Jul 11, 2008

किस बाबा किस!

----------
बोंबला!
साधारणपणे डझनभर विवाहसंस्थांचे उंबरे झिजवल्यानंतर, चहा-पोह्यांचे पन्नासेक कार्यक्रम यथासांग पार पाडल्यानंतर आणि विवाहेच्छू युवतींच्या मनांच्या सागरांतल्या गर्तांमध्ये गटांगळ्या खाल्ल्यांनंतर आज "हा हंत हंत' म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. म्हणजे, एवढ्या दिवसांची, आठवड्यांची, वर्षांची मेहनत वायाच गेली म्हणायची! विवाहेच्छू तरुणी या तरुणांचे व्यक्तिमत्त्व, पगार, घरची श्रीमंती, लफड्यांची पार्श्‍वभूमी, वाईट (नसलेल्या) सवयी, घरातल्या अडचणीच्या ठरू शकणाऱ्या गोष्टी (उदा. लग्न न झालेली नणंद, संसारातच पाय अडकलेली सासू वगैरे), घरातलं राहणीमान (वॉशिंग मशीन, फ्लॅट्रॉन टीव्ही, चारचाकी वगैरे), राहण्याचे ठिकाण (शक्‍यतो कोथरूड ः बिबवेवाडी, कॅम्प "चालेल') आदी निकष लावून (सूचना ः निकष प्राधान्यक्रमानुसार असतीलच, असे नाही.) नवऱ्याची निवड करतात, असा आमचा आतापर्यंत समज होता. त्यासाठी कधी नव्हे ते पार्लरमध्ये जाऊन केसांचे सेटिंग, (पुरुष मसाजरकडून) फेस मसाज, डिझायनर कपडे वगैरे अप-टु-डेट राहण्याचा आमचा प्रयत्न चालला होता. पण हाय रे कर्मा! "हेचि फळ काय मम तपाला' असे म्हणण्याची वेळ आमच्यावर अमेरिकेतल्या एका संशोधनाने आणली आहे.
सोबत या संशोधनाचा "महाराष्ट्र टाइम्स'मधील धागा जोडला आहे. या धाग्याने आमच्या भावी संसाराच्या सुखी स्वप्नांना टराटरा फाडले आहे. (अगदी हिमेश रेशमिया स्वरांन फाडतो, तसे!) म्हणजे, विवाहेच्छू तरुणांकडे असलेली "उत्तमरीत्या चुंबन घेण्याची कला' ही तरुणींना सर्वाधिक आकर्षित करते तर?
आम्हाला ही माहिती अगदीच नवी होती. एकतर हल्लीच्या मुली एवढ्या सुधारल्या आहेत, याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमात मुली अगदी पायाने जमीन उकरत नसल्या, तरी अगदीच नाकाने कांदे सोलत नाहीत, असा आमचा आपला एक समज होता. पण पहिल्याच कार्यक्रमात एका आधुनिक उपवर तरुणीने आम्हाला पोह्यांच्या बशीसह तोंडघशी पाडले! चक्क "एचआयव्ही टेस्ट' केली आहे काय, हे विचारून! नशीब, तिने रिपोर्टची झेरॉक्‍स आणून द्यायला सांगितली नाही!
तेव्हापासूनच मुलींच्या आधुनिकतेचा अंदाज यायला लागला होता. पण हा म्हणजे कहर झाला. उत्तम चुंबनकला, हीच मुलींवर प्रभाव टाकण्याची एकमेव कला आहे, हे तेव्हा कळले असते, तर पहिल्याच मुलीला भेटल्यावर आमचा ऑफिसातला हुद्दा सांगण्याआधी उत्तम चुंबनाचे प्रात्यक्षिकच आम्ही दाखवले असते!
अर्थात, चुंबनातले आम्ही कुणी जाणकार तज्ज्ञ नव्हे. पण वर्षानुवर्षं चुंबनाची जी प्रात्यक्षिकं आम्ही रुपेरी पडद्यावर पाहत आलो आहोत, त्यांचा प्रत्यक्षात उपयोग करण्याची ही नामी संधी होती. बाकी, चुंबनकला अवगत नाही, म्हणून आमची प्रेयसी आम्हाला टाकून दुसऱ्यावर प्रभावित होण्याचा प्रश्‍नच नव्हता. कारण, मुदलात, त्यासाठी आधी कुणी आमच्यावर भाळणं आवश्‍यक होतं! त्यामुळं चुंबनकलेत तरबेज होण्यासाठी चहापोह्यांच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसरं माध्यम नव्हतं.
"तुमच्या मुलीबरोबर थोडं एकांतात मोकळेपणानं बोलायचं आहे,' असं म्हटलं, तरी अनेक भावी वधुपित्यांची साधारणपणे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्यांची झाली होती, तशी द्विधा मनःस्थिती व्हायची. कुणीकुणी तर दारामागे टपून राहायचे. आता आम्ही काय त्यांच्याच घरात तिचा विनयभंग करणार होतो का? पण छे! विश्‍वास म्हणून नाही.
पण ही बातमी वाचून आमच्यापुढे साक्षात तो ऐतिहासिक प्रसंग उभा राहतो. ""तुमच्या मुलीचं चुंबन घेऊन मला तिला "इम्प्रेस' करायचं आहे,'' असं आम्ही या वधुपित्यांना सुचवत आहोत. मग भर मांडवातून मुलगी पळून गेल्यानंतर आनंदानं नाचणाऱ्या "दिल है के मानता नहीं'मधल्या अनुपम खेरसारखे हे वधुपिते आम्हाला डोक्‍यावर घेऊन नाचताहेत.
""घे, घे. मस्त चुंबन घे. इम्प्रेस कर तिला!'' असं म्हणून प्रोत्साहन देत आहेत. ती मुलगी लाजून चूर होत आहे. आपला चेहरा उंचावून डोळे मिटून आमच्या बाहुपाशात विलीन होण्यासाठी आतुर होत आहे...मग ती आमच्या चुंबनकलेवरून आम्ही तिच्या बाळांचे सुयोग्य जन्मदाते ठरू शकतो का, याची पारख करून निवड करणार आहे....!
...आणि अचानक आमची तंद्री खाडकन भंग होते.
""अहो, बटाटे किसून देणार आहात ना? किस करायचाय ना? उठा! लोळत बसू नका! एकादशी आणि दुप्पट खाशी तुमचीच असते. उठा आता!! नाहीतर किस-बिस काही मिळणार नाही!!'' आमच्या सौभाग्यवतींची मृदु साद कानी पडते आणि जीव पुन्हा घाबराघुबरा होतो...
---------------
- कुमार आशावादी
------------------
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2991389.cms

Jul 10, 2008

पाऊस आटलेला....

"पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा
दारास भास आता हळुवार पावलांचा...'
दर वर्षी वातावरण पावसाळलं, की मला या गाण्याची अनिवार ओढ वाटतेच. पावसाळ्यात दर दोन दिवस आड ही कॅसेट (हो, कॅसेटच! "सीडी' नाही!) घरी वाजतेच. पण यंदा अजून एकदाही लावावीशी वाटली नाही. खरंच, यंदा वरुणराजा रुसलाय!
मी जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात उटी-कोडाईकॅनॉल सहल ठरवली, तेव्हा अनेकांनी वेड्यात काढलं होतं. पावसाने सहल बुडते की काय, असं नंतर मलाही वाटायला लागलं होतं. पण त्यानं कृपा केली. फारसा त्रास न देता सहल व्यवस्थित पार पडली, तेव्हा कोण आनंद झाला होता! पण तोच आनंद पुण्यात परतल्यावर मावळला.
पहिल्या धारेचा पाऊस यंदा झेलता आला नाही. पहिल्या आठवड्यात इथे, कोकणात तो दणकून कोसळला. तेव्हा मी तमिळनाडूत बागडत होतो. आल्यावर जो तोंड घेऊन पळाला, तो आतापर्यंत! जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे चिपळूण-राजापूर-संगमेश्‍वर, महाड, सांगली, मुंबई किमान दोनदा तरी पाण्यात बुडाल्याच्या बातम्या, कुठेतरी दरड कोसळल्याची दुर्घटना, धबधब्यांनी ओसंडून वाहणाऱ्या घाटांचे फोटो, अनुभवायला मिळणारच! पण यंदा ही दृश्‍यं फारच दुर्मिळ!
पावसाळा म्हणजे ट्रेकिंगला उधाण! दरवर्षी ड्यूक्‍स नोज आणि जमल्यास तोरणा हे ट्रेक तर मी चुकवतच नाही! पण यंदा तोरण्याला अजिबात जावंसं वाटलं नाही. आमच्या "गिरीदर्शन'चे जूनअखेरीस तोरणा आणि जुलैअखेर ड्यूक्‍स नोज ट्रेक ठरलेले. पण तोरणा तरी यंदा हुकला. किंबहुना, हुकवला. पाऊसच नाही, तर जायचा उत्साह कसा वाटणार? ड्यूक्‍स नोज पर्यंत तरी तो कोसळेल, अशी अपेक्षा.
पावसाळ्याच्या अनेक आठवणी आहेत. एकतर माझा भयंकर आवडता सीझन. दोन-चारदा पावसात तुडुंब भिजल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. विशेषतः ट्रेकला जाताना अजिबात रेनकोट बिनकोट न्यायचा नाही, मनसोक्त भिजायचं आणि गच्च ओले कपडे तसेच अंगावर वाळवायचे, बदलायचेही नाहीत, हा आपला नेम. ट्रेक नसला, तरी रेनकोट बाळगण्याचे कष्ट न घेता, ऑफिसातून नखशिखांत भिजून घरी जायचे प्रसंग दोन-तीनदा तरी आलेच पाहिजेत! पुण्यात 97 साली आलो, तेव्हा दोन वर्षे माझ्याकडे रेनकोटही नव्हता. कारण रत्नागिरीच्या पावसातून आलेल्या मला पुण्याचा पावसाळा म्हणजे झाडांना पाणी शिंपडल्यासारखा होता!
रत्नागिरीत तर पावसात धुमशान असायचं. कॉलेजात असताना थिबा पॅलेसला क्‍लासला जायचो, तेव्हा परतताना पाऊस लागला, तर वह्या सोबतच्या मुला-मुलींकडे द्यायच्या आणि सायकलवरून मनसोक्त भिजत घरी जायचं, हा आवडता छंद! काय धमाल यायची त्या पावसात! अगदी दोन फुटांवरचंही दिसायचं नाही.
एफ. वाय. ला असताना पावसजवळ भटकंतीला गेलो होतो. तेव्हा जो टपोऱ्या थेंबांचा तुफानी पाऊस झेललाय, तसा नंतर कधी पाहिला नाही. आणि त्यानंतर बस मिळाली नाही, म्हणून वाळू नेणाऱ्या टेम्पोच्या हौद्यात बसून रत्नागिरीपर्यंत हेंदकाळत, ठेचकाळत केलेला प्रवास. त्यातून त्यात टेम्पोच्या हौद्याच्या खालच्या फळ्या निसटलेल्या आणि त्यातून थेट रस्त्यावर पडण्याचा, किंवा गेला बाजार पार मुरगळण्याचा धोका! प्रत्येकाने एकमेकांच्या हाताला घट्ट धरून दिलेला आधार! ओहो!
"रत्नागिरी एक्‍स्प्रेस'मध्ये काम करताना एकदा रात्री साडेदहाला घरी निघालो, तेव्हा तुफानी पाऊस पडत होता. रेनकोट होता, तरी घरी पोचेन, अशी माझी मलाच खात्री नव्हती. एकतर मिट्ट अंधार, रस्त्यालाही दिवे नाहीत आणि छातीत धडकी भरविणारा विजांचा कडकडाट! माझी तर पाचावर धारण बसली होती!
यंदा मात्र अजून तरी त्यानं कृपा केलेली नाही. मस्त भिजून घरी यावं आणि कांदा भज्यांवर ताव मारावा, अशी इच्छा फार वेळा झालेली नाही. दूरवर भटकायला जावं आणि सोसाट्याचा वारा खावा, असं वाटलेलं नाही. राजा, कधी बरसणार आहेस रे...?
------------