Aug 10, 2017

समथिंग `स्पेस`ल

('मुंबई सकाळ'च्या श्रावण विशेष पुरावणीसाठी लिहिलेला लेख क्र. 3)
...


``आई, मी काय म्हणतो, तू यंदा नेहमीसारखी मैत्रिणीकडे जन्माष्टमीला जाणार नाहीयेस?`` वत्सलाबाईंसाठी स्वतः चहा करून आणून दिल्यावर केतन म्हणाला.

``अरे नाही रे बाबा, यंदा तीच घरी नाहीये. जन्माष्टमी बुडणार माझी.``
हे उत्तर ऐकून त्याचा चेहरा पडला.
``तुला नक्की काय हवंय? उगाच ताकाला जाऊन भांडं लपवू नये.``
`` भांडं लपवायचा प्रश्नच येत नाही. हल्ली टेट्रा पॅकमध्येच मिळतं ना ताक!`` त्यानं विनोदाचा प्रयत्न केला.
``बाळा, हेच संस्कार केले का रे मी तुझ्यावर? एवढा वाईट दर्जा आहे तुझ्या विनोदाचा?`` वत्सलाबाईंच्या या वाक्यावर त्याची बोलतीच बंद झाली.
...
रात्री सगळीकडे निजानीज झाल्यावर बेडरूममध्ये मात्र वातावरण एकदम तापलं...अर्थात, जोरदार खडाजंगीमुळे.
``तुला ना, एखाद्याला कसं पटवायचं, कळतच नाही!`` सोनाली धुसफुसत म्हणाली.
``निदान तू तरी हे बोलू नकोस. तीन वर्षांपूर्वीच तुला...``
``आगाऊपणा करू नकोस. मला पटवून खूप मोठा तीरच मारलायंस तू. मी आईला पटवण्याबद्दल बोलतेय.``
``अगं, पण ते बाबा बघून घेतील ना!`` केतनने पंच मारला खरा, पण त्यावर सोनाली फणकाऱ्यानं तोंड फिरवून झोपी गेली, तेव्हा हा पंच आपल्याला आज खूप महागात पडणार, याचा त्याला अंदाज आला.
...
रविवार, कृष्णाष्टमी आणि 15 ऑगस्ट अशा सलग तीन दिवस सुटीच्या काळात फिरायला जाण्याचा खर्च आत्ता शक्य नव्हता, पण निदान रोजच्या धबडग्यातून तरी सोनालीला जरा स्वतःसाठी `स्पेस` हवी होती. सासूबाई घरी असल्या, की अशी मोकळीक घेता येणार नव्हती. पण जन्माष्टमीची आठवण करून देण्याचा प्लॅन तर फसला होता. सासूबाई कुठे जाणार नाहीत हे कळलं आणि सोनाली जरा खट्टूच झाली. अगदी कुठे रिसॉर्टवर गेलो नाही, तरी निदान गाडीतून लांब कुठेतरी चक्कर मारून येऊ, असं त्यानं सुचवलं. सोनालीनं नाइलाजानं त्याला होकार दिला.
अखेर तो सुटीचा दिवस उजाडला. दोघं सकाळी लवकरच गाडीतून फिरायला बाहेर पडली. नेमका अर्ध्या तासातच सोनालीला कुणाचातरी फोन आला आणि तिनं वैतागून गाडी थेट घराकडे वळवायला सांगितली. घरी पोहोचल्यावर ती तातडीने दार उघडून स्वयंपाकघराकडे धावली.
``गॅस सुरू राहिलाय म्हणून आईंचा फोन आला होता. पण इथे तसं काहीच नाहीये! शी! आता पुन्हा कुठे बाहेरही पडता येणार नाही. सगळा मूड गेला!`` मागून आलेल्या केतनला सांगत सोनाली वैतागून खाली बसली. केतनने तिला शांत करण्यासाठी तिच्यासाठी कॉफी केली, तिच्या आवडीची गाणी लावली. आपण आता थेट उद्याच येऊ, असा निरोपही वत्सलाबाईंनी दिला होता. आता पुन्हा बाहेर जायला नको, घरीच एखादी फिल्म बघू, गप्पा मारू, एकमेकांसाठी वेळ देऊ, असं त्यानं ठरवलं. जेवणही त्यानं बाहेरूनच मागवलं. त्या दोघांचा वेळ खूप मजेत गेला.
पार दुसऱ्या दिवशी सकाळी वत्सलाबाई घरी आल्या, तेव्हा सोनालीनं त्यांचं उत्साहात स्वागत केलं, आस्थेनं चौकशी केली. थोड्यावेळाने मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या वत्सलाबाईंनी पुन्हा सोनालीला फोन केला, तेव्हा तिच्या काळजात धस्स झालं.
``काय गं, काल घरात पुरेशी स्पेस मिळालेय, की आजसुद्धा मला वेगळं काहीतरी निमित्त काढून आणखी एखाद्या मैत्रिणीच्या घरी दिवसभर वेळ घालवायला जावं लागणारेय?`` असं वत्सलाबाई म्हणाल्या तेव्हा कालचा त्यांचा फोन, गॅसचं बटण चालू राहिल्याचं निमित्त आणि त्यांच्या अचानक ठरलेल्या कार्यक्रमामागचं कारण सोनालीला कळलं आणि ती कानकोंडी झाली. मग दोघी फोनवरच मनसोक्त हसल्या. खूप `स्पेस`ल होतं ते मनमोकळं हास्य!

- अभिजित पेंढारकर.

(क्रमशः)

हॅशटॅग सूनबाई!

(`मुंबई सकाळ`च्या श्रावण पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 2)

...


सोनाली आज सकाळपासून नेटवर काहीतरी शोधाशोध करत होती, पण तिला हवं ते सापडत नव्हतं. एकदोनदा केतननं तिला विचारायचा प्रयत्न केला, पण तिची प्रतिक्रिया बघून तो खचला. थोड्या वेळानं तीच शोधाशोध थांबवून त्याच्या आसपास घुटमळायला लागली, तेव्हाच तिला काहीतरी हवंय, याचा अंदाज त्याला आला.

``केतन, ऐक ना...`` थोड्याशा लाडिक स्वरात तिनं सुरुवात केली.
``हे बघ, आई घरात आहे आत्ता. तेव्हा आत्ता काही...``
``आगाऊपणा करू नकोस. मला जरा तुझा गायडन्स हवाय.``
`` हे म्हणजे काजव्यानं सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे!``
``चेष्टा पुरे. आमची इकडून अशीच थट्टा होणार असेल, तर एक माणूस कट्टी आहे मग स्वारीशी.`` सोनालीनं पुन्हा `जयश्री गडकर` पवित्रा घेतला.
``सोनाली, मी तुला हवी ती मदत करतो, पण प्लीज साठच्या दशकात शिरू नकोस.`` 
``मला नारळीभात करायचाय, पण प्रॉपर रेसिपीच मिळत नाहीये कुठे.`` सोनाली सकाळपासून कशात गुंतली होती, हे केतनला आत्ता समजलं.
``अगं एवढंच ना? आमच्या आईला विचार. आईच्या हातचा नारळीभात अप्रतिम असतो. तिच्या हातांची चव कुणालाच येणार नाही!`` ज्या वाक्याची सोनालीलाच काय, कुठल्याही सुनेला सर्वाधिक भीती असते, ते वाक्य अखेर केतनने उच्चारून टाकलं. सोनालीनंही तो सल्ला ताबडतोब शिरोधार्य मानला. `तू सांगितलंस, म्हणून जातेय हं,` असं तिला स्वतःच्याच मनाचं समाधान करून घ्यायचं असावं, असं केतनला उगाचच वाटलं.

पुढचे दोन दिवस घरात अधूनमधून नारळीभाताचाच विषय निघत राहिला. सोनाली सासूबाईंकडून नारळीभात करण्याच्या टिप्स घेतेय, त्याबद्दल काही शंका अतिशय सौम्य स्वरात विचारतेय, सासूबाई प्रेमानं तिला समजावतायंत, बदाम, काजू किती घालावेत, कसे चिरावेत असं अगदी साग्रसंगीत वर्णन करतायंत, असं दुर्मिळ दृश्य दिवसातून अनेकदा बघायला मिळालं.

..आणि अखेर तो दिवस उजाडला. सोनाली गेल्या दोन तीन दिवसांत जे काही शिकली होती, त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याची वेळ आता आली होती. तिनं नारळीपौर्णिमेच्या आधीच नारळीभाताचा प्रयोग करून बघितला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. सोनाली स्वतःवरच जाम खूश झाली. आपण केलेल्या नारळीभाताची भरपूर सजावट करून तिनं त्याचे फोटो काढले, स्वतःचे आणि सासूबाईंचे स्वयंपाकघरात फोटो काढले. त्या दिवशी काही तिला ते फेसबुकवर अपलोड करायला वेळ मिळाला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती फोटो अपलोड करण्यासाठी ते सिलेक्ट करत असतानाच मैत्रिणीचा फोन आला.
``अगं, तू नारळीभाताचे फोटो फेसबुकवर अपलोड केलेस का, असं विचारायला मीच तुला फोन करणार होते!`` सोनाली म्हणाली, ``आपल्या सगळ्या ग्रुपचं आजच फोटो टाकायचं ठरलं होतं ना? विसरलीस की काय?``
``मी नाही विसरलेले. पण तू काहीतरी विसरल्येस.`` मैत्रिणीनं सुनावलं, ``आपलं ठरलं होतं, की स्वतः नारळीभात करायला शिकायचं आणि त्याचे फोटो टाकायचे.``
``हो, मग! मी स्वतःच केलाय नारळीभात कुणाचीही मदत घेतलेली नाही.`` सोनालीनं ठसक्यात उत्तर दिलं, पण आपण फोटो अपलोड न करताही हिला आपण सासूबाईंची मदत घेतल्याचं कसं कळलं, असा प्रश्न सोनालीच्या मनात आलाच.
तेवढ्यात मैत्रीण म्हणाली, ``तुझ्या सासूबाईंनी अपलोड केलेत तुमचे दोघींचे नारळीभात करतानाचे फोटो. तुला टॅग केलयं, `सेलिब्रेटिंग श्रावण : सेल्फी विथ सूनबाई`, अशा हॅशटॅगसकट. कुठल्यातरी सिनेमाच्या प्रमोशनसाठीचा फंडा आहे, त्यालाच रिस्पॉन्स दिलाय बहुतेक, तुझ्या सासूबाईंनी!`` मैत्रिणीचं बोलणं संपता संपताच सोनालीनं फेसबुक चेक केलं, तेव्हा तिला सासूबाईंनी अपलोड केलेले त्या दोघींचे फोटो आणि त्यावरच्या ढीगभर कमेंट्स, लाइक्स दिसल्या आणि तिनं कपाळावर हात मारून घेतला. नारळीभात करताना काल सहज म्हणून काढलेले फोटो सासूबाईंनी आपल्या मोबाईलवर मुद्दामहून का मागवून घेतले, याचं गूढ तिला आत्ता उकललं होतं. आता तिचं कडू झालेलं तोंड नारळीभातानं तरी गोड होणार का, हा प्रश्नच होता.

- अभिजित पेंढारकर.


(क्रमशः)

`काळ` सोकावतो...!...

(`मुंबई सकाळ`च्या श्रावण विशेष पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 1)


 ...


``सोनाली, अगं हा जोक वाचलास का?`` वत्सलाबाईंनी हाक मारली आणि सोनाली आदर्श सुनेसारखी स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली.

``कुठला जोक, आई चेहऱ्यावरचे `केतनला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि सासूबाईंना स्मार्ट फोन घेऊन दिला!` हे भाव लपवत तिनं कुतुहलानं विचारलं.

``अगं, हा नागपंचमीवरचा जोक गं!`` वत्सलाबाईंना हसू आवरत नव्हतं. त्यांनी सांगितलेला जोक ऐकल्यावर सोनालीनं त्यांना हसून टाळी दिली आणि त्याच वेळी बाहेरून आलेल्या केतनने तिच्या या अभिनयाला फक्त नजरेतूनच दाद दिली.

``आई, मला फॉरवर्ड करा ना!`` एक डोळा केतनकडे ठेवून सोनालीनं स्वरात शक्य तेवढा नम्रपणा आणत सांगितलं  ``गेल्या वर्षी हाच जोक आला होता आई. तुम्ही यंदा व्हॉटस अप घेतलंत, हा आमचा दोष आहे का?`` हे तोंडावर आलेलं वाक्य तिनं पुन्हा आदर्श सुनेसारखं गिळून टाकलं.

आज घरी आल्यानंतर एकदम एवढं प्रसन्न, हसतंखेळतं वातावरण बघून केतनच्या मनात पाल चुकचुकली होतीच. चहा घेताघेता त्याच्या मनातल्या शंकेवर शिक्कामोर्तब झालं.

``अच्छा, हे कारण आहे होय आजच्या सौजन्य सप्ताहाचं?`` आई बाहेर निघून गेल्याची खातरी झाल्यावर, केतननं सोनालीला टोमणा मारला.

``उगाच काहीतरी शंका काढू नकोस. आमचं काही भांडण वगैरे नाहीये, त्या माहेरी जाणार म्हणून मला आनंद व्हायला!``

``मी कुठे म्हटलं तुमचं भांडण आहे म्हणून? काळाबरोबर बदलायला हवंच. तूसुद्धा आईची सून न राहता मुलगीच झालेयंस. पण आई आता माहेरी जाणार म्हणून एका माणसाला मनातून खराखुरा आनंद झालाय की नाही?`` केतनला तिची खोडी काढायचा मोह आवरला नाही.

``काय हे बोलणं तरी! अशी चेष्टा आवडत नाही बरं आम्हाला. इकडून असेच टोमणे मारले जाणार असतील, तर आम्ही मुळी बोलणारच नाही, ज्जा!`` सोनालीनंही एकदम `जयश्री गडकर` पवित्रा घेतला. केतन एवढ्या फिस्सकन हसला, की त्याचा कप डचमळून चहा अंगावर सांडला.

`` मला आईंचं खरंच कौतुक वाटतं. त्यांना या वयातसुद्धा त्यांना माहेरी जाण्याची ओढ आहे!`` सोनाली मनापासून म्हणाली.

``अगं, श्रावणात जातात ना बायका आपल्या माहेरी!``

``अरे हो, पण लग्नानंतर थोडे दिवस ओढ असते. आईंना अजूनही माहेरी जावंसं वाटतं, याचीच कमाल वाटते मला. अगदी उत्साहानं जातात त्या. गावातल्या माहेरवाशिणींच्या मंगळागौरींमध्येही रस घेतात, नागपंचमीला झाडाला झुले बांधून त्याच्यावर खेळतात, खरंच असं उत्साही असायला हवं माणसानं!``

``ती उत्साही आहेच! बरं, सध्या व्हॉट्स अप काय म्हणतंय?``

``काही विचारू नकोस बाबा. सोसायटीतल्या ज्येष्ठ नागरिक महिला मंडळाच्या ग्रुपवरसुद्धा घेतलंय आईंना. सतत कुठले ना कुठले सुविचार, जोक्स पाठवत असतात मला! आजच श्रावणाचा महिमा का काय पाठवलंय. आणि वर त्या नागपंचमीचा जोक!`` सोनालीनं व्यथा मांडली आणि केतनला पुन्हा हसू आलं.

``माणसानं काळानुसार बदलायला हवं. आईसुद्धा बदलतेय. गंमत वाटते मला!`` केतनच्या बोलण्यातून आईचं कौतुक दिसत होतं. ``बाय द वे, मला वाटतं, तुलासुद्धा ब्रेक हवाय. तू पण श्रावणानिमित्त माहेरी का जात नाहीस चार दिवस?``

``खरंच जाऊ? चालेल तुला?``

``जा गं, इथे मॅनेज करू आम्ही. चारच दिवसांचा तर प्रश्न आहे. आणि तुलाही विश्रांती हवीच ना!`` केतननं अगदी काळजीनं सांगितलं.

``किती काळजी करतोस रे माझी!`` सोनाली डोळ्यांत अश्रू आणून म्हणाली. ``की असं करू?`` तिनं एकदम काहीतरी सुचल्यासारखं विचारलं.

``काय?``

``मी आईला भेटावं, असं वाटतंय ना तुला?``

``अर्थात!``

``मला विश्रांती मिळायला हवेय ना?``

``म्हणजे काय!``

``मग माझ्या आईलाच इकडे बोलावून घेते ना! बोरिवलीलाच तर राहते ती. मी तिच्याकडे गेले काय आणि ती माझ्याकडे आली काय, एकच ना! काळाबरोबर एवढं तरी बदलायला हवंच ना माणसानं?`` सोनालीनं बिनतोड सवाल केला आणि केतनचा चेहरा पाहण्यासारखा झाला.


- अभिजित पेंढारकर.


(क्रमशः)

Jul 17, 2017

अटी लागू

10.30 am
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या ग्रुपचा सध्या दिवसेंदिवस गुणात्मक ऱ्हास होत चालला आहे. इतर ग्रुप्सपेक्षा आपले वेगळेपण जपण्यासाठी, आपण प्रत्येकाशी बोलून, चर्चा करून, निवडून मोजकेच असे 40 सदस्य ग्रुपमध्ये घेतले होते. परंतु सुरुवातीच्या काळात कुठल्याही विषयावर हिरिरीने आणि अभ्यासपूर्ण चर्चा करणाऱ्या सदस्यांना सध्या टाइमपास आणि चहाटळकीव्यतिरिक्त बोलण्यासाठी काही विषयच राहिलेले नाहीत, असे निदर्शनास आले असून, ही अतिशय गंभीर बाब आहे. आधी कला, साहित्य, राजकारण, सामाजिक समस्या, अर्थव्यवस्था, आर्थिक नियोजन अशा विषयांवर गांभीर्याने चर्चा करणारे सदस्य आता नटनट्यांच्या लफड्यांपासून आपापल्या कपड्यांच्या खरेदीपर्यंत कुठल्याही विषयावर अर्थहीन, चहाटळ, थिल्लर आणि वाह्यात चर्चा करू लागले आहेत, हे खरंच खेदजनक आहे. नाइलाजाने हा ग्रुप काही काळासाठी स्थगित करावा किंवा कायमचा बंद करावा, असा निर्णय घ्यावा लागत आहे. यापैकी योग्य पर्याय निवडून लवकरच जाहीर करण्यात येईल. कृपया कुणी याबद्दल वैयक्तिक गैरसमज करून घेऊ नये. या विषयावर कुठलीही चर्चा पर्सनल चॅटवर करू नये, ही विनंती.``
- आपला ॲडमिन.
....
12.30 pm
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपवरच्या काही गैरप्रकारांबद्दल स्पष्ट मत व्यक्त करून ग्रुप बंद करण्याचा किंवा स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक सदस्यांनी ग्रुपवर किंवा पर्सनली विनंती करून ग्रुप बंद करू नये, अशी मागणी केली आहे. ग्रुपची शिस्त आणि नियम यांसाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीसुद्धा दिली आहे. तरीही, थोड्या प्रमाणात मनोरंजन आणि वैयक्तिक गप्पा होणारच, अशी शक्यताही व्यक्त केली आहे. त्याचबरोबर जास्तच वाह्यातपणा करणाऱ्या सदस्यांना योग्य ताकीद द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. या सर्व सूचनांचा विचार करून ग्रुप बंद करण्याचा निर्णय सध्या घेऊ नये, असा विचार असून, ग्रुपच्या भवितव्याबद्दलचा पुढील निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल.``
- आपला, ॲडमिन.
....
2.30 pm.
``आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपच्या बिघडलेल्या शिस्तीबद्दल ग्रुपच्या बहुतेक सदस्यांशी वैयक्तिक चर्चा केल्यानंतर काही सदस्यांनी ग्रुपमध्ये थोडा मोकळेपणा असण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जास्त टाइमपास नको, पण अध्येमध्ये हलकेफुलके मेसेज यायला हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या सूचनेचा गंभीरपणे विचार करून, सरसकट सगळ्यांना अशा मेसेजचा त्रास होऊ नये आणि ग्रुपच्या मूळ नियमांना हरताळ फासला जाऊ नये, म्हणून आपल्याच मूळ ग्रुपचा एक सहग्रुप म्हणून वेगळा ग्रुप तयार करावा आणि त्यात या मोकळेपणाला, थोड्याफार टाइमपासला वाव द्यावा, असा विचार समोर आला आहे. या निर्णयाला मान्यता असलेल्या आणि नव्या ग्रुपमध्ये येण्यास इच्छुक असलेल्या सदस्यांनी कृपया पर्सनलवर मेसेज करावा.``
- आपला, ॲडमिन.
....
4.30 pm.
आपण गांभीर्याने, निष्ठेने आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेल्या `Serious friendship` या निवडक 40 जणांच्या ग्रुपबरोबरच एक नवा सहग्रुप स्थापन करण्याबद्दल काही सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, असा ग्रुप लवकरच तयार करण्यात येईल आणि त्यात इच्छुक सदस्यांना प्रवेश दिला जाईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.
- आपला ॲडमिन.
- ....
4.45 pm.
Admin created new group – `Serious friendship-on tp mode.`
Admin added 38 new members to the group.
सदस्यांच्या मागणीनुसार नवा ग्रुप तयार करण्यात आला असून, केवळ इच्छुक सदस्यांनाच त्यात प्रवेश देण्यात आला आहे. आधीच्या ग्रुपमधल्या एका सदस्याशी काहीच संपर्क होऊ न शकल्याने त्याला या ग्रुपमध्ये घेण्याबद्दलचा निर्णय झाला नाही. बाकी इच्छुकांना ग्रुपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.
आधीच्या ग्रुपची सर्व शिस्त आणि नियम इथे धाब्यावर बसवले जातील, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, ही नम्र विनंती.
- आपला, ॲडमिन.

नशीब


``काय काय नशीबाचे भोग आले नाही, आपल्या वाट्याला? आजचा दिवस कधी बघू शकेन, असं वाटलंच नव्हतं मला.`` ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकत म्हणाली.
``खरंच. माझ्या मनातलं बोललीस. मी तुला मधल्या काळात धीर देत होतो, पण मनातून पार खचून गेलो होतो. आपण कधी एकत्र येऊ, ही आशाच सोडून दिली होती.`` त्यानं हळूच डोळे पुसले.
``नशीब आपल्याला कुठेकुठे घेऊन जातं, नाही? तुला सांगू, नशीब वगैरे गोष्टींवर आधी माझा कधीच विश्वास नव्हता. `माझी वेळ चुकली,` `नशीबात असेल ते मिळतंच`, वगैरे गोष्टींची टर उडवायचे मी एकेकाळी. पण तुझ्याशी भेट झाली आणि मी हळूहळू बदलत गेले.``
``केवढी कचाकचा भांडली होतीस, पहिल्याच दिवशी माझ्याशी, आठवतंय? ह्या मुलीचं पुन्हा आयुष्यात कधी तोंड बघायचं नाही, असं ठरवलं होतं मी!``
``हो, मीसुद्धा!`` ती हसून म्हणाली.
``चोराच्या उलट्या बोंबा!``
``का? तुझी काहीच चूक नव्हती त्या दिवशी?``
``अजिबात नव्हती! रांगेत मीच पुढे होतो. तू उशिरा आली होतीस!``
``आता पुन्हा त्यावरून भांडणारेस का आज माझ्याशी? चार वर्षं झाली त्या गोष्टीला. त्याच्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय साहेब!``
``हो, आपण पुन्हा भेटलो तेव्हा पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यातच अडकलो होतो. तेव्हासुद्धा मला बघून तोंड फिरवलं होतंस तू. पण दुसरा काही पर्यायच नव्हता, म्हणून माझी छत्री, माझा रुमाल, माझी गाडी, सगळंच घेतलंस.``
``आणि तुझं मनसुद्धा, ना?``
``शी! खूपच पांचट होता हा!``
``असू दे. तुझ्याकडूनच शिकलेय!``
``विषय बदलू नकोस. बरं, नेलंस ते नेलंस, दुसऱ्या दिवशी वेळेवर आणूनसुद्धा दिलं नाहीस!`` त्यानं पुन्हा तिची खोडी काढली.
``हो क्का? बरं! मग आत्तासुद्धा तुझीच गाडी घेऊन मी घरी जाते. तू ये चालत.`` ती फणकाऱ्यानं उठली.
``अगं अगं! रागावतेस काय नुकतंच प्रेमात पडल्यासारखी? साडेतीन वर्षं झाली आपण प्रेमात पडून. आज आपलं लग्नसुद्धा झालंय. इथे मस्त समुद्रावर आलोय, जरा बसूया निवांत. गप्पा मारू. घरी जाऊन पुन्हा भांडायचंच आहे! `` त्याच्या या वाक्यावर तिला हसायचं नव्हतं, पण तिला ते आवरता आलं नाही.
``स्वीट रास्कल आहेस तू. कितीही टोकाचं भांडण झालं, तरी दोन मिनिटांत नॉर्मलला येतोस आणि माझी समजूत काढतोस. तुझ्या याच स्वभावावर फिदा झालेय मी.``
``आणि मी तुझ्या वस्सकन अंगावर येण्यावर!`` त्यानं पुन्हा तिला चिमटा काढला.
``आपल्या भांडणाचं काही टेन्शन नाही रे, पण आपल्या घरच्यांची भांडणं कधीच मिटणार नाहीत, याची काळजी वाटतेय मला. माझ्या नशीबात सासरचे आणि माहेरचे दोन्ही नातेवाईक नसणारेत, यापुढे कधीच.``
``थोड्या दिवसांनी होईल सगळं सुरळीत. काळजी नको करू.``
``नाही होणार. मी दोन्ही घरच्यांना ओळखते. त्यांच्या मनातला आपल्याबद्दलचा आणि एकमेकांबद्दलचा राग बघितलाय मी. आणि खोट्या आशेवर जगायला मला नाही आवडत.``
``हं. खरंच आहे. आपल्या नशीबात ते नव्हतं, असं म्हणू आणि आपलं आयुष्य जगायला लागू.``
``करेक्ट बोललास. आणि मला कसलीही खंत नाहीये. घरच्यांचे आशीर्वाद मिळाले नसतील, पण रीतसर रजिस्टर लग्न झालंय आपलं. आता आयुष्यभर तू माझ्याबरोबर आहेस ना, मग बास! तुझी साथ असेल, तर नशीब साथ देईलच!``
ती त्याच्या मिठीत शिरली आणि त्यालाही भरून आलं.
...
संध्याकाळी समुद्राजवळच्या रस्त्यावर भरपूर गर्दी जमली होती. नुकताच एक भीषण अपघात तिथे झाला होता. पोलिसांचा घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. अपघात झालेली बससुद्धा एका इलेक्ट्रिक पोलवर धडकलेल्या अवस्थेत तिथेच उभी होती. तिच्या चाकापाशी रक्ताचं थारोळं साचलेलं दिसत होतं.
कुणीतरी शेजारच्या माणसाला म्हणत होतं, ``दोघं जण गेले म्हणे. आजच लग्न झालं होतं त्यांचं. बिच्चारे! समुद्रावर फिरायला आले होते. घरी जात असताना एकदम बसचे ब्रेक फेल झाले आणि या दोघांना धडक बसली. दोघंही ऑन द स्पॉट खलास!``
शेजारी म्हणाला, ``वाईट झालं. काय तरी नशीब असतं नाही एकेकाचं?``