Oct 18, 2007

शेण कसे खावे?



बाजारात येता-जाता, गल्ली-बोळातल्या फूटपाथांवर, रेल्वे स्टेशनांवर, बस स्टॅंडांवर, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची वर्तमानपत्रं, नियतकालिकांत सध्या एकाच प्रकारच्या पुस्तकाची चलती आहे...यश कसे मिळवावे, सुखी कसे व्हावे, यशस्वी होण्याचे शंभर उपाय, अपयशातून यशाकडे वगैरे वगैरे....!


ही पुस्तकं एवढ्या संख्येनं सगळीकडे मिळताहेत, खपताहेत, त्यावरून त्यात नक्कीच काहितरी "दम' असला पाहिजे. "नॉन-फिक्‍शन' पुस्तकंच हल्ली खपतात, अशी "रिऍलिस्टिक' माहितीही मिळाली. त्यामुळं आम्हीही काहितरी हृदयद्रावक, मनखोदक, बुद्धिभेदक, नेत्रविस्फारक, कल्पनारम्य, चक्षुचमत्कारिक लिहिण्यापेक्षा खर्रखुर्र आणि वास्तवाधारित लिहावं, असं वाटू लागलं....पण "यश कसं मिळवावं' अशा छापाचं काहितरी लिहायचं, तर स्वतःला किमान यश मिळालेलं असणं अपेक्षित किंवा अध्याहृत आहे, असं आम्हाला वाटलं. (अशी पुस्तकं लिहिणाऱ्या किती जणांना आधी आणि पुस्तकानंतर यश मिळालंय, देव जाणे! पण आमची आपली एक भ्रामक समजूत.) त्यामुळं तो प्रश्‍न मिटला. यशाचा आणि आमचा म्हणजे भुजबळ-शिवसेनेइतकाही संबंध नाही. मग लिहावं कशावर...?


मोठा खासा प्रश्‍न होता. मग आपला हातखंडा असलेल्या अपयशावरच काहितरी लिहावं असा कौल आमच्या सडक्‍या मेंदूनं दिला. भिकारगल्लीतल्या "कवडीमोल' प्रकाशनानं स्वतःहून प्रकाशनाची तयारी दाखवली आणि दहा रुपये सवलतीत एक प्रत आणि खपलेल्या दर तीन पुस्तकांमागे सव्वा रुपया असं भरघोस मानधन मंजूर झाल्यानंतरच आम्ही लेखणीला हात घातला.सध्या एकट्या सानिया मिर्झाचा सन्माननीय अपवाद वगळता सगळ्याच खेळांतले खेळाडू, कलाकार, मान्यवर, मंत्री, संत्री, मोसंबी, सगळ्या क्षेत्रांत यशस्वी होत असताना त्यांच्यासाठी "यश कसे मिळवावे' अशा प्रकारच्या पुस्तकांची काहीच गरज नाही, असे वाटून गेले. (असलीच, तर ती सचिन तेंडूलकरला असेल. पण तोही जाहिराती, हॉटेल व्यवसाय, पेज थ्री वगैरे क्षेत्रांत यशस्वी आहेच की!)


"यशाचाही कंटाळा येतो' अशा स्वरूपाचे कोणत्या तरी प्रसिद्ध व्यक्तीचे संतवचनही आमच्या कानावर पडले होते. त्यामुळं प्रत्येक यशस्वी व्यक्तीनं अपयशाची चवही थोडी चाखून बघायला हवी, असं आम्हाला वाटून गेलं. त्यामुळंच, "अपयशी होण्याचे 51 सोपान' अशा छापाचं पुस्तक लिहिलं, तर ते हातोहात खपेल, अशी मनोमन खात्री झाली. पण पुस्तकाला नाव काहितरी आकर्षक असावं, असं कुणीतरी सुचवलं. उदा. "इडली, ऑर्किड आणि मी', "ही श्रींची इच्छा' वगैरे. म्हणून मग आमचा "अंतू बर्वी' बाणा ऐनवेळी हात देऊन गेला. "अपयशी कसे व्हावे' यालाच समानार्थी असलेला आणि आम्ही स्वतः वारंवार अनुभवलेला "शेण कसे खावे,' हा वाक्‍प्रचार मदतीला धावून आला. पुस्तकाला शीर्षक तेच ठरलं.


या पुस्तकाची किंमत फारच वाजवी (कुणीतरी कानाखाली "वाजवी'ल!) असल्यामुळं आणि ते नाक्‍यानाक्‍यावर "गोवा, माणिकचंद'पेक्षाही सहज उपलब्ध असल्यामुळं त्यातल्या तपशीलाबद्दल फार काही देण्याचा मोह इथे टाळलाय. (विचारलंय कुणी?) तरीही, ही थोडक्‍यात झलक...


1. कुठलंही काम हाती घेताना आपल्याला हे बापजन्मात जमणार नाही, याची खात्री मनात बाळगावी.

2. असला-नसलेला उत्साह झटकून टाकून, प्रचंड नैराश्‍यानं आणि एरंडेल प्यायल्यासारखा (किंवा अलोकनाथसारखा म्हणा, हवं तर!) चेहरा करून कामाला नाइलाजानंच सुरुवात करावी.

3. थोडंसं जरी आपल्याला काम जमतंय, यश मिळतंय, असं वाटायला लागलं, की काहितरी कारणं काढून आपली कामाची दिशा बदलावी. नसलेल्या त्रुटींबद्दल तक्रारी करून काम देणाऱ्याला हैराण करून टाकावं.

4. कामात इंटरेस्ट वाटायला लागला असल्यास ताबडतोब काम थांबवावं. चहा किंवा लघुशंकेचं निमित्त करून कामातून मन काढून घ्यावं. उसना उत्साह गाळून टाकावा आणि नव्या नैराश्‍यानं पुन्हा कामाला हात घालावा.

5. एवढं करूनही कसंबसं एखादं काम पूर्णत्वाला गेलंच, तर अंतिम टप्प्यानंतर तरी ते कुणापर्यंत पोचणार नाही, याची काळजी घ्यावी.

6. शक्‍यतो त्याचा आणि आपल्या अयशस्वी कारकिर्दीचा तोंड फाटेस्तोवर अपप्रचार करावा.

7. कामात जाणुनबुजून काहीतरी त्रुटी ठेवाव्यात आणि त्यांवरच समाधान मानावे.

8. आपलं यश काम पूर्ण होण्यात नाही, तर ते अर्धवट राहण्यात, अयशस्वी होण्यात आहे, याची कायम जाणीव ठेवली, तर कधीच अपयश येणार नाही. (म्हणजे काय?)

9. एखाद्या वेळी यशस्वी होण्याची थोडीशीही धुगधुगी निर्माण झाल्यास, ताबडतोब केलेल्या कामाचा बट्ट्याबोळ करून टाकावा.

10. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, अपयश हे आपलं ध्येय आहे, हे पक्कं मनाशी ठेवावं.

----


सध्या माझं हे पुस्तक प्रचंड खपतंय.

हं...आता काही नतद्रष्ट समीक्षकांच्या पोटात या पुस्तकाचा अत्युच्च दर्जा खुपल्यामुळं आणि त्यांच्या डोळ्यांवर "यश कसं मिळवावं' वगैरे पुस्तकांचं यश असल्यामुळं त्यांनी माझ्या पुस्तकावर प्रचंड टीका केलेय. "लेखकाच्या अपयशाचं कारण सांगणारं पुस्तक' अशी शेलकी आणि सदाशिव पेठी विशेषणं त्यांनी लावल्येत, पण आम्ही फिकीर करत नाही....अपयशावर आमचा प्रचंड विश्‍वास आहे....!


तुम्हीही हे पुस्तक (कुठे मिळालंच, तर) जरूर वाचा आणि अभिप्राय कळवा.
काशीत गेलातच म्हणून समजा!


-------------

4 comments:

Nandan said...

he pustak chhan aahe. khapala tari yashasvi; nahi khapala tari yashasvi :)

Raj said...

एकदम झकास :) हे पुस्तक विकत घ्यायलाच हवे.
अपयशी होण्याचे उपाय वाचल्यावर हेसुद्धा किती कठीण आहे असे वाटले.

Devidas Deshpande said...

ब्येस लिहिलंय. आजकाल सुसिक्षित मानसांस्नी टिप्स आणि यशाचे मंत्र छापाची पुस्तकं लई आवडतात म्हंतात. तुमचं पुस्तक बी त्याच "टायपा'तलं हाय. अक्षी असंच नेटानं मनापासून काम करा अन्‌ आणखी एकादं पुस्तक काढा राव!

loukika raste said...

....
........
काशीत गेलातच म्हणून समजा!
aawadala.nice article
bhari ahe!!!