Aug 30, 2007

लग्नाला यायचं (नाही) हं...!

आमीर खान-किरण राव यांच्या लग्नाच्या "कव्हरेज'साठी आधी मुंबईत आणि नंतर पाचगणीत गेलेल्या पत्रकारांच्या पदरी निराशाच पडली. "बाईट' काय, आमीरनं साधं दर्शनही दिलं नाही. वर त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. खरं तर हा प्रकार गैरसमजुतीतून घडला. आमीरनं लग्नाची निमंत्रणपत्रिका पाठवली आहे, असा सर्व माध्यमांचा समज झाला, त्यामुळे ते धावत गेले; पण खरी निमंत्रणपत्रिका आम्हाला मिळाली. सोबत ती देत आहोत...

--------
...(सौ.) रिना प्रसन्न... आमचे येथे श्री कृपेकरून श्री. आमीर खान आणि किरण राव यांचा विवाह समारंभ मुंबईत नोंदणी पद्धतीने होणार आहे. त्यानंतर पाचगणीत दोन दिवस स्वागत समारंभाच्या नावाखाली "श्रमपरिहार' आयोजित करण्यात आला आहे. (तिथे सगळी "सोय' आहे.)

कार्य सिद्धीस नेण्यास आमचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि आम्ही स्वतः समर्थ आहोत. या शुभकार्यास आपले (दुरून) आशीर्वाद आम्हास अतिशय मोलाचे आहेत, तरी लग्नसमारंभातील गोंधळ आणि स्वागत समारंभाची धावपळ लक्षात घेता, दोन्ही कार्यक्रमांना "न' येणेचे करावे. नंतर आमचे नवीन चित्रपट, अन्य "प्रोजेक्‍ट' आणि गॉसिप यांसाठी मात्र अवश्‍य येणेचे करावे.
(आपल्याला न बोलावता आमच्या लग्नाला जेवढी प्रसिद्धी मिळेल, तेवढी बोलावूनही मिळणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.)

विशेष टीप ः कृपया कॅमेरे आणि माईकचा "आहेर' आणू नये. आपली अनुपस्थिती हाच आमच्यासाठी आशीर्वाद आहे. आपले, समस्त हुसेन आणि राव परिवार

1 comment:

Anonymous said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे .
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर