May 22, 2009

`गाडी` घसरली, सावरली...

साडेसाती एकदा मागे लागली, की तिचं समाधान होईपर्यंत पिच्छा सोडत नाही। गाडी बिघडण्याची साडेसाती अशीच गेले काही दिवस मागे लागली होती. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी पिडल्यानंतरच तिनं पाठ सोडली.
आमची मारुती गाडी चालकासह घेऊन आई-वडील रत्नागिरीहून इथे पुण्याला आले होते. माझी मावशीही सोबत होती. त्यांच्यासाठी म्हणून मी रजा टाकली होती. दुसऱ्या दिवशी रांजणगावला जायचा बेत आखला. साधारण 11 वाजता निघालो. घरापासून निघून पुढच्याच चौकात आलो होतो, तर पोलिसांनी गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला. मी तर सिग्नल तोडला नव्हता, की झेब्रा क्रॉसिंग तुडवले नव्हते. "अपराध माझा असा काय झाला,' अशा पवित्र्यात मी भांडण्याच्या तयारीत होतो. तेव्हा समजलं, की सीटबेल्ट लावला नसल्यानं मला अडवण्यात आलंय. हे प्रकरण नवीन होतं. पुण्यात बेल्ट अत्यावश्‍यक आहे वगैरे ऐकलं होतं, पण पुण्यात कार चालविण्याची कधी वेळच आली नव्हती. प्रत्यक्षात आज आली आणि प्रथम ग्रासे मक्षिकापात जाहला. निमूटपणे काहीतरी कारणं सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शेवटी हो-नाही करता करता 50 रुपयांत मांडवली झाली. हुश्‍श करून पुढच्या प्रवासाला लागलो. पण पहिला अपशकुन झाला होता...जाताना प्रचंड रहदारी आणि रांगांमुळे पोचण्यास वेळ लागला. दुपारी जेवण करून निघालो. गाडी सुरू करण्यासाठी आलो, तर किल्लीच फिरेना. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर ती कशीबशी फिरली. गाडी सुरू झाली. येताना वाटेत दोन-तीनदा गाडी वेगात असताना अचानक बंद पडली. काय भानगड झाली, कळेना. बरेचदा किल्ली फिरवल्यानंतर ती पुन्हा सुरू होत होती. मला संध्याकाळी पाचला ऑफिस गाठायचं होतं. त्यामुळं पुण्यापर्यंत जाऊ आणि उद्या बघू, असं ठरवलं. शेवटी तीन-चारदा बंद पडून कोरेगाव भीमामध्ये पोचल्यानंतर गाडी हटूनच बसली. काही केल्या पुन्हा सुरू होईना. तिथे मेकॅनिक शोधणं भाग होतं. शिवाय, ऑफिसमध्ये माझ्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्याची दुहेरी जबाबदारीही सुरू झाली. फोनाफोनी करून काही व्यवस्था होते का, ते पाहिलं.
कोरेगाव भीमामध्ये मेकॅनिक शोधणं जिकिरीचं काम होतं. नशीबानं आमची गाडी बंद पडली, तो मुख्य बाजार होता. तिथेच जवळ एक गॅरेज होतं. तिथे जाऊन मेकॅनिकला गाठलं. त्यानं तपास केल्यावर बॅटरीतलं पाणी पूर्ण संपल्याचं निष्पन्न झालं. बाटलीभर पाणी ओतल्यानंतर भस्सकन वर आलं. मघाशी आम्हीही बॅटरीतलं पाणी तपासलं होतं....पण ते होतं ड्रायव्हर सीटखालचं. ते "वायपर'चं पाणी होतं, हे त्या मेकॅनिकनं सांगितल्यावर समजलं. पाणी पूर्णपणे संपल्यामुळे गाडी गरम झाली होती आणि बंद पडत होती. रबर कीटही जळालं होतं. गाडी लगेच दुरुस्त होणं शक्‍यच नव्हतं. तिथेच सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आमच्या तिथल्या एका सहकाऱ्याला साकडं घातलं आणि तेही देवासारखे धावून आले. त्यांच्याच गाडीतून मग आम्ही सगळे पुण्याला अगदी घरापर्यंत आलो.दुसऱ्या दिवशी बसने जाऊन गाडी घेऊन येण्याचा उद्योग करावा लागला. या सगळ्या प्रकरणात सुमारे दीड हजार रुपये खर्च झाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत गाडी बाहेर काढली नव्हती. संध्याकाळी बाजारात जाण्याची तयारी सुरू होण्याआधी एक छोट्या फेरीसाठी गाडी बाहेर काढली. येताना सोसायटीत आल्यावरच गाडी पुन्हा रुसली. गिअर पडत नव्हते आणि रेझ मात्र खूप होत होती. क्‍लचची गोची झाली होती. गाडी बाजूला लावून रिक्षानं जावं लागलं. त्यापुढच्या दिवशी ते काम करून घेतलं. तूर्त काम झालं होतं, तरी धाकधूक होतीच. रत्नागिरीपर्यंतचा प्रवास करायचा होता. सुदैवानं त्यानंतरच्या प्रवासात गाडीनं काही त्रास दिला नाही.
...पण माझ्या नेहमीच्या बाईकनं ती कसर भरून काढली। तिसऱ्याच दिवशी संध्याकाळी सातच्या एका मराठी चित्रपटाच्या प्रिमिअरला निघालो होतो। सिटीप्राईडच्या थोडेच अलीकडे बाईक अचानक पंक्‍चर झाली. तिथे दुकान शोधून पंक्‍चर काढून घेण्याएवढा वेळ नव्हता. गाडी तशीच रस्त्याच्या कडेला लावली. चित्रपट पाहिला. नंतर नऊ वाजता पंक्‍चरच्या दुकानाची शोधाशोध सुरू झाली. कुणी दुकान सोडून दुसरीकडे गेलेला होता, कुणी बंद करण्याच्या मार्गावर होता, कुणी येण्यास तयार नव्हता. कर्वे रोड फ्लायओव्हरपर्यंत फिरण्याची दगदग केली. काहीच उपयोग झाला नाही.रात्री पत्रकार परिषदेला जायचं होतं. ती आटोपल्यावर गाडी ढकलत घरी न्यावी, असा विचार केला. पण दोन-अडीच किलोमीटरचं अंतर होतं. रात्री अकराला एवढी गाडी ढकलणं म्हणजे दिव्यच होतं. हॉटेलातून मनाचा हिय्या करून निघालो खरा, पण अर्ध्या वाटेतच विचार बदलला. पुन्हा एकदा नशीबावर हवाला ठेवून गाडी उभी केली होती तिथेच रात्रभर सोडून चालत घरी आलो. सकाळी पंक्‍चर काढून घेण्याचं काम फारसं कठीण नव्हतं.दोन्ही गाड्यांनी असा मला मनसोक्त त्रास दिला, तेव्हाच त्यांची मनःशांती झाली.
---
असो। यंदाच्या कोकण दौऱ्यात दोन नवीन ठिकाणांना भेट दिली। जयगडजवळच्या कोळिसरे देवस्थानाला खूप लहानपणी गेलो होतो. यंदाच्या दौऱ्यात ते जमवलं. गाडी घेऊन सर्व जण गेलो होतो. अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेलं हे ठिकाण कुणालाही हरवून टाकणारं आहे. गणपतीपुळ्याच्या रस्त्यावर, पण दहा किलोमीटर अलीकडे हे देवस्थान आहे. साधारणपणे इ.स. 150 वगैरे मध्ये त्याची स्थापना झाल्याचं सांगतात. लक्ष्मी-केशवाची मूर्ती आणि देवळाचं एकूण स्थानच डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. दोन बाजूंना डोंगर, एकीकडे दरी आणि एकीकडे नदी, अशा या स्थानी मनाला शांतता लाभते. देवळाशेजारीच कायमस्वरूपी झरा हा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो.माझ्या मामेभावाच्या सासुरवाडीला, कळझोंडी या गावालाही भेट दिली. त्यांचं घर सुंदरच होतं. कोकणात एवढं सुंदर घर मी अनेक वर्षांनी अनुभवलं. भरपूर आंबे खाल्ले. फणस मात्र यंदा वाट्याला आला नाही. एकदा बरका फणस आणून हाणला, तेवढाच. मनस्वीसुद्धा मांडी ठोकून गरे खायला बसली होती. काप्यापेक्षा बरक्‍याचंच तिला जास्त आकर्षण होतं. गणपतीपुळ्याला मात्र या वेळी गेलो नाही.आता पावसाळ्यात पुन्हा या भागात जाण्याचा विचार आहे. पाहूया!
----

ही काही प्रकाशचित्रं :
kokan1कोळिसरेचं निसर्गरम्य मंदिर.---------
kokan2मंदिराशेजारी असलेला कायमस्वरूपी झरा.-----kokan3पावसाळ्यात इथे काय धमाल येइल!---kokan5कळझोंडीचं टिपिकल कोकणी घर.--------kokan4देवळाकडे जाणारी वाट--------kokan6रत्नागिरीतला भगवती किल्ला. इथे भगवतीचं मंदिर आहे. नि अथांग पसरलेला समुद्र पण मनमोहक दिसतो. दीपस्तंभही आहे किल्ल्यावर.----kokan7किल्ल्याची भिंत.----kokan8समुद्रावर मनस्वी उंटावरून बागडली.----kokan9नंतर वाळूत मनसोक्त लोळली. ----------kokan12भरपूर भिजलीसुद्धा!----------बाकीचे फोटो पाहा इथे....

May 20, 2009

`उत्तर'क्रिया!

rajनिवडणूक निकालाची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज ठाकरे त्यांच्या नित्यक्रमाला लागले होते. नाही म्हटलं, तरी प्रचार संपूनही प्रत्यक्ष निकालापर्यंत गडबड कायम होतीच. बेरजा वजाबाक्‍यांची चर्चा सुरू होती, समीकरणं मांडली जात होती. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी तर मनसेची दिवाळीच साजरी झाली होती. पहिल्याच निवडणुकीत अनेक उमेदवारांनी लाख-दीड लाख मतांपर्यंत बाजी मारली होती. अधिक जोर लावला असता, तर आणखी काही जागा जिंकलोही असतो, अशी परिस्थिती होती. लोकांच्या अगदी "मनसे' प्रतिसादामुळं सगळेच भारावले होते. राजसाहेबांनाही मतदारांनी दाखविलेल्या प्रचंड अभिमानाबद्दल श्रमांचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांतही त्यांच्या कर्तृत्वाचं, पक्षाच्या यशाचं गुणगान आलं होतं. ते वाचतानाही राजसाहेब प्रसन्न हसले. आपल्या लाडक्‍या कुत्र्याला त्यांनी गोंजारलं. नेहमीप्रमाणं त्याला सकाळी फिरायलाही नेऊन आणलं. शुभेच्छांचे फोन निकालाच्या सकाळी जे सुरू झाले, ते रात्री बारा-साडेबारापर्यंत सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळीही हा "सिलसिला' संपला नव्हता. अनेकांच्या शुभेच्छा झेलत झेलतच राजसाहेबांनी आन्हिके उरकली. तेवढ्यात कुणा नेत्याचाच फोन आला.
""लक्षात ठेवा. एवढ्या यशानं हुरळून जायचं नाही. बाकीचे नालायक पक्ष लोकांना नको आहेत, हे त्यांनी दाखवून दिलंय. आता विधानसभेला अजिबात गाफील राहू नका. विजय आपलाच आहे!'' त्यांनी करड्या आवाजात सुनावलं. आपण अभिनंदन करायला फोन केला, की नेहमीची दटावणी ऐकायला, असाच प्रश्‍न त्या बिचाऱ्या नेत्याला पडला असावा.
""असो. बोला, तुमचं काय काम होतं ते!'' राजसाहेब म्हणाले.
पलीकडून बोलणाऱ्यानं त्याचं काम सांगितलं.
""सत्कारच ना? मी फार सत्कार-बित्काराच्या फंदात पडणारा माणूस नाही. पण पक्षाची ताकद सिद्ध झालेय. त्यानिमित्तानं मी सत्कार स्वीकारायला तयार आहे. कुठे आहे कार्यक्रम?''
""मुंबईतच आहे साहेब!'' कार्यकर्त्यानं सांगितलं.
""ठीक आहे. येईन मी. पण वेळेत सुरू करा आणि वेळात आटपा. बरीच कामं बाकी आहेत.'' राजसाहेबांनी पुन्हा सुनावलं.
पुढचे काही दिवस शुभेच्छा आणि अभिनंदनं झेलण्यात गेले. इतर पक्षांची संसदीय समितीची बैठक होते, तशी मनसेची लोकसभेतल्या सर्व (पराभूत) उमेदवारांची बैठक झाली. विधानसभेसाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली.
असेच काही दिवस धामधुमीत गेले आणि प्रत्यक्ष सत्काराचा दिवस उजाडला. सगळी तयारी झाली होती. राजसाहेब मोठ्या प्रसन्न मुद्रेनं सत्काराच्या ठिकाणी गेले. कार्यक्रमाची आखणी भव्य स्वरूपाची होती. मात्र, सुरुवातीपासून संजय निरुपम, गुरूदास कामत आणि अन्य काही नेत्यांची छायाचित्रं बघून ते काहीसे अस्वस्थ झाले. उत्तर भारतीय संघटनांच्या नावांच्या पाट्याही ठिकठिकाणी झळकत होत्या. "मनसेची ताकद पाहून उत्तर भारतीयही वठणीवर आले की नाही! माझ्या सत्कारातही त्यांनी अभिनंदनाच्या पाट्या लावल्या आहेत!!' राजसाहेब मनाशीच म्हणाले.
कार्यक्रमाचं स्वरूप थोडं निराळं होतं. आधी राजसाहेबांचं भाषण आणि नंतर सत्कार, अशी रचना होती. बाकीच्या नेत्यांची भाषणं झाल्यावरच राजसाहेब सभास्थळी आले होते. आल्याआल्या काही मिनिटांतच त्यांचं भाषण सुरू झालं. नेहमीप्रमाणे मनसेची गरज, ताकद, मतदारांनी दाखविलेला विश्‍वास, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं कार्य, याविषयी ते बोलले. मग ओघानंच बिहारी आणि उत्तर भारतीय नेत्यांवर आणि लोकांवर त्यांनी आग ओकायला सुरवात केली. व्यासपीठावरचे अन्य लोक काहीसे अस्वस्थ झालेले आढळले. लोकांमध्येही टाळ्या-शिट्ट्या आणि जल्लोषाऐवजी अस्वस्थता दिसत होती. तेवढ्यात कुणीतरी राजसाहेबांचा शर्ट ओढला. "इन' बाहेर आल्यानं ते थोडेसे संतापलेले दिसले.
""साहेब, उत्तर भारतीयांवर आणि बिहारींवर जास्त टीका करू नका. त्यांनीच हा सत्कार आयोजित केलाय! मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या प्रचंड मतांमुळेच मुंबईत युतीचे उमेदवार पडले ना, म्हणून!'' तो कार्यकर्ता कुजबुजला.
""काय?'' राजसाहेब उडालेच. मग त्यांची नजर व्यासपीठावरच्या फलकांकडे गेली. "उत्तर भारतीय और बिहारी उम्मीदवारों को लोकसभा पर प्रतिनिधित्व देने में मदद के लिये "मनसे' का धन्यवाद' असे लिहिले होते!!

May 18, 2009

लग्न म्हणजे...

आयुष्याच्या एका टप्प्यावर कुणाची तरी साथ हवीशी वाटते...
निर्णय कसा घ्यायचा, हे मात्र ठरलेलं नसतं.
"अमक्‍याची तमकी लग्नाची आहे...' कुणीतरी सुचवतं. "तमका तुला अगदी शोभून दिसेल हो!' भोचक शेजारीण काकू मध्येच नाक खुपसतात.
प्रत्यक्ष निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो. पण तो घ्यायचा कसा, याचा घोळ सुटत नाही...

कुणी वधू-वर केंद्रात जाण्यासाठी सुचवतं.
"ऑनलाइनच जमव हो!' कुणी सांगतं.
प्रत्यक्षात वधू-वर सूचक केंद्राच्या वाऱ्या आणि ऑनलाइन मनजुळवणीचा खेळ काही झेपणारा नसतो.
मग जमवायचं कसं?
अनेकांपुढे प्रश्‍न असतो.
.....
पालकांचं वेगळंच म्हणणं असतं.
"आम्ही बघू तो मुलगा हिला पसंत पडत नाही. कुणाचं नाक पुढे, तर कुणी अगदीच "हॅ..' दिसतो म्हणे!! आणायचा कुठून हिला साजेसा मुलगा?'
"ह्याला नक्की कशी मुलगी हवेय, त्याचाच पत्ता लागत नाही. सुंदर, देखणी मुलगी आणली, तर ती अकलेचा खंदक आहे म्हणतो!'
पालकांच्या चर्चांत डोकावलं, तर हेच सूर आळवलेले ऐकायला मिळतात.
...
पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या निवडीचा मेळ साधता येईल?
याचाच वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत...
विवाहेच्छू मुले-मुली आणि पालकांच्या एका अनोख्या मेळाव्यातून...
....
मुला-मुलींचा परस्पर परिचय व्हावा, व्यक्तिमत्त्वं ओळखता यावीत, गप्पा-संवाद व्हावा आणि त्यातून जोडीदार निवडीची संधी मिळावी, या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे...
कधी? ः 23 मे, 2009, शनिवार. सायं. 5 ते 9.
कुणासाठी ः तूर्त तरी ब्राह्मण समाजासाठी. (पहिल्या टप्प्यात एवढंच!)
स्थळ ः स्वस्तिश्री सभागृह, सरस्वती विद्या मंदिरासमोर, बाजीराव रस्ता, पुणे.
फी? ः अर्थातच आहे! अल्पोपाहारासहित. (अधिक उत्सुकता असलेल्यांना खासगीत सांगितली जाईल.)
यायचा विचार आहे? इथे प्रतिक्रिया टाका. तुमचा नंबरही द्या. नाहीतर मला abhi.pendharkar@gmail.com वर कळवा. जमवूया