Nov 18, 2015

Operation `बाहु`बली


(भाग 2)

खजिना विहीर चौकातून टिळक रस्त्याला जाऊन तो पार करावा, असा विचार केला, पण तिथेही अभूतपूर्व गर्दी होती. एरव्ही टिळक रस्त्यावरच्या दोन मंडळांच्या मध्ये खूप अंतर असतं. पुढचा गणपती येईपर्यंत एका जागी उभं राहून वाट बघायलाही कंटाळा येतो. त्या रात्री मात्र सगळी संकटं आमच्यासमोर हात जोडून उभी होती. लांबलांबपर्यंत रस्ता पार करण्याची अजिबात संधी दिसत नव्हती. मग तिथून मागे वळून भिकारदास मारुतीच्या जवळच्या बोळातून टिळक रस्त्यापर्यंत आलो.  गर्दीतून सुटकेचा मार्ग तिथेही दिसत नव्हताच, पण आता पर्याय नव्हता. लवकरात लवकर तिथून बाहेर पडणं महत्त्वाचं होतं. शेवटी तसाच धीर करून गर्दीत घुसलो.

माझा उजवा हात डाव्या हातानं धरूनच गर्दीतून चालावं लागत होतं. हात गळ्यात बांधल्यामुळं निदान ते बघून तरी लोक थोडीशी जागा देत होते. तरीही, पायाखाली दिसत नसणा-या फूटपाथवरून दुस-या चौकापर्यंत जाणंही सहनशक्तीचा अंत बघणारं होतं. लोक दोन्ही बाजूंनी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते आणि मी त्यांच्या धक्क्यापासून वाचण्याचा! दोन्ही मुलं हर्षदाच्या ताब्यात होती. आधीच गर्दी, त्यात माझा हात जायबंदी, त्यामुळे मुलं जास्तच घाबरली होती. कसाबसा सावरत, धक्क्यांपासून वाचत त्याच गर्दीतून एसपी कालेजच्या चौकापर्यंत पोहोचलो आणि डावीकडे वळून थोडा मोकळा श्वास घेतला. तरीही अग्निपरीक्षा संपली नव्हतीच. उजवा हात जरा हलला तरी ठणकत होता. आता टिळक रस्त्यापासून पर्वतीच्या पुलापर्यंत चालत जायचं होतं. वाटेत गर्दीची विघ्नं होतीच. ना. सी. फडके चौकापर्यंत आलो आणि नीलायम समोरच्या रस्त्यावर एका मिरवणुकीनं पुन्हा रस्ता अडवला होता. या गर्दीत घुसण्याचं धाडस दाखवणं म्हणजे मूर्खपणा ठरला असता. पर्वतीजवळ लावलेली बाईक तर ताब्यात घ्यायलाच हवी होती. मग हर्षदा आणि मनस्वीनं बाईकवरून घरी यावं आणि मी निमिषला घेऊन चालत घरी पोहोचावं, असं आम्ही ठरवलं.

तिथून चालत घरी आलो. मुलांना एकटंच घरी झोपवून हर्षदाबरोबर मी ग्लोबल हास्पिटलला पोहोचलो.  गर्दीचं दिव्य पार पडलं, पण हास्पिटलमधल्या अतिशहाण्यांशी संघर्ष अद्याप बाकी आहे, याची तेव्हा कल्पना नव्हती. हात दुखतोय, त्या अर्थी मुका मार लागला असेल, किंवा फारतर फ्रॅक्चर असेल, अशीच शंका वाटत होती. किंबहुना, तशी खात्रीच होती. `ग्लोबल`मध्ये पोहोचलो, तर तिथे गणपतीचाच प्रसाद मिळालेले आणखी दोन तीन पेशंट आले होते. एका झिडपिडीत माणसानं आमची चौकशी केली. हा स्वतः रात्रपाठीचा डाक्टर आहे, हे समजल्यावर मी थिजूनच गेलो. त्यानं प्राथमिक चौकशा केल्या आणि हात हलवल्याशिवाय दुखत नाहीये, याचा अर्थ फ्रॅक्चर नसावं, असा निष्कर्ष काढला. मग माझी एक्सरेसाठी रवानगी केली. हात थोडा हलवल्यावर प्रचंड दुखत होता. एक्सरे काढणा-या माणसानं मला तो कोपरात शक्य होईल तेवढा वाकवायला लावला. प्रचंड कळा मारत होत्या, पण इलाज नव्हता. त्यानं कोपराचे दोन angles मधून एक्सरे काढले.

आता एक्सरे रिपोर्टसाठी थांबणं आवश्यक होतं. ते लवकर आले आणि ते पाहून फ्रॅक्चर नाहीये, असं निदान तिथल्या डाक्टरांनी केलं. पेन किलर इंजेक्शन देऊ आणि उद्या सकाळपर्यंत नाही थांबलं, तर खांद्याचा एक्सरे काढू, असं त्यांनी सांगितलं. प्रत्यक्षात दुखणं खांद्याला आहे, हे त्यांना बहुधा एक्सरे काढल्यानंतर लक्षात आलं असावं. मग धनर्वात आणि पेन किलर अशी दोन दोन भोकं शरीराला पाडून घेतल्यानंतर आम्ही घरी आलो. रात्री एकाच कुशीवर कसाबसा तळमळत झोपलो.
सकाळी उठलो, तरी त्रास कमी झाला नव्हता. रात्रीपासून सतत एक विचार मनात येत होता. मुकामारच असेल, तर हात जरा ताणून, दुःख सहन करत वर घेऊन बघावा. पण तो त्रास सहन न झाल्यामुळे असेल किंवा दुस-या कुठल्या भीतीमुळे, पण तेवढा जोर केला नाही.
दहा वाजता सदाशिव पेठेतलं मोडक हास्पिटल गाठलं. मिरवणूक सुरूच होती, त्यामुळे ठिकठिकाणी बांबूने अडवलेल्या रस्त्यांचे अडथळे पार करण्याची शर्यत खेळावी लागत होती. टिळक रस्त्याच्या अलीकडेच गाडी लावून हास्पिटलपर्यंत चालत गेलो. एक्सरे टेक्निशिअन आले नव्हते. तिथल्या असिस्टंट डाक्टरांना दाखवलं, त्यांचाही पहिला अंदाज असाच होता, की सहन न होण्यासारखं दुखत नाहीये, त्या अर्थी फ्रॅक्चर नसावं. कदाचित मुकामार असेल, किंवा किरकोळ फ्रॅक्चर असेल, असाच ग्रह आता आम्हीसुद्धा करून घेतला होता.

एक्सरे टेक्निशिअन सांगवीहून निघाल्याचं समजलं. गणपती मिरवणुकीचे अडथळे पार करत ते कधी पोहोचणार, यासाठी आम्ही आता देवच पाण्यात ठेवायचे बाकी होते. तरीही ते अपेक्षेपेक्षा खूपच वेळेत पोहोचले. त्यांनी लगेच एक्सरे काढले. मुख्य म्हणजे जिथे दुखत होतं, तिथले, म्हणजे खांद्याचे एक्सरे काढले. काही सेकंदात ते तयार झाले आणि ते पाहून त्यांची नाही, पण माझी काळजी वाढली.

फ्रॅक्चर आहे, असं त्यांनी सांगितलं.
म्हणजे आता प्लॅस्टरचा ताप, असाच विचार मी मनात केला.

पण त्यांचं पुढचं वाक्य काळजात धडकी भरवणारं होतं.

`बहुतेक सर्जरी करावी लागेल! मी डाक्टरांशी बोलून कन्फर्म करतो!!`

(क्रमशः)

Nov 11, 2015

Operation `बाहु`बली

भाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात लावण्यापासून दुस-या दिवशी पहाटे दगडूशेठ गणपती लक्ष्मी रस्त्यावरून जाईपर्यंत मजबूत तंगडतोड करणं, हा वार्षिक सोहळाच होऊन गेला होता. भाड्याच्या घरात राहणं बंद झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर हा उत्साह क्रमाक्रमानं कमी होत गेला. लक्ष्मी रस्त्याच्या श्वासही घेता न येणा-या गर्दीत घुसून एका चौकापासून दुस-या चौकापर्यंत जाणं ही अहमहमिकाही बाद होऊन मुलांसह जायचं, तर आपला टिळक रस्ता बरा, हा विचार पक्का होत गेला. पण टिळक रस्ताही एवढा दगा देईल, याची मला अजिबात कल्पना नव्हती.


यंदाच्या चतुर्दशीला सकाळी फक्त मानाचे गणपती बघायचे आणि संध्याकाळी थोडा वेळ टिळक रस्त्याला चक्कर मारून परत यायचं, असंच नेहमीप्रमाणे ठरवलं होतं. तरीही सकाळी बाहेर पडलोच नाही. दिवसभर घरीच काम केल्यानंतर जरा कंटाळा आला, म्हणून फारसा उत्साह नसतानाही पाय मोकळे करण्यासाठी टिळक रस्त्याला जायचं ठरवलं. सहकुटुंब. निमिषला सकाळी मानाचे गणपती दाखवले होते, त्यामुळे त्याला घरीच ठेवून मी आणि मनस्वी, दोघांनीच जायचं आधी ठरत होतं, पण ते बदलून चौघं जायला निघालो. पर्वतीपर्यंत दुचाकीनं जायचं आणि तिथे जागा मिळेल तिथे गाडी लावून पायी भटकायचं, असा बेत होता. पर्वतीच्या पुलावरच एका बाजूला स्कूटी लावून टिळक रस्त्याच्या दिशेनं चालत निघालो. त्या दिवशी नेहमीपेक्षा गर्दी जास्तच वाटत होती. टिळक रस्ता जवळजवळ येत गेला, तशी ती आणखी वाढत गेली.


एखाद दुसरा गणपती बघून निघू, असाच विचार तेव्हा केला होता. थोडा वेळ एसपी collegeच्या चौकात थांबून रस्ता मोकळा मिळाल्यावर ओलांडून पलीकडे गेलो. काही वेळ थांबल्यानंतर एका मंडळाचा गणपती दृष्टिपथात आला. त्यांचं ढोलपथक ऐकून घरी परतू, असं ठरवलं होतं. ढोलपथक पाहायला पुढे गेलो, तेव्हाच मागून गर्दी वाढायला लागल्याचा अंदाज आला होता. निमिषला कडेवर घेतलं होतं. मनस्वी आणि हर्षदा आमच्या पुढेच, एकत्र होत्या. ढोलपथकाच्या स्वयंघोषित रस्तेसम्राटांनी दो-या लावून पथक पाहायला जमलेल्या लोकांना रस्त्याच्या कडेला रेटायला सुरुवात केली. ह्या लोकांच्या दांडगाईत आपण चेंगरायला नको, म्हणून लगेचच मागे जाऊन रस्त्याच्या कडेला उभं राहण्याचा निर्णय घेतला. एवढ्यात पुढच्या बाजूनं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून रांगा करून येणा-या लोकांनी मधल्या चिंचोळ्या जागेतून समोरच्यांना ढकलत पुढे जायला सुरुवात केली. माझ्या समोर दोन कमी उंचीच्या महिला होत्या. त्यांना या ढकलाढकलीची झळ बसू नये, म्हणून जास्तीत जास्त पाय रोवून त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत होतो. थोडी जागा मोकळी झाल्यावर तसाच मागे येऊन रस्तातून बाजूला जाण्यासाठी निघालो, तेवढ्यात रेटणा-या लोकांचा जोर वाढला. थोडासा बेसावध होतो, त्यामुळे त्या रेट्यानं तसाच पाठमोरा रस्त्यावर पडलो. कडेवर निमिष होता, त्याला वरच्यावर कुणीतरी उचलल्याचं दिसलं. मी पडलो, तिथून अगदी थोडीशी जागा सोडून बाजूला फक्त गर्दीचे पायच दिसत होते. निमिषला वरच्या वर कुणीतरी उचललं आणि कुणाकडे तरी दिलं, एवढंच दिसत होतं. आपटल्यामुळे माझा खांदा अचानक प्रचंड दुखायला लागला होता. काय होतंय, हे मला काही क्षण कळतच नव्हतं. हर्षदा आणि मनस्वी दिसत नव्हत्या, पण निमिषला कुणीतरी हर्षदाकडे दिलं असावं, असं वाटत होतं. पडल्यानंतर उठण्याचीही शुद्ध मला काही क्षण नव्हती. कुणीतरी मला खांद्याला धरून उठवण्याचा प्रयत्न केला, पण मीच त्यांना रोखलं, कारण उजवा खांदा प्रचंड दुखत होता. कसाबसा हात टेकून उठलो, पण आपला उजवा हात उचलताच येत नाहीये, हे जाणवलं. चक्कर आल्यासारखं होत होतं. पुन्हा गर्दीत सापडू नये, म्हणून बाजूला जाऊन दहा मिनिटं शांतपणे उभा राहिलो. हर्षदा, मनस्वी, निमिष एकत्र असतील आणि सुरक्षित असतील, असा फक्त अंदाजच करू शकत होतो. कारण खांद्याच्या असह्य वेदनांमुळे दुसरं काही सुचतच नव्हतं.


थोडं सावरल्यानंतर आजूबाजूला पाहून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोप-यात उभी असलेली हर्षदा दिसली. मनस्वी तिच्याबरोबरच होती आणि मुख्य म्हणजे निमिषही होता. म्हणजे कुणीतरी वरच्या वर त्याला उचलून हर्षदाकडे दिलं असावं, हा माझा अंदाज बरोबर ठरला होता. हायसं वाटलं. मला नक्की काय झालंय, मी असं का करतोय, हे त्यांना कळतच नव्हतं. गर्दीतून मुलांना वाचवण्यासाठी हर्षदा सुरक्षित ठिकाणी उभी राहिली होती. मी प्रत्यक्षात पडल्यानंतर सुमारे दहा-बारा मिनिटांनी आम्ही एकमेकांना भेटलो. माझा हात प्रचंड दुखतोय आणि उचलताही येत नाहीये, हे तिला सांगितलं. त्या गर्दीत नक्की काय करावं, तेच कळत नव्हतं. कदाचित पडल्यामुळे मुकामार लागला असेल, काही वेळानं तो बरा होईल, असं मला वाटलं. सुदैवानं तिथेच एक ambulance होती. माझ्या कोपरालाही आपटलंय आणि जखम होऊन रक्त येतंय, हेही जाणवलं. तातडीनं काहीतरी उपचार घेणं भागच होतं. प्रत्यक्षात मला कोपराची जखम बघताही येत नव्हती, एवढा हात जखडला गेला होता. ambulance मध्ये शिरलो. तिथे doctor असतील आणि आपल्याला नक्की काय झालंय त्याचं निदान होईल, उपचार होतील, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली. तिथे फक्त एक कंपाउंडर होता. त्यानं कोपराच्या जखमेला मलमपट्टी केली आणि हात दुखतोय म्हटल्यावर एका साध्या बँडेज पट्टीनं तो गळ्यात अडकवून टाकला. दुसरा काहीच उपचार तिथे होऊ शकणार नव्हता. आता जवळचं हास्पिटल गाठणं भाग होतं.


गर्दी एवढी होती, की पुढच्याच चौकात सदाशिव पेठेत असलेलं मोडक हास्पिटल आठवलं, तरी तिथे पोहोचण्याचा विचारही करणं शक्य नव्हतं. एवढ्या गर्दीत ते सुरू असेल की नाही, याचीही खात्री नव्हती. त्यामुळे आधी टिळक रस्ता पार करून घराजवळच्या ग्लोबल हास्पिटलमध्ये पोहोचावं, असा विचार केला. एसपी बिर्याणीच्या बाहेरच्या कट्ट्यावर काही वेळ बसून विश्रांती घेतली. दुखणारा हात घेऊन तुफान गर्दीतून रस्ता कसा काढायचा आणि वेदना कशा सहन करायच्या, याचाच विचार डोक्यात सुरू होता. माझ्या कडेवर असताना पडल्यामुळे आणि गर्दीमुळे निमिष आधीच खूप घाबरला होता. मला नक्की काय झालंय, हे समजल्यामुळे हर्षदाही. घरापर्यंत पोहोचण्याचं दिव्य कसं पार पाडायचं, याची चिंता आम्हा दोघांनाही होती. पण आमच्यापेक्षाही जास्त चिंता असलेला माणूस शेजारीच येऊन माझ्याच परवानगीनं `श्रमपरिहारा`साठी बसला, तेव्हा तिथून हलावं, असा विचार मी केला. माझ्या नशीबातला `सश्रम कारावास` मात्र एवढ्या सहजासहजी संपणार नव्हता...!


(क्रमशः)

Sep 20, 2015

जबाबदारी


रत्नागिरीच्या घरी गणपती असल्याने आणि आईवडील तिथेच राहत असल्याने दरवर्षी निदान मला तरी गणपतीत घरी जावं लागतं. पूर्वी स्वेच्छेने जायचो, आता कर्तव्य म्हणून जातो. गेल्या वर्षी सात दिवसांचा गणपती होता. तेव्हा मी सिरियलचं अचानक जास्त काम आल्यामुळे मला सात दिवसांत घरातून बाहेरसुद्धा पडता आलं नव्हतं. या वेळी मात्र बाहेर पडून आवर्जून काही लोकांना भेटायचं ठरवलं होतं.

काल स्टॅंडवर एका मित्राला भेटायला निघालो होतो, तेव्हा जाताना आईनं आठवण केली, ``गोखले नाक्यावरच्या दुकानात सुनीता असेल. लवकर गेलास, तर भेटेल.`` सुनीता माझी मामेबहीण. लग्न झाल्यानंतर आता ती रत्नागिरीतच असते. ब-याच दिवसांत तिची भेट झाली नव्हती. या वेळी भेटायचं असं मनात नव्हतं, पण अचानक योग आला होता आणि वेळेतही बसत होतं. गोखले नाक्यापर्यंत गेलो, पण सवयीनं मारुती आळीतून स्टॅंडकडे वळणार होतो. आज आठवडा बाजारामुळे मारुतीच्या आळीला गर्दी नसेल, म्हणून राम आळीनं जायचं ठरवलं आणि अचानक सुनीताला भेटायचं होतं, हे आठवलं. तिथे जवळच तिचं दुकान होतं. मी गेलो, तेव्हा ती आवराआवरी करून निघण्याच्या तयारीतच होती. पाच मिनिटांत बाहेर आली. कुठे बसूया, असा विचार करत मग आम्ही शेवटी राम आळीतल्या नूतनीकरण झालेल्या राम मंदिरात बसलो. त्या निमित्तानं श्रीरामाला माझं दर्शन घडलं.

सुनीता आणि मी एकाच वयाचे. लहानपणी रत्नागिरीत असताना मी दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्यांमध्ये हटकून माझ्या आजोळी, म्हणजे शिपोशीला जायचो. तासा-दीड तासाचा बसचा प्रवास. थोडा मोठा झाल्यावर एकटाच जायला लागलो. मामा-मामी, आजी आणि ही तीन भावंडं, असा सहा जणांचा संसार. मी तिकडे जाणं म्हणजे ह्या भावंडांसाठी पर्वणी असायची. शिपोशी हे तसं अगदीच खेडेगाव. गावात उन्हाळ्यात पूजेनिमित्त प्रोजेक्टरवर दाखवले जाणारे चित्रपट, घराच्या जवळच असलेली नदी आणि कार्तिकातला गावाच्या देवळातला उत्सव, एवढंच काय ते मनोरंजन. त्या मानानं मी सुखी होतो. रत्नागिरीत तीन थिएटर्स होती आणि मला लहानपणापासूनच सिनेमाचं वेड होतं. मी तिकडे गेल्यावर नव्यानंच पाहिलेल्या सिनेमांच्या स्टो-या सांगायचो, ते त्या भावंडांसाठी मोठं मनोरंजन असे. कधीकधी तेसुद्धा शेतात, कुठल्या कुठल्या वाडीत प्रोजेक्टरवरून पडद्यावर बघितलेल्या सिनेमांच्या स्टो-या सांगत, तेव्हा मलाही नवीन ज्ञान मिळे. `यादों की बारात` आणि `आली लहर, केला कहर` या दोन सिनेमांची त्यांनी मला सांगितलेली स्टोरी अजूनही आठवतेय. (मी अजूनही हे दोन्ही सिनेमे पाहिलेले नाहीत. स्टोरी कळल्यामुळे नव्हे, योग आला नाही म्हणून! असो.) कधीतरी माझा बेळगावचा मावसभाऊ राजू राहायला यायचा, तेव्हा त्याच्याकडे सिनेमाच्या स्टो-यांचा खजिनाच असायचा. मग आम्ही सगळेच श्रोते व्हायचो!

बाकीची दोन भावंडं तशी लहान असल्यामुळं सुनीताशी माझ्या ब-याच गप्पा व्हायच्या. आपापल्या भावी आयुष्यावरही आम्ही बोलायचो. तिच्याशी माझं ब-यापैकी ट्यूनिंगही होतं. आमच्या घराशेजारची पोरं मला सुनीताच्या नावावरून चिडवायचीही. पण मामेबहिणीशी लग्नाच्या विचाराची संकल्पनाही मला कधी पटली नव्हती.
आपापल्या घरातली सुखदुःखं, कटकटी याच्यावर आम्ही त्या अजाणत्या वयात बरीच गहन आणि गंभीर चर्चा करायचो. त्या त्या समस्यांवरच्या उपाययोजनांवरही बोलायचो. अर्थात, मोठ्या माणसांसमोर कधी ते उपाय मांडण्याचं धाडस आम्हा दोघांचंही झालं नाही. मुंबईत धाकट्या मामाच्या घरीसुद्धा आम्ही सुट्यांमध्ये योगायोगानं एकत्र राहिलो, तेव्हाही आमच्या खूप गप्पा व्हायच्या.

सुनीताला रत्नागिरीत भेटलो, तेव्हा ह्या सगळ्या आठवणी निघाल्या. तिच्या किंवा माझ्या घरी भेटलो नाही, हे बरंच झालं, असं वाटलं. बोलण्यात आमचे नेहमीचे विषय निघालेच. `आईवडिलांनी आपल्याला लहानपणी वाचनाची आवड आणि सवय लावली नाही, त्यासाठी पुस्तकं विकत आणून दिली नाहीत, किंबहुना, आपल्याला `घडवण्या`साठी जास्त वेळ दिला नाही, ही माझी नेहमीची तक्रार. माझ्यापेक्षा त्या खेडेगावात वाढताना सुनीताला हे जास्तच जाणवलं असणार, असं मला वाटत होतं. ती म्हणाली, ``तुलनेनं बाबांनी आमच्यासाठी खूप केलं. आजोबा गेल्यामुळे खूपच लहान वयात त्यांच्यावर घराची जबाबदारी पडली. लांबची नोकरी, त्यासाठी रोजची पायपीट, शाळेतल्या कटकटी, घरी आल्यावर घरातल्या समस्या, आमची भांडणं, घर आणि जागेची सगळी व्यवस्था पाहणं, कामावर आलेल्या मजुरांना दिवसभराची कामं देणं, पहाटे डोंगरावर असलेल्या गोठ्याकडे जाऊन गुरांची व्यवस्था पाहणं, दूध काढणं, एवढे सगळे व्याप ते एकट्यानं सांभाळत होते. तरीही आमच्या अभ्यासासाठी खूप वेळ द्यायचे. त्या परिस्थितीत यापेक्षा जास्त काही करण्याची अपेक्षाच करता येणार नाही!``

याच्या आधी आमच्या बोलण्यात हा विषय कधीच आला नव्हता. सुनीतालाही अशा दृष्टिकोनातून विचार करताना आत्तापर्यंत कधी ऐकलं नव्हतं. मीसुद्धा अशा पद्धतीनं कधी विचारच केला नव्हता ह्या गोष्टींचा!

स्वतः पालक झाल्यावर किती समज येते नाही, माणसात!

Jul 14, 2015

प्रश्नांकित...!

लहानपणी गोष्टी ऐकताना किंवा वाचताना जिवावर उदार होऊन राजकन्येला आजारपणातून किंवा संकटातून वाचवणा-या एखाद्या गरीब बिचा-या तरुणाला राजा अर्धं राज्य देतो आणि राजकन्येचंही त्याच्याशी लग्न लावून देतो, याचं फार अप्रूप वाटायचं. (अप्रूपच. असूया नव्हे. कारण आपल्याला असा कुठला उदार राजा मिळणार नाही, याची शंभर टक्के खात्री असायची. आणि फक्त तेवढ्या आशेवर आपण एवढं साहस बापजन्मी करणार नाही, याची दोनशे टक्के. तर ते असो!)

माझ्या मुलांना अशाच काहीतरी गोष्टी रचून सांगताना हा लग्नाचा विषय मध्ये येणार नाही, याची काळजी मी आवर्जून घेतो. जेणेकरून माझ्या लहानपणी मला पडणारे प्रश्न त्यांना पडू नयेत. (मुलांचं मन निरागस, चौकस असतं. त्यांना प्रश्न विचारू द्यावेत, मुलं म्हणजे मातीचा गोळा छाप उपदेश श्यामची आई/बाबांनी करू नयेत.)

आज मुलाला (वय वर्षं साडेपाच) अशीच एक स्वैर रूपांतरित गोष्ट सांगत होतो. सगळ्यात शेवटी राजकन्येला वाचवल्यानंतर त्या तरुण गरीब मुलाला राजानं मोठ्ठं बक्षीस दिलं, असं सांगितलं. राजकन्येशी लग्नाचा विषय कटाक्षानं टाळला.

 ``बक्षीस म्हणजे काय दिलं?``

हा प्रश्न अचानक आला, पण अनपेक्षित नव्हता.

``म्हणजे, खूप सोन्याच्या मोहरा आणि एक मोठ्ठं घर दिलं राहायला.`` मी त्याची समजूत घालायचा प्रयत्न केला.

`` पण तो आणि त्याची आई, असं दोघंच आहेत ना? मग त्याला एवढं मोठं घर कशाला हवं?``

त्याच्या पुढच्या प्रश्नानं मी सर्द झालो...!

 

 

Jun 7, 2015

फटा पोस्टर, निकला... हिरो, हिरोइन, व्हिलन, सेकंड हिरो, सेकंड हिरोइन, ईटीसी ईटीसी...!

 

 

`दिल धडकने दो'चं पोस्टर पाहिलं आणि मळमळायला झालं.

छ्या...!

ह्याला काय पोस्टर म्हणतात? पोस्टर म्हणजे कसं हवं? सिनेमातल्या जवळपास प्रत्येक प्रसंगाचा तो छोटेखानी प्रोमोच हवा. नव्वदच्या दशकात आम्ही स्वतंत्रपणे थेट्रात जाऊन पिक्चर पाहायला लागलो. काय पोस्टर्स असायची त्या काळात....अहाहा...!!

एका हातात पिस्तुल, दुस-या हातात rocket launcher घेतलेला मिथुन, धर्मेंद्र, गोविंदा, चंकी पांडे, सनी देओल किंवा कधी कधी तर दस्तुरखुद्द बच्चन साहेब. त्याच्या कपाळावर रक्ताचा मळवट भरलेला. हातावर एखादी पट्टी. अंगात रक्ताळलेली बनियन. चेह-यावर खाऊ का गिळू छाप बद्धकोष्ठित भाव. त्याच्या सोबत अर्धी झाकलेली हिरवीण. (अर्धी झाकलेली म्हणजे, भीतीनं त्याच्या मागे अर्धी दडलेली. `तशा` अर्थानं अर्धी झाकलेली नव्हे. ती पण असायची, पण दुस-या कोप-यात.) दुस-या कोप-यात हिरोपेक्षाही संहारक शस्त्रं हातात घेऊन उभा असलेला व्हिलन किंवा व्हिलनची फौज. मल्टिस्टारर सिनेमा असेल, तर मग सगळे हिरो लायनीत आपापल्या हिरविणीबरोबर रांगेत उभे. पोस्टरच्या डाव्या वरच्या कोप-यापासून ते उजव्या वरच्या कोप-यापर्यंत फोटो फ्रेमला फुलांची माळ घातल्यासारखी छोट्या छोट्या चौकौनांमध्ये सिनेमातल्या इतर असंख्य कलाकारांची वेगवेगळ्या भावमुद्रेतली छायाचित्रं. उजव्या कोप-यात सिनेमातल्या बलात्कारासारख्या अत्यंत महत्त्वाच्या दृश्याची झलक. डाव्या कोप-यात एखाद्या होळीच्या किंवा तत्सम गाण्याची झलक. मधोमध सिनेमाचं नाव आणि त्याभोवती दोन, तीन थरांचं वलय.

त्या काळात बी ग्रेड, सी ग्रेड अशी हीन, जातिवाचक, अपमानास्पद वर्गवारीच अस्तित्त्वात नव्हती. सगळे सिनेमे एकाच जातकुळीतले वाटायचे. जे वेगळ्या वाटेनं जायचे, ते कुठल्यातरी एकांड्या थेट्रात किंवा टीव्हीवरच बघायला मिळायचे.

`जंगल क्वीन' `डाकूरानी`छाप सिनेमांची पोस्टर्स तर विशेष आकर्षक असायची. किती दूरदर्शी विचार करणारे दिग्दर्शक आणि निर्माते होते, त्या काळात...! आपल्या सिनेमाचा प्रोमो प्रेक्षकांना कुठेही पाहता येणार नाहीये, त्यामुळे पोस्टरवरच तो स्थिरचित्र रूपाने का होईना, दिसला पाहिजे, अशी त्यांची प्रामाणिक भावना असायची. के. सी. बोकाडिया, कांती शाह, मेहुलकुमार, हे अशाच सामाजिक हेतूनं प्रेरित झालेले काही महापुरुष.

सिनेमाच्या मुख्य पोस्टरशिवाय अगदी खिडकीच्या एका झडपेच्या आकाराची छोटी पोस्टरही त्या काळात आकर्षक असायची. ती बाजारात, किंवा दुस-या थिएटरवर लावली जायची. ती बघून मोठं पोस्टर बघायची उत्सुकता चाळवायची.

याशिवाय जास्त उत्सुकता असायची ती सिनेमातल्या काही दृश्यांची झलक दाखवणारी साधारण छोट्या फ्रेमच्या आकाराची पोस्टर्स. प्रेक्षक म्हणून माझी कारकिर्द रत्नागिरीत घडली. त्यावेळी तिथे तीन थिएटर्स होती. राधाकृष्ण, श्रीराम आणि लता. `राधाकृष्ण`ला साधारण नवीन (एक महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेले) सिनेमे लागायचे. `श्रीराम`ला मराठी किंवा रिपीट रन मधले आणि `लता`ला तथाकथित बी किंवा सी ग्रेड. `राधाकृष्ण`मध्ये तिथल्या आणि `श्रीराम`मधल्या सिनेमांची ही छोटी फ्रेम साइज पोस्टर्स लागायची. प्रत्येक सिनेमाची साधारण दहा ते बारा. गुरुवारी तर मेजवानी असायची. सध्या सुरू असलेल्या आणि शुक्रवारपासून लागणा-या सिनेमाची, अशी दोन्ही पोस्टर्स बघायला मिळायची. मी तर चौथीपासूनच मधल्या सुटीत वेळात वेळ काढून, ही पोस्टर्स बघायला थेटरवर धावायचो.


या पोस्टरनी सिनेमांची चटक लावली आणि सिनेमानं जगण्याची!