Nov 18, 2007

गोष्ट कडक आजोबांची आणि प्रेमळ नातवंडांची!

गोष्ट कडक आजोबांची
आणि प्रेमळ नातवंडांची!

तशी टारगट पोरं नव्हेतच ती. थोडीशी उथळ म्हणा, हवं तर! पण सिनेमात प्रचंड मान, कीर्ती असलेली. बरं, हे दोघांचं घरचंच कार्य. म्हणजे तिच्या कल्पनेतून झालेलं आणि त्याच्या पैशातून आणि कामातून. अगदी गोडगोड, छानछान. कुणाला दुखवणं नाही, चिडवणं नाही. अजातशत्रूच जणू! (सगळेच "गोडबोले' अजातशत्रूच असतात म्हणे. असो.)

पण त्यांच्या हातून एक छोटीशी चूक घडली. एका "आजोबां'ची नक्कल केली त्यांनी. बरं, हे आजोबा साधेसुधे नव्हेत. या "नातवंडां'चं बारसं जेवलेले. आपल्या "देशभक्ति'पर चित्रपटांनी भल्याभल्यांना सळो की पळो करून सोडलेले...झालं! त्यावरूनच रामायण सुरू झालं...!

बरं, चॅनेलवाल्यांनाही दिवाळीतल्या दोन नव्या सिनेमांची गाणी, गाण्यांमागच्या कहाण्या, नटनट्यांना शूटिंगदरम्यान किती वेळा शिंका आल्या आणि किती वेळा ठसके लागले, इथपासून अगदी स्पॉटबॉय, जेवणाची व्यवस्था करणाऱ्या मावशी, सगळ्यांच्या मुलाखती दाखवून झाल्या होत्या. आता नवा रतीब काय घालायचा, असा प्रश्‍नच होता. त्यातच हे "आजोबा' हाताशी लागले. मग त्यांना (तोंडावरचा हात काढायला लावून) वेगवेगळ्या "मूड्‌स'मध्ये दाखवून, त्यांचा जळजळीत संताप टीव्हीवर दाखवून झाला.बरं, या "कीर्तिवान' मुलांनाही आपल्या सिनेमाची टिमकी वाजवायला काहीतरी नवं निमित्त हवंच होतं. त्यांनीही लगोलग पत्रकार परिषदेत लोटांगण घालून टाकलं! आता, सिनेमात एके काळी बराच मान मिळवलेल्या (आणि सध्या कुणालाच माहीत नसलेल्या) आजोबांची माफी मागायला त्यांचं काय जात होतं? एका दगडात तीन-चार पक्षी! मोठ्यांचा आदर केल्याचा देखावा, सिनेमाची पुन्हा चर्चा आणि आपल्या निरागसपणावर शिक्कामोर्तबही! बरं, आजोबांच्या कार्याचे गोडवे गाऊन त्यांना पुन्हा खूश केलं, की झालं काम! झालं, पेल्यातलं वादळ एका दिवसात पुन्हा पेल्यात गडप!

---
ता. क. सिनेमासृष्टीत असे अनेक आजोबा आहेत. काही नाइलाजाने निष्क्रिय, काही प्रेक्षकांच्या नाइलाजाने सक्रिय! त्यांची चेष्टा करण्याचा प्रसंग घडल्यास पुन्हा अशा बातम्या पाहायला मिळतील. बाय द वे, आपल्या या "देशभक्तिपरायण आजोबां'नी त्यांच्याच "जय हिंद' चित्रपटातील नायिकेने स्वतःच्या अंगावरचे कपडे जाळण्याचं जे रसाळ दृश्‍य चित्रित केलं होतं, तेही देशभक्तीवरची निष्ठा म्हणूनच बरं का!




-----