Apr 15, 2008

नस्ती आफत!


परवाच एका सिनेमाच्या पार्टीला गेलो होतो. एकतर मराठी सिनेमाच्या पार्टीत "सकाळ'वाल्याला फार महत्त्व असतं. त्याच्याशिवाय आपल्या पिक्‍चरचं काही खरं नाही, असं निर्मात्यांना उगाचच वाटत असतं. एक बडे निर्माते-दिग्दर्शक होते. ते माझी वाटच बघत होते. नेहमीप्रमाणे पिक्‍चरची माहिती देऊन झाल्यावर जास्तच प्रेमात आले. एकतर मी प्रिमिअर शो पाहिला नव्हता. चित्रपट मला कसा वाटला, याबद्दल त्यांना उत्सुकता होती. पण मी त्याबद्दल काहीच बोलू शकलो नाही.

नंतरच्या बोलण्या-वागण्यातून एकंदरीत लक्षात आलं, की माझ्या नावाची त्यांना दहशत होती!सध्या मराठी चित्रपटसृष्टीत निदान पुण्याबाबत तरी मला सगळे घाबरतात की काय, असंच वाटायला लागलंय. काही निर्माते तर "अरे बापरे! पेंढारकर लिहिणार आहेत काय,' म्हणून डोक्‍याला हात लावतात. काही माझ्याऐवजी दुसऱ्या कुणाला बोलावता आलं तर बरं होईल, असा लकडा पीआरओकडे लावतात. खरं तर अशी दहशत बिहशत असायचं काहीच कारण नाही. मी काही राक्षस नाही. किंवा कुणाबद्दल आकसानं पण लिहीत नाही. पण खोट्याला खोटं म्हणतो, एवढंच.

गेल्या वर्षी तर एका प्रसिद्ध दिग्दर्शकानं माझ्याविरुद्ध शड्डूच ठोकला होता. त्याला आम्ही प्रत्युत्तरातून सरळ केला. यंदाही अगदी भोळा, साळसूद असलेल्या एका लेखक-दिग्दर्शकानं माझ्याविरुद्ध मोहीम चालवली. त्याच्या चित्रपटाला मी वाईट म्हटलं, म्हणून. आम्ही धूप घातला नाही.बहुधा, अशाच काहीतरी समजुतीखाली हे प्रसिद्ध दिग्दर्शक महाशय होते. मग त्यांनी पीआरओला माझ्यासाठी दुसऱ्या दिवशी "शो' अरेंज करायला सांगितलं.

मी म्हटलं, रात गई, बात गई. दुसऱ्या दिवशी विसरून जातील. पण नाही! मी एका कार्यक्रमात असताना, त्या पीआरओ चा फोन आला.
"अहो, ते दिग्दर्शक तुमच्यासाठी पेटलेत! तुम्ही आज कधी बघणार आहात, विचारताहेत.'
मी म्हटलं, उद्या बघतो.
मग त्यांनी माझा नंबरच साहेबांना देऊन टाकला. दुपारी कार्यक्रम संपल्या संपल्या घरी जाताना साहेबांचा फोन.
"बघणार का आज पिक्‍चर?'
मी म्हटलं, "नाही. उद्या. आज बरं नाहीये.'
"बरं. पण पॉझिटिव्हच लिहा. तुमच्यावर बरंच अवलंबून आहे..'

दुसऱ्या दिवशी इमाने इतबारे चित्रपट पाहिला. बरा होता. मी बरंच लिहिणार होतो.ऑफिसात पोचतोय, तोच साहेबांचा फोन.
"बघितला का? कसा वाटला?'

मी म्हटलं, "चांगला आहे.'

तेव्हा कुठे साहेबांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. खरं तर मी चित्रपट पाहिल्यावर त्यांना माझ्यासोबत जेवायलाही जायचं होतं म्हणे. पण मी दुसऱ्या दिवशीही चित्रपटच न पाहिल्यामुळे त्यांचा नाइलाज झाला.

परीक्षण चांगलं आल्यावर पुन्हा थॅंक्‍सचा एसएमएस वगैरे. मी माझ्या पद्धतीप्रमाणे, "ते माझं कामच होतं,' असं उत्तर पाठवलं. त्यावर परत, "आय ऍम व्हेरी ग्रेटफुल टू यू'चा एसएमएस.
आता, मी ज्याचे चित्रपट पाहत पाहत मोठा झालोय, त्यानं एवढं अगदी माझ्या हातापाया पडावं, असं काही नव्हतं. माझं कर्तृत्वही तेवढं नाही आणि त्याचा दर्जाही एवढा कमी नाही. तशी गरजही नाही. तरी, कुणीतरी त्याच्या मनात भरवलं असावं, की मी वाईटच लिहितो म्हणून. आणि एकदा मी वाईट लिहिलं, की संपलं सगळं!
असो. या सगळ्या प्रकरणातून एक वेगळा अनुभव मिळाला, झालं!
-----

3 comments:

Anonymous said...

To be honest, It is more about your nuisance value than anything else.

your = any jounalist writing for any newspaper having considerable circulation within the target audience.

I see a lot of them misusing their newsly found power for getting favours/goodies/cash, and some getting carried away thinking that this is their power/ knowledge / opinion that people are respecting.

What do you think ?

अभिजित पेंढारकर said...

dear anonymous,

why are you afraid of displaying your name, though I have written with name?

anyway.

I don't use or misuse my nuisance value for distroying or threatening or promoting anyone.
I write from my mind.

Let me know, if you have found any of such example, when I have misused my power.

Don't just fire into the air.

ok?

abhijit.

नीरजा पटवर्धन said...
This comment has been removed by the author.