Showing posts with label लघुकथा. Show all posts
Showing posts with label लघुकथा. Show all posts

Jul 6, 2018

खरा चित्रपटप्रेमी



...तरीही विक्रमादित्यानं आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा स्मशानापाशी गेला. स्मशानाजवळच्या त्या झाडावरचं प्रेत त्यानं खांद्यावर घेतलं आणि तो राजवाड्याच्या दिशेने चालू लागला.

प्रेतात लपलेला वेताळ जागा होऊन त्याला म्हणाला, ``हे राजन, तुझ्या चिकाटीला दाद दिलीच पाहिजे. रोजच्या रोज नित्यनेमाने फेसबुकवर पोस्टी पाडणाऱ्यांपेक्षा तुझी चिकाटी अफाट आहे. चल, तुला याच चिकाटीवरून एक गोष्ट सांगतो. फार फार वर्षांपूर्वी... सॉरी. फार फार वर्षांपूर्वीची कशाला, आत्ता कालपरवाची गोष्ट सांगतो. मुंबई नामक एका मायानगरीत संजय दत्त नावाचा एक कलाकार कम पार्ट टाइम देशद्रोही कम पार्ट टाइम गुन्हेगार राहत होता. राजकुमार हिरानी नावाच्या पार्ट टाइम दिग्दर्शक कम पार्ट टाइम मित्रानं त्याच्या आयुष्यावर एक चित्रपट तयार केला – `संजू`. संजय दत्तची पार्ट टाइम कारकिर्द आणि पार्ट टाइम वैयक्तिक आयुष्य त्यात दाखवण्यात आलं होतं. सोशल मीडियावर या सिनेमाची भरपूर चर्चा झाली. कुणी व्हिडिओ केले, कुणी ऑडिओ केले, परिसंवाद झडले, पार्ट्या रंगल्या, प्राइम टाइममध्ये महाचर्चा घडल्या. कुणी प्रेक्षकांना मूर्ख म्हटलं, कुणी प्रेक्षकांना या देशद्रोह्याचे सिनेमे बघू नका, असं कळकळून आवाहन केलं. कुणी सिनेमा बघा, पण त्याचे गुन्हेही लोकांना सांगा, असं भावनिक आवाहन केलं.

सोशल मीडिया लोकांच्या हातात आल्यापासून समीक्षकांच्या जेवढ्या पिढ्या जन्माला आल्या नसतील, तेवढ्या या एका आठवड्यात जन्माला आल्या. शेवटी सोशल मीडियावर एक स्पर्धाच जाहीर करण्यात आली. खरा चित्रपटप्रेमी कोण, अशी स्पर्धा. स्पर्धेसाठी वेगवेगळ्या कॅटेगरी ठेवण्यात आल्या होत्या. पहिली, `संजू` सिनेमा पाहून लगेच फेसबुकवर परीक्षण लिहिलेले. या कॅटेगरीत एन्ट्रीजचा महापूर होता. दुसरी कॅटेगरी होती, `संजू` सिनेमा बघूनही परीक्षण न लिहिणारे. हा विभाग ओस पडला होता. तिसऱ्या कॅटेगरीत काही कारणांनी `संजू` बघण्याची संधी न मिळालेल्यांचा समावेश होता. चौथी कॅटेगरी मात्र एक तत्त्व म्हणून `संजू` न बघणारे आणि दुसऱ्यांनीही बघू नये, असं आवाहन करणाऱ्यांची होती. या कॅटेगरीत एऩ्ट्रीजचा एवढा पाऊस पडला, की जाहीर केल्या केल्या ही कॅटेगरी ओव्हरफ्लो झाल्यामुळे प्रवेश बंद करावे लागले. बाकी चोरून डाऊनलोड करून बघणारे, मित्रांकडून पेन ड्राइव्हमध्ये कॉपी करून घेणाऱ्यांचेही विभाग होते, पण त्यात विशेष काही नसल्यामुळे त्यांची दखल घेण्याची गरज नव्हती.

एवढी गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, ``तर, तर हे अतिबुद्धिमान, सर्वशक्तिमान राजन, आता तू सांग, यापैकी नक्की कुठल्या चित्रपटप्रेमींची कॅटेगरी श्रेष्ठ ठरली असेल? आणि कुणाला बक्षीस मिळालं असेल? तुला या प्रश्नाचं उत्तर माहीत असतानाही तू बोलला नाहीस, तर तुला `रेस-3` आणि `बागी-2`ची डीव्हीडी घरी आणून दिली जाईल आणि ते दोन्ही चित्रपट सलग बघण्याची सक्ती केली जाईल. तुझ्या डोक्याची शंभर काय, हजार शकलं आपोआपच होतील. सांग!``

विक्रमादित्य हसला.
क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, ``उत्तर सोपं आहे वेताळा. `संजू` बघणाऱ्या किंवा न बघणाऱ्या कुणालाही हे बक्षीस मिळालं नाही.``
वेताळाला आश्चर्य वाटलं.

``खरा चित्रपटप्रेमी तोच, ज्यानं `संजू`चा मोह टाळून सेट मॅक्सवर `सूर्यवंशम` बघितला!

हे उत्तर ऐकल्यावर वेताळाच्याच डोक्याची शंभर शकलं झाली आणि तो ती गोळा करत सैरावैरा धावू लागला.



May 2, 2018

नजरबंदी

``मॅडम, आमच्या मुलासाठी आम्ही इथे आलो होतो.`` वीणाताईंच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग दाटून आले होते.

``बोला ना, अगदी मोकळेपणानं बोला.`` डॉक्टर अंजली त्यांना धीर देत म्हणाल्या. तरीही कुठून सुरुवात करावी, हे वीणाताईंना समजत नव्हतं. काही क्षण असेच शांततेत गेले. फारच गंभीर विषय दिसतोय, हे डॉक्टर अंजली मॅडमच्या लक्षात आलं.
``हे बघा, डॉक्टरपासून काही लपवायचं नसतं. त्यातून मी मानसोपचारतज्ज्ञ आहे. तुमच्या मुलाची जी काही समस्या आहे, ती राहू नये, असं वाटतंय ना तुम्हाला? त्यानं नॉर्मल आयुष्य जगायला हवंय ना? मग मोकळेपणानं बोला. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं समजणार?``
डॉक्टरांची ही मात्रा लागू पडली असावी. अशा केसेस कशा हॅंडल करायच्या, पालकांना किंवा रुग्णांना कसं बोलतं करायचं, हे त्यांना एवढ्या वर्षांच्या अनुभवातून सहज समजत होतं. वीणाताई थोड्या अस्वस्थ झालेल्या जाणवल्या. त्यांनी बोलण्यासाठी जुळवाजुळव केली, पण त्यांचे शब्द घशातच अडकत होते. काय बोलावं, कसं बोलावं याचीच पंचाईत होत होती. शेवटी डॉ. अंजली यांनी श्री. विलासरावांशी बोलायचं ठरवलं.
``तुम्ही वडील आहात ना त्याचे? तुम्ही सांगा. हे बघा, काही काळजी करायचं कारण नाही, इथल्या गोष्टी कुठे बाहेर जाणार नाहीत. बोला.``
वीणाताईंनी विलासरावांकडे अपेक्षेनं पाहिलं.
``किती वर्षांचा आहे तुमचा मुलगा?``
``सोळा. म्हणून तर काळजी वाटतेय.`` वीणाताई म्हणाल्या.
``काय होतंय नक्की? त्याचं कुठलं वागणं खटकलं तुम्हाला?``
आता वीणाताईंना राहवलं नाही. त्यांनी सगळंच सांगायचं ठरवलं. गेले काही दिवस मुलाचं वागणं त्यांना फारच खटकत होतं. तसं पहिल्यापासून तो कधी वेडंवाकडं वागलेला नव्हता. आईवडिलांचा आज्ञाधारक असा आदर्श मुलगा होता तो. पण वयात आल्यापासून गेली दोन तीन वर्षं त्याचं वागणं हळूहळू बदलत गेलं होतं. वीणाताईंना ते आधी लक्षात आलं नव्हतं, पण आलं, तेव्हा त्यातलं गांभीर्य त्यांच्या अगदीच अंगावर आलं. शशांक मुलींकडे वाईट नजरेने बघतो, असं वीणाताईंना जाणवलं होतं. तो पोर्न व्हिडिओ बघतानाही एकदा सापडला होता. आजूबाजूच्या काही मुलींनीही त्याच्या रोखून बघण्याबद्दल वीणाताईंकडे तक्रार केली होती, म्हणून त्यांना जास्त काळजी वाटायला लागली होती. विलासरावांना त्यांनी सांगून पाहिलं, पण त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. शेवटी वीणाताईंना कुणीतरी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला, तेव्हा त्या डॉक्टर अंजली यांची रीतसर अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडे आल्या. पहिल्या वेळेला मुलाला घेऊन येऊ नका, असं डॉक्टरांनीच सांगितलं होतं. निदान समस्या समजून घेऊ, काय करता येतं ते बघू, नंतर गरज लागल्यास तुमच्या मुलाशी मी बोलेन, असंही त्या म्हणाल्या होत्या. 
डॉक्टर अंजली यांनी वीणाताईंचं सगळं ऐकून घेतलं. वीणाताई अगदी मनापासून बोलत होत्या. मुलाबद्दलचं प्रेम आणि आता त्याच्या वागण्याची वाटणारी काळजी ठायीठायी जाणवत होती.
``काळजीचं कारण नाहीये. या वयात असं घडणं नॉर्मल आहे,`` असं डॉक्टर म्हणाल्या, तेव्हा मात्र वीणाताईंच्या चेहऱ्यावर आणखी चिंता पसरली.
``अहो खरंच नॉर्मल आहे हे. मोठ्या माणसांनी असं वागणं, हे गंभीर आहे!`` विलासरावांकडे बघत डॉक्टर अंजली म्हणाल्या.
``पण डॉक्टर..`` वीणाताई अजूनही गोंधळलेल्या वाटत होत्या.
त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच डॉक्टर अंजली म्हणाल्या, ``शशांक अजून लहान आहे, कोवळं वय आहे त्याचं. या वयातच मुलींबद्दल आकर्षण वाढीला लागतं. मी त्याच्याशी बोलेन. काळजी करू नका, इथे नाही बोलणार. माझ्या एखाद्या सेमिनारला किंवा कार्यक्रमाला त्याला घेऊन या, तिथे त्याच्याशी सहज ओळख काढून गप्पा मारेन. तुम्ही इथे आला होतात, हे सांगणार नाही. सुधारेल तो. त्याला जे वाटतंय ते नॉर्मल आहे, फक्त या भावना नक्की कशा कंट्रोल करायच्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टींमध्ये मन कसं रमवायचं, हे मी त्याला सांगेन. तो नॉर्मलच आहे आणि त्याचा हा सगळा प्रॉब्लेम लवकरच दूर होईल.`` असं डॉक्टर अंजली यांनी अगदी मायेनं सांगितलं, तेव्हा मात्र वीणाताई थोड्या रिलॅक्स झाल्या. डॉक्टरांविषयी त्यांनी आधी जे ऐकलं होतं, त्याचाच प्रत्यय त्यांना येत होता. आपल्या मुलाची समस्या वाटते तेवढी गंभीर नाही आणि तो लवकरच रुळावर येईल, हे डॉक्टरांकडून ऐकणं त्यांच्यासाठी खूपच आशादायी होतं.
``थॅंक्यू डॉक्टर. तुमचे आभार कसे मानू, तेच मला कळत नाहीये.`` वीणाताईंचा कंठ दाटून आला होता.
``तुम्ही कधी भेटाल त्याला?``
``पुढच्या महिन्यात. तोपर्यंत त्याच्याशी तुमच्या पातळीवर काय बोलायचं, कसं वागायचं, त्याबद्दल एक पुस्तक देते तुम्हाला. ते वाचून घ्या आणि तसं वागा. पुढच्या आठवड्यात मला रिपोर्ट कळवा.``
``थॅंक्यू डॉक्टर. मी नक्की वाचेन आणि तसं वागेन.`` वीणाताईंनी वचन दिलं.
``मला फक्त तुमच्याशी थोडं बोलायचंय!`` डॉक्टर अंजली म्हणाल्या आणि वीणाताईंच्या काळजात पुन्हा धस्स झालं. त्यांनी विलासरावांकडे बघून इशारा केला आणि विलासराव केबिनच्या बाहेर जाऊन बसले.

``काय झालं डॉक्टर? आणखी काही सांगायचं होतं का? शशांकबद्दल काही...```
``नाही, त्याच्याबद्दल नाही.``
``त्याला पुढच्यावेळी घेऊन येऊ का? मी कसंतरी कन्व्हिन्स करेन त्याला. येईल तो, तुम्ही म्हणत असाल तर.``
``अहो नाही. शशांकला घेऊन येण्याची काहीच गरज नाही!``
``नक्की? हवंतर घेऊन येते त्याला! त्याची नजर....`` वीणाताई अस्वस्थ झाल्या होत्या.
``त्याला आणायची गरज नाहीये! `` डॉक्टर अंजली प्रत्येक अक्षरावर भर देत मोठ्याने बोलल्या, तशा वीणाताई गप्पच झाल्या.

डॉक्टर पुढे काय बोलतात, यासाठी त्यांनी कानांत प्राण आणले होते.

``फक्त एक करा.``

``काय?``

``तुमच्या मिस्टरना पुन्हा इथे घेऊन येऊ नका!``


- अभिजित पेंढारकर.


Apr 10, 2018

का रे अबोला?

रेवा दोन दिवसांपासून थोडी गप्प गप्प आहे, या भावनेनं मधुरा अस्वस्थ झाली होती. वयात येत असलेल्या आपल्या लेकीशी बोलावं, तिचं म्हणणं समजून घ्यावं, असं तिला मनापासून वाटत होतं, पण तिला वेळच मिळत नव्हता.

खरंतर लेकीशी लहानपणापासून तिचा उत्तम संवाद होता. अधूनमधून काही ना काही निमित्तानं ती रेवाशी बोलत असे. आता मुलगी जशी मोठी होऊ लागली, तशी तिच्या कल्पना, तिचं वागणंबोलणं, तिची मानसिक, शारीरिक स्थिती याबद्दलही मधुरा खूप जागरूक होती. रेवाला कुठल्याही बाबतीत आपल्याशी बोलायला ऑकवर्ड वाटू नये, उत्तम संवाद राहावा, सगळं मोकळेपणानं बोलता यावं, असं तिला वाटत होतं. रेवा आत्ता कुठे अकरा वर्षांची होत होती, पण आता मुली लवकर मोठ्या होतात, आपल्याला जे सोळाव्या वर्षात कळत नव्हतं ते त्यांना या वयातही कळतं, हे मधुराला पक्कं माहीत होतं. म्हणूनच ती अस्वस्थ झाली होती.
रेवा दोन दिवस नीट बोलत नाही, वागत नाही, आपण काही सांगायला गेलो, तर तेवढ्यापुरतं उत्तर देते, हे तिच्या लक्षात आलं होतं. नक्की काय झालं असेल पोरीला? कुणी काही बोललं असेल का? कुणी तिच्याशी चुकीचं वागलं असेल का? शाळेत कुणी ओरडलं असेल का? कुणाचं काही चुकीचं वागणं बघितल्यामुळे तिच्या मनावर परिणाम झाला असेल का? काही वाचून, बघून चुकीचं मत तयार झालं असेल का? विचार करून करून मधुराचं डोकं फुटून जायची वेळ आली होती. तिनं शंभरवेळा ठरवलं, पण तिची आणि रेवाची बोलण्यासाठीची निवांत वेळ जुळूनच येत नव्हती.
अखेर एक दिवस ती संधी मिळाली. घरातले सगळे कुठे ना कुठे गेले होते आणि संध्याकाळच्या वेळी दोघीच घरी होत्या.
``माझ्यासाठी छान कॉफी करतेस का गं बच्चू?`` मधुरानं प्रेमानं विचारलं.
रेवानं फार प्रतिक्रिया न देता नुसती मान हलवली आणि ती कॉफी करायला स्वयंपाकघराकडे वळली. बच्चू ही लाडाची हाक मारल्यावर रेवाची कळी खुलते, असा मधुराचा अनुभव होता, पण आज ही मात्रासुद्धा फारशी लागू पडली नव्हती. काहीतरी गडबड होती, नक्कीच.
आपण तर गेल्याच आठवड्यात तिच्याशी बोललो होतो! तेव्हा ती नॉर्मल वाटत होती. मग चार पाच दिवसांत असं काय घडलं असेल?
रेवा कुठे कुठे गेली होती ह्या आठवड्यात?
मधुरानं मेंदूतल्या सगळ्या आठवणी फास्ट रिवाइंड केल्या, तरी तिला काही पत्ता लागेना. ती जास्तच अस्वस्थ झाली. नाही म्हणायला एकदा तिनं रेवाला भाजी आणायला पाठवलं होतं, तेव्हा पाच रुपयाऐवजी दहा रुपयांना कोथिंबिरीची जुडी घेऊन आली, त्यावरून आजी तिला थोडं बोलली होती. त्याच्यावरून काही बिनसलं असेल का? की सोसायटीत नव्यानंच राहायला आलेल्या घरी ती एका वाढदिवसाच्या पार्टीला गेली, तिथे काही घडलं असेल?
``कॉफी!`` रेवाच्या शब्दांनी मधुरा भानावर आली.
``तुला नाही केलीस?`` मधुराला आश्चर्य वाटलं.
उत्तरादाखल रेवानं फक्त `च्यक्` केलं.
मधुरानं आग्रहानं आपल्यातली थोडी कॉफी दुसऱ्या कपात ओतून तिला दिली.
तिच्याशी संवाद साधण्याची हीच संधी होती. अभी नहीं, तो कभी नहीं!
``रेवा, काय झालंय सोन्या?`` तिनं आईच्या मायेनं विचारलं.
``काही नाही.`` रेवानं नजरेला नजर न देता उत्तर दिलं, तेव्हाच काहीतरी झालंय, हे मधुरातल्या आईनं हेरलं.
``मला सांगणार नाहीस? आपण बोलतो की नाही मोकळेपणानं? आपण मैत्रिणी आहोत ना एकमेकींच्या? मग? सांग बघू...!``
प्रत्येक शब्दागणिक मधुरा रेवाच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव टिपत होती. तिची चुळबूळ वाढल्याचं मधुराला जाणवत होतं. आता भावनांचा कडेलोट होऊ न देता तिच्याकडून काय झालंय ते काढून घेणं, हे शिवधनुष्य तिला पेलायचं होतं, पण त्यात ती तरबेज होती.
``घरी कुणी ओरडलं का?``
रेवानं नकारार्थी मान हलवली.
``बाबा काही चिडून बोलले का?``
तरीही नकार कायम राहिला.
``आजी-आजोबांशी काही भांडण?``
``अं हं...!``
``शाळेतल्या बाई काही....``
नकार कायम राहिला.
``खाली खेळताना कुणी....``
``वॉचमनकाकांमुळे काही.... ``
``तू क्लासला जातेस, तिथलं कुणी... ``
सगळ्यांना नकारार्थी उत्तरं येत राहिली आणि मधुराचा धीर खचत चालला. तिची कल्पनाशक्तीही आता संपत चालली होती.
``त्या दिवशी वाढदिवसाला त्या नव्या शेजाऱ्यांकडे गेली होतीस, तिथे काही...`` तिनं प्रश्न विचारला आणि रेवाच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. मधुराचं काळीज हललं. म्हणजे आपला तर्क खरा होता तर!
आता आपलं कोकरू आपल्या कुशीत येऊन धाय मोकलून रडत काय काय सांगणार, या कल्पनेनंच तिच्या पोटात गलबललं.
``काय झालं बाळा तिथे?`` मधुरानं रेवाचा अंदाज घेत, स्वतःवर प्रचंड कंट्रोल ठेवत विचारलं. तिचं उत्तर ऐकण्यासाठी तिचे प्राण कानांत गोळा झाले होते.
``काहीच नाही!`` रेवानं उत्स्फूर्तपणे उत्तर दिलं, ``आम्ही पावभाजी खाल्ली, आईस्क्रीम खाल्लं आणि घरी आलो!``
मधुराचा बार फुसका ठरला होता. थोडक्यात, तिथे काहीच झालं नव्हतं. आता मात्र मधुराची सहनशक्ती संपत चालली.
``अगं, मग अशी का वागतेयंस दोन दिवस? गप्प गप्प का असतेस तू? काय झालंय तुला? कुणावर रागावलेयंस?`` मधुराला राग येत होता, पण आई म्हणून जबाबदारीनं वागणं महत्त्वाचं होतं.
दोन क्षण शांततेत गेले. मायलेकी एकमेकींच्या नजरेला नजर देत बघत राहिल्या.
``आई, खरं सांगू?``
``हो. खरंच सांग!`` मधुरा कळवळून म्हणाली.
``तू रागावणार नाहीस ना?``
``नाही बेटा. काहीही झालं असलं, तरी सांग. मला आज उत्तर हवंय. कुणामुळे तू अशी उदास असतेस?``
रेवाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती म्हणाली, ``तुझ्यामुळे!``
काही क्षण मधुराचा तिच्या कानांवर विश्वासच बसेना. पूर्वीच्या कादंबऱ्यांत नायिकांना नायकाने नकार दिल्यानंतर त्यांच्या कानात कुणीतरी तप्त लाव्हा वगैरे ओतल्यासारखा फील यायचा ना, तसं काहीतरी तिला झालं.
`अगं पण का? मी काय केलंय?`` मधुराच्या बोलण्यात उत्सुकता, उद्विग्नता, कुतुहल, राग, आर्तता वगैरे सगळंच दाटून आलं होतं.
``अगं, काय होणारेय मला दर चार दिवसांनी? इथे तुझ्या समोरच असते ना? `काय झालं बेटा,` असं सारखं काय विचारायचं? बोअर होतं मला! म्हणूनच मूड गेला होता माझा.`` शक्यतो आईला न दुखावता, आवाजात नम्रता ठेवून रेवा म्हणाली आणि तिच्यासमोरून उठली.
``मी खेळायला जातेय खाली. तासाभरात येते!`` असं म्हणून सॅंडल घालून खाली पळालीसुद्धा!

मधुराच्या डोक्यावरचं मोठ्ठं ओझं एकदम उतरल्यासारखं झालं. तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. साडेसात वाजायला आले होते. 
...आणि त्याच वेळी तिला जाणवलं, आणखी एक मोठी समस्या आपल्यासमोर आपल्यासमोर आ वासून उभी आहे – `आज रात्रीला भाजी काय करायची?`


Mar 3, 2018

आयडेंटिटी क्रायसिस



``नितीन, तुझा फोन वाजतोय कधीपासून. घेत का नाहीयेस?`` प्रिया किचनमधूनच ओरडली.
``अगं, मी बाथरूममध्ये आहे. इथून कसा घेऊ फोन?``
``बरं, मी बघते,`` असं म्हणून प्रिया हात पुसून नितीनचा फोन बघण्यासाठी बाहेर आली. नितीनची अंघोळ उरकतच आली होती, तेवढ्यात प्रियाच्या किंचाळण्यामुळे त्याच्या हातातून तांब्या पायावर पडला आणि तोही किंचाळला.
``अगं, झालं काय एवढ्यानं किंचाळायला?``
``काय काय नावानं फोन नंबर सेव्ह करतोस रे?`` प्रिया आता त्याच्याशी भांडण करण्याच्या पवित्र्यात बाथरूमच्या बाहेर उभी राहिली होती.
``काय झालं? `` टॉवेल गुंडाळून बाहेर येत नितीन म्हणाला.
``अवदसा`, अशा नावानं कुणाचा नंबर कसा काय सेव्ह करू शकतोस तू?``
प्रियाच्या या वाक्यावर नितीनच्या हातून टॉवेल निसटणारच होता, पण त्यानं वेळीच टॉवेलला (आणि स्वतःला!) सावरलं.
प्रिया ढिम्म होती.
तिच्या चेहऱ्यावरची एकही वक्ररेषा हलली नव्हती.
``एकेकाळी माझ्या हातून असा टॉवेल निसटला, की कसली कातिल नजरेनं बघायचीस तू माझ्याकडे! आता खुनशी नजरेनं बघतेस. `` नितीन कुरकुरला.
``विषय वेगळा चाललाय इथे. अवदसा कोण आहे? ``
``अगं, ती ही....आपली... ``
``आपली? ``
``आपली म्हणजे, ती मार्केटिंगवाली गं. मार्केटिंग एजन्सीमधून फोन येतो नेहमी त्या नंबरवरून. म्हणून मी तशा नावानं सेव्ह करून ठेवलाय तो. ``
``असंय होय? ``
``म्हणजे? तू संशय घेतेयंस माझ्यावर? ``
``नाही रे राजा. माझा भोळा सांब तू. माझ्याशिवाय दुसरी कुणीही तुझ्या मनात नाहीये, माहितेय मला. तुझ्यावर कसा संशय घेईन मी?`` प्रिया `श्यामची आई टोन`मध्ये बोलली आणि नितीनचा चेहरा खुलला. एवढ्यात एकदम ती `सत्या`ची शेफाली छाया बनत म्हणाली, ``असं वाटण्याएवढा तू भोळा नाहीयेस आणि तुला तसा फील देण्याएवढी मी निर्बुद्ध!``
नितीनचा खळ्ळकन स्वप्नभंग झाला. निघायचंय मला लवकर, असं म्हणून त्यानं तिथून कल्टी मारली.
....
दोन दिवसांनी पुन्हा असाच प्रकार घडला. यावेळी रणसंग्रामाचं ठिकाण बाथरूमबाहेरच्या पॅसेजऐवजी गॅलरी होती. रविवारच्या सुटीच्या निमित्तानं नितीन बागकामाचा पसारा मांडून बसला होता आणि तेवढ्यात त्याचा फोन वाजला. नेमकी त्याला रिंगटोन ऐकू गेली नाही आणि प्रियानं फोन बघितला. यावेळी नाव डिस्प्ले होत होतं - `भवानी.` पुन्हा तोच सुमधुर संवाद घडला. तिनं त्याला फोन वाजतोय सांगणं, त्यानं फोन घेता येत नसल्याचं कारण सांगणं, तिनं त्या विचित्र नावाबद्दल चौकशी करणं आणि त्यानं दचकणं, लपवाछपवी करणं, काहीतरी थातुरमातुर सांगून वेळ मारून नेणं.
``पण आज तर रविवार आहे, मार्केटिंगचा कॉल येणं शक्यच नाही!`` प्रियानं मुद्द्याला हात घातला.
``अगं, तुला माहिती नाहीयेत हे लोक. हे रविवारची सुटी कशी घालवावी, याचंही मार्केटिंग करू शकतील!`` नितीनच्या खुलाशावर प्रिया काही वेळ गप्प झाली, पण तिचं पूर्ण समाधान झालं नव्हतं.

तिच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळायला लागला होता. कोण करत असेल नितीनला फोन? तो फोन घेत का नसेल? असं काय घडलं असेल, फोन न घेण्यासारखं? गेल्यावेळी `अवदसा` म्हणून फोन आला होता, तो हाच नंबर नाही ना, हे तपासावं असं तिला वाटत होतं, पण नितीनच्या समोर त्याचा फोन तपासणं हे तिच्या `नवऱ्यावर अजिबात संशय न घेणारी बायको` या इमेजला धक्का लावून घेण्यासारखं होतं. तरीही तिचं मन काही तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. याबद्दल कुणाचा तरी सल्ला घ्यावा, कुणापाशी तरी मन मोकळं करावं, असं तिला वाटत होतं. या परिस्थितीत तिला आईशिवाय दुसरं कुणी जवळचं वाटलं नाही.
``ठीक आहे, मी बोलेन जावईबापूंशी!`` आईनं दिलासा दिला, तेव्हा प्रियाला मनावरचं मणाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं.
``आणि काळजी करू नकोस, जावईबापू चांगले आहेत आमचे. ये सिर्फ तुम्हारा वहम है.`` हिंदी सिनेमे बघत असल्याचा आईवर वाईट परिणाम झालाय, हे प्रियाच्या लक्षात आलं.

प्रियाच्या आईनं तिचा शब्द पाळला. तिनं नितीनला फोन करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही ना काही कारणानं तिचा संवादच होऊ शकला नाही. शेवटी प्रियानंच आईला सांगितलं, की सध्या तू लक्ष घालू नकोस. प्रकरण अगदीच हाताबाहेर गेलं, तर मी तुला कळवेन. आईलाही बरं वाटलं. तसंही नितीनचं आपल्या आईशी फारसं पटत नाही, याची प्रियाला कल्पना होतीच.

काही दिवस असेच भाकड गेले. मधल्या काळात काहीच घडलं नाही. प्रियाला तो नंबर तपासून बघण्याची उत्सुकता होती, पण ती योग्य संधीच्या शोधात होती. आणि एक दिवस तिला ती सुवर्णसंधी मिळालीच. `अवदसा` या नावानं सेव्ह केलेला नंबर तिनं शोधला, पण आता कॉंटॅक्ट लिस्टमध्ये हा नंबर नव्हता. तिला आश्चर्याचा धक्का बसला, संशय आणखी बळावला. आपण फोन तपासणार, याचा नितीनला आधीच संशय आला होता की काय? त्यानं नंबर डिलीट का केला असेल? निदान `भवानी`चा नंबर तरी शोधावा, असा विचार तिच्या मनात चमकून गेला आणि त्या नावानं तिनं सर्च दिला, पण हाय रे कर्मा! `भवानी`सुद्धा कॉंटॅक्ट लिस्टमधून अंतर्धान पावली होती. आता मात्र प्रिया भयंकर अस्वस्थ झाली. फोन नंबर तोंडपाठ असण्याची कला आपल्याला वश व्हायला हवी होती, असं तिला राहून राहून वाटलं. `तुझा नवराही मेन विल बी मेन कॅटेगरीतला आहे गं सिंड्रोम`ने तिचा पूर्ण ताबा घेतला आणि आता नवऱ्यावर डोळ्यात तेल घालून पहारा करण्याचा निश्चय तिनं करून टाकला.

अर्थात, प्रियाच्या दुर्दैवाचे दशावतार एवढ्यात संपणारे नव्हते. आपल्याला निवांत वेळ असेल आणि टीव्हीवर सिनेमा बघण्याचा मूड असेल, तेव्हा फक्त `सूर्यवंशम,` `मैं हूं सबसे बडा खलनायक नंबर वन` आणि `मुंबई की फूलनदेवी` एवढेच ऑप्शन्स असतात ना, तसंच काहीसं प्रियाच्या बाबतीत झालं. ती त्या विचित्र नावाच्या नंबरवरून फोन येण्याची चातकिणीसारखी वाट बघत होती आणि तिचं नशीब कुठेतरी पेंड खात होतं.
नितीनच्या आयुष्यात आपल्या पलीकडे कुणीतरी आहे आणि तीच त्याला फोन करून त्रास देतेय, तिचे फोन नितीन टाळतोय, अशी प्रियाची खात्री झाली होती. फक्त ती कोण, एवढं समजणं बाकी होतं. तिनं त्याचे सगळे चॅट्ससुद्धा त्याच्या नकळत तपासले होते, पण साजिद खानच्या सिनेमातून जसं काहीच हाताला लागत नाही, तसंच तिच्या हाती काही लागलं नव्हतं.

अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर तिचा भाग्योदय घडवणारा तो दिवस उजाडला.
त्या दिवशी पुन्हा नितीनच्या अनुपस्थितीत त्याचा फोन वाजला आणि `च्यायला, डोक्याला ताप!` असा नंबर डिस्प्ले होऊ लागला. ही तीच बया असणार, हे प्रियाच्या लक्षात आलं. प्रियानं झडप घालून फोन उचलला, पण तोपर्यंत तो कट झाला होता. ती चरफडली. तिनं पुन्हा त्याच नंबरवरून फोन लावायचा प्रयत्न केला, पण तो लागला नाही. ती अस्वस्थ झाली. तिनं नंबर तपासला. तो ओळखीचा वाटत होता, पण नक्की कुणाचा आहे, कळत नव्हतं. आज नितीन फोन घरीच विसरून बागेत फिरायला गेला होता आणि तेवढ्या वेळात या नंबरचा छडा लावण्याचं अग्निदिव्य प्रियाला पार पाडायचं होतं. तिनं आपल्या सगळ्या मैत्रिणींची नावं आठवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे नंबर शोधले, पण त्यांपैकी कुणाचाच तो नंबर नव्हता. तिनं नितीनच्या माहीत असलेल्या मैत्रिणींची नावं आठवली, त्यांचे नंबरही शोधले, पण व्यर्थ! शेवटी तिनं नितीनच्या ऑफिस कर्मचारी, सोसायटीतील शेजारी, क्लबचे मेंबर्स, अगदी मुलाच्या शाळेतल्या ताईंचे नंबर्ससुद्धा आठवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच क्लू मिळत नव्हता.
अचानक तिला काहीतरी सुचलं. आपल्या मोबाईलवरून त्या नंबरवर फोन केला तर?
``शी! हे आधी का सुचलं नाही?`` प्रिया स्वतःवरच चरफडली.
तिनं नितीनच्या फोनवरचा तो नंबर पुन्हा बघितला आणि आपल्या फोनवरून तो नंबर डायल केला. रिंग वाजू लागली आणि तिच्या जीवात जीव आला. तेवढ्यात दार उघडून नितीन आत आला. प्रिया जाम घाबरली आणि कानाला लावलेला फोन तिनं तसाच कट केला.
``चल लवकर, आपल्याला काळे काकांकडे जाऊन यावं लागणारेय. ते अचानक आजारी पडलेत!`` नितीननं तिला सांगितलं आणि ती पटकन आवरून त्याच्याबरोबर बाहेर पडली. आत्ताच डायल केलेला नंबर आपल्याकडे सेव्ह आहे की नाही, हे बघण्यासाठीही तिला वेळ मिळाला नाही.

काळे काकांच्या घरीच तासभर गेला. सगळी हालहवाल विचारून, त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था करून दोघं परत आले, तेव्हा प्रियानं मोबाईल बघितला आणि आईचे चार मिस कॉल्स बघून ती चमकलीच.
तिनं घाईघाईनं आईला फोन केला. आईनं फोन उचलेपर्यंत प्रियाच्या जिवाची घालमेल सुरू होती. आईला काही त्रास तर झाला नसेल ना, बाबांची तब्येत ठीक असेल ना, शंभर शंका तिच्या मनात येत होत्या. शेवटी एकदाचा आईने फोन उचलला.
``आई, काय गं, कशासाठी फोन केला होतास? चार मिस कॉल्स होते तुझे. सगळं ठीक आहे ना?`` प्रियानं एका दमात विचारून टाकलं.
``आमच्याकडे सगळंच ठीक आहे गं. पण तू कशासाठी फोन केला होतास?``
``मी? कधी?``
``एक तासापूर्वी! म्हणून तर मी तुला पुन्हा फोन करत होते!``

-    अभिजित पेंढारकर

Oct 15, 2017

घेता, किती घेशील दो कराने?


``आज संध्याकाळी जायचंय ना हो आपण खरेदीला?`` सकाळी पेपर वाचताना सौ. किरकिरे एकदम आठवल्यासारख्या ओरडल्या आणि सगळ्या घराचं लक्ष वेधलं गेलं. बहुधा कुठल्यातरी साडीच्या दुकानांतल्या आकर्षक साड्यांच्या जाहिरातींवर त्यांची नजर पडली होती.

 

यंदा दिवाळीचा फराळ स्वस्त, घरांच्या किमती कमी होणार, अशाच बातम्या महिनाभर झळकत होत्या. एसटीचा प्रवास थोडासा महागणार असल्याची कुणकुण होती, पण यावेळी कुठे फिरायला जाण्याचा बेत नव्हता. पेट्रोलच्या किंमतींवरून रणकंदन झाल्यानंतर सरकारनं पेट्रोल दोन-चार रुपये कमीच केलं होतं आणि काही पदार्थांच्या जीएसटीमध्येही कपात केली होती. थोडक्यात, विरोधकांच्या मोर्चांशिवाय महागाईचं विशेष विरोधी वातावरण कुठे नव्हतं. त्यामुळे खरेदीसाठीही अगदी अनुकूल काळ होता. त्यातून दिवाळी अगदीच दोन दिवसांवर आली होती आणि आज खरेदीला जाणं आवश्यकच होतं. कुमार आणि सुकन्येचे खरेदीचे तर भलेमोठे प्लॅन्स कधीपासून आखून तयार होते. त्यासाठीची यादीही त्यांनी तयार ठेवली होती.

``आम्ही लहान होतो, तेव्हा आम्हाला असं कुणी विचारतही नव्हतं!`` किरकिरे आजोबांनी सकाळपासून तीनशेएकोणसत्तराव्या वेळेला हे वाक्य उच्चारलं, तेव्हा समोर ऐकून घ्यायला कुणी नव्हतं. ``वर्षातून एकदा नवीन कपडे मिळायचे, तेसुद्धा दिवाळीला. वडील कुठूनतरी स्वस्तातलं एखादं कापड घेऊन यायचे आणि मग त्यातच घरातल्या सगळ्या भावंडांची शर्टांची शिलाई व्हायची.`` आजोबांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यपूर्वकाळातली टेप वाजवली. ``अरे श्रीधर, तुला चष्म्याची नवीन फ्रेम सांगितली होती, ती आणलीस का रे?`` त्यांना तेवढ्यात काहीतरी आठवलं.

``ती बाजारातच आली नाहीये हो अजून! तो दुकानदार वैतागला होता माझ्यावर, दर महिन्याला तुमच्यासाठी वेगवेगळ्या फ्रेम्स मागतो म्हणून!`` श्री. किरकिरेंनी शक्य तेवढ्यात नम्र आवाजात खुलासा केला.

``बरं ठीकेय, संध्याकाळी तसंही आपण बाहेर शॉपिंगला जाणारच आहोत, तेव्हा काय ते बघू.`` आजोबांनी विषय मिटवून टाकला. आजीलाही बाजारात नवी आलेली नवी `पाठक बाई स्टाईल` साडी घ्यायची होती, पण एकदम संध्याकाळीच विषय काढू, असं तिनंही ठरवून टाकलं होतं. चिरंजीवांना कॉलेजसाठी नवीन बूट घ्यायचे होते. खरंतर अजून त्याची दहावीच सुरू होती, तरीही मनातून तो कॉलेजला कधीच पोचला होता. सुकन्येला आलिया भट स्टाईल पलाजो घ्यायचा होता, कृती सेनॉन स्टाईल लेहंगा, कंगना स्टाईल स्पॅगेटी टॉप आणि दीपिका स्टाईल अनारकलीही हवा होता. एकूण सगळ्यांचे सगळे प्लॅन्स ठरले होते. ठरला नव्हता तो एकाच व्यक्तीचा प्लॅन आणि ती व्यक्ती होती, श्री. किरकिरे. सगळ्यांना नव्या खरेदीसाठी मूड आला होता आणि श्री. किरकिरेंना फक्त टेन्शन आलं होतं...खर्चाचं. सगळ्यांच्या इच्छाआकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या एकट्यावर होती, कारण घरखर्चाचा कोलमडणारा हिशोब त्यांना सावरायचा होता. सकाळपासून त्यांची जी घालमेल चालली होती, त्यावरूनच सौ. किरकिरेंना अंदाज आला होता. त्यामुळे आपल्या खरेदीची यादी आयत्यावेळीच जाहीर करावी आणि दुकानदारानं गळ घातली म्हणून घ्यावं लागलं, असा देखावा निर्माण करावा, असा त्यांचा बेत होता.

दुपारपर्यंत फारसं काही उत्साहवर्धक घडलं नाही, पण दुपारनंतर घडामोडींना वेग आला. सरकार पाडण्यासाठी किंवा मंत्रिमंडळ विस्तारासाठी येतो, तसा.

``सगळ्यांनी एकत्र खरेदी जायलाच हवं का?`` चिरंजीवांनी शंका काढली. त्यांना संध्याकाळी टीव्हीवर लागणारी फुटबॉलची मॅच बघायची होती. खरंतर दिवाळीच्या तोंडावर संध्याकाळी एकत्र बाहेर खरेदीसाठी जाण्याचा कुमारी किरकिरेलाही वैताग आला होता, पण तिला खरेदीसाठी दुसरं कुणी पार्टनरही मिळालं नव्हतं. शिवाय बंधुराज घरी असल्यामुळे तिला निवांतपणे घरी बसून `हाफ गर्लफ्रेंड`ही बघता येणार नव्हता. तिची त्यावरून धुसफूस सुरू झाली. आजीआजोबांना पाय मोकळे करायला बाहेर पडायचंच होतं, पण पावसाची लक्षणं दिसत होती आणि आता भिजण्याची कुणाचीच इच्छा नव्हती.

``ते ऑनलाइन का काय ते शॉपिंग करता ना तुम्ही? ते कुठे जाऊन करतात?`` आजीनं शंका काढली, तसे चिरंजीव आणि सुकन्या फिस्सकन हसले.

``अगं आजी, ऑनलाइन शॉपिंग घरीच करता येतं. त्यासाठी कुठे जावं लागत नाही.`` सुकन्येनं आजीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग तिनं मोबाईलवर वेगवेगळ्या वेबसाइट्स कशा असतात, तिथे केवढ्या व्हरायटी असतात, लेटेस्ट ट्रेंड आणि कस्मटर रेटिंग बघून कसं खरेदी करता येतं, हे सगळं तिला दाखवलं. ``पण मोबाईलवर दुकानदाराशी घासाघीस कुठे करता येतेय?`` या आजीच्या प्रश्नावर कुणाकडेच उत्तर नव्हतं. आणि खरेदीची मजा घासाघीस करून दुकानदाराकडून आपल्याला पाहिजे तशा वस्तू आपल्याला हव्या त्या दरात घेण्यातच आहे, असं सांगून आजीनं ऑनलाइन शॉपिंगचा प्रस्ताव धुडकावून लावला.

बाहेर जाऊन ही मंडळी किती खरेदी करणार आणि त्यासाठी किती वेळ खर्ची घालणार, याचा अजूनही श्री. किरकिरेंना अंदाज येत नव्हता. नाही म्हणायला एक गोष्ट त्यांना साथ देत होती, ती म्हणजे पाऊस. दुपारपासून जो काही पाऊस लागला होता, त्यामुळे सगळ्यांच्याच खरेदीच्या उत्साहावर विरजण पडलं होतं. छत्र्या आणि रेनकोट सांभाळत आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत खरेदीला जाण्यात कुणालाच रस नव्हता. निदान आजचा बेत उद्यावर गेला, याचा सूक्ष्म आनंद श्री. किरकिरेंच्या चेहऱ्यावर झळकत होता. अर्थात, आज खरेदीला गेलो नाही, तर उद्यापासून आपल्याला वेळ नाही आणि मग मनासारखी खरेदी राहूनच जाईल, याचा सौ. किरकिरेंना अंदाज होता. काहीतरी करायला हवं होतं.

 

``पण संध्याकाळी घरी बसून काय करायचं?`` चिरंजीवांनी विचारलेली शंका सौ. किरकिरेंच्या पथ्यावर पडली.

``मी मस्त उपाय सांगते!``  उत्साहाने उडी मारत त्या पुढे आल्या. पुन्हा सगळ्यांचे कान टवकारले गेले.

``आठ दिवस फराळाच्या कामामुळे घरातल्या साफसफाईला वेळ मिळाला नव्हता. सगळे अनायसे घरी आहेत, तर आजच करून टाकूया साफसफाई! सगळ्यांची मदत होईल!``

 

सौ. किरकिरेंनी हे वाक्य उच्चारलं मात्र, पुढच्या दहा मिनिटांत घरातले सगळे मरगळलेले, सुस्तावलेले, कंटाळलेले चेहरे पावसापाण्याची पर्वा न करता बाजारातील गर्दीत खरेदीच्या उत्सवात रममाण झाले होते!


 

-    अभिजित पेंढारकर.

Jul 17, 2017

अटी लागू

10.30 am
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या ग्रुपचा सध्या दिवसेंदिवस गुणात्मक ऱ्हास होत चालला आहे. इतर ग्रुप्सपेक्षा आपले वेगळेपण जपण्यासाठी, आपण प्रत्येकाशी बोलून, चर्चा करून, निवडून मोजकेच असे 40 सदस्य ग्रुपमध्ये घेतले होते. परंतु सुरुवातीच्या काळात कुठल्याही विषयावर हिरिरीने आणि अभ्यासपूर्ण चर्चा करणाऱ्या सदस्यांना सध्या टाइमपास आणि चहाटळकीव्यतिरिक्त बोलण्यासाठी काही विषयच राहिलेले नाहीत, असे निदर्शनास आले असून, ही अतिशय गंभीर बाब आहे. आधी कला, साहित्य, राजकारण, सामाजिक समस्या, अर्थव्यवस्था, आर्थिक नियोजन अशा विषयांवर गांभीर्याने चर्चा करणारे सदस्य आता नटनट्यांच्या लफड्यांपासून आपापल्या कपड्यांच्या खरेदीपर्यंत कुठल्याही विषयावर अर्थहीन, चहाटळ, थिल्लर आणि वाह्यात चर्चा करू लागले आहेत, हे खरंच खेदजनक आहे. नाइलाजाने हा ग्रुप काही काळासाठी स्थगित करावा किंवा कायमचा बंद करावा, असा निर्णय घ्यावा लागत आहे. यापैकी योग्य पर्याय निवडून लवकरच जाहीर करण्यात येईल. कृपया कुणी याबद्दल वैयक्तिक गैरसमज करून घेऊ नये. या विषयावर कुठलीही चर्चा पर्सनल चॅटवर करू नये, ही विनंती.``
- आपला ॲडमिन.
....
12.30 pm
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपवरच्या काही गैरप्रकारांबद्दल स्पष्ट मत व्यक्त करून ग्रुप बंद करण्याचा किंवा स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक सदस्यांनी ग्रुपवर किंवा पर्सनली विनंती करून ग्रुप बंद करू नये, अशी मागणी केली आहे. ग्रुपची शिस्त आणि नियम यांसाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीसुद्धा दिली आहे. तरीही, थोड्या प्रमाणात मनोरंजन आणि वैयक्तिक गप्पा होणारच, अशी शक्यताही व्यक्त केली आहे. त्याचबरोबर जास्तच वाह्यातपणा करणाऱ्या सदस्यांना योग्य ताकीद द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. या सर्व सूचनांचा विचार करून ग्रुप बंद करण्याचा निर्णय सध्या घेऊ नये, असा विचार असून, ग्रुपच्या भवितव्याबद्दलचा पुढील निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल.``
- आपला, ॲडमिन.
....
2.30 pm.
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपच्या बिघडलेल्या शिस्तीबद्दल ग्रुपच्या बहुतेक सदस्यांशी वैयक्तिक चर्चा केल्यानंतर काही सदस्यांनी ग्रुपमध्ये थोडा मोकळेपणा असण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जास्त टाइमपास नको, पण अध्येमध्ये हलकेफुलके मेसेज यायला हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या सूचनेचा गंभीरपणे विचार करून, सरसकट सगळ्यांना अशा मेसेजचा त्रास होऊ नये आणि ग्रुपच्या मूळ नियमांना हरताळ फासला जाऊ नये, म्हणून आपल्याच मूळ ग्रुपचा एक सहग्रुप म्हणून वेगळा ग्रुप तयार करावा आणि त्यात या मोकळेपणाला, थोड्याफार टाइमपासला वाव द्यावा, असा विचार समोर आला आहे. या निर्णयाला मान्यता असलेल्या आणि नव्या ग्रुपमध्ये येण्यास इच्छुक असलेल्या सदस्यांनी कृपया पर्सनलवर मेसेज करावा.``
- आपला, ॲडमिन.
....
4.30 pm.
आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपबरोबरच एक नवा सहग्रुप स्थापन करण्याबद्दल काही सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, असा ग्रुप लवकरच तयार करण्यात येईल आणि त्यात इच्छुक सदस्यांना प्रवेश दिला जाईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.
- आपला ॲडमिन.
- ....
4.45 pm.
Admin created new group – `Serious friendship-on tp mode.`
Admin added 38 new members to the group.
सदस्यांच्या मागणीनुसार नवा ग्रुप तयार करण्यात आला असून, केवळ इच्छुक सदस्यांनाच त्यात प्रवेश देण्यात आला आहे. आधीच्या ग्रुपमधल्या एका सदस्याशी काहीच संपर्क होऊ न शकल्याने त्याला या ग्रुपमध्ये घेण्याबद्दलचा निर्णय झाला नाही. बाकी इच्छुकांना ग्रुपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.
आधीच्या ग्रुपची सर्व शिस्त आणि नियम इथे धाब्यावर बसवले जातील, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, ही नम्र विनंती.
- आपला, ॲडमिन.

नशीब


``काय काय नशीबाचे भोग आले नाही, आपल्या वाट्याला? आजचा दिवस कधी बघू शकेन, असं वाटलंच नव्हतं मला.`` ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकत म्हणाली.
``खरंच. माझ्या मनातलं बोललीस. मी तुला मधल्या काळात धीर देत होतो, पण मनातून पार खचून गेलो होतो. आपण कधी एकत्र येऊ, ही आशाच सोडून दिली होती.`` त्यानं हळूच डोळे पुसले.
``नशीब आपल्याला कुठेकुठे घेऊन जातं, नाही? तुला सांगू, नशीब वगैरे गोष्टींवर आधी माझा कधीच विश्वास नव्हता. `माझी वेळ चुकली,` `नशीबात असेल ते मिळतंच`, वगैरे गोष्टींची टर उडवायचे मी एकेकाळी. पण तुझ्याशी भेट झाली आणि मी हळूहळू बदलत गेले.``
``केवढी कचाकचा भांडली होतीस, पहिल्याच दिवशी माझ्याशी, आठवतंय? ह्या मुलीचं पुन्हा आयुष्यात कधी तोंड बघायचं नाही, असं ठरवलं होतं मी!``
``हो, मीसुद्धा!`` ती हसून म्हणाली.
``चोराच्या उलट्या बोंबा!``
``का? तुझी काहीच चूक नव्हती त्या दिवशी?``
``अजिबात नव्हती! रांगेत मीच पुढे होतो. तू उशिरा आली होतीस!``
``आता पुन्हा त्यावरून भांडणारेस का आज माझ्याशी? चार वर्षं झाली त्या गोष्टीला. त्याच्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय साहेब!``
``हो, आपण पुन्हा भेटलो तेव्हा पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यातच अडकलो होतो. तेव्हासुद्धा मला बघून तोंड फिरवलं होतंस तू. पण दुसरा काही पर्यायच नव्हता, म्हणून माझी छत्री, माझा रुमाल, माझी गाडी, सगळंच घेतलंस.``
``आणि तुझं मनसुद्धा, ना?``
``शी! खूपच पांचट होता हा!``
``असू दे. तुझ्याकडूनच शिकलेय!``
``विषय बदलू नकोस. बरं, नेलंस ते नेलंस, दुसऱ्या दिवशी वेळेवर आणूनसुद्धा दिलं नाहीस!`` त्यानं पुन्हा तिची खोडी काढली.
``हो क्का? बरं! मग आत्तासुद्धा तुझीच गाडी घेऊन मी घरी जाते. तू ये चालत.`` ती फणकाऱ्यानं उठली.
``अगं अगं! रागावतेस काय नुकतंच प्रेमात पडल्यासारखी? साडेतीन वर्षं झाली आपण प्रेमात पडून. आज आपलं लग्नसुद्धा झालंय. इथे मस्त समुद्रावर आलोय, जरा बसूया निवांत. गप्पा मारू. घरी जाऊन पुन्हा भांडायचंच आहे! `` त्याच्या या वाक्यावर तिला हसायचं नव्हतं, पण तिला ते आवरता आलं नाही.
``स्वीट रास्कल आहेस तू. कितीही टोकाचं भांडण झालं, तरी दोन मिनिटांत नॉर्मलला येतोस आणि माझी समजूत काढतोस. तुझ्या याच स्वभावावर फिदा झालेय मी.``
``आणि मी तुझ्या वस्सकन अंगावर येण्यावर!`` त्यानं पुन्हा तिला चिमटा काढला.
``आपल्या भांडणाचं काही टेन्शन नाही रे, पण आपल्या घरच्यांची भांडणं कधीच मिटणार नाहीत, याची काळजी वाटतेय मला. माझ्या नशीबात सासरचे आणि माहेरचे दोन्ही नातेवाईक नसणारेत, यापुढे कधीच.``
``थोड्या दिवसांनी होईल सगळं सुरळीत. काळजी नको करू.``
``नाही होणार. मी दोन्ही घरच्यांना ओळखते. त्यांच्या मनातला आपल्याबद्दलचा आणि एकमेकांबद्दलचा राग बघितलाय मी. आणि खोट्या आशेवर जगायला मला नाही आवडत.``
``हं. खरंच आहे. आपल्या नशीबात ते नव्हतं, असं म्हणू आणि आपलं आयुष्य जगायला लागू.``
``करेक्ट बोललास. आणि मला कसलीही खंत नाहीये. घरच्यांचे आशीर्वाद मिळाले नसतील, पण रीतसर रजिस्टर लग्न झालंय आपलं. आता आयुष्यभर तू माझ्याबरोबर आहेस ना, मग बास! तुझी साथ असेल, तर नशीब साथ देईलच!``
ती त्याच्या मिठीत शिरली आणि त्यालाही भरून आलं.
...
संध्याकाळी समुद्राजवळच्या रस्त्यावर भरपूर गर्दी जमली होती. नुकताच एक भीषण अपघात तिथे झाला होता. पोलिसांचा घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. अपघात झालेली बससुद्धा एका इलेक्ट्रिक पोलवर धडकलेल्या अवस्थेत तिथेच उभी होती. तिच्या चाकापाशी रक्ताचं थारोळं साचलेलं दिसत होतं.
कुणीतरी शेजारच्या माणसाला म्हणत होतं, ``दोघं जण गेले म्हणे. आजच लग्न झालं होतं त्यांचं. बिच्चारे! समुद्रावर फिरायला आले होते. घरी जात असताना एकदम बसचे ब्रेक फेल झाले आणि या दोघांना धडक बसली. दोघंही ऑन द स्पॉट खलास!``
शेजारी म्हणाला, ``वाईट झालं. काय तरी नशीब असतं नाही एकेकाचं?``

शेजारधर्म!

``नमस्कार. आत येऊ का?`` दारात उभ्या असलेल्या त्या अनोळखी गृहस्थांनी नम्रपणे विचारणा केली आणि शंतनुनं अदबीनं त्यांना नमस्कार करून दार उघडलं.
``अहो या ना, प्लीज!`` त्यानं दारात उभ्या असलेल्या त्या दांपत्याचं स्वागत केलं, पण हे नक्की कोण आहेत, हा उलगडा काही त्याला झाला नव्हता.
``सॉरी, आपली ओळख नाही आणि आम्ही असे अचानक तुम्हाला न कळवता आलो. डिस्टर्ब तर नाही ना केलं? `` त्यांनी पुन्हा नम्रपणा दाखवला.
``नाही हो. इट्स ओके. बसा ना.`` शंतनुने त्यांना खुर्ची दिली. दोघेही जरा स्थिरावले.
``आम्ही शारंगधर. इथेच, ह्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर राहतो.`` त्या दांपत्यानं खुलासा केला, तेव्हा शंतनुच्या मनातलं प्रश्नचिन्हही दूर झालं.
``अरे, हो का? सॉरी, मी ओळखलं नाही. आम्हीसुद्धा इथे नवीनच आहोत ना, जेमतेम एक महिनाच झालाय आम्हाला इथे येऊन.``
``हो, कळलं आम्हाला अध्यक्षांकडून. म्हणूनच तुमच्याकडे आलोय. आम्हालाही फ्लॅट विकायचाय. त्यासाठी तुमची मदत हवी होती.``
``अवश्य. बोला ना. शेजाऱ्यांना मदत करणं, हे कर्तव्यच आहे आपलं.``
``आम्हाला सोसायटीचा सॅंक्शन्ड प्लॅन पाहिजे होता. तो कुठेच मिळत नाहीये.``
``काय सांगता? सोसायटीकडे पण नाहीये? ``
``नाही. सगळीकडे प्रयत्न केले, कुठेच मिळेना, म्हणून शेवटी तुमच्याकडे आलो. तुमचा नुकताच व्यवहार झालाय, तुमच्याकडे तो नक्की असेल असं वाटलं. ``
``बरं झालं, तुम्ही आमच्याकडे आलात. अहो, आमच्या फ्लॅटच्या व्यवहाराच्या वेळेलाही असाच त्रास झाला होता आम्हाला. घर घेणं म्हणजे बाळंतपण पार पाडण्यासारखंच असतं. सगळा त्रास सहन करावा लागतो!`` बायकोनं आणून दिलेला चहा त्या दोघांना देत शंतनू म्हणाला. त्या दोघांनीही नको नको करत चहा घेतला.
``आम्हाला तर कुणीच मदत केली नव्हती. सगळयांनी अडवणूक केली. एका क्षणी तर आता काही घर होत नाही, असंच वाटून गेलं होतं. अगदी पार माणुसकी विसरून जातात लोक अशा व्यवहारात.`` शंतनूनं त्याची व्यथा सांगितली.
``हो ना.`` शारंगधरांनीही दुजोरा दिला.
``हा मॅप शोधण्यासाठी आम्ही जंगजंग पछाडलं. महापालिकेत खेटे घातले, तिथल्या शिपायाला पैसे देऊन बघितलं, नगरसेवकाचा वशिला लावला, तरीही ढिम्म. शेवटी वैतागून गेलो. मग बॅंकेच्या वकिलानंच पाच हजार रुपये घेऊन करून दिलं आमचं काम. बहुतेक पैशांसाठीच अडवलं होतं!`` शंतनूचा सगळा संताप त्याच्या बोलण्यातून जाणवत होता.
``हे वकील इथून तिथून सारखेच. ग्राहकांना लुबाडण्यातच जन्म जाणार ह्यांचा!`` शारंगधरांनी त्यांचाही अनुभव सांगितला.
``खरंतर आमच्या आधीच्या मालकांनीच हा प्लॅन आम्हाला द्यायला हवा होता. पण काय करणार, गरज आमची होती ना, आमचे हात दगडाखाली होते. बॅंकेचें कर्ज नामंजूर झालं असतं, म्हणून आम्हीच सोसला तो भुर्दंड. अक्कलखाती गेले म्हणायचं, आणि गप्प बसायचं!`` शंतनूनं त्यांच मन मोकळं केलं.
``हो, हे खरंय. पण तुमच्यासारखी माणसं भेटली, की जगात माणुसकी शिल्लक असल्याची खातरी पटते.`` शारंगधर चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाले. एव्हाना शंतनूने तो प्लॅन शोधून त्यांच्यासमोर उलगडला होता. त्यात त्यांचा फ्लॅट स्पष्ट दिसत होता. त्यांचं काम झालं होतं. हा प्लॅन त्यांना चालणार होता. त्यांचा चेहरा एकदम खुलला.
``हेच तर हवं होतं मला. कॉपी काढून घेण्यापुरता मला हा द्याल का?``
``अरे, म्हणजे काय! अर्थातच. काही प्रॉब्लेम नाही. घेऊन जा तुम्ही. ``
``थॅक्यू. थॅंक्यू शंतनू साहेब.``
``अहो थॅंक्यू काय? शेजारी आहात तुम्ही आमचे. एवढं तर करायला हवंच ना माणुसकी म्हणून! `` शंतनूने हसून उत्तर दिलं आणि शारंगधर आणखी कृतकृत्य झाले. असे शेजारी आणखी काही काळ लाभायला पाहिजे होते, आपण उगाच फ्लॅटचा व्यवहार लवकर करतोय, असं त्यांच्या मनाला वाटून गेलं. ते दारातून बाहेर पाऊल टाकणार, तेवढ्यात शंतनूचे पुढचे शब्द त्यांच्या कानावर आले, ``आम्हाला प्लॅनसाठी पाच हजार रुपये पडले होते, म्हणून तेवढेच तुमच्याकडून घेतोय. झेरॉक्स काढून आणल्यावर दिलेत तरी चालतील. काही घाई नाही. माणुसकी सोडलेली नाही आम्ही वकिलांसारखी!``

ता. क.

``माझ्यासाठी हा निकाल अतिशय दुःखदायक होता. अशी कामं करायला कधीकधी जिवावर येतं, पण काय करणार, हा आमचा व्यवसाय आहे. असो. तुमच्या दोघांच्याही भावी आयुष्याला शुभेच्छा. आनंदी राहा.`` खूप जड अंतःकरणाने वकील साहेबांनी प्रणव आणि अवनीला शुभेच्छा दिल्या.
प्रणव आणि अवनीलाही काय बोलावं कळत नव्हतं. त्यांच्या आयुष्यातला हा कदाचित सर्वांत कटू दिवस होता. दोघांनी गेली दोन वर्षं एकमेकांशी खूप चर्चा केली, खूप संवाद साधण्याचा प्रयत्न केला, आपापसातले मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण काही जमलंच नाही. नाइलाजानं तो निर्णय घ्यावा लागला होता...एकमेकांपासून वेगळं होण्याचा.
खरंतर त्या दोघांचा प्रेमविवाह. एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असताना त्यांची ओळख झालेली. ओळखीतून मैत्री, मैत्रीतून प्रेम आणि प्रेमातून लग्न, असा रीतसर प्रवास पाच वर्षांचा होता. प्रेम आंधळं का कसंतरी असतं असं म्हणतात, ते प्रणवला लग्नानंतर जाणवायला लागलं. किरकोळ कारणावरून त्याचे अवनीशी खटके उडायला लागले. अवनीचा अतिव्यवस्थितपणा आणि नियमानुसार वागण्याचा अतिआग्रह हेच आधी त्यांच्यातल्या प्रेमाचं आणि नंतर विसंवादाचं कारण ठरलं होतं. अवनी मराठीची प्राध्यापक. अतिशय बुद्धिमान. तर प्रणव जगण्याकडे हसतखेळत बघणारा, छोट्या चुका नजरेआड करणारा, स्वच्छंदी. हे दक्षिण आणि उत्तर ध्रुव काही एकत्र येऊ शकले नाहीत. आपलं एकमेकांवर प्रेम असलं, तरी आपण एकत्र संसार करू शकत नाही, या निर्णयावर ते आले आणि सामंजस्याने वेगळं व्हायचा निर्णय त्यांनी घेऊन टाकला. पुढील कायदेशीर अडथळेही सुरळीत पार पडले.
घटस्फोट मंजूर झाल्याच्या दिवशी ते पुन्हा भेटले, तेव्हा नाही म्हटलं तरी दोघांच्याही काळजात काहीतरी हललंच. प्रणवनं तिला एक पत्र दिलं. ओळख झाल्यापासून अशी अनेक पत्रं त्यानं तिला लिहिली होती. आजचं हे कदाचित शेवटचं होतं. त्यानं लिहिलं होतं, ``अवनी, तू खूप चांगली आहेस. तुझ्यासारखी व्यक्ती ज्याच्या आयुष्यात असेल, तो खरंच भाग्यवान. काही काळासाठी मला हे भाग्य लाभलं, पण मी दुर्दैवी ठरलो. आयुष्यभरासाठी तुझी सोबत मिळू शकली नाही. पुढच्या काळात तुझी साथ नसली, तरी तुझ्याबरोबर घालवलेल्या काही चांगल्या क्षणांची आठवण काढून मी तो काळ निभावून नेईन.
कायम हसत राहा, सुखी राहा.
ता. क. :
आणि हो, आणखी कुणावर माझ्यासारखंच अमाप प्रेम केलंस, तर माझ्याप्रमाणे त्याच्या व्याकरणाच्या चुका काढत जाऊ नकोस. बाय!``
घरी आल्यावर प्रणवचं ते पत्र पुन्हा पुन्हा वाचताना अवनीचे डोळे भरून आले. आता बरंच काही घडून गेलं होतं, पण हा कटू निर्णय बदलता आला असता का, असा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला. तिनंही हातातली कामं बाजूला ठेवून प्रणवला एक भावनिक पत्र लिहिलं. आजपर्यंतचं कदाचित मायेचा सर्वाधिक ओलावा असलेलं ते पत्र होतं. सगळं पत्र पूर्ण झाल्यावर तिनं लिहिलं,
`ता. क. `व्याकरणा`च्या नाही रे, `शुद्धलेखना`च्या!`

रॉंग नंबर

``हाय!``
``हाय डिअर``
``व्हॉटस अप?``
``हो, व्हॉटस अपवरच आहे मी. बोल ना.``
``अगं, ते माहितेय. व्हॉटस अप म्हणजे, काय चाललंय?``
``बसलेय निवांत. तुला आज माझी कशी काय आठवण?``
``कशी काय म्हणजे काय? मला रोजच तुझी आठवण येते. ``
``खरंच? लव्ह यू डिअर. काय करतोयंस तू? ``
``ऑफिसमध्ये खर्डेघाशी. दुसरं काय करणार? बरं, तू डीपी का ठेवला नाहीयेस? ``
``सहज. तुला माहीत नाही, मी डीपी काढलेला? ``
``अं...अगं नाही, नसेल लक्ष गेलं. सॉरी.
``इटस ओके. पण नावावरून तर कळलं असेलच ना?``
``अगं नाही, मी तुझा नंबर वेगळ्याच नावानं सेव्ह केलाय. एनीवे. ऑफिसमध्ये जरा बोअर झालं म्हणून तुला पिंग केलं. ``
``सो नाइस ऑफ यू! आज एवढं छान वाटतंय ना, पहिल्यांदा बोलतोयंस तू असं.``
``अगं मनात असतं, पण नेहमी बोललं जातंच, असं नाही. You know, I am so lucky to have you in my life. ``
``रिअली?``
``I mean it. योग्य वेळी तू भेटली नसतीस, तर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक!``
``same here. आज तू एवढं मनापासून बोलतोयंस, खरंच खूप बरं वाटतंय. ``
``माझ्यासाठी खूप करतेस तू. मी खरंच त्याची परतफेड नाही करू शकत.``
``It's ok darling. असं बोलून दाखवायची गरज नसते. ``
``डार्लिंग म्हटलंस आणि अंगावर शहारा आला बघ. आता ऑफिसमध्ये लक्ष लागणार नाही माझं. ``
``हं. मग माझी आठवण काढत काम कर, म्हणजे फास्ट काम होईल. ``
``कधी भेटायचं? ``
``तुला वेळ झाला की, जानू. ``
``जानू? इश्श!! खूप वेगळं बोलतोयंस तू आज, सोनू. आता तर तुला भेटायची कधी नव्हे एवढी ओढ लागलेय. ``
``हं. भेटूच. बरं ऐक, एक महत्त्वाचं सांगायचं होतं. ``
``बोल ना. ``
``हे असं लाडिक आणि खाजगी चॅट करणं धोकादायक असतं. अशा नात्यात आपण जास्त काळजी घ्यायला हवी. तू चॅट लगेच डिलीट करून टाकत जा हां!``
``का रे? त्यात कसला एवढा धोका? ``
``अगं, उगाच प्रॉब्लेम नको. तुझ्या ऑफिसमध्ये, घरी कुणी तुझा मोबाईल बघितला तर... ``
``कुणी नाही बघत.``
``तरीही काळजी घे. आणि दुसरं म्हणजे माझ्याशी चॅट करताना चुकून दुसऱ्या कुणाला जाणार नाही, याची काळजी घे. ``
``म्हणजे? ``
``अगं, चुकून आपलं चॅट दुसऱ्या कुणाला गेलं, तर प्रॉब्लेम होऊ शकतात. परवा आमच्या ऑफिसमधल्या एका मित्राचा असाच लोच्या झाला. ``
``काय? ``
``त्याला वाटलं आपण आपल्या गर्लफ्रेंडशी चॅट करतोय आणि चुकून तो बायकोशी बोलत होता. घरी गेल्यावर बायकोनं धू धू धुतला.``
``वा! पण तू हे मला का सांगतोयंस, मला कळलं नाही. नवऱ्याशी काहीही बोलेन मी चॅटवर. कुणाची भीती बाळगायची काय गरज आहे? ``
``डार्लिंग, आपण नवरा-बायको झालो नाहीये अजून. आपल्याला एकत्र येण्यात अनेक अडथळे आहेत. यू बेटर नो. ``
``तू काय बोलतोयंस? बरा आहेस ना? आपलं लग्न होऊन पाच वर्षं झालेयंत राजा! मी प्रणिती बोलतेय, तुझी बायको! मला वाटलं आता नोकरीसाठी मी नाशिकला असते, म्हणून तू माझ्याशी चॅट करत होतास. तुला नक्की कुणाशी बोलायचं होतं?``
(काही मिनिटं स्मशानशांतता....)
``अनिकेत, r u there? Hello…reply immediately. अनिकेत....हे बघ, तू आहेस ऑनलाइन. मला दिसतोयंस तू. उगाच रेंज नाही वगैरे कारणं सांगू नकोस. मला उत्तर दे. थांब...मी उद्याच्या उद्या पुण्याला येतेय. मग करू आपण समोरासमोर चॅटिंग!``

सहानुभूती


``तुला तर माहितीच आहे ना, मी कसा माणूस आहे ते? माझ्यावर विश्वासघाताचा आरोप केलाय तिनं! विश्वासघाताचा आरोप! मी तिला फसवू शकतो का? तिलाच काय, मी कुणालातरी फसवू शकतो का? असा लबाड माणूस वाटतो का मी?`` तो अगदीच सैरभैर झाला होता. खचून गेला होता. त्याला एवढं निराश झालेलं कधीच कुणी बघितलं नव्हतं. तो आत्तापर्यंत कायम स्वाभिमानानं, ताठ मानेनं जगत आला होता. कधी कुठल्याही गोष्टीसाठी कुणावर अवलंबून राहिला नव्हता. आज मात्र त्याची उमेद पार खचली होती. आता तो पुन्हा उभा राहू शकेल की नाही, असंच कुणालाही त्याच्याकडे बघून वाटलं असतं.
``एवढी वर्षं एकत्र राहिलो आम्ही आणि आता ती माझ्यावर असे आरोप करतेय. मी तिला फसवलं, असं सांगून आजच घटस्फोटासाठी अर्ज केलाय तिनं. मी काय करू? तिच्यावरचं प्रेम पुन्हा सिद्ध करून दाखवू का? `` तो पुन्हा रडायला लागला.
``एवढं प्रेम होतं आमचं एकमेकांवर, तरीही तिनं माझ्यावर फसवणुकीचा आरोप केला! मी इमोशनल बोलून कायम सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणाली ती. इमोशन्स वापरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो? मी? तुला तरी पटतं का हे? तुझ्या बाबतीत तरी कधी केलंय का मी असं?`` त्यानं पुन्हा डोळ्यांत पाणी आणून तिला विचारलं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो पुन्हा हमसाहमशी रडायला लागला.
``राजा, तू रडू नकोस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू कधीच अशी दुसऱ्याची भावनिक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार नाहीस रे, माझ्या सोन्या!`` ती त्याच्या केसांतून बोटं फिरवत म्हणाली. तिनं त्याला आधार देण्यासाठी मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रूधारा ओघळायला लागल्या...

Jun 26, 2017

नीतिमत्ता!


संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात मुख्य रस्त्याच्या कॉर्नरला असलेलं ते रेस्टॉरंटसुद्धा उत्साहाने फुललं होतं. संधिप्रकाश दारंखिडक्यांतून झिरपत आत येत होता आणि आकर्षक रंगसंगती केलेल्या टेबलांवरची सजावट आणखी खुलून दिसत होती. बाहेरची वाढती रहदारी, लोकांची घरी जाण्याची घाई, मध्येच गाडी पुढे घेण्यावरून होणारी भांडणं बघत आलं-वेलची टाकलेल्या चहाचे घोट घेत निवांत बसणं, हा अनेकांचा संध्याकाळचा विरंगुळा होता. त्या दिवशीही हे रेस्टॉरंट अशाच दर्दींच्या गर्दीनं फुलून गेलं होतं. अपवाद होता, तो फक्त एका टेबलचा. या टेबलावरचे सगळेच जण सुतकी चेहऱ्यानं एकमेकांकडे बघत बसले होते. कुणीच काही बोलत नव्हतं. शेवटी एकानं पुढाकार घेतला आणि मौनव्रताची कोंडी फुटली. ते सगळे एकाच ऑफिसमध्ये काम करणारे होते, पण वेगळ्या विभागांतले. ऑफिसमध्ये रोज तसा एकमेकांशी संबंध येत नसे. येई तोसुद्धा कामापुरता. ऑफिस व्यवस्थित चाललं होतं, कामाचंही फार टेन्शन नव्हतं आणि हाच त्यांच्या चिंतेचा विषय होता.
``आपण व्हॉट्स अप ग्रुप सुरू करूया का?`` एकानं काडी टाकली आणि सगळे खाऊ का गिळू नजरेने त्याच्याकडे बघायला लागले.
आपण असं काय देशद्रोही विधान केलं, हे न कळून तो बिचारा कानकोंडा झाला. इतरांच्या बोलण्यातून त्याला कळलं, की ऑफिसमधला कामाचा शीण घालवण्यासाठी व्हॉटस अप ग्रुप तयार करण्याचा उपाय सुचवणारा तो काही जगातला पहिला माणूस नव्हता. याआधीसुद्धा हा विचार कित्येकदा पुढे आला होता आणि मागे पडला होता. ऑफिसमधलं गॉसिप नको, मेसेज वाचण्यातच खूप वेळ जातो, लोक काहीही फॉरवर्ड करतात, अशा अनेक तक्रारी होत्या. त्याबरोबरच एक मुख्य आक्षेप होता, तो म्हणजे काही आगाऊ पुरुष सदस्य या कॉमन ग्रुपवर असभ्य जोक्स टाकतात, हा. ती भानगडच नको म्हणून कधी या ऑफिसचा ग्रुपच स्थापन झाला नव्हता. यावेळी मात्र अशा ग्रुपशिवाय तरणोपाय नाही, असाच निष्कर्ष या चर्चेत निघाला आणि लगेच शिक्कामोर्तब आणि अंमलबजावणीही झाली.
अर्थात, ऑफिसच्या साडेचार वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीतला पहिला व्हॉट्स अप ग्रुप स्थापन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीआधी ग्रुपच्या अटी आणि नियम ठरवणे आवश्यक होते. हिशेब आणि नियमावलीच्या बाबतीत चोख असलेल्या एका सहकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. बाकीही कुणाकुणावर अशाच जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. सगळ्यात महत्त्वाची आणि जोखमीची जबाबदारी म्हणजे ग्रुपच्या सदस्यांना काबूत ठेवणे आणि त्यांचा तोल सुटू न देण्याची होती, ती त्या ग्रुपचा प्रस्ताव पुन्हा नव्याने मांडणाऱ्या त्या नव्या सदस्याची होती. त्या निमित्तानं त्याची सगळ्यांशी पुन्हा ओळख झाली. त्याचं नावही त्याच्या स्वभावाला साजेसंच होतं – प्रीतम. अल्पावधीत तो सगळ्यांचा `प्रीतम` झाला.
ग्रुपमुळे ऑफिसमुळे नवं चैतन्य आलं, लोकांचा कामातला हुरूप वाढला, सगळे एकमेकांशी खेळीमेळीत राहू लागले. ऑफिसच्या कामातला रुक्षपणा संपून तिथे नवा उत्साह आला, कार्यक्षमताही वाढली. एकूण सगळीकडे आनंदीआनंद झाला. लोक काटेकोरपणे नियमांचं पालन करत होते, ग्रुपवर काही वाह्यात, अवाजवी, थिल्लर चर्चाही होत नव्हती. थोडक्यात, सगळे आटोक्यात होते आणि नियम पाळत होते. ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश प्रचंड यशस्वी झाला होता.
...आणि अशाच उत्साही वातावरणात एके दिवशी भूकंप झाला! ग्रुपवर हलकल्लोळ माजला, प्रचंड उलथापालथ झाली. ग्रुपच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. कारणही तसंच घडलं होतं. एवढ्या साध्या, सरळ, सोज्वळ वाटेने चाललेल्या ग्रुपवर एक अश्लील व्हिडिओ येऊन पडला होता. ग्रुपच्या सगळ्या नियमांना एका फटक्यात सुरुंग लागला होता. दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, तर साक्षात एडमिनकडूनच हा प्रमाद घडला होता! सगळ्यांचा `प्रीतम` असलेला एडमिन एका फटक्यात सगळ्यांच्या रागाचा धनी बनला होता. अपेक्षेप्रमाणेच सगळ्यांनी त्याला सोलून काढला. तो सगळ्यात ज्युनिअर असतानाही एडमिन म्हणून सगळ्यांना गुरकवायचा, त्याचा हूट एका क्षणात निघाला. प्रीतम हडबडला. खरंतर त्याच्याकडून ही चूक नकळत घडली होती. एवढ्या प्रेमानं निर्माण केलेला, प्राणपणानं जपलेला, सगळ्या ज्येष्ठश्रेष्ठांच्या भावना जपून चालवलेला ग्रुप एका क्लिपमुळे उद्ध्वस्त होणार होता. इतर कुणी टाकलेल्या एखाद्या थोड्याशा वाह्यात विनोदावरही ज्येष्ठांनाही ग्रुपवरच खडे बोल सुनावणारा प्रीतम आज नैराश्याच्या गर्तेत गेला होता. प्रीतमनं ग्रुपवर `सॉरी` एवढाच मेसेज टाकला आणि तो मौनात गेला.
दुसऱ्या दिवशीही ग्रुपवर स्मशानशांतता होती. प्रीतम ग्रुपवरच नव्हे, तर ऑफिसलाही फिरकला नाही.
तिसऱ्या दिवशी सकाळी प्रीतमला जाग आली, तेव्हा त्याच्या मोबाईलवर व्हॉट्स अपचे कितीतरी पर्सनल मेसेज आलेले होते. बहुधा आणखी बरंच काही ऐकून घ्यावं लागणार, या काळजीनं त्यानं भीतभीतच मेसेज वाचायला सुरुवात केली.
``प्रीतम, झालं ते झालं. तूसुद्धा मुद्दाम काही केलं नव्हतंस. आपण काय घडलं ते विसरून जाऊ. मी बाकीच्यांनाही समजावेन. तू परत ये.`` प्रीतमला मेसेज वाचून समाधान वाटलं. त्यानं हसरा इमोजी पाठवून आपलं समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा मेसेज वाचला गेल्याचं नोटिफिकेशन आल्यावर लगेच पुढचा मेसेज आला - ``परवाची क्लिप चांगली होती. अशाच आणखी आहेत का?``
प्रीतम उडालाच. काही प्रतिक्रिया द्यायच्या आधी त्यानं बाकीच्या सहकाऱ्यांकडून आलेले पर्सनल मेसेज बघितले. त्यांचाही आशय बहुतांश तसाच होता. एवढ्यात प्रीतमला काही महिला सदस्यांचेही मेसेज दिसले. बहुधा परवाच्या प्रकरणाबद्दलच त्यांनी आपले वाभाडे काढले असतील, असं समजून त्याला ते उघडायचं धाडस होईना. पण बऱ्याच जणींचे मेसेज बघून त्याला राहवलं नाही. त्यानं ते उघडून बघितले आणि त्याला पुन्हा जोरदार धक्का बसला.
त्या मेसेजमधलाही आशयही जवळपास तसाच होता!

-       अभिजित पेंढारकर.