Dec 7, 2007

कोकणची टुमटुमी आणि ड्रायव्हिंगची खुमखुमी

बऱ्याच दिवसांनी यंदा शिपोशीचा...माझ्या आजोळचा उत्सव अनुभवला.
धमाल आली.
कार्तिक नवमी ते पौर्णिमा असा हा सहा दिवसांचा उत्सव. कोकणातल्या टिपिकल गावातला. पण नुसती धमाल. गावातून मुंबई-पुण्यात बस्तान बसविलेले सगळे चाकरमानी झाडून या उत्सवाला हजेरी लावतात. वर्षानुवर्षं.

यंदाचा काहितरी एकशेचार-पाचावा उत्सव असावा.एकतर समद्या बामणांचं हे खासगी देऊळ. येणारेही समदे बामण. रात्रीचं जेवण देवळातच. दुपारचं आपापल्या घरी. आम्ही बुधवारी गेलो. म्हणजे उत्सवाचा दुसरा-तिसरा दिवस असावा. रात्रीच्या गाडीनं पुण्यातून रत्नागिरीला पोहोचलो. संध्याकाळी आमची मारुती व्हॅन घेऊन शिपोशी. मी रत्नागिरीला गेलो, की गाडीचा "डायव्हर' मीच.

मनस्वीताईंची प्रवासात छान झोप झाली होती. रात्री देवळात गेलो. देवळाभोवती प्रदक्षिणा, अर्थात भोवत्यांचा कार्यक्रम होता. दर वेळी अभंग म्हणत प्रदक्षिणा, नंतर देवळाभोवती फेर धरून भोवत्यांमध्ये नाच आणि पुन्हा हाच क्रम. असा पाच वेळा. एकादशी होती. त्यामुळं खिचडी बिचडी हाणली होती. नाचताना सगळी जिरली.मनस्वी तर पार उधळली होती. प्रदक्षिणांमध्ये झेपेल तेवढं नाचलीच, पण आम्हाला कुणालाही न जुमानता देवळाच्या परिसरात नुसती धुमाकूळ घालत होती. एवढं मोकळं रान मिळाल्यावर ती आमच्यापाशी कशाला येतेय? ऐश करत होती बेटी!रात्री साडेबाराच्या सुमारास घरी गेलो.

रोज हाच दिनक्रम होता. शिपोशीला मरणाची थंडी होती. त्यातून मामाचं घर कौलारू. सगळीकडे फटी, भगदाडांतून थंडी घरात घुसून ठाणच मांडायची. बरेच पाहुणे तडमडल्यामुळं घरात पांघरुणंही अपुरी पडत होती. त्यामुळं रात्री थंडीत अक्षरशः लाकडं व्हायची. किमान दोन-चारदा तरी जाग यायची. पण त्यातही मजा होती.उत्सवादरम्यान दोन संगीत नाटकं होती. संगीत नाटक म्हणजे फुल टू कंटाळा! मी लहानपणापासून कधीच अशा नाटकांना एका जागी बसलेलो नाही. आम्ही आपले काठाकाठानं फिरत आस्वाद घेण्यात धन्यता मानणारे. कुणी जबरदस्तीनं समोर बसवलंच, तर कधीही शेवटपर्यंत जागा राहिलेलो नाही. त्यातून या वेळी मनस्वी होती. त्यामुळं तिच्या झोपेच्या वेळेआधी घरी पोचणं भाग होतं. ते एक निमित्त मिळालं. रोज नाटक सुरू झालं, की आम्ही घरी!

शिपोशीतली बळीभाऊची मिसळ जाम फेमस आहे. आमचा मुंबईचा मामा तर तिच्यावर फुल फिदा! त्याच्या जोडीनं आम्ही पण मग दोन-तीनदा हाणली. बरं. बारा-चौदा रुपयांत घसघशीत मिसळ, पाहिजे तेवढा रस्सा, दोन पाव! मजाच की मग! "रुपाली'त पाण्याला सुद्धा एवढेच पैसे घेत असतील!उत्सवाचे चार दिवस मजेत गेले. भोवत्या नाचायल नेहमीप्रमाणेच मजा आली. "ग्यानबा तुकाराम'च्या सात स्टेप्स नाचणं म्हणजे खरोखरच दिव्य! यंदा बऱ्यापैकी जमलं मला ते. काही क्‍लिप्स टाकायचा प्रयत्न आहे. बघुया, टेक्‍निकली शक्‍य झालं तर.

उत्सव संपला, सगळी मंडळी पांगली. चार दिवस गजबजून गेलेलं शिपोशीचं मामाचं घरही ओस पडलं. आजीचे डोळे नेहमीप्रमाणे पाणावले.

शिपोशीतून सातारामार्गे पुण्याला गाडी नेण्यासाठी ड्रायव्हर मिळत नव्हता. मग मीच मनाचा हिय्या करून हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. बाबांनीही भरीस घातलं. मग म्हटलं, बघूया, काय होईल ते!शिपोशीहून मीच साताऱ्याला आणि नंतर पुण्याला गाडी आणली. वाटेत आंबा घाट होता, पण त्यात फारशी अडचण जाणवली नाही. हायवेवर वेगात मात्र थोडी तंतरली होती. पण एकूण अनुभव छान होता.

साताऱ्यात एक दिवस राहिलो, पण सज्जनगडाच्या अवघड घाटातून गाडी घालण्याचं धाडस मात्र करवलं नाही. तिथे एक प्रशिक्षित ओळखीचा ड्रायव्हर कम मित्र घेतला. तिथून पुण्याला गाडी एकट्यानंच आणली आणि पुण्यात रस्ते म्हणवल्या जाणाऱ्या चिंचोळ्या गल्ल्यांत वाहनांच्या धबडग्यातून चालवलीही.वेगळाचा अनुभव होता.

चांगली बारा-तेरा दिवस रजा उपभोगल्यानंतर पुन्हा कामावर रुजू होणं खरंच त्रासदायक होतं. पण नाविलाज को क्‍या विलाज?

------

1 comment:

Anonymous said...

कोकणात जाऊनही फक्त एकच फोटो? ब्लॉगच्या तमाम 'प्रेक्षकां'वर हा अन्याय आहे