगळीकडे निजानीज झाल्यावर बेडरूममध्ये मात्र वातावरण एकदम तापलं...अर्थात, जोरदार खडाजंगीमुळे.
``तुला ना, एखाद्याला कसं पटवायचं, कळतच नाही!`` सोनाली धुसफुसत म्हणाली.
``निदान तू तरी हे बोलू नकोस. तीन वर्षांपूर्वीच तुला...``
``आगाऊपणा करू नकोस. मला पटवून खूप मोठा तीरच मारलायंस तू. मी आईला पटवण्याबद्दल बोलतेय.``
``अगं, पण ते बाबा बघून घेतील ना!`` केतनने पंच मारला खरा, पण त्यावर सोनाली फणकाऱ्यानं तोंड फिरवून झोपी गेली, तेव्हा हा पंच आपल्याला आज खूप महागात पडणार, याचा त्याला अंदाज आला.
...
रविवार, कृष्णाष्टमी आणि 15 ऑगस्ट अशा सलग तीन दिवस सुटीच्या काळात फिरायला जाण्याचा खर्च आत्ता शक्य नव्हता, पण निदान रोजच्या धबडग्यातून तरी सोनालीला जरा स्वतःसाठी `स्पेस` हवी होती. सासूबाई घरी असल्या, की अशी मोकळीक घेता येणार नव्हती. पण जन्माष्टमीची आठवण करून देण्याचा प्लॅन तर फसला होता. सासूबाई कुठे जाणार नाहीत हे कळलं आणि सोनाली जरा खट्टूच झाली. अगदी कुठे रिसॉर्टवर गेलो नाही, तरी निदान गाडीतून लांब कुठेतरी चक्कर मारून येऊ, असं त्यानं सुचवलं. सोनालीनं नाइलाजानं त्याला होकार दिला.
अखेर तो सुटीचा दिवस उजाडला. दोघं सकाळी लवकरच गाडीतून फिरायला बाहेर पडली. नेमका अर्ध्या तासातच सोनालीला कुणाचातरी फोन आला आणि तिनं वैतागून गाडी थेट घराकडे वळवायला सांगितली. घरी पोहोचल्यावर ती तातडीने दार उघडून स्वयंपाकघराकडे धावली.
``गॅस सुरू राहिलाय म्हणून आईंचा फोन आला होता. पण इथे तसं काहीच नाहीये! शी! आता पुन्हा कुठे बाहेरही पडता येणार नाही. सगळा मूड गेला!`` मागून आलेल्या केतनला सांगत सोनाली वैतागून खाली बसली. केतनने तिला शांत करण्यासाठी तिच्यासाठी कॉफी केली, तिच्या आवडीची गाणी लावली. आपण आता थेट उद्याच येऊ, असा निरोपही वत्सलाबाईंनी दिला होता. आता पुन्हा बाहेर जायला नको, घरीच एखादी फिल्म बघू, गप्पा मारू, एकमेकांसाठी वेळ देऊ, असं त्यानं ठरवलं. जेवणही त्यानं बाहेरूनच मागवलं. त्या दोघांचा वेळ खूप मजेत गेला.
पार दुसऱ्या दिवशी सकाळी वत्सलाबाई घरी आल्या, तेव्हा सोनालीनं त्यांचं उत्साहात स्वागत केलं, आस्थेनं चौकशी केली. थोड्यावेळाने मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या वत्सलाबाईंनी पुन्हा सोनालीला फोन केला, तेव्हा तिच्या काळजात धस्स झालं.
``काय गं, काल घरात पुरेशी स्पेस मिळालेय, की आजसुद्धा मला वेगळं काहीतरी निमित्त काढून आणखी एखाद्या मैत्रिणीच्या घरी दिवसभर वेळ घालवायला जावं लागणारेय?`` असं वत्सलाबाई म्हणाल्या तेव्हा कालचा त्यांचा फोन, गॅसचं बटण चालू राहिल्याचं निमित्त आणि त्यांच्या अचानक ठरलेल्या कार्यक्रमामागचं कारण सोनालीला कळलं आणि ती कानकोंडी झाली. मग दोघी फोनवरच मनसोक्त हसल्या. खूप `स्पेस`ल होतं ते मनमोकळं हास्य!

- अभिजित पेंढारकर.

(क्रमशः)

हॅशटॅग सूनबाई!

(`मुंबई सकाळ`च्या श्रावण पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 2)

...


सोनाली आज सकाळपासून नेटवर काहीतरी शोधाशोध करत होती, पण तिला हवं ते सापडत नव्हतं. एकदोनदा केतननं तिला विचारायचा प्रयत्न केला, पण तिची प्रतिक्रिया बघून तो खचला. थोड्या वेळानं तीच शोधाशोध थांबवून त्याच्या आसपास घुटमळायला लागली, तेव्हाच तिला काहीतरी हवंय, याचा अंदाज त्याला आला.

``केतन, ऐक ना...`` थोड्याशा लाडिक स्वरात तिनं सुरुवात केली.
``हे बघ, आई घरात आहे आत्ता. तेव्हा आत्ता काही...``
``आगाऊपणा करू नकोस. मला जरा तुझा गायडन्स हवाय.``
`` हे म्हणजे काजव्यानं सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे!``
``चेष्टा पुरे. आमची इकडून अशीच थट्टा होणार असेल, तर एक माणूस कट्टी आहे मग स्वारीशी.`` सोनालीनं पुन्हा `जयश्री गडकर` पवित्रा घेतला.
``सोनाली, मी तुला हवी ती मदत करतो, पण प्लीज साठच्या दशकात शिरू नकोस.`` 
``मला नारळीभात करायचाय, पण प्रॉपर रेसिपीच मिळत नाहीये कुठे.`` सोनाली सकाळपासून कशात गुंतली होती, हे केतनला आत्ता समजलं.
``अगं एवढंच ना? आमच्या आईला विचार. आईच्या हातचा नारळीभात अप्रतिम असतो. तिच्या हातांची चव कुणालाच येणार नाही!`` ज्या वाक्याची सोनालीलाच काय, कुठल्याही सुनेला सर्वाधिक भीती असते, ते वाक्य अखेर केतनने उच्चारून टाकलं. सोनालीनंही तो सल्ला ताबडतोब शिरोधार्य मानला. `तू सांगितलंस, म्हणून जातेय हं,` असं तिला स्वतःच्याच मनाचं समाधान करून घ्यायचं असावं, असं केतनला उगाचच वाटलं.

पुढचे दोन दिवस घरात अधूनमधून नारळीभाताचाच विषय निघत राहिला. सोनाली सासूबाईंकडून नारळीभात करण्याच्या टिप्स घेतेय, त्याबद्दल काही शंका अतिशय सौम्य स्वरात विचारतेय, सासूबाई प्रेमानं तिला समजावतायंत, बदाम, काजू किती घालावेत, कसे चिरावेत असं अगदी साग्रसंगीत वर्णन करतायंत, असं दुर्मिळ दृश्य दिवसातून अनेकदा बघायला मिळालं.

..आणि अखेर तो दिवस उजाडला. सोनाली गेल्या दोन तीन दिवसांत जे काही शिकली होती, त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याची वेळ आता आली होती. तिनं नारळीपौर्णिमेच्या आधीच नारळीभाताचा प्रयोग करून बघितला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. सोनाली स्वतःवरच जाम खूश झाली. आपण केलेल्या नारळीभाताची भरपूर सजावट करून तिनं त्याचे फोटो काढले, स्वतःचे आणि सासूबाईंचे स्वयंपाकघरात फोटो काढले. त्या दिवशी काही तिला ते फेसबुकवर अपलोड करायला वेळ मिळाला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती फोटो अपलोड करण्यासाठी ते सिलेक्ट करत असतानाच मैत्रिणीचा फोन आला.
``अगं, तू नारळीभाताचे फोटो फेसबुकवर अपलोड केलेस का, असं विचारायला मीच तुला फोन करणार होते!`` सोनाली म्हणाली, ``आपल्या सगळ्या ग्रुपचं आजच फोटो टाकायचं ठरलं होतं ना? विसरलीस की काय?``
``मी नाही विसरलेले. पण तू काहीतरी विसरल्येस.`` मैत्रिणीनं सुनावलं, ``आपलं ठरलं होतं, की स्वतः नारळीभात करायला शिकायचं आणि त्याचे फोटो टाकायचे.``
``हो, मग! मी स्वतःच केलाय नारळीभात कुणाचीही मदत घेतलेली नाही.`` सोनालीनं ठसक्यात उत्तर दिलं, पण आपण फोटो अपलोड न करताही हिला आपण सासूबाईंची मदत घेतल्याचं कसं कळलं, असा प्रश्न सोनालीच्या मनात आलाच.
तेवढ्यात मैत्रीण म्हणाली, ``तुझ्या सासूबाईंनी अपलोड केलेत तुमचे दोघींचे नारळीभात करतानाचे फोटो. तुला टॅग केलयं, `सेलिब्रेटिंग श्रावण : सेल्फी विथ सूनबाई`, अशा हॅशटॅगसकट. कुठल्यातरी सिनेमाच्या प्रमोशनसाठीचा फंडा आहे, त्यालाच रिस्पॉन्स दिलाय बहुतेक, तुझ्या सासूबाईंनी!`` मैत्रिणीचं बोलणं संपता संपताच सोनालीनं फेसबुक चेक केलं, तेव्हा तिला सासूबाईंनी अपलोड केलेले त्या दोघींचे फोटो आणि त्यावरच्या ढीगभर कमेंट्स, लाइक्स दिसल्या आणि तिनं कपाळावर हात मारून घेतला. नारळीभात करताना काल सहज म्हणून काढलेले फोटो सासूबाईंनी आपल्या मोबाईलवर मुद्दामहून का मागवून घेतले, याचं गूढ तिला आत्ता उकललं होतं. आता तिचं कडू झालेलं तोंड नारळीभातानं तरी गोड होणार का, हा प्रश्नच होता.

- अभिजित पेंढारकर.


(क्रमशः)

`काळ` सोकावतो...!...

(`मुंबई सकाळ`च्या श्रावण विशेष पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 1)


 ...


``सोनाली, अगं हा जोक वाचलास का?`` वत्सलाबाईंनी हाक मारली आणि सोनाली आदर्श सुनेसारखी स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली.

``कुठला जोक, आई चेहऱ्यावरचे `केतनला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि सासूबाईंना स्मार्ट फोन घेऊन दिला!` हे भाव लपवत तिनं कुतुहलानं विचारलं.

``अगं, हा नागपंचमीवरचा जोक गं!`` वत्सलाबाईंना हसू आवरत नव्हतं. त्यांनी सांगितलेला जोक ऐकल्यावर सोनालीनं त्यांना हसून टाळी दिली आणि त्याच वेळी बाहेरून आलेल्या केतनने तिच्या या अभिनयाला फक्त नजरेतूनच दाद दिली.

``आई, मला फॉरवर्ड करा ना!`` एक डोळा केतनकडे ठेवून सोनालीनं स्वरात शक्य तेवढा नम्रपणा आणत सांगितलं  ``गेल्या वर्षी हाच जोक आला होता आई. तुम्ही यंदा व्हॉटस अप घेतलंत, हा आमचा दोष आहे का?`` हे तोंडावर आलेलं वाक्य तिनं पुन्हा आदर्श सुनेसारखं गिळून टाकलं.

आज घरी आल्यानंतर एकदम एवढं प्रसन्न, हसतंखेळतं वातावरण बघून केतनच्या मनात पाल चुकचुकली होतीच. चहा घेताघेता त्याच्या मनातल्या शंकेवर शिक्कामोर्तब झालं.

``अच्छा, हे कारण आहे होय आजच्या सौजन्य सप्ताहाचं?`` आई बाहेर निघून गेल्याची खातरी झाल्यावर, केतननं सोनालीला टोमणा मारला.

``उगाच काहीतरी शंका काढू नकोस. आमचं काही भांडण वगैरे नाहीये, त्या माहेरी जाणार म्हणून मला आनंद व्हायला!``

``मी कुठे म्हटलं तुमचं भांडण आहे म्हणून? काळाबरोबर बदलायला हवंच. तूसुद्धा आईची सून न राहता मुलगीच झालेयंस. पण आई आता माहेरी जाणार म्हणून एका माणसाला मनातून खराखुरा आनंद झालाय की नाही?`` केतनला तिची खोडी काढायचा मोह आवरला नाही.

``काय हे बोलणं तरी! अशी चेष्टा आवडत नाही बरं आम्हाला. इकडून असेच टोमणे मारले जाणार असतील, तर आम्ही मुळी बोलणारच नाही, ज्जा!`` सोनालीनंही एकदम `जयश्री गडकर` पवित्रा घेतला. केतन एवढ्या फिस्सकन हसला, की त्याचा कप डचमळून चहा अंगावर सांडला.

`` मला आईंचं खरंच कौतुक वाटतं. त्यांना या वयातसुद्धा त्यांना माहेरी जाण्याची ओढ आहे!`` सोनाली मनापासून म्हणाली.

``अगं, श्रावणात जातात ना बायका आपल्या माहेरी!``

``अरे हो, पण लग्नानंतर थोडे दिवस ओढ असते. आईंना अजूनही माहेरी जावंसं वाटतं, याचीच कमाल वाटते मला. अगदी उत्साहानं जातात त्या. गावातल्या माहेरवाशिणींच्या मंगळागौरींमध्येही रस घेतात, नागपंचमीला झाडाला झुले बांधून त्याच्यावर खेळतात, खरंच असं उत्साही असायला हवं माणसानं!``

``ती उत्साही आहेच! बरं, सध्या व्हॉट्स अप काय म्हणतंय?``

``काही विचारू नकोस बाबा. सोसायटीतल्या ज्येष्ठ नागरिक महिला मंडळाच्या ग्रुपवरसुद्धा घेतलंय आईंना. सतत कुठले ना कुठले सुविचार, जोक्स पाठवत असतात मला! आजच श्रावणाचा महिमा का काय पाठवलंय. आणि वर त्या नागपंचमीचा जोक!`` सोनालीनं व्यथा मांडली आणि केतनला पुन्हा हसू आलं.

``माणसानं काळानुसार बदलायला हवं. आईसुद्धा बदलतेय. गंमत वाटते मला!`` केतनच्या बोलण्यातून आईचं कौतुक दिसत होतं. ``बाय द वे, मला वाटतं, तुलासुद्धा ब्रेक हवाय. तू पण श्रावणानिमित्त माहेरी का जात नाहीस चार दिवस?``

``खरंच जाऊ? चालेल तुला?``

``जा गं, इथे मॅनेज करू आम्ही. चारच दिवसांचा तर प्रश्न आहे. आणि तुलाही विश्रांती हवीच ना!`` केतननं अगदी काळजीनं सांगितलं.

``किती काळजी करतोस रे माझी!`` सोनाली डोळ्यांत अश्रू आणून म्हणाली. ``की असं करू?`` तिनं एकदम काहीतरी सुचल्यासारखं विचारलं.

``काय?``

``मी आईला भेटावं, असं वाटतंय ना तुला?``

``अर्थात!``

``मला विश्रांती मिळायला हवेय ना?``

``म्हणजे काय!``

``मग माझ्या आईलाच इकडे बोलावून घेते ना! बोरिवलीलाच तर राहते ती. मी तिच्याकडे गेले काय आणि ती माझ्याकडे आली काय, एकच ना! काळाबरोबर एवढं तरी बदलायला हवंच ना माणसानं?`` सोनालीनं बिनतोड सवाल केला आणि केतनचा चेहरा पाहण्यासारखा झाला.


- अभिजित पेंढारकर.


(क्रमशः)

Feb 6, 2017

सोनियाच्या ताटी!



असं म्हटलं जातं, की काही माणसं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात. (चमच्याचं माहीत नाही, पण सोन्याचं नाणं गिळणारी काही लहान मुलं मला माहीत आहेत. त्यानंतर ते नाणं त्यांच्या पोटातून (कुठल्याही वाटेने) बाहेर काढण्यासाठी डॉक्टरला सोन्यानं मढवण्याचं आमिष दाखवणारे त्यांचे आई-बापही मला माहीत आहेत. पण ते जाऊ दे!) तर काही माणसं त्यांचा पुनर्जन्म झाल्यानंतर तोंडात सोन्याचा चमचा धरायला लागतात. अर्थातच राजकारणात गेल्यानंतर त्यांचा पुनर्जन्म होत असतो आणि सोन्याचा चमचा तोंडात धरायला लागण्यासारखी परिस्थिती येण्याआधी त्यांना बऱ्याच जणांकडे चमचेगिरीसुद्धा करायला लागलेली असते.
राजकारणात वरिष्ठांकडून उमेदवारीचं टॉनिक मिळालं, की अनेकांना सोन्याचे दिवस येतात. कॉंग्रेसला सध्या सोन्याचे दिवस नसले, तरी त्यांचे वरिष्ठ नेते नुकतेच सोन्याच्या ताटातून जेवण करताना टीव्हीवर दिसून आले. त्याच्या क्लिप `व्हायरल` झाल्या. निवडणुकीच्या काळात व्हायरल होणाऱ्या अशा बातम्यांचा, फोटो-व्हिडिओंचा ताप हा व्हायरल फीवर पेक्षा जास्त डेंजरस असतो. मोठमोठ्या नेत्यांपर्यंत तो व्हायरल होण्याची शक्यता असते आणि त्यातून उमेदवारांच्या डोक्याला वेगळाच ताप होतो. बरं, जे सोन्याच्या ताटातून जेवण करत होते, ते होते साक्षात कॉंग्रेसचे निष्ठावंत पाईक, छोट्या पदापासून उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीपर्यंत पोहोचलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि नंतरचे `आदर्श` मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वगैरे वगैरे. (तसंही कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना गेली अनेक वर्षं `सोनिया`च्या ताटामुळेच जेवायला मिळत आहे, हे सगळ्यांनाच माहितेय.) एवढी महत्त्वाची बातमी म्हटल्यावर कुठल्यातरी उत्साही कार्यकर्त्याला वाटलं असणार, की एवढा `सोन्यासारखा` महाराष्ट्र घडवणाऱ्या मंडळींना या निवडणुकीच्या काळात आणखी फेमस करून टाकावं. त्यानं केले फोटो व्हायलरल. नतद्रष्ट मीडियावाल्यांनी त्याचाही बाऊ केला. धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या विरोधकांनी लगेच ही संधी साधून बोंबाबोंब केली. (त्यांना बिचाऱ्यांना प्लॅटिनमच्या ताटात जेवायला लागत असल्याची असूयाही त्यामागे असावी!) एवढी चर्चा झाल्यानंतर शेवटी अशोकराव चव्हाणांना खुलासा करावा लागला. त्यांनी खरं काय ते सांगून टाकलं. त्यांच्या मते हे कार्यकर्त्यानं घरी प्रेमानं वाढलेलं जेवण होतं. साहजिकच आहे, आता कार्यकर्त्याच्या आग्रहाला बळी पडणं, हा तर राजकीय नेत्यांचा धर्म आहे. आणि याच धर्माचं पालन ते सत्तेत असतानाही करत असतात. कार्यकर्ते म्हणा, बिल्डर म्हणा, उद्योगपती म्हणा, गावगुंड म्हणा, सगळ्यांचा आग्रह एवढा असतो, की कितीही ठरवलं, तरी त्यांचं प्रेम नाकारता येत नाही. या प्रेमाला काही नतद्रष्ट लोक भ्रष्टाचार, गैरव्यवहार, घोटाळे, `सत्तेचा माज,` अशा काहीतरी उपमा देतात.
तात्पर्य काय, की आजपासून सोन्याच्या ताटात जेवायला सुरुवात करा. बायको कटकट करायला लागली, तर तिला सांगून टाका, की तिच्या प्रेमापोटीच हे सगळं चाललंय!
ता. क. भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून तिकीटासाठी दोन लाख रुपये मागितल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झालाय म्हणे. कार्यकर्त्यांनी स्वतः प्रेम व्यक्त केलं नाही, तर नेते त्यांना ते व्यक्त करण्याची संधी आणि पर्याय उलपब्ध करून देतात, ते हे असे!
....

Feb 23, 2014

`स्वप्न` भारत निर्माणाचं....!

जागोजागी लागलेल्या पोस्टरवरचा दाढीचे खुंट वाढलेला तो चेहरा किशा एकटक पाहत उभा होता. त्याचा सखारामकाका ब-याच दिवसांनी गावात येणार होता. सखारामकाका मोठ्या शहरात जाऊन बरीच वर्षं झाली होती, पण किश्या मात्र गावातल्या शेतीतच रमला होता. अखेर बरीच वाट बघितल्यानंतर एकदाची एसटी आली. गावात दिवसभरात येणारी ही एकच एसटी. किशा काकाच्या दर्शनाकडे डोळे लावून बसला होता. पण एकेक करत सगळे प्रवासी उतरले, तरी काका दिसायला काही तयार नव्हता. काकानं चुकीचा दिवस कळवला, की त्याचीच बस चुकली, असा प्रश्न किश्याच्या मनात उभा राहिला. शेवटी सगळे प्रवासी उतरल्यानंतर ड्रायव्हरनं गाडी वळवायला घेतली, तेव्हा किशाला राहवेना. तो गाडीत चढला आणि अख्खी एस्टी त्यानं धुंडाळून पाहायला सुरुवात केली.

ड्रायव्हरच्या मागच्या आडव्या सीटपर्यंत किश्या आला, तेव्हा एका कोप-यात गलितगात्र अवस्थेत बसलेला एक देह त्याला दिसला. थोडंसं निरखून पाहिल्यावर हाच आपला सखारामकाका, हे ओळखायला त्याला वेळ लागला नाही.

``काका, अरे इथे काय बसून राहिलायंस? उतरला का नाहीस?'' किश्यानं विचारलं, तरी काका एक ना दोन. ढिम्म. काकाचं असं काय झालं, असा विचार करताना किश्याला लक्षात आलं, की काकाला एसटी बाधलेय. मुख्य म्हणजे, आपल्या गावातल्या रस्त्यावरचे खड्डे बाधलेत. मग कसाबसा हात धरून काका बसमधून खाली उतरला. ड्रायव्हर कंडक्टरचा खोळंबा झाल्याबद्दल शिव्या खायला लागल्या, ते वेगळंच.

याच गावात जन्माला आलेल्या, वाढलेल्या आपल्या काकाचं असं का व्हावं, हे किश्याला कळत नव्हतं. मग बैलगाडीतून घराकडे जात असताना किश्यानं काकाला बोलतं केलं.

जाताना वाटेत काकाला त्याच्या बालपणीचे हरी, गजाभाऊ, सोपानकाका वगैरे मित्र भेटले. सगळे डोक्यावरून कसल्यातरी मोठमोठ्या टोपल्या घेऊन निघाले होते.

``काय भाऊ, आज कुठे दौरा?`` सखाकाकानं सहज म्हणून विचारलं, पण तो प्रश्न त्या तिघांना जिव्हारी का लागला, हे काही त्याला कळलं नाही.

``कुठे म्हणजे? बाजाराला! इथून चार मैलावर आहे बाजार. रोज चालत जावं लागतंय एवढ्या टोपल्या डोक्यावर घेऊन, तेव्हा कुठे चार पैसे मिळतात!`` त्यांच्यातल्या एकानं सुनावलं.

``अरे? पण गेल्या दहा वर्षांत काहीच बदललं नाही?`` काकानं निरागसे विचारलं. त्यावर त्या तिघांनीही असा काही राग चेह-यावर आणला, की काकाला पुढचं काही विचारायला सुचलंच नाही. ते तिघंही आपल्या मार्गानं चालते झाले.

बैलगाडीची ही सफर खरंतर शहरात राहिलेल्या काकासाठी आनंददायी असायला हवी होती. शहरात गेल्यावर स्वतःच्या मुलांनाही कृषी पर्यटनात आवर्जून तो बैलगाडीत बसवत आला होता. पण ही सफर त्याला फारशी मानवत नसल्याचं जाणवत होतं. एकतर गावात येतानाच्या रस्त्यात एसटीमध्ये बसलेले दणके आता त्याच्या अंगप्रत्यंगातून बोलके झाले होते. गावातल्या या धुळीनं माखलेल्या रस्त्यावरचे खड्डे त्या जखमांवर मीठ चोळत होते.

``किश्या, अरे पक्का रस्ता कुठे गेला?`` शेवटी त्यानं न राहवून विचारलं.

``कुठला पक्का रस्ता?`` किश्या गोंधळून गेला होता.

``अरे, इथे पक्का रस्ता झाला नाहीये का अजून?``

``नाही!`` आपला काका असा का भंजाळलाय, हे किश्याला कळेनासं झालं होतं.

``म्हणजे? गेल्या दहा वर्षांत काहीच बदललं नाही का?`` काकाच्या या प्रश्नानं तर किश्याला हसावं की रडावं कळेना. काकाचं काहीतरी बिनसलंय, एवढं मात्र त्याच्या लक्षात येत होतं.

वाटेत कावडीनं पाणी नेणारे काही बाप्ये भेटले, डोक्यावरून हंड्यांची चवड घेऊन जाणा-या बायाबापड्या भेटल्या, त्यांनाही काकानं असेच काही प्रश्न विचारले. आपल्याच गावातला हा माणूस आपली चेष्टा का करतोय, असं त्यांना वाटलं आणि काकाचा रागही आला. शेवटी किश्यानं मध्यस्थी करून वेळ मारून नेली. आपल्याच गावात राहिलेल्या काकाला शहरात गेल्यावर नक्की झालंय काय, या शंकेनं किश्याचं मन कुरतडलं जाऊ लागलं होतं.

कसं बसं घर आलं. दमूनभागून आलेल्या काकानं लगेच पंखा लावायची आर्डर सोडली.

``काका, इथे दुपारी चार तास लाइट नसते!``किश्यानं खुलासा केला.

``काय? चार तास? मग तोपर्यंत काय करायचं? हा उकाडा कसा सहन होणार?`` काकाच्या या प्रश्नावर किश्यानं त्याच्याकडचा पुठ्ठा पुढे केला.

``हा घे घरगुती पंखा. आता उकाडा यानंच पळवायचा!``

काकाचा नाइलाज झाला. मग शेताचा फेरफटका झाला. पाण्यावाचून सुकून चाललेली शेती बघून काकाला वाईट वाटलं. काकाच्या इतर प्रश्नांपेक्षाही `गेल्या दहा वर्षांत काहीच बदललं नाही का,` या प्रश्नानं किश्या जास्त हैराण झाला होता.

``काय बदलणार होतं काका? हे दहा वर्षांत सगळं बदलल्याचं काय नाटक काढलंयंस तू?`` किश्यानं शेवटी वैतागून विचारलं.

``अरे, आमच्याकडे टीव्हीवर दर पाच मिनिटांनी ती भारत निर्माणची जाहिरात लागते. त्यात म्हणतात, की दहा वर्षांत खूप काही बदललं म्हणून. गावांची प्रगती झाली, सगली गावं समृद्ध झाली वगैरे दाखवतात त्याच्यात, मला वाटलं आपलंही गाव....!`` काकानं खुलासा केला.

``काका, त्या जाहिरातीत दाखवतात ना, ते तुझं स्वप्नच होतं असं समज. फारसं काही बदललेलं नाहीये, हेच खरं आहे.``

``मग नक्की बदललंय काय?``

``अरे, मंत्री बदलले, त्यांची खाती बदलली, त्यांनी केलेल्या गैरव्यवहारांची नावं बदलली, झालंच तर पक्षाचे नेतेसुद्धा बदलले...! अजून काय बदलायला हवं होतं तुला?``

किश्याच्या या सडेतोड उत्तरानंतर गप्प बसण्याशिवाय काकाला पर्याय नव्हता.

Jan 28, 2014

`हॅक` तिच्या!

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात दुःखं तरी किती असावीत! रस्त्यावरचा खड्डा चुकवावा लागला नाही, टीव्हीचे सगळे चॅनेल व्यवस्थित दिसले, बायकोनं एकही दिवस भांडण केलं नाही, बॉसनं फालतू कारणावरून झापलं नाही, असा एकही दिवस उगवत नाही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात!

गण्या हा असाच एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस. कुणाच्या अध्यात-मध्यात नसलेला. (थोडक्यात शक्यतो प्रत्येक बाबतीत मूग गिळून (किंवा शेपूट घालून!) गप्प बसणारा. गण्याची हौस मात्र दांडगी. प्रत्येक गोष्टीत त्याला फार इंटरेस्ट. प्रत्येक विषयात त्याचा जवळपास व्यासंग! अर्थात, अनुभव आणि निरीक्षणांतून आलेला. सीरियावर हल्ला होणार की नाही, याचं उत्तर आंतरराष्ट्रीय संबंधांमधला एखादा प्रकांडपंडित किंवा एखादा होराभूषणही देऊ शकणार नाही, पण गण्याला त्याचं उत्तर माहीत असतं. बराक ओबामांना ते जाणून घ्यावंसं वाटत नाही, हा त्यांचा करंटेपणा.

गण्याची सगळीकडेच फिरस्ती. तसा गण्या लहानपणापासूनच संवेदनशील. मनाचा हळवा. कांदा चिरतानाही त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं ते कांद्याच्या उग्रपणामुळे नव्हे, तर तो चिरला जातोय, याबद्दल गण्याच्या मनाला होणा-या यातनांमुळे.

अशाच दोन वेगवेगळ्या बातम्यांनी गण्याचा जीव अलिकडेच पुन्हा कासावीस झाला होता. पहिली बातमी होती ती आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या (उद्योगांच्या नव्हे!) आणि भारत-पाकिस्तान परराष्ट्र संबंधांना एक वेगळा आयाम देणा-या थोर अभिनेत्री (?) वीणा मलिक यांची. लग्नानंतर आता त्यांनी चित्रपट क्षेत्रातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. खरंतर एकतर लोक संन्यास संपल्यानंतर लग्न करतात किंवा लग्नाचा आणि संसाराचा कंटाळा आल्यानंतर अनेक वर्षांनी संन्यास घेतात. हा संन्यास चित्रपट क्षेत्रातल्या कारकिर्दीचा होता, हे गण्याच्या खूप उशिराने लक्षात आलं. तरी त्याचा जीव हेलावायचा तो हेलावलाच! आपल्या महान चित्रपटसृष्टीचं, टीव्ही चॅनेल्सवरच्या टॉक शोजचं आणि `बिग बॉस`सारख्या रिअलिटी शोजचं काय होणार, या गंभीर प्रश्नानं गण्याची रात्रीचीच काय, दुपारची झोपसुद्धा उडाली!

दुसरी बातमी आणखी गंभीर होती. भारतीय क्रिकेट संघाचं विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्यासाठीचं प्रेरणास्थान आणि तमाम भारतीय क्रिकेटरसिकांचं आशास्थान असलेल्या मॉडेल-कम-अभिनेत्री मा. पूनमजी पांडे यांची वेबसाईट हॅक झाल्याची खबर होती. ही अफवा नाही, तर साक्षात पूनमजींनी ट्विटरवरून जाहीर केलं होतं. (आता, त्यांचं ट्विटर अकाउंट कुणी हॅक करून पुन्हा ही अफवा कुणीतरी पसरवली होती की काय, कोण जाणे!) गण्याच्या पायाखालची वाळू सरकली. मा. पूनमजींची ही वेबसाईट रात्रंदिवस पाहताना (म्हणजे दिवसा कमी, रात्री जास्त!) गण्यानं इंटरनेटचं बिल भरमसाठ वाढवून घेतलं होतं! `नशा`सारख्या असंख्य चित्रपटांत त्यांनी केलेल्या कायिक अभिनयामागची सामाजिक आणि मनोवैज्ञानिक भूमिका वाचताना गण्याचं काळीज हेलावून गेलं होतं. ही अशी वेबसाईट हॅक झालेय, हा धक्काच गण्याला न झेपणारा होता. स्वतःची सख्खी बायको मित्राबरोबर पळून गेल्यानंतर जेवढा रडणार नाही, तेवढा गण्या त्या दिवशी रडला.

भारतासारख्या देशात कुठलीच गोष्ट सुरक्षित नाही, या भावनेपेक्षाही गण्याच्या मनातली दुसरी भीती जास्त गंभीर होती. भारतीय क्रिकेट संघानं वर्ल्ड कप जिंकला, तर (किमान एकदा तरी!) नैसर्गिक अवस्थेत फिरण्याची प्रेरणादायी घोषणा पूनमताईंनी केली होती. त्यानंतर भारतानं खरंच वर्ल्ड कप जिंकला. (हा योगायोग की खरंच स्फूर्ती, याबद्दल धोनीनं उत्तर देणं टाळलं म्हणे!) पण दुर्दैवानं पोलिसांच्या आणि कायद्याच्या दबावामुळे पूनमताईंना त्यांची (आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची) मनोकामना पूर्ण करता आली नाही. मा. पूनमजी कधी ना कधी त्यांचा शब्द पाळतील, या एकमेव आशेवर गण्या जगतोय. पण कालच्या ताज्या बातमीमुळे, त्यावेळची ती घोषणा नक्की पूनमजींनीच केली होती, की त्यांची साईट/ट्विटर अकाउंट हॅक करून आणखी कुणी हा चहाटळपणा केला होता, याबद्दल गण्याचा गोंधळ उडालाय!

....


Oct 20, 2009

निकालाआधीची दिवाळी!

सामान्यांची, सर्वसामान्यांची, अतिसामान्यांची आणि असामान्यांची दिवाळी असते, तशीच राजकीय नेत्यांनाही दिवाळी असतेच की! त्यांच्या घरीही गोडधोड पदार्थ होतात, वेगवेगळे फराळाचे प्रकार केले जातात, आप्तेष्ट-नातेवाइकांना निमंत्रणं धाडली जातात, अगदी आनंदाचा महोत्सव असतो म्हणा ना! हां. इतरांपेक्षा राजकारण्यांची दिवाळी वेगळी म्हणायची ती या अर्थानं, की दिवाळीच्या आगचे-मागचे वातावरण कसे आहे, यावर बरंच काही अवलंबून असतं. सध्याचे त्यांचे ग्रहमान, पक्षश्रेष्ठींची मर्जी, सध्या असलेली जबाबदारी, येऊ घातलेली संकटं, विरोधकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, या सगळ्यावर त्यांच्या दिवाळीचा "मूड' ठरत असतो. अशा या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळीत त्यांचे फटाकेही एकदम जगावेगळे असणारच की नाही? पाहूया, त्यांची एक झलक..

1) आपटीबार ः हा फटाका दलित चळवळीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांच्यासाठी. रिपब्लिकन ऐक्‍याची त्यांनी दिलेली ही एकशेत्रेसष्टावी हाळी. या वेळी ऐक्‍य होणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघच मानली जात होती; पण ज्या खडूनं ही रेख मारायला आठवले निघाले होते, त्या खडूच्या निर्मितीतच काहीतरी भ्रष्टाचार झाला असावा. कारण ही रेघच मुळात पुसट आखली गेली. त्यामुळं ती पुसण्यासाठी इतरांना फारसे कष्ट करावे लागले नाहीत. शिवाय, तो काळा दगडदेखील आठवले ज्यांना सध्या जाहीर विरोध करताहेत, त्यांनीच पुरवलेला होता, अशीही कुजबुज ऐकू येऊ लागली.
असो. तर या फटाक्‍याचं वैशिष्ट्य असं, की बाहेरून वाटतो हा मोठा शक्तिशाली फटाका. पाहताक्षणी कुणाच्या डोळ्यात भरावा आणि कुणालाही आकर्षण वाटावं असा. अनेक वाती आणि अनेक प्रकारचे दारूगोळे एकत्र येऊन बनलेला; पण तो पेटवायच्या आधीच एकेक वाती निखळत जातात. काही आधीच फुसक्‍या होत्या, हे नंतर लक्षात येतं. ठासून भरलेल्या दारूगोळ्यातही फारसा दम नाही, हे फटाका पेटवल्यानंतरच लक्षात येतं. मोठ्या आवाजाचं चित्र फटाक्‍याच्या अंगावर असलं, तरी प्रत्यक्षात फुसका आवाज करून हा फटाका विझून जातो.

2) ट्रेन ः "ट्रेन' किंवा दोरीवरून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सुर्रर्रर्रऽऽऽऽ करत जाणारा हा फटाका खास बंडखोर आणि अपक्षांसाठी. तो सुरू कुठे होणार, हे आपल्याला माहीत असतं, पण संपणार कुठे, हे कुणीच आधी सांगू शकत नाही. एका टोकावरून जो वात पेटवून देईल, त्याच्याच बाजूला तो फटाका परत येईल, याची अजिबात खात्री नसते. कदाचित तो दुसऱ्या टोकाला जाऊन पुन्हा पहिल्या टोकाला येऊ शकतो, किंवा आल्याची हूल देऊन तिकडेच थांबूही शकतो. कधीकधी तर वात शिल्लक असताना आणि आत दारूही भरपूर असताना तो दोरीच्या मध्यभागीच एकाएकी विझूनही जाऊ शकतो. तर एखाद प्रसंगी वात पेटवणाऱ्याच्याच अंगावर उडी मारून त्याला भाजण्याची गंभीर धोकाही असतो!

3) अग्निबाण (रॉकेट) ः हा फटाका खास राज ठाकरेंसाठी. या फटाक्‍याचं वैशिष्ट्यं असं, की त्याला जशी दिशा द्याल, त्या प्रमाणात तो विध्वंस घडवतो. कधी या गोटात खळबळ उडवेल, तर कधी त्या गोटात. काही सांगता येत नाही! बाटलीत जरी हा बाण लावला, तरी तो सरळ जाईलच, याचा नेम नसतो. सुईईईऽऽऽऽ असा त्याचा शिट्टीसारखा आवाज आणि जोरदार अग्निवर्षाव पाहून कुणालाही त्याविषयी आकर्षण वाटतंच. तो फार मोठा स्फोट वगैरे घडवत नाही. तरीही, प्रतिस्पर्ध्याच्या गोटात अस्वस्थता आणि चिंता निर्माण करण्याएवढा परिणाम नक्कीच साधतो. बाटली वाकडी करून लावली, तर तो कुणाच्याही खिडकीतून एखाद्याच्या घरात अग्निकांड घडवू शकतो, तर कधी कुणाला बेसावध गाठून त्याला नामोहरम करू शकतो. लावणाऱ्याला मात्र या अग्निबाणाचा काही अपाय झाल्याचा अनुभव आत्तापर्यंत तरी नाही!

4) लवंगी ः अतिशय आकर्षक वेष्टनात आणि दणदणीत आवाजाच्या स्टीकरसह बनवलेली ही लवंगी फटाक्‍यांची माळ आपले सर्वांचे लाडके नेते कोकणसम्राट नारायण राणेंसाठी! ही माळ अतिशय बेरकी, हुशार. आपली नक्की ताकद किती आहे, याचा अंदाज कुणाला येऊ द्यायची नाही. त्यामुळे सुरवातीला तिच्यावरचे स्टीकर पाहून आणि तिच्या वेष्टनाचा आकार पाहूनच भलेभले दचकतात; पण प्रत्यक्षात तसं घाबरण्याचं कारण नाही बरं! कारण आधी दणदणीत आवाज केला, तरी नंतर ही माळ फुसकी निघू शकते. कधी कधी तर वेष्टन बदलून अगदी सस्त्यातही खपवलेली गेलेली पाहिलेय म्हणे अनेकांनी तिला!

5) फुलबाजे ः मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेले समस्त नेते उदा. पतंगराव कदम, रोहिदास पाटील, अजित पवार, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदींसाठीचं हे विशेष उत्पादन. फारसं धोकादायक नाही, तरीही छान तडतडणारं आणि भरपूर प्रकाश व आनंद देणारं. फटाके उडविल्याचंही समाधान आणि कुणाला नुकसान न केल्याचंही. यानं दुसऱ्या कुणाला त्रास होण्याची शक्‍यताच नाही. उलट, कधीकधी याच फुलबाज्यानं दुसऱ्या मोठ्या फटाक्‍यांची वात लावून देऊन त्यांना उडण्यासाठी आणि भरपूर आवाज करण्यासाठी देखील मदत करता येते. अशी मदत झाली तरी ठीक, नाही झाली, तरी उत्तम! फुलबाजे उडविण्यातली गंमत काही कमी होत नाही. आहे की नाही खरी गमतीदार वस्तू?

यंदाच्या दिवाळीत या फटाक्‍यांच्या खरेदीला भरपूर गर्दी झाल्याची चर्चा आहे; पण ग्यानबाची मेख खरी पुढेच आहे बरं का! हे फटाके यंदा ज्या रंगाचे, ज्या रूपाचे आणि गुणधर्माचे आहेत, तसेच पुढील वर्षी राहतील, अशी खात्री नाही बरं का! तेव्हा यंदा असे दिसताहेत म्हणून खरेदी करून पुढल्या वर्षासाठी राखून ठेवाल, तर नक्की पस्तावाल, एवढं लक्षात ठेवा!!

Jun 8, 2009

महिलाराज!

कामातून जरा निवांत वेळ काढून शरद यादव आज सकाळीच पाटण्यात फेरफटका मारायला निघाले होते. नितीशकुमार मुख्यमंत्री झाल्यापासून यादव तसे जरा अलिप्तच वागत होते. कुणी त्याला पक्षांतर्गत मतभेद म्हटलं, कुणी मत्सराचं नाव दिलं, तर कुणी "नेतृत्वाला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा मोठेपणा' असं नाव दिलं. काहीही असो, पूर्वीच्या जनता दलाच्या काळात शरद यादव या नावाला जे वजन होतं, ते आता राहिलं नव्हतं, हे मात्र खरं.
यादवांना आज जरा लोकांची मनं जाणून घ्यायची होती. "लालूराज' संपल्याच्या खुणा पाहायच्या होत्या. नव्या सुशासनाचा सुनियोजित कारभार स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवायचा होता. लोकसभेच्या प्रचाराच्या धामधुमीत त्याकडे लक्ष द्यायला जमलं नव्हतं. त्यातून त्यांच्याच पक्षातल्या फर्नांडिसांनी बंडाचं निशाण रोवून पक्षाच्या नाकीनऊ आणलं होतं. त्यांना निवृत्तीच्या वाटेला लावण्याची मोठी जबाबदारी यादवांनी पार पाडली होती. त्यामुळं त्यांना आता हायसं वाटत होतं.
बाजारपेठेतून चक्कर मारता मारता त्यांच्या असं लक्षात आलं, की काही वर्षांपूर्वीचं दहशतीचं सावट कुठच्या कुठं पळून गेलंय. नियमित व्यवहार सुरू आहेत. मुलं एकमेकांचा हात धरून शाळेत एकटी निघाली आहेत. आवश्‍यक तिथं पोलिसांचा पहारा आहे.
"चला, संयुक्त जनता दलाच्या राज्यात तरी गुन्हेगारी संपली, हे एक बरं झालं!' यादवांनी समाधानाचा सुस्कारा टाकला. पण जसजसे ते पुढे जाऊ लागले, तसतसं त्यांना वातावरण काहीसं वेगळं जाणवू लागलं. दुकानात सगळीकडे बायकाच वस्तू विक्री करीत होत्या. किराणा मालाच्या दुकानापासून मॉलपर्यंत आणि पार्लरपासून हार्डवेअरपर्यंत, सगळीकडे बायकाच बायका! सायकल आणि स्टोव्ह रिपेअरिंगसाठीही बायकाच होत्या!
काहीतरी गडबड आहे की काय, याची शहानिशा करायला यादव पोलिस ठाण्यात गेले, तर तिकडेही सगळ्या बायकाच! अस्वस्थ होऊन यादव बाहेर आले. बिहार बदललाय, अशी चर्चा त्यांनी ऐकली होती; पण सगळीकडे बायकांचं राज्य असण्याइतपत परिस्थिती आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. तरतरत ते तसेच घराकडे निघाले. सोबतच्या कार्यकर्त्यांची मागून पळताना दमछाक झाली.
काही निष्ठावंत लगेच घरी दाखल झाले. यादव घामाघूम होऊन घरी पोचले. सकाळच्या फेरफटक्‍याचा प्रसन्न मूड कुठच्या कुठं पळून गेला होता. आता काय बोलावं नि करावं, कुणालाच सुचत नव्हतं. कुणी त्यांना थंड पाणी दिलं, कुणी कोल्ड्रिंक आणून दिलं. कुणी सरबताचा पेला पुढे केला. कुणी फॅनचा स्पीड वाढवला. यादवांचं कशातच लक्ष नव्हतं.
""मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसात फोन लावा!'' यादव कडाडले.
लगेच फोन लावण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू झाली. पण प्रयत्न करूनही फोन लागेना, तसे यादव आणखी अस्वस्थ झाले. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर फोन लागला.
""मी शरद यादवांकडून बोलतोय. साहेबांना सीएमशी बोलायचंय!'' कार्यकर्त्यानं प्रस्तावना केली.
सीएमनी फोन घेतला. यादवांनी त्या कार्यकर्त्याकडून रिसीव्हर जवळपास ओढूनच घेतला.
""बोला!'' पलीकडून कुण्या महिलेचा आवाज आला.
""सीएम आहेत का? मला त्यांच्याशीच बोलायचंय.'' यादव गुश्‍श्‍यात म्हणाले.
""मी सीएमच बोलतेय.'' पलीकडून आवाज आला.
""अहो, काय चेष्टा करताय? तुम्ही नितीशकुमारांना फोन देता का?''
""नितीशजी आता सीएम नाहीत. त्यांनी मला सीएम केलंय. मी त्यांची पत्नी!'' फोनवरून खुलासा झाला.
यादवांच्या हातून रिसीव्हर गळूनच पडला. म्हणजे? नितीशकुमारांनी पण लालूंच्याच पावलावर पाऊल ठेवून बायकोला वारसदार केलं की काय? पक्षातल्या इतर नेत्यांना काही किंमतच नाही? या महिला एवढ्या डोईजड कशा झाल्या? महिला आरक्षण विधेयकामुळे?
""नाही नाही! मी हे होऊ देणार नाही! महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झालं, तर मी सभागृहात विष प्राशन करेन!'' यादव गरजले.
त्याच क्षणी त्यांची तंद्री भंगली. आपण घरी नाही, तर संसदेत आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं. "मघाचं सगळं स्वप्न होतं तर!' ते मनाशी म्हणाले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती...

May 31, 2009

स्टॅलिनशाही!

चेन्नईतल्या आपल्या निवासस्थानी करुणानिधी ऐटीत आपल्या सिंहासनावर बसले होते. पक्षाच्या आमदार-खासदारांची गर्दी झाली होती. करुणानिधींच्या सिंहासनाच्या डावीकडे होते त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अळगिरी. त्यापलीकडे नातू दयानिधी मारन. उजवीकडच्या बाजूला पहिल्याच खुर्चीत होते त्यांचे दुसरे पुत्र स्टॅलिन. पलीकडे मुलगी कनिमुरी.
सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत होते. विषय गंभीर होता. काही झालं तरी तमीळ अस्मितेचा प्रश्‍न होता! तमिळनाडूच्या जनतेनं टाकलेल्या विश्‍वासाला पात्र ठरतील असेच प्रतिनिधी दिल्लीत पाठवणं आवश्‍यक होतं. करुणानिधींनी एकेकाला मत विचारायला सुरवात केली. पण कुणीच काही बोलायला तयार नव्हतं. पक्ष ठरवेल ते धोरण स्वीकारण्याची त्यांची तयारी होती. गेल्या वेळी "नापास' ठरवलेल्या टी. आर. बालू या विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षेला बसण्याची इच्छा होती, पण दिल्लीतल्या हेडमास्तरांनीच त्याचं नाव नाकारल्यानं त्याचा इलाज चालत नव्हता. त्यानं एकदा चोरून हात वर करण्याचा प्रयत्न केला, पण करुणानिधींनी गॉगलआडच्या डोळ्यांनीच त्याला दटावलं. बालू आपला पुन्हा शहाण्या "बाळू'सारखे...आपलं.. बाळासारखे गप्प बसले.

कुणाचीच इच्छा नाही असं दिसल्यावर करुणानिधींनी पुन्हा एकदा सर्वांना संधी द्यायचं ठरवलं. तरीही कुणी हात वर करायला तयार होईना. ""ठीक आहे. कुणाचीच तयारी नसेल केंद्रात जायची, तर मला पक्षाचा प्रमुख म्हणून काहीतरी भूमिका घ्यावीच लागेल. दयानिधी गेल्या वेळीही सरकारमध्ये होता. तो केवळ माझा नातू म्हणून नव्हे, तर एक नेता म्हणून महत्त्वाचा आहे. त्याला यावेळीही केंद्रात पाठवू.'' करुणानिधी म्हणाले.
सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला.

""दूरसंचार क्षेत्रातली नवी क्रांती आमच्या पिढीला काही झेपत नाही. तिथे नव्या दमाचे लोक हवेत. आपण ए. राजाला पाठवू. चालेल?''
सगळ्यांनी पुन्हा गजर केला.

""आता अजून एक कॅबिनेट शिल्लक आहे. आहे का कुणाची इच्छा?'' करुणानिधींनी चौफेर नजर टाकली.
कुणाचाच आवाज आला नाही.

""ठीक आहे. पुन्हा एकदा मलाच हा निर्णय घ्यायला हवा. बाळ, तुला आहे का इच्छा केंद्रात जायची?'' करुणानिधींनी स्टॅलिनला विचारलं.
""नाही बाबा. मी राज्यातल्याच जनतेची सेवा करणार. मला पदबिद नको.''
""बरं. मग बाळ अळगिरी, तू दादा ना? जाशील का तू दिल्लीत?''
""ठीक आहे बाबा. जशी तुमची आज्ञा.'' अळगिरीनं नम्रतेनं होकार भरला.
""बाबा, मी पण जाणार दादाबरोबर!'' पलीकडे बसलेली कनिमुरी एकदम ओरडली.
""थांब. एकेकाला पाठवू आपण. तुला पण पाठवू हां पुढच्या वेळी!'' करुणानिधींनी समजूत काढली.
""बाबा, दादा केंद्रात जाणार असेल, तर तुम्हाला इथे एकटं एकटं होईल. शिवाय तुमची तब्येतही बरी नसते हल्ली. तुम्हाला मदत करायची इच्छा आहे माझी.'' स्टॅलिन करुणानिधींचं उपरणं खेचत म्हणाला.
""असं म्हणतोस? राज्याच्या कारभारात मलाही कुणाची तरी मदत हवीच आहे. मग उपमुख्यमंत्री होतोस का तू?''
""चालेल बाबा!''
""ठीक आहे. ठरलं तर. चला, सगळे निर्णय लोकशाहीनं झाले, हे एक बरं झालं!'' करुणानिधींनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आणि सगळे नेते पांगले.

Feb 18, 2009

`राजा' माणूस!

काही माणसांचं वैशिष्ट्यच असं असतं, की ती थेट काळजात घुसतात। सर्वार्थानं ती परिपूर्ण असतात, किंवा आदर्श असतात असं मुळीच नाही. पण त्यांच्यातला एखादाच गुण एवढा जोरकस असतो, की रूढ अर्थानं असलेले इतर दुर्गुण त्यापुढे झक् मारतात!

राजा रेवाळे हा आमचा असाच एक कॉलेजमधला मित्र। अकरावीत प्रवेश घेतल्यापासून सगळं जगच बदललं होतं. एकतर शाळेतली शिस्त, नियमित अभ्यास, घरच्यांचा धाक, कायमचं लक्ष, या सगळ्यातून स्वातंत्र्याचा अनुभव घेत होतो. परिणाम व्हायचा तोच झाला. शाळेत दहावीपर्यंत कधी स्वाध्यायात सुद्धा नापास झालेल्या मला अकरावीतल्या पहिल्याच चाचणी परीक्षेत पंचवीसपैकी एक, दोन असे गुण मिळायला लागले. अकरावी कशीबशी काढली आणि बारावीत चक्क नापास झालो. पुन्हा बारावी परीक्षा द्यायची ठरवली, तीपण सगळे विषय घेऊन. मी मेडिकलला वगैरे जाणार, अशी आशा घरच्यांना आणि मला तेव्हाही होती! म्हणूनच "ग्रुप'मध्ये चांगली टक्केवारी मिळवण्यासाठी सगळे विषय घेऊन पुन्हा बसण्याची खुमखुमी होती.

वाईटातून काही चांगलं होत असतं म्हणतात। राजा रेवाळेचा आणि माझा परिचय याच वर्षी झाला. आधी केवळ चेहरा ओळखीचा होता, पण थेट संबंध आला नव्हता. तोही असाच बारावीत पहिल्या वर्षी गटांगळी खाऊन माझ्या जोडीला पुन्हा सर्व विषय घेऊन बारावीला बसला होता. मग आम्ही दीडशहाण्या रिपीटर्सची टीमच जमली! सगळे विषय आम्हाला आधीच कळलेत, आता फक्त उरलेय ती उजळणी, असाच आमचा पवित्रा असायचा. त्यामुळं वर्गात पुन्हा तेच विषय "समजून' घेण्याची आम्हाला काहीच गरज नव्हती! मग कुठे कॉलेजच्या गेटबाहेर उभं राहून पोरींची टवाळी कर, कधी ग्राऊंडवर टाइमपास कर, असे उद्योग चालायचे.

पुलंच्या "रावसाहेब'मध्ये सगळ्यात जास्त दंगा रावसाहेबांचा असे, तसाच दंगा आमच्या ग्रुपमध्ये "राजा' करायचा। त्याची विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा अफाट होता. विनोदाला फार काही दर्जाबिर्जा होता, असं नव्हे. पण कॉलेजातल्या टिंगलटवाळ्यांमध्ये तो अव्वल होता. वर्गात कधीमधी चुकून बसलोच, तर सर काहीतरी शिकवत असताना राजाच्या एखाद्या कॉमेंटवरून जी खुसपूस व्हायची, ती सरांच्या नजरेतून न सुटणारी असायची. मग एकेकाला वर्गाच्या बाहेर तरी जावं लागायचं, किंवा ओरडा खायला लागायचा. बरं, एवढं करून हा नामानिराळाच राहायचा.

राजाला उगाच डिवचणं आणि त्याच्याकडून शब्दांचा यथेच्छ मार खाणं, हे भाग्याचं लक्षण होतं। काही जण मात्र नकळत त्याच्या शेपटीवर पाय द्यायचे आणि मग आठ दिवस त्यांना तोंड दाखवायला जागा उरायची नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी ऐकून असलेल्या एका नवख्या पोरानं असंच एकदा राजाला डिवचलं.... "काय राजा, लग्न केलंस म्हणे! 'एखाद्यानं काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं असतं.

राजा लगेचच म्हणाला। "म्हंजे काय? तुला माहित नाही? पोरगं पण झालं! घरी ये, "खरवस' खायला! 'आता, एखाद्याला हा विनोद अश्लील, दर्जाहीन वगैरे वाटू शकेल. पण त्यावेळी आम्ही गडबडा लोळलो होतो.मुलींशी बोलण्याची त्या काळात चोरी होती. कॉलेजात असलो, तरी आमचे मुला-मुलींचे ग्रुप वगैरे नव्हते. ग्रुप म्हणजे एकतर मुलांचा, किंवा मुलींचा. वेगवेगळा. एखादा मुलगा गॅलरीत मुलीशी बोलताना दिसला, की त्या प्रक्रियेला आमच्या शब्दकोषात "गूळ पाडणे' असं नाव होतं. मग एखादा मुलगा जास्तच चिकटलेला दिसला, की आम्ही त्याच्या समोरच्या गॅलरीत किंवा काही अंतर राखून जवळ उभे राहून पाठीवरून गुळाची पोती भरून नेल्याची ऍक्शन करायचो. तो तिच्याशी गुलुगुलू करून परत आला, की राजा त्याला हळूच म्हणायचा. "जपून रे! डायबेटिस होईल! ' नवखा असला, तर त्या बिचाऱ्याला काहीच कळायचं नाही.

"नेचर क्लब'च्या नावाखाली आम्ही भटकंतीला जायचो, तेव्हा गणपतीपुळ्याच्या एका ट्रेकदरम्यान तो नदी पार करताना खोल पाण्यात जाऊन बुडायला लागला होता। दोघातिघांनी हात दिल्यावर सावरला. तेव्हाची त्याची अवस्थाही पाहण्यासारखी होती. नंतर स्वतःवरच विनोद वगैरे करून त्यानं त्या घटनेचंही बरंच भांडवल केलं.कॉलेजच्या गॅदरिंगलाही हवालदाराचं सोंग आणून त्यानं धुमाकूळ घातला होता. मी त्या वेळी "बाई' झालो होतो आणि राजाच्या जोडीनं हास्याचे फवारे उडविण्याचा अल्पसा प्रयत्न केला होता.

नंतर टी। वाय. पर्यंत आम्ही एकत्र होतो, पण आमचे विषय वेगवेगळे होते. कधीतरी ट्रेकला एकत्र भेटायचो किंवा कॉलेजच्या मधल्या सुटीतही. तेवढ्यापुरती मजा यायची. पण बारावीएवढी धमाल नंतर कधी केली नाही.कॉलेजातली मैत्री वर्ष संपता संपता कशी संपते, ते कधीच कळत नाही. मीदेखील रत्नागिरीतून शिक्षणासाठी (? ) पुण्यात आलो आणि राजाशी काहीच संपर्क राहिला नाही. आता तर तो काय करतो, याचाही मला पत्ता नाही. रत्नागिरीत गेल्यावर शोधून काढणं अवघड नाही, हे जेवढं खरं, तेवढंच जुन्या गोड आठवणींना आता वरकरणीच्या औपचारिक गाठीभेटींची पुटं चढवलेली पाहवत नाहीत, हेही!

Oct 13, 2008

कुणाची गं तू?

अंगावर फाटक्‍या तुटक्‍या कपड्यांनिशी मुंबई स्वर्गाच्या दारात उभी होती। एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, वसंत बापट प्रभृतींची भेट तिला घ्यायची होती. चित्रगुप्तानं बऱ्याच रखडंपट्टीनंतर मुंबईला आत प्रवेश दिला. एसेम, अत्रे, बापटांसह संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांसमोर मुंबई जाऊन उभी ठाकली. सगळ्या नेत्यांना थोडंसं आश्‍चर्य वाटलं, पण त्यांना हे फार अनपेक्षित नव्हतं. कधी ना कधी मुंबई आपल्याकडेच गाऱ्हाणं घेऊन येणार, याची त्यांना खात्री होती.

मुंबईच्या या अनपेक्षित आगमनानं सगळे नेते किंचित चिंतेत पडले। "गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाही, एवढी दुरवस्था मुंबईची झाली आहे. तिला नरकयातना भोगायला लावणाऱ्यांना संडास साफ करायला लावलं पाहिजे, नरकातही त्यांना जागा दिली जाऊ नये,' असं भाषणच त्यांनी संतप्त अवस्थेत ठोकलं. "जाहला न इतुका अवमान कधी, जाळली का यासाठीच आयुष्यें आम्ही' अशा स्वरूपाची कविता बापटांनी तत्काळ रचून गाऊन दाखवली. एसेम नेहमीप्रमाणे धीरगंभीर होते.परप्रांतीयांनी केलेलं आक्रमण, आपल्याच माणसांनी दलालांच्या हाती सोपवून शहराची केलेली माती, वाढतं प्रदूषण, गजबजाट, अस्वच्छता, गुन्हेगारी याबद्दलच मुंबईला गाऱ्हाणं मांडायचं असावं, अशी या सर्व नेत्यांना खात्री होती. "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,' ही घोषणा आपण का दिली आणि त्यातल्या "च'ला किती महत्त्व होतं, याची आठवण अत्र्यांनी पुन्हा एकदा करून दिली. हे करताना यशवंतराव चव्हाणांकडे जाणीवपूर्वक कटाक्ष टाकला. यशवंतराव आपल्या पेटीतून महाराष्ट्राचा मंगल कलश काढून त्याला पॉलिश करण्यात गुंगले होते. त्यांनी अत्र्यांकडे विशेष लक्ष दिलं नाही.

मुंबईचं खरं गाऱ्हाणं ऐकून घ्यायलाच कुणी तयार नव्हतं। खुद्द महाराष्ट्रात जी स्थिती भोगत आहोत, तीच संयुक्त महाराष्ट्राच्या अध्वर्यूंच्या दारी आल्यावरही अनुभवायला मिळावी, याचं तिला विलक्षण वैषम्य वाटलं. ती रडवेली झालेली पाहून सगळ्या नेत्यांना दया आली. आपण समजतो तसं नाही. मुंबईचं दुःख वेगळंच आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी आपापल्या भूमिका आणि मतभेद बाजूला ठेवून मुंबईला बोलण्याची संधी दिली.
"संयुक्त महाराष्ट्राच्या पदरात माझं कन्यादान करणाऱ्या माझ्या आदरणीय पित्यांनो, मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन. पण आता सध्याच्या राज्यकर्त्यांनी जो तमाशा मांडलाय, तो तुम्हाला कळला, तर तुमच्याच कामगिरीची तुम्हाला कीव येईल...'' मुंबई मुसमुसत म्हणाली
``काय झालं, काय झालं?'' सगळे चिंताक्रांत झाले
``खुद्द माझ्या पित्याच्या चारित्र्याविषयीच संशय घेतला जात आहे.''
``कोण आहे तो हरामखोर?'' अत्रे गरजले.
``सांगते, सांगते....आधी एका पोलिस अधिकाऱ्यानं माझ्या वडिलांविषयी संशय घेतला। मी कुणाच्याच `बापा'ची नाही, असे ते म्हणाले। आतापर्यंतचे राज्यकर्ते मला कायमच सावत्रपणाची वागणूक देत आले। त्यात या अधिकाऱ्यानं मी अनौरस असल्याचंच सांगून मला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही...'' मुंबई स्फुंदून स्फुंदून रडू लागली.
एसेमनाही गलबलून आलं.
``माझ्यावर कायमच प्रेम करणारे एक आजोबा मला धीर देतील, असं वाटलं होतं. पण त्यांच्याशी भांडण असलेल्या त्यांच्या पुतण्यानं मला आधार दिला. "रस्त्यावर उतरा, म्हणजे मुंबई कुणाच्या बापाची आहे हे कळेल,' असं त्या अधिकाऱ्याला सुनावलं. नंतर आमच्या या आजोबांचा दसरा मेळावा झाला. ते आता थकल्यामुळं त्यांच्या मुलानंच "मुंबई आमच्या "बापा'ची' असं जाहीर करून टाकलं.''
``हे बरं झालं। कुणीतरी न्याय दिला ना?'' बापटांनी सुस्कारा सोडला.''
``ते झालं हो, पण आता मलाच प्रश्‍न पडलाय ना, मी नक्की कुणाची ते!'' मुंबईच्या या प्रश्‍नावर सगळेच निरुत्तर झाले.
---------

Oct 7, 2008

सौजन्याची ऐशी तैशी

खादीच्या कपड्यावर असलेल्या सवलतीचा फायदा घेऊन भरपूर खरेदी करून आपण महात्मा गांधींचं स्मरण दरवर्षी करत असतो. ही झाली सर्वसामान्यांची पद्धत. मोठ्या लोकांचं सगळंच निराळं असतं. आता हेच बघा ना...ज्येष्ठ समाजसुधारक अंबुमणी रामदास (स्वामी) यांनी यंदाच्या गांधी जयंतीचं निमित्त साधून भारतातील समस्त मानवजातीला सिगारेटच्या व्यसनापासून वाचविण्याचा विडा उचलला. (खरं तर "विडा' हेही व्यसनच. पण ते असो!) तसंच आपल्या राजकीय नेत्यांनी सौजन्य सप्ताह पाळायचं ठरवलं.

वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका, हा गांधीजींचा संदेश. आपल्या धुरंधर राजकारण्यांनी त्यात थोडं "इम्प्रोवायझेशन' करून "वाईट करू नका आणि केलेलं निस्तरून टाका,' ही नवी शिकवण अंगी बाणवली। जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भावी अध्वर्यू अजितदादा पवार यांनी साताऱ्यात जाऊन कॉंग्रेसच्या एका बड्या मंत्र्यावर आणि अन्य काही नेत्यांवरही टीका केली। दुसऱ्या दिवशी गांधी जयंतीचा संकल्प आठवल्यावर त्याबद्दल खुलासा करून टाकला.

मुलायमसिंह यांनी जुने वैर विसरून सोनिया गांधींची विमानतळावरच धावती (की उडती?) भेट घेतली. अमरसिंहांनी नारायण राणेंची भेट घेतली. ही भेट "बिझनेस'संबंधी होती असं जाहीर झालं असलं, तरी ती राजकीय "धंदा' चालविण्याच्या दृष्टीनेची चाचपणी होती, अशी अफवा आहे।

पुण्यात पत्रकारांच्या अधिवेशनात शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे एकत्र आले। त्यांचाही कलगीतुरा रंगला, पण सौजन्यपूर्ण वातावरणात। पवारांनी राणेंना पुढील वेळी मुंडेंना सोबत घेऊन जाण्याचा सल्ला देऊन टाकला। मुंडेंनीही राणे, पवारांना कोपरखळ्या मारल्या, पण गोडीगोडीनं....आणि या सौजन्य सप्ताहाचा समारोप झाला तो थाटामाटात, वाजतगाजत आणि कुणीही कधीही अपेक्षा केली नव्हती, अशा घटनेनं. छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंवरील खटला मागे घेऊन आपली लढाई संपल्याचंही जाहीर करून टाकलं! उद्धव ठाकरेंसोबत त्यांची बैठकही झाली. लखोबा, टी. बाळू, अशा सर्व विशेषणं गोदावरीत विसर्जित झाली.

या सर्व घटनांत अर्थातच कोणाचाही स्वार्थ, राजकीय फायदा नव्हता। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांशी या घडामोडींचा संबंध जोडणाऱ्याला नतद्रष्टच म्हणावं लागेल. गांधी जयंतीनिमित्तानं पाळलेल्या सौजन्य सप्ताहाच्या यशस्वितेसाठी प्रत्येक नेत्यानं आपापल्या परीनं टाकलेली ती भर होती. प्रत्येकानं यथाशक्ती त्यासाठी मदत केली.मुख्य प्रश्‍न पुढे आहे. गांधी जयंतीनिमित्त या सर्वांनी अहिंसेचा, प्रेमाचा, वसुधैव कुटुंबकम्‌ चा संदेश बिंदेश दिला हे ठीक आहे! पण पुढच्या आठवड्यात रावणदहन आहे आणि त्यानंतर नरक चतुर्दशी! एरव्ही वर्षभर हा मुहूर्त साधणाऱ्या या नेत्यांवरची जबाबदारी आता वाढली आहे

---

Jul 29, 2008

सनई-चौघडे

स्वतःचं लग्न स्वतः ठरविण्याचा आणि जुळवून आणण्याचा उपद्‌व्याप पाच वर्षांपूर्वी केला होताच। आता दुसऱ्यांची लग्नं जुळवण्याचा प्रयत्न करून पाहायचं होतं। आपण काही पु।लं।चा "नारायण' नाही, पण लोकांना निदान दिशा तरी दाखवता येईल, असं वाटत होतं। साथ-साथ विवाह अभ्यास मंडळाच्या विवाहेच्छूंच्या मेळाव्याच्या निमित्तानं ती संधीही गेल्या रविवारी, 27 तारखेला मिळाली।

`साथ-साथ'च्या नवीन रचनेत कार्यक्रमही बदलले होते। वधु-वर मेळाव्यासारखा कार्यक्रम घेणार काय, असं मला विचारण्यात आलं, तेव्हा झटकन "हो' म्हणून टाकलं। एकतर स्वतःचं सूत्रसंचालन कौशल्य आजमावायचं होतं। त्यातून विवाह म्हणजे आपल्या अगदी आवडीचा विषय। आपण कसे ग्रेट आणि दुसरे कसे मूर्ख, हे दाखवायची संधीही आपसूक मिळणार होती। निमंत्रण आनंदानं स्वीकारलं।दोन-तीन फेऱ्या निश्‍चित केल्या होत्या। साथ-साथ च्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यात काही फेरबदल केले, काही वाढवल्या. माझी मूळ संकल्पना कायम ठेवली.

सुरुवातीला औपचारिक ओळख कार्यक्रम घ्यायचा विचार नव्हता। पण आयत्या वेळी काही बदल करून, ओळखीचा कार्यक्रम घातला। त्यातून मुलं-मुली मिक्‍स व्हायला मदत होईल, असं वाटलं.एकतर मेळावा सुरू व्हायच्या आधीच एक मुलगा एक मुलगी असं सगळ्यांना बसवलं. त्यातून पहिल्यांदाच आलेल्या मुलं-मुली बाजूला पडण्याचा धोका टळला. एकमेकांची ओळख स्टेजवर जाऊन करून द्यायची, असा हमखास हातखंडा विषय ठेवला. एकमेकांची लग्नाच्या दृष्टिकोनातून ओळख करून घेताना मुलं-मुली बऱ्यापैकी मोकळी झाली, एकमेकांत मिसळली. दुसऱ्याच्या अपेक्षा आणि त्याचं प्रोफाइल मांडताना प्रत्येकाची कसरत पाहण्यासारखी होती.दुसऱ्या फेरीत लग्नायोग्य संभाव्य जोड्यांना एकमेकांना प्रश्‍न विचारायला सांगितले. फारसं पुढे येऊन न बोलणाऱ्या जोड्या त्यासाठी निवडल्या. ही फेरीही रंगली.

तिसऱ्या फेरीत सगळ्या मुलामुलींना वेगवेगळे प्रसंग देऊन त्यात तुम्ही काय केलं असतंत, यावर बोलायला सांगितलं। बायको उशिरा घरी आली तर, तिची आई आजारी असेल तर, नवऱ्याची जवळची मैत्रीण काहीबाही एसेमेस पाठवत असेल तर, बायको लग्नाआधीच कुणाच्या शारीरिकदृष्ट्याही जवळ आली असेल तर...? असे प्रसंग होते। मुलांनी खूप उत्साहानं आणि हिरीरीनं उत्तरं दिली। सगळे प्रामाणिक होते, ही आनंदाची गोष्ट।त्यातून काही उणिवा, उण्या बाजू राहिल्या, त्या दाखवून दिल्या. मुलांनाही त्या पटल्या.साथ-साथ च्या कार्यकर्त्यांनीही चांगली मदत केली. दोन तास हा मेळावा चालला. विदाऊट ब्रेक. मला लवकर निघायचं होतं आणि उशिरा सुरू झाला होता म्हणून. नाहीतर तो आणखी रंगला असता. शेवटी शेवटी गुंडाळावा लागला.

एकूण अनुभव छान होता. एकतर माझा सूत्रसंचालनाचा आत्मविश्‍वास वाढला. त्यातून निदान दोन तास तरी लोकांना आपण आपल्याकडे पाहायला, ऐकायला लावू शकतो, एवढा विश्‍वास आला. मुलांना चांगला कार्यक्रम दिल्याचं समाधान मिळालं. मुलांनीही "आतापर्यंतचा उत्कृष्ट कार्यक्रम' अशा शब्दांत या कार्यक्रमाची प्रशंसा केली."साथ-साथ'मध्ये जे काही कमावलं, त्याचं चीज झाल्यासारखं वाटलं....!

आता मोठ्या स्तरावर असाच काही उपक्रम करायचा विचार आहे. आहे कुणी लग्नाळू?

---------

Jul 3, 2008

कशी शांतता शून्य शब्दांत येते....

तो किंवा ती आपल्याला मनापासून आवडते. आपल्या काळजातच घुसते. कुठल्याही अपेक्षेनं नव्हे, पण निव्वळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आपण प्रेमात पडतो. त्यानं/तिनं आपल्याशी मैत्री करावी, असं वाटतं. पण ती एका मर्यादेपलीकडं आपल्याला फार भीक घालत नाही. आपण अनेक प्रयत्न करतो...त्यासाठी प्रसंगी, वेगळ्या वाटेनं जातो. पण व्यर्थ!
ती (व्यक्ती) कुठलीही असू शकते. कुठल्याही पार्श्‍वभूमीची, कुठल्याही प्रवृत्तीची. आपल्याला आवडते, ती तिची प्रवृत्ती. जगण्याची कला. धडाडी, कर्तबगारी, शैली, बोलण्या-वागण्याची पद्धत, एखाद्या विषयातला अभ्यास, विचार, मतं मांडण्याची पद्धत, यांपैकी काहीही. आपल्याकडे तो गुण नसतो कदाचित, म्हणून आपण तिचा आदर करायला लागतो. तिच्याकडून आणखी काही शिकता यावं, असं वाटतं. त्यासाठी तिच्याशी मैत्री करायला हवी असते. तिनं आपल्यासाठी खास काही करावं, काही द्यावं, अशी अपेक्षा नसते. पण थोडा वेळ तिच्या सहवासात राहता यावं, असं वाटत असतं. तिच्या सोबत राहून जेवढं टिपता येईल, तेवढं आपल्याला टिपायचं असतं. तिच्या खासगी गोष्टी तिनं सांगाव्यात, अशी अपेक्षा नसते, पण आपल्या खासगी गोष्टींत तिचा सल्ला मिळेल, निदान तिच्या सहवासाचा काही प्रभाव पडेल, असं वाटत असतं.
ती कुणी "ग्रेट' असतेच, असं नाही. पण सर्वसामान्यांपेक्षा कुठल्या तरी बाबतीत वेगळी असते. काही एक वेगळा गुण असतो, ज्याचं आपल्याला आकर्षण वाटत असतं आणि आपल्यात तो नसल्याबद्दल रुखरुखही. पण तिला आपल्याबद्दल फारसं वाटत नसतं. औपचारिक ओळख ठेवण्यापलीकडे मैत्री सरकत नाही. मैत्रीच्या तारा काही छेडल्या जात नाहीत. आपण प्रामाणिक प्रयत्न करतो, पण तिला त्याची फारशी कदर नसते. निदान आपल्या मैत्रीच्या प्रयत्नांचा आदर राखण्याएवढंही सौजन्यही कधी कधी वाट्याला येत नाही. हा तिचा दोष असतो, की आपल्याच अवाजवी अपेक्षांमधला फोलपणा?
तुम्हाला हा अनुभव आलाय कधी? मला हज्जारदा आलाय! अनेकदा तोंडघशी पडलोय, अनेकदा त्रास करून घेतलाय. अगदी मनापासूनचा म्हणवणारा मित्र काही कारण नसताना दुरावल्याचा. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडल्याची साक्ष देणाऱ्याकडून नंतर काहीच संपर्क न साधला गेल्याचा. कॉलेज संपल्यावर नातंही संपल्याचा. आणि आपण कितीही ओढीनं आपली सुख-दुःखं सांगितल्यानंतरही, त्यांची परतफेड न झाल्याचा. आपण अतिशय प्रामाणिक राहिल्यानंतरही, त्याच्या आयुष्यातला अगदी महत्त्वाचा टप्पाही दुसऱ्याच्या तोंडून कळण्याचा.
आपल्या चांगल्या/वेगळ्या कामगिरीकडे, कलेकडे नियमितपणे लक्ष ठेवून त्यात सूचना करणारा, कान धरणारा, सल्ले देणारा कुणीच मित्र असत नाही? गरज असल्याशिवाय, आपल्या आयुष्यात काय चाललंय, याची चौकशी करावीशीही त्याला वाटत नाही?
खरंच खरी मैत्री एवढी दुरापास्त आहे? व्यावहारिकतेच्या, धावपळीच्या आयुष्याच्या, अर्थाजनाच्या बंधनांनी तिला जखडून, संपवून टाकलंय? कधीतरी हॉटेलात जाणं, फोनवर बोलणं, एसएमएस करणं, यापलीकडे मैत्री जाऊ शकत नाही? नोकरी, जबाबदाऱ्या यांची बंधनं मैत्रीच्या नात्यापेक्षाही तीव्र असतात?
चांगल्या मैत्रीची गरज काय फक्त एकटेपणीच असते? अगदी जगण्याचं रहाटगाडगं व्यवस्थित चालू असतानाही मित्रांशी उत्तम नातं नाही राखता येत?
-------------

Apr 14, 2008

वाचू कीर्तनाचे रंगी...

पुण्यात सिंहगड पायथ्याजवळ रेव्ह पार्टीची नशा जगजाहीर झाली, त्या वेळी केलेलं हे लिखाण आहे. रेव्ह पार्टीनंतर सांस्कृतिक डोस पाजण्याचं पीकच आलं होतं. "पेशव्यांची परंपरा असलेल्या पुण्याचं काय झालं हो!' असा टाहो फोडला जात होता. विश्‍वास नांगरे पाटीलही सगळीकडे याच विषयावर बोलत होते. त्याचंच हे प्रहसन.
---------
बालगंधर्व (रंग) मंदिरात बुवांचं कीर्तन ऐन रंगात आलंय. समोर उपस्थित सदाशिव पेठी, नारायण पेठी, शनिवार पेठी, तबला-पेटी आणि समस्त सुसुसुसुसुसुसुसु-संस्कृत, सुसुसुसुसुसुसुसु-जाण आणि सुसुसुसुसुसुसुसु-शिक्षित मंडळी आणि पत्रकार-पत्रकारिणी धुंद ("मद्य' नव्हे) होऊन डोलताहेत...काही भावविव्हल आणि भक्तिवेल्हाळ श्रोते तर पार "समाधी अवस्थे'त गेलेत...(काही नतद्रष्ट यालाच सुखाची झोप असं म्हणतात...असो. अशा कपाळकरंट्यांना काय कळणार अशा अध्यात्मिक गोष्टी...(पुन्हा) असो.)

महाराजांच्या जिभेवर जणू सरस्वतीच भांगडा करतेय...आणि वाणीतून तर मध, साखर भसाभसा सांडतेय...(पवित्र, टापटीप "देऊळ' असूनही त्यामुळंच माशाही घोंघावताहेत...)जाहला संस्कारांत खंड । म्हणूनच "रेव्ह पार्ट्या' उदंड ।।"विश्‍वास' म्हणे असे हे "गुंड' । ठेचावेत करूनी "जेरबंद' ।।तर मंडळी, माऊलींनी काय सांगून ठेवलंय...या जगात अज्ञान आणि अंधकाराचं उदंड पीक आलंय...अधर्म आणि असंस्कार माजलाय...अशा परिस्थितीत एकच उपाय...पालकांनो, मुलांना भरपूर प्रेम द्या...नाहीतर आमच्याकडे पाठवा...आम्ही त्यांना कोठडीत त्यांच्यावर "प्रेमवर्षाव' करू...!!अनंतकोटी "रेव्हबाज'निर्दालक, सगुणतारक, दुर्गुणहारक संतशिरोमणी विश्‍वासराव नांगरे पाटील महाराज की जय...!!!!! (एकच जयघोष...)महामहोपाध्याय, संताधिसंत, शास्त्रज्ञाधिशास्त्रज्ञ ("देवाधिदेव'च्या सुरात) विजयराव भटकर महाराज की जय...!! (मंदिरा'तील मागच्या उजव्या कोपऱ्यातील गटाकडून आरोळी) संतशिरोमणी, महान संस्कृतीरक्षक श्री श्री श्री (किमान तीनदा आवश्‍यक. दोनदा चालेल. पण फक्त एकदा "श्री' खपवून घेणार नाही) बबनराव पाचपुते महाराज की जय! (हा "देशा'वरचा आवाज)

एवढा सगळा गदारोळ आणि घोषणांचा चित्कार यथासांग पार पडल्यानंतर नांगरे-पाटील महाराज पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाला (खरं तर तथाकथित उच्चभ्रूंच्या बेगडी अब्रूरूपी लंगोटीलाच) हात घालतात.मंडळी, ""आजची तरुण पिढी बहकण्यामागचं आणि रेव्ह पार्ट्यांसारख्या वाईट मार्गाला लागण्यामागचं कारण एकच आहे....आईवडिलांचं होणारं दुर्लक्ष आणि संस्कारांचा अभाव...!''""आज आईवडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही...सगळे पैशांच्या मागे लागलेत...त्यामुळेच हा दुराचार समाजात माजलाय. अशा पार्ट्यांत नाचणारी, अमली पदार्थांच्या आहारी जाणारी तरुण पिढी पाहताना आमचं हृदय हेलावतं...त्यांच्या (फक्त मुलांच्या) अंगावर हात टाकताना मनाला किती यातना होतात...पण इलाज नसतो..."पोलिसी खाक्‍या'नंच ठोक्‍यायला...आपलं..."ठोकायला' लागतं...किती वेदना होत असतील...मारणाऱ्यांना...! पण इलाज नाही ! आजच्या तरुण पिढीला योग्य जागेवर आणायचं असेल, तर त्यांना त्यांच्या "योग्य जागी' लाथा घालायलाच हव्यात...नाही का?''बोला...अनंतकोटी "रेव्हबाज'निर्दालक विश्‍वासराव नांगरे पाटील महाराज की जय !! ...पुन्हा एकमुखी गजर.त्यापाठोपाठ संताधिसंत, शास्त्रज्ञाधिशास्त्रज्ञ भटकर महाराज आणि संतशिरोमणी पाचपुते महाराज यांच्याही अनुयायांकडून (की समर्थकांकडून?) त्यांच्या नावांचा अनुक्रमे गजर.

नांगरे-पाटील महाराजांच्या कीर्तनात पुन्हा एकदा समाजातील अव्यवस्था, सगळीकडे माजलेला भ्रष्टाचार, संस्कृतीचा ऱ्हास, वाढता चंगळवाद, यांची ओघवत्या आणि मधाळ वाणीत उजळणी होते. (मधासाठी आलेल्या माशा आता सगळीकडे घोंघावून श्रोत्यांना "नको तिथे' चावू लागल्या आहेत.) (मध्येच कुणीतरी सदाशिव पेठी पुणेकर "पोलिस खात्यात भ्रष्टाचार नाही काय?' असा भोचक प्रश्‍न आपलं तोंड कुणाला दिसणार नाही, अशा बेतानं विचारतात. त्यामुळं महाराजांची गैरसोय होते, पण ते तिच्याकडे (आणि त्याच्याकडे) सोयीस्कर दुर्लक्ष करतात.)

संदीप खर्डेकर बुवांना बुक्का लावायला उठतात. त्यांच्या कपाळावर आधीच नाकापासून केसांपर्यंत शेंदूर असल्याने त्यांच्या बुक्का कुठे लावायचा, असा प्रश्‍न बुवांना पडतो. प्रत्येकाच्या कपाळाला बुक्का लावून कीर्तनाची सांगता होते.

(टीप ः - नांगरे-पाटील बुवा सध्या (बदली होईपर्यंत) शाल-श्रीफळ आणि सव्वाअकरा रुपये या दराने पुणे जिल्ह्यात कुठेही "बहकलेली तरुणाई' या विषयावरील कीर्तनासाठी उपलब्ध आहेत.)

------

Feb 9, 2008

दिशा, वाट अन् `वाट'

Around the corner, I have a friend,
In this great city that has no end,

Yet the days go by and weeks rush on,
And before I know it, a year is gone.

And I never see my old friends face,
For life is a swift and terrible race,

He knows I like him just as well,
As in the days when I rang his bell

And he rang mine but we were younger then,
And now we were busy, tired men.

Tired of playing a foolish game,
Tired of trying to make a name.

`Tomorrow' I say! `I will call on Jim
Just to show that I'm thinking of him."

But tomorrow comes and tomorrow goes,
And distance between us grows and grows.

Around the corner, yet miles away,
``Here's a telegram sir, `Jim died today.'

And that's what we get and deserve in the end.
Around the corner, a vanished friend.

-एक अज्ञात कवी. (इंटरनेटवरून साभार.)
--------------------
बिनचेहर्‍याच्या अफाट शहरात
होता मला एक जीवलग मित्र
जणू हरवलेल्या माणसांमधलं
माझं रंगभरलं हिरवं चित्र

तो मला आवडायचा अन
मीही, त्याला आवडायचो फार
चर्चा, मस्करी, थट्टेला
पूर यायचा अपार...

पण हळूहळू दिवस सरले...
पाहता पाहता वर्षही सरलं...
माझ्या मित्राचं मी तोंडही नाही पाहिलं
हे तेव्हा कुठे मला आठवलं!

आम्ही आता नव्हतो नवथर पोरं कालची
कसल्याशा ओझ्यांनी होती पाठ आमची वाकली
नाव, पैसा आणि प्रतिष्ठा यांचा होता खेळ
खेळता खेळता नुरला मित्रासाठी वेळ...

पण आता केला निश्चय
अन ठरवलं मनाशी ठाम
उद्य करू फोन त्याला अन सांगू,
`मला तुझी दोस्ता याद येते जाम'

पण `उद्या' आला अन `उद्या' गेला
आमच्यातला दुरावा वाढतच गेला...
एके दिवशी अचानक तार आली..
तार होती, की मित्राला देवाज्ञा झाली!

कसलं आयुष्य, कसली स्पर्धा,
कसली शर्यत अन कसलं काय...
पाहता पाहता मैत्र संपलं,
हाती माझ्या उरलं काय...

बिनचेहर्‍यांच्या या अफाट शहरात
आता कुठला दोस्त, कुठली दोस्ती...
मित्र गमावलेल्या चेहर्‍यांची
गर्दी माझ्या सभोवती...


- श्रीपाद ब्रह्मे. (स्वयंस्फूर्त.)
-----------------
तुंबलेल्या कोंदट खोलीत
होता एक `जवळचा' मित्र
त्याच्याविना विचारत नव्हतं
मला काळं कुत्रं

एकाच खोलीतलं जिणं
अन एकाच ग्लासातलं पिणं,
आसपासच्या जगाशी
आम्हाला देणं ना घेणं

घरून आलेला `पॉकेटमनी'
अर्धा महिनाच पुरायचा
उधार-उसनवार्‍यांनी
उरला महिना काढायचा

समोरच्या टुमदार बंगल्यातली
`गोरटेली' दोघांना आवडायची
तिच्या स्वप्नांतच आमची
एकेक रात्र सरायची..

माझेच कपडे, परफ्यूम वापरून
साल्यानं तिला पटवलं
आपलं `खोटं नाणं' तिच्या
बापाच्या बंकेत वटवलं

उद्या भेटतो सांगून
तो गेला तो गेलाच!
माझ्या जिवावर जगून
माझ्यासाठी `मेलाच!'

`उद्या' आला
आणि`उद्या' गेला
पण माझा `जवळचा' मित्र
कधीच नाही भेटला

कधी जातो आमच्या अड्ड्यासमोरून
त्याच्या आलिशान मोटारीतून
अन बघतो तुच्छतेनं
काळ्या काचांपलीकडून

त्याच जुन्या कोंदट खोलीत
आता मी एकटाच राहतोय
बंगलेवाल्या पोरींकडे
आता `वेगळ्या' नजरेनं पाहतोय...


- अभिजित पेंढारकर. (आगाऊपणे स्वयंस्फूर्त.)
----------------

Nov 6, 2007

तुणतुणी, पिपाण्या आणि पावर्‍या...

काही नाही, एकही प्रतिक्रिया आली नाही `दिवाळी पहाट' या पोस्टवर, म्हणून हेडिंग बदलून पाहतोय, झालं!
आधी वाचलेल्यांनी (आणि पहिल्यांदाच वाचणार्‍यांनीदेखील) पुन्हा वाचण्याची गरज नाही. अगदीच वेळ जात नसेल तर ठीक आहे...!

असो.
------

आपल्या समाजात काही साथीचे रोग आहेत. डेंग्यू, मलेरियापेक्षाही भयंकर वेगाने फैलावणारे. गणपतीतली डिजिटल "भिंताडगिरी', नवरात्रातला दांडिया-मॅनिया आणि आता दिवाळीतला पहाटींची धुडगूस.



या रोगांचे व्हायरस कसे येतात, कसे पसरतात आणि धोकादायक असल्याचे माहित असूनही अनेक लोक त्याला कसे फशी पडतात, का...ही कळत नाही. गेले एक-दोन दिवस पेपरातल्या मनोरंजनाच्या जाहिरातींवर तुम्ही नजर टाकली असेल, तर हा दिवाळी पहाट कार्यक्रमांचा उच्छाद सहज लक्षात येईल.



कुणीतरी अलाणा फलाणा गायक, गायिका, पावरीवाला किंवा तबलाकुट्या. त्याच्या कलेला हा सुगीचा काळ. एरव्ही त्याला कुणी विचारत नसेल, किंवा रंगमंचावरच्या भरताड भरतीतला तो कुणीतरी एकही असू शकेल. पण दिवाळीत त्याला कोण डिमांड!



बरं, हे कार्यक्रम पण भल्या पहाटे साडेपाच, सहाला वगैरे असतात. आता घरी पणत्या, दिवे लावायचे सोडून, कोण उपटसुंभ पहाटे पहाटे पाचशे-हजारांची तिकिटं काढून थेटरांमध्ये दिवे लावायला जातात कोण जाणे! आमच्यासारख्या फुकट पासवाल्यांचं तरी एकवेळ समजू शकतो. पण तिकीट काढून काय जायचं असल्या पावऱ्या नि तबले ऐकायला?पावसाळा आला की पावसाळलेली गाणी, हिवाळ्यात गारठलेली गाणी, दिवाळीत मांगल्यरसाने बदबदलेली गाणी...काय चाललंय काय? गोडाचं किती अजीर्ण सहन करायचं?



पुढच्या वर्षाच्या दिवाळीसाठी एक प्रस्ताव आहे. पाहा, पटलं तर. नाहीतरी काय, घरंदारं सोडून बाहेर थेटरातच दिवे लावायचेत ना, मग मल्लिका शेरावतच्या हॉट सीन्सवर (प्रात्यक्षिकासह) रसभरीत चर्चा का नको? सनोबर कबीर, दीपल शॉ यांच्यासारख्यांचा दिलखेचक नृत्यथयथयाट का नको? गेला बाजार, एकमेकांना यथेच्छ बुकलणाऱ्या डब्ल्यूडब्ल्यूएफवाल्यांचा रक्तपाती आविष्कार का नको?



बघा, विचार करा. सुचवा आणि आनंद घ्या!





-------

Oct 9, 2007

द ग्रेट अन"लॉयल' सर्कस...

""बाबा, सर्कसला जाऊया?''
"नको रे...कंटाळा आलाय. शिवाय गावाबाहेर आहे ती. खूप लवकर निघावं लागेल.''"
"शी बाबा! तुम्हाला नेहमीच कंटाळा. अहो, बरेच प्राणी असतात त्यात. मला बघायचेत.''"
"नको म्हटलं ना! आणि हल्ली मेनकाताईंच्या कृपेनं त्यात कुठलेच प्राणी नसतात. फक्त कुत्री-मांजरी, पोपट-मैना असतात.''"
"वाघ, सिंह, हत्ती नसतात?''"
"अजिबात नाही!''"
"मग...सर्कसमध्ये बघायचं काय?''
"अरे...सांगितलं ना, बघण्यासारखं काहीच नसतं हल्ली''"
"पण ते झुल्यावरच्या कसरती, मृत्युगोल, गाड्यांच्या कसरती तरी असतातच की!''"
"तू अगदी हट्टी आहेस बघ. अगदी आईवर गेलायंस. आपलं बोलणं खरं केल्याशिवाय राहणार नाहीस. अरे, गाड्यांच्या कसरती बघण्यासाठी सर्कशीच्या तंबूपर्यंत कशाला जायला हवं? मी तुला दाखवतो. आपल्या पुण्यातल्या रस्त्यांवर रोज अखंड कसरती चालू असतात.''"
"बाबा बाबा, आपण जायचं, रस्त्यावरची सर्कस बघायला?''"
"चल...''
-----
दृश्‍य दुसरे ः स्थळ ः टिळक चौक. (अलका टॉकीजच्या जवळचा. "टिळक' कोणाला माहित नाहीत, ना!)"

"हं. आता बघ गंमत. तुला वाहतुकीचे नियम शिकवलेत का शाळेत? हा हिरवा दिवा म्हणजे जा, पिवळा म्हणजे गाडी हळू करून थांबा आणि लाल म्हणजे पूर्ण थांबा. पण बघ हं आता...लक्ष्मी रस्त्यावरून येणाऱ्या या गाड्या आहेत ना, त्या पिवळा दिवा लागल्यावर थांबणारच नाहीत. उलट, आणखी वेगानं जातील. लाल दिवा लागल्यानंतरही पुढेच पळत राहतील.''"
"बाबा बाबा, तो बघा, सायकलवाला. तो काय उडवणार आहे का आता?''
""उडवू सुद्धा शकतो, बाबा! या सायकलवाल्यांचं काही खरं नाही. आता लकडी पुलावरून दुचाक्‍यांना बंदी आहे की नाही? पण सायकलवाल्यांना कुठलेच नियम नाहीत. ते कुठेही, केव्हाही, कसेही घुसू शकतात. बघ आता, कसा वाकडा-वाकडा शिरतोय, सिग्नल नसतानाही! अरे अरे अरे....तो बघ दुसऱ्याला पाडून निघून गेला!''"
"बाबा, लाल सिग्नल आत्ताच लागलाय ना, मग हे बाईकवाले गाड्या कशाला फुरफुरवतायंत?''
""अरे, मागच्या जन्मी मावळे होते ते. सारखी घोड्यावर टांग मारायची सवय. त्यामुळं गाडीचा चाबूक ओढल्याशिवाय करमत नाही. सिग्नल असताना गाडी बंद करणं त्यांना मान्य नाही.''"
"बाबा, ते कुठूनही वळवून, कसेही चालवणारे रिक्षावाले काका बघितलेत?''
""अरे बाबा हळू बोल! त्यांनी ऐकलं, तर त्यांच्या सगळ्या जातभाईंना गोळा करून आपल्या सळो की पळो करून सोडतील. दिसायला ही एवढीशी रिक्षा असली, तरी या काकांची "दादा'गिरी मोठी आहे. ते कुणालाही जुमानत नाहीत. तो रिक्षावाला तर बिनधास्त कडेला रिक्षा लावून दुसऱ्याशी बोलत बसलाय, बघ! रिक्षा एवढीशी असली, तरी तिचे दर विमानापेक्षाही जास्त असतात, माहितेय?''
-----------

दृश्‍य तिसरे ः अप्पा बळवंत चौक.

""बाबा, आपण इथे का आलोय?''"
"अरे, संतांच्या, ज्ञानवंतांच्या, विचारवंतांच्या, बुद्धिमंतांच्या आणि आता काही उपद्रवी जंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा एक हिस्सा आहे हा! ऐतिहासिक शनिवारवाडा इथून अगदी हाकेच्या अंतरावर. जगप्रसिद्ध बावनखणी....जाऊ दे जाऊ दे....! आणि तू असा उद्धटासारखा प्रश्‍न विचारतोयंस...? अरे आयशी-बापसानं हेच शिकवलं का?''"
"बाबा, तुम्ही तर मला आज पहिल्यांदाच इथे आणताय. आणि बावनखणी म्हणजे काय?''
""अं...अरे ते बघ..ते बघ...तू आईस्क्रीम खाणार?''"
"नको. विषय बदलू नका.''"
"आता इथे उभं राहून निमूट गंमत बघ. इथे पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्याचीच खरी सर्कस आहे. बघ, कुठल्याही बाजूनं वाहनं सुटली, तरी बाजीराव रस्ता ओलांडणंच शक्‍य नाही. ते पांढरे पट्टे दिसताहेत ना, ते क्रॉसिंगसाठी नव्हे, गाड्यांच्या रेससाठीच असावेत, असं वाटतं ना?''"
"बाबा, इथे पोलिस नसतात का?''
""असतात ना...अरे, पुण्यातले वाहतूक पोलिस कर्तव्यदक्ष आहेत. ते नेहमी ड्युटीवर हजर असतात. पिवळ्या दिव्यावर गाड्यांना थांबायला लावतात. नाही थांबल्या, तर दंड घेतात. चिरीमिरी अजिबात घेत नाहीत. पण ते नसले, की असा गोंधळ होतो बघ...!''
""बाबा, ते कोपऱ्यात तंबाखू मळत, गप्पा मारत उभे असलेले पांढरा शर्ट, खाकी पॅंटमधले काका कोण आहेत? मघाशी इथे रस्त्यातच उभे राहून वाहनांना सूचना करताना बघितलं होतं मी त्यांना...!!''"
"अं....ते ना... ते...आपले ते हे...जाऊ दे. घरी चल!''

-------