Oct 28, 2018

मिसळ `मैफल`


मिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे.

मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण असणार, किती दर्दी असणार, याचा अंदाज घ्यावा लागतो.

मिसळीचंही तसंच आहे. `चला, आता शास्त्रीय संगीत मैफलीला जाऊ` असं म्हणून आपण उरकल्यासारखं मैफलीला जात नसतो. तसंच `चला, मिसळ खाऊ` म्हणून मिसळ खायला जायचं नसतं. मिसळ खाण्यासाठी बैठक लागते, पूर्वतयारी लागते. सुटीचा दिवस निश्चित करावा लागतो. सकाळपासून पोटात जागा ठेवावी लागते. किंबहुना, `उद्या मिसळ खायचेय,` हे कळल्यापासून जठराग्नीसुद्धा शांत होऊन कुठेतरी दडी मारून बसतो, कारण मिसळ समोर आल्यानंतर आपल्याला भडका उडवायचा आहे, याची त्याला कल्पना असते.

 

मिसळ खाण्यासाठीचं चांगलं ठिकाण आधीच शोधून ठेवायचं असतं. त्यासाठी गूगल मॅप्स, इंटरनेटची मदत होत नाही, तर केवळ चांगलं खाण्यासाठी जगणाऱ्या आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधावा लागतो. अतिप्रसिद्ध झालेली ठिकाणं सोडून फारशा तुडवल्या न गेलेल्या अनवट वाटा शोधाव्या लागतात. अशाच एखाद्या ठिकाणी आपली क्षुधाशांती करणारं ठिकाण अल्लाद सापडून जातं.

मिसळ म्हणून बटाट्याची भाजी, कांदापोहे, नायलॉन पोह्यांचा चिवडा आणि त्यात सांबारसदृश आमटी ढकलणाऱ्या हॉटेलांकडे फिरकणं म्हणजे महापाप. मुळात मिसळ हा वडासांबारपासून ते शेजवान राइसपर्यंत सबकुछ मिळणाऱ्या हॉटेलमध्ये खायचा पदार्थच नाही. तो फक्त मिसळच देणाऱ्या छोट्या टपऱ्या किंवा आडबाजूच्या अडचणीच्या ठिकाणांमध्ये खाल्ल्यावरच जास्त समाधान देणारा पदार्थ. मिसळीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे रस्सा. सोडा घालून शिजवलेल्या पांढऱ्या वाटाण्यापासून कुठल्याही पद्धतीने केलं जाणारं फुळूकपाणी हा खरंतर रस्सा नव्हेच. फक्त फरसाण घालून ज्याची चव अबाधित राहते, तो खरा रस्सा. मग तो मटकीचा असो, की काळ्या वाटाण्याचा, की हरभऱ्याचा.

प्लेटमध्ये फरसाण, कांदा घातल्यानंतर मोठ्या पातेल्यात रटरटणाऱ्या द्रवपदार्थावरचं तर्रीचं जाडजूड झाकण ओगराळ्यानं बाजूला केल्यानंतर खाली दिसणारा तांबूस पदार्थ म्हणजे रस्सा. तो रस्सा घालून आणि वर तर्रीचं मधाचं बोट लावून कांदा, शेव, कोथिंबीर घालून मिसळ आपल्यासमोर येते, तेव्हा तिच्या त्या मनमोहक रूपानं आपलं लक्ष वेधून घेतलं जायला हवं.

 

मूर्तिमंत सौंदर्याला जसं हिरे-पाचू-माणसांच्या आभूषणांची गरज लागत नाही ना, तसंच मिसळीलाही फक्त बारीक चिरलेला भरपूर कांदा, शेव आणि कोथिंबीर, एवढीच सजावट पुरेशी असते. जोडीला कांद्याची एक्स्ट्रा वाटी, लिंबाची फोड आणि शेजारी ठेवलेल्या बादलीतला वाफाळता रस्सा, असे कसलेले वादक असले, की पुरे.

 

मिसळीच्या वाडग्यात आधी रश्श्याची पहिली वाटी रिकामी करावी, वाटीतला निम्मा कांदा ओतावा आणि बादलीतला तेवढाच रस्सा पुन्हा ओतून घ्यावा आणि मगच मिसळीचा आस्वाद घ्यायला सुरुवात करावी.

मिसळीसाठीचं ठिकाण ठरवताना `जादा रस्सा हवा असल्यास सव्वाअकरा रुपये जास्त आकार लागेल` असले बोर्ड टांगलेल्या ठिकाणांना आधीच बाद करून टाकावे. किमान दोनदा फुकट रस्सा, तोही न मागता देणाऱ्या किंवा शेजारी (`घ्या! अंघोळ करा ह्याच्यात!` अशा थाटात) रश्श्याची बादलीच आणून ठेवणारी ठिकाणं हीच खरी मिसळप्रेमी रसिकांच्या भावनांची कदर करणारी माणसं.

 

मिसळीची भैरवी सुरू झाली, की ती संपत आल्याची चुटपुट लागली, तर ती खरी मिसळ! कधी एकदा संपते असं झालं किंवा शेजाऱ्याकडे सरकवावी लागली, तर ती नापास!

 

सगळ्यात महत्त्वाचं :

मिसळ आवडल्यानंतर त्याच धुंदीत राहावं. `ह्याच्यापेक्षा त्या अमक्या ठिकाणची जास्त चांगली असते` हे वाक्य उच्चारून जिभेची चव घालवू नये. मैफलीत गाणं आवडलं नाही, पण तबला आवडला, तानपुरा झकास होता, असं होऊ शकतं. मिसळीच्या मैफलीत दोनच पर्याय असतात – आवडली, किंवा आवडली नाही! मिसळीत आणि शास्त्रीय संगीत मैफलीत तफावत असेल, तर ती एवढीच!

 

-    अभिजित पेंढारकर.

Oct 15, 2018

मी टू

``आरती, काय गं, कुठे होतीस एवढे दिवस? अचानक गायब झालीस! काही फोन नाही, निरोप नाही!`` वीणा जराशी वैतागलीच होती.

``बाई अहो गावाला गेल्ते. कामं होती जरा शेतीची.``

``तुम्हा बायकांचं असंच आहे. हातातल्या कामांचं तुम्हाला देणंघेणंच नसतं. असं अचानक न कळवता निघून जातात का? किती पंचाईत झाली माझी, माहितेय?``

``ताई, अहो कामासाठीच गेल्ते ना! जाऊ द्या की आता. इसरा! किती बडबड कराल?``

``घ्या! वर मलाच ऐकव तू. माझी बडबड दिसतेय तुला, स्वतःचा निष्काळजीपणा नाही दिसत?``

``बरं ऱ्हायलं. तुम्हाला नसंल पटत, तर जाते मी. दुसरं काम बघेन!``

आरती वळून जायला निघाली.

``थांब आता!`` वीणा पटकन तिच्या मागे धावली. ``काय करणार? आम्हालाच गरज ना! ये उद्यापासून. की आजच येतेयंस?``

``तुम्ही सांगाल तसं.``

``बरं, मग आजच काम सुरू कर. मला जरा श्वास तरी घ्यायला मिळेल. गेले महिनाभर मीच करतेय सगळं. कंबरडं पार मोडलं धावपळ करून!`` वीणा बडबडत होती. ``बाबा चार दिवसांसाठी इथे आले होते, ते बाथरूममध्ये घसरून पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं, गावाला नेऊन पोचवणं, आईकडे त्यांच्या औषधपाण्याची चौकशी, इथे मुलांचे डबे, माझी नोकरी, घरातली कामं... आणि नेमकी त्याच दिवसापासून तू गायब!`` वीणाचा सगळाच त्रागा आज आरतीवर निघाला.

``जाऊ दे, तुझ्याशी काय बोलत बसलेय?`` असं म्हणत वीणा बेडरूमकडे वळली. आत पडलेले कपडेही अजून आवरायचे होते.

``आणि अर्धा पगारही कापणारेय हं मी तुझा!`` वीणानं जाता जाता सुनावलं.

काहीच प्रतिक्रिया न देता आरती कामाला लागली.

 

 

वीणा आत गेली, तेव्हाच तिचा फोन वाजत होता. शेवटची रिंग होऊन फोन कट व्हायच्या आधीच तिनं फोन उचलला.

``हां, संजना, बोल गं!``

संजनाने काहीतरी महत्त्वाचं सांगायला फोन केला होता. वीणालाही ते ऐकून धक्का बसला होता. तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. आरतीनं घरात झाडलोट सुरू केली होती, पण वीणा अध्येमध्ये येरझारा घालत होती आणि काळजीतही वाटत होती, ते तिच्या लक्षात आलं होतं. अर्ध्या तासाने तिचा फोन संपला, तेव्हा आरतीनं तिच्याकडे काळजीने बघितलं.

``काय झालं बाई?``

``जरा ऑफिसमध्ये गडबड झालेय, तुला नाही समजणार.``

``सांगा की. तुम्ही काळजीत वाटला, म्हणून इचारलं.``

``अगं, तुझ्या लक्षात येण्यासारखा विषय नाहीये तो! तुला कशाला चौकशा?``

``तसं न्हाई, पण....म्हंजी, तुमचा आवाज बी बदलला होता, म्हणून...``

``ह्या बायकांना ना, नको त्या चौकशा!`` वीणा स्वतःशीच पुटपुटली, ``आत्ता मला विचारेल आणि नंतर गावभर जाऊन सांगेल!``

बडबड करत वीणा पुन्हा तिच्या कामाकडे वळणार होती, तेवढ्यात तिला जाणवलं, आरती तिच्याकडे बघत जागीच उभी आहे.

``अगं काय त्रास आहे तुझा? तुला समजायला हवंच आहे का?

आरतीच्या प्रतिक्रियेवरून वीणाला समजलं, की ही काही ऐकल्याशिवाय हटणार नाही. तिला आत्ता जास्त कटकट नको होती. आरतीला कसंतरी गप्प करावं म्हणून ती म्हणाली, ``मी टू` मूव्हमेंटबद्दल काही ऐकलंयंस का तू?``

``न्हाई बा. काय असतं ते?``

``बघ! म्हणूनच तुला सांगत होते ना, तुझ्याशी संबंधित विषय नाहीये ते! नको त्या गोष्टीत लक्ष कशाला घालायचं? तुला नुसती कामं टाळायला काहीतरी कारणं हवीत! जा...काम कर!``

``तरी पण सांगा की!``

आता मात्र वीणा वैतागली.

``अगं, ज्या बायकांना पुरुष त्रास देतात, त्यांचा छळ करतात, त्यांना मानसिक, शारीरिक त्रास होईल असं वागतात, त्यांनी आपल्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी... म्हणजे, आपल्याबाबतीत जे वाईट घडलंय ते सांगण्यासाठी एक चळवळ सुरू केलेय. त्याला `मी टू` असं नाव दिलंय.``

``असंय व्हय? म्हंजी मोर्चा बिर्चा हाय काय?``

``नाही गं, मोर्चा नाही, त्या सोशल मीडियावर लिहितात.``

``कुठं?``

``फेसबुकवर.``

``त्याच्यानं काय होतं?``

``त्यामुळे त्या लोकांचं खरं रूप बाकीच्यांना कळतं, पोलिस चौकशी करतात, इतर बायकांना त्यांच्यावरच्या अन्यायाबद्दल बोलावंसं वाटतं, काही वाईट लोकांचा खोटारडेपणा उघड होतो. कधीकधी पोलिस कारवाईही करतात.``

``असंय व्हय!``

``बघ, म्हटलं होतं ना, तुझा नाही संबंध, तर कशाला विचारतेयंस?``

आरती काहीच न बोलता तिच्या कामाला लागली. सगळं काम पूर्ण करून ती जायला निघाली.

``येते बरं का, ताई.``

``हो. उद्यापासून येणारेस ना नक्की?``

``व्हय.``

``नशीब!``

``ताई, बाबांची तब्येत कशी आहे आता?``

``ठीकेय. थोडा मुकामार होता. नशीब, काही फ्रॅक्चर वगैरे झालं नाही. नाहीतर या वयात पडल्यावर किती त्रास होतो, माहितेय ना..?``

``व्हय व्हय. बरं, येते.`` आरती निघून गेली.

...

 

 

``पण वेळच्यावेळी औषधं घ्या बरं का. दुर्लक्ष करू नका. आणि गरज वाटली, तर मला कळवा. मी येईन भेटायला!`` दुसऱ्या दिवशी सकाळी आरती कामावर आली, तेव्हा वीणा तिच्या वडिलांशी बोलत होती.

``एक मिनिट हं, बाबा!`` असं म्हणून वीणानं दार उघडली आणि आरतीला काय काम करायचंय, ते सांगितलं. पुन्हा फोनवर बोलायला लागली.

``अहो, ती आरती आली ना, तिच्याशी बोलत होते. आज महिन्यानंतर उगवलेय ती!`` वीणानं बाबांना सांगितलं.

``नाही, आज जरा लवकरच जाणारेय ऑफिसला. अहो, आमच्या बॉसच्या विरुद्ध एका कलीगनं तक्रार केलेय. त्यांनी तिचा छळ केल्याची. हो, त्यामुळे आज जरा खडाजंगी होणारेय ऑफिसमध्ये. नाही, आम्हाला तसा काही अनुभव नाही आलेला, पण पुरुषांचं काय सांगावं? एकूणच मी टू मोहिमेला सपोर्ट करायला हवा ना!`` वीणाला आणखी बरंच बोलायचं होतं, पण बाबांना अचानक आठवलं, की त्यांना दवाखान्यात जायचंय चेकअपसाठी. वीणानं फोन आटोपता घेतला.

ती बेडरूमकडे जायला वळली, तेव्हा तिला लक्षात आलं, की आरती हातात झाडू घेऊन दारातच उभी आहे.

``काय गं, तू अजून काम सुरूच केलं नाहीयेस?`` वीणा पुन्हा वैतागली.

``ताई, ते मी टू बद्दल कायतरी सांगत व्हतात नव्हं का तुम्ही काल... ?``

``झाली का तुझी सुरुवात? कशाला गं तुला नसत्या चौकशा?``

``सांगा की ताई. आत्ता बी बोलत व्हतात तुम्ही.``

``तुला काय हवंय नेमकं? आणि मुळात तुझा काय संबंध? तू का विचारतेयंस एवढं? अगं, मोठमोठ्या ऑफिसमध्ये, कंपन्यांमध्ये, कामाच्या ठिकाणी असले त्रास असतात. बॉस लोक त्यांच्या ऑफिसमधल्या बायकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात, त्यांचा गैरफायदा घ्यायला बघतात, कधीकधी सिनेमात किंवा नाटकात काम करणाऱ्या नट्यांच्या बाबतीतसुद्धा असं होतं. तू जा बाई आता..मलाही लवकर निघायचंय...वेळ नको घालवू.``

``ताई, पण कधीतरी असलं कायतरी झालेलं असंल, लई दिस उलटून गेले असतील, तरी बी तक्रार करता येते? म्हंजी, पोलिस ऐकून घेत्यात?``

``घ्यावंच लागतंय त्यांना! अनेक बायका तक्रार करतायंत, पोलिसांवर तेवढं दडपण आहे. त्यांनी दखल घेतली नाही, तर तेच अडचणीत येतील. सरकार तर कायदासुद्धा करणारेय या बाबतीत! `` वीणानं तिच्या सगळ्या शंका मिटवून टाकल्या. ``पण तू का एवढ्या चौकशी करतेयंस? तुझ्या माहितीत कुणाच्या बाबतीत काही....`` वीणाला आता आरतीच्या चेहऱ्यावरून जरा काळजी वाटायला लागली होती.

``म्हायतीत कशाला ताई? मी माझ्याबद्दल इचारत होते!``

``काय?`` वीणा उडालीच!

``अगं, मग सांगितलं का नाहीस? कुणी त्रास दिला तुला? तुझ्या शेजारचं कुणी? दीर? नात्यातलं जवळचं कुणी? की... ?``

``ताई, मला सांगा, आपण तक्रार दिल्यावर पोलिस त्या मानसाला पकडून तुरुंगात टाकतात व्हय?``

``म्हणजे काय! कधीकधी चांगलं धुतात कोठडीत. लहान-मोठं, वय बिय काही बघत नाहीत!``

``पण त्या मान्सानं आपल्या अंगावर कधीतरी हात टाकला असंल, आन् पोलिसांनी त्याला फटकावल्यावर त्याला बी त्रास झाला तर?``

``होऊ दे की! त्याच्या कृत्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी! आपण कशाला त्याच्या वयाचा विचार करायचा? त्यानं हे असले धंदे करताना केलेला असतो का विचार? मला सांग, तू असं आडून आडून का बोलतेयंस? तू काहीतरी सांगत होतीस, ते सांग की! घाबरू नको! मी आहे तुझ्या पाठीशी!`` वीणाला आता आरतीबद्दल पूर्ण सहानुभूती वाटत होती. आरतीसाठी काहीही करायचं तिनं ठरवलं होतं.

``न्हाई...मी आपलं सहजच इचारत होते. तसलं काय न्हाई झालेलं माझ्यासंगट.!``

``नक्की ना?``

``व्हय.``

वीणानं मोकळा श्वास घेतला. आरतीसुद्धा दोन क्षण तिथेच रेंगाळली.

``ताई, बाबांची तब्येत कशी आहे आता?`` तिनं विचारलं.

``ठीकेय. होतायंत हळूहळू बरे. बाथरूममध्ये पडले तेव्हा जरा मार लागला होता, पण नशीबानं फार मोठं काही नाहीये. नशीबच म्हणायचं!``


 

-    अभिजित पेंढारकर.

बेरंग

दाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली.

तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाही ना, कुणी आपल्याला काही बोलणार तर नाही ना, याची काळजी होती. सुदैवानं शेजारीपाजारी आपल्या कामात गुंतले होते. दोन घरं पलीकडे राहणारी नीलिमा खिडकीपाशीच होती, पण आभाळात कुठेतरी नजर लावून बसली होती.

लिफ्टचं बटण दाबून ती लिफ्ट येण्याची वाट बघत बसली. सकाळच्या वेळी लिफ्टमध्ये कुणी ना कुणी असणारच! त्यांनी काही विचारलं तर? तिला काळजी वाटली.

आज तिला कुणाचीच नजर नकोशी झाली होती.

काही क्षणांत लिफ्ट आली. सहाव्या मजल्यावरून खाली जायचं म्हणजे मध्ये कुणी ना कुणी लिफ्ट थांबवणार, आपल्याला बघितल्यावर काहीतरी चौकशी करणार...!

जिन्यानं जावं का?

तिनं दोन क्षण विचार केला. लिफ्टचं दार उघडलं.

``please close the door!`` लिफ्टसुंदरी बोंबलू लागली.

तिनं मनाचा हिय्या केला. काय होईल ते होवो, लिफ्टनंच जायचं! तिनं लिफ्टमध्ये पाऊल ठेवलं आणि ग्राउंड फ्लोअरचं बटण दाबलं. सहा मजले उतरून जातानाचे 15-20 सेकंद तिला युगांसारखे भासत होते.

तिच्या सुदैवानं मधल्या मजल्यांवरच्या कुणीही लिफ्टचं बटण दाबलं नाही. ती ग्राउंड फ्लोअरवर पोहोचली. इथे तरी नक्कीच कुणीतरी समोर भेटणार, अशी सार्थ भीती तिला वाटली. पण सुदैवानं तळमजल्यावरही कुणीही नव्हतं. तिनं तसाच घाईघाईत स्कार्फ गुंडाळला आणि ती बाइकवर बसून भुर्रर्रर्र करून निघाली. आज तिनं खालच्या निर्मलाकाकूंना काही सांगितलं नाही, की सोसायटीबाहेरच्या दुकानदार काकांना बाय केलं नाही, की वाटेतल्या देवळात दर्शन घ्यायला ती थांबली नाही.

तिच्या मनातली भीती अजूनही कमी झाली नव्हती. नेमकं वाटेत कुणीतरी ओळखीचं भेटेल की काय, अशी धाकधूक होती. 45 सेकंदांच्या सिग्नलसाठी चौकात थांबतानाही ती अस्वस्थ होती. तिच्या नशीबानं तिचा ऑफिसपर्यंतचा प्रवासही सुखरूप पार पडला.

या ऑफिसमध्ये ती नव्यानेच जॉइन झाली होती. स्टाफ कमी होता आणि सगळ्यांशी नीट ओळखीही झाल्या नव्हत्या. प्रत्येकाचे स्वभाव, सवयी, त्यांच्या आवडीनिवडी, सणवार साजरे करण्याची पद्धत, याबद्दल तिला फारशी कल्पना नव्हती.

आज घरातून बाहेर पडण्यापासून ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत तिच्या मनात जी भीती होती, त्यामागेही हेच कारण होतं.

तिच्या नशीबाने तिला आज या प्रवासात कुणी टोकलं नव्हतं. कुणी ओळखीचं भेटलं नव्हतं, कुणी हिणवलं नव्हतं, कुणी काही कमेंट केली नव्हती.

 

ती धावतपळत ऑफिसमध्ये पोहोचली.

एकदा ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिच्या मनातली भीती पूर्णपणे संपणार होती. तिला हायसं वाटणार होतं. एवढी पायरी ओलांडली की झालं, असं तिला वाटलं!

तिची धाकधूक आता अगदी शेवटच्या स्टेजला होती.

तिनं ऑफिसच्या दारात पाय ठेवलं मात्र...

ऑफिसमध्ये नव्यानंच जॉइन झालेल्या रिसेप्शनिस्टनं विचारलेल्या प्रश्नानं तिच्या सकाळपासूनच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं. रिसेप्शनिस्ट म्हणाली, ``काय मॅडम, आजचा रंग निळा आहे, माहिती नाही होय तुम्हाला?``

 

-    अभिजित पेंढारकर.

Sep 2, 2018

केल्याने भाषांतर

रत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या `रत्नागिरी एक्स्प्रेस` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबदारी असायची. टेलिप्रिंटर अखंड खडखडत असायचा आणि त्याच्यावरच्या इंग्रजीतल्या कॉपीज टराटरा फाडून तो ते भेंडोळं समोर घेऊन बसायचा. एकट्यानं बहुतेकसं भाषांतर बडवायचा. ते पहिल्यांदा बघितलं, तेव्हा खूप भारी वाटलं होतं.

 

तिथे भाषांतर करण्याची फार वेळ आली नव्हती. `सागर` आणि `सकाळ`मध्ये तर मी बातमीदारीच करत होतो. भाषांतराशी संबंध येण्याचा प्रश्न नव्हता.

 

पुण्यात आल्यानंतर आधी `लोकसत्ता`त बातमीदारी करून `केसरी`मध्ये नोकरीला लागलो, तेव्हा बातम्यांच्या भाषांतराशी थेट आणि जवळचा संबंध आला. अभय कुलकर्णी, अमित गोळवलकर, विनायक ढेरे हे सिनिअर तेव्हा बातम्या भाषांतरित करायला द्यायचे. प्रत्येक बातमीचं शब्दन् शब्द भाषांतर झालंच पाहिजे, असा सुरुवातीला माझा समज होता. तीन-चार पानांच्या इंग्रजी बातमीची सुरेंद्र पाटसकरसारखे सहकारी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात वासलात लावायचे, तेव्हा आश्चर्य वाटायचं. नंतर मीसुद्धा भाषांतराचं (आणि कापाकापीचं) तंत्र शिकू लागलो आणि त्यात मजा वाटायला लागली. दडपण कमी झालं.

 

पीटीआय, यूएनआयच्या बातम्यांमधल्या विशिष्ट शब्दांची परिभाषाही समजली. Wee hours, Charred to death, slammed, thrashed, alleged, sacked, to get a shot in arms, whip, अशा शब्दांची गंमत कळायला लागली. पीटीआयच्या विशिष्ट बातम्यांमध्ये विशिष्ट शब्द असायचेच.

 

Air Strikes चं `वैमानिकांचा संप` अशा झालेल्या चुकीच्या भाषांतरांची उदाहरणं ऐकली, वाचली होती, तरी काम करताना भरपूर चुकाही घडायच्या. रत्नागिरीत असताना आंतरराष्ट्रीय घडामोडी वाचायची कधी सवय नव्हती. बातमीमध्ये Shanghai has said, Islamabad has said अशी वाक्यं असली, की गोंधळ व्हायचा. म्हणजे `चीनने/पाकिस्तानने म्हटले आहे,` हा अर्थ हळूहळू समजायला लागला.

Sanctions on Iraq म्हणजे इराकवर बंधनं किंवा परवानगी नव्हे, तर `निर्बंध` असे विशिष्ट वर्तमानपत्रीय पारिभाषिक शब्दही समजायला लागले.

 

संपादक अरविंद गोखले दर मंगळवारी मीटिंग घ्यायचे आणि अंकातील चुका सांगायचे. चूक कुणाची आहे, ते त्या त्या व्यक्तीनं आपणहून समजून घ्यायचं, अशी पद्धत होती. चूक केलेल्या व्यक्तीचा उल्लेख किंवा जाहीर पंचनामा व्हायचा नाही. एकदा मी `Pentagon said`चं `पेंटॅगॉन` या नियतकालिकात असे म्हटले आहे की,` असं भाषांतर करून ठेवलं होतं. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला Pentagon म्हणतात, हे तेव्हा समजलं.

 

`सकाळ`मध्ये आल्यानंतर तर बहुतांश काम भाषांतराचंच असायचं. अशोक रानडे, विजय साळुंके यांच्यासारखे कसलेले पत्रकार आमच्या बातम्या तपासायचे. साळुंके तर आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक. ते मुद्दाम आंतरराष्ट्रीय बातम्या भाषांतरित करायला द्यायचे आणि त्या त्या विषयांचा अभ्यास करावा लागायचा.

 

`सकाळ`मध्ये नेमके आणि योग्य मराठी शब्द वापरण्याबद्दल त्यांचा अतिशय आग्रह असायचा. Line of control (LOC)ला तेव्हा `सकाळ`मध्ये `प्रत्यक्ष ताबारेषा` असा शब्द त्यांनी रूढ केला होता. नियंत्रण आणि `ताबा` यात म्हटलं तर फरक आहेच. नेमकेपणा राखला जायचा, तो असा.

 

`सकाळ`चे माजी संपादक एस. के. कुलकर्णी अधूनमधून शिकवायला यायचे. ते म्हणजे तर शब्द, भाषा, ग्रामीण महाराष्ट्र, यांचे गाढे अभ्यासक. इंग्रजीत feared dead हा वाक्प्रचार वापरतात. त्याचं मराठी शब्दशः भाषांतर `ते मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे,` असं केलं जातं, त्याला त्यांचा आक्षेप असायचा. आपल्याला भीती कशाला वाटेल? `मृत्युमुखी पडल्याची शक्यता` असू शकते, असं ते म्हणायचे.

 

Milestone म्हणजे `मैलाचा दगड` नाही, `महत्त्वाचा टप्पा` हेसुद्धा तिथेच शिकता आलं.

कधीकधी मंगळवारच्या मीटिंगमध्ये ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव पटवर्धन यायचे. तेसुद्धा इंग्रजीचे मोठे अभ्यासक. एकदा मी ब्यूटी क्वीन स्पर्धेच्या बातमीत blonde हे नाव समजून `ब्लॉंड अमूक तमूक` असं भाषांतर केलं होतं. त्यांनी त्याबद्दल मीटिंगमध्ये सांगितल्यानंतर मला चूक लक्षात आली.

 

 

नंतर भाषांतराची गोडीच लागली. इंटरनेट आल्यानंतर हे काम आणखी रंजक झालं. मूळ पीटीआयची बातमी वाचायची, यूएनआयच्या बातमीशी ती ताडून बघायची, मग इंटरनेटवर त्याचे आणखी तपशील शोधायचे, इतर वेबसाइट्सच्या बातम्या बघायच्या आणि हे सगळं वाचून एकत्रित दीडशे किंवा दोनशे शब्दांची बातमी करायची, त्यात एखादी चौकट तयार करायची, याची मजा वाटायला लागली. एखाद्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य किंवा कोर्टाचा निकाल अशा बातम्यांचं भाषांतर जास्त इंटरेस्टिंग असायचं. त्यात शब्दांचे अर्थ, छुपे अर्थ शोधता यायचे, त्या व्यक्तीची समज, तिची प्रतिमा, यांचा आधार घेऊन भाषांतर करावं लागायचं. शशी थरूर यांचं इंग्रजी, लालूप्रसाद यादव किंवा उत्तरेतल्या काही नेत्यांचं हिंदी, त्यातले वाक्प्रचार समजून घेऊन नेमकं भाषांतर करण्याची फार हौस असायची. आर्थिक बातम्यांच्या मात्र मी फारसा फंदात पडत नसे.

 

आशियाई देशांना सुनामीचा फटका बसला, तेव्हा पहिले दोन दिवस नुकसान, मृत्यूच्या आकड्यांच्या बातम्या दिल्यानंतर बातम्यांमध्ये तोच तोचपणा येऊ लागला होता. रोज मुख्य बातमी तर करायला हवी, पण आकडेवारीशिवाय वेगळं काही नाही, अशी परिस्थिती होती. चौथ्या दिवशी तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांनी सांगितलं, त्याच विषयाची काहीतरी वेगळी बातमी शोधून काढा आणि ती पहिल्या पानावरची मुख्य बातमी (मेन फीचर) करा. आमची शोधाशोध सुरू झाली. प्रदीप कुलकर्णी आणि मी, असे दोघे सहकारी रात्रपाळीला होतो. एका बातमीत एक-दोन ओळींमध्ये काही नागरिक आता आपल्या जुन्या घरांमध्ये परतू लागले असून, पुरातून वाचलेलं सामान गोळा करण्याचा प्रयत्न करतायंत, असा काहीतरी उल्लेख होता. मला मुख्य बातमी मिळाली होती.

 

मग त्या दोन-तीन ओळींवरून, तिथल्या परिस्थितीची कल्पना करून सुमारे तीनशे साडेतीनशे शब्दांची, तिथल्या परिस्थितीचं वर्णन करणारी, भावनिक बातमी लिहिली. कुणी घर सावरण्याचा प्रयत्न केला असेल, कुणी आपल्या हरवलेल्या मुलांचा शोध घेतला असेल, कुणी आपले दागदागिने शोधत असेल, अशी सगळी कल्पना करून बातमी लिहिली होती. दुसऱ्या दिवशी तिची खूप प्रशंसा झाली. भाषांतराच्या काळातला तो सगळ्यात गोड आणि आनंददायी अनुभव.


सावल्या


लहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच्या बागेत धुडगूस तर कधी पत्त्यांचा डाव, असे उद्योग चालायचे. संध्याकाळी कधीकधी नदीच्या एका बाजूला, थोड्या आडजागी आम्ही वाळूत खेळायला जायचो. उन्हाळ्यात नदी बऱ्यापैकी आटलेलीच असायची, पण ती ओलांडून जावं लागायचं. तो भाग तसा आडोशाचा होता आणि तिथे आसपास फारशी वस्ती नव्हती. तिथे खेळायला आम्ही जरा लवकर जायचो आणि सहा वाजेपर्यंत अंधार पडायच्या आत घराची वाट धरायचो. संध्याकाळच्या वेळी तिथली हलणारी झाडं, त्यांतून घुमणाऱ्या वाऱ्याचा आवाज, त्यांच्या सावल्या, सगळं गूढ वाटायचं. मामा कधीतरी रात्रीच्या वेळी त्याच्या वाडवडिलांनी, काकांनी, गावातल्या कुणीतरी पाहिलेल्या भुतांच्या कहाण्या सांगायचा. तिथल्याच कुठल्यातरी वडाखाली गावातल्या एकाला भुतानं झपाटलं होतं वगैरे कहाण्या ऐकून आम्ही टरकायचो. आम्ही नदीच्या बाजूला जायचो, तिथेच पुढच्या वाटेवर कुठेतरी ती घटना झाली असावी, असं वाटायचं.

 

 

मामाचं घर अगदी जुन्या पद्धतीचं होतं. ओटी, पडवी, माजघर, स्वयंपाकघर, परसदार, अंगण वगैरे. आम्ही सगळे माजघरात झोपायचो. बाहेर ओटी, पडवी, अशा दोन खोल्या होत्या. पडवीत आम्ही संध्याकाळी झोपाळ्यावर शुभंकरोति वगैरे म्हणायला बसायचो, पण लाकडी खिडकीच्या गजांतून कुणीतरी डोकावून बघतंय की काय, असे भास सतत होत असायचे. एकदा सात-सव्वासातच्या दरम्यान शुभंकरोति आटोपली, की मग पुन्हा पडवीत फिरकायची आमची शामत नसायची. जो काही धुमाकूळ घालायचा, तो माजघरात.

 

घरापासून दुसरं जवळचं घर किमान 50-60 फुटांवर होतं. बाहेर किर्रर्र काळोख आणि रातकिड्यांची किरकीर. रात्रीच्या वेळी भीतिदायकच वातावरण असायचं. घरात मिळमिणते दिवे असायचे. त्यांच्या प्रकाशामळे भिंतींच्या, खांबांच्या, घरात रचून ठेवलेल्या पोत्यांच्या ज्या सावल्या पडायच्या, त्यांच्यामुळे त्या गूढ वातावरणात आणखी भर पडायची. रात्री माजघरातून कुणी बाहेरच्या खोलीचं दार बंद आहे की नाही, हे बघायला जायला सांगितलं, तर कुणीही त्या धाडसासाठी तयार नसायचं. कधीकधी आमच्या पैजाही लागायच्या. ओटीवर जायचं, ओटी पार करून दिवा लावायचा, मग पडवीच्या पायऱ्या उतरून जायचं, दार बंद आहे की नाही बघायचं, कडी घालायची आणि ओटीवर येऊन दिवा बंद करायचा, मग अंधारातच ओटी पार करून माजघरात यायचं, एवढं मोठं दिव्य असायचं ते. बाहेरच्या दाराला कडी घातली किंवा तपासली, की तिथून पाठमोरं परत येताना अंगातलं त्राणच गेल्यासारखं व्हायचं. सावकाश चालत यायचं टास्क दिलेलं असलं, तरी तेवढी हिंमतच नसायची. एकदा कडी घातली, की सुसाट पळत येऊन माजघर गाठायचं, हीच सर्वसाधारण रीत होती. एक क्षण थांबलो, तरी मागून एखादा हात येऊन आपली बकोट धरेल, असंच वाटायचं. दिव्यामुळे पडणाऱ्या स्वतःच्या सावलीचीही भीती वाटायची.

 

हळूहळू मोठे झालो आणि ही भीती कमी झाली आणि आजोळी जाणंही.

 

कधीकधी वाटतं, की बालपणी तेवढीच एक भीती होती, ते बरं तरी होतं. आता वेगवेगळ्या सावल्या रोजच भीती घालत असतात. त्यांच्यापासून कसं वाचणार?

 

Jul 6, 2018

खरा चित्रपटप्रेमी



...तरीही विक्रमादित्यानं आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा स्मशानापाशी गेला. स्मशानाजवळच्या त्या झाडावरचं प्रेत त्यानं खांद्यावर घेतलं आणि तो राजवाड्याच्या दिशेने चालू लागला.

प्रेतात लपलेला वेताळ जागा होऊन त्याला म्हणाला, ``हे राजन, तुझ्या चिकाटीला दाद दिलीच पाहिजे. रोजच्या रोज नित्यनेमाने फेसबुकवर पोस्टी पाडणाऱ्यांपेक्षा तुझी चिकाटी अफाट आहे. चल, तुला याच चिकाटीवरून एक गोष्ट सांगतो. फार फार वर्षांपूर्वी... सॉरी. फार फार वर्षांपूर्वीची कशाला, आत्ता कालपरवाची गोष्ट सांगतो. मुंबई नामक एका मायानगरीत संजय दत्त नावाचा एक कलाकार कम पार्ट टाइम देशद्रोही कम पार्ट टाइम गुन्हेगार राहत होता. राजकुमार हिरानी नावाच्या पार्ट टाइम दिग्दर्शक कम पार्ट टाइम मित्रानं त्याच्या आयुष्यावर एक चित्रपट तयार केला – `संजू`. संजय दत्तची पार्ट टाइम कारकिर्द आणि पार्ट टाइम वैयक्तिक आयुष्य त्यात दाखवण्यात आलं होतं. सोशल मीडियावर या सिनेमाची भरपूर चर्चा झाली. कुणी व्हिडिओ केले, कुणी ऑडिओ केले, परिसंवाद झडले, पार्ट्या रंगल्या, प्राइम टाइममध्ये महाचर्चा घडल्या. कुणी प्रेक्षकांना मूर्ख म्हटलं, कुणी प्रेक्षकांना या देशद्रोह्याचे सिनेमे बघू नका, असं कळकळून आवाहन केलं. कुणी सिनेमा बघा, पण त्याचे गुन्हेही लोकांना सांगा, असं भावनिक आवाहन केलं.

सोशल मीडिया लोकांच्या हातात आल्यापासून समीक्षकांच्या जेवढ्या पिढ्या जन्माला आल्या नसतील, तेवढ्या या एका आठवड्यात जन्माला आल्या. शेवटी सोशल मीडियावर एक स्पर्धाच जाहीर करण्यात आली. खरा चित्रपटप्रेमी कोण, अशी स्पर्धा. स्पर्धेसाठी वेगवेगळ्या कॅटेगरी ठेवण्यात आल्या होत्या. पहिली, `संजू` सिनेमा पाहून लगेच फेसबुकवर परीक्षण लिहिलेले. या कॅटेगरीत एन्ट्रीजचा महापूर होता. दुसरी कॅटेगरी होती, `संजू` सिनेमा बघूनही परीक्षण न लिहिणारे. हा विभाग ओस पडला होता. तिसऱ्या कॅटेगरीत काही कारणांनी `संजू` बघण्याची संधी न मिळालेल्यांचा समावेश होता. चौथी कॅटेगरी मात्र एक तत्त्व म्हणून `संजू` न बघणारे आणि दुसऱ्यांनीही बघू नये, असं आवाहन करणाऱ्यांची होती. या कॅटेगरीत एऩ्ट्रीजचा एवढा पाऊस पडला, की जाहीर केल्या केल्या ही कॅटेगरी ओव्हरफ्लो झाल्यामुळे प्रवेश बंद करावे लागले. बाकी चोरून डाऊनलोड करून बघणारे, मित्रांकडून पेन ड्राइव्हमध्ये कॉपी करून घेणाऱ्यांचेही विभाग होते, पण त्यात विशेष काही नसल्यामुळे त्यांची दखल घेण्याची गरज नव्हती.

एवढी गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, ``तर, तर हे अतिबुद्धिमान, सर्वशक्तिमान राजन, आता तू सांग, यापैकी नक्की कुठल्या चित्रपटप्रेमींची कॅटेगरी श्रेष्ठ ठरली असेल? आणि कुणाला बक्षीस मिळालं असेल? तुला या प्रश्नाचं उत्तर माहीत असतानाही तू बोलला नाहीस, तर तुला `रेस-3` आणि `बागी-2`ची डीव्हीडी घरी आणून दिली जाईल आणि ते दोन्ही चित्रपट सलग बघण्याची सक्ती केली जाईल. तुझ्या डोक्याची शंभर काय, हजार शकलं आपोआपच होतील. सांग!``

विक्रमादित्य हसला.
क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, ``उत्तर सोपं आहे वेताळा. `संजू` बघणाऱ्या किंवा न बघणाऱ्या कुणालाही हे बक्षीस मिळालं नाही.``
वेताळाला आश्चर्य वाटलं.

``खरा चित्रपटप्रेमी तोच, ज्यानं `संजू`चा मोह टाळून सेट मॅक्सवर `सूर्यवंशम` बघितला!

हे उत्तर ऐकल्यावर वेताळाच्याच डोक्याची शंभर शकलं झाली आणि तो ती गोळा करत सैरावैरा धावू लागला.



May 2, 2018

नजरबंदी

``मॅडम, आमच्या मुलासाठी आम्ही इथे आलो होतो.`` वीणाताईंच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग दाटून आले होते.

``बोला ना, अगदी मोकळेपणानं बोला.`` डॉक्टर अंजली त्यांना धीर देत म्हणाल्या. तरीही कुठून सुरुवात करावी, हे वीणाताईंना समजत नव्हतं. काही क्षण असेच शांततेत गेले. फारच गंभीर विषय दिसतोय, हे डॉक्टर अंजली मॅडमच्या लक्षात आलं.
``हे बघा, डॉक्टरपासून काही लपवायचं नसतं. त्यातून मी मानसोपचारतज्ज्ञ आहे. तुमच्या मुलाची जी काही समस्या आहे, ती राहू नये, असं वाटतंय ना तुम्हाला? त्यानं नॉर्मल आयुष्य जगायला हवंय ना? मग मोकळेपणानं बोला. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं समजणार?``
डॉक्टरांची ही मात्रा लागू पडली असावी. अशा केसेस कशा हॅंडल करायच्या, पालकांना किंवा रुग्णांना कसं बोलतं करायचं, हे त्यांना एवढ्या वर्षांच्या अनुभवातून सहज समजत होतं. वीणाताई थोड्या अस्वस्थ झालेल्या जाणवल्या. त्यांनी बोलण्यासाठी जुळवाजुळव केली, पण त्यांचे शब्द घशातच अडकत होते. काय बोलावं, कसं बोलावं याचीच पंचाईत होत होती. शेवटी डॉ. अंजली यांनी श्री. विलासरावांशी बोलायचं ठरवलं.
``तुम्ही वडील आहात ना त्याचे? तुम्ही सांगा. हे बघा, काही काळजी करायचं कारण नाही, इथल्या गोष्टी कुठे बाहेर जाणार नाहीत. बोला.``
वीणाताईंनी विलासरावांकडे अपेक्षेनं पाहिलं.
``किती वर्षांचा आहे तुमचा मुलगा?``
``सोळा. म्हणून तर काळजी वाटतेय.`` वीणाताई म्हणाल्या.
``काय होतंय नक्की? त्याचं कुठलं वागणं खटकलं तुम्हाला?``
आता वीणाताईंना राहवलं नाही. त्यांनी सगळंच सांगायचं ठरवलं. गेले काही दिवस मुलाचं वागणं त्यांना फारच खटकत होतं. तसं पहिल्यापासून तो कधी वेडंवाकडं वागलेला नव्हता. आईवडिलांचा आज्ञाधारक असा आदर्श मुलगा होता तो. पण वयात आल्यापासून गेली दोन तीन वर्षं त्याचं वागणं हळूहळू बदलत गेलं होतं. वीणाताईंना ते आधी लक्षात आलं नव्हतं, पण आलं, तेव्हा त्यातलं गांभीर्य त्यांच्या अगदीच अंगावर आलं. शशांक मुलींकडे वाईट नजरेने बघतो, असं वीणाताईंना जाणवलं होतं. तो पोर्न व्हिडिओ बघतानाही एकदा सापडला होता. आजूबाजूच्या काही मुलींनीही त्याच्या रोखून बघण्याबद्दल वीणाताईंकडे तक्रार केली होती, म्हणून त्यांना जास्त काळजी वाटायला लागली होती. विलासरावांना त्यांनी सांगून पाहिलं, पण त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. शेवटी वीणाताईंना कुणीतरी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला, तेव्हा त्या डॉक्टर अंजली यांची रीतसर अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडे आल्या. पहिल्या वेळेला मुलाला घेऊन येऊ नका, असं डॉक्टरांनीच सांगितलं होतं. निदान समस्या समजून घेऊ, काय करता येतं ते बघू, नंतर गरज लागल्यास तुमच्या मुलाशी मी बोलेन, असंही त्या म्हणाल्या होत्या. 
डॉक्टर अंजली यांनी वीणाताईंचं सगळं ऐकून घेतलं. वीणाताई अगदी मनापासून बोलत होत्या. मुलाबद्दलचं प्रेम आणि आता त्याच्या वागण्याची वाटणारी काळजी ठायीठायी जाणवत होती.
``काळजीचं कारण नाहीये. या वयात असं घडणं नॉर्मल आहे,`` असं डॉक्टर म्हणाल्या, तेव्हा मात्र वीणाताईंच्या चेहऱ्यावर आणखी चिंता पसरली.
``अहो खरंच नॉर्मल आहे हे. मोठ्या माणसांनी असं वागणं, हे गंभीर आहे!`` विलासरावांकडे बघत डॉक्टर अंजली म्हणाल्या.
``पण डॉक्टर..`` वीणाताई अजूनही गोंधळलेल्या वाटत होत्या.
त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच डॉक्टर अंजली म्हणाल्या, ``शशांक अजून लहान आहे, कोवळं वय आहे त्याचं. या वयातच मुलींबद्दल आकर्षण वाढीला लागतं. मी त्याच्याशी बोलेन. काळजी करू नका, इथे नाही बोलणार. माझ्या एखाद्या सेमिनारला किंवा कार्यक्रमाला त्याला घेऊन या, तिथे त्याच्याशी सहज ओळख काढून गप्पा मारेन. तुम्ही इथे आला होतात, हे सांगणार नाही. सुधारेल तो. त्याला जे वाटतंय ते नॉर्मल आहे, फक्त या भावना नक्की कशा कंट्रोल करायच्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टींमध्ये मन कसं रमवायचं, हे मी त्याला सांगेन. तो नॉर्मलच आहे आणि त्याचा हा सगळा प्रॉब्लेम लवकरच दूर होईल.`` असं डॉक्टर अंजली यांनी अगदी मायेनं सांगितलं, तेव्हा मात्र वीणाताई थोड्या रिलॅक्स झाल्या. डॉक्टरांविषयी त्यांनी आधी जे ऐकलं होतं, त्याचाच प्रत्यय त्यांना येत होता. आपल्या मुलाची समस्या वाटते तेवढी गंभीर नाही आणि तो लवकरच रुळावर येईल, हे डॉक्टरांकडून ऐकणं त्यांच्यासाठी खूपच आशादायी होतं.
``थॅंक्यू डॉक्टर. तुमचे आभार कसे मानू, तेच मला कळत नाहीये.`` वीणाताईंचा कंठ दाटून आला होता.
``तुम्ही कधी भेटाल त्याला?``
``पुढच्या महिन्यात. तोपर्यंत त्याच्याशी तुमच्या पातळीवर काय बोलायचं, कसं वागायचं, त्याबद्दल एक पुस्तक देते तुम्हाला. ते वाचून घ्या आणि तसं वागा. पुढच्या आठवड्यात मला रिपोर्ट कळवा.``
``थॅंक्यू डॉक्टर. मी नक्की वाचेन आणि तसं वागेन.`` वीणाताईंनी वचन दिलं.
``मला फक्त तुमच्याशी थोडं बोलायचंय!`` डॉक्टर अंजली म्हणाल्या आणि वीणाताईंच्या काळजात पुन्हा धस्स झालं. त्यांनी विलासरावांकडे बघून इशारा केला आणि विलासराव केबिनच्या बाहेर जाऊन बसले.

``काय झालं डॉक्टर? आणखी काही सांगायचं होतं का? शशांकबद्दल काही...```
``नाही, त्याच्याबद्दल नाही.``
``त्याला पुढच्यावेळी घेऊन येऊ का? मी कसंतरी कन्व्हिन्स करेन त्याला. येईल तो, तुम्ही म्हणत असाल तर.``
``अहो नाही. शशांकला घेऊन येण्याची काहीच गरज नाही!``
``नक्की? हवंतर घेऊन येते त्याला! त्याची नजर....`` वीणाताई अस्वस्थ झाल्या होत्या.
``त्याला आणायची गरज नाहीये! `` डॉक्टर अंजली प्रत्येक अक्षरावर भर देत मोठ्याने बोलल्या, तशा वीणाताई गप्पच झाल्या.

डॉक्टर पुढे काय बोलतात, यासाठी त्यांनी कानांत प्राण आणले होते.

``फक्त एक करा.``

``काय?``

``तुमच्या मिस्टरना पुन्हा इथे घेऊन येऊ नका!``


- अभिजित पेंढारकर.


Apr 10, 2018

का रे अबोला?

रेवा दोन दिवसांपासून थोडी गप्प गप्प आहे, या भावनेनं मधुरा अस्वस्थ झाली होती. वयात येत असलेल्या आपल्या लेकीशी बोलावं, तिचं म्हणणं समजून घ्यावं, असं तिला मनापासून वाटत होतं, पण तिला वेळच मिळत नव्हता.

खरंतर लेकीशी लहानपणापासून तिचा उत्तम संवाद होता. अधूनमधून काही ना काही निमित्तानं ती रेवाशी बोलत असे. आता मुलगी जशी मोठी होऊ लागली, तशी तिच्या कल्पना, तिचं वागणंबोलणं, तिची मानसिक, शारीरिक स्थिती याबद्दलही मधुरा खूप जागरूक होती. रेवाला कुठल्याही बाबतीत आपल्याशी बोलायला ऑकवर्ड वाटू नये, उत्तम संवाद राहावा, सगळं मोकळेपणानं बोलता यावं, असं तिला वाटत होतं. रेवा आत्ता कुठे अकरा वर्षांची होत होती, पण आता मुली लवकर मोठ्या होतात, आपल्याला जे सोळाव्या वर्षात कळत नव्हतं ते त्यांना या वयातही कळतं, हे मधुराला पक्कं माहीत होतं. म्हणूनच ती अस्वस्थ झाली होती.
रेवा दोन दिवस नीट बोलत नाही, वागत नाही, आपण काही सांगायला गेलो, तर तेवढ्यापुरतं उत्तर देते, हे तिच्या लक्षात आलं होतं. नक्की काय झालं असेल पोरीला? कुणी काही बोललं असेल का? कुणी तिच्याशी चुकीचं वागलं असेल का? शाळेत कुणी ओरडलं असेल का? कुणाचं काही चुकीचं वागणं बघितल्यामुळे तिच्या मनावर परिणाम झाला असेल का? काही वाचून, बघून चुकीचं मत तयार झालं असेल का? विचार करून करून मधुराचं डोकं फुटून जायची वेळ आली होती. तिनं शंभरवेळा ठरवलं, पण तिची आणि रेवाची बोलण्यासाठीची निवांत वेळ जुळूनच येत नव्हती.
अखेर एक दिवस ती संधी मिळाली. घरातले सगळे कुठे ना कुठे गेले होते आणि संध्याकाळच्या वेळी दोघीच घरी होत्या.
``माझ्यासाठी छान कॉफी करतेस का गं बच्चू?`` मधुरानं प्रेमानं विचारलं.
रेवानं फार प्रतिक्रिया न देता नुसती मान हलवली आणि ती कॉफी करायला स्वयंपाकघराकडे वळली. बच्चू ही लाडाची हाक मारल्यावर रेवाची कळी खुलते, असा मधुराचा अनुभव होता, पण आज ही मात्रासुद्धा फारशी लागू पडली नव्हती. काहीतरी गडबड होती, नक्कीच.
आपण तर गेल्याच आठवड्यात तिच्याशी बोललो होतो! तेव्हा ती नॉर्मल वाटत होती. मग चार पाच दिवसांत असं काय घडलं असेल?
रेवा कुठे कुठे गेली होती ह्या आठवड्यात?
मधुरानं मेंदूतल्या सगळ्या आठवणी फास्ट रिवाइंड केल्या, तरी तिला काही पत्ता लागेना. ती जास्तच अस्वस्थ झाली. नाही म्हणायला एकदा तिनं रेवाला भाजी आणायला पाठवलं होतं, तेव्हा पाच रुपयाऐवजी दहा रुपयांना कोथिंबिरीची जुडी घेऊन आली, त्यावरून आजी तिला थोडं बोलली होती. त्याच्यावरून काही बिनसलं असेल का? की सोसायटीत नव्यानंच राहायला आलेल्या घरी ती एका वाढदिवसाच्या पार्टीला गेली, तिथे काही घडलं असेल?
``कॉफी!`` रेवाच्या शब्दांनी मधुरा भानावर आली.
``तुला नाही केलीस?`` मधुराला आश्चर्य वाटलं.
उत्तरादाखल रेवानं फक्त `च्यक्` केलं.
मधुरानं आग्रहानं आपल्यातली थोडी कॉफी दुसऱ्या कपात ओतून तिला दिली.
तिच्याशी संवाद साधण्याची हीच संधी होती. अभी नहीं, तो कभी नहीं!
``रेवा, काय झालंय सोन्या?`` तिनं आईच्या मायेनं विचारलं.
``काही नाही.`` रेवानं नजरेला नजर न देता उत्तर दिलं, तेव्हाच काहीतरी झालंय, हे मधुरातल्या आईनं हेरलं.
``मला सांगणार नाहीस? आपण बोलतो की नाही मोकळेपणानं? आपण मैत्रिणी आहोत ना एकमेकींच्या? मग? सांग बघू...!``
प्रत्येक शब्दागणिक मधुरा रेवाच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव टिपत होती. तिची चुळबूळ वाढल्याचं मधुराला जाणवत होतं. आता भावनांचा कडेलोट होऊ न देता तिच्याकडून काय झालंय ते काढून घेणं, हे शिवधनुष्य तिला पेलायचं होतं, पण त्यात ती तरबेज होती.
``घरी कुणी ओरडलं का?``
रेवानं नकारार्थी मान हलवली.
``बाबा काही चिडून बोलले का?``
तरीही नकार कायम राहिला.
``आजी-आजोबांशी काही भांडण?``
``अं हं...!``
``शाळेतल्या बाई काही....``
नकार कायम राहिला.
``खाली खेळताना कुणी....``
``वॉचमनकाकांमुळे काही.... ``
``तू क्लासला जातेस, तिथलं कुणी... ``
सगळ्यांना नकारार्थी उत्तरं येत राहिली आणि मधुराचा धीर खचत चालला. तिची कल्पनाशक्तीही आता संपत चालली होती.
``त्या दिवशी वाढदिवसाला त्या नव्या शेजाऱ्यांकडे गेली होतीस, तिथे काही...`` तिनं प्रश्न विचारला आणि रेवाच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. मधुराचं काळीज हललं. म्हणजे आपला तर्क खरा होता तर!
आता आपलं कोकरू आपल्या कुशीत येऊन धाय मोकलून रडत काय काय सांगणार, या कल्पनेनंच तिच्या पोटात गलबललं.
``काय झालं बाळा तिथे?`` मधुरानं रेवाचा अंदाज घेत, स्वतःवर प्रचंड कंट्रोल ठेवत विचारलं. तिचं उत्तर ऐकण्यासाठी तिचे प्राण कानांत गोळा झाले होते.
``काहीच नाही!`` रेवानं उत्स्फूर्तपणे उत्तर दिलं, ``आम्ही पावभाजी खाल्ली, आईस्क्रीम खाल्लं आणि घरी आलो!``
मधुराचा बार फुसका ठरला होता. थोडक्यात, तिथे काहीच झालं नव्हतं. आता मात्र मधुराची सहनशक्ती संपत चालली.
``अगं, मग अशी का वागतेयंस दोन दिवस? गप्प गप्प का असतेस तू? काय झालंय तुला? कुणावर रागावलेयंस?`` मधुराला राग येत होता, पण आई म्हणून जबाबदारीनं वागणं महत्त्वाचं होतं.
दोन क्षण शांततेत गेले. मायलेकी एकमेकींच्या नजरेला नजर देत बघत राहिल्या.
``आई, खरं सांगू?``
``हो. खरंच सांग!`` मधुरा कळवळून म्हणाली.
``तू रागावणार नाहीस ना?``
``नाही बेटा. काहीही झालं असलं, तरी सांग. मला आज उत्तर हवंय. कुणामुळे तू अशी उदास असतेस?``
रेवाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती म्हणाली, ``तुझ्यामुळे!``
काही क्षण मधुराचा तिच्या कानांवर विश्वासच बसेना. पूर्वीच्या कादंबऱ्यांत नायिकांना नायकाने नकार दिल्यानंतर त्यांच्या कानात कुणीतरी तप्त लाव्हा वगैरे ओतल्यासारखा फील यायचा ना, तसं काहीतरी तिला झालं.
`अगं पण का? मी काय केलंय?`` मधुराच्या बोलण्यात उत्सुकता, उद्विग्नता, कुतुहल, राग, आर्तता वगैरे सगळंच दाटून आलं होतं.
``अगं, काय होणारेय मला दर चार दिवसांनी? इथे तुझ्या समोरच असते ना? `काय झालं बेटा,` असं सारखं काय विचारायचं? बोअर होतं मला! म्हणूनच मूड गेला होता माझा.`` शक्यतो आईला न दुखावता, आवाजात नम्रता ठेवून रेवा म्हणाली आणि तिच्यासमोरून उठली.
``मी खेळायला जातेय खाली. तासाभरात येते!`` असं म्हणून सॅंडल घालून खाली पळालीसुद्धा!

मधुराच्या डोक्यावरचं मोठ्ठं ओझं एकदम उतरल्यासारखं झालं. तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. साडेसात वाजायला आले होते. 
...आणि त्याच वेळी तिला जाणवलं, आणखी एक मोठी समस्या आपल्यासमोर आपल्यासमोर आ वासून उभी आहे – `आज रात्रीला भाजी काय करायची?`


Mar 3, 2018

आयडेंटिटी क्रायसिस



``नितीन, तुझा फोन वाजतोय कधीपासून. घेत का नाहीयेस?`` प्रिया किचनमधूनच ओरडली.
``अगं, मी बाथरूममध्ये आहे. इथून कसा घेऊ फोन?``
``बरं, मी बघते,`` असं म्हणून प्रिया हात पुसून नितीनचा फोन बघण्यासाठी बाहेर आली. नितीनची अंघोळ उरकतच आली होती, तेवढ्यात प्रियाच्या किंचाळण्यामुळे त्याच्या हातातून तांब्या पायावर पडला आणि तोही किंचाळला.
``अगं, झालं काय एवढ्यानं किंचाळायला?``
``काय काय नावानं फोन नंबर सेव्ह करतोस रे?`` प्रिया आता त्याच्याशी भांडण करण्याच्या पवित्र्यात बाथरूमच्या बाहेर उभी राहिली होती.
``काय झालं? `` टॉवेल गुंडाळून बाहेर येत नितीन म्हणाला.
``अवदसा`, अशा नावानं कुणाचा नंबर कसा काय सेव्ह करू शकतोस तू?``
प्रियाच्या या वाक्यावर नितीनच्या हातून टॉवेल निसटणारच होता, पण त्यानं वेळीच टॉवेलला (आणि स्वतःला!) सावरलं.
प्रिया ढिम्म होती.
तिच्या चेहऱ्यावरची एकही वक्ररेषा हलली नव्हती.
``एकेकाळी माझ्या हातून असा टॉवेल निसटला, की कसली कातिल नजरेनं बघायचीस तू माझ्याकडे! आता खुनशी नजरेनं बघतेस. `` नितीन कुरकुरला.
``विषय वेगळा चाललाय इथे. अवदसा कोण आहे? ``
``अगं, ती ही....आपली... ``
``आपली? ``
``आपली म्हणजे, ती मार्केटिंगवाली गं. मार्केटिंग एजन्सीमधून फोन येतो नेहमी त्या नंबरवरून. म्हणून मी तशा नावानं सेव्ह करून ठेवलाय तो. ``
``असंय होय? ``
``म्हणजे? तू संशय घेतेयंस माझ्यावर? ``
``नाही रे राजा. माझा भोळा सांब तू. माझ्याशिवाय दुसरी कुणीही तुझ्या मनात नाहीये, माहितेय मला. तुझ्यावर कसा संशय घेईन मी?`` प्रिया `श्यामची आई टोन`मध्ये बोलली आणि नितीनचा चेहरा खुलला. एवढ्यात एकदम ती `सत्या`ची शेफाली छाया बनत म्हणाली, ``असं वाटण्याएवढा तू भोळा नाहीयेस आणि तुला तसा फील देण्याएवढी मी निर्बुद्ध!``
नितीनचा खळ्ळकन स्वप्नभंग झाला. निघायचंय मला लवकर, असं म्हणून त्यानं तिथून कल्टी मारली.
....
दोन दिवसांनी पुन्हा असाच प्रकार घडला. यावेळी रणसंग्रामाचं ठिकाण बाथरूमबाहेरच्या पॅसेजऐवजी गॅलरी होती. रविवारच्या सुटीच्या निमित्तानं नितीन बागकामाचा पसारा मांडून बसला होता आणि तेवढ्यात त्याचा फोन वाजला. नेमकी त्याला रिंगटोन ऐकू गेली नाही आणि प्रियानं फोन बघितला. यावेळी नाव डिस्प्ले होत होतं - `भवानी.` पुन्हा तोच सुमधुर संवाद घडला. तिनं त्याला फोन वाजतोय सांगणं, त्यानं फोन घेता येत नसल्याचं कारण सांगणं, तिनं त्या विचित्र नावाबद्दल चौकशी करणं आणि त्यानं दचकणं, लपवाछपवी करणं, काहीतरी थातुरमातुर सांगून वेळ मारून नेणं.
``पण आज तर रविवार आहे, मार्केटिंगचा कॉल येणं शक्यच नाही!`` प्रियानं मुद्द्याला हात घातला.
``अगं, तुला माहिती नाहीयेत हे लोक. हे रविवारची सुटी कशी घालवावी, याचंही मार्केटिंग करू शकतील!`` नितीनच्या खुलाशावर प्रिया काही वेळ गप्प झाली, पण तिचं पूर्ण समाधान झालं नव्हतं.

तिच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळायला लागला होता. कोण करत असेल नितीनला फोन? तो फोन घेत का नसेल? असं काय घडलं असेल, फोन न घेण्यासारखं? गेल्यावेळी `अवदसा` म्हणून फोन आला होता, तो हाच नंबर नाही ना, हे तपासावं असं तिला वाटत होतं, पण नितीनच्या समोर त्याचा फोन तपासणं हे तिच्या `नवऱ्यावर अजिबात संशय न घेणारी बायको` या इमेजला धक्का लावून घेण्यासारखं होतं. तरीही तिचं मन काही तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. याबद्दल कुणाचा तरी सल्ला घ्यावा, कुणापाशी तरी मन मोकळं करावं, असं तिला वाटत होतं. या परिस्थितीत तिला आईशिवाय दुसरं कुणी जवळचं वाटलं नाही.
``ठीक आहे, मी बोलेन जावईबापूंशी!`` आईनं दिलासा दिला, तेव्हा प्रियाला मनावरचं मणाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं.
``आणि काळजी करू नकोस, जावईबापू चांगले आहेत आमचे. ये सिर्फ तुम्हारा वहम है.`` हिंदी सिनेमे बघत असल्याचा आईवर वाईट परिणाम झालाय, हे प्रियाच्या लक्षात आलं.

प्रियाच्या आईनं तिचा शब्द पाळला. तिनं नितीनला फोन करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही ना काही कारणानं तिचा संवादच होऊ शकला नाही. शेवटी प्रियानंच आईला सांगितलं, की सध्या तू लक्ष घालू नकोस. प्रकरण अगदीच हाताबाहेर गेलं, तर मी तुला कळवेन. आईलाही बरं वाटलं. तसंही नितीनचं आपल्या आईशी फारसं पटत नाही, याची प्रियाला कल्पना होतीच.

काही दिवस असेच भाकड गेले. मधल्या काळात काहीच घडलं नाही. प्रियाला तो नंबर तपासून बघण्याची उत्सुकता होती, पण ती योग्य संधीच्या शोधात होती. आणि एक दिवस तिला ती सुवर्णसंधी मिळालीच. `अवदसा` या नावानं सेव्ह केलेला नंबर तिनं शोधला, पण आता कॉंटॅक्ट लिस्टमध्ये हा नंबर नव्हता. तिला आश्चर्याचा धक्का बसला, संशय आणखी बळावला. आपण फोन तपासणार, याचा नितीनला आधीच संशय आला होता की काय? त्यानं नंबर डिलीट का केला असेल? निदान `भवानी`चा नंबर तरी शोधावा, असा विचार तिच्या मनात चमकून गेला आणि त्या नावानं तिनं सर्च दिला, पण हाय रे कर्मा! `भवानी`सुद्धा कॉंटॅक्ट लिस्टमधून अंतर्धान पावली होती. आता मात्र प्रिया भयंकर अस्वस्थ झाली. फोन नंबर तोंडपाठ असण्याची कला आपल्याला वश व्हायला हवी होती, असं तिला राहून राहून वाटलं. `तुझा नवराही मेन विल बी मेन कॅटेगरीतला आहे गं सिंड्रोम`ने तिचा पूर्ण ताबा घेतला आणि आता नवऱ्यावर डोळ्यात तेल घालून पहारा करण्याचा निश्चय तिनं करून टाकला.

अर्थात, प्रियाच्या दुर्दैवाचे दशावतार एवढ्यात संपणारे नव्हते. आपल्याला निवांत वेळ असेल आणि टीव्हीवर सिनेमा बघण्याचा मूड असेल, तेव्हा फक्त `सूर्यवंशम,` `मैं हूं सबसे बडा खलनायक नंबर वन` आणि `मुंबई की फूलनदेवी` एवढेच ऑप्शन्स असतात ना, तसंच काहीसं प्रियाच्या बाबतीत झालं. ती त्या विचित्र नावाच्या नंबरवरून फोन येण्याची चातकिणीसारखी वाट बघत होती आणि तिचं नशीब कुठेतरी पेंड खात होतं.
नितीनच्या आयुष्यात आपल्या पलीकडे कुणीतरी आहे आणि तीच त्याला फोन करून त्रास देतेय, तिचे फोन नितीन टाळतोय, अशी प्रियाची खात्री झाली होती. फक्त ती कोण, एवढं समजणं बाकी होतं. तिनं त्याचे सगळे चॅट्ससुद्धा त्याच्या नकळत तपासले होते, पण साजिद खानच्या सिनेमातून जसं काहीच हाताला लागत नाही, तसंच तिच्या हाती काही लागलं नव्हतं.

अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर तिचा भाग्योदय घडवणारा तो दिवस उजाडला.
त्या दिवशी पुन्हा नितीनच्या अनुपस्थितीत त्याचा फोन वाजला आणि `च्यायला, डोक्याला ताप!` असा नंबर डिस्प्ले होऊ लागला. ही तीच बया असणार, हे प्रियाच्या लक्षात आलं. प्रियानं झडप घालून फोन उचलला, पण तोपर्यंत तो कट झाला होता. ती चरफडली. तिनं पुन्हा त्याच नंबरवरून फोन लावायचा प्रयत्न केला, पण तो लागला नाही. ती अस्वस्थ झाली. तिनं नंबर तपासला. तो ओळखीचा वाटत होता, पण नक्की कुणाचा आहे, कळत नव्हतं. आज नितीन फोन घरीच विसरून बागेत फिरायला गेला होता आणि तेवढ्या वेळात या नंबरचा छडा लावण्याचं अग्निदिव्य प्रियाला पार पाडायचं होतं. तिनं आपल्या सगळ्या मैत्रिणींची नावं आठवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे नंबर शोधले, पण त्यांपैकी कुणाचाच तो नंबर नव्हता. तिनं नितीनच्या माहीत असलेल्या मैत्रिणींची नावं आठवली, त्यांचे नंबरही शोधले, पण व्यर्थ! शेवटी तिनं नितीनच्या ऑफिस कर्मचारी, सोसायटीतील शेजारी, क्लबचे मेंबर्स, अगदी मुलाच्या शाळेतल्या ताईंचे नंबर्ससुद्धा आठवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच क्लू मिळत नव्हता.
अचानक तिला काहीतरी सुचलं. आपल्या मोबाईलवरून त्या नंबरवर फोन केला तर?
``शी! हे आधी का सुचलं नाही?`` प्रिया स्वतःवरच चरफडली.
तिनं नितीनच्या फोनवरचा तो नंबर पुन्हा बघितला आणि आपल्या फोनवरून तो नंबर डायल केला. रिंग वाजू लागली आणि तिच्या जीवात जीव आला. तेवढ्यात दार उघडून नितीन आत आला. प्रिया जाम घाबरली आणि कानाला लावलेला फोन तिनं तसाच कट केला.
``चल लवकर, आपल्याला काळे काकांकडे जाऊन यावं लागणारेय. ते अचानक आजारी पडलेत!`` नितीननं तिला सांगितलं आणि ती पटकन आवरून त्याच्याबरोबर बाहेर पडली. आत्ताच डायल केलेला नंबर आपल्याकडे सेव्ह आहे की नाही, हे बघण्यासाठीही तिला वेळ मिळाला नाही.

काळे काकांच्या घरीच तासभर गेला. सगळी हालहवाल विचारून, त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था करून दोघं परत आले, तेव्हा प्रियानं मोबाईल बघितला आणि आईचे चार मिस कॉल्स बघून ती चमकलीच.
तिनं घाईघाईनं आईला फोन केला. आईनं फोन उचलेपर्यंत प्रियाच्या जिवाची घालमेल सुरू होती. आईला काही त्रास तर झाला नसेल ना, बाबांची तब्येत ठीक असेल ना, शंभर शंका तिच्या मनात येत होत्या. शेवटी एकदाचा आईने फोन उचलला.
``आई, काय गं, कशासाठी फोन केला होतास? चार मिस कॉल्स होते तुझे. सगळं ठीक आहे ना?`` प्रियानं एका दमात विचारून टाकलं.
``आमच्याकडे सगळंच ठीक आहे गं. पण तू कशासाठी फोन केला होतास?``
``मी? कधी?``
``एक तासापूर्वी! म्हणून तर मी तुला पुन्हा फोन करत होते!``

-    अभिजित पेंढारकर